(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • प्रमुख आहार सूत्र – भाग ८

    बालकांसाठी मातृस्तन्य सर्वोत्तम. आईचे नसेल तर दायीचे. नसेल तर गाईचे ! त्याच्यापुढे जाऊन म्हैशीचे दूध प्यायले तर कफ आणखीनच वाढेल. म्हणजे तेही नको.

    अजूनही काहीजणांना नेमकेपणाने कळले नाही. दूध प्यावे की नाही ? प्यावेतर दूध कधी प्यावे ?

    खरं सांगायचं तर आयुर्वेदीय दिनचर्येमधे तर सकाळी चहा पण नाही आणि दूध पण नको. दिनान्ते म्हणजे सायंकाळी चालेल. पण मग जेवणार कधी ? रात्री झोपतानासुद्धा दूध पिऊ नये. असा स्पष्ट कुठेही उल्लेख नाही. असल्यास लक्षात आणून द्यावा.

    काल सांगितलेल्या खाण्याच्या भरगच्च 'शेड्युलमधे' दुध प्यायला योग्य वेळ उरतच नाही. म्हणून शहरात रहाणाऱ्यांनी दुधाच्या फंदात न पडलेलेच बरे. त्यांनी सुटीच्या दिवशी तरी धारोष्ण दूध जिथे मिळेल अशा गोशाळेत पूर्ण दिवस जाऊन रहावे. गाईची सेवा करावी. सहवास मिळवावा. गाईच्या पाठी धावावे. त्यांचे शेण गोळा करावे. ग्रंथामधे तर इतके स्पष्ट वर्णन मिळते की, गाईला जव खायला घालावेत. आणि शेणातून पडणारे जव गोळा करावेत. आणि फक्त तेवढेच आहार म्हणून खावेत. पाण्याच्या ऐवजी गोमूत्र प्यावे. प्रमेहामधे गाईचे दूध औषध नाही. उलट मधुमेह वाढतो. एवढे लक्षात ठेवले तरी पुरेल. प्रमेहाच्या सर्व रूग्णांनी आपल्या खाण्यापिण्यातून दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ( साखर न घालतासुद्धा ) आणि दही बंद करावेत, आणि तीन महिन्यानंतर अनुभव घ्यावा.

    आता मधुमेह न झालेल्या लोकांच्या लोकभावना लक्षात घेऊन, दूध कधी प्यायचे हे सांगायचे झाल्यास सकाळी धारोष्ण प्यावे. किंवा सायंकाळी धारोष्ण प्यावे. पण कटाक्षाने पोट रिकामे हवे. त्याआधी किमान दोन ते तीन तास तरी पोटात काही गेलेले नसावे. किंवा दूध प्यायल्यावर पुढे दोन तास काही खाऊ नये. अगदी धारोष्ण नाही मिळाल्यास गरम करून घ्यावे.

    जेवणाच्या वेळी दूध घेतले तर पोट भरून जाईल. आणि पुनः विरूद्धान्नाचा दोष लागणारच. रात्रौच्या वेळी प्यायचे तर अग्नि नसताना पिणार म्हणजे पुनः पचनक्रियेवर ताण. तो पण दोष उत्पन्न होतो.

    शहरातून विकत मिळणारे दूध हे अनेक गाईंचे एकत्र केलेले, किमान चार ते पाच दिवसापूर्वीचे शिळे, प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवलेले, अतीशीत केलेले असते.

    तबेल्यात असणाऱ्या सर्व गाई निरोगी असतीलच, त्या कोणता चारा खात असतील, किती फिरत असतील, याची खात्रीदेखील देता येत नाही. आपल्याला जर निरोगी रहायचे असेल, तर आपण जे खाणार पिणार ते उत्तम प्रतीचे असायला नको का ?

    समजलं नसेल तर परत एकदा सांगतो, दूध पचायला जड असते. कफ वाढवणारे असते. पटकन नासणारे असते. म्हणून दूध हे आहारीय द्रव्य म्हणून नको. पण औषधी म्हणून वैद्य सल्ल्यानुसार चालेल. मधुमेह असणाऱ्यांनी दूध पिणे नकोच.

    इतरांनी दूध प्यायचेच असेल तर धारोष्ण किंवा सुखोष्ण. थंड फ्रीजमधले तर अजिबातच नको. अॅसिडीटी वाढल्यावर घेतले तर तात्पुरते बरे वाटेलही, पण अॅसिडीटी होऊ नये म्हणून नियमाने असे दूध पित असाल तर भविष्यात कफ आणि वात नक्की वाढणार.

    ज्यांना दूध सहजपणे पचते, ज्यांना मनापासून आवडते, त्यांना दूध प्यायचे असेल तर ते हळद, सुंठ, धने, जिरे असे काहीतरी पाचक मसाले घालून प्यावे. जेवण आणि दूध यामधे किमान तीन तासाचे तरी अंतर हवे. नाहीतर पोटात राडा ठरलेला.
    इति प्रमेहरोगांतर्गत दुग्धविषय समाप्तः ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.01.2017

  • शनिवारवाड्याच्या वास्तुशांतीला २८५ वर्षे

    मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २२ जानेवारी रोजी २८५ वर्षे पूर्ण झाली.

    त्या निमित्ताने शनिवारवाडय़ाची माहिती.

    पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. बाजीरावांचा महाल, सदर, दफ्तरखाना, फडणीस-चिटणीसांचा फड, जवाहिरखाना आणि भुयाराची विहीर असे शनिवारवाडय़ातील पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले होते. पूर्वी पेशव्यांचे कुटुंब लहान होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे वाडय़ाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाडय़ाला तटबंदी करण्याचे ठरविले. मात्र, पुण्यामध्ये पेशव्यांनी कोट बांधला तर सिंहगडाला शह बसेल अशी भूमिका घेत सचिवांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तटबंदीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश आले. मात्र, नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाडय़ावर शत्रूकडून घातपाती कृत्ये तसेच हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन तटबंदी उभारण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पायाच्या दगडकामावर विटांचे बांधकाम करून तटबंदी उभारण्यात आली, शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून, त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा अजून सुस्थितीत आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.

    p-32685-Shaniwarwada-01१८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्ट र हेन्रीत डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणार्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

    p-32685-Shaniwarwada-01शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळीशंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसर्यास टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.

    -- संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • चाळिशी गाठल्यावर काय खाल?

    चाळिशीपर्यंत सगळेच जण आरोग्याकडे दुर्लक्षच करीत असतात. चाळिशी पार केली की मग मात्र शरीर धोक्याची घंटा वाजवायला लागतं. ती वेळेवर ऐकली आणि आहाराविहारात वयानुरूप बदल केले तर पुढचे अनेक धोके टाळता येतात.

    दिवसेंदिवस मानवी जीवन खूपच वेगवान, धावपळीचे होत चालले आहे. एक काळ शहरी व ग्रामीण, जीवनात खूप वेग नव्हता; ‘वाघ मागे लागल्यासारखी’ धावपळ नव्हती; रात्रपाळी हा रोजचा जीवनमंत्र नव्हता; जेवण बहुधा घरचेच असे; पण आता सगळ्यांचीच जीवनशैली बदललेली आहे. आत्ताच्या ‘फास्ट’ युगात मानवी जीवनाचे सहा टप्पे करता येतील. पाच वर्षांपर्यंतचे शिशुजीवन, पंधरा-सोळा वर्षांपर्यंतचे बाल व नवतरुणाचे जीवन, अठरा ते पस्तीस-चाळिशीपर्यंत ऐन तरुणाईचा काळ, चाळीस ते साठपर्यंत तारुण्य व जबाबदारी असा सुंदर मिलाप असणारा; आयुष्यात काहीतरी निश्चित घडविण्याचा काळ; साठीनंतर ऐंशीपर्यंत ‘फ्रुटफुल’ आयुष्य जगण्याचा निवृत्तिकाळ व त्यानंतरचे नव्वदी-शंभरीपर्यंतचे ‘बोनस लाइफ’ यातील सर्वात महत्त्वाच्या चाळिशीनंतरच्या तरुणाईच्या निरंतर आरोग्याकरिता आहार, विहार व व्यायाम कसा असावा हे पुढील लेखात आपण पाहत आहोत.

    आपला व्यवसाय व नोकरीधंदा चालू असताना वय वर्षे चाळीस-पंचेचाळीसपर्यंतचा काल हा ऐन तारुण्याचा, कर्तृत्वाचा, हिमतीचा, आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करण्याचा, भविष्याबद्दल फिकीर न करता एका विशेष मस्तीत पौरुषत्वाने संपूर्ण जीवन, पुरेपूर रस घेऊन जगण्याचा काळ आहे. हा काल पित्ताचा काळ आहे, ऊर्जेची गरज असणारा व ऊर्जा खर्च करण्याचा काळ आहे. या काळांत कितीही आव्हाने, संकटे, अडचणी, प्रश्न उभे राहोत, ते पेलण्याची, त्यांना तोंड देण्याची हिंमत शरीर व मनाची असावी. असे आरोग्य निसर्गत:च अपेक्षित असते. ‘फरशीवर पडलो तर फरशीला खड्डा पडेल, मला काही होणार नाही,’ अशी हिंमत बांधूनच पुढे जावे लागते. या काळात कमावलेले शरीर व मन पुढील उतरणीच्या काळांत साथ देणारे असते. त्याकरिता कर्तृत्व दाखवता येईल याकरिता पुरेशी ऊर्जा, बलदंड शरीर कमवायलाच हवे व त्याचबरोबर पुढील आयुष्याकरिता उपयोगी पडेल असे काटक शरीर व नाना मगजमारीकरिता सामना देईल असा ‘वरचा मजला’ सक्षम हवा. या सक्षमतेकरिता संगतसुद्धा चांगलीच हवी. गृहस्थाश्रमाचा आदर्श कसा असावा, हे सांगणारे कविवर्य मोरोपंत काय म्हणतात?

    सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो ।
    कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।।

    आजकाल सकाळी पहाटे उठून फिरायला जाण्याची मोठीच ‘क्रेझ’ फक्त वृद्धातच नव्हे तर तरुणाईमध्येही आहे; ही मोठी आनंदाची बाब आहे. अलीकडे लहान-मोठय़ा शहरात जिममध्ये जाऊन, पैसे मोजून, शरीर कमावण्याचे प्रयत्न वाढत आहेत. पूर्वी घरच्या घरी सकाळी उठल्या उठल्या; ‘आईच्या नावाने दोन, वडिलांच्या नावाने दोन व देवाच्या नावाने दोन’ असे सहा सूर्यनमस्कार घातले जात. असे सूर्यनमस्कार किती ‘जिमवाले’ घालतात? अशा सहा सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करावी; रोज एक-एक याप्रमाणे वाढवत किमान चोवीस-पंचवीस सूर्यनमस्कार सकाळी घालावेत. नंतर स्वस्थपणे दोन-तीन मिनिटे दीर्घश्वसन-प्राणायाम करावा. आवश्यकतेनुसार पश्चिमोत्तानासन, अर्धवज्रासन, कमान, मानेचे व्यायाम व सर्वात शेवटी शवासन करावे. या सगळ्यांकरिता बारा ते पंधरा मिनिटे पुरेशी होतात. हा व्यायाम आपल्या आयुष्यभरची आरोग्य इस्टेट कमावण्याकरिता नेहमीच साथ देतो.

    कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणांत तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे.

    चाळिशीच्या आसपास पोचलेली व्यक्ती, मग ती व्यापारी वा नोकरदार असो; व्हाइट कॉलर वा ब्लू कॉलर असो; धनवान वा हातावर पोट असणारा मजूर असो; शेतात, रस्त्यावर, खाणीत, खाडीत राबणारा; श्रमसंस्कृती जपणारा कर्मचारी असो. या सर्वाना रोज किमान दहा-बारा तास काम करावेच लागते. कामाच्या मानाने शरीराला दर क्षणाला ऊर्जेची, ‘पेट्रोलची’ गरज, शरीराची गाडी नीट चालविण्याकरिता लागते. आयुर्वेदात ‘अन्नं वृत्तिकरणां श्रेष्ठम्’ असे शास्त्रवचन आहे. कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणात तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात जे रोग त्रास देऊ शकतात असे मधुमेह, स्थौल्य, आमांश, आमवात, संधिवात, मूळव्याध, प्रमेह, हृद्रोग, रक्तदाब, दमा, स्थौल्य, अर्धागवात, सायटिका, सूज, मूत्रपिंडाचे विकार, ग्रहणी, अग्निमांद्य, पोटात गॅस धरणे, बुद्धिमांद्य, त्वचाविकार या सगळ्या विकारांना शरीरांत साठवायला थारा द्यायचा नसेल तर ‘ज्वारी सकाळी व जोंधळा सायंकाळी’ असे प्रमुख अन्न असावे. ज्वारीत फाजील कोलेस्टरॉल नाही, याउलट पोट भरण्याकरिता व कितीही श्रम शरीराला सहन होतील अशी ऊर्जा आहे. त्याला तेल तूप लागत नाही. शिळी भाकरी झाली तरी खराब होत नाही. नुसत्या पाण्याबरोबर ज्वारीची भाकरी खाता येते. क्वचित ज्वारी थंड पडते, त्यांनी त्यात बाजरी मिसळून भाकरी करावी. बाजरीत ज्वारीचेच गुण आहेत. पण बाजरी उष्ण आहे. काहींना बाजरी खाल्ल्यावर शौचाला रक्त पडते. बाजरीची भाकरी तारतम्याने वापरावी, शक्यतो ज्वारीचाच वापर करावा. ज्वारीचे मी कितीही गुणगान केले तरी लोक गहू वापरणारच, कारण घरोघरी, हॉटेलमध्ये, बेकरीच्या पदार्थात सर्वत्र गहू आहेच. हा गहू महाराष्ट्रात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आला व त्याने आमच्या मोठमोठय़ा ज्वारीला दुय्यम स्थान दिले आहे. स्थूल व मेदस्वी व्यक्तींनी सुकी चपाती आणि कृश व वातप्रधान व्यक्तींनी व्यवस्थित तेल घालून गव्हाची पोळी खावी. भावी आयुष्यात ज्यांना मधुमेहाचे भय आहे त्यांच्याकरिता मेथीपोळी व आमांश, आमवात, मलावरोध, संधिवात, सायटिका, फ्रोजन शोल्डर यांच्याकरिता एरंडेल पोळी आहे. पण ऐन तारुण्यात या सवयी लावून घेऊ नयेत. ज्यांना भाताशिवाय चालत नाही त्यांनी शक्यतो जुना तांदूळच वापरावा. मिळाला तर हातसडीचा तांदूळ वापरावा. त्यामुळे शरीरात नाना तऱ्हेचे सूजेचे विकार होण्याची कारणे टळतील. नवीन तांदळामुळे आमांश, सर्दी, कफ हे विकार बळावतात. नाचणी किंवा नागली हे धान्य अशक्त व्यक्ती, हलका कोठा असणारे, दीर्घ काळचा ताप वा अन्य आजारांतून उठण्याकरिता आहे. भरपूर श्रम करणाऱ्यांकरिता त्याची गरज नाही.

    कडधान्य त्यांत तूर, मूग, मसूर, उडीद, हरभरा, वाटाणा हे सगळे पचवायची तारुण्यात पचनशक्ती असावयास हवी. पोटांत वायू धरू नये म्हणून त्यांच्याबरोबर आले, लसूण, जिरे अशी योजना असावी. पालेभाज्या, फळभाज्या या ऋतुमानानुसार सर्वच खाव्यात, पचवाव्यात, बटाटा व कांदा हे सर्वाचेच रोजचेच आवडीचे असो-नसो, गरजेचे तोंडी लावण्याचे अन्न आहे. यांतील कांदा हा अधिक चांगला. त्यात रोगप्रतिकारशक्तीआहे. भाज्यांमध्ये लसणीचा वापर न करिता स्वतंत्र लसूण नियमितपणे खाल्ला तर भावी आयुष्यांत ‘दर क्षणाला टिकटिक करीत चालेल असे हृदयाचे घडय़ाळ’ कधीच दगा देणार नाही. याप्रमाणेच जेवणात आले असेल तर आमाशय म्हणजे पोटाचे स्वास्थ्य नीट राहील. माझ्या लहानपणात खूप फळे खावयाची सार्वत्रिक सवय नव्हती. अलीकडे फळांचे बंड खूप माजले आहे. ऋतुमानानुसार सर्वच फळे चांगली. दीर्घायुष्याकरिता फलाहार जरूर असावा. त्यातल्या त्यात पपई, डाळिंब, ताडफळ, सफरचंद, वेलची केळे, पांढरे खरबूज, नारळाचे ओले खोबरे, अंजीर, केमिकल्सवर न पोसलेली गोलाई असलेली आंबट नसलेली द्राक्षे, अननस यांचा तारतम्याने व खिशाला परवडेल असा वापर करावा. दैनंदिन आहारात फाजील तेल, तूप, मीठ, मिरची, तिखट मसाला नसावा. डालडा किंवा तत्सम वनस्पतिजन्य तेल टाळावेच. कारण त्यामुळे केस, दृष्टी, हृदय, मेदसंबंधी विकार नक्कीच बळावतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.लोकप्रभा/ वैद्य प. य. वैद्य खडीवाले

  • प्रमुख आहार सूत्र – भाग ५

    दुध उत्तम प्रतीच्या उत्तम गाईचे जरी असले तरी ते पचवायला प्रकृती आणि भूक तेवढीच उत्तम लागते. पुनः आवडायला हवे. आणि अन्य अन्नाची त्यात भेसळ नको.

    बालकांची गोष्ट वेगळी. त्यांना अक्कल फुटेपर्यंत आवड निवड तशी कळत नाही. प्रकृती समजत नाही, भूक सणसणीत असते. मातृस्तन्याखेरीज अन्य काही पोटात जात नाही. फक्त दूधच पोटात गेले तरी वय कफाचे असले तरी दूध सात्म्य असते. पचते. पण जसजसे वय वाढू लागते, तशी बालकाची अवस्था बदलते. क्षीराद पासून अन्नाद अवस्था येत जाते. अन्य पदार्थ पोटात जाऊ लागतात. या अन्य पदार्थातील द्रव्यांचा संपर्क दुधाशी येत जातो आणि परिणाम बदलत जातात. जे दूध पचायला सोपे असते, तेच अन्य पदार्थांच्या उपस्थितीमुळे पचायला जड होत जाते. आणि अग्निमांद्य निर्माण होते.

    जलोदरासारख्या आजारात, अनुभवी वैद्यांकडून रुग्णाला केवळ गाईच्या दुधावर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तो याच कारणासाठी. अन्य कोणत्याही स्वरूपाची भेसळ दुधाशी होत नाही. त्यामुळे नुकसान न होता फायदा होतो. पण आज आपल्या खाण्यामधे एवढी भेसळ होत चालली आहे की, दुधाला पचल्यानंतर आपले गुण दाखवण्यापुरतेसुद्धा शुद्ध रहाता येत नाही.

    गाईचे दूध अमृततुल्य म्हणजे अमृताप्रमाणे असते. कितीही झाले तरी आईसारखे असणे आणि आई असणे यात फरक आहेच ना ! तसेच गाईचे दूध कितीही अमृतासारखे असले तरीदेखील मीठाच्या चिमटीने अगदी गाईचे दूध सुद्धा नासतेच ना. तसेच आहे.

    प्रमेह नावाचा मुख्य आजार. त्याचे वात पित्त कफानुसार वीस प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह. एवढी रोगाची व्याप्ती असताना आज फक्त टाईप ए आणि टाईप बी म्हणून विषय सोडून देऊन चालणार नाही ना.
    प्रकृतीनुसार, रोगाच्या लक्षणानुसार, मधुमेहाच्या उपप्रकारानुसार रोग्याचे पथ्यापथ्य आणि औषध बदलत जाते. आणि याचा योग्य निर्णय केवळ वैद्यच घेऊ शकतो.

    व्यवहारामधे बालक आणि योगी तपस्वी यांच्या खेरीज इतरांना दूध पूर्णान्न नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. त्यांना जगण्यासाठी अन्य आहारीय पदार्थांचा समावेश आवश्यक आहे. बुद्धिमान मुले बनवण्यासाठी मुलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना दूध देऊ नये. आज नको ते फॅड आले आहे. दुध पचायला जड तर आहेच त्यात आणखी बदाम.
    म्हणजे गर्भावस्थेत काही पथ्यापथ्य पाळायचे नाही, आणि पोरांच्या पोटावर नंतर अत्याचार करायचे. असो. हा वेगळा विषय होईल.

    जर्सी, हाॅस्टीन एचएफ या तर गाईच नव्हेत, तर गाईसारखे दिसणारे जंगली, संकरीत, विदेशी प्राणी आहेत. यांचे दूध पिण्यायोग्य तर नाहीच, चहात सुद्धा नको. एकवेळ म्हैशीचे दूध वापरले तरी चालेल, पण हे जंगली, विदेशी प्राणी कधीच नकोत. म्हैशीचे दूध पचायला जड असतेच. पण त्यात सुंठ, मिरीसारखे पदार्थ घालून उकळले तर दोष थोडे कमी होतात.

    एखाद्या शरीरात प्रमेह होण्यासाठी पूरक वातावरण तयार केव्हा आणि कसे होते, ते सांगताना दुधाबद्दल ग्रंथकार म्हणतात, दुध आणि दुधाचे पदार्थ यांना जर शरीराने पचवले नाही तर भविष्यात प्रमेहाचा एखादा प्रकार नक्कीच भेटीला येणार.

    गाईना रानात फिरवून आणणे, त्यांना चारा पाणी देणे, आंघोळ घालणे, त्यांचे दूध काढणे, त्यांच्या वासरांना खेळवणे, हे सहजपणाने जे करतात, त्यांना दूध सहज पचते. यांनी दूध प्यायला काहीच हरकत नाही. नव्हे यांनी दूध प्यायलाच हवे.
    अतिप्रमाणात ज्यांना दूध प्यायची सवय आहे, आणि काम काहीही करणार नाहीत त्यांनी देशी गाईचेच दूध जरी प्यायले, तरी प्रमेहाने धरलेच म्हणून समजा.

    दूध पिणाऱ्यांनी गाईंची सेवा केलीच पाहिजे. सेवा इतरांनी करायची, मी फक्त मेवा खाणार, त्याला प्रमेह नक्की होणार.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.01.2017

  • अजीर्ण

    न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच |
    तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः |

    सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. ‘डॉक्टर, मला अजीर्णाचा त्रास आहे.’ अशी तक्रार प्रत्येक डॉक्टरांकडे घेऊन दिवसांतून एखादा तरी रुग्ण सर्रास पहायला मिळतो. साधारण २५ टक्के तरी लोक अजीर्णाने ग्रासलेले आहे.

    आता आपण जर ही पाश्चाेत्य जीवनशैली बदलून आपली भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले नाही, तर ही टक्केवारी वाढत जाईल. अजीर्णाचे रुग्ण वाढतील व त्याचबरोबर अजीर्णाने मोठ-मोठ्या आजारांना आमंत्रण मिळेल.

    अजीर्णाची कारणे
    विषमाशन – आयुर्वेदामध्ये आहार हा कधी घ्यावा, कसा घ्यावा, कीती घ्यावा, कुठल्याक्रमाने घ्यावा, कुठल्या संयोगाने घ्यावा, कीती शिजलेला घ्यावा व कोणत्या विधिनुरूप घ्यावा याचे काही नियम सांगितलेले आहे. पण आपण मात्र या नियमांविरुद्ध जेवण घेतो यालाच विषमाशन म्हणतात. आज बहुतांशी आई-वडिल दोघेही काम करतात. त्यामुळे जेवण हे एकदाच बनवले जाते व तसेच ते फ्रीजमध्येही ठेवले जाते. संध्याकाळी आल्यावर मायक्रोव्हेवमध्ये गरम केले की झाले. पण या सवयीमुळे आपली फ्वन शक्ती कमी होते. ‘रेड टू यूज’ पॅनटचा जास्त वापर घरात व्हायला लागला. क्षारयुक्त व रसायने वापरून टिकवलेल्या पदार्थांमुळे पौष्टिकता कीती? बर्यासचवेळा सकाळी डब्यासाठी शिळेच अन्न नेले जाते. ताज्या फळाऐवजी ‘फेव्हरेट जूस’लाच सगळ्यांची जास्त पसंती आहे. भाज्यापण आठवड्याभराच्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यामुळे ताजेपणाचा विचार हा केलाच जात नाही. वेळेअभावी जीवनशैली बदलली, पण आजारही वाढले.

    आज हॉटेलमध्येही सर्रास खाणे-जेवणे वाढले. भाजी, मांस, मटण याची स्वच्छता, निवडणे हा विचार तर केलाच जातच नाही. जीभेला बरे लागते ना मग झाले. खाली आसनमांडी घालून शांत जेवणे ही प्रथा तर आता नष्टच झालेली आहे. हॉटेलमध्ये म्हटलं की परत वर खुर्चीवर बसून गप्पा गोष्टी करत टीव्ही पाहत जेवले म्हणजे आपण काय खातो व कीती खातो याचा तर अंदाजच लागत नाही. फॅशन म्हणून चिकन-मटण खाऊन परत वर आणि आईस्क्रीम खातात किंवा स्वीट डीश खातात. परिणामतः शरीरात कफदोष वाढतो व खालेले पचत नाही व सर्दी, खोकला सारखे त्रासही होतात.

    त्याचप्रमाणे हल्ली आपण संध्याकाळी कामावरून घरी येताना समोसा, वडा, केक, भजी यासारखे पदार्थ आणतो, म्हणजे जेवणापूर्वी खाल्ले जाते. जेवण बनवायला उशीर असल्याने हा पर्याय निवडतात. पण याने होत काय तर साहजिकच रात्री उशिरा जेवले जाते. त्यानंतर सोफ्यावर आडवे पडून मालिका बघण्यात अभ्यास करण्यात चॅट करण्यात वेळ घालवतो. जेवणं होईपर्यंत मध्यरात्र होते व आपण लगेच झोपतो. त्यामुळे खाल्लेले जेवण पोटात तसेच पडून राहते. रात्रीचे अन्न पचन नाही. त्यामुळे सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ नसल्यास निरुत्साह वाटतो. परत सकाळी बाहेर पडायच्या गडबडीत नाश्ता करतो किंवा तसेच बाहेर पडतो. मग दुपारी आणलेला डबा भूक लागू दे किंवा न लागू दे वेळ झाली की खातो. पौष्टिक अन्न जरी असले तरी शांतचित्ताने न जेवल्यास किंवा टेन्शन, राग, दुःख, भीती अशा भावना मनात असल्यास पचन नीट होत नाही व खाल्लेले अंगाला लागत नाही.

    वेगविधारण – खाल्लेले अन्न पचते की आपल्याला सपाटून भूक लागते, सकाली उठल्या उठल्या शौचास जाण्याची संवेदना होते, पण सकाळी शौचास न झाल्याने अवेळी होते व मग वेगाचा धारण केला जातो व दोष प्रफुल्लित होऊन पचनसंस्था बिघडते.

    दिवास्वाप – रात्रीजागरण – आपल्या जीवनाचं सगळंच वेळापत्रक बदलल्याने आपण रात्री उशिरा झोपतो व ती झोप पुरी करण्यासाठी दिवसा झोपतो. अति गुरु-शीत-स्निग्ध-विदाही अशा आहाराचे सेवन करणे या सर्व कारणांनी अग्निमेद होतो आणि अजीर्ण ही व्याधी उत्पन्न होते.

    काही वेळा द्रवरूप पित्त वाढते. प्रफुल्लित झालेले पित्त व कफाने अवरोध होऊन अन्न पोटात पडून राहते. पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे कोष्ठाच्या इतर भागात प्रक्षोभ होऊन भूक लागल्यासारखी वाटते. ही खरी भूक नव्हे. अशावेळी आहार घेतला जातो व साहजिकच अजीर्णाची उत्पत्ती होते. म्हणूनच खूप खाल्लेतरीही अंगाला लागत नाही.

    अजीर्णाची सामान्य लक्षणे
    भूक न लागणे, तोंडास चव नसणे, पोट जड वाटणे, पोटात आवाज येणे, गॅस होणे, कधी पातळ संडास कधी मलावरोध, अंग दुखणे, अंग जड होणे, डोके दुखणे, भरभूर जांभया येणे, अंग मोडल्याप्रमाणे होणे.

    आमाजीर्ण असल्यास कफ वाढतो व थोडसेही खाल्ले तरी पोटजड होते. रुग्णास अम्लरहित अशा किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रस गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.

    विदग्धाजीर्ण – पित्तप्रकोपाने विदग्धाजीर्ण होते. घशाशी आबंट, तिखट, कडवट येणे, छातीत पोटात जळजळणे, जास्त घाम येणे व तहान फार लागणे. अशी लक्षणे दिसतात.

    विष्टब्धाजीर्ण – या प्रकारात वायू व पुरीष यांचा अवष्टंळ होतो. विविध प्रकारच्या वेदना, आध्यान, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात.

    अजीर्णामध्ये घ्यायाची काळजी व उपचार
    अजीर्ण झाले असता, सर्वप्रथम खाल्लेले अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत उपाशी रहावे. नंतर जसजसा अग्धी वाढेल, भूक लागेल त्याप्रमाणात, विविध प्रकारचे यूश, लिंबू सरबत, ताक, पेया, फलरस आणि द्रवाहार द्यावा.

    जेवणाच्या वेळा चुकवू नये. दुपारचे जेवण १-२ च्या दरम्यान व रात्री शक्यतो ९ च्या अगोदर. भूक नसल्यास जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्यावर सैंधव घालून चघळावा. रात्री नुकतेच सॅलाड वैगेर खाऊ नये. अन्न शिजवूनच खावे.

    जमत असल्यास आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. साबुदाणा खिचडी खाऊन नव्हे, तर पोटाला पूर्ण विश्रांती द्यावी. जेवताना शांत चित्ताने, एकाग्रतेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटातल्या जेवणावर भरपूर प्रेम करावे.

    औषधी द्रव्यांमध्ये त्रिटकू, पंचकोल, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, आमपाचक वटी, भास्कर लवण उपयुक्त ठरतात.

    आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आहारासंबंधी नियम पाळल्यास अजीर्णाचा त्रास होणार नाही. आहाराचे योग्य तर्हेंने पचन होऊ लागले म्हणजे अजीर्ण होत नाही. शुद्ध ढेकर, उत्साह वाटणे, मलमूत्रादिंचे वेग योग्य प्रकारे येणे, चांगली भूक लागणे, शरीर लाघव प्राप्त होणे ही अन्नाचे संपूर्ण पचन झाल्याची लक्षणे होय व पर्यायाने अजीर्ण न घेण्याची.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ.मनाली महेश पवार

  • नाचता नाचता व्यायाम

    एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. मुळात होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. एरोबिक्स सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच! एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. एरोबिक्समध्ये ‘फ्लोअर एरोबिक्स’ व ‘बेंच एरोबिक्स’ असे दोन प्रकार आहेत. फ्लोअर एरोबिक्समध्ये सुरुवातीला ‘वॉर्म अप’ व्यायाम करावे लागतात. यातही नुसते कसेही हात-पाय हलवून चालत नाही. वॉर्म अपच्याही ठरलेल्या स्टेप्स असतात. त्यालाच जोडून ३० ते ४० मिनिटे पोटावरील स्नायूंना (अॅअब्ज) तसेच कमरेखालच्या व वरच्या शरीराला व्यायाम दिला जातो.

    एरोबिक्स मध्ये वॉर्म अप असतोच. पण प्रत्यक्ष व्यायाम ‘बेंच’वर म्हणजे ठरावीक उंचीच्या मोडय़ांवर साधारण ३० मिनिटांसाठी असतो. कमरेखालचे आणि वरचे शरीर व हृदय यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. यात बेंचच्या स्टेप्स चढणे व उतरण्यात पायांचाही खूप वापर होतो. झुंबा आणि बॉलीवूड डान्स झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर पाय आपसूक थिरकायला लागतात आणि नाचायचा हुरूप येतो. ७-८ वर्षांपूर्वीपासून झुंबा आपल्याकडे आला आणि हळूहळू लोकप्रियही होऊ लागला. बॉलीवूड डान्समध्येही वॉर्म अप चुकत नाही. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. एरोबिक्स, झुंबा आणि बॉलीवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार करताना नाचाच्या स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा ५५ मिनिटे ते १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत ‘कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते.

    त्यामुळे शरीराला होणारे फायदे असे. * हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवू लागते. * नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात. (स्नायूंचे टोनिंग) * नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. * शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते. * इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके, ताजेतवाने वाटू लागते. * उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात. * एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. * चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायामही सुचवले जातात. व्यक्तीला मुळात ज्या कारणासाठी व्यायाम करायचा आहे ते लक्षात घेऊन नाचाबरोबर इतर प्रकारच्या व्यायामांचा योग्य मेळ घालता येतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- लोकसत्ता / डॉ. पलक कुलकर्णी

  • प्रमुख आहार सूत्र – भाग ७

    काही प्रश्न काही जणांच्या मनात काल उपस्थित झाले.........
    आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत,
    आमचा प्रोटीन्सचा सर्वात मोठा पर्याय म्हणून आम्ही दुधाकडेच पहात होतो,
    मग आम्ही असे पौष्टिक दूध पिणे बंद करायचे का ?

    असे भावनिक होऊन नाही चालणार ! दूध म्हणजे अमृततुल्य आहे, हे जरी सत्य असले तरी व्यवहार पण लक्षात घ्यावा. दूध पचायला जड असते. टिकाऊ नाही. जरा दुसरा हात लागला तरी नासते, एवढे नाजुक आहे.
    लहर आली तर प्यावे. उपास असेल तर प्यावे, भूक चांगली असेल तर प्यावे. पण दूध नियम करून पिऊ नये.

    आम्ही सकाळी चहा पिणार, त्यात मैद्याची बिस्किटे बुचकळून खाणार, नंतर भरपेट नाश्ता करणार, दुपारी परत जेवणार, मधे एखाद्या औषधांचा डोस अगर टाॅनिक, अॅण्टी ऑक्सीडंटचा डोस घेणार, आणि विसरलोच, सकाळी चहा अगोदरचा एलोवेरा आवळा करेला ज्युस. दुपारी अगदी वेळेत जेवणार. जेवणानंतर तांब्याभर पाणी पिणार. जेवणानंतर घ्यायच्या औषधी. पुनः त्याच्या बरोबर भांडभर पाणी. नंतर तासभर झोपणार. परत तीन चार वाजता फक्त कपभर चहा. अधे मधे चहा होतो तो वेगळाच. त्यावेळी पुनः म्हणे शुगर फ्री मारी नाहीतर एखादी खारी. दर तीन चार तासांनी खाल्ले नाहीतर म्हणे अॅसिडीटीच वाढते, असं डाॅक्टरनीच बजावून सांगितले आहे, म्हणून सायंकाळी सहा वाजता परत काहीतरी लाईट नाश्ता. मधल्या वेळेचा औषधांचा डोस असतोच. पुनः बाजारात गेलो तर एखादा दाट लस्सीचा ग्लास. नशीब या ग्लासबरोबर अजून तरी चकना नाही . भूक लागल्याशिवाय जेवायचे नाही. हा नियम आम्ही हटकून पाळतो, त्यामुळे भूक लागेपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले असतात. म्हणून जेवण होते दहा वाजता.! आणि आयुर्वेदात रात्री झोपताना म्हणे दूध प्यायला सांगितले आहे. म्हणून परत झोपताना एखादा ग्लास दूध घेतले जाते. सकाळी उठल्यापासून पोटाचे मशीन चालूच. त्यात फळे भरणे, सॅलेडचा कचरा, हाय प्रोटीनच्या नावाखाली गिळलेले मांस, चवीला छान म्हणून मासे, डब्याची सोय म्हणून गव्हाची चपाती, आणि भरपूर पाणी.......
    आणि या डब्याच्या मधली जागा भरून काढण्यासाठी पौष्टिक दुध !!!!!??????

    किती अत्याचार करायचे ?
    तो जागा आहे, म्हणून निदान पचवतोय आणि आपण हिंडतोय फिरतोय ! एखादा दिवस जरी त्याने काम थांबवले की आजार पाठी लागतातच. दूध अत्यंत पौष्टिक आहे. यात वाद नाहीच. पण जे अत्यंत पौष्टिक असते, ते पचवण्यासाठी अग्निदेखील तेवढाच प्रखर लागतो.

    आहे उत्तम गुणाचे म्हणून काय सगळं एकदमच खाल्लं पाहिजे काय ?

    ग्रंथामधे जे लिहिलेलं असतं, ते अगदी कडक नियम म्हणून नव्हे तर एक आधार म्हणून लिहिले जाते, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
    काही सूत्रांचे भावार्थ, (जसे देव ह्रदयात असतो. )
    काहींचे लक्षार्थ, ( आम्ही काही अगदी तसे नाही हो )
    काहीचे शब्दार्थ ( मेहनत केल्याशिवाय प्रमेह नत होणार नाही. )
    तर काहींचे श्लेष लक्षात घ्यावे लागतात,( माहीतीये किती श्याणा आहेस ते !)
    नाहीतर क्लेष होतात.

    दिनान्ते पिबेत पयम् हा जो श्लोक सांगितला जातो, तो वैद्यकीय सुभाषितामधला असावा. ग्रंथातला नाही. हा नियम देखील सर्वसाधारण सांगितलेला आहे. सर्वासाठी आहे, असे नाही. त्याचे व्यावहारिक उपयोग वैद्य ठरवित असतो.

    आज अॅलोपॅथी डाॅक्टरदेखील, दूध पिताना सायीखालचे दूध प्यावे असे सांगतात. पण या प्रयोगाने शरीरातील सर्व स्निग्धत्व संपून जाते. स्नेह विरहित दूध पिऊन नुसते पोट भरेल, पण पोषण होणारच नाही. मग प्यायचेच कशाला ?

    दूध प्यायचेच असेल तर केवळ दूधच पिऊन रहावे. त्यावेळी दुसरे काहीही पदार्थ नको. हे कोजागिरी पौर्णिमेला विशेष लक्षात ठेवावे. भेळ भजी खातखात आटीव मसाला दूध प्यायले तर काय होणार ?
    पिताना गोड लागणार, पण पोटात जाऊन नासणार !
    मग कसे पचणार ?

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    23.01.2017

  • शेळ्या आणि बोकड यांचे वेगळे अर्थशास्त्र

    शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्‍यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्‍यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही. परंतु अशा चार-दोन किंवा दहा-बारा शेळ्या पाळणारे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेळ्यांना होणार्‍या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.

    हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्‍हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. तशी न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन ङ्गायदेशीर ठरू शकते.

    महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद (ङ्गोन ९४२२५६५३६५) हे नेहमी शेळ्या पाळणार्‍यांना एक आव्हान देत असतात. ‘२५ शेळ्या पाळा आणि मारुती कार पळवा’ अशी त्यांची घोषणा आहे. मात्र या २५ शेळ्या अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष आहे. आपण आता केलेला बोकडांच्या अदलाबदलीचा विचार याच दृष्टीने महत्वाचा आहे. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय ङ्गायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमानधपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात ङ्गारसा ङ्गायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्‍यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो. काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्‍याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्‍याला जास्त पैसे मिळतात.

    त्याचा ङ्गायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी प्रचंड मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्‍यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना ङ्गारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्‍यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे. एरवी हेच बोकड गावच्या आठवड्याच्या बाजारात पाच-सहा हजाराला सुद्धा जात नाही. विशेषत: बोकूड जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा किंवा चंद्राच्या कोरीच्या आकाराचा पांढरा ठिपका असेल तर अशा बोकडाच्या मालकाचे उखळ पांढरे झालेच समजा. दर बकरी ईद सणाला असे पांढरे ठिपके असलेले बकरे केवढ्याला विकली जात असते याची चर्चा होत असते आणि दर वर्षी अशा बोकडाच्या किंमतीनी खळबळ निर्माण केलेली आपल्याला दिसते.

    या वर्षी तर असे पांढरे ठिपकेवाली बोकडे लाखाच्या पुढे आणि दीड-दीड लाखापर्यंत गेलेली आहेत. तेव्हा शेळी पालकांनी जमेल तशी बकरी बकरी ईदसाठी राखून ठेवली पाहिजेत आणि पांढरा चॉंदवाला बोकड तर जीवापाड जपून त्याला मुंबईला नेऊन विकले पाहिजे. सोलापूर, नगर या भागामध्ये काही शेळी पालक हा व्यवसाय करतात आणि टेंपो भरून बकरे बकरी ईदला मुंबईत घेऊन जातात. हा एक अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा मुद्दा आहे. शेळी पाळणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षीच बकरी ईदच्या बोकडांच्या किंमतीची चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु ती ऐकून त्यापासून ते काही बोध घेत नाहीत. तसा तो घेतला पाहिजे आणि व्यापारी बुद्धीचा वापर करून चार पैसे जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर अभ्यास आहे.

  • मुंबईतला अभूतपूर्व गिरणी संप

    (डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)

  • सत्यनारायण नको जनता जनार्दन प्रसन्न करा

    हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.