(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • किचन क्लिनीक – ताक

    असे म्हटले जाते की स्वर्गलोकाचा राजा इंद्र ह्याला हि जे दुर्लभ होते ते ताक मात्र आपल्या पृथ्वी वासियांना सहज उपलब्ध आहे.तर असे हे ताक दुधाचे दही बनविले जाते व दही घुसळून त्याचे ताक बनते.

    दहि कसे घुसवले जाते ह्यांवरून ह्या ताकाचे चार प्रकार पडतात ते खाल्ली प्रकारे:

    १)घोल:
    ह्यात पाणी न घालताच दही घुसळले जाते व ताक बनविले जाते. ह्या ताकाचे गुण साधारण पणे दह्या सारखेच असतात.हे वातपित्तनाशक आहे.

    २)मथित(मठ्ठा):
    दह्यात पाणी न घालता घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे ताक Irritable Bowels मध्ये चांगले काम करते कारण हे संडास बांधून ठेवते त्यामुळे परत परत जुलाब होत नाहीत.हे कफ पित्तनाशक आहे.

    ३)ताक:
    दह्यात १/४ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे त्रिदोषनाशक असून थंडीच्या दिवसात प्यायला उत्तम.हे भुक वाढविते व तोंडावा रूची आणते.

    ४)उदश्वित:
    दह्यात १/२ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे कफकर असून बल वाढविणारे,शरीरातील विषार कमी करणारे आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – काही दह्यांचे गुणधर्म व दह्याचे घरगुती उपचार

    १)गाईच्या दुधाचे दही:

    चवीलागोड,आंबट,उष्ण,स्निग्ध,बलकारक, पुष्टिकर,भुक वाढविणारे व अजीर्णात उपयुक्त आहे.

    २)म्हशीच्या दुधाचे दही:

    चवीला गोड,आंबट,पचायला जड,स्त्राव उत्पन्न करणारे,स्निग्ध,वातनाशक,कफकर,रक्तदुषित करणारे,शुक्र व वजन वाढविणारे आहे.

    ३)शेळीच्या दुधाचे दही:

    मल अर्थात संडासलाघट्टकरणारे,हलके त्रिदोषनाशक,भुक वाढविणारे,वजन वाढविणारे आहे.

    आता आपण दह्याचे काही घरगुती उपचार पाहूयात:

    १)कुळीथाचे अजीर्ण झाले असता ताजे दही कपड्यात बांधून टांगून ठेवावे व त्याचे निथळणारे पाणी प्यावे.

    २)भुक लागते पण तोंडावर चव नाही असे असल्यास भोजन करताना मध्ये मध्ये दही+सैंधव+ खडी साखर हे मिश्रण घ्यावे.

    ३)पातळ जुलाब होत असल्यास दही+तूप+सैंधव हे मिश्रण भातात मिसळून खावे.

    ४)दह्यावरची साय २ चमचे+१ चमचा त्रिफळा चुर्ण+१ चमचा मध हे मिश्रण रोज रात्री घेतल्यास डोळ्यांना हितकर आहे.

    ५)कृश शरीराच्या व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन आठवड्यातून दोन वेळेस दुपारच्या जेवणात दही व खडी साखर हे मिश्रण घ्यावे.

    दही अतिप्रमाणात खाल्ल्यास कफ व पित्ताचे विकार होऊ शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – दही खायचे नियम

    आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.

    तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात:

    १)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.

    २)दही गरम करून खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.

    ३)अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.

    ४)दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.

    ५)दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव,खडी साखर असे काही तरी घालून खावे.

    ६)उन्हाळा,वसंत ऋतू,व शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.

    ७)संडास मधून आव पडणे,डोके दुखी,सर्दी,पडसे,त्वचारोग,अम्लपित्त,संडासला आगहोणे,लघ्वीचीजळजळ,रक्तदोष,कोड,
    अंगावर सूज येणे,रक्तस्राव,पांडूरोग,चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.

    ८)दही हे मासे,अंडी,मांस,फळे,भाज्या,कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष,डोळ्यांचे विकार,त्वचा रोग,रक्त विकार,अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे,रक्तविकार होऊ शकतात.

    म्हणूनच दही खा पण जरा जपून.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • मन कि बात – व्यसनं आणि सरकार..

    प्रत्येक बजेटमधे, सरकार कोणत्याही पक्षाचं असो, एक गोष्ट काॅमन असते आणि ती म्हणजे दारू-बिडी-सिगारेट (हानीकारकच परंतू ड्रग्सच्या तुलनेत कमी हानीकारक) आदी गोष्टींवरची करवाढ. या करवाढीमुळे सहाजीकच या गोष्टींच्या किंमती वाढतात

  • अल्सर

    अल्सर म्हणजे काय?

    अल्सर म्हणजे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात (डय़ुओडेनम) होतात. आम्लपित्ताशी आपण ज्या अल्सरचा संबंध जोडतो तो हाच. याशिवाय काही रुग्णांमध्ये अन्ननलिका, मोठे आतडे किंवा लहान आतडय़ालाही वेगवेगळ्या कारणांमुळे अल्सर होऊ शकतो. पण हे नेहमी बघायला मिळणारा अल्सर हा जठर किंवा डय़ुओडेनमला होणारा.

    लक्षणे कोणती?

    अल्सरच्या प्रकारानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सामान्यत: दिसणारी काही लक्षणे अशी-

    *पोटाच्या वरच्या भागात वारंवार दुखणे

    *आम्लपित्त होणे

    *सतत पित्त वर येऊन छातीच्या मध्यभागी दुखणे

    *पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे

    *यात अल्सरच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार पित्त होते, भूक कमी होते, काही जणांचे वजनही कमी होते. बेंबीच्या वरच्या भागात दुखायला लागते.

    *अल्सरच्या गंभीर लक्षणांमध्ये दुखणे वाढते, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसावे लागते. अशा दुखण्यात बऱ्याचदा खाल्ल्यावर आराम पडल्यासारखे वाटते. मळमळ आणि आम्लपित्त झाल्यानंतर होतात तशा उलटय़ाही होऊ शकतात. आजार आणखी पुढे गेला असेल तर उलटीतून रक्त पडू शकते. काही रुग्णांमध्ये शौचावाटे रक्त जाऊ शकते किंवा शौच काळ्या रंगाची होऊ शकते.

    *अल्सरचे काही रुग्ण अगदीच गुंतागुंतीच्या गंभीर परिस्थितीत डॉक्टरांकडे येतात. अशा रुग्णांमध्ये अल्सर फुटून आतडय़ाला छिद्र पडलेले असू शकते. या रुग्णांना अचानक पोटात प्रचंड दुखू लागणे, उलटय़ा होणे आणि पोट गच्च होऊन फुगणे ही लक्षणे दिसतात. गंभीर स्थितीत आलेल्या काही रुग्णांना रक्ताची उलटी होते किंवा संडासवाटे जोरात रक्त जाते. याउलट काही रुग्णांमध्ये अल्सर भरून आतडय़ाची ती जागा बारीक होते आणि तिथे अडथळा निर्माण होऊन उलटय़ा होतात.

    अल्सरची कारणे कोणती?

    *‘एच पायलोरी’ नावाच्या जंतूचा संसर्ग हे जठराच्या तसेच लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागाच्या अल्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. या जंतूंची लागण दूषित अन्न व पाण्यातून होते.

    *वेदनाशामक गोळ्यांचा अनावश्यक वापर किंवा काही आजारांमुळे दीर्घ काळ पित्तकारक औषधे घ्यावी लागणे यामुळेही अल्सर होऊ शकतो.

    *धूम्रपान व मद्यपान

    *सातत्याने खूप तिखट व मसालेदार खाणे

    *अतिरिक्त ताण व त्यामुळे वाढणारे आम्लपित्त हे देखील अल्सरसाठी कारणीभूत ठरू शकते.

    *अल्सर सर्वसाधारणपणे वयाच्या विशीनंतर आढळणारा आजार आहे. तरुणांमध्ये तसेच वृद्धांमध्येही अल्सरचे रुग्ण सापडतात.

    डॉक्टरांकडे केव्हा जावे?

    *आपल्याकडे आम्लपित्ताच्या रुग्णांची संख्याही कमी नाही. त्यातील कित्येकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असतो. या त्रासात देखील रुग्णांना पित्त उसळणे, मळमळ व उलटी होणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे दिसू शकतात. यातील प्रत्येक रुग्णाला अल्सर असतो असे नक्कीच नाही. पण असे त्रास सातत्याने व्हायला लागले तर अल्सरची शक्यता पडताळून पाहणे योग्य. अल्सरचे निदान नुसती लक्षणे पाहून करत नाहीत. दुर्बिणीतून तपासणी (एंडोस्कोपी) करून अल्सर आहे की नाही हे सांगता येते.

    *पोटाचा कर्करोग असलेल्या काही रुग्णांनाही वर सांगितलेल्यासारखीच लक्षणे दिसू शकतात. परंतु आम्लपित्त समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेणे चांगले.

    अल्सर होऊ नये म्हणून-
    *जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय.

    *वारंवार अति मसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे.

    *रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी.

    *अनेकांना क्रोसिन, काँबिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा.
    अल्सर आणि शस्त्रक्रिया

    *अल्सरचे स्वरुप साधे असेल तर ‘एच पायलोरी’ जंतूंच्या विरोधातील प्रतिजैविके आणि त्याबरोबर ४ ते ८ आठवडय़ांपर्यंत आम्लपित्त कमी होण्यासाठीची औषधेही दिली जातात. अर्थात औषधे घेण्याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

    *अल्सरची स्थिती गंभीर असेल किंवा त्यावर औषधांचा म्हणावा तसा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया करून घेण्यास सुचवले जाते.

    *अल्सरच्या सर्वच रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे; किंबहुना आता आम्लपित्त कमी करण्यासाठी अधिक गुणकारी औषधे उपलब्ध झाल्यामुळे अल्सरसाठी शस्त्रक्रियेची गरज भासण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

    आम्लपित्तनाशक औषधेही वारंवार नकोच!
    *आम्लपित्तावर स्वत:च्या मनानेच सारखी- सारखी ‘अँटासिड’ म्हणजे आम्लपित्तनाशक औषधे घेण्याची सवयही कित्येकांना असते. अँटासिडची गोळी किंवा पातळ औषध घेऊन बरे वाटत असले तरी ते तेवढय़ापुरते असते. यात उपचार तर अर्धवट होतातच, पण औषधाने तेवढय़ापुरते बरे वाटू लागल्यामुळे आजाराचे निदान केले जात नाही.

    *आम्लपित्तच्या लक्षणांवर अँटासिड औषधे घेताना दुसरीकडे तिखट- मसालेदार खाणे, धूम्रपान किंवा मद्यपानाचे कुपथ्य देखील सुरूच राहण्याची शक्यता अधिक असते. परिणामी आम्लपित्तावर योग्य इलाज होतच नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाने आम्लपित्तावर वरवरचे उपाय करत राहण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवलेले बरे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. संजय कोलते.

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह अंतिम भाग २५

    आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी
    ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
    नवान्नपानं गुडवैकृतंच
    प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।।

    मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ?

    प्रमेह होऊ नये म्हणून
    अंगाला घाम आणून ।
    शरीरातील क्लेद काढून
    राहून सदैव दक्ष ।
    आहारावर असावे लक्ष ।। 1।।

    प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण झालेल्या कफाचा विकृत चिकटपणा म्हणजे क्लेद कारणीभूत असतो. जो तयार होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहीले पाहिजे.

    केली जर मेहनत
    प्रमेह होईल नत ।
    शरीरा येई लघुत्व
    शंका मनी आणू नये ।।2।।

    मेहनत केली तर मधुमेह नाहीसा होतो.
    शरीराच्या हालचाली जेवढ्या जास्ती तेवढा शरीराला हलकेपणा येतो.

    फिरायचे फिरोन करावे
    बसायाचे बैसोन लिहावे ।
    बसणे ठिकाणी झोपणे
    ऐसे करणे बरे नव्हे ।। 3 ।।

    जे काम फिरून करता येण्याजोगे असते, ते बसून करू नये, जे बसूनच करायचे असेल ते झोपून करू नये.

    दीवास्वाप टाळावे
    टेबलावरी लवंडावे ।
    पांघरूण घेऊन झोपावे
    हे क्लेदाचे कारण ।। 4 ।।

    दुपारची झोप अजिबात नको. अपवाद ग्रीष्म आणि शरद ऋतु.
    झोपायचे असल्यास जेवणाअगोदर एक डुलकी टेबलखुर्चीत बसून काढावी.

    कष्टाची कामे करोन
    झोपावे निश्चिंत होवोन ।
    फुका कारणे लोळोन
    क्लेद माजतो अंगासी ।।5।।

    झोप तेव्हाच लागते, जेव्हा मेहनत करून थकवा आलेला असतो. जेवणानंतर येणारा अशक्तपणा हा क्लेद वाढवणारा असतो.

    आळसे सुख मानो नये
    सुखाचा अतिरेक करो नये ।
    दुःखाचे दुःख मानो नये
    अंतिम सुखी होण्यासी ।।6।।

    झोपेचे सुख हे थकवा घालवण्यापुरते असावे. झोप पूर्ण होऊनही लोळत राहाण्याचे सुख घेण्याचा प्रयत्न करू नये.
    शरीराला सुखाचा अतिरेक झाल्यास आयुष्य दुःखाचा अतिरेक सहन करावा लागतो. म्हणून देहे दुःख ते सुख मानीत जावे, आत्ता थोडासा त्रास वाटला तरी अंतिम सुख म्हणजे आरोग्य मिळेल.

    आपुले औषध स्वये करिती
    ते कुऱ्हाडीचा दांडा होती ।
    पथ्यापथ्य वैद्यास पुसती
    तयांसी नाव विवेक ।। 7।।

    मिडीयाच्या माध्यमातून अनेक सल्ले घरगुती औषधे वाचनात येत असतील तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून प्रत्येकाचे औषध वेगळे या नियमानुसार सर्व सल्ले आपल्यासाठीच असतात असे नाही. त्यातील ज्याचा अधिकार आहे, अशा वैद्यांना जरूर विचारावे.

    वेगान न धारयेत
    तहान नसता पाणी घेत ।
    वृक्कासी व्यर्थ ताण देत
    हेची प्रमेहासी आमंत्रण ।।8।।

    पाणी गरजेनुसारच प्यावे.
    तहान नसताना पाणी पिऊ नये.
    सक्काळी सकाळी पाणी नको. रात्री झोपताना मुळीच नको. दात असताना ज्युस नको. अति खाण्याची हौस नको.

    दूर रहावे चार हातं
    फवारणी आणि खतं ।
    पिकवाव्या स्वकष्टातं
    फळे आणि भाज्या ।।9।।

    रासायनिक फवारणी केलेली फळे आणि पालेभाज्या खाणे म्हणजे पोटावर अत्याचार करणे होय.

    बांधून ठेविली कोंबडी
    खाल्ली तिची तंगडी ।
    पडली रोगाची उडी
    वरच्या वरी ।।11।।

    खुराड्यात माजवलेल्या पशुपक्ष्यांचे मांस खाऊ नये, याऐवजी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाणाऱ्या प्राण्याची निवड करावी.

    सूरव्यास साक्षी ठेवून
    जे करिती भोजन ।
    सुखे होई परिवर्तन
    खाल्ल्या अन्नाचे ।।12।।

    जे प्राणी सुर्यास्तानंतर खातात, त्यांचे मांस खाऊ नये. किंवा सूर्य नसताना जे खाल्ले जाते, त्याचे रूपांतर क्लेदात होते.

    क्लेद राक्षस जाणावा
    अन्नासी सूर्य दाखवावा ।
    क्लेदासी ठार मारवावा
    सूर्या करवी ।।13।।

    धान्य किमान एक वर्ष जुने करून वापरावे, त्यासाठी कडकडीत उन्हात ते आधी वाळवावे. नाहीतर भाजून वापरावे.

    मत्स्य कूर्म अथवा खेकडा
    जलाधिपति प्रमेहासी वाकडा ।
    असे अन्न त्वरीत सोडा
    जे क्लेदासी कारण ।।14 ।।

    ज्या अन्नात पाणी किंवा जलांश जास्ती आहे ते अन्न टाळावे, जे पाणथळ जागी रहातात किंवा पाण्यातच जगतात, त्यांच्या अंगी मुळातच पाणी जास्त असल्याने असे प्राणी क्लेद वाढवतात.

    मधुर ते ते सर्व सोड
    म्हणजे फक्त नव्हे गोड ।
    पचायला होती जड
    या नाव मधुर ।। 15।।

    गोड पदार्थ म्हणजे फक्त गुळ आणि साखरच नव्हे तर पचायला जे जड ते सर्व मधुमेहाचे कारण आहेत.

    गव्हाचा होतो गाजावाजा
    मधुर रसाचा आहे राजा ।
    प्रमेहाची मिळेल सजा
    चटणी भाकरीत आहे मजा ।।16।।

    समुद्र किनारी गहू नको. कुकरचा चिकट भात नको. चटणी भाकरी सोलकढीशिवाय जेवण नको. गरजेपेक्षा जास्त नको.

    सेवा केल्यावीण खाणे
    म्हणजे नरकात जाणे ।
    कशाला मग दूध पिणे
    ताक तूप असताना ।।17।।

    श्रमाचे काम न करता भरपेट जेवणे, गाईची प्रत्यक्ष सेवा न करता पैसे देऊन विकतचे दूध दही खाणे, त्यापासून बनलेल्या चाॅकलेट, मिठाया यांच्यावर ताव मारणे हे प्रमेहाला बोलावणे आहे. जसे, दुध आणि दही हे पदार्थ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत. वैद्यांना माहिती नसल्यास हा श्लोक वाचून दाखवावा. आणि अर्थ सांगावा. पण दुध आणि दही यांचा मोह वेळीच सोडावा.

    अग्नीचा विसर पाडोन
    कधीही केले अन्नसेवन ।
    होणार नक्की अपचन
    ऐसे न करावे ।। 18।।

    भुक नसताना जेवणे, घड्याळ सांगते म्हणून जेवणे, सूर्यास्तानंतर जेवणे, ज्या अन्नाने आपल्याला त्रास होतो, हे माहिती असून जेवणे, पहिले खाल्लेले पचले नसताना परत जेवणे, आग्रहाचे जेवणे इ. प्रमेहाचे कारण आहे.

    यंत्रावर विसंबून
    मन भावना मारून ।
    इंद्रियांना गुंडाळून
    आणि त्याला विसरून
    रोगी होईल जीवन ।।19 ।।

    याकरीता,
    अखंड असावे सावधान
    खातापिता ठेवावे भान ।
    आयुष्य जगावे छान
    औषधाविना कायमचे ।।20।।

    इति अल्पमति प्रमेहसंप्राप्ती समाप्ती

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    10.02.2017

  • रामायणातील गणित शास्त्र !!!

    (WhatsApp वरून आलेली रंजक माहिती शेअर करत आहे)

    लेखक: श्री. पु. ज्ञा. कुलकर्णी,
    निवृत्त विद्युत अभियंता व गणितज्ञ, पुणे

    प्राचीन काळातील ऋषीमुनींना सूक्ष्मासह मोठमोठ्या संख्यावाचनासाठीचे आवश्यक तेवढे उत्तम नि सखोल ज्ञान होते, हे रामायणासारख्या ग्रंथातील श्लोकांचा अभ्यास केल्यास ध्यानांत येते. आज रोजी आपण मात्र येवढ्या मोठ्या संख्या वाचण्याच्या फंदातच पडत नाही हेच खरे. लक्षांश, शतांश, दशांश आणि एक, दहा, शंभर, हजार, लाख, कोटी, अब्ज इथपर्यंतच आपली सर्वसाधारण मजल जाते. यापुढील संख्यावाचनाची आपल्याला प्रत्यक्ष जरी गरज भासत नसली तरी जेव्हा केव्हा अशी गरज भासते तेव्हा आपण दहा लाख, शंभर कोटी, हजार कोटी, हजार अब्ज अशा संज्ञा वापरतो. वाल्मीकी रामायणात अशा संख्यांचे नेमक्या शब्दात वर्णन करणारे श्लोक युद्धकांड सर्गात आले आहेत, ते पाहणे व समजून घेणे आपल्याला निश्चितच मनोरंजक वाटेल असे वाटते. कोटीच्या पुढील संख्यांसाठी येथे शंकू, महाशंकू, खर्व,पद्म इ. सारख्या संज्ञांची योजना केली आहे. असो.

    रामायणाच्या युद्धकांड सर्गातील श्लोक ३३ ते ४० हे यादृष्टीने जास्त महत्वाचे आहेत. जिज्ञासूंनी हे श्लोक अवश्य अभ्यासावेत. किंबहूना संपूर्ण रामायण या निमित्ताने अभ्यासावे आणि आपला हा ऐतिहासिक ठेवा किती अमोल नि महत्वाचा आहे हे जाणून घ्यावे. आपल्या पूर्वजांचे गणिती ज्ञान किती समृद्ध होते ते जाणून घ्यावे. ’गणित’ या शब्दात इतर सर्व शास्त्रांचा समावेश होतो असे मला वाटते. येथे ते मूळ संस्कृत श्लोक दिले असून त्याखाली त्याचे मराठीत रुपांतर दिले आहे आणि त्याखाली त्या संख्या घातांकासह मुद्दाम आपल्या माहितीसाठी लिहून दाखवल्या आहेत. यादृष्टीने संस्कृत चा अभ्यास किती महत्वाचा आहे हेही ध्यानात येईल. हा अभ्यास आपण स्वतःहून करावा लागणार आहे, हे ध्यानात घेऊया.

    डॉ.प्र.न.जोशी संपादित सार्थ वाल्मीकिरामायण भाग-३-युद्धकांड अष्टाविंश सर्गः श्लोक३३-४० पुढे नमूद केल्याप्रमाणे होत.

    शतं शतसहस्राणां कोटिमाहुर्मनीषिणः ।
    शतं कोटिसहस्राणां शंकुरित्यभिधीयते ॥३३॥
    शतं शंकुसहस्राणां महाशंकुरिति स्मृतः। महाशंकुसहस्राणां शतं वृंदमिहोच्यते ॥३४॥
    शतं वृंदसहस्राणां महावृंदमितिस्मृतम् महावृंदसहस्राणां शतं पद्ममिहोच्यते ॥३५॥
    शतं पद्मसहस्राणां महापद्ममितिस्मृतम्। महापद्मसहस्राणां शतं खर्वमिहोच्यते ॥३६॥
    शतं खर्वसहस्राणां महाखर्वमितिस्मृतम् । महाखर्वसहस्राणां समुद्रमभिधीयते।
    शतं समुद्रसाहस्रमोघ इत्यभिधीयते ॥३७॥
    शतमोघसहस्राणां महौघा इति विश्रुतः ।
    एवं कोटिसहस्रेण शंकूणां च शतेन च ।
    महाशंकुसहस्रेण तथा वृंदशतेन च ॥३८॥
    महावृंदसहस्रेण तथा पद्मशतेन च ।
    महापद्मसहस्रेण तथा खर्वशतेन च॥३९॥
    समुद्रेण च तेनैव महौघेन तथैव च ।
    एष कोटिमहौघेन समुद्रसदृशेन च ॥४०॥

    या श्लोकांचे श्लोकनिहाय मराठीत रुपांतर पुढे दिल्यानुसार होते ते याप्रमाणे—

    शंभरलाखएककोटि, शंभरसहस्रकोटिएकशंकू; एकलाखशंकूएकमहाशंकू;एकलाखमहाशंकूएकवृंद॥३३-३४॥
    एकलाखवृंदएकमहावृंद;एकलाखमहावृंदएकपद्म; एकलाखपद्मएकमहापद्म;एकलाखमहापद्मएकखर्व॥३५-३६॥
    एकलाखखर्व एकमहाखर्व; एकसहस्रमहाखर्व एकसमुद्र; एकलाखसमुद्र एकओघ;॥३७॥
    एकलाखओघ एक महौघ; १सहस्रकोटि, शंभरशंकू, १सहस्रमहाशंकू, शंभरवृंद,॥३८॥
    सहस्रमहावृंद, शंभरपद्म,सहस्रमहापद्म, शंभरखर्व,॥३९॥
    शंभरसमुद्र, शंभरमहौघ, समुद्रसमुद्र, शंभरकोटिमहौघ.॥४०॥

    असे हे मराठी रुपांतर पाहून त्याचा नेमका बोध होत नाही. कारण हे शब्द आपल्या वापरातील नाहीत, परिचयाचे नाहीत. त्यासाठी त्याचे श्लोकनिहाय नेमक्या गणिती भाषेत रुपांतर करुन ते पुढे नमूद केले आहेत. हे आपल्याला समजण्यास सुलभ वाटेल असे वाटते.

    १० चा ७ वा घात =१००लाख=१कोटी,
    १० चा १२ वा घात =१०० सहस्रकोटी= १शंकू,
    १० चा १७ वा घात =१लक्षशंकू= १महाशंकू,
    १० चा २२ वा घात =१लक्षमहाशंकू= १वृंद,[३३-३४]
    १० चा २७ वा घात =१लक्षवृंद= १महावृंद,
    १० चा ३२ वा घात =१लक्षमहावृंद=१पद्म,
    १० चा ३७ वा घात =१लक्षपद्म=१महापद्म,
    १० चा ४२ वा घात =१लक्षमहापद्म=१खर्व,[३५-३६]
    १० चा ४७ वा घात =१लक्षखर्व=१महाखर्व,
    १० चा ५० वा घात =१सहस्रमहाखर्व=१समुद्र,
    १० चा ५५ वा घात =१लक्षसमुद्र=१ओघ, [३७]
    १० चा ६० वा घात =१लक्षओघ=१महौघ, १०३*१०७= एक सहस्रकोटि,१०२*१०१२=शंभरशंकू,१०३*१०१७=१सहस्रमहाशंकू,१०२*१०२२=शंभरवृंद,[३८]
    १०३*१०२७=१सहस्रमहावृंद, १०२*१०३२=शंभरपद्म, १०३*१०३७=सहस्रमहापद्म, १०२*१०४२=शंभर खर्व [३९]
    १०२*१०५०=शंभर समुद्र, १०२*१०६०=शंभर महौघ, १०५०*१०५०=१०१००=समुद्रसमुद्र, १०२*१०७*१०६०=शंभरकोटिमहौघ [४०]

    वर नमूद केलेला दहाचा ७ वा घात म्हणजे एक कोटी हे आपण समजू शकतो पण, दहाचा १००वा घात म्हणजे ’समुद्रसमुद्र’ होय.

    या संख्येची आपण कल्पनाच करुं शकत नाही. पण आमच्या पूर्वजांना हे चांगले ठाऊक होते. हे अभिमान वाटावे असेच आहे, असे वाटत नाही का? आणि म्हणून रामायण, महाभारत, उपनिषदे, वेद यांचा आपण मूळातून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी संस्कृत आलेच पाहिजे, जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करायचा असेल तर मॊडी लिपी माहित करुन घेतलीच पाहिजे. हे सारे राष्ट्रकार्य आहे असे समजून अभ्यासण्याची गरज आहे. हा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. असो.

    मोठ्या कालगणनेसाठी पंचागात मोठमोठ्या संख्यांचा विचार जसा केला जाई तसाच सूक्षकालगणनेसाठी लव, निमिष, पल अशा संज्ञांचा वापर केला जात असे. जाता जाता ही माहिती येथे देणे अप्रस्तुत ठरु नये. पंचागाचा उपयोग करणार्‍यांना या संज्ञा माहित असतात. मला लहानपणापासून पंचाग वाचण्याचा नाद आहे, सवय आहे.

    कालगणनेसाठी ’लव’ या संज्ञेचा वापर होत असे. ’लव’ म्हणजे शतपत्रातील एका कमलदलाचा भेद करण्यासाठी लोह शलाकेस लागणारा काळ होय. पण याचा नेमका अर्थ काय ते समजत नाही. येथे प्राचीन कालमापनासाठीच्या संज्ञा आपल्या माहितीसाठी देत आहे.

    ३०लव=१त्रुटी; ३० त्रुटि=१ कला; ३०कला =१ काष्ठा; ३० काष्ठा =१ निमिष, एक निमिष म्हणजे १ चुटकी वाजते तो वेळ होय. ८ निमिष= १ मात्रा, एका मात्रेत एक श्वास पूर्ण होतो. ३६० निश्वास= १ घटिका, २ घटिका= १ मुहूर्त, ३० मुहूर्त = अहोरात्र व एक अहोरात्र म्हणजे १दिवस = २४ तास होय. ३६० दिवस=१ वर्ष.

    हे एक वर्ष म्हणजे देवाचा किंवा ईश्वराचा एक दिवस होय.१२००० ईश्वरी वर्षे म्हणजे एक चतुर्युग. एक हजार चतुर्युगे=ब्रह्माचा एक दिवस. यासच एक कल्प म्हणतात. याविषयी दासबोध दशक ६ समास ४ ओवी २ व ३ मध्ये ”ऐसी चतुर्युगें सहस्र | तो ब्रह्मयाचा येक दिवस ||६.४.२|| असा उल्लेख आलेला आहे.

    श्रीसूर्य सिद्धांतानुसार २७ महायुगे संपून २८ वे महायुग सध्या चालू आहे. यासंबंधीचा ” चतुर्युग सहस्त्राणि ब्रह्मणो दिनमुच्यते” हा श्लोक पंचांगात पाहायला मिळतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे समजले आते, यासच एक पर असे म्हणतात. याच्या अर्धा काळ ”परार्ध” होय.

    या प्राचीन भारतीय कालमापनाची तुलना सध्याच्या कालमापन पद्धतीशी कशी होते ते समजून घेतल्यास याचे थोडेफार आकलन होण्यास चांगली मदत होते. आंतरजालकावर ही माहिती मिळाली ती खालील प्रमाणे.

    १] प्रतिविपल-०.००६ सेकंद;
    २] ६० प्रतिविपल -१ विपल--०.४.सेकंद;
    ३] ६०विपल- १पल-विघटी;
    ४] ६० पल- १ घटिका- दंडा, नाडी- २४ मिनिटे;
    ५] ६० घटीका– १ दिवस- दिन, वाट, वासर;
    ६] १० विपल- १प्राण- ४ सेकंद;
    ७] ६ प्राण-१पल-२४ सेकंद

    याजबरोबर गुरुवार मध्यरात्री १७-१८ फेब्रु ३१०२ बी.सी.ला कलियुग सुरु झाले असे येथे नमूद केले आहे. असो.

    कादिनव, टादिनव, पादिपंचक, याद्यष्टक, क्षशून्यम। या सूत्राचा वापर करुन अनेकदा सांकेतिक भाषेत संख्यांचे सादरीकरण केले जात असे. या सूत्रानुसार
    कटपय=१,
    खठफर=२,
    गडबल=३,
    घढभव=४,
    ङणमश=५,
    चत-ष-=६,
    छथ-स-=७,जद-ह-=८,
    झध-- =९ आणि
    क्ष=०

    याप्रमाणे प्रत्येक वर्णाक्षरास अंक कल्पून वैदिकगणितात दिलेल्या ”शंकराच्य़ा स्तुतिपर स्तोत्राची” उकल, गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य भारती तीर्थकृष्ण महाराज यांनी करुन दाखवली. यात ’च’ आणि ’त’ गटातील अनुनासिकांचा वापर केला नसल्याचे दिसून येते. शून्यासाठी ’क्ष’ या वर्णाक्षराचा उपयोग केला आहे. यावरुन संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारी पंडित मंडळी या सूत्राचा वापर अत्यंत प्रभावीपणे करत असत असे दिसून येते. अगदी अशाच प्रकारे मराठी भाषेचा वापर करुन श्री समर्थानी गुप्त संदेश दिले असल्याचे अनेक ठिकाणी आढळते.

    ”गोपीभाग्यमधुव्रात । शृंगिशोदधि संधिग । खल जीवित खाताव । गलहालार संधर ॥

    हा श्लोक वरवर पाहाता श्रीशंकराची स्तुति करण्यासाठी योजला आहे, पण प्रत्यक्षात मात्र हा श्लोक म्हणजे पाय या चिन्हाची ३२ अंकी किंमत आहे. वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे ’पाय’ होय. रोजच्या व्यवहारात आपण त्याची किंमत २२/७ किंवा ३.१४ इतकीच घेतो, पण येथे मात्र ती प्रत्येक चरणात ८ अंक याप्रमाणे ४ चरणात मिळून ३२ अंकी दिलेली आहे.

    वर दिलेला मंत्र या श्लोकातील अक्षरांचे अंकात रुपांतर करण्यासाठी उपयोगी पडतो.येथे ’गोपी’ म्हणजे गप=३१, भाग्यम म्हणजे भगम=४३५, धुव्रात= ९४६ यावरुन पहिला चरण ३१४३५९४६ हे अंक दर्शवतो. २रा चरण शृंगि=५३, शोदधि=५८९, संधिग=७९३ म्हणजेच ५३५८९७९३ हे अंक दर्शवतो, ३रा चरण खल=२३, जीवित=८४६, खाताव=२६४ म्हणजेच २३८४६२६४ हे अंक तर ४था चरण ”गल हालार संधर” = ३३८३२७९२ हे अंक दाखवतो. याप्रमाणे चारी चरणाचे सर्व अंक त्या अनुक्रमाने मांडल्यास पाय= ३.१४३५९४६ ५३५८९७९३ २३८४६२६४ ३३८३२७९२ अशी ३२ अंकी मिळते. असो.

    याप्रमाणे, भारतीय प्राचीन गणित किती समृद्ध आहे, याची ही नुसती झलक आहे. अजूनही बरेच कांही सांगता येण्यासारखे आहे. परंतु येथे केवळ त्याची तोंड ओळख करुन देणे येव्हढाच उद्देश्य आहे. ही ओळख करुन दिल्यावर आपण सखोल अभ्यासाला प्रवृत्त व्हाल अशी अपेक्षा आहे. निदान या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास डोळसपणे करण्यासाठी प्रयत्‍नरत व्हाल तर या लेखाचा तो उद्देश्य सफल झाला असे समजता येईल. इदम् न मम ! जयजय रघुवीर समर्थ! श्रीरामकृष्णार्पणमस्तु !

    संदर्भ: १] सार्थ वाल्मीकिरामायण भाग ३- डॉ. प्र.न.जोशी आवृत्ती शके १९०६ २] सार्थ दासबोध-के.वि.बेलसरे ३] प.पू.शंकराचार्य भारति तीर्थकृष्ण महाराज यांच्या वैदिक गणितावर, १९८० दरम्यान स्वतः अभ्यास करुन काढलेल्या टीपांच्या नोंदीवरुन. .

    सौ.जयश्री खाडीलकर देशपांडे यांचे भिंती वरुन साभार ......

  • किचन क्लिनीक – दही

    दही हा पदार्थ जरी दुधापासूनच बनत असला तरी दुध व दह्याच्या गुणधर्मात बराच फरक आहे.दुधासारखे जर आपण दह्याचे नियमीत सेवन केले तर ते रोगांना आयतेच निमंत्रण दिल्या सारखे होईल.

    दही हा पदार्थ थंड असून तो शरीरात थंडावा निर्माण करतो हा जो समज आपल्या समाजात रूढ झाला आहे तो पुर्णत: चुकीचा आहे.वास्तविक दही हे उष्ण गुणाचे असते.

    आता दह्याचे सामान्य गुणधर्म पाहूया:

    दही हे शरीरात स्निग्धपणा निर्माण करते,पचायला जड असते,तोंडास रूची आणते,शरीरात शुक्रधातू व चरबी वाढविते,वात दोष कमी करून पित्त व कफ दोष वाढविते.

    साधारण पणे दही हे ७ प्रकारचे असते व प्रत्येकाचे गुण वेगळे असतात चला आता ते आपण थोडक्यात पाहू:

    १)ताजे दही:
    रुचिकर,गोड,शरीरात विविध स्त्रावांची उत्पत्ती करणारे व चरबी व कफ वाढविणारे असते.

    २)आंबट दही:
    कफपित्तकर,अंगावर सूज उत्पन्न करणारे व शरीरात स्त्राव उत्पन्न करणारे असते.

    ३)शिळे आंबट दही:
    रक्तधातू विकृत करते,पित्त वाढविते व त्यामुळे रक्ताचे व पित्ताचे अनेक विकार जसे त्वचारोग,डोळे लाल होणे,घशाशी आंबटकडू येणे,झोपेचा अतिरेक असे त्रास होतात.

    ४)अदमुरे दही:
    ह्याचे वारंवार सेवन केल्याने छातीत जळजळ,सर्दी,खोकला,पोट फुगणे,अशा तक्रारी होतात.

    ५)तापविलेल्या दुधाचे दही:
    वातनाशक,तोंडास रूचि आणते,शरीर पुष्ट करते,बलदायक आहे.

    ६)साय काढलेल्या दुधाचे दही:
    तुरट,पचायला साईच्या दह्या पेक्षा हल्के,भुक वाढविणारे,मळ घट्ट बांधुन बाहेर काढणारे,आतड्यांची गती कमी करणारे,ह्याच्या नियमीत सेवनाने पोट फुगते.

    ७)साईचे दही:
    पचायला जड,वातनाशक,कफकर,शुक्रधातू वाढविणारे आहे.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

    "दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?"
    "आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?"

    कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि दही खाण्यापेक्षा त्यापासून बनणारे ताक, लोणी आणि तूप हे उत्तरोत्तर अधिक सुपाच्य, पौष्टिक आणि जास्त चलन मिळवून देणारे अमृत असे सहजपणे शत्रुला द्यायचे ? म्हणून तर कृष्णाने मथुरेत जाणारी दुधदह्याची मडकी फोडून टाकून, डेऱ्यातील ताक, लोणी तूप मात्र, चोरून का होईना, स्वदेशातच वाटून आपल्याच बांधवाना पुष्ट केले.

    आणि असे ताकद वाढवणारे ताक, लोणी आणि तूप हे प्रमेहातही अपथ्यकर नाही. उलट ताक पचायला हलके, सदा पथ्यकर, अग्निला विझू न देणारे, आणि गुणाने रूक्ष आहे. तूप हे तर पित्ताला कमी करून अग्निला वाढवणारे एकमेव द्रव्य असावे.

    आमच्या राज्यातील ताक लोणी आणि तुपाचं हे अमृत शत्रुपक्षाला विकण्यापेक्षा, दुधाची आणि दह्याची मडकी फोडून टाकणारा, प्रमेहाचे प्रतिकात्मक कारण नष्ट करणारा, भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श असला पाहिजे.

    आयुर्वेदानुसार डायबेटीसला म्हणे गुळ चालतो. कोणीतरी, काहीतरी चर्चेसाठी पिल्लू सोडून देतो झालं. ग्रंथकार इतक्या स्पष्ट शब्दात गुळाचा उल्लेख, प्रमेह होण्याच्या कारणांमधे करीत आहेत, त्याला कसे नाकारायचे ? केवळ गुळच नव्हे तर गुळापासून बनलेले पुढील सर्व पदार्थ देखील अपथ्यकर सांगितले आहेत.

    बरं आता जो गुळ बाजारात मिळतोय, तो फुल्ल ऑफ केमिकल. पिवळा आणि पांढरट रंगाचा गुळ हा चवीला खारटही लागतो, तो त्यातील घातक रसायनांमुळे. या रसायनांमुळे मधुमेह सोडाच, कॅन्सर सारखे जीवघेणे आजार पाठी लागताहेत. हे लक्षातच येत नाही. पूर्वी गुळाला मुंगळे यायचे, गुळाच्या ढेपीवर मधमाश्या फिरायच्या. आता त्यातील विषारी रसायनांमुळे किटकसुद्धा येईनासे झाले आहेत.

    तसं गुळ पूर्वी च्या तुलनेत कमीच वापरला जातोय म्हणा ! पूर्वी कसं, बाहेरून कुणी पाहुणं आलं की गुळपाणी विचारलं जायचं. आता पाणीही विचारत नाहीत, गुळ तर लांबच राहीला. पूर्वी चहामधे पण गुळ वापरला जायचा. आता गुळाचे अतिशुद्ध विषारी रूप म्हणून साखर वापरली जातेय. !

    गुळ अभिष्यंद उत्पन्न करणारा म्हणजे चिकटपणा करणारा आहे. शिवाय मधुररसाचा आहे. म्हणून प्रमेहामधे अपथ्यकर सांगितलेला आहे.

    मधुर चवीपेक्षा, चिकटपणा जास्त गडबड करतो. आता हेच बघा ना.
    आपल्या हातावर कोणीतरी साखर ठेवली. पटकन तोंडात टाकली. हात पुसुन मोकळे. हाताला साखर चिकटत नव्हती. पण हातावर साखर ठेवली. आणि हातातील साखरेवर अर्धा चमचाच पाणी घातले आणि सांगितले, "आता फक्त साखर खा" तर ????

    साखर खाल्ल्यानंतर हाताला जसा चिकटपणा उरतो, तसाच चिकटपणा पोटातही तयार होतो, जो काढायला जास्ती कष्ट पडतात. अग्नि लवकर संपतो. आणि प्रमेहाची लक्षणे दिसतात. हा चिकटपणा जेवढा कमी होईल तेवढा प्रमेह लवकर नियंत्रणात येईल.

    साखरेऐवजी वापरल्या जाणाऱ्या सॅक्रीनच्या गोळ्या, साखरेपेक्षा घातक ! अमेरिकेत कधीच बंद झाल्यात. अमेरिकेची अशी काही क्रेझ निर्माण झाली आहे ना, की उदाहरण देऊन पटवायचे झाले तरी अमेरीकाच आठवते. असो.

    सॅक्रीनपेक्षा दोन चिमूट साखरच परवडली. साखरेपेक्षा थोडी कमी रसायने खडीसाखरेत असतात.

    एकंदरीत प्रमेह हा भरपूर गैरसमजांनी भरलेला एक गोड आजार आहे, एवढे मात्र खरे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.02.2017

  • किचन क्लिनीक – जव

    किचन क्लिनीक – जव

    जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.

    तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.

    डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.

    आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:

    १) मंड:

    हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.

    २) मंथ:

    चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.

    ३) रोटी:

    चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.

    जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.

    तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.

    धन्यवाद.

    वैद्य स्वाती अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क: ९९६०६९९७०४