(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • गुढी पाडवा

    गुडी पाडवा’. हिन्दू नववर्षाचा प्रथम दिवस. ‘गुढी पाडवा’ या शब्दातला ‘पाडवा’ हा शब्द, तिथी ‘प्रतिपदा’चं अपभ्रंशीत रुप आहे. ‘गुढी’ या शब्दाचा जन्म कसा झाला असावा याचा शोध घेताना काही मनोरंजक माहिती मिळत गेली

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेरा

    पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.

    पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.

    आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.

    आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
    किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.

    अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.

    या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
    कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    28.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग बारा

    एकदा मिक्सर सुरू झाला की झाकण मधेच उघडायचं नाही, मधेच झाकण उघडलं की आतील सर्व बाहेर उडते. तस्संच एकदा पचन सुरू झाले की आत टाकणे बंद करायचे. एकदा भोजनान्ते पिबेत तक्रम् झाले, तोंड धुतले, मुखवास खाल्ला की नंतर अधे मधे काही खायचे नाही की प्यायचे नाही.

    पातेल्यात समजा भात करायला ठेवलाय, पाणी उकळायला सुरवात झालेली आहे, तांदुळ आत घातले आहेत, अर्धवट शिजलेले आहेत, आणि मधेच आणखी दोनतीन पाहुणे आले. त्याच्यासाठी वाढीव भात करायचा झाला तर, अर्धवट शिजत असलेल्या भातात परत तांदुळ टाकायचे का ?
    असं केलं तर भात नीट होणार नाही. बिघडून जाईल.

    पीठाच्या चक्कीमधे वरून धान्य घातले आहे. पीठ पडायला सुरवात झाली आहे, आणि अचानक लोड शेडींग सुरू झाले, चक्की बंद झाली.
    तर काय होते ?
    जे धान्य आतमधे होते ते जैसे थे अवस्थेत रहाते. पुनः जेव्हा लाईट येतील, तेव्हा परत चक्की सुरू होईल, पण धान्याचे काही कण, न भरडताच पुढे जातात आणि पीठ चाळून घ्यावे लागते.

    तसेच पचन एकदा सुरू झाले, मिक्सर एकदा सुरू झाला की मधे थांबवणे नाही. कोणत्याही कारणाने मधेच आतला मिक्सर थांबला/ थांबवला की पचनावर परिणाम होतोच.

    म्हणून आज्जी म्हणायची, अरे जेवताना मधेच उठू नये. भरल्या ताटावरून उठून जाऊ नये एकदा जेवायला सुरवात केली की, सर्व लक्ष जेवणातच हवे. मन जेवताना तिथेच हवे. नाहीतर आतमधे काय हवं नको, हे समजणार कसं ?

    आज आपण जेवण कसे जेवत आहोत, याचा या निमित्ताने विचार व्हावा. आजच्या काळाचा विचार केला तरीसुद्धा जेवताना शांतपणे, पूर्ण लक्ष जेवणातच ठेवून, पूर्ण आनंद घेऊन जेवणे एवढे अशक्य कोटीतले आहे का ? टीव्हीवर मॅच नाहीतर मालिका मल्लिका पहात जेवणे, गप्पागोष्टी करत जेवणे, मोबाईल वर चॅट करत जेवणे, वाॅटसप पहाता पहाता जेवणे, जेवण अर्धवट टाकून उठणे, जेवताना अभ्यास करणे, जेवणानंतर स्वीट डिश, आईस्क्रीम खाणे, हे असे केल्याने पचन बिघडते.

    स्टार्ट टू फिनिश जेवण एका स्ट्रोकमधेच झाले पाहिजे.
    विदाऊट ब्रेक, विदाऊट जाहिराती कार्यक्रम पहायलादेखील आपल्याला किती आनंद मिळतो ना !

    मग अस्सच जेवण, विदाऊट ब्रेक, विदाऊट कमर्शियल अॅड, झालं तर पचवणाऱ्याला किती आनंद होईल ना ?

    पण नाही.
    "मला जेवतानाचाच वेळ बोलायला मिळतो, जेवत असताना समजा अर्जंट काॅल आले तर काय करायचं ?" हे असे लंगडे समर्थन आपले आपण करून घेत असतो, आणि त्याचा आनंद, आपण हिरावून घेत असतो.

    म्हणजे, पोट माझे आहे, मी काय हवे ते करेन, त्या पोटाने मी जे (अत्याचार ) करतो ते सहन केलेच पाहिजे, या मानसिकतेतून आपण बाहेर पडले पाहिजे.

    ही इंद्रिये हे अवयव, हे मन, त्याने या जन्मापुरते आपल्याला सांभाळायला दिलेले आहे. ते नीटच सांभाळले पाहिजे. त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ....

    नाहीतर तो देईल त्या शिक्षा भोगायला तयार असले पाहिजे..
    वुई आर ओन्ली अ केअर टेकर ऑफ थिस बाॅडी ! वुई हॅव टु........

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अकरा

    पोट म्हणजे जणु काही मिक्सरच !

    भांडे अर्धे अन्नाने, पाव भाग पाण्याने, असे एकुण पाऊण भरावे. पाव भाग हवेच्या संचरणासाठी मोकळा ठेवावा. आणि झाकण लावावे आणि दीड दोन मिनीटात मिक्सरमध्ये सर्व अन्नाचे पीठ तयार होते, हे आपण बघतोच.
    जसं मिक्सरमध्ये तस्संच अगदी पोटामधे सुरू असतं ! फक्त पोटामधे हा मिक्सर दीड दोन मिनिटाऐवजी दीड दोन घंटे सुरू असतो.

    जेवायला सुरवात करावी. पोटाला सूचना मिळत जाते. तसे तसे पोटात पाचक स्राव वाढत जातात. ज्या पदार्थाला पचवायला जे घटक आवश्यक आहेत, ते आधी पासूनच तिथे स्वागताला तयार असतात. सहा चवींचे सहा सोहळे आतमधे सुरू होतात. प्रत्येक चव बाहेर वेगळी असली आणि नंतर आतमधे जरी, अवघा रंग एक झाला अशी अवस्था असली तरी, त्यामधे प्रत्येक पदार्थाला जे पचवायला हवंय, ते मिळत जाते. आणि प्रत्येक पदार्थ आपलं रूपांतर करून घेण्यासाठी तयार असतो.

    नाटक सुरू करण्यापूर्वी कसं सगळे कलाकार ड्रेसिंग रूममधे नियमित कपड्यांमधे आत जातात. आतमधे रंगभूषाकार एकच असतो, त्याला प्रत्येक जण आपली भूमिका काय आहे ते सांगतो, त्याअनुसार तो सगळ्यांना असं काही रंगाने रंगवतो, त्यात त्याचं मूळ रूप बदलवूनच टाकतो, जेव्हा हे कलाकार रंगमंचावर येतात, तेव्हा स्वत्व विसरून देहभान हरवून त्या भूमिकेत तादात्म्य पावतात. आणि आपल्या वाटेला आलेला कलेचा भाग सादर करत असतात. प्रत्येक जण फक्त आपली भूमिका, आपली एन्ट्रीची वेळ, एक्झिटची वेळ, आपले संवाद लक्षात ठेवतो, कोणत्या वाक्यानंतर, त्या नाटकातली माझी एन्ट्री, माझा सहभाग दाखवायचा आहे हा क्रम लक्षात ठेवलेला असतो. आणि नाटकाचा पूर्ण एकत्रित परिणाम एकदम उठावदार होतो.

    अगदी तस्संच या अन्नद्रव्यांच होत असावं.
    तेल तूप इ. स्निग्ध पदार्थ पचवणारी यंत्रणा वेगळी, पिष्टमय पदार्थ, आंबटगोड तिखट पचवणारी यंत्रणा वेगळी. जरी वेगवेगळी असली तरी ही सर्व यंत्रणा त्या मोठ्ठ्या रंगभूषाकाराच्या आज्ञेत आपलं काम करत असतात. अगदी यंत्राप्रमाणे.

    रंगवाल्यांकडे कसं आता आपल्याला हवी असलेली शेड तयार करण्यासाठी कंप्युटरवर एक निश्चित प्रोग्राम असतो, त्यात आपल्याला हव्या असलेल्या रंगाच्या शेडचा क्रमांक लिहिला की, आतमधे जे बेसिक रंग असतात, त्यातील कोणता रंग किती मिली सोडायचा हे आधी कंप्युटर द्वारे ठरवलेलं असतं, तो तेवढ्याच प्रमाणात सिक्रीट केला जातो.
    पण आपल्यासाठी हे सिक्रेट असतं.
    आपल्याला काय महत्वाचं?
    आपल्याला जो रंग हवा आहे, त्याच शेडनुसार तो मिळणं. बरोबर ना ! त्या सिस्टीममधे बदल करण्याची सूत्र आपल्या हातात घेऊ नये.

    आतमधे मिक्सर फिरत असतो, योग्य प्रमाणात वेगवेगळे रंग योग्य प्रमाणात एकत्र होत असतात. फक्त आपल्याला त्याची जाण नसते.

    ऐनवेळी प्रोग्राम बदलवणं तर फारच कठीण असतं. म्हणून असे पदार्थ खाऊ नयेत, ज्याची पूर्वकल्पना आतदिली गेली नसेल. म्हणजेच कोटेड फूड. बाहेरून एक चव आत मधे दुसरीच चव. जसं कॅपसुलमधे भरलेलं कडू औषधी. यासाठीच आयुर्वेदीय पद्धतीने जी औषधे दिली जातात, ती विशिष्ट चवींची असतात, त्याची चव तशीच्या तश्शी आतमधे समजणं तेवढंच महत्वाचं असतं. म्हणूनच आयुर्वेदातील चूर्ण, चाटण, उगाळून घ्यायची असतात. कोणत्याही औषधांच्या चवी समजणे खूप महत्वाचे असते. फसवून औषध तर नकोच, पण आहार पण ज्या त्या चवीचा समजून उमजून आत पाठवावा.

    जीभेला फसवून केलेलं खाद्यकर्म नंतर त्रासदायक होऊ शकतं. हे लक्षात असावे.
    आतमधे फसवाफसवी नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दहा

    ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.

    एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.

    कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.

    ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !

    बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.

    ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.

    अगदी अलगद लहरेदार !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.03.2017

  • गुढी पाडवा आणि शोभायात्रा नव्हे, ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’

    नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या.

  • १००० X १०००

    श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.

    मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.

    अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.

    श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.

    श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.

    एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.

    ‘कारण त्याला 1000 X 1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.

    ‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.

    ‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.

    ‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.

    ‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.

    ‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला

    ‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.

    ‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला

    ‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’

    मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.

    जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.

    अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!

    उल्हास हरी जोशी,
    मोः-9226846631

  • जागतिक रंगभूमी दिन

    २७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. जगभरात `जागतिक रंगभूमी दिन’ साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्टिटय़ूटने १९६१ सालापासून मोठे प्रयत्न सुरू केले आणि त्यानंतर जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च १९६२ पासून जगभरात साजरा होऊ लागला. कलेचा सामुदायिक आविष्कार अभिव्यक्त होण्याची पद्धत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आजतागायत बदलत गेली आहे. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ हा शब्द आणि मराठीत आपण रंगभूमी हा समानार्थी शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाटय़संहिता, नाटय़दिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सार्या गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, पोलिश, अमेरिकन, चिनी, जपानी आणि भारतीय रंगभूमी यांचे एकमेकांशी आदानप्रदान झालेले नाही. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतिकीकरण व्हावे यासाठी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. भारतात तर संस्कृतमध्ये कालिदास, भास, भवभूती असे एकापेक्षा एक मोठे दिग्गज नाटककार होऊन गेले. भारतात बहुभाषिक रंगभूमी आणि तिचा आविष्कार वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात प्रकटलेला आहे. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तनपरंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके, लळित, तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाटय़कला जन्मास आली. रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली. त्यात मराठीत किर्लेस्कर देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर, शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या एलकुंचवार, आळेकरांपर्यंत रंगभूमीवर झालेल्या उल्लेखनीय बदलाची रंगभूमीला नोंद ही घ्यावीच लागते. पूर्वी राजे, राणी, विद्वान आणि धनिक यांचा आश्रय रंगभूमीला मिळत असे. आजही विद्वान आणि धनिक रसिकांचा विविध माध्यमातून नाटय़कलेला लोकाश्रय लाभत आहे. महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार मानला जातो. प्रतिभावंत नाटककार व दिग्दर्शक, कल्पक तंत्रज्ञ, आधुनिक तांत्रिक-यांत्रिक सुविधा, सुजाण अभिरुचिसंपन्न रंगभूमीवरील वरील वेगवेगळे प्रकार वा रूपे उदयास आली, असे म्हणता येईल. नाटय़प्रयोग व त्याचा प्रेक्षक यांच्या परस्पर संबंधांविषयीच्या वैशिष्टय़पूर्ण संकल्पनाही प्रयोगशील रंगकलेमागे दिसून येतात. अलीकडे तर पथनाटय़े होऊ लागली आहेत आणि त्यांच्या रूपाने रंगकला जशी बंदिस्त रंगमंदिरातून बाहेर पडली, तशीच ती विशिष्ट प्रकारच्या प्रेक्षकविषयक कल्पनांतूनही बाहेर पडली आहे. रंगभूमीचे हे प्रकार किंवा प्रयोग हे अखंडपणे होत राहतील. रंगभूमीवरील नाटकांमधून कला आणि सांस्कृतिक आविष्कार जो होत आहे त्याच्या स्पंदनांचा आणि संस्कृतीच्या स्पंदनांशी किंवा आंदोलनाशी तिचा अतूट संबंध आहे. नागर रंगभूमी व लोकरंगभूमी (फोक थिएटर) यांच्यातील सीमारेषाही पुसट होऊ लागल्या आहेत. तेंडुलकरांचे `घाशीराम कोतवाल’सारखे नाटक किंवा गिरीश कर्नाड यांची नाटके या दृष्टीने आधुनिक रंगभूमी आणि लोकरंगभूमी यांच्या विधायक समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल. आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमी ही केवळ कला नव्हे, तर समाजातील ती एक कलात्मक व विकसनशील संस्था आहे हे लक्षात ठेवले, तर रंगभूमीच्या अभ्यासाच्या अनेक बाजू लक्षात येऊ शकतात आणि विश्वरंगभूमीच्या दृष्टीनेही भर पडू शकते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नाटक मंदारमाला

    २६ मार्च १९६३ साली आजच्या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

    जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते... हरी मेरो जीवन प्राण आधार... अशा "मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. "मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित मा.राम मराठे आणि मा.प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.

    ‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.

    सोऽहम हर डमरू बाजे

    https://www.youtube.com/watch?v=m8tWvVY6UTk

    मंदारमाला नाटकातील इतर गाजलेली पदे
    कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)
    जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे)
    जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)
    तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)
    तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)
    बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)
    बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)
    हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वाहातं राहा..-

    आपली हिन्दू संस्कृती सिंधू नदीच्या काठी रुजली, फुलली, बहरली..! सिंधू आजही वाहती आहे आणि हिन्दू संस्कृती आजही नांदती आहे..सिंधूचं वाहणं आपल्या रक्तात एवढं भिनलंय की आपण आयुष्याच्या वाहण्याला ‘जीवन प्रवाह’ असं नांवच देऊन टाकलंय. पण एकेकाळी मोकळी, वाहती असलेली आपली संस्कृती आता हळुहळू बंदीस्त होऊ लागलीय.