वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
खावे. पण गरज असेल तर खावे.
खावे. पण आवडत असेल तर खावे.
खावे. पण हितकर असेल तर खावे.
खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे.
खावे. पण भूक असेल तर खावे.
खावे. पण पचवू शकत असेल तर खावे.
खावे. पण तयार करता येत असेल तर खावे.
खावे. पण जिभेला चव असेल तर खावे.
सगळ्या यातना काढतोय त्या पोट भरण्यासाठीच !
आणि आपल्या कृतीने जर..
पोटच बिघडत असेल तर, कशाला खावे ?
पचवू शकत नसू तर, कशाला खावे ?
गरज नसेल तर, कशाला खावे ?
आवडत नसेल तर, कशाला खावे ?
पिकतच नसेल तर, कशाला खावे ?
विकतचे आणून कशाला खावे ?
तोंडाला चव नसेल तर कशाला खावे?
केवळ आस्य आहे म्हणून ?
मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी मी, हे अन्न सेवणार ?
प्रत्येक घास खाण्यापूर्वी असा विचार करावा.
जीभ हा अत्यंत स्वार्थी अवयव आहे.
"मला बरं वाटतंय म्हणून मी खातेय,
इतरांना होणाऱ्या यातनांचे मला काय ?
असा अविचार जीभ करते.
ज्या एकीमुळे अवयवांची युती तुटत असेल, तिचे काय करायचे ? असे ठरवून बाकीचे सगळे अवयव त्याच्याकडे मागणी करतात, तो सर्व शक्तीमान तिला शिक्षा फर्मावतो, आणि जीभेची चवच काढून घेतो.
कठोर शिक्षा !
तिच्यावर बहिष्कार.
"तिला जे हवंय ते द्यायचं नाही, जोपर्यंत बाकीच्या अवयवांच्या यातना संपत नाहीत, पुनः युती होत नाही, तोपर्यंत तिला विसरून जा."
आणि तो तिची चवच काढून घेतो.
आता यापलीकडे जाऊन जो हट्टाने खाणार त्याला प्रमेहासारखी शिक्षा तोच देणार.
डाॅक्टरांकडे गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बघावीशी वाटते तीला. जीभेला. तपासायला दाखवायला सांगतात ती जीभ. तिला तपासल्यानंतर डाॅक्टरना सहज कळते, आत हिने काय काय घोटाळे करून ठेवले आहेत ते !
आणि डाॅक्टर देखील पथ्य सांगतात, जोपर्यंत अवयवांची तिच्याशी परत युती होत नाही, तोपर्यंत, हे अजिबात खाऊ नका. तमुक पिऊ नका.
हे युती तुटणे अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे ज्याला कळले तो तरला.
आपले पूर्वज देखील काही कमी खवय्ये नव्हते. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, एकाहून एक सरस पदार्थ तयार केले जात होते. ते लिखित स्वरूपात क्षेमकुतुहल सारख्या ग्रंथात पहायला मिळतात. त्यावेळेच्या पदार्थांची नावे संस्कृत मधील होती. आता बोलीभाषेत वेगवेगळी तयार झाली. आणि सर्व पदार्थ उत्तमात उत्तम द्रव्ये वापरून केले जात होते. साजूक तुपातल्या जिलब्या, गावठी गाईच्या दुधाची रबडी, घरातल्या चक्क्याचे रवाळ रसाला म्हणजे श्रीखंड, घरात जात्यावर ओव्या म्हणत दळलेल्या पीठाचे वडे किती सांगू ?
आता फक्त फरक एवढाच आहे की सगळे पदार्थ विकतचे, पामतेलात तळलेल्या जिलब्या आणि डालड्यात तळलेले कृत्रिम गुलाबाचा वास घातलेले गुलाबजाम. फरक आहेच ना !
जिभेचे चोचले नव्हते ते, त्यावेळची गरज होती. श्रम पण तेवढेच होते ना ! आता श्रम कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ अति झालेत. परिणाम आजुबाजुला दिसतोच आहे.
आणखी एक फरक लक्षात येण्याजोगा, तो म्हणजे पूर्वी पुरणपोळीसाठी होळी पौर्णिमेच्या दिवसाची वाट पहावी लागत असे. गुळपोळ्या फक्त संक्रांतीला, श्रीखंड फक्त पाडव्याच्या मुहूर्तावर. लग्न मुंज असेल तरच लाडू. नाहीतर नाही.
आता बाजारात केव्हाही जा.
जो जे वांछिल तो ते सर्व काळ !
सर्व मधुर रसाचे पदार्थ चाॅकलेट पासून गुलाबजाम पर्यंत, मुबलक प्रमाणात समोर हजर असतात.
आपल्या सणांची रचना त्या त्या वातावरणातील हवामानावर आणि उपलब्ध साधनसामुग्री वर केली गेली आहे. त्यामुळे त्यावेळी ते पदार्थ खायलाच हवे असतात. आता जानेवारी फेब्रुवारी मधे अगदी रथसप्तमी पर्यंत तीळाचे लाडू मिळतात, ते आत्ताच, या सीझनला खाण्यासाठीच असतात.
सणांच्या निमित्ताने खाल्ले तर मनाची, वातावरणाची, परवानगी घ्यायची बिलकुल गरज नाही.
नाहीतर नंतर या मधुर सुखाच्या यातना ठरलेल्याच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.02.2017
आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत.
आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो.
म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही.
जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. पण आजच्या काळात मात्र हे जिह्वालौल्य खूपच वाढलेले आहे. याचे अतिसुख प्रमेहाचे कारण ठरेल. याचेच नव्हे तर कोणत्याही गोष्टीतील अति सुख किंवा अति दुःख हे सुद्धा रोगाचे कारण आहे.
शिवलीलामृतामधे देखील वर्णिलेलं आहे.
अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण ।
अतिभोगं अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय।।
जिह्वा सुख म्हणजे मला जे आवडतं तेवढंच मी खाणार, बाकीचे नाही. मग ते हितकर असो, वा नसो. काही वेळा आपल्याला आवडत नसलं तरी एखादा पदार्थ आपल्याला खावा लागतो. त्यात आवड निर्माण करून खाल्ले तरच तो पचतो, नाहीतर नाही. आयुर्वेदातील बहुतांश औषधे न आवडणाऱ्या चवींची असतात. पण अंतिमतः सुख देणारी असतात, त्यामुळे कितीही वाईट तोंड करून प्यायला खायला लागली तरी हितकरच असतात, आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदीय औषधे कायमची घ्यावी लागत नाहीत. रूग्णाला खायला काय आवडतेय यापेक्षा, वैद्य जाणतो, रूग्णाचे हित कशामधे आहे. म्हणून पथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे !
आता या पथ्य अपथ्यामधे रुग्ण, वैद्याचे डोके खातो, हे वेगळं हं !
असो.
माझे हित कशात आहे, हे वैद्याला विचारून आपला आहार ठरवला तर मरेपर्यंत औषधांची गरज उरत नाही. यासाठी थोडा संयम पाहिजे मनावर. आणि मनावर संयम ठेवण्यासाठी जीभेवर....
म्हटलंच आहे ना,
जेणे जिंकिली रसना....
जिंकल्या साऱ्या वासना.
जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय सुद्धा !! वाक् इंद्रिय आणि रसनेंद्रीय !
एकाचे काम बाहेर टाकणे, जसे शब्द.बोलणे.
एकाचे काम आतमधे घेणे जसे अन्नपाणी. गिळणे.
नियंत्रित खाणे आणि विचारपूर्वक बोलणे हाच संयम. म्हणून या आत बाहेर वळवळणाऱ्या जीभेवर संयम ठेवला तरच सर्व इंद्रियावर संयम येतो. पटलं ना !
मला सर्व मिळतंय मग मी खाल्लं तर काय बिघडलं? मी भोगून संपवेन, प्रत्येक वेळी त्यागच करायला हवा असं कुठाय ? असा विचार करणं चुकीचं आहे.
माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवून खाणं, हे हितकर असते.
हे ज्याला समजले त्याला जीवन उमजले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.02.2017
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation( EMFR) निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field (PEMF) मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्रानाश व कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो.
सुसंवादाची कमी : प्रत्यक्ष संवाद हा सगळ्यात उत्तम! समोरासमोर बसून संवाद साधल्याने संबंध चांगले राहतात,तसेच कुठल्याही समस्येचे निवारण लवकरात लवकर होते. पण, आजकाल मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे संवाद हा फारच कमी झालेला आहे. प्रवासात पण जेव्हा सगळे ग्रुपनी जातात,तेव्हा गप्पागोष्टींपेक्षा सगळेजण मोबाईलवरच व्यस्त असतात.
शारीरिक हालचाली कमी
मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. तसेच, आळशीपणा पण वाढला आहे. शेजारच्या दुकानातून सामान आणायचे असल्यास फोन करून होमडिलीव्हरी द्वारे सामान मागविल्या जाते. अशा प्रकारे आळशीपणाचे जे दुष्परिणाम असतात, त्याद्वारे नुकसानच होते.
अतिरेक झोपेचे प्रमाण
मोबाईल रेडिएशनचा वेग हा ८८४ Mh २ इतका असतो, त्यामुळे झोपेचे प्रमाण हे वाढतच जातं. जास्त झोपण्यामुळे कामे वेळेवर पूर्ण होत नाही, तसेच संपूर्ण शरीरावर पण घातक परिणाम होतो.
एकाग्रतेचा अभाव
सेलफोनच्या अति वापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शारीरिक तसेच मानसिक पण ताण पडतो. मुले अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात व internet चा वापर करतात. त्यामुळे मुलांचे नापास होण्याचे प्रमाण हे वाढतच आहे.
ब्रेन ट्युमर
सेलफोनचे जे electromagnetic रेडिएशन निघतात. त्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या ब्रेनवर होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार अतिरेकी वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असतो.
शरीराच्या तापमानात वाढ
मोबाईल फोनमध्ये रेडिओ frequewncies चा बेस स्टेशनशी संवाद साधण्यासाठी वापर केला जातो.या rf रेडिएशनमुळे शरीराच्या तापमानात अतिरिक्त वाढ होते, त्याचा वाईट परिणाम आपल्या ब्रेन व शरीरावर होतो.
अपघाताच्या प्रमाणात वाढ
सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे रोड अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नियम कितीही कडक केले तरीपण लोक ड्रायव्हिंग करताना सेलफोनवर बोलत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते व अपघाताच्या प्रमाणात वाढ होते.
तोंडाचा ट्युमर वाढण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या मेडिकल सर्वेनुसार सेलफोनच्या अतिरेकी वापरामुळे mouth cancer ची शक्यता वाढते. त्यामुळे खूप आवश्यक असेल तेव्हाच फोनचा वापर करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती नोंदवलेली असते आणि ती हे दर्शवते की तुम्ही भारताचे नागरिक आहात. भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. पर्सनल पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्ट. पासपोर्ट जारी केल्यापासून १० वर्षे रेग्युलर पासपोर्ट वैध असतो. पासपोर्ट कायदा १९६७ नुसार पासपोर्टसाठी अर्ज करताना खोटी माहिती दिल्यास शिक्षा होऊ शकते. पासपोर्ट हा एक महत्त्वाचा शासकीय दस्तावेज म्हणून सुद्धा उपयोगी पडतो. भारतीय पासपोर्टचा (Passport) हा जगभरातील सर्वात प्रभावशाली पासपोर्टच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक आता विना व्हिसा जगातील ५९ देशामध्ये प्रवास करू शकतात. इंडियन पासपोर्टवर काही देशांमध्ये 'व्हिसा ऑन अराइवल' सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही रंगांचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.
निळा (सामान्य व तत्काळ) सामान्य व्यक्तिसाठी.
देशातील सामान्य व्यक्तिसाठी निळ्या रंगात पासपोर्ट बनवला जातो. निळा रंग भारतीय नागरिकाला रिप्रझेंट करत असतो. त्यात ऑफिशियल व डिप्लोमॅट्सपासून वेगळे ठेवत असतो. सरकारनेच हे अंतर निर्माण केले आहे. कस्टम अधिकारी तसेच विदेशात पासपोर्ट तपासणी करतांना अडचणी येत नाहीत.
पासपोर्टधारकाचे नाव असते. जन्म तारीख, जन्म स्थळाचा उल्लेख असतो. सोबत छायाचित्र व स्वाक्षरी असते. व्यक्तीची ओळख दर्शवण्यासाठी पासपोर्टकडे महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणून पाहिले जाते.
पांढरा (ऑफिशियल, सरकारी कामासाठी.)
गव्हर्नमेंट ऑफिशियल तसेच सरकारी कामासाठी पांढर्याप रंगाचा पासपोर्ट दिला जातो. सरकारी कामासाठी विदेशात जाणार्यास व्यक्तीला पांढरा पासपोर्ट दिला जातो. ऑफिशियल आयडेंटिटीसाठी हा पासपोर्ट पाहिला जातो. कस्टम चेकिंग करताना याच पद्धतीने डील केले जाते.
पांढर्या पासपोर्टसाठी अर्जदाराला स्वतंत्र अर्ज करावा लागतो. पांढर्यां पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जात ठोस कारण द्यावे लागते. पांढरा पासपोर्टधारकाला विविध सुविधा मिळत असतात.
मरून (डिप्लोमॅटिक, भारतीय डिप्लोमॅट्स व वरिष्ठ सरकारी अधिकारी.)
भारतीय राजनयिक (डिप्लोमॅट्स) व सरकारी वरिष्ठि अधिकार्यां ना (आयपीएस, आयएएस दर्जाचे अधिकारी) मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो. हाय क्वॉलिटी पासपोर्टसाठी स्वतंत्र अर्ज दिला जातो.
एका आठवड्याच्या आत तत्काळ पासपोर्ट बनून मिळतो. सामान्य पासपोर्टप्रमाणेच ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी अर्जदाराला एनेग्झर-आय भरावे लागते. यात अर्जदाराला आपली सविस्तर माहिती भरावी लागते. सर्व दस्ताऐवज एका फर्स्ट क्लास गझेटेड ऑफिसर द्वारा व्हेरिफाय करावे लागतात.
सामान्य पासपोर्ट बनवण्यासाठी १० ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. रजिस्टर्ड पोस्टने पासपोर्ट अर्जदाराच्या घरी पाठवला जातो. सामान्य व्यक्तिला १० वर्षांच्या मुदतीत पासपोर्ट दिला जातो.
पासपोर्टचा इतिहास
पासपोर्ट (पारपत्र) या संकल्पनेची अंमलबजावणी भारतात सर्वप्रथम पहिल्या महायुद्धाच्या वेळी करण्यात आली. त्यापूर्वी भारतात येताना आणि बाहेर जाताना कोणत्याही परवान्याची गरज भासत नव्हती. भारताच्या संरक्षणासाठी १९१४ मध्ये तत्कालीन प्रशासनाने पासपोर्ट बंधनकारक केला. त्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्यात आला; पण, हा कायदा अल्पायुषी ठरला. पहिले महायुद्ध संपल्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. अवघे सहा महिने या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली; पण, तत्कालीन प्रशासनाला हा कायदा पुढे सुरू ठेवण्याचे अधिकारी देण्यात आले. या कायद्याच्या निमित्ताने तत्कालीन इंग्रजी राजवटीने आपल्या साम्राज्याच्या सीमा अधिक बळकट केल्या. अखेर, "पासपोर्ट' ही संकल्पना सुरू ठेवण्याचा निर्णय घेऊन, १९२० मध्ये नवीन "भारतीय पासपोर्ट कायदा' तयार करण्यात आला. कालांतराने "द पासपोर्ट (एंट्री इन टू इंडिया) ऍक्ट" १९२०' असे त्याचे नामकरण करण्यात आले. पासपोर्ट हा केंद्र सूचीतील विषय असला तरीही १९३५ मध्ये यात बदल करून देशातील काही राज्यांना हा अधिकार देण्यात आला. त्यात मुंबई, दिल्ली अशा राज्यांचा समावेश होता. त्यामुळे या राज्यांमध्ये पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात आली. अर्थात त्या राज्याच्या गृहखात्याच्या नियंत्रणात पासपोर्ट अधिकारी कार्य करीत असे. भारत स्वतंत्र झाल्यावर पासपोर्ट हा विषय परत केंद्रसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे त्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. १९५४ पर्यंत संबंधित राज्य सरकारतर्फे पासपोर्ट देण्यात येत होते. केंद्र सरकारतर्फे १९५४ मध्ये पहिली पाच प्रादेशिक पासपोर्ट कार्यालये देशात सुरू करण्यात आली. त्यात मुंबई, दिल्ली, मद्रास (चेन्नई), कलकत्ता (कोलकता) आणि नागपूर या शहरांचा समावेश होता. पासपोर्ट काढणे सुलभ करण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) सुरू करण्यात आली आहेत. सध्या भारतात ८१ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.
"पीएसके'मुळे या पासपोर्ट कार्यालयावरील ताण कमी झाला आहे. पासपोर्टसाठी 18002581800 या कॉल सेंटरवर दूरध्वनी करून तसेच, www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाच्या स्थितीची अद्ययावत माहिती घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
पोलिस पडताळणीची प्रक्रिया "ऑनलाइन' करण्यासाठी पासपोर्ट आणि पोलिस या विभागातर्फे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.
पासपोर्टची वाढती मागणी
स्वातंत्र्यानंतर सुरवातीच्या काही वर्षांमध्ये परदेशात जाणारे मूठभर नागरिकच पासपोर्टसाठी अर्ज करीत होते. त्यामुळे या खात्यावरील ताण मर्यादित होता; पण, आता जागतिकीकरणामुळे जग हे "ग्लोबल व्हिलेज' होत असताना पासपोर्टची मागणी करणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. १९५८ मध्ये देशातील फक्त ३३ हजार २१६ नागरिकांना पासपोर्ट देण्यात आला होता. त्यापुढील 48 वर्षांमध्ये म्हणजे २००६ पर्यंत ही संख्या ४४ लाख ४१ हजार ७६८ पर्यंत वाढली. २०१० मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने तब्बल ८४ लाख ३९ हजार ५८४ पासपोर्ट वितरित केले आहेत.
पासपोर्ट काढण्यासाठी पासपोर्ट सुविधा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज भरता येतो. त्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज "डाऊनलोड' करू शकतो, तसेच "ऑनलाइन' भरू शकतो.
पासपोर्ट सर्वसाधारण, की तत्काळ काढायचा आहे; त्यानुसार त्याचे शुल्क निश्चिपत करण्यात आले आहे. तसेच, लहान मुले, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक या वर्गवारीत पासपोर्ट मिळतो. भरलेल्या अर्जाची पासपोर्ट सेवा सुविधा केंद्रातील अधिकाऱ्यांकडून छाननी होते. पोलिस पडताळणीचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष पासपोर्ट छापला जातो.
पासपोर्टसाठी आवश्यसक कागदपत्रे
- रहिवासाचा पुरावा
पाणी बिल, फोन बिल, लाइट बिल, चालू खात्याचे बॅंक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, गॅस कनेक्शान, रेशनकार्ड, आधार कार्ड.
- वयाचा दाखला
२६ जानेवारी १९८९ नंतर जन्म झालेल्यांना जन्माचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यापूर्वीचा जन्म असल्यास जन्माचे प्रमाणपत्र, शाळेचा दाखला.
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र.
- महिलांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
- प्लेन बॅंकग्राउंडवर तीन पासपोर्ट साईझ फोटो (3.5 बाय 3.5 सेंटीमीटर).
केंद्र सरकारने पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ केली आहे. सामान्य माणसालाही पासपोर्ट काढता येईल इतकी सहज-साधी प्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि खरी माहिती अर्जात नमूद केलेली असल्यास 80 टक्के पासपोर्ट वेळेत मिळतात. केंद्र सरकारने पासपोर्टची प्रक्रिया सोपी केल्यावर आता बायोमॅट्रीक डिटेल्स असलेला ई-पासपोर्ट लॉंच करणार आहे. चीप असलेले हे ई-पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालय लवकरच देणार आहे. याद्वारे पासपोर्ट संबंधी सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तपासता येईल. ई-पासपोर्ट संबंधीताची माहिती सुरक्षित ठेवेल आणि बनावट पासपोर्ट बनवणाऱ्यांना चाप बसेल. ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप असते. चीपमध्ये त्याच सूचना असतात ज्या पासपोर्टच्या डाटा पेजवर छापलेल्या असतात. या चीपद्वारे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना कुठल्याही घोळाचा छडा लावता येईल आणि पासपोर्टचा दुरुपयोग रोखण्यात मदत होईल. ई-पासपोर्टनंतर परराष्ट्र मंत्रालय पूर्णपणे डिजिटल पासपोर्ट लॉंच करणार आहे. हा असा पासपोर्ट असेल जो मोबाइल मध्येही ठेवता येऊ शकेल. या अत्याधुनिक तंत्रामुळे कुठल्याही ठिकाणाहून आपल्याला लवकरात लवकर पासपोर्ट मिळवता येईल. तसंच कोणी एकाच वेळी दोन ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज केल्यास संबंधित यंत्रणेतून मंत्रालयाला त्या ठिकाणचा ऍलर्ट जाईल. यामुळे दोन ठिकाणाहून पासपोर्ट मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसेल.
जगभरातील पासपोर्टची क्रमवारी करणाऱ्या आर्टन कॅपिटलच्या ‘पासपोर्ट निर्देशांका’च्या नव्या आवृत्तीत जर्मन पासपोर्टने पहिले स्थान पटकावले आहे. भारतीय पासपोर्ट ७८ व्या क्रमांकावर आहे. वाढीच्या दृष्टीने सर्वांत आघाडीवर अमेरिका आहे, तर त्यानंतर चीन, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, जपान व भारत यांचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताला पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळाले होते. या पद्धतीमध्ये जगभरातील पासपोर्टची माहिती संकलित केली जाते, ती दर्शवली जाते आणि पासपोर्टच्या प्रभावीपणानुसार त्यास क्रमवारी दिली जाते; तसेच पासपोर्टधारकाला किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करता येऊ शकतो किंवा देशात प्रवेश केल्यावर व्हिसा घेता येतो (व्हिसा ऑन अरायव्हल) त्यानुसार संबंधित पासपोर्टला ‘व्हिसा-फ्री स्कोअर’ दिला जातो. जर्मनीचा व्हिसा स्कोअर सर्वाधिक १५७ आहे, तर १५६ स्कोअर नोंदवून सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा स्कोअर ४६ असून, चीन व पाकिस्तान अनुक्रमे ५८ व ९४व्या स्थानावर आहेत. केवळ २३ स्कोअर मिळालेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत कमी प्रभावी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
आपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर. म्हणूनच आपल्या हृदयासाठी आपण एकदा थांबून शांतपणे विचार करायला हवा, तोही हृदयापासून..
हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वात अधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील. भारतात कारोनरी आर्टरी या आजाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली ४ टक्के होते आणि आता ते ११ टक्के इतके वाढले आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता. त्याचे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयाच्या तरुणांमध्ये आता झपाटय़ाने वाढत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण १९५० साली जवळपास १ ते ३ टक्के होते, पण तेच आता १० ते ३१ टक्के इतके वाढलेले आहे. भारतात दरवर्षी लाखो हृदयविकारच्या आजाराने बळी पडतात. हे सर्व टाळण्यासाठी हा आजार का होतो, त्याची उपचारपद्धती काय आणि ते टाळण्याचे उपाय काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
हृदयविकार
हृदय हे स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. ते सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात आणि जर या कोरोनरी धमन्यामध्ये अवरोध निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला ‘हृदयविकार’ आहे असेही म्हणतात. हृदयात रुग्णाला थोडे काम केल्यावर छातीच्या मध्यभागी दुखणे, छाती भरून येणे, डाव्या हातामध्ये दुखणे, दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या छातीतील दुखण्याला ‘अंजायना’ (हृदयशूळ) म्हणतात.
मधुमेह असलेल्या रुग्णाला कदाचित छातीत वेदना होणार नाहीत, अशा रुग्णाला दम लागणे, थोडेच काम केल्यावर थकवा येणे, कमजोरी वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो. (१०० टक्के BLOCK) तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी छातीत तीव्र वेदना होणे. दरदरून घाम येणे.. भोवळ येणे.. दम लागणे.. असा त्रास होतो. कधी कधी हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे ताबडतोब मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या सर्व आजारांना हृदयविकार असे म्हणतात. हृदयविकार टाळण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
* हृदयविकाराचे निदान करणे.
* धोक्याची घटके ओळखणे.
*धोक्याची घटके टाळण्याचा प्रयत्न करणे.
* औषधोपचार करणे.
* नवीन तंत्राचा उपयोग करून हृदयविकाराचा उपचार करणे.
* अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
हृदयविकाराचे निदान : हे सर्व टाळण्यासाठी या आजाराचे लवकर व योग्य निदान होणे आवश्यक आहे. हृदयरोगतज्ज्ञ (काíडओलॉजिस्ट) रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर हृदयाच्या काही विशिष्ट टेस्ट करायला सांगतील. त्यात ई.सी.जी, हृदयाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा थॅलियम यांचा समावेश होतो. या सर्व नॉन इन्वेसिव्ह टेस्ट असून यात हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे, पण सर्वात महत्त्वाची व शंभर टक्के निदान करणारी गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट आहे. ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी.’ हृदयरोगाचे निदान करण्याचे, त्याची तीव्रता, प्रमाण, विस्तार बघण्याची एकमेव तपासणी म्हणजे ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी. अत्यंत सुरक्षित, सोपी व १०० टक्के निदान देणारी तपासणी.!
तज्ज्ञ हृदयविशारदाकडून ही तपासणी १० ते १५ मिनिटांत होते. रुग्णाच्या मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी पोकळ नळी १.५ मि. मी. व्यासाची, हृदयाच्या कोरोनरी धमनीपर्यंत नेण्यात येते. मॉनिटरवर याचे एक्स-रे स्कॅनिंगद्वारे चित्रण चालू असते. आणि दुसऱ्या मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हार्ट रेट (स्पंदन), ई. सी. जी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे सर्व काही दिसत असते. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रुग्णाला सुट्टी करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिया एकंदरीत अत्यंत सुरक्षित असून शंभर टक्के निदान करणारी आहे.
धोक्याचे घटक
हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर त्याचे धोक्याचे घटक ओळखणे जरुरी आहे.
वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. पण आता मध्यम वयामध्येसुद्धा हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार रक्त वाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते, म्हणून हे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
लिंगभेद : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. स्त्रियांमधील ईस्ट्रोजन नावाचा आंतरिक स्राव हा हृदयविकार टाळण्यास मदत करतो. पण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी थांबते, तेव्हा या स्रावाचे प्रमाण कमी होते आणि अशा स्त्रियांत हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांप्रमाणेच असू शकते.
आनुवंशिकता : हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.
धूम्रपान : हा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. तंबाखूमध्ये चार हजार धनरूप किंवा वायूरूपात असणारी रसायने असतात. कार्बन, कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन हे पदार्थ हृदयाला हानीकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्यास सुरुवात होते आणि रक्तवाहिन्यांतील अवरोध वाढू लागतो. हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता वाढते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दम लागतो. जगात जवळपास १० लाख लोक धूम्रपानामुळे दरवर्षी मरतात.
मद्यपान : मद्यपानामुळे स्नायूंचे आजार होतात. हृदयाच्या पेशींच्या सेल्युलर पातळीवर दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. मद्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते.
हृदयविकार टाळण्यासाठी
* आहारात योग्य तो बदल करणे.
* व्यायाम करणे.
* योगा- मेडिटेशन करणे.
* औषधोपचार करणे.
*अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
आहार
संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
रोजच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.
कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.
चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.
मांसाहार टाळावा. मटन-चिकन टाळावे, अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ : मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे.
चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.
मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपू नये. थोडी शतपावली घ्यावी.
उपवास टाळावे. सकाळी व्यवस्थित न्याहारी करावी, पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण मात्र हलकेच घ्यावे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवावे. त्या वेळा नियमितपणे पाळणे.
व्यायाम
भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घकाळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असे व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतात. योगासने करावीत.
योगा-मेडिटेशन
मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवून देणारा उत्तम मार्ग म्हणजे योगा-मेडिटेशन. यात प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. अशांत मन शांत करण्याचा हा योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनात उत्साह वाढू लागतो. जीवनातील नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. ही भावना फार महत्त्वाची असते. यामुळे जीवनातील ताणतणाव, स्ट्रेस कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी
कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध असल्याचे निदर्शनास आले, या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी’. अवरोध हा मुख्यत: चरबीनी बनलेला असल्यामुळे ह्य बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते; त्यानंतर अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे आणि रक्तवाहिनीच्या आकाराप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. ह्य प्रक्रियेला अॅन्जिओप्लास्टी विथ स्टेंट असे म्हणतात.
अॅन्जिओप्लास्टीचे फायदे
अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास) ह्यत कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे. ज्यांना हृदयविकारावर सोबत बाकी आजारसुद्धा आहेत, उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते. बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते. त्याला ‘ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.
रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हार्ट अटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लस्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध आहे त्याना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते. तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
बायपास सर्जरी
जर कोरोनरी आर्टरीमध्ये अवरोधाचे प्रमाण जस्त असल्यास किंवा मुख्य कोरोनरी आर्टरीला जर अवरोध असल्यास किंवा विभाजन होणाऱ्या दोन आर्टरीच्या उगमावर जर अवरोध असल्यास बायपास सर्जरी करणे योग्य आहे.
हृदयरोग टाळण्यासाठी
दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. ह्य व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन आणि कमरेचा घेर कमी करावा. ह्यासाठी आहारात योग्य तो बदल करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यान- धारणा, योगा ह्य गोष्टीचा उपयोग करावा. योग्य वेळी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी. धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा. जेवणात मिठाचे आणि मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा. संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत वागवू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आपला रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नेमाने वैद्यकीय तपासणी करा अणि डॉक्टरचा सल्ला घ्या.. तो पाळा. आहार, विहार, आचार, विचारात योग्य तो बदल करून आपलं आरोग्य आणि शरीर निरोगी ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. लोकसत्ता / डॉ. गजानन रत्नपारखी
योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत.
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मधुमेह आपल्या देशाची वाढती समस्या आहे. या जगात मधुमेहींच्या गणनेमध्ये आपला दुसरा नंबर येतो. प्रत्येक पाचव्या भारतीय नागरिकाला मधुमेह असून ही फार काळजीची बाब आहे. मधुमेहाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याची काही लक्षणे नसतात. उदा. जेव्हा आपल्याला संसर्ग झाला की ताप येतो, पोट बिघडले की मग पोट दुखते- पण मधुमेहात मात्र असे काहीही होत नाही. मधुमेहाची जी लक्षणे आहेत- खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, खूप लघवी होणे, ही रक्तातील साखर फार जास्त प्रमाणात वाढल्यावरची लक्षणे आहेत. पण रक्तातील साखर हळूहळू जास्त होते.
सर्वसाधारण प्रमाणापेक्षा थोडी जास्त साखर रक्तात असताना जर कळली तर त्यावर त्वरित इलाज-पथ्य करून ती आटोक्यात आणता येते. परिणामी मधुमेहामुळे शरीरात होणारी गुंतागुंत टाळता येते. पण ही थोडी वाढलेली साखर रक्ताचा तपास केल्यावरच कळते. त्यामुळे रक्ताचा तपास करणे आवश्यक आहे. जर आपल्या आई-वडील किंवा बहीण-भावाला मधुमेह असेल तर मधुमेहाची चाचणी नियमित रूपाने करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यावर त्याचे पथ्यपाणी व इलाज करण्यापेक्षा तो टाळता यावा यावर भर दिला पाहिजे. ‘Prevention is better than cure’ अशी म्हणच आहे. मधुमेह टाळण्याकरता वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. खूप गोड खाल्ले की मधुमेह होतो हा चुकीचा समज आहे. गोड खाऊन मधुमेह होत नाही- पण खूप गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढते, पोटावरची चरबी (abdominal fat) वाढते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
मधुमेह टाळण्याचा सोपा उपाय आहे की ‘पोटभर खाऊ नका व पोट रिकामे ठेवू नका’! पोट रिकामे ठेवले- खूप भूक लागली की मग आपण विचार न करता खातो, गरजेपेक्षा जास्त खातो व वजन वाढते व अती खाण्यामुळे रक्तातील साखर वर-खाली होऊ शकते. आपण खाताना, आपल्याला किती अन्नाची गरज आहे हे जाणून व समजून घेणे आवश्यक आहे. जर आपल्या रोजच्या जेवणानेही आपले वजन सतत वाढत आहे, असे कळले की हे अन्न आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे हे आपणास समजले पाहिजे. कोणी आपल्याहून जास्त खाते यावर लक्ष न देता- आपल्याला अन्नाची किती गरज आहे, हे समजले पाहिजे. जर वजन वाढत असेल तर अन्नाचे प्रमाण कमी केले पाहिजे.
अन्नाची निवडही बरोबर केली पाहिजे. उदा. भात खाऊन वजन वाढते, मधुमेह असेल तर रक्तातील साखर वाढते, म्हणून बरेच लोक साखरेचे प्रमाण वाढले किंवा वजन कमी करायचे असेल तर भात सोडतात. पण मग कमी खाऊन पोट भरत नाही म्हणून पोळीचे प्रमाण वाढवतात. पण असे करताना पोळी व भात खाऊन साखर वाढते, वजन वाढते. त्यामुळे पोळी जास्त घेण्यापेक्षा सॅलड, भाजी, आमटी यांचे प्रमाण वाढवावे. किंवा दही, उसळ यांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आहाराबद्दलचे गैरसमजही समजून घेतले पाहिजेत. उदा. मधुमेहींना साखर चालत नाही, पण गूळ नैसर्गिक असल्यामुळे चालतो किंवा मधसुद्धा चालतो. हा फार मोठा गैरसमज आहे. असे केल्यामुळे मधुमेह आटोक्यात ठेवणे कठीण होते. शरीरात साखर, गूळ व मध हे सर्व एकाच प्रकारे काम करतात व समप्रमाणात साखर वाढवतात. त्यामुळे हे तीनही पदार्थ टाळावेत.
साखर मधुमेहींना वज्र्य आहे हे ज्ञान सर्वाना असते, पण स्निग्ध पदार्थही मधुमेहींना तेवढेच हानीकारक आहेत. हे फार कमी लोकांना कळते. एक विशिष्ट प्रकारचा स्निग्ध पदार्थ – ‘Trans fats’ हा सर्वात हानीकारकआहे. ट्रान्सफॅट हा डालडा, मार्गरीन इत्यादी पदाथार्ंत आढळतो. या प्रकारचे स्निग्ध पदार्थ वापरूनच फराळाचे पदार्थ, मिठाया इत्यादी तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. त्याचप्रमाणे इतर स्निग्ध पदार्थसुद्धा कमीतकमी प्रमाणात वापरावेत. तेल अती उकळले / तापविले की त्यात ‘Trans fats’ तयार होतात. हे तेल परत वापरले तर हे ‘Trans fats’ तयार केलेल्या पदार्थात येतात व त्यामुळे मधुमेहीला त्रास होऊ शकतो. स्निग्ध पदार्थात ऊर्जा इतर अन्नपदार्थापेक्षा जास्त असते व त्यामुळे त्याच्या सेवनाने वजन लगेचच वाढते. त्यामुळे स्वयंपाक करताना कमीतकमी प्रमाणात तेल, तूप, लोणी, ओले-सुके खोबरे, दाण्याचे कूट वापरावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
‘मेनोपॉज’ अर्थात ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे आवश्यक आहे.
मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला एक वर्षांपर्यंत मासिक पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येते. तरीही या स्त्रियांनी पाळी चुकल्याची शंका आल्यावर स्त्रीरोग तज्ञांकडून तो मेनॉपॉजचाच टप्पा असल्याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रातील बातमीने लक्ष वेधून घेतले. बातमी होती एका लग्न होऊ घाललेल्या २८- २९ वर्षांच्या मुलीला ‘मेनोपॉज’ आल्याबाबतची. सहाजिकच ही बातमी वाचणाऱ्या बऱ्याच जणी अकारण काळजीत पडल्या. जर एखाद्या स्त्रीला वयाच्या ३५ वर्षांच्या आधीच मेनोपॉज आला तर त्याला ‘अर्ली’ किंवा अकाली मेनोपॉज असे म्हटले जाते. अकाली मेनोपाज अर्थातच विरळा आढळतो. लवकर मेनाोपॉज येण्याची ही तक्रार आनुवांशिक असू शकते. आईला लवकर मेनोपॉज आला असेल तर मुलीचीही तीच प्रवृत्ती असू शकते. स्त्रीला ‘पेल्व्हिक इन्फेकशन’ किंवा क्षयासारखा एखादा आजार होऊन गेल्यामुळे तिच्या ओव्हरीजवर परिणाम होऊनही अकाली मेनोपॉज येऊ शकतो.
मेनोपॉजची लक्षणे
* मासिक पाळी अनियमित होऊन हळूहळू पूर्णपणे बंद होणे.
* मानसिक स्थितीत अकारण बदल होणे. एका क्षणी आनंदी वाटणे तर दसऱ्याच क्षणी काहीही सबळ कारण नसताना निराशा दाटून येणे.
हॉट फ्लशेस
सारे काही व्यवस्थित असताना काही क्षणातच शरीराचे तापमान वाढते. लगेच थोडय़ा वेळात हे तापमान कमी होऊन थंड वाटते. यामुळे दरदरुन घाम सुटतो. कधी- कधी रात्री झोपमोड होते.
* पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च झाल्यासारखे वाटते.
* स्मरणशक्ती कमी होते.
* योनीमार्ग कोरडा पडून शारिरिक संबंधास त्रास होतो.
* सांधे दुखी
* वजनात वाढ. विशेषत: पोटाचा घेर वाढतो.
* त्वचेवर दिसणारे परिणाम. त्वचा कोरडी होऊन अंगाला खाज येणे. त्वचेवर सुरकुत्या दिसणे, त्वचा सैल पडणे.
* नखे/ हाडे ठिसूळ होणे. इ.
ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतीलच असे नाही. लक्षणांची तीव्रताही कमी- अधिक होऊ शकते.
मेनोपॉजनंतर स्त्रीच्या शरीरातील ‘फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन’ आणि ‘ल्युटेनायझिंग हॉर्मोन’ या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते तर ‘इस्ट्रोजेन’ या हॉर्मोनचे प्रमाण कमी होते.
मेनोपॉज नंतरच्या आवश्यक तपासण्या
* सीरम कॅल्शिअम.
* सीरम व्हिटामीन डी- ३
* बोन डेन्सिटी-
वयाच्या चाळीसाव्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी बोन डेन्सिटी तपासणी करणे आवश्यक
मॅमोग्राफी – स्तनांतील गाठी आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या ४५व्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.
मेनोपॉजनंतर जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल
* शारीरिक क्षमतेनुसार नियमित व्यायाम आवश्यक.
* मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान (मेडिटेशन) करावे.
* शक्यतो सुती आणि सैलसर कपडय़ांचा वापर करावा.
* कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन टाळावे.
* भरपूर पाणी प्यावे.
* कॅल्शिअमयुक्त आहार घ्यावा. आहारात सोयाबिनचे एक किलो पीठ पाच किलो गव्हाच्या पिठात मिसळून त्याचा वापर रोजच्या जेवणातील चपात्या/ पोळ्यांसाठी करता येईल. सोयाबिनच्या दुधाचे पनीर (टोफु), सोया चंक्स, सोया मिल्क लाभदायक ठरते. भरपूर प्रमाणात फळे, भाज्यांचे सेवन करावे. भोपळा मेनोपॉजसाठी अतिशय लाभदायक. दररोज किमान १ ग्लास दूध प्यावे. एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा ४-५ वेळा थोडे थोडे खावे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावेत. कॉफीचे अतिरिक्त सेवन टाळावे. दररोज ४-५ बदाम खाल्ले तर उत्तम. तीळ आणि जवसाचाही रोजच्या जेवणात समावेश करणे लाभदायक.
सतत मूड बदलण्याच्या तक्रारीवर (मूड स्विंग) ओट्स, पनीर, कडधान्यांचा आहारात अधिक प्रमाणात असणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद, पिअर, द्राक्षे ही फळे आणि खजुर, मनुका हा सुकामेवा जरूर खावा. या फळांमुळे हाडे ठिसूळ होण्याची म्हणजे ऑस्टिओपोरॉसिसच्या प्रक्रियेचा वेग मंदावू शकतो.
वयाची पस्तिशी उलटण्यापूर्वीच काही मुलींना मेनोपॉज येऊ शकतो.
अकाली (अर्ली) मेनोपॉजला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गोष्टी-
* आनुवंशिकता
* हायपोथायरॉइडिझम
* क्षय (टीबी)
* गालगुंड
स्त्रीचे गर्भाशय व अंडाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकावे लागले असल्यास कर्करोगावरील उपचारांत रेडिएशन व केमोथेरपी द्यावी लागल्यास अकाली मेनोपॉजसाठी करावयाच्या तपासण्या-
* एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) टेस्ट
* एलएच (ल्युटेनायझिंग हॉर्मोन) टेस्ट
* इस्ट्राडिऑल टेस्ट
* प्रोजेस्टेरॉन टेस्ट
* टेस्टॉस्टेरॉन टेस्ट
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
Copyright © 2025 | Marathisrushti