(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • पायव्याचे दगड

    भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.

    असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • अहंकाराची फळे

    अहंकाराची फळे

    विजयच्या आत्महत्येची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. एका उमद्या व्यक्तिमत्त्वाने अचानक सर्वांचा निरोप घ्यावा याला काय म्हणावं? स्वत:चं आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याइतकं असं कोणतं कारण असावं याबद्दल मला जिज्ञासा वाटू लागली. विजयच्या मृत्यूचं दु:ख काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आत्महत्येशी संबंधित माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला.

    विजयचे वडील एक मोठे सरकारी अधिकारी. मोठ्या पदामुळे त्यांच्याभोवती सतत खुशमस्क-यांचा गराडा पडलेला असे व आपल्या बॉसचा अहंकार सतत कुरवाळण्याचं काम हे खुशमस्करे मोठ्या इमाने-इतबारे पार पाडायचे. अधिकारीपदाच्या खुर्चीमुळे साहेबांना कोणाकडूनही नकार ऐकण्याची सवयच राहिली नव्हती. घरातसुद्धा प्रत्येकाने आपल्याला सलाम करावा व आपलेच म्हणणे ऐकावे असे त्यांना वाटू लागले. विजयची आई महिला मंडळं, क्लब्ज व पार्ट्यांच्या विश्वात रमणारी स्त्री होती. तिला स्वत:च्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता व सभोवतालच्या सर्वांनी आपलं केवळ कौतुकच करावं अशी तिची अपेक्षा होती. कोणीही तिच्या मनाविरुद्ध वागलं तर तिच्या जिवाचा अत्यंत संताप होत असे. दोघेही जन्मदाते अहंकाराला कुरवाळण्यात इतके व्यग्र होते की विजयच्या आयुष्याकडे व समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना अजिबात फुरसत नव्हती. आपल्या भावना, विचार, समस्या समजावून घेणा-या व्यक्तीच्या शोधात निघालेला विजय अखेर एका मुलीच्या प्रेमात पडला. पण तिची मानवनिर्मित जात वेगळी होती. स्वत:च्या मुलाच्या भवितव्याचा विचार करण्यास कधीही फुरसत न मिळालेले त्याचे पालक त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्रचंड बिथरले. आपल्या मुलाशी थेट चर्चा न करता इतरांच्या मदतीने त्यांनी प्रेमी युगुलावर लग्न न करण्यासाठी प्रचंड दबाव आणला व त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अखेर अति अहंकाराने आंधळ्या झालेल्या पालकांच्या भावनाशून्य वागण्याची परिणती झाली विजयच्या अत्यंत दुर्दैवी आत्महत्येत !

    असे आम्ही कसे? प्रत्येक घरातली मुलं त्यांच्या वयोमानानुसार वागत असतात. त्यांचं विश्व वेगळं, त्यांची स्वप्नं वेगळी, आकांक्षा वेगळ्या, धडपड वेगळी, आदर्श वेगळे. त्यांना अवघं जग जिंकायची इच्छा असते. पण त्याच वेळेस लहान वयातील अपरिपक्वतेमुळे व बरेचदा अति उत्साहामुळे अनेक चुका त्यांच्या हातून घडतात.पूर्ण विचार न करता उतावळेपणाने चुकीचे निर्णय घेणे, एकतर्फी प्रेम तसेच शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजण्याची घोडचूक ही सगळी सळसळत्या तारुण्याची लक्षणे आहेत. आपल्या मुलांशी सुसंवाद साधून, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन तारुण्यातील धोकादायक वळणांची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांच्या परिपक्वतेचे व त्यांना आपल्या अपत्यांप्रति असलेल्या जबाबदारीचे लक्षण आहे. आई-वडील जर चोवीस तास आपल्याच तो-यात वावरत असतील तर मुलांनी त्यांच्या भावना, व्यथा कोणाजवळ व्यक्त कराव्या? अशा वेळी होणा-या प्रचंड कोंडमा-याचा जर आत्महत्येसारखा दु:खद शेवट झाला तर त्याला जबाबदार कोण?

    घराघरातील पालकांनी स्वत:चा अहंकार काबूत ठेवून व मुलांच्या अहंकाराला न डिवचता त्यांना योग्य वेळी सावध करणे हे कौशल्याचे काम आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी ते कौशल्य हस्तगत करणे ही काळाची गरज आहे !

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • १ एप्रिल २००४ – जीमेलचा वाढदिवस

    १ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा "गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा "एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी सुरवातीच्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते. हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. खरोखरच जीमेल सेवा सुरू झाली आणि हा हा म्हणता जगभरातील लोकांना जी-मेलने आकृष्ट केले. व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग वगैरे गोष्टी आधीही होत्या. परंतु, त्यांची ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करून घ्यावी लागत. "जी-मेल‘मध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा हात जोडून उभ्या राहिल्या. कॅलेंडर, ऑनलाइन ड्राइव्ह, फोटो होस्टिंग, व्हिडिओसाठी यू-ट्यूब, ब्लॉग, बातम्या आणि "गुगल‘च्या सर्व सेवा वापरण्याची सोय झाली. जीमेल ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या. उदाहरणार्थ, अगदी पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच त्या काळी जास्त नव्हते. निळ्या-करडय़ा रंगाचे हॉटमेल पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही खिडकी, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. अशी संपूर्ण रचना तयार करण्यामागे गुगल कंपनीतील अभियंता पॉल बुशैत याची धडपड होती. नवी सेवा मोफत द्यायची किंवा नाही, यासारख्या मुद्‌द्‌यांवर आधी कंपनीत वादही झाले होते. पण, या सगळ्यातून तावून-सुलाखून तयार झालेली "जी-मेल‘ सेवा पाहतापाहता इतकी लोकप्रिय झाली, की सध्या ती वापरणाऱ्यांची संख्या १२५ कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत! जीमेलच्या वापरकर्त्यांपैकी निम्मे आशियातच आहेत. जी-मेल मुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर संगणकाच्या पडद्यावर उमटविलेली अक्षरे निमिषार्धात सातासमुद्रापार पोचण्याची सोय उपलब्ध झाली. या "डाकिया‘चे स्वरूपच आमूलाग्र पालटून गेले. मग "पांढऱ्यावर काळे‘ करण्याची आवश्ययकता उरली नाही.

    जीमेलचे अभिनंदन
    जी-मेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी-मेलची अनोळखी फीचर्स.
    इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या 'जीमेल'चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर 'जीमेल' वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही 'जीमेल'ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.

    'स्पॅम' चा वापर
    आपल्या जीमेल अॅड्रेसमध्ये जो डॉट दिला जातो, त्याचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नसतो. तुमचा जीमेल आयडी जर tyler.durden@gmail.com असा असेल तर tylerdurden@gmail.com किंवा t.ylerdurden@gmail.com किंवा t.y.l.e.r.d.u.r.d.e.n@gmail.com या नावाने येणारे मेल्ससुद्धा तुमच्या इनबॉक्समध्येच येतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. अशा प्रकारचे जीमेल अॅड्रेस आपण वन टाइम ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी किंवा इतर तात्पुरत्या इंटरनेट सेवांसाठी वापरता येतात. तात्पुरते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जर पुन्हा त्या साइटवरून मेल येऊ द्यायचे नसतील तर आपल्या जीमेल आयडीची अक्षरे बदलून इमेल फिल्टर तयार करता येते आणि या आयडीवर येणारे सर्व मेल डीलीट करता येतात.

    इमेल फिल्टर तयार करणे
    इमेल फिल्टर तयार करण्यासाठी जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर गो टू सेटिंग्ज-फिल्टर टॅब-क्रीएट अ न्यू फिल्टर या क्रमाने जावे लागते. फिल्टर तयार झाल्यानंतर त्यात स्कीप इनबॉक्स, अप्लाय द लेबल, डीलीट आणि इतरही अनेक पर्याय असतात. फिल्टर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमच्याकडे येणारे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या पर्यायांनी तपासल्यानंतरच इनबॉक्समध्ये येतील.

    इमेल सबस्क्रिप्शनचे वर्गीकरण
    वेगवेगळ्या इमेल सबस्क्रिप्शनचे इमेल फिल्टर तयार करण्यासाठी + या चिन्हाचा उपयोग करावा. The Onion या वेबसाइटवरुन इमेल सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर tyler.durden+theonion@gmail.com हा इमेल अॅड्रेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे theonion वरून सर्व इमेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि आवश्यकता नसल्यास फिल्टर बसवून ते परस्पर डीलीट करता येतील.

    जीमेल कॉन्टॅक्ट्स
    आपल्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स ऑटोमॅटीकली आपल्या गुगल अकाऊंटशी जोडले जातात. यासाठी तुम्ही ज्या इमेल अॅड्रेसने स्मार्टफोनवर साइन इन केलेले असते त्यातील कॉन्टॅक्ट्स अपडेट केलेल असायला हवेत.

    गुगलशी कॉन्टॅक्ट्स जोडणे
    अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवरून सेटींग्ज-अॅड अकाऊंट-गुगल या क्रमाने सर्व टप्पे पूर्ण केले की गुगल अकाऊंटशी कॉन्टॅक्ट्स जोडता येतात. अशा पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये जे फोन नंबर्स असतील ते सर्व गुगल अकाऊंटशी जोडले जातात आणि नंबर डीलीट होण्याचा धोका कमी होतो. गुगल आयडीवर नंबर सेव्ह झाला की तो तुमच्या जीमेल अॅड्रेस बुकमध्ये समाविष्ट होतो आणि तुम्ही त्या इमेल अॅड्रेस ज्या डीव्हाइसवरून उपयोग कराल त्यात तो दिसू शकतो. अॅण्ड्रॉइडशिवाय आयओएस, विन्डोज फोन आणि ब्लॅकबेरीवरूनसुद्धा कॉन्टॅक्ट्स गुगल अकाऊंटशी जोडता येतात.

    गुगल १८
    गुगलच्या मुख्य पानावरील डाव्या कोपऱ्यातील जीमेल-कॉन्टॅक्ट्स-मोअर-फाइंड अॅण्ड मर्ज कॉन्टॅक्ट्स या क्रमाने पुढे गेले की आपल्या अॅड्रेस बुकमधील कॉन्टॅक्ट्सच्या डबल एन्ट्रीज दिसून येतात. यातील आवश्यक त्या कॉन्टॅक्ट्सला क्लीक करा आणि मर्ज करा.

    कॉन्टॅक्ट्स परत मिळवणे
    आपल्या फोनमधून अॅड्रेस डीलीट केला की जीमेलवरूनही तो डीलीट होतो. पण तीस दिवसांच्या आत प्रयत्न केल्यास तो कॉन्टॅक्ट रिकव्हर होऊ शकतो. यासाठी जीमेलच्या कॉन्टॅक्ट्सवर गेल्यानंतर मोअर-रीस्टोअर हे ऑप्शन्स निवडावे लागतात.

    लॅब्ज
    जीमेलची उपयुक्तता अधिकाधिक वाढवण्यासाठी 'लॅब्ज'मध्ये आणखीही पर्याय उपलब्ध आहेत. डावीकडे असलेले चॅट ऑप्शन उजवीकडे नेणे, अनेक इनबॉक्स तयार करणे, आलेला इमेल क्लीक न करता पाहता येणे असे वेगवेगळे प्रयोग 'लॅब्ज'च्या माध्यमातून करता येतात.

    कॅलेंडर
    तुमच्या गुगल अकाऊंटवर स्वतःचे कॅलेंडर/प्लानर तयार करता येते. हे कॅलेंडर इमेलद्वारे इतरांना पाठवता येऊ शकते. त्यामुळे तुमचे त्यामुळे तुमच्या वेळापत्रकानुसार इतरांना त्यांची कामे प्लान करता येतात. लॅब्ज ऑप्शनमधून कॅलेंडर सेट अप करता येते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सतरा

    "गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? "

    90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ?

    अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच ना !

    दर दोन चार तासांनी खा खा खाल्ले तर पचन करायला वेळ कधी देणार ? मग वात बिघडणारच. आपल्याच कर्मानी विकृत झालेला हा वात म्हणजे आजच्या काळातील 'गॅस' होय.

    आपल्यासाठी हा वात वाढवणारे पदार्थ कोणते ते शोधून बंद करणे हे आपणच शोधायचे. कारण आपण काय खातोय यापेक्षा कसे पचवतोय हे जास्ती महत्त्वाचे आहे. खाल्लेल्याचे पचन होणे, त्यावर अग्निची प्रक्रिया होणे महत्त्वाचे ! अग्निच्या जे जे विरोधात ते ते सर्व वात वाढवणारे. जसे पाणी. अतिरिक्त प्रमाणात, चुकीच्या वेळी घेतलेले, पाणी हे वात वाढवते.

    आंबोळी इडलीच्या सुक्या पीठात पाणी घातल्यानंतरच आंबायला सुरवात होते ना ! पाणी घातल्यानंतरच पीठ फुगते, दुप्पट होते, पीठाची चव बदलते, स्वरूप पालटते, पीठ बुडबुडेयुक्त दिसते, हे सर्व बदल पीठामधे कोणी केले ? एका पाण्याने केले. म्हणजे इडली डोसा पाव पिझ्झा यासारख्या आंबवलेल्या पदार्थात गॅस मुळातच जास्ती असतो, म्हणजे आंबवलेल्या पीठाचे सर्व प्रकार गॅस वाढवतात.

    पण क्वचित प्रसंगी हे पदार्थ खावेच लागणार असतील तर याच पीठाचे खमंग, कुरकुरीत डोसे करून खावेत, खाल्ले तरी ते दिवसाचेच खावे आणि ते पचेपर्यंत दुसरे काहीही खाऊ नये, ही युक्ती आहे. हा पर्याय आहे. सोयीस्कर अर्थ काढू नयेत.

    जेवणामधे कच्चे तेल आणि सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले तर गॅस कमी होतो.

    सूर्यास्तापूर्वी घेतलेले जेवण, गरम गरम जेवण, गोड, आंबट, खारट चवींनीयुक्त जेवण, वाताचा म्हणजे गॅसचा नाश करते. जेवणात सहा चवी आवश्यक आहेत. एखादी चव जरी कमी पडली तरी गॅस होणार.

    पाणी, तेल आणि अन्नपचन या विषयावरील मागील सर्व टीपा पुनः वाचाव्यात. नाहीतर पुनरूक्ती दोष उत्पन्न होईल.

    नियमितपणे मलप्रवृत्ती साफ राहील, असे पहावे. जेव्हा मलप्रवर्तन करावेसे वाटेल, तेव्हा "त्याचे" लगेचच ऐकावे. आणि मलमूत्र विसर्जन करून यावे. यासाठी आतून "तो" काय सांगतोय, यावर सतत लक्ष ठेवावे, म्हणजे गॅस होणार नाही.

    जे अन्नपाणी साठवलेले असते, ते गॅस वाढवणारे असते. अन्नपाणी कुजल्यावर त्यामधे गॅस तयार होतो. पालेभाज्या, कच्ची खाल्ली जाणारी आणि मोड आणून पचायला जड बनवलेली कडधान्ये, खूप पिकलेली फळे, फ्रीजमधील अन्नपदार्थ ( ते सर्व शिळेच होतात. ) रात्र उलटून गेलेला तयार आहार, गॅस वाढवतो.

    पोटात अवकाश न ठेवता ठासलेले, बकाबका खाल्लेले, बळेबळे भरवले जाणारे, मनाविरुद्ध खाल्लेले अन्न देखील गॅस वाढवणारे असते.

    जसे गाडीचे अग्निस्थान म्हणजे कार्बोरेटर आणि अतिरिक्त वायुवाहक पुंगळी म्हणजे सायलेन्सर साफ असेल, तरच गाडीचे अॅव्हरेज वाढते, हे खरे आहे ना ?

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    01.04.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सोळा

    या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो,

    ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात,

    जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही.

    जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो.

    ज्याच्या दबावाखाली भले भले अवयव गुपचूप बसून रहातात. आपले कामही करू शकत नाही, असा दरारा असणारा,

    ग्रंथात, ज्याच्या नावावर, ऐशी रोगांची भलीमोठी लिस्ट लागलेली आहे असा,

    वाॅन्टेड असे फर्मान येऊनही त्याला कोणीही पकडू न शकलेला,

    जो स्वतः विकृत होऊन, कफाला पित्ताला हलवून टाकण्याची क्षमता असलेला,

    स्वतःची वेगळी स्रोतस यंत्रणा नसतानाही, इतर प्रस्थापित यंत्रणेचा वापर करत, सर्व स्रोतसांमधे भरून रहाणारा,

    विकृत झालेल्या पित्तामुळे बिघडलेला अग्नि हा ज्याचा पितामह म्हणजे आजोबा, आणि त्यामुळेच विकृत झालेल्या कफाचा परिणाम म्हणून जन्माला आलेले 'आमजन्य अपचन' हा ज्याचा पिता आहे, ज्याच्यामुळे अनेक अन्य रोगांना जन्म मिळालेला असतो, किंवा जो त्यांचा जन्मदाता असतो,

    शोषून घेऊन सुकवून टाकणे हा दुर्गुण असलेला, अत्यंत चंचल स्वभावाची जोड मिळाली की, समोरच्यातला स्नेह आटवून टाकणारा,

    पाण्यामुळे वाढणारा, पाण्यात काम करण्याऱ्या मंडळींना लवकर पकडणारा, थंड गुणाचा जवळचा मित्र असणारा,

    ज्याच्या अस्तित्वामुळे पोटाला चारी बाजूला सारखीच तडस लागते, हा भौतिकशास्त्रातील नियम सिद्ध करणारा,

    ज्याच्याकडे स्त्री पुरूष वृद्ध बालक असा भेद नाही, कोणताही वांशिक, जातीय, धार्मिक भेदभाव न मानणारा,

    हाडे ठिसूळ करण्यात एक नंबर, चरबी एका जागी साठवून ठेवण्यात एक नंबर, मळाला सुकवून टाकून विबंध निर्माण करण्यात एक नंबर, मनात आलं तर अग्निला भडकवून टाकून, एका ठिकाणी लागलेली आग दुसऱ्या ठिकाणी नेऊन, लावालावी करण्यात एक नंबर असलेला,

    श्रम केले नाही, पोट हलवले नाही, पोट दाबले गेले नाही, पोट पिळले गेले नाही, तर जिथे आहे तिथे, तस्साच पडून रहाणारा,

    बहुतेक वेळा आभासी ह्रदयरोगाची लक्षणे दाखवणारा, आणि प्रचंड भीती उत्पन्न करणारा,

    क्षणात इथे तर क्षणात तिथे असा लपाछपीचा खेळ खेळत स्नायुंना कमजोर करून टाकणारा,

    काय खाल्लेतर बरे होईल, काय नाय खाल्लेतर बरे होईल, या द्वंद्वात कायम ठेवणारा, काहीही खाल्लेतरी आणि काही नाही खाल्लेतरी जे करायचंय ते करणारा,

    एवढं असूनही स्वतंत्रपणे शास्त्रीय नावाचं बारसं न झालेला, त्यामुळे स्वतंत्र व्याधी म्हणावा की नाही, इथपर्यंत वैद्यांची चर्चासत्रे घडवणारा

    वन अॅण्ड ओन्ली वन
    गॅस
    गॅस
    आणि
    गॅस

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    31.03.2017

  • वसन्त ऋतूचे Do’s and Don’ts

    पांघरुणात गुरफटून ठेवणारी ,झोपेच्या मोहात गुंतविणारी थंडी हळुहळु आपला निरोप घेऊ लागली आहे. ऊबदार वाटणाऱ्या ऊन्हाचा प्रवास आता तापणाऱ्या उन्हाच्या दिशेनं सुरु झाला आहे.

    साहित्यात हा वसन्त ऋतू कितीही आल्हाददायक सांगितला असला तरीही व्यवहारात मात्र केवळ डॉक्टरांसाठीच आल्हाददायक दिसून येतो.याच वसंत ऋतूच्या काळात सर्दी ,खोकला,दमा tonsillitis,bronchitis,flue, अनेक साथीचे आजार,त्वचाविकार अश्या अनेक तकारींना जन्म देतो.भूक मंदावते, पचनशक्ती कमी होते,थोडक्यात वेगवेगळ्या आजारांची सुगी जोमात असते.थंडीत साठलेला कफ दोष ऊन्हाने पातळ होऊन हे सगळं रामायण घडवत असतो.

    आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या या सगळ्या रामायणाचा त्रास आपल्या चिमुरड्यांना होत असतो.त्यातच परीक्षांचा काळ दत्त म्हणून ऊभा राहिलेला असतो एकूणच परिस्थिती आणीबाणीची असते.या सगळ्या घडामोडींपासून आपल्या कुटुंबाला 'सुरक्षा कवच'आयुर्वेदाच्या माध्यमातुन देण्याचा प्रयत्न म्हणजेच या लेखाचा खटाटोप .

    आयुर्वेदाचं नाव ऐकून "अरे बापरे ,आता काय कडू काढे ?असा प्रश्न मोठे मोठे डोळे करून विचारणाऱ्या माझ्या समस्त मित्रमैत्रिणींसाठी वसंत ऋतूसाठी खास आयुर्वेदाचा हटके अंदाज!

    जाता खायचा खाऊ म्हणून फुटण्याचा समावेश करून कफाला bye bye म्हणता येईल.

    दुधात थोडीशी सुंठ घालून या वसंत ऋतुसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवता येईल.

    नाष्ट्यामध्ये भाजणीची थालीपीठ,खाकरा,ज्वारीची ऊकडपेंडी,बाजरीचा शिरा,हुलग्याच्या शेंगोळ्या,लाह्यांच्या पिठाचा उपमा यासारखे पदार्थ खाण्यात आले तर या ऋतूतील आजारपणं खूप खूप लांब राहतील.

    दुपारच्या snacks साठी वेगवेगळ्या लाह्या,popcorn,राजगिरा वडी, गोपाळकाला,लाह्यांचा चिवडा अशी variety तर सोन्याहून पिवळे.

    कढण, कोबीचे सूप,दुधीभोळ्याचे सूप,शेवग्याचे सूप यांचा वापर केला तर साठलेला कफ पडून जाईल.

    ज्वारी, बाजरी यांची भाकरी हा आपल्या main course चा भाग या दिवसांसाठी ठरवून करूयात.

    शेवग्याची भाजी,शेवग्याचे सांबार,दुधीभोपळा,मेथी,गवार, कुळीथाची ऊसळ म्हणजे औषधांना पर्याय ठरेल.

    सीताफळ,द्राक्षे, आईस्क्रीम पासून सध्या चार हातांचे अंतरच बरे.

    नाक वहात असल्यास झोपताना हळदीचा धूर आणि नाक बंद झाल्यास ओव्यांचा धूर घेऊन Vicks,nasal drops यांना bye म्हणूयात.

    समप्रमाणात एकत्र केलेली पूड छातीला व पाठीला talcum powder प्रमाणे लावून prevention is better than cure याची प्रचिती घेता येईल.

    थोडक्यात वसन्त ऋतूचे हे Do's and Don'ts लक्षात ठेऊयात आणि 'हृदयी वसन्त फुलताना' चा आनन्द घेऊयात

  • गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

    “गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे.

  • बाबा…तुमच्यासाठी…

    ‘डॉक्टर, मला माझ्या मुलाकडे परत जायचं नाहीये. इथे तुम्ही जवळ असाल म्हणून या शहरात राहायला आलोय मी’ त्या वयोवृद्ध माणसाच्या मनातली ती खंत दुखावलेल्या अश्रुपूर्ण नजरेतून बाहेर येत होती.. ‘अमेरिकेत असतो माझा मुलगा. फार बिझी असतो तो. तिकडे वैद्यकीय उपचारही अतिशय महाग आहेत. त्याला मदत करायची इच्छा असते, पण नाईलाज असेल त्याचा. त्याला आता काय करणार?’ पोटात भयंकर दुखायला लागल्यामुळे तातडीने ते आणि त्यांची पत्नी भारतात परतले होते. आल्या दिवशीच त्यांच्या हर्निया मध्ये आतड्याला पीळ बसल्याचं निदान झालं. लगेच ऑपरेशन झालं आणि बरे होऊन ते घरी ही गेले. पार्किन्सन च्या त्रासासाठी ते माझ्याकडे येत असतात.

  • जागतिक डॉक्टर दिन

    आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.
    सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पंधरा

    ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट.

    तसेच अन्नरस तयार झाला की, त्यातून दोन घटक बनवले जातात. एक चांगला सार भाग दुसरा टाकावू किट्ट भाग. सार भागापासून सात धातुंची निर्मिती केली जाते. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे ते सात धातु. (धातु म्हणजे धातु, मेटल नव्हे.) आणि किट्ट भागापासून मल, मूत्र आणि स्वेद निर्माण होतात. या निर्माण कार्यात सात धातुंचे सात अग्नि, पंचमहाभूतांचे पाच अग्नि आणि मुख्य जाठराग्नि असे एकुण तेरा प्रकारचे अग्नि भाग घेतात. सार भागापासून उत्तम धातु निर्माण कसे केले जाते याचे वर्णन गेल्या वर्षीच्या आरोग्यटीपेमधील अन्नपचन या मालिकेमधे केलेले आहे.

    टाकावू भाग जर योग्य वेळी, योग्य मार्गाने शरीराबाहेर टाकला गेला नाही, तर चांगला सार भाग कितीही उत्तम रीत्या तयार झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसे उसाचा रस काढला जात असताना त्यातील कचरा रसात येऊ नये म्हणून रस दोन वेळा गाळून कचरा वेगळा केला जातो. ऊसाच्या रसापासून गुळ करताना देखील वारंवार त्यातील मळी वेगळी केली जाते, तरच उत्तम प्रतीचा गुळ तयार होतो. म्हणजे कचरा साफ करणारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.

    तसेच अन्नरसातील कचरा, विषारी पदार्थ वेगळे करणारी यंत्रणादेखील शरीरात काम करत असते. यामधे यकृत, वृक्क हे प्रमुख अवयव आहेत. अन्नरसाचे रूपांतर शुक्रापर्यत करीत असताना वेळोवेळी त्यातील टाकावू भाग वेगळा केला जातो. योग्य त्या मलमार्गामधे ( वेशीवर ) आणून ठेवला जातो. घन भाग गुदमार्गाने, आणि द्रव भाग मूत्र आणि स्वेद (म्हणजे घाम ) मार्गाने बाहेर काढला जातो. हिवाळा पावसाळ्यात ऋतु बदलला की, लघवी जास्ती होते आणि उन्हाळ्यात घाम जास्ती येतो. हे बाहेरील ऋतु ओळखून तसे बदल आतमधे करवणारा तो सिंपली ग्रेट !

    गावातील गटारे, कचऱ्याच्या कुंड्या, रस्त्यावरील घाण, जर योग्य वेळेला साफ केले गेले नाहीत, तर केव्हाही, साथीचे आजार वेशीवर, घुसखोरीच्या संधीची वाट बघत बसलेलेच असतात. म्हणून ही स्वच्छ भारत यंत्रणा पुनः एकदा नीट लक्ष देऊन कार्यरत करण्यासाठी आपण सगळे झटत आहोत.

    जसे देशासाठी, तसेच देहासाठी सुद्धा जागरूक राहीले पाहिजे. जर देशातील आणि देहातील हा कचरा योग्य वेळी, योग्य यंत्रणामार्फत, सदैव जागरूक राहून, देहाबाहेर बाहेर काढला गेला नाही, तर वेशीवरचे राक्षस आत आलेच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    30.03.2017