वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अ) गाईंचे दुध:
१)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे.
२)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो.
३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे थोडे प्यावे.
४)वारंवार संडास मधून आव पडून त्रस्त झालेल्या व्यक्तीला १ कप गाईचे दुध+१ कप पाणी+१/२ चमचा सुंठ घालून हे मिश्रण फक्त दुध शिल्लक राही पर्यंत उकळावे व त्यास थोडे थोडे पाजावे.
५)संडासला घट्ट होत असल्यास १ वाटी दुध+ १ मोठा चमचा तूप किंवा लोणी चपाती किंवा भाकरी सोबत खावे.
गाईचे दुध प्यायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
ए,बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच.
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणी दरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात.
एकाच मतदार संघातून एकाच पक्षाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज करू नयेत म्हणून राजकीय पक्ष हे फार्म अधिकृत उमेदवारांना देतात.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.श्री.साळगांवकर
भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले.
या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती.
” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश मा.स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.
स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो. युवा वर्गाने स्व:ताला टेक्नॉसलॉजीशी इतके सुसंगत ठेवले आहे, की ते जगाशी ओळख ठेवून आहेत. कुठे काय घडतंय हे त्यांना माहीत असते. पण याच टेक्नॉठलॉजीशी ते इतके भावनिक गुंतले गेले आहेत, की त्यामुळे तिथूनच त्यांना नैराश्य ही येते.
तर खरच आपणच आपण भविष्य घडवायला हवे, कोणावरही अवलंबून राहणे हे योग्य नाही.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा विषय नाही. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच झालो.
शास्त्रीय संगीतामधे प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या त्या वेळी ऐकला तर तो सगळ्य़ा जाणीवांना स्पर्शून जातो. मी स्वतः याचा बरेचदा अनुभव घेतला आह . एवढ्यातलीच गोष्ट आहे, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या एका पहाट मैफिलीला गेलो होतो. सकाळचा गारवा.. हेमंत ऋतू असल्याने मंद वारे सुरु होते. अश्विनी भिडे यांचा “कवन बदरीया गयो माई, कौन गली गयो शाम” रे मनवा सुमर हरी नाम.. सुरु केले आणि साधारण २० एक मिनिटांच्या नंतर आपोआपच डोळ्यात पाणी आलं. इतका आर्त स्वर लागला होता की तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. योग्य वेळी योग्य राग आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती यामुळे हे शक्य होऊ शकते! संगीता मधे जी शक्ती आहे ती फक्त अनुभवाने च समजते. संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.
एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी मा.आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ” पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत मा.भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भीमसेन जोशींचा एक बडॊद्याचा अनुभव सांगितला .रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत पूरियाधनाश्री गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला. लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ” पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए है, इतना तो मालूम रहेगाही नां…”
वरचा अनुभव म्हणजे त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं. त्या टांगेवाल्याच्या कानावर गाणं ऐकण्याचे संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं. म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला. योग्य वेळी जर योग्य राग ऐकला, तर त्याचा परिणाम जास्त होतो. बरेचदा चुकीच्या वेळेस ऐकलेले राग उगाच नकोसे वाटतात. तेंव्हा, रागाची वेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची.
इंटरनेट वरून आपल्या सभासदांसाठी, कुठला राग केंव्हा ऐकावा याची माहिती देत आहे. या वर अधिक प्रकाश आपल्या सभासदांनी टाकावा.
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी ६ ते ८ :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी, मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ इंटरनेट
अनेक लोकांना वाटते की, फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला एका रात्रीत यश मिळाले. मात्र, त्या लोकांचा हा गैरसमज आहे. कारण मार्क झुकेरबर्गने फेसबुक उभी करण्यासाठी खूप कष्ट उपसलेले आहेत. त्याचे फंडे वापरून तुम्हीही यश मिळवू शकता.
स्वप्न बघा
झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले होते, सर्वात श्रीमंत होण्याचे, जगात प्रसिद्ध होण्याचे. त्यासाठी त्याने कष्ट केले. जर तुम्हालाही तसेच यश मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वत:ला विचारावे लागेल की, तुम्ही आयुष्यात काय मिळवू इच्छिता. आगामी 10 वर्षांत तुम्ही कोठे असाल? मृत्यूनंतर तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवले जाईल? स्वप्न बघा, काही तरी मिळवण्याची इच्छा बाळगा.
मोठा विचार करा
फेसबुक हा खरे तर झुकेरबर्गचा संगणकावरील एक प्रकल्प होता. तो विकण्याचा पर्यायही त्याच्याकडे होता. मात्र, त्याने असे केले नाही. त्याला नोकरी करायची नव्हती. तो जगाची व लोकांची संवाद साधण्याची पद्धत बदलू इच्छित होता. त्याचे मित्र एफबीला महाविद्यालयातील प्रकल्प म्हणत होते. मात्र, झुकेरबर्ग त्यास लाखो लोकांना एकमेकांशी जोडणारा जागतिक प्रकल्प म्हणायचा. लोकांनी सुरुवातीला एफबी हा लक्षावधी डॉलर प्रकल्प असल्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, त्याने फेसबुकला अब्जावधी डॉलरची कंपनी बनवले.
सुरुवात छोटी करा
आपल्या हातात अब्जावधी डॉलरचा विश्वव्यापी प्रकल्प असल्याची कल्पना असूनही त्याने सुरुवात छोटी केली. त्याने लाखो डॉलरचा निधी मिळण्याची वा प्राथमिक भांडवल मिळण्याची वाट पाहिली नाही. छोटी सुरुवात करण्यात काहीही लाज बाळगू नये.
स्वत:वर विश्वास ठेवा
यशस्वी होण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे. इतरांवर जबाबदारी टाकून कधीही यश मिळत नाही. स्वत:ला कधीही कमकुवत समजू नका आणि तुम्ही तुमचे काम कराल, ही क्षमता तुमच्यात ईश्वर निर्माण करेल.
वेड कायम ठेवा
तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वेड आहे का? तुम्ही त्यासाठी कशाचाही त्याग करायला तयार आहात का? यशस्वी होण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे स्वत:ला विचारा. झुकेरबर्गला बालपणापासूनच प्रोग्रामिंगचे वेड होते आणि त्याने ते कायम ठेवण्यासाठी हॉर्वर्ड महाविद्यालयासही दांडी मारली.
टीकेसाठी तयार राहा
प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाप्रमाणेच झुकेरबर्गला टीका सहन करावी लागली. मात्र, त्याने ती कधीच लपवली नाही. त्याच्या मते, यश मिळवण्यासाठी टीका आवश्यक आहे आणि ती सहन करण्यासाठी तयार राहायला हवे; परंतु तिचा फायदाही घ्यायला हवा.
लक्ष केंद्रित करा
झुकेरबर्गने फेसबुकची मोहीम पूर्ण करण्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित केले. वॉरेन बफेट, बिल गेट्स, अँड्र्यू कार्नेजी या यशस्वी उद्योजकांनी नेहमी स्वत:चे लक्ष ध्येयावर केंद्रित केले. विविध प्रयत्नांनी कमी आणि केंद्रित प्रयत्नांनी अधिक यश मिळते.
जोखीम घेणे शिका
कोणतीही व्यक्ती जोखीम घेतल्याविना यश मिळवू शकत नाही. त्याने फेसबुक तयार करण्यासाठी जोखीम घेतली आणि महाविद्यालयाला रामराम ठोकला. जर तो आपल्या प्रकल्पात अपयशी ठरला असता, तर फेसबुकही हातचे गेले असते आणि महाविद्यालयातही त्याला प्रवेश मिळाला नसता. गुगलशी स्पर्धा करण्यातही त्याने जोखीम घेतली. जोखीम घेण्याच्या क्षमतेवर व्यवसाय अवलंबून असतो. जोखीम घेतली नाही तर जग स्थिर बनेल.
प्रक्रियेत सहभागी व्हा
उद्योजकतेच्या खेळात ध्येयापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे प्रक्रिया. जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करता, तेव्हा आपण एका प्रवासास सुरुवात करता, एका प्रक्रियेस सुरुवात करता. त्यात तोच यशस्वी होईल, जो आपल्या प्रक्रियेत प्रामाणिक असेल. झुकेरबर्गने एक स्वप्न पाहिले, त्याचे नियोजन केले आणि त्यावर काम केले. त्याने आपले वेड कायम ठेवले आणि संपूर्ण प्रक्रियेत सुरुवातीपासून अखेरपर्यंत सहभागी राहिला.
दिग्गजांना घाबरू नका
झुकेरबर्ग फेसबुकला इंटरनेटचे हृदय बनवू इच्छित होता. मात्र, त्यात एक अडथळा होता तो पूर्वीपासून प्रस्थापित गुगलशी सामना करण्याचा. मग गुगलला घाबरून कामच सुरू करायचे नाही का? नाही, यशासाठी मोठे होण्याची भावना हवी म्हणून कोणत्याही दिग्गजाला घाबरण्याऐवजी त्याचा सामना करा.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
कोकण गोवा केरळ प्रांतातील जनतेचे आहारामधील प्रमुख घटक होय.ह्याचा नुसता भातच नव्हे तर ह्या पासून अनेक पदार्थ बनविले जाता जसे पुलाव,बिर्याणी,साखरभात, घावन,इडली,डोसे,भाकरी,पायस इ.आणी प्रत्येक रूपात ह्याची चव अप्रतीम लागते.
ह्याचे उकडे,सुरे असे दोन प्रकार असतात.तसेच ह्याच्या अनेक पोटजाती देखील असतात जसे कोलम,सोनामसुरी,बलम,बासमती इ.आणी हो प्रत्येक तांदुळाची चव वेगळी लागते बरं का.
सर्व प्रकारच्या भातामध्ये साठे साळी हा भात श्रेष्ठ असून त्यात देखील काळा व पांढरा असे दोन प्रकार असतात त्यात पांढरा उत्तम मानला जातो.
सुरे तांदुळ पचायला जड असतात तर उकडे तांदुळ पचायला हल्के असतात.सर्वच तांदुळ चवीला गोड असतात पण साठे साळी मात्र मागुन थोड्या तुरट चवीचे लागतात.तांदुळ पचायला हल्के,स्निग्ध,थंड,पित्तघ्न,अल्प कफवातकर,शरीर पुष्ट करणारे,वृष्य,अल्प मल उत्पन्न करणारे आहेत.
आता तांदुळा पासुन बनविलेल्या विविध व्यंजनांचे गुण पाहुया:
१)यवागु(कण्हेरी):
१ भाग तांदुळ व ६ भाग पाणी घालून केली जाते ती दाट कण्हेरी.हि पचायला हल्की,मल बांधुन ठेवणारी,तहान कमी करणारी,जुलाब,ताप ह्यात उपकारक,मुत्रल आहे.
२)अटवल(विलेपी):
१ भाग तांदुळ व ४ भाग पाणी घालून कण्हेरी पेक्षा दाट केली जाते तिला अटवल म्हणतात.हि भुक वाढविणारी,हृद्य,बल्य,पचायला हल्की,जखम,ताप,डोळ्याचे रोग ह्यात पथ्यकर,गोड,रुचिकर,पौष्टीक,तहान कमी करणारी व मल बांधुन ठेवणारी असते.
३)पेज(पेया):
१ भाग भातामध्ये १४ भाग पाणी घालून केली जाते ती पेज.हि थकवा,ताप,जुलाब ह्यात पथ्यकर आहे,पचायला हल्की,भुक वाढविणारी,रुचिकर,वात व मल ह्यांना पुढे सरकवणारी,घाम उत्पन्न करणारी आहे.
४)मंड:
पेजेतील शितें काढली कि जो द्रव भाग उरतो तों म्हणजे मंड होय.हा पचायला हल्का,थंड,मल बांधुन ठेवणारा,भुक वाढविणारा,ताप,अतिसार ह्यात पथ्यकर,चक्कर येत असल्यास ती कमी करणारा,कफ पित्त नाशक आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आयुर्वेदामध्ये अनेक दुधांचे गुणधर्म सांगितले आहेत.पण त्यातील जे दुध मानव प्राणी प्यायला वापरतो तेवढ्याच दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखात पहाणार आहोत.
१)गाईंचे दुध:
हिचे दुध चवीला गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,शरीरात क्लेद व चिकटपणा अल्प प्रमाणात निर्माण करते,कफकर,वातपित्त कमी करणारे, संडासला व लघ्वीला सुकर करणारे,मानसिक आजारबरेकरणारे,दाहनाशक,शक्तिवर्धक, विषनाशक(असे म्हणतात कि जर गाईने चुकून एखादी विषारी वनस्पती खाल्ली तरी त्याचे विष हे गाईच्या दूधात उतरत नाही).
२)म्हशीचे दुध:
चवीला गोड,थंड,पचायला गाईच्या दुधापेक्षा जड,स्निग्ध,भरपूर क्लेद व चिकटपणा निर्माण करणारे,बलकारक,शुक्रधातूची वाढ करणारे,झोप आणणारे,संडास व लघ्वी बांधून ठेवणारे,भुक कमी करणारे आहे म्हणून भस्मक रोगात हे द्यावे असे सांगितले जाते.
३)शेळीचे दुध:
गोड,तुरट,थंड,पचायलाहल्के,स्निग्ध, पित्तनाशक,बलदायक,पौष्टीक,शुक्रधातू वाढविणारे,भुक वाढविते,संडास बांधून ठेवणारे असून टिबी ह्या आजारात अत्यंत पथ्यकर आहे.
४)मेंढीचे दुध:
गोड,पचायला जड,वातनाशक,कफ व पित्त वाढविणारे,उष्ण असते.हे दुध दमा असणाऱ्या व्यक्तिंनी मुळीच पिऊ नये.
५)स्त्रीचे दुध:
वातपित्त नाशक,डोळ्यांनाहितकर,रक्तदोषनाशक,गोड,तुरट व पचायला हल्के असते.
असे हे वेगवेगळ्या दुधांचे गुणधर्म आपण ह्या लेखामध्ये पाहिले.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
श्लोकातील पुढचा शब्द आहे, ग्राम्यौदक आनूपरसः
ग्राम्य म्हणजे गावातील.
गावातील काय काय ?
रस म्हणजे जल किंवा पाण्याशी संबंधीत, आनूप म्हणजे पाणथळ ओलसर जागी रहाणारे पशुपक्षी, प्राणी, मासे, त्यांचे मांस दूध आदि. तसेच या प्रदेशातील फळे, पालेभाज्या इ पिके. एवढी या विषयाची व्याप्ती आहे. हे केवळ उक्त आहे. न सांगितले गेलेले ते तेवढेच अनुक्त आहे. अनुक्त म्हणजे याप्रमाणे इतर आपण जाणून घ्यावेत या अर्थी.
केवळ गावातील आणि जंगलातील प्राणी यांच्या स्वभावानुसार त्यांचे गुणधर्म बदलतात. परिणाम बदलतात. त्यामुळे गावातील प्राणी आणि गावात न रहाणारे जंगली प्राणी यांच्या मांसात फरक असतो.
जसे, गावातील प्राण्यांची वाढ ही थोडी जास्ती होते. जंगलामधे राहणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत गावामधे फिरायला जागा कमी असते. त्यामुळे व्यायाम कमी होतो. मृत्युची भीती जंगलात जास्ती असते, त्यामुळे अन्न सेवन करीत असताना देखील सतत मान वर करून इकडे तिकडे लक्ष ठेवून आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जीव वाचेपर्यंत धावावे लागते. तसे गावातील प्राण्यांचे होत नाही. तसे ते सुरक्षित असतात.
कालमानानुसार गावातील प्राण्यांमधे परत दोन प्रकार पडतात. आपले अन्न आपणच शोधून खाणारे गावातील प्राणी जसे कावळा, चिमणी, गावठी कोंबडी इ. आणि अन्नासाठी माणसावर अवलंबून असणारे खुराड्यात वाढवलेले पाळीव प्राणी जसे पाळलेली बदके, डुकर, ब्राॅयलर पक्षी इ.
खुराड्यात ज्यांना माजवले जाते, ते प्राणी तुलनेत जास्त सुस्त असतात, गुबगुबीत, मांसल, धष्टपुष्ट असतात. यांचा व्यायाम जवळपास नसतोच. वजनही जवळ जवळ दुप्पट असते. अंगावर चरबी जास्ती असते. हे प्राणी पाळले जातात ते काही केवळ हौस किंवा भूतदया म्हणून नाही तर त्यापासून फक्त पैसा आणि पैसाच मिळवायचा असतो. मग ते बोकड असो वा कोंबडं किंवा डुक्कर असो वा बदक. भारतात अजून तरी गाई म्हैशी बैल रेडे त्यांची वासरे, ही दुधासाठी आणि शेतीकामासाठी वाढवली जातात. पण पाश्चात्य जगात यांचे मांस हा व्यापाराचा मुख्य पदार्थ आहे. आता भारतात देखील तोच दृष्टीकोन राबवण्यात पाश्चात्य तरबेज व्हायला लागले आहेत. आणि भारतातले अहिंसेचे पुजारी, हिंसेच्या मार्गाने जायला लागले आहेत. असो.
खा. खा. खायला घालायचे, मांस आणि चरबी वाढवून वजन वाढवायचे, त्यासाठी काही विशिष्ट औषधी खायला घालायची आणि हार्मोन्सची सूचिकाभरणे (म्हणजे इंजेक्शन) टोचायची, गलेलठ्ठ करून वजन वाढवून विकायची असा सगळा बिझनेस असतो. त्या प्राण्यांच्या आरोग्याची कोणालाही कसलीच काळजी नसते.
ब्राॅयलर कोंबड्याचे म्हणाल तर साधारणपणे पंचेचाळीस दिवसाची ब्राॅयलर कोंबडी साधारणपणे दोन ते सव्वादोन किलोची होते. तर त्याच वयाची गावठी कोंबडी फक्त नऊशे ग्रॅम ते एक किलो वजनाची असतात. यावरून अंदाज येईल की गावातील खुराड्यात वाढवलेले प्राणी आणि मोकळेपणाने फिरणारे प्राणी यांच्या वजनात एवढा फरक का येतो ते !
असे माजवलेले प्राणी खाल्ले की त्यांचे मांस पचवायला देखील तेवढीच जास्त चरबी संपली पाहिजे.तेवढाच जास्त व्यायाम झाला पाहिजे जर तेवढा व्यायाम, कष्ट झाले नाहीत आणि ती वाढलेली चरबी जर संपली नाही, तर प्रमेह ठरलेला.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.02.2017
दिवसेंदिवस छोटय़ा छोटय़ा त्वचाविकारांनी पछाडलेले रुग्ण मोठय़ा संख्येने; त्वचा रोग तज्ज्ञांकडे जातात. डॉक्ट रवैद्यांकडेही येतात. काळे, वेदनारहित व तिळांसारखे जे त्वचेवर डाग उठतात त्यांस ‘तिलकालक’ म्हणतात. तेच जाड व उंच असल्यास त्यांस ‘मस’ म्हणतात. मसापेक्षांहि उंच, पांढरे वा काळे असतात त्यास ‘चामखीळ’ म्हणतात. जन्मत: काळा/पांढरा व त्वचेबरोबर जो वाटोळा डाग असतो त्यास ‘लांछन’ म्हणतात.
या सगळ्या क्षुल्लक त्वचाविकारात खाण्यापिण्याच्या बंधनांची मदत खूपच मोलाची व खर्चाच्या दृष्टीने अल्पमोलाची ठरते. मीठ, आंबट, खारट पदार्थ, लोणची, पापड, शिळे अन्न, फास्टफूड, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, मिसळभाज्या, दही, रसम सांबार, इडलीडोसा, ढोकळा, सॉस, व्हिनेगार, शेव, भजी, चिवडा आदी टाळावेत. जेवण साधे फिके, शक्यतो उकडलेल्या भाज्या, ज्वारी, मूग असे असावे. असे पथ्यापथ्य पाळल्यामुळे हे क्षुद्ररोग वाढत नाहीत. लवकर आटोक्यात येतात. तीळ या विकाराची कोणी कात्री देऊ शकत नाही. तीळ आपोआप येतात, आपोआप जातात. औषधोपचाराशिवायही जातात पण ज्यांचे तीळ खूप मोठे असतात त्यांनी त्या जागेचा वर्ण सुधारण्याकरिता एलादितेल थेंबथेंब दिवसातून ४-५ वेळा लावावे. तीळांची संख्या वाढत असल्यास प्रवाळ, कामदुधा, उपळसरी सकाळ संध्याकाळ; त्रिफळाचुर्ण रात्री अशी औषधे घ्यावी. मस खूप लहान असल्यास दुर्लक्ष करावे. सर्जरस किंवा राळेचे मलम घासून लावल्याने मस बहुधा ८-१५ दिवसात बरा होतो. मस आकाराने मोठा असल्यास घोडय़ाचा केस करकचून बांधावा. मस निश्चयाने गळून पडतो. चामखीळ विकाराकरिता सर्जरस मलम लावणे हा हुकमी उपाय! चामखीळीचा आकार मोठा असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ अशी औषधे घ्यावी. लांछन विकारात क्षीरिवृक्षांच्या साली, कोंब दूधात वाटून लेप करावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-वैद्य प. य. वैद्य खडीवाले
हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल.
रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील. रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील. तुमच्या कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल. दिवसातुन अनेक वेळा तुमच्या नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच तुमचे नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील. ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.
व्हॅसलिनचा उपयोग तुम्ही लिप ग्लॉसम्हणून सुध्दा करु शकता. थोडेसे व्हॅसलिन घेऊन तुम्ही आवडत्या कूल-एड पावडरमध्ये मिक्स करु शकता. तुमचा फेव्हरेट लिप ग्लॉस तयार होईल. मायक्राव्हेवमध्ये एक चॉकलेट बाइट आणि थोडेशी व्हॅसलिन मेल्ट करा. आता हे मिक्स करुन घ्या. तुमचा चॉकलेट लिप ग्लॉस तयार आहे. परफ्यूमचा सुंगध दिर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास सर्वात अगोदर व्हॅस्लीन लावून घ्या आणि त्यावर परफ्यूम स्प्रे करा. पिंपल्सची समस्या असेल तर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायद्याचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti