वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.
लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात 'आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत' असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती 'फुलं आहेत का?' असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली 'मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?' त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. 'फुलं नाही मिळाली तर मग काय करता?' आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. 'मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.' मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.
लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.
वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.
प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? 'अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे' असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995
पुण्यनगरी/12 मे 2017
राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्या हिवाळ्यात टिकून राहते.
अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या संदर्भात केली होती. आणि हा सारा विषय अमेरिकेत सामाजिक स्वास्थ्याच्या चिंतेचा विषय म्हणून गांभीर्यानं चर्चेत आला होता. आता मात्र एक नवी समिती म्हणतेय की धडधाकट प्रौढ व्यक्तींमध्ये कोलेस्टरॉल हा काही चिंतेचा विषय ठरत नाही, त्याचा थेट संबंध लगेच हृदयविकाराशी जोडू नये..ही बातमी अमेरिकेतली असली, तरी या गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या व्याख्यांचा जगभरातल्या माणसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. तेल-तूप खाण्याच्या सवयींवर आणि आहाराच्या पद्धतींवर तर आपल्याकडेही कोलेस्टरॉलची तलवार टांगलेली दिसतेच..या साऱ्याचा कसा विचार करायचा?
या संदर्भातलीच ही एक विशेष चर्चा..
कोलेस्टरॉल या शब्दाची केवढी धास्ती अनेकांच्या मनात. तेल-तूप खाताना सतत त्या धास्तीचीच तलवार डोक्यावर. आपल्या आहाराचा विचार असा पाश्चिमात्य पद्धतीनं का करता? त्यांचे चष्मे का वापरता? ते चष्मे बदलले की इकडे लोकांच्या मनातली धास्ती, भीती, भय सारंच बदलतं. आहाराशी खेळ होतो तो वेगळाच.
आयुर्वेद सांगतो, आपण जिथे राहतो त्या प्रदेशातील धान्य, तेल, फळ इ. नियमित वापरावे. हा युनिव्हर्सल नियम अवलंबावा. आपला पारंपरिक आहार शक्यतो बदलू नये. उत्तर प्रदेशचे भैया कोणते तेल वापरतात? मोहरी / सरसू / राई. कारण त्या थंड हवेला मोहरीसारखे उष्ण तेल आवश्यक आहे. पण मुंबईत राहून मोहरीचे तेल खाल्ले तर पित्त वाढणार. मी मनसे सांगतोय. यात मनसेचा संबंध नाही.
कोकणातल्या जवळजवळ प्रत्येक तिसऱ्या घरात गावठी घरच्या नारळाचे तेल असतेच. एवढी खोबरेलाची मुबलकता आहे. परंपरेने जेवणामध्ये खोबरेल तेल वापरले जात होते. मग रोग का वाढले?
उत्तम वंगण, उत्तम एनर्जी सोर्स, उत्तम उपलब्धता, उत्तम निर्मितीमूल्य, एवढी संपत्ती असूनही उपभोगशून्यस्वामी कसा बनला? कोणी एवढं विरक्त बनवलं त्याला?
उत्तर काय असेल?
आजची औषधनिर्माण व्यवस्था. द्राक्ष -ऊस-साखर यांच्या उत्पादकांप्रमाणे खोबरेल तेलाला कोणी गॉडफादर नाही. प्रत्येकाच्या घरात तयार होणारे खोबरेल जर त्यांनी जेवणामध्ये वापरायचे ठरवले तर इतर तेलांची विक्र ी खूप प्रमाणात घटेल! म्हणजेच तेलसम्राटांच्या लॉबीला धक्का! त्यामुळे सुरू झाली जीवघेणी स्पर्धा! हो, जीवघेणीच. कारण, आरोग्याच्या मुळावरच घाव होता हा! पद्धतशीरपणे खोबरेल तेलाला हृदयरोग आणि कोलेस्टरॉलच्या दहशतीत मारले जातेय. आणि भोग भोगतोय तो सामान्य माणूस!
जे आरोग्य पूर्वी होतं ते सगळं बंद करून पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या विचारांना भुलून (घाबरून) स्वत्व गमावलं की काय होतं, ते आता अनुभवता येतंय.
काहीजण सन्माननीय अपवाद आहेत. काही बालरोगतज्ज्ञदेखील आता अगदी जन्मलेल्या बाळांना खोबरेल तेलाचे काही थेंब किंवा गावठी गायीचे तूप भरवायला सांगत आहेत. आईच्या दुधात असलेले सोडियम मोनोक्लोनीक अॅसिड हे प्रथीन खोबरेल तेलातही असतं म्हणे! ही जमेची बाजू आहे.
पाश्चात्त्य कुकरी शोमध्ये सॅलेड्स, भाज्या इ.वर वरून आॅलिव्ह आॅइल घेताना आपण बघतो. म्हणून आपण आॅलिव्ह आॅइल घ्यायचं नाही. कारण आॅलिव्ह आपल्याकडे पिकत नाहीत. अशावेळी आपल्या भागात पिकणारे तेल उपयोगी ठरते. त्यातही खोबरेल तेल. पण हे तेल कच्चे वापरायचे. ही आपली पद्धत आहे. (आपली-तुपली/पाश्चात्त्य-पौर्वात्य हा भेद का? असा व्रात्यपणा मी का करतोय? ‘स्वत्वाची’ जाणीव होण्यासाठी!)
पण आपण तसं करत नाही. भलतंच करतोय. मग आता काय करायचं? गाडी रिव्हर्स घ्यायची? चुकीच्या रस्त्याने जर गाडी गेली असेल, पुढे वळायला जागाच नसेल तर गाडी मागे घेण्याला पर्याय नसतो.
आरोग्याची गाडी चुकीच्या रस्त्याने चालली आहे. अगदी १८० अंशात!
चपलेचा अंगठा तुटला तर चप्पलच बदलून टाका, तसंच गुडघ्यासारखा एखादा अवयव काम करेनासा झाला तर तो दुरुस्त करण्याऐवजी सरळ बदलूनच टाका असं सांगणारी आजची ‘वैद्यकीय’ यंत्रणा. अशा यंत्रणेकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार? आणि गाडी मागे घ्यायला कमीपणा कसला? या मागे जाण्यातच खरंतर पुढे जाणं दडलेलं आहे.
म्हणून तेलांचा विचार करतानाही तेच. जेवणात पूर्वीसारखे कच्चे गावठी खोबरेल तेल वापरायला सुरुवात करूया. आणि निरोगी राहूया.
आज डॉक्टर मंडळी कोलेस्टरॉलच्या भीतीने जेवणातील तेल कमी किंवा बंदच करायला सांगतात. वाताच्या चिकित्सेतील सर्वात महत्त्वाचे औषध जर तेल म्हणजे स्नेह आहे आणि तोच जर ‘जेवणातून’ काढून टाकला तर वाताचा कोरडेपणा, रूक्षपणा कधीच कमी होणार नाही. कोरडेपणा, रूक्षपणा, वेदना कमी होण्यासाठी ‘जेवणात स्नेह’ हा हवाच! ‘स्नेह’ जेवणात आणि जीवनातसुद्धा !
कोणी कोणते तेल वापरावे ?
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील वातावरण, जमीन, पाणी इ. आपल्या प्रकृतीला अनुकूल असते. त्या जमिनीमध्ये जे पिकते, उगवते तेच वापरावे.
जसे कोकणात खोबरेल, शेंगतेल, तीळतेल श्रेष्ठ आहे. कोकणात करडईचे, स्थानिक तेल खावं. जे पिकत नाही ते खाऊ नये.
तेल शक्यतो कच्चेच वापरावे किंवा फार गरम करू नये (जसे चायनीज बनवताना वाफा येईपर्र्यंत तेल तापवतात. हा दोष आहे.) आपण गरम गरम भाकरीवर, चटणीमध्ये कालवून वा तेल-मीठ-मसाला-भात कालवून घेताना कच्चेच तेल वापरावे. पापड भाजून वरून तेल, मसाला, कांदा, टोमॅटो घालून खाल्ला तरी चालेल.
तूप
तूप चवीला गोड नसेल, पण गुणांनी गोड. आणि जे गुणांनी गोड असते ते शुगर वाढवेलच असे नाही.
तूप हे एकमेव द्रव्य असे आहे जे भूक शिल्लक ठेवून पोषण करते. नाहीतर बाकीचे गोड पदार्थ खाल्ले की भूक कमी होत जाते. तसं तुपाचं होत नाही.
‘खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी’, ‘तूप खाल्ल्याशिवाय रूप दिसत नाही’ अशा म्हणीदेखील व्यवहारात रूढ आहेत. चांदोमामा चांदोमामा भागलास का, तूप रोटी खाऊन जा.. आठवतंय ना हे बडबडगीत....
जर तूप वाढले गेले नाही तर चांदोमामासुद्धा जेवत नाही, उपाशीच राहतो. हे शब्दांचे अर्थ समजण्याअगोदर शिकवले जातेय. (पण लिंबोणी, करवंदी, वाडा, चिरेबंदी, तूप, माशी याचे अर्थ कुठे माहीत असतात आता पोरांना?)
आई-आजी सांगत असे, भाकरी कोरडी खाऊ नये, पोटात दुखतं. लोणी, तूप, तेल काहीतरी लावून खावी ! आधी प्रॅक्टीकल मग थिएरी, हीच भारतीय परंपरा.
एवढे महत्त्व आपल्या भारतीय परंपरांमध्ये सांगितले गेले असूनदेखील अज्ञानामुळे, अनाभ्यासामुळे, शास्त्र माहीत नसल्यामुळे तुपासारख्या अमृतापासून आपण वंचित राहतोय. समर्थ याला करंटेपणा म्हणतात. आहे पण उपभोगायचे नाही. (लॉटरी लागलीय, पण तिकीट हरवून टाकायचे.) कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवत, तुपासारख्या अमृताला लाथाडून टाकायचे हा करंटेपणाच नव्हे काय?
घृत म्हणजेच तूप. तूप म्हणजे गायीचेच.
आणि गाय म्हणजे देशी, गावठी, भारतीय बनावटीचीच ! या भारतीय स्वदेशी वंशाच्या ए 2 दुधाची माहिती सध्या व्हॉट्सअॅपच्या अनेक गटातून फिरते आहे. तर त्यापुढचा टप्पा तूप. तुपाचे गुण काय वर्णावे?
भल्याभल्यांना माहीतच नाही, साजूक तूप म्हणजे काय !
पाच वेळा अग्निसंस्कारित असते हे नाजूक साजूक तूप.
१. दोहन संस्कार - दूध हातानी पिळून काढले जाते. (यंत्राने नाही. यंत्राने काढलेल्या निरशा दुधाचे तपमान बदलते.)
२. मंदाग्नीवर तापवणे - दूध जेवढे सावकाश आणि मंद अग्नीवर तापवले जाते, तेवढी साय जास्त जाड येते.
३. किण्वन - गोड दुधाचे रूपांतर आंबट दह्यात करणारी प्रक्रि या.
४. मंथन संस्कार - दह्याचे लाकडी रवीने, हाताने घुसळून लोणी आणि ताक वेगळे तयार करणारा संस्कार.
५. पुन:अग्नी - मंदाग्नीवर लोणी कढवून साजूक तूप करणे.
अशा पाच अग्निदिव्यातून शुद्ध होऊन बाहेर पडलेल्या साजूक तुपाचे परीक्षण केलेलेच नसावे. अन्य पाश्चात्त्य पद्धतीच्या अतिशीत संस्कारातून तयार झालेल्या बटरने कोलेस्टरॉल का वाढू नये? तेच मिक्सरवर केलेले ताक आणि हाताने दही घुसळून केलेले ताक यांच्या गुणातील फरक किती सांगावेत?
मी स्वत: एक प्रयोग केलाय. एकाच दिवशी, एकाच वेळी, एकच तपमान असलेल्या दुधाला विरजण लावून दुसऱ्या दिवशी अर्धे दही मिक्सरमध्ये घुसळले. उरलेले दही हातानी रवीच्या साहाय्याने घुसळले. मिक्सरमधील दही एकाच दिशेत, एकाच गतीत फिरले. फक्त चार मिनिटात लोणी ताकावर पसरले. आणि रवीने किमान सतरा ते अठरा मिनिटं घुसळावे लागले. दोन्ही तळहात घासले गेल्याने लालबुंद झाले. आणि लोण्याचा गोळा ताकावर डोलायला लागला. दोन्ही ठिकाणी तयार झालेले लोणी स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यातच बुडवून ठेवले. तासाभराने या लोण्यांचे तूप कढवले. मिक्सर वापरून तयार केलेले तूप झाले बुळबुळीत आणि टिकले फक्त तीन महिने, तर स्वकष्टाने, घाम गाळून, माझे रक्त घुसळवून तयार केलेल्या लोण्याचे तूप तीन वर्षं टिकले. (नंतर खाऊन संपवले.)
कणीदार, रवाळ, करड्या रंगाची साय असलेले आणि वास तर अजूनही माझ्या नाकात दरवळतो आहे. असे नाजूकपणे केलेले साजूक तूप शंभर वर्षे टिकते, त्याला पुराण घृत म्हणतात. तेच एक हजार वर्षं ठेवले तर प्रपुराण घृत म्हणतात. याचे गुणधर्म वेगवेगळे वर्णन केलेले आहेत.
स्वत:ला शंभर वर्षे आयुष्य असणारे तूप खाणे बंद करा असे सांगत, एक दिवसाचे आयुष्य असणारी पालेभाजी खायचा आग्रह धरणाऱ्या डॉक्टरांवर आमचा जास्त विश्वास!
कलियुग. आणि दुसरं काय?
वापरलेल्या तेलाचे काय करायचे?
सतत एकाच तेलात तळल्याने, वारंवार गरम केल्याने तेल औषधी गुणांनी संपते. पण युक्तीने वापरल्यास औषधी बनू शकते. हेच कढईतील जळके तेल बाहेरून मालीश करण्यासाठी छान काम करते. माझ्या रुग्णांना कमीत कमी पैशात हे तेल कसे उपलब्ध होते? यासाठी हॉटेलमधील / वडापाव स्टॉलवरील तेल (किंवा घरातील सुद्धा) त्यात थोडा कापूर घालून वापरायला सांगतो.
काय आहेत फायदे?
मीठ, मोहरी, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे, आले, हळद, कढीपत्ता इ. औषधी द्रव्यांनी संस्कारित आणि सतत लोखंडी कढईत उकळत असलेले लोहसिद्ध तेल (खरपाकी स्नेह) असते. छान गुण दिसतो त्याचा. आणि इतरांनाही जरा चांगल्या नवीन तेलातील भजी, वडे मिळतात हा अतिरिक्त फायदा.
खोबरेल तेल
खोबरेल तेल म्हणजे कोकणातलं अमृत. गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे या भौगोलिक परिसराला कोकण म्हणूया. येथील एक महत्त्वाचे पीक म्हणजे नारळ. नारळ वापरल्याशिवाय कोकणी जेवण नव्हे, तर अन्य कोणतीच गोष्ट पूर्ण होणारच नाही. येथील ती परंपराच आहे. मग जेवणात असो किंवा देवाला मानाच्या ठेवायच्या नारळापासून, देवाला प्रसाद, पाहुण्यांची लग्न आदिची आमंत्रणे, ओटी भरणे, लग्नातले अहेर, मानपानापासून अगदी करणी, ओवाळणी, दृष्ट काढणे इ. अनेक कामांसाठी नारळ हा हवाच.
अमृतफळ अशासाठी म्हणतोय, या कल्पवृक्षात अलौकिक औषधी गुण दडलेले आहेत. केस चांगली वाढ होण्यासाठी, गळणारे केस कमी होण्यासाठी, कोंडा, खरबा इ. कमी होण्यासाठी नित्यनियमाने केसांच्या मुळांना खोबरेल तेलाएवढे चांगले औषध शोधूनही सापडणार नाही. त्यात कापूर पावडर टाकून केसांच्या मुळांना लावले की उवा, लिखांचा नायनाट होतो. शांत झोप येण्यासाठी डोके, तळपाय, डोळे यांना लावावे आणि कानात खोबरेल घालावे. अंघोळीपूर्वी पूर्ण अंगाला तेलाचे अभ्यंग करावे म्हणजे अंघोळीच्या थंड पाण्याने होणारा वातप्रकोप होत नाही.
हिवाळा, पावसाळ्यात जरा कोमट करून लावावे. उन्हाळ्यात तसेच वापरले तरी चालते. हल्लीच्या मराठी सिरियलमधूनदेखील डोक्याला मायेने खोबरेल तेल लावण्याचे प्रसंग मुद्दाम दाखवले जाताहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट.
तात्पर्य, रोज रात्री डोक्यावर खोबरेल तेल घालावेच. याला शिरोअभ्यंग म्हणतात.
रोज तेलाचे मालीश करावे असं म्हटलं तर जसं हाताला अत्तर लावतात तेवढंच तेल पूर्ण अंगाला पुरवून पुरवून लावणारी मंडळी आम्ही पाहतो. असे कंजुषी तेल वापरून बलाढ्य वात कमी होण्याची अपेक्षा कशी करता?
दरवाजाच्या बिजागरातून घर्षणाचा आवाज येत असेल तर तेलाचे काही थेंब सोडले तर आवाज थांबतो. आपले सांधेदेखील या बिजागरांप्रमाणेच काम करतात. त्यांना पण तेल हवे असते. शिवणाच्या मशीनलादेखील त्यातील अवयवांची झीज होऊ नये यासाठी आत तेल सोडण्यासाठी विशिष्ट ठिकाणी छिद्रे ठेवलेली असतात. अशी छिद्रे शरीरालादेखील आहेत. तोंड, कान, नाक, त्वचा, गुदद्वार, मूत्रमार्ग, प्रजनन पथ इ. यातून तेल आत सोडावे. म्हणजे या यंत्राची कार्यक्षमता वाढते. लोखंड गंजू नये म्हणून ‘आॅइलपेंट’ लावतातच ना ! मग शरीर गंजू नये म्हणून तेल लावायला हवेच. इंजिनमधले आॅइल संपू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पाहिले जाते. डोळ्यात तेल घालून पहारा देणे हा वाक्प्रचार आहे हा! यासाठीच अंगाला रोज तेल लावायचा सल्ला खरे आयुर्वेदतज्ज्ञ देतात. अंगाला रोज किमान सात चमचे तेल जिरवावे.
दोन हात दोन चमचे!!! दोन पाय दोन चमचे
पोट छाती एक चमचा !!! पाठ कंबर एक चमचा
डोके आणि कान एक चमचा. याहून अधिक चालेल. पण कमी नको.
नित्यनियमाने केलेले अभ्यंग म्हणजेच तेल मालीश किती गुणकारी आहे ! भरपूर काम केल्यानंतर आलेला थकवा नाहीसा करणे, अंगावर म्हातारपण दिसू लागणे म्हणजेच त्वचेला सुरकुत्या पडणे, डोळ्यासाठी आरोग्यदायी, डोळे, शरीर तजेलदार दिसणे, शरीरसंघटन मजबूत होणे, चांगली शांत झोप येणे, त्वचेला लकाकी चकाकी दिसणे, जिमसारखं फक्त बाहेरून सिक्सपॅक न होता आतून निरोगी होणे, यासाठी एकच उपाय अभ्यंग आणि अभ्यंगच.
आज जर्मनी, रशिया इ. बाहेरील अनेक देशांत भारतीय वैद्यक परंपरेतील तेल लावण्यावर संशोधन करावेसे वाटत आहे, ते त्यांच्या पद्धतीने संशोधन करताहेतदेखील!
पण आमचे वैद्यक तज्ञ्ज्ञ म्हणतात, ‘छे हो, असं तेल लावून काय होणारे ? बाहेरून तेल लावणे म्हणजे वेस्ट आॅफ टाइम, वेस्ट आॅफ मनी आहे.’
राहून राहून एक आश्चर्य मात्र वाटते की, जर त्वचेला बाहेरून लावून आतमध्ये काही शोषलेच जात नसेल तर आज नव्याने उपलब्ध केलेली वेगवेगळी जेल, आॅईन्टमेंट, क्र ीम्स कशी काम करतात?
म्हणजे ‘ते’ तज्ज्ञ जे सांगतात ते सर्वच्या सर्व बरोबर आणि आयुर्वेदाच्या परंपरेतील वैद्य हजारो वर्षांपासून जे सांगतात ते म्हणजे कालबाह्य काय?
नारळ
कोकणात प्रत्येक जेवणात नारळ असतोच. कोकणातले आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तांदुळ! जिथे जिथे तांदुळ वापरला जातो तिथे तिथे नारळही वापरला जातो. आता हेच बघा ना! तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आत सारण नारळाचे! घावने केले कि ओल्या नारळाची चटणी आणि नारळाचा रस! आंबोळ्या केल्या की ऊसळीचे वाटण नारळाशिवाय पूर्ण होणारच नाही. शेवया केल्या की नारळाचा रस हवाच!
तांदळाची गरम गरम भाकरी आणि सुक्या नारळाची चिंच गुळ घातलेली लसणाची चटणी. क्या बात है!
तांदळापासून बनवलेल्या पोह्यांवरसुध्दा नारळ. दडपेपोहे नारळाशिवाय कधी होतील का? आणि रात्रीचा शिळा भात, त्यावर घातलेले कच्चे खोबरेल, त्यात भर म्हणून वर नुकत्याच फोडलेल्या ओल्या नारळाचे खोवलेले खोबरे आणि मीठ मसाला व्वाह!
या चवीपुढे बिर्याणी गेली उडत.
तांदळाच्या पीठाच्या कढीपत्ता आणि लसूण घालून केलेली ऊकड. ती एका बोटाने खायची आणि या उकडीवर कच्चे खोबरेल कधी घेऊन बघितलंय? पाची बोटांनी खावीशी वाटते!
ओटी भरताना देखील नारळ आणि तांदुळ जणु काही एकत्रच खेळत असतात.
एवढे सख्य आजपर्यंत अन्य कोणत्याही पदार्थांमधे दिसलेले नाही. पोटात गेल्यावर एकमेकांना पचवून टाकतात ना! म्हणून एवढे सख्य !!!
असे अनेक पदार्थ ग्रंथात वर्णन केले आहेत, ज्यांना आजच्या भाषेत एकमेकांचे एण्टीडोट म्हटले तरी चालेल. जसे गरम गरम भातावर डाळीचे वरण, या वरणावर साजूक तूप- त्यावर ताजे कापलेले लिंबू, त्यावर चिमूटभर भुरभुरवलेले मीठ हे पदार्थ एकमेकांचे पचन करण्यास मदत करणारे आहेत.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
सखी पुरवणी दै. लोकमत दि. 1 मे 2017 मधे आलेला लेख.
१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱया मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आजीच्या हातचे जेवण, आजी-आजोबांच्या गोष्टी या सुखाला मुले मुकतात. अशा परिस्थितीत त्यांना कुटुंबाची जाणीव होण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी ‘जागतिक कुटुंब दिन’ साजरा केला जातो. भारतीय लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगू शकतात. मूळ अमेरिकन आणि ब्रिटीश लोक मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत. याचे कारण या समाजाने आपली कुटुंब व्यवस्था टिकवलेली नाही हे आहे. या लोकांमध्ये घटस्फोट, आई-वडिलांविना कुटुंबे यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आज या देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या घोषणेच्या आजच्या जगात एकत्र कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परंतु असं असलं, तरी अलीकडच्या या विभक्त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशा भल्या मोठया गोतावळ्यासह राहणारी काही ‘मोठी सुखी कुटुंबं’ही आहेतच.
भारतीय कुटुंब पद्धतीबाबत विचार केला असता प्राथमिक व संयुक्त कुटुंब पद्धत एकविवाही व बहुविवाही कुटुंबद्धत, मातृसत्ताक व पितृसत्ताक कुटुंबपद्धत आढळून येते. कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह खरतर माणसामधील नाती ही आपल्या जन्मावरून विवाहवरून अथवा एखाद्याला दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. खर तर एकत्र कुटुंबपद्धती इतर दुय्यम नातेसंबंधाचा अंतर्भाव होतो. एकत्र कुटुंबसंस्थेत आजी-आजोबा, आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी, काका-काकू त्यांची मुले-मुली असे घटक असतात. साधारण: वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो. भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अगदी रामायण महाभारताच्या काळात आपण पाहिले तर, एकत्र कुटुंब व्यवस्थेला एक वेगळेच महत्त्व आहे. आज बायका संसाराला हातभार म्हणून नोकर्याळ करायला लागल्या आहेत. त्यामुळे नवरा बायको दोघे नोकरीसाठी बाहेर असतात. त्यांची मुले शाळेत असली तरी, त्यांना डब्यात पोळी-भाजी ऐवजी कुरकुरे, केक, ड्रायफुड असे काहीतरी दिले जाते. खर तर कुटुंब म्हटलं म्हणजे एक माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफल्या जाते. कुटुंबात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब एकत्र कुटुंबपद्धतीत एकजुटीने संकटाचा सामना करतात. कुटुंब टिकवायचे असेल, तर कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेमभाव असणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे ऐक्य नेमहीसाठी टिकून राहील, हा सुखी कुटुंबाचा खरा महामंत्र आहे. आज देशात वाढत असलेल्या विभक्त कुटुंब पद्धतीबाबत आपण विचार करायला हवा. खर तर वृद्धाश्रम आपली भारतीय संस्कृती नाही.
कुटुंबापेक्षा मोठं
धन कोणतंच नाही...
वडिलांपेक्षा चांगला
सल्लागार कोणीही नाही...
आईच्या सावलीपेक्षा मोठं
जग कोणतंच नाही...
भावापेक्षा उत्तम
भागिदार कोणीही नाही...
बहिणीपेक्षा जवळची
शुभचिंतक कोणीही नाही...
कुटुंबापेक्षा उत्कृष्ट आपलं
दुसरं जग व जीवन
असूच शकत नाही.....
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.
आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग तीन
सगळं पटतंय हो, पण अहो इथे शहरात आम्हाला बसायला काय उभं रहायला पण जागा नाही, एवढी धान्य कुठे वाळवत बसायची ? शहरात प्लॅस्टिकच्या डब्यांना पर्यायच नाही हो ! गवत कुठून आणणार आणि मुडी कोण वळणार !
जरा प्रॅक्टीकल आयुर्वेद सांगता येणार नाही का ? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आजचा लेख.
धान्य टिकवण्यासाठी धान्यातील पाणी कमी करणे आणि त्यासाठी धान्यातील उष्णता वाढवणं महत्त्वाचे !
जर वाळवणं जमत नसेल तर धान्य भाजून ठेवावे. चुलीवर अथवा गॅसवर पण चालेल. पण मंद विस्तवावर शेकत शेकत भाजून घ्यावे. आणि आपोआपच थंड होऊ द्यावे.
भाजण्यासाठी पूर्वी मातीचे खापर वापरत असत. लोखंडी कढई असल्यास उत्तम. त्यात वाळू तापवून भाजल्यास अति उत्तम. वाळूमधे धान्य भाजून ठेवले तर सर्व धान्य एकाच वेळी चारही बाजूने नीट व्यवस्थित भाजले जाते. आणि टिकते. आताचे निर्लेप वगैरे, लेप असेपर्यंत कदाचित ठीक पण जरा ओरखडा आला तर विषासमान.
भाजून झाल्यावर वाळूमिश्रीत धान्यातील वाळू चाळणीने चाळून बाजूला काढली जाते.
भाजल्यानंतर पूर्ण थंड झाल्याशिवाय मात्र धान्य भरून ठेवू नये. भरताना डबा मात्र प्लॅस्टीकचा नको. टीन म्हणजे पत्र्याचा चालेल. स्वस्त मिळतो आणि चकचकीत दिसतो, म्हणून अॅल्युमिनियम पण नको.
काही औषधे सूर्याच्या थेट उष्णतेत वाळवून, संग्रहीत केली जातात, तर काही छायाशुष्क केली जातात. तर काही अति नाजुक छायाशुष्क करताना म्हणजे सावलीत वाळवताना देखील वर आच्छादन घातले जाते. म्हणजे त्या द्रव्यातील रस, गुण, स्वभाव, परिणाम इ. जसे हवेत तसे मिळू शकतात. अर्थात धान्य टिकवणे आणि औषध टिकवणे यासाठी पद्धतीमधे थोडा फरक पडतो, हे पण लक्षात घ्यावे.
सूर्याचे काम घरातील अग्नि करतो. अर्थात तेथे पाहिजे जातीचे, जेनु काम तेनु थाय, असे म्हणतात. सूर्य जे करेल ते इतर कोणीही करू शकणार नाही.
जे न देखे रवि, ते देखे कवि. म्हणजे जे सूर्य पाहू शकणार नाही, ते म्हणे कवि पाहू शकतो. कवि, पणती या अलंकारीक भाषा साहित्यामधे ठीक वाटतात, पण व्यवहारात सूर्याला पर्याय सूर्यच !
कांदा लसूण यासारख्या अन्नाला टिकवायचे असल्यास वाळवायची पद्धत वेगळी. तिथे इतर काही कामाचे नाही. थेट पडणारी सूर्यकिरणेच त्याला आवश्यक! तर कमळाच्या पाकळ्या किंवा केशर, गुलाब संरक्षित करायचे असल्यास झाकण घालून सावलीत वाळवावे लागेल.
धान्य टिकवण्यासाठी भारतात आणखी काही प्रतिनिधी द्रव्य वापरतात. ज्या द्रव्यांना सूर्यापासून निर्माण होणारी पर्यायी नावे आहेत, ती सर्व द्रव्ये (यापैकी एक ) धान्याच्या राशीत ठेवली तरी धान्य टिकून राहते. जसे बिब्बा, तिरफळे, हळकुंड, कढीपत्ता, लवंग, इ. तीक्ष्ण गंधी, उष्ण स्वभावी द्रव्ये वापरली जातात. काही ठिकाणी एरंडेल तेलासारखी द्रव्ये पण रक्षकाचे काम करतात.
काही ओली द्रव्ये सुरक्षित ठेवायची असल्यास तूप तेल मध यांचाही वापर करतात. आसव अरीष्ट टिकवायची असतील तर विशिष्ट लाकडांचे ड्रम बांधून घ्यावे लागतात. प्लॅस्टिकच्या ड्रममधे नाही. या ड्रमना आतून तूप, मध लावून घ्यायचे असते. औषधी द्रव्यांच्या धुरांनी तो ड्रम किंवा बरणी निर्जंतुक करायची असते. हे आमचे आपले आयुर्वेदीय शास्त्र ! (आताही फ्युमिगेशनच करतात की हो ! )
लोणची टिकवायची असतील तर फोडींच्यावर तेलाचा थर आला पाहिजे. हे पण एक शास्त्र आहे. ते घरातील आजीला, आईला माहिती होते. ते सुनेपर्यंत पोचले पाहिजे. एका पिढीतील हे ज्ञान पुढच्या पिढीला परंपरेने समजावून सांगणे, त्यातील गुण आणि दोष ओळखणे आणि त्यात स्वतःची वैज्ञानिक शुद्ध बुद्धी वापरणे महत्त्वाचे !
यालाच तर पिढीजात परंपरा म्हणतात. ज्या अनेक वर्षे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतात टिकून आहेत. आणि या अश्या पारंपारिक गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा, पाश्चात्य तज्ञ भारतात येतात. आणि शिकून जातात. आणि परत येऊन आम्हालाच आंग्ल भाषेत शिकवतात !
मेकाॅलेने तेच केले आणि आम्ही भुललो !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन
धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)
ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.
निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.
धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.
टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?
भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.
प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.
गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.
गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.
आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.05.2017
शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.
'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?
एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अॅण्टीव्हायरस असणे तसेच अॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.
२.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .
३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .
४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .
स्मार्टफोन ला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका .
Free Jio Data च्या नावाने व्हाट्सअप मेसेज मध्ये येणाऱ्या लिंक्स देखील अशाच फसव्या आणि घातक असतात.. फ्री डेटा तर मिळणार नाहीच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फ्री व्हायरस नक्की येऊ शकतो... तेव्हा असे फुकट मेसेज मधील लिंक ओपन देखील करू नका आणि फॉरवर्ड देखील करू नका...
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक
नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.
भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत "ड्रम किंवा बॅरल" तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !
धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.
जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर "गुरू" असतात. "गुरू" असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !
आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर "आमा" सारखे दोष कमी होतात.
फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. .... म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । - इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.
प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !
धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच "काळ" हे पण मोठे प्रभावी औषध आहे.
ठराविक "काळ" निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.05.2017
डिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं.
Copyright © 2025 | Marathisrushti