वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यज्ञ- खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा. संग्रहातठेवा आणि शेअर सुद्धा करा. आणि हो ..... डॉ. प्रमोद मोघे यांचे नाव न काढता शेअर करा .........
यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.
पण हे झाले छोटे यज्ञ.समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.
"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले.
अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले.प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.
लेखक - डॉ. प्रमोद प्र. मोघे (निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, NCL)
तिळाच्या तेलाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!तिळाच्या तेलाचा उपयोग करून पहा नक्कीच फायदा होईल.तिळाच्या तेलाचा जेवणात वापर केल्याने जेवण स्वादिष्ट होते. मात्र याचा केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. या तेलात व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरससाखी खनिजे तसेच प्रोटीनची चांगली मात्रा असते. यासाठीच हे केस तसेच त्वचेसाठी फायदेशीर असते.
केंसाच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल. तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे लांबसडक केस होतात. यासाठी केवळ आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाने स्काल्पला मसाज करा. केस नक्की वाढतील.
केमिकल्स, प्रदूषण आणि उन्हामुळे तुमचे केस खराब झाले असतील तिळाच्या तेलाचा वापर उत्तम. तिळाचे तेल खोलवर जाऊन केसांना पोषण देते.
सूर्यांच्या किरणांमधून निघाणारे यूव्ही रेंज त्वचा आणि केसांना नुकसान पोहोचवतात. तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करुन हे रोखू शकता. तिळाचे तेल केस आणि त्वचेवर संरक्षक कवच बनवते ज्यामुळे केस अथवा त्वचेचे नुकसान होत नाही.
हल्ली कोंड्याची समस्या सर्वसामान्य झालीये. झोपण्यापूर्वी बोटांच्या सहाय्याने तिळाचे तेल स्काल्पला लावून मसाज करा आणि सकाळी केस धुवा. कोड्यांची समस्या निघून जाईल.
कोरडे तसेच रुक्ष केसांमध्ये नवजीवन आणण्याचे काम तिळाचे तेल करते. आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाचा वापर केल्यास स्पिल्ट एंड्स तसेच कुरळे कोरड्या केसांची समस्या दूर होईल. १. ताण कमी करण्यासाठी तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
१.ताण कमी करण्यासाठी
तेलाचा मसाज केल्यानं आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि ताण कमी होतो.
२.त्वचा मॉईश्चराईज करण्यासाठी
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते.
३.हृद्याचे आरोग्यसाठी
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अॅसिड हे ओमेगा ६ फॅटी अॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.
४.हाडांचे आरोग्यासाठी
लहान बाळांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ठिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.
५.गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनएचे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.
६.स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी
गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.
७.तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.
८.शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.
९.रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.
१०.व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
forwarded by - गजानन
whats app - 7775871809
चिकित्सक सल्ला जरूर घ्यावा .....
सौजन्य - सम्रुद्धी पापड
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग चार
कमळ दिवसा उमलते, सायंकाळी मावळते.
समांतर पर्णविन्यास असलेल्या गुलमोहोर, चिंच, लाजरी इ. वनस्पतींची पानेदेखील दिवसा उघडतात आणि सायंकाळनंतर बंद होतात.
वनस्पतीमधील फोटो सिंथेसिस ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या सूर्यावरच अवलंबून असते, हे पण आपण शाळेत शिकलोय.
पक्ष्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव सूर्योदयानंतर सुरू होते.
ब्राह्म मुहूर्तावर उठून आपले आह्निक आवरून दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज व्हावे, असे आयुर्वेदातही लिहिले आहे.
सर्व शुभकार्ये दिवसाचीच होतात. दिवसा सकारात्मक उर्जा कार्यशील असते. रात्री नसते. सत्वगुण दिवसाचा असतो तर रात्र ही तमोगुणी असते.
उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. म्हणजे सकारात्मक उर्जा मिळते, तर सूर्य अस्ताला जाताना त्याला पाहू नये, नकारात्मक शक्ती वाढते, हे पण भारतीय दर्शनशास्त्रामधे लिहिले आहे.
आरोग्यम् भास्कराद इच्छेत, म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे. आरोग्याचा स्वामी सूर्य आहे. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यापासून आपल्याला उर्जा मिळत असते.
सर्व आहारीय पदार्थ गोळा करण्याचा कालावधी पण सूर्योदयाला सुरू होतो, त्याचप्रमाणे औषधी संग्रह करायला सुद्धा दिवसच सांगितलेला आहे.
हे सर्व नियम निसर्गाने ठरवलेले आहेत. माणूस हा पण त्याच निसर्गातील एक घटक आहे. त्यामुळे या निसर्ग नियमांना आपणही बांधील आहोत, हे कदापि विसरून चालणार नाही.
यावरून पुनः पुनः हेच सिद्ध होते, की दिवस हा कामे करण्यासाठी तर रात्र ही विश्रांती घेण्यासाठी आहे. त्यात ढवळाढवळ करू नये.
हे नियत काम नियत वेळी करणे हेच आरोग्य, हे नियम पाळणाऱ्या सर्वांना नियत आयु मिळते. हे पण आपण व्यवहारात पहातो.
पर्णाळी पाहोन उचले ........
.....आणि पुरूष भ्रमिले
याला काय म्हणावे, असे समर्थ देखील विचारत आहेत. पानावरून चालणारी अळी पुढे पाय टाकताना, पुढे आधार आहे का, हे चाचपून बघते आणि मगच पाय पुढे टाकते, म्हणून पानावरून ती खाली पडत नाही, एवढा सावधपणा एवढ्याश्या अळीमधे सुद्धा आहे, आणि मनुष्यप्राणी (दासबोधामधे देखील 'पुरूष' हा शब्द लिंगवाचक नसून, स्त्री आणि पुरूष या दोघांनाही एकत्रित म्हणून वापरला आहे. गैरसमज नसावा. ) मात्र आपल्या सुरक्षेसाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्व नियम पुरूष आपणहून मोडतो, आणि नंतर दैवाला दोष देत बसतो.
अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.05.2017
बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.
बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.
लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.
बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.
प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे "ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. "ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! "ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.
मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व "ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.
जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.
बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम हे आरोग्यासाठी उत्तम आहे. भिजवलेले बदाम तर सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला बदाम भिजवून खाणं आवडत नसेल, तर तुमचा विचार बदला. कारण नुसतं बदाम खाण्यापेक्षा ते भिजवून खाण्याचे फायदे अनेक आहेत.
बदाम भिजवून खाण्याचे फायदे
बदामावरील टरफलं काढून खाणं हे फायद्याचं आहे. बदामाच्या टरफलांमध्ये टॅनिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे टरफलासह बदाम खाल्याने बदामाची पूर्ण पोषकतत्त्वं शरिरात जात नाहीत.
*बदाम भिजवून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
*याशिवाय वजन घटवण्यासाठीही भिजवलेले बदाम फायदेशीर ठरू शकतात.
*भिजवलेल्या बदामांमुळे सौंदर्य टिकवण्यात, चेहऱ्यावर सुरकुत्या न पडू देण्यास, तसंच चेहरा टवटवीत दिसण्यास मदत होते.
*भिजवलेल्या बदामांमध्ये ‘ब17’ जीवनसत्त्व आणि फॉलिक असिड असल्यामुळे कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यास मदत होते.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख..
मित्रांनो सध्याचे युग धावपळीचे आहे.प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची ,गाठण्याची ,पूर्ण करण्याची प्रत्येकाला घाई असते.
जीवन धकाधकीचे बनले आहे आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणार्याला तर अक्षरशः ह्याचा प्रत्यय रोजच येत असतो.
तर असे दिवसभर काम करून आपल्यापैकी प्रत्येक जणथकून जातो,दमून जातो. अंग आंबल्यासारखे होते,दुखायला लागते.कोणताही उत्साह राहत नाही.
नको ते काम ,नको ती नोकरी असे सुद्धा वाटू लागते,पण नाईलाजाने दुसर्या दिवशी पुन्हा नेहमीचे रहाटगाडे ओढणे भागच असते.
तरुणाईच्या जोश मध्ये कितीही काम ,मेहनत केली तरी थकवा येत नसे पण आता जरा वय वाढू लागले की थकवा आणि अंगदुखी आपले अस्तित्व दाखवू लागतात.
अश्या लवकर थकनाऱ्या ,अंग दुखणाऱ्या लोकांसाठी होमिओपथी मध्ये रामबाण औषध आहे.
भले मग तो थकवा शारीरिक असो,मानसिक असो वा इतर कोणताही असो ह्या थकव्यावर, अंगदुखीवर, निरुत्साहावर मात करण्यासाठी औषध आहे Arnica 30
होमिओपथी मेडिकल स्टोर मधून हे औषध liquid मध्ये घ्या. एक 500ml म्हणजे अर्धा लिटर ची बाटली घ्या. ह्या बाटलीत उकळून गार केलेले पाणी भरा व ह्या पाण्यात Arnica 30 चे फक्त 3 थेंब टाका.
बाटलीचे झाकण लावून बाटली जोरजोरात हलवा.
झाले,अंगदुखी ,थकवा ह्यावर मात करणारे औषध तयार झाले. ह्या बाटलीच्या झाकणानेच दोन दोन झाकण पाणी दिवसातून दोन वेळा घ्या. सकाळी अनशापोटी म्हणजे चहा,नाश्ता करण्याच्या 10 मिनिटे आधी आणि रात्री झोपण्यापूर्वी असे घ्या.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या पाण्याच्या दोन डोस मधेच तुमची अंगदुखी थकवा कोठच्या कुठे पळून जाईल. अंगात नवीन स्फूर्ती,नवा जोश,नवी ताकद येईल. मनात नवीन उत्साह जागेत आणि तुम्ही जग जिंकण्यासाठी सज्ज व्हाल.
थोडी अतिशयोक्ती जरी वाटली तरी हे अगदी खरे आहे. वय झालेल्या आणि वय होत चाललेल्या लोकांसाठी हे औषध खरेच वरदान आहे.
आणि अर्थातच होमिओपथी असल्याने जरा सुद्धा side effect नसल्याने तुम्ही बिनधास्तपणे हे औषध घेऊ शकता.
मग मित्रानो आजच हे औषध सुरु करा आणि आठवडाभरातच तुमचे आभार मानणारे मेसेज माझ्या व्हाट्स अप नंबर वर येतील ह्याची मला खात्री आहे
-- डॉ प्रसाद हजारे,भिवंडी
09881374994
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन
काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.
विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !
फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?
ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.
जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !
ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.
जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.
मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल "स्लीप" मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.
हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.05.2017
शरीरातील पेशींच्या विघटनाचे मर्म कळले तर आज दुर्धर वाटणार्या अनेक विकारांवर विजय मिळवणे शक्य होईल. 'वैद्यकाचे' नोबेल विजेते 'योशिनोरी अोशुमी' यांनी हेच अनमोल काम केले आहे.
२०१६ या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार योशिनोरी अोशुमी या 'टोकियो इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी' या प्रतिष्ठित संस्थेतील विख्यात जपानी संशोधकास त्यांच्या 'पेशीविघटन व पुर्नवापर प्रक्रिये'वरील मूलभूत संशोधनासाठी बहाल करण्यात आला आहे. 'स्टॉकहोम' येथील नोबेल कमिटीद्वारे २०१६ सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करताना डॉ. योशिनोरी अोशुमी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
पेशी तसेच पेशीतील अनेक घटकांचा नाश का व कसा होतो हे शास्त्रज्ञांपुढचे एक मोठे कोडे होते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ या विषयावर सतत संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेविषयीच्या संशोधनास साठच्या दशकापासून जोमाने सुरुवात झाली व शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेचा सखोल अभ्यास सुरु केला. पेशी स्वभक्षण प्रक्रियेत पेशीतील घटकांचा नाश पेशींद्वारे या घटकांना पेशीतील पातळ पापुद्रयात बंदिस्त करुन त्यांचा विनाश केला जातो. सन १९६३ साली क्रिश्चिएन डुवे या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने पेशीतील घटकांचे विघटन व त्यांचा पुर्नवापर होण्याच्या या प्रक्रियेचे 'पेशी स्वभक्षण प्रक्रिया' असे नामकरण केले.
पेशीविघटनाची प्रक्रिया ही पेशीचक्रातील एक नैसर्गिक अभिक्रिया असून पेशीतील वितंचकांद्वारे पेशीतील अनेक घटकांचे विघटन केले जाते आणि त्यातील काही घटकांचा पुर्नवापरही केला जातो. या प्रक्रियेमुळे पेशी संतुलित राहण्यास मदत होते. डॉ. अोशुमींनी ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सखोल संशोधन सुरु केले. किण्वन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या यीस्ट पेशींवर प्रयोग करुन पेशी स्वभक्षणाची प्रक्रिया या पेशीत घडून येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले. यीस्ट पेशींची वाढ विशिष्ट परिस्थितीत केल्यास यीस्ट पेशीतील काही घटकांचा नाश होतो, हे डॉ. अोशुमींनी सप्रमाण सिद्ध केले. या संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात पेशीतील स्वभक्षण प्रक्रिया नियंत्रित करणार्या जनुकांचा शोध लावण्यात अोशुमींना यश मिळाले आहे.
पेशीभक्षण प्रक्रियेचे अंतरंग स्पष्ट करत ही प्रक्रिया नियंत्रित करणारी एकूण १५ जनुके डॉ. अोशुमींनी शोधून काढली आणि यीस्ट पेशीतील पेशीभक्षण प्रक्रियेप्रमाणेच सर्व सजीवांतील पेशीतही ही पेशीविघटन आणि पुर्नवापर प्रक्रिया घडत असते, असे प्रतिपादन करत पेशीविघटनाच्या प्रक्रियेत पेशीतील अॉटोफॅगोझोम्सद्वारे पेशीघटकांचे विघटन केले जाते, असे सिद्ध करत डॉ. अोशुमींनी पेशीविघटन व पुर्नवापर प्रक्रिया उलगडून दाखविली.
पेशी विघटनाची प्रक्रिया ही पेशीसाठी एकीकडे अत्यंत आवश्यक असते तर दुसरीकडे याच प्रक्रियेमुळे अनेक समस्याही निर्माण होतात. पेशीतील काही घटकांचे विघटन करुन त्यांचा वापर पेशींना ऊर्जा देण्यासाठी करण्यात येतो. पेशीवर हल्ला करणार्या जीवाणू तसेच विषाणूंचा नाश करण्यासाठीही विघटनाची प्रक्रिया आवश्यक ठरते तसेच पेशीतील अनावश्यक घटकांचा नाश करण्यासाठीही पेशी स्वभक्षणाची प्रक्रिया आवश्यक ठरते. पण पेशीभक्षणाच्या या मूलभूत प्रक्रियेत जर बिघाड निर्माण झाला किंवा या प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्या जनुकांत उत्परिवर्तनामुळे बदल घडून आला तर मात्र संपूर्ण पेशींचे विघटन होऊन अल्झायमर किंवा मधुमेहासारखे दुर्धर आजार निर्माण होऊ शकतात. पेशी विघटनाच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाल्यास कॅन्सरसारख्या व्याधीही उद्भवू शकतात.
पेशीस्वभक्षण प्रक्रिया उलगडल्यामुळे अनेक दुर्धर आजारांवर मात करता येणं आज शक्य झालं आहे. पेशीभक्षणाची ही मूलभूत प्रक्रिया उलगडण्यात डॉ. अोशुमींचे संशोधन अत्यंत मोलाचे आहे. अल्झायमर, मधुमेह, कर्करोग तसेच व्रुद्धापकाळी निर्माण होणार्या स्म्रुतिभ्रंशावर मात करण्यासाठी पेशीभक्षण प्रक्रिया रोखून जनुकीच स्तरावर उपचार पद्धत विकसित करता येणे शक्य झाले आहे.
नोबेल पारितोषिकाची घोषणा झाल्यावर त्याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अोशुमी यांनी पेशीस्वभक्षणाची प्रक्रिया शरीरात सतत चालणारी प्रक्रिया असून एकीकडे नवीन पेशींची निर्मिती होत असताना शरीरातील पेशींचा विनाशही होत असतो आणि हेच जीवनाचे सत्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
- डॉ. सिद्धीविनायक बर्वे
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
गवती चहा (शास्त्रीय नाव: Cymbopogon Citratus; इंग्लिश: lemon grass;) ही मूलतः आफ्रिका, युरोप, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांतील उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशांतील एक तृणवर्गीय वनस्पती आहे.
हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात.
उपयोग :
ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो.
कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.
पावसाळ्यासाठी तयारी करताना गवती चहाचे कंदही घरात कुंडीत लावता येतील. लहानशा कुंडीत लावूनदेखील काहीही कष्ट न घेता गवती चहाची पाने चांगली वाढतात. पावसात कधी तरी आल्याबरोबर गवती चहाची लहानशी जुडी चहात घालून तो वाफाळता चहा प्यायची मजा औरच! या ऋतूत घरात एकदा तरी गवती चहाचा काढा होतोच. गवती चहादेखील कफ कमी करणारा आहे. त्याबरोबरच वात कमी करणारा म्हणूनही तो उपयुक्त ठरतो, पण चहात किंवा काढय़ात घालण्याव्यतिरिक्त गवती चहाचे घरगुती तेलही तयार करता येते हे फार जणांना माहीत नसेल. पावसाळ्यात अनेकांचे सांधे दुखतात, गुडघेदुखीही उफाळते. त्यावर गवती चहाचे तेल लावून आराम पडतो. गवती चहाची पाने चुरगाळून ती तेलात अगदी थोडा वेळ उकळावीत. हे तेल गार झाल्यावर ते गाळून बाटलीत भरून ठेवावे. तिळाचे तेल 'वातघ्न' असल्यामुळे ते यासाठी वापरले तर उत्तमच. पण साधे खोबरेल तेल वापरूनही चालेल.
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
Copyright © 2025 | Marathisrushti