(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • सीमोल्लंघन करायलाच हवं आता…

    पुणे येथील मानसतज्ज्ञ आणि करिअर काऊन्सेलर मयुरेश उमाकांत डंके यांचा WhatsApp वरुन आलेला लेख

  • जाहीरात

    बंगलोरच्या ज्या जर्मन मल्टिनॅशनल कंपनीत मी काम करत होतो त्या कंपनीला कधी वर्तमानपत्रांत जाहीराती देण्याची पाळी आली नव्हती. त्याला कारणही तसेच होते. भारतातील ‘ऍटो ऍन्सिलरी सेक्टर’ मधील ही सर्वात मोठी आणि दिग्गज कंपनी होती. डीझेल आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारे महत्वाचे भाग बनवणारी ही कंपनी होती. या कंपनीची उत्पादने वापरल्याशिवाय डिझेल आणि पेट्रोल इंजिनांचे प्रॉडक्शन करणे शक्यच नव्हते. त्यामूळे भारतातले सगळे इंजीन मॅन्युफॅक्चरर्स या कंपनीचे ओ.इ. कस्टमर होते. या मध्ये ऍटोमोबाईल सेक्टरमधील कंपन्या मोठ्या प्रमाणावर होत्या. या प्रकारची उत्पादने बनवणारी ही भारतातील एकमेव कंपनी असल्यामूळे या कंपनीची जवळ जवळ मोनॉपली होती. या कंपनीला स्पर्धक होते. नाही असे नाही. पण ते फारच किरकोळ स्वरुपातले होते. कंपनीचे बंगलोर आणि नाशीक या दोन ठिकाणी कारखाने होते. दोन्ही कारखाने अत्याधुनीक होते. कंपनीची प्रॉडक्ट्स नुसतीच हाय टेक नव्हती तर हाय प्रिसिजन पण होती. कंपनीची जी उत्पादने इंजीनवर बसवण्यात येत त्यांना पण सर्वीस लागे. या साठी कंनीनीने भारतात 100 डिलर्स आणि सर्वीस स्टेशन्सचे जाळे उभे केले होते. तसेच या प्रकारची सर्वीस देणारी अनेक खासगी सर्वीस स्टेशन्स पण होती. यांना कंनीचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणावर लागत. त्यामूळे कंपनीचा स्पेअर पार्टचा धंदा पण मोठ्या प्रमाणावर होता. जसजसे इंजिनांचे आणि वाहनांचे उत्पादन वाढत होते तसतसे कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढतच चालली होती. अनेक वेळेला कंपनीच्या मालाचे शॉर्टेज असायचे. थोडक्यात कंपनी जे बनवत होती ते आपोआप विकले जात होते. ते सुद्धा कंपनीला हव्या असलेल्या किंमतीमध्ये विकले जात होते. कंपनिची 4 झोनल आणि 8 एरिया ऑफिसेस होती. यांच्यातर्फे कंपनीचे व्यवहार उत्तम चालू होते. अशी ही परिस्थिती अनेक वर्षे होती. मग कंपनीला जाहीरातबाजी करण्याची गरजच काय?

    पण 1980 च्या सुमारास परिस्थिती बदलली! कंपनीच्या बंगलोरच्या कारखान्यात कामगारांचा संप झाला. हा संप दिर्घकाळ, म्हणजे जवळ जवळ 2 महीने टिकला. या संपामूळे कंपनीचे प्रॉडक्शन बोंबलले. याचा मोठा फटका कंपनीच्या ग्राहकांना बसू लागला. ऍटोमोबाईल सेक्टरला याचा सर्वात मोठा फटका बसला. ट्रक, बसेच, कार्स आणि टू व्हिलर गाड्यांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आणि गाड्यांचे उत्पादन गडगडले. त्याचप्रमाणे ज्या गाड्या रस्त्यावर धावत होत्या त्यांच्या सर्व्हिसींगला कंपनीचे पार्ट मिळेनासे झाल्याने या गाड्या पण बंद पडू लागल्या. याचा मोठा फटका रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला बसला. थोडक्यात देशाच्या इकॉनॉमिलाच याचा मोठा फटका बसु लागला. अगदी लोकभेमध्ये चर्चा होण्यापर्यंत हे प्रकरण ताणले गेले. संप मिटवण्याचे कंपनीचे हर तर्हेलचे प्रयत्न चालूच होते पण त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. संपाच्या या काळात कंनीचे जे ओ. ई. कस्टमर्स होते त्यांचा कंपनीवरचा विश्वास कमी होऊ लागला आणि त्यांनी पर्यायी व्यवस्था शोधायचा मार्ग स्विकारायला सुरवात केली. काही जणांनी ही उत्पादने आयात करायला सुरवात केली. कंपनीचे जे किरकोळ स्पर्धक होते त्यांचे चांगलेच फावले आणि त्यांच्या उत्पादनांची हातोहात विक्री होऊ लागली. कंपनीचे नकली किंवा डुप्लिकेट पार्ट बनवणार्यांानी वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला सुरवात केली. असे अनेक नकली मालाचे उत्पादक दिल्लीला होते. पण याहीपेक्षा अजून एक मोठा ‘थ्रेट’ कंपनीसाठी निर्माण झाला. भारतातील एका प्रसिद्ध उद्योग समुहाने यात उडी घेतली. या कंपनीसारखीच उत्पादने बनवणारा कारखाना सुरू केला. जोरदार मार्केटिंगच्या जोरावर कंपनीचे अनेक ग्राहक आपल्याकडे खेचून घेतले आणि कंपनीपुढे मोठे आव्हान उभे केले. कंपनीच्या मार्केट शेअरवर याचा परिणाम होऊन कंपनीचा मार्केट शेअर हळू हळू घसरू लागला.

    दोन महिन्यांच्या अथक परिश्रामाने हा संप एकदाचा मिटला आणि कंपनीचे उत्पादन परत पूर्वीसारखे सुरु झाले. या काळात कंपनीचे जे आर्थिक नुकसान झाले होते त्या पलीकडे जाऊन कंपनीसाठी तीन आव्हाने निर्माण झाली होती. पहीले आव्हान म्हणजे कंपनीच्या कामगारांच्या मनात कंपनी विषयी जिव्हाळा निर्माण करणे, दुसरे आव्हान कंपनीच्या ओ. ई. कस्टमर्सच्या मनात कंपनीविषयीचा विश्वास परत जागृत करणे आणि तिसरे आव्हान म्हणजे बाजारातील कंपनीची घसरलेली पत आणि प्रतिष्ठा परत मिळवणे.

    मी स्पेअर पार्ट मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामूळे माझा संबंध तिसर्यार आव्हानाशी आला. मार्केटमधील घसरलेली कंपनीची पत आणि प्रतिष्ठा परत कशी मिळवायची या वर चर्चा सुरू झाली. अनेक उपायांचा विचार करण्यात आला. कंपनीचा नवीन आलेला कॉम्पिटिटर दिवसेंदीवस शिरजोर बनत चालला होता. त्याला आवर घालण्यासाठी मार्केटमधील कंपनीची इमेज शक्य तेवढ्या लवकर सुधारणे आवश्यक होते. अनेक उपायांचा विचार केल्यावर कंपनीने वर्तमानपत्रांतील जाहीरातींच्या माध्यमातून कंपनीची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. जाहीराती मुख्यतः दोन प्रकारच्या असाता. एक जाहीरात ही उत्पादनांविषयी किंवा वस्तुंविषयी असते. त्याला ‘प्रॉडक्ट ऍड’ म्हणतात. तर दुसरी जाहीरात ही कंपनीविषयी असते. त्याला ‘कॉर्पोरेट ऍड’ असे म्हणतात. कंपनीने प्रॉडक्ट ऍड आणि कॉर्पोरेट ऍड यांचे मिश्रण करून जाहीराती टाकायचे ठरवले. अशा प्रकारच्या जाहीराती त्या वेळी कोणी टाकत नव्हते, त्या मूळे हा एक नवीन प्रयोगच होता.

    अशा प्रकारच्या ‘ऍड कॅम्पेन’ साठी सक्षम ऍड एजन्सी असावी असे कंपनीला वाटले. त्यासाठी कंपनीने भारतातील त्या वेळच्या चार प्रमुख ऍड एजन्सिजना प्रेझेन्टेशनसाठी बोलावले. ऍड एजन्सीचे प्रेझेन्टेशन हा काय प्रकार असतो याचा मला अनुभव घ्यायची संधी मिळाली. या प्रेझेन्टेशन मधून भारातततील एक प्रसिद्ध आणि आघाडीची ऍड एजन्सी निवडली गेली. यामूळे ऍड एजेन्सीबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव मला मिळणार होता.

    त्यानंतर मग प्रत्यक्ष जाहीरातीवर काम सुरू झाले. आधी जाहीरातीचा आकार काय असावा यावर चर्चा सुरू झाली. कंपनीच्या दृष्टीने या जाहीराती महत्वाच्या असल्यामूळे लोकांचे लक्ष लगेच त्याकडे जावे यासाठी काय काय करता येईल यावर विचार विनिमय सुरू झाला. जाहीरातींचा आकार हा ‘कॉलम सेंटिमीटर’ तसेच ‘फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज’ या भाषेत ठरतो. क्वार्टर पेज (म्हणजे वर्तमानपत्राचे एक चतुर्थौंश पान) हा जाहीरतीचा आकार ठरला. क्वार्टर पेज आकाराचीच पण दोन कॉलम रुंदी असलेली उंच कॉलमसारखी जाहीरात अधीक आकर्षक होईल असे ऍड एजन्सीचे म्हणणे पडले म्हणून तो साईज फायनलाइज करण्यात आला. वर्तमानपत्राच्या कुठल्या पानावर जाहीरात टाकल्याने ती लोकांचे लक्ष वेधून घेते यावर पण बरीच चर्चा झाली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची जाहीरात सर्वात महाग असते, जस जसे आतल्या पानांकडे जाल तस तसे जाहीरातींचे दर कमी कमी होत जातात असे कळले. दुसर्याआ किंवा तिसर्यात पानावर टाकलेली जाहीरात लवकर लक्ष वेधुन घेते असे एका सर्व्हेमधील पाहणीत आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्यामूळे वर्तमान पत्राच्या दुसर्याम पानावर जाहीराती टाकायचे ठरले. एकुण तीन जाहीराती टाकायच्या, त्यातील दोन जाहीराती प्रॉडक्ट संबंधी (एक डिझेल इंजिन वाल्यांसाठी तर एक पेट्रोल इंजिन वाल्यांसाठी) तर एक जाहीरात कॉर्पोरेट प्रकारची टाकायचे ठरले.

    जाहीरातीचा साइझ ठरला. कुठल्या पानावर जाहीरात टाकायची हे ठरले. आता महत्वाचा भाग होता तो म्हणजे जाहीरातीचा मजकुर ठरवणे, याला कॉपी असे म्हणतात. कारण जाहीरातीमध्ये ‘कॉपी’ ला फार महत्व असते. आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आधी ठरवावे लागते मगच कॉपी तयार होते. यावर बरीच चर्चा चर्विटचरण झाले. ऍड एजन्सीने कॉपीची एकुण 32 सॅम्पल्स सादर केली. अर्थातच मूळ कॉपी इंग्लीशमध्ये होती. यावर बरीच चर्चा चर्वीटचरण होऊन तीन कॉपीज फायनलाइज करण्यात आल्या. आधी फक्त इंग्रजी भाषेत आणि भारतातील प्रमुख इंग्रजी वर्तमान पत्रातून जाहीराती देण्याचे ठरले. मग हिन्दी आणि महत्वाच्या प्रादेशीक भाषांमधुन पण जाहीराती देणे आवश्यक आहे असे ठरले. त्यामूळे इंग्रजीबरोबर हिन्दी, तामीळ, तेलगु, मल्याळम, कानडी, मराठी, गुजराती, गुरुमुखी, बंगाली, ओरीया आणि आसामी भाषांमधून पण जाहीराती टाकायचे ठरले. यात पुढे उर्दु भाषा पण ऍड झाली. ज्या इंग्लीश कॉपी अप्रुव्ह केल्या होत्या त्याचीच निरनिराळ्या भाषांमध्ये भाषांतर करण्याचे ठरले. यासाठी ऍड एजन्सीने मुंबईतील एका प्रसिद्ध लॅन्वेज ब्युरोची नेमणूक केली. भाषांतरे योग्य झाली आहेत की नाही हे तपासण्यासाठी कंपनीने वेगळा मार्ग निवडला. कंपनीतील ज्या कर्मचार्यां ची मात्तृभाषा कानडी किंवा बंगाली आहे त्यांचेकडे ती भाषांतरे तपासण्यासाठी देण्यात आली. त्यावेळी बंगलोरला मराठी आणि हिन्दी भाषा येणारा मी एकमेव माणुस होतो. त्यामूळे हिन्दी आणि मराठी भाषांतरे माझ्याकडे आली. मराठी भाषांतराची तर बोंबच होती. त्यात बर्यारच सुधारणा कराव्या लागल्या. हिन्दी भाषांतर मात्र अप्रतीम झाले होते. नंतर मला कळले की हे भाषांतर गुलशन नंदा या हिन्दीमधील ज्येष्ट कादंबरीकाराने केले होते. गुलशन नंदा यांच्या हिन्दी कादंबर्याध त्या वेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या अनेक कादंबर्यांतवर चित्रपट पण निघाले. त्यावेळी त्यांच्या कादंबरीवर आधारलेला राजेश खन्ना आणि आशा पारेख यांचा ‘कटी पतंग’ हा सिनेमा तुफान गाजला होता. यासाठी गुलशनबाबूंनी भरपूर फी उकळली पण भाषांतर मात्र अप्रतीम करून दिले. उर्दु भाषांतर सुद्धा हिंन्दी सिनेजगततील एका प्रसिद्ध कवीने करुन दिले होते.

    कॉपी ठरल्यानंतर महत्वाचा भाग असतो तो म्हणजे लेआऊट. थोडक्यात जाहीरात कशी दिसेल याची मांडणी. आधी जाहीरातीमध्ये कंपनीची प्रॉडक्ट दाखवायची नाहीत, फक्त लोगो दाखवायचा असे ठरले. पण मग नंतर कंपनीच्या प्रॉडक्ट ऍडमध्ये डिझेल इंजीन आणि पेट्रोल इंजीनसाठी लागणारी प्रॉडक्स दाखवावी असे ठरले. आधी जाहीरातीमध्ये माणसाचे चित्र नव्हते. पण जाहीरातीला काहीतरी मानवी चेहेरा असावा असे ठरले. यासाठी आधी काही मॉडेल्स आणि चित्रपट तारकांचा विचार झाला. पण मग कंपनीतीलच एखादा कर्मचारी असावा असे ठरले. उत्तम पर्सनॅलिटी असलेला एक कर्मचारी कंपनीच्या मुंबई ऑफीसमध्ये होताच. त्याची मॉडेल म्हणून निवड झाली. लेआउटची आर्ट वर्क येउ लागली आणि लेआउट पण फायनलाइज होऊ लागले.

    कोणत्या वर्तमानपत्रात जाहीराती टाकायच्या आणि त्यांचे टाईमटेबल काय असावे यावर चर्चा सुरू झाली. रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जाहीरातींचे दर जास्त असतात. त्यामूळे रविवारच्या सुट्टीच्या अलिकडचा दिवस म्हणजे शनिवार, नंतरचा दिवस म्हणजे सोमवार आणि आठवड्याचा मधला दिवस म्हणून गुरुवार हे दिवस ठरले. दोन जाहीरातींमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे असे ठरले. टाईम्स ऑफ इंडीया, इंडियन एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाईम्स, हिन्दू, अमृत बझार पत्रीका या इंग्रजीमधील आघाडीच्या वृत्तपत्रांसह एकूण 54 वर्तमानपत्रे निवडण्यात आली. यांमध्ये मराठीतील सकाळ, लोकसत्ता, तरुण भारत आणि पुढारी ही प्रमुख वर्तमानपत्रे होती. (त्या वेळी महाराष्ट्र टाईम्स बहुतकरून नसावा) या वर्तमानपत्रात जाहीराती कोणकोणत्या तरखांना प्रसिद्ध होणार हे वेळापत्रक त्याचप्रमाणे जाहीरात प्रसिद्ध झाल्यावर त्या वर्तमानप्तराचे तीन अंक बंगलोरला पाठवायचे ऍड एजेन्सीने मान्य केले.

    अशा रितीने ऍड कॅम्पेन दणक्यात सुरू झाले. ठरल्याप्रमाणे कंपनीच्या जाहीराती छापून येऊ लागल्या. जाहीराती छापून आलेल्या अंकांचे गठ्ठे च्या गठ्ठे बंगलोरला येऊ लागले. पेपर मध्ये छापून आलेल्या जाहीराती बघून सगळ्यांचे डोळे सुखावू लागले. फिल्डमधून पण जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. ऍड कॅम्पेन सक्सेसफुल झाला आहे असा फिडबॅक येऊ लागला. कंपनीने जाहीरातींसाठी जी मेहेनत घेतली होती आणि भरपूर पैसे खर्च केले होते (त्या वेळी या सर्व कँमेनचा खर्च 17 लाख रुपयांच्या घरात गेला होता. त्यावेळचे 17 लाख म्हणजे आत्ताचे 2 कोटी 93 लाख) ते सत्कारणी लागले असे वाटत होते.

    या जाहीरातबाजीच्या काळात एक गंमतीदार घटना घडली. मी विमानाने बंगलोरहून दिल्लीला निघालो होतो. मला विमानात त्या दिवसाचा टाईम्स ऑफ इंडियाचा अंक मिळाला होता. तो अंक चाळत असताना त्या अंकाच्या दुसर्यां पानावर छापून आलेल्या आमच्या कंपनीच्या जाहीरातीकडे माझे लक्ष गेले. थोड्याच वेळात सुटा बुटातले एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी पण टाईम्सचा अंक चाळायला सुरवात केली. माझ्या कंपनीच्या जाहीरातीवरून त्यांनी दोन तीन वेळा तरी नजर फिरवली असेल. थोड्या वेळाने मला त्यांनी त्यांचा परीचय करू दिला. भारतातील एका प्रसिद्ध वाहन निर्मिती करणार्या् कंपनीचे ते उच्च अधीकारी असल्याचे मला कळले. त्यांनी मला त्यांचे कार्ड पण दिले ते मी शर्टाच्या खिशात ठेवले. मी मग माझा परिचय करून दिला. माझ्या कंपनीचे नाव ऐकताच ते लगेच म्हणाले, ‘तुमच्या कंपनीबद्धल मी नुकतेच काहीतरी वाचले आहे!’
    ‘काय वाचलेत?’ मी कुतुहलाने विचारले.
    ‘नक्की आठवत नाही पण काहीतरी वाचले एवढे मात्र खरे. कदाचीत एखादी बातमी असेल’ ते म्हणाले.
    ‘साधारणपणे केव्हा वाचलेत?’ मी विचारले.
    ‘नक्की आठवत नाही! झाले असतील दोन तीन दिवस!’ ते म्हणाले.
    मला जरा आश्चर्यच वाटले. मी त्यांचे व्हिजिटिंग कार्ड नीट बघीतले आणि उडालोच. ते त्यांच्या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर होते आणि त्यांना काही वेळापूर्वी बघीतलेली आमच्या कंपनीची जाहीरात आठवत नव्हती. तर इतरांची काय कथा?
    मी त्यांना जेव्हा सांगीतले की त्यांनी आमच्या कंपनीविषयी थोड्या वेळापूर्वी या विमानातच वाचले आहे आणि जेव्हा मी त्यांना टाईम्समधली ऍड दाखवली तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले, ‘ आम्ही सुद्धा पूर्वी अशा जाहीराती देत होतो. पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आल्यावर जाहीराती देणे बंद केले.’ मला काही त्यांचे म्हणणे फारसे पटले नाही तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘टाईम्समध्ये तुमच्या कंपनीव्यतिरिक्त इतर अनेक जाहीराती आहेत. यातील किती जाहीराती तुमच्या लक्षात आहेत?’ खरोखरच एकही जाहिरात माझ्या लक्षात नव्हती. ‘आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी जाहीराती टाकत असतो आणि ऍड एजन्सीजना धनवान करत असतो. कारण कुठलिही ऍड एजन्सी घ्या. ती न्युज पेपर ऍड कॅम्पेनच सजेस्ट करत असते. कारण यातच त्यांचा फायदा असतो.’ ते म्हणाले.
    ‘म्हणजे तुम्ही ऍड टाकत नाही?’ मी वाचारले.
    ‘आम्ही आता पॅटर्न बदलला आहे. आम्ही लोकल डिलरला ऍड टाकायला सांगतो आणि त्याचा खर्च आम्ही उचलतो. यामूळे एकतर ऍड परिणामकारक होतात आणि खर्च पण वाचतो!’ ते म्हणाले.

    बंगलोरच्या आमच्या मिटींगमध्ये मी हा किस्सा सांगीतला. पुढे कंपनीने पण तो ऍड कॉम्पेन आवरता घेतला. त्यानंतर या कंपनीने कधी पेपरमध्ये ऍड टाकल्याचे मी तरी पाहीले नाही.

    एकुण जाहीरातबाजी करण्यासाठी किती मेहेनत घ्यावी लागते याची थोडी तरी कल्पना यावी यासाठी मी हा प्रपंच मांडला. तसेच हे एक खर्चीक माध्यम आहे. असे असुनही आज वर्तमानपत्रे, मासीके, टी.व्ही., रेडियो यांच्या माध्यमातून आपल्यावर जाहीरातींचा पाऊस पडत असतो. काही वर्तमानपत्रे तर केवळ जाहीरातींवरच चालतात असे मला आढळून आले आहे. पुण्याचा ‘सकाळ’ हे याचे उत्तम उदाहरण आहे. मी हल्ली पुण्याच्या सकाळचा उल्लेख ‘सकाळ म्हणजे जाहीरतींचा सुकाळ’ असाच करत असतो. अनेक टीव्ही चॅनल तर निव्वळ जाहीरातीवर चालतात. अनेक कंपन्या या जाहीरातींसाठी कोट्यावधी रुपये खर्च करत असतात पण याचा किती उपयोग होतो? एकतर पेपरमध्ये छापून आलेल्या जाहीराती लक्षात रहात नाहीत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीच्यावेळी अनेक जण टी.व्ही. म्युट करतात. तीच गोष्ट रेडियोवरच्या जाहीरातींची आहे. आता तर जाहीरातींचे तंत्र बदलत चालले आहे. इंटरनेट जाहीरातींचे युग सुरू झाले आहे. यांमध्ये केवळ जाहीरात पाहिल्याबद्दल पैसे मिळण्याची सोय आहे. अमेरिकेतील वर्तमान पत्रांमध्ये तसेच टी. व्ही. वर जाहीराती फार कमी असतात. तेथील वर्तमानपत्रे जाहीरातींची वेगळी सप्लिमेन्ट काढतात जे लोक जपून ठेवतात. टी. व्ही. वर सुद्धा जाहीरातींचा म्हणून वेगळा प्रोग्रॅम असतो. आपल्याकडे अजून हा प्रकार सुरू झाला नाही. काही दिवसांनी या पेपर आणि टी. व्ही. वाल्यांना जाहीराती मिळणे बंद होईल. मग हे लोक काय करतील?

    असो! जाहीरातींना किती महत्व द्यायचे. जाहीरातींच्या या जंगलात स्वतःला किती बुडवायचे आणि आपले आयुष्य किती जाहीरातमय करून टाकायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.

    तुम्हाला काय वाटते?
    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    28 May 2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3

    संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.

    कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
    "अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।"

    या संकल्पामधे "आयु आणि आरोग्य" असे दोन शब्द दिसताहेत.
    आरोग्य कोणाचे ?
    समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.

    केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !

    माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
    देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?

    मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी "देणारा" देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !

    आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !

    अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.

    त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.

    औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.05.2017

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापन दिन

    मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद.

    मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली अनेक वर्षे करते आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागात मिळून संस्थेच्या ७० शाखा आहेत. दहा हजारापेक्षा जास्त आजीव सभासद असणारी ही महाराष्ट्रातील एकमेव साहित्यसंस्था आहे. शतकोत्तर दशकपूर्ती करणाऱ्या या संस्थेची वाटचाल मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी साह्यभूत ठरलेली आहे.
    एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. १८७८ मध्ये पहिले ग्रंथकार संमेलन न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत भरले. दुसरे १८८५ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. तिसरे संमेलन १९०५ मध्ये सातारा येथे भरले. ही संमेलने अनेकदा काही काही कारणांमुळे खंडित होत होती. या खंडित संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न पुण्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाला. पुण्यात २६ आणि २७ मे १९०६ रोजी झालेले चौथे संमेलन विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरलेले होते. लोकमान्य टिळक, न. चिं. केळ्कर, चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, पांगारकर, रेव्हरंड टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. २७ मे रोजी समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषद आज रोजी स्थापन झाली आहे, अशी घोषणा केली. लो. टिळकांनी उठून या घोषणेला पाठिंबा दिला.

    साहित्य परिषदेची पुण्याच्या टिळक रस्त्यावर जी इमारत उभी आहे, ती १९३५ पर्यंत अस्तित्त्वात नव्हती. तिची उभारणी टप्या टप्याने झाली. आरंभीच्या काळात या संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रा. श्रीनिवास बनहट्टी, श्री. ना. ग. गोरे, रा. शं. वाळिंबे, प्रा. रा. श्री. जोग, ग. दि. माडगूळकर, गं. बा. सरदार, प्रा. वसंत कानेटकर, श्री. ज. जोशी, शंकरराव खरात, शंकर पाटील, ग. प्र. प्रधान, डॉ. सरोजिनी बाबर, राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. प्र. चिं शेजवलकर अशा मान्यवरांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. पुणे शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्यां आदराने उल्लेख केला जातो असे ज्येष्ठ साहित्यसेवक म. श्री. दीक्षित परिषदेशी कार्यालय अधिक्षक, कार्यवाह, कोषाध्यक्ष आणि विश्वस्त अशा अनेक नात्यांनी निगडित होते.

    केवळ पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत कार्यरत असणाऱ्या परिषदेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे वाड्मयीन कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात स्मृतिदिन, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखती, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (कै) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय परिषदेच्या वैभवात भर घालण्याचे काम करीत आहे. ५०,००० जुने नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश, संदर्भग्रंथ इथे असल्यामुळे हे ग्रंथालय अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय बनलेले आहे. अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे मोलाचे काम परिषद करीत आहे. सर्व वाडमय प्रकारातील पुस्तकांना पारितोषिके देऊन गौरविण्याचे काम परिषदेतर्फे केले जाते. मराठी भाषा, साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन परिषदेतर्फे केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून दरमहा मानधन देण्यात येते. अनेक प्रज्ञावंत साहित्यिकांनी आणि निष्ठावंत साहित्यसेवकांनी तन, मन आणि धन अर्पण करुन, आपल्या आयुष्यातला बाहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लो. टिळक, न. चिं. केळकर, कृ. प. खाडिलकर, वा. गो. आपटे, दा. ग. पाध्ये. विविधवृत्तकार मोरमकर रेव्हरंड जोशी, धनंजयराव पटवर्धन, न. र. फाटक, वा. दा. गोखले, गं. भा. निरंतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. ल. ठोकळ, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. के. क्षीरसागर, स. कृ. पाध्ये, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, रा. शं. वाळिंबे, ग. दि. माडगूळकर, कवी यशवंत, न. का. घारपुरे, वि. भि. कोलते, भालबा केळकर, ना. ग. गोरे, दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, ग. वा. बेहेरे, अ. ना. भालेराव, म. वि. फाटक, म. ना. अदवंत, कृ. ब. निकुम्ब, वा. रा. ढवळे, श्री. ना. बनहट्टी, स. गं. मालशे, श्री. ज. जोशी, शंकर पाटील, भालचंद्र फडके, वि. स. वाळिंबे, व. दि. कुलकर्णी, गो. म. कुलकर्णी, शंकरराव खरात, भीमराव कुलकर्णी या मान्यवरांनी संस्थेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. या कर्तुत्त्वसंपन्न परंपरेत मोलाची भर घालून परिषदेची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम डॉ. गं. ना. जोगळेकरांनी केले.

    १९६१ मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्यावेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. साहित्य महामंडळाची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्था मिळून महामंडळ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी, समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता. दत्तो वामन पोतदारांबरोबर विदर्भ साहित्य संघाचे ग. त्र्यं. माडखोलकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अनंत भालेरव, भगवंतराव देशमुख, नरहर, कुरुंदकर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे वा. रा. ढवळे आणि पत्रकार श्री. शं. नवरे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते.

    महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावे असे आपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार १९६५ च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामंडळाने आपल्या हाती घेतले. या योजनेनुसार डिसेंबर १९६५ मध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला जे संमेलन भरले होते, ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन ठरले, त्यापूर्वी १९६४ पर्यंतची ४५ साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.

    १९६४ साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगाव (गोवा) येथे भरलेले संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेले शेवटचे संमेलन. आपली साहित्य संमेलने गणनेसाठी उदारपणे साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने महामंडळासाठी मोठाच त्याग केलेला आहे. त्यामुळेच संमेलनाची गणना होती तशीच कायम राहिली आणि हैदराबादचे संमेलन हे महामंडळाचे पहिले संमेलन असूनही ते सेहेचाळीसावे संमेलन ठरले.

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मोठे असले तरी त्यात सहभागी होणाऱ्या लेखक, कवी, वक्त्यांच्या संख्येला मर्यादा येते. त्यामुळे इच्छा असूनही सर्वांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे अवघड जाते. त्या त्या विभागातील प्रतिभावंतांना अभिव्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करावे या भावनेतून विभागीय साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली. गेल्या काही वर्षांत विभागीय साहित्य संमेलनांना मिळणारा प्रतिसाद विलक्षण आहे. प्रतिभेचे अनेक नवीन कवडसे अशा संमेलनातून साहित्यक्षेत्राला मिळाले आहेत. मसापच्या विविध शाखांनी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनांनी आदर्श नियोजनाचा आणि गुणवत्तपूर्ण कार्यक्रमांचा वस्तुपाठ निर्माण केला.

    जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि उदारीकरणाचे जीवनाच्या सर्व क्षेत्रावर दूरगामी परिणाम होत आहेत. जगण्याचा तीव्र झालेला संघर्ष, साहित्यातूनही तेवढयाच प्रभावीपणे प्रकट होत आहे. बदलांचा वेध घेत जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत रचनात्मक अशी कामे उभी करण्याचा प्रयत्न परिषदेने यापूर्वी केलेला आहे आणि या नंतरही तो तसाच पुढे चालू राहील.

    http://www.masapapune.org
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / महाराष्ट्र साहित्य परिषद

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2

    जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.

    लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.

    आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
    काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.

    प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
    ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.

    प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !

    आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?

    असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
    त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.

    नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.05.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सेहेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1

    हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.

    या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
    कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
    त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.

    आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.

    जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.

    केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.

    देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.

    या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.

    यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.

    जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
    ............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    26.05.2017

  • आहारातील बदल – भाग २

    जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.

    आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.

    जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
    जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
    जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
    तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.

    म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.

    वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.

    हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.

    जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.

    पण कोणाला ?
    ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
    दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.

  • मधुमेहापासुन मुक्ती

    मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत.

    अतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.

    मधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.

    सगळ्या मधुमेहीनी हे जाणणे गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.
    टाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.

    या सर्व मुद्यावर मात करण्यासाठी "फ्रिडम फ्राँम डायबेटीस" या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.

    "रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा." हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.

    स्मूदीची पाककृती अशी आहे-

    १. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.
    २. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.
    ३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.
    ४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.
    ५. "रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा." कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.
    ६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.
    ७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.

    हे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.

    स्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.

    या व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा. "पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा" जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.

    'फ्रीडम फ्राँस डायबेटीस' च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.

    या लोकांनी चक्क "ग्लुकोज टोलरन्स टेस्ट" ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.

    या स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.

    संकलन,
    विकास दांगट,
    पुणे. 9423094303

  • व्यायाम करणे हि कला, स्थुलतेची टाळे बला

    अजूनही आपल्या देशात व्यायामाला समानार्थी शब्द आहे कंटाळा !
    हाss हाsss
    काय झालं हसू आलं ना?

    पण हेच वास्तव आहे. व्यायाम करण्यापेक्षा तो टाळण जास्त सोप्प आहे असं आजही बहुतांशी लोकांना वाटत. पण लक्षात घ्या इथेच आपण चुकतो. व्यायामाला जगात पर्याय नाही. सर्व साधारण पणे लोकांना व्यायाम टाळण्यासाठी खालील कारणे द्यायला आवडते –
    1. माझे शेड्यूल खूप बिझी असते त्यामुळे मी व्यायाम करूच शकत नाही

    2. मला खूप घरकाम असते, मला व्यायामाची गरजच नाही (हे विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत )

    3. मला रात्री झोपच येत नाही मग मी सकाळी उशिरापर्यंत झोपायलाच हवे, त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार

    4. मला तर शिफ्ट ड्युटी असते माझा ताळमेळ जमतच नाही

    5. माझे कंपनीत खूप चालणे होते त्यामुळे मला व्यायामाची गरज नाही

    6. व्यायाम केला कि माझे अंग दुखते

    7. मी तर रोज ४ कि.मि. चालतो /चालते पण माझे वजन काही कमी होत नाही, लठ्ठपणा हि माझी टेंडन्सी आहे.

    8. मी मुळात जेवणच खूप कमी करते आणि माझे आठवड्यातून ३ उपास असतात त्यामुळे मी व्यायाम नाही केला तरी चालतो.

    9. मला डॉक्टरांनी व्यायाम करायचा नाही असे सांगितले आहे

    खरोखरीच हि कारणे ऐकून समोरच्याची कीव येते. व्यायाम हि एक कला तर आहेच पण व्यायाम हा फार चतुराईने आणि स्मार्ट पणे करायला हवा तरच त्याचा योग्य तो फायदा आपल्याला मिळतो. स्नायूंचे बळ वाढवायचा, वजन वाढवायचा, वजन कमी करण्याचा, एखादा आजार बरा करण्याचा, मन शांत करण्याचा, हृदय मजबूत करण्याचा, फुफ्फुसांची शक्ती वाढवायचा, सौष्ठव मिळवण्याचा, फिगर बनवण्याचा इतकच काय तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असे व्यायामाचे प्रकार आहेत. आणि हे सगळ स्मार्ट व्यायामाने शक्य आहे. खाली मी काही स्मार्ट व्यायामाच्या टिप्स दिल्या आहेत –

    1. सुरुवातीला तुम्हाला किती वेळ व्यायामासाठी देणे शक्य आहे ते ठरवा. हि वेळ सुरुवातीला अगदी १५ मि पण पुरेशी आहे.

    2. व्यायाम करताना हृदयाची गती वाढवणे व शांत करणे या दोन्ही गोष्टी आल्याच पाहिजे

    3. चालणे हा शरीरासाठी व्यायाम नाही. तुमच्या जर पोटावर कमरेवर चरबी असेल तर त्यासाठी काही स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.

    4. आपल्या जीवनशैलीनुसार व्यायाम बदला. जर आपण सतत समोर वाकून काम करत असाल तर आपल्याला मागे वाकणारे व्यायाम आवश्यक आहेत हे लक्षात घ्या.

    5. घरकाम म्हणजे व्यायाम नाही (स्त्रियांनी हे विशेष लक्षात घ्यावे ). घरकामाने आपण थकतो, व्यायामाने आपण प्रसन्न होतो.

    6. व्यायाम आज केला तर त्याचा फायदा आजच मिळतो, त्यामुळे रोज व्यायाम करावा.

    7. व्यायामात कायम बदल करावा. व्यायाम हा कॉम्बीनेशन मधे करावा. म्हणजे कधी दोरीच्या उड्या आणि योगा, तर कधी धावणे चालणे व पॉवर योगा, कधी फक्त योगा आणि मेडीटेशन, सुटीच्या दिवशी डोंगर चढणे.

    8. नुसताच व्यायाम नाही तर रोजच्या हालचाली पण वाढवणे गरजेचे असते. जसे जिना चढणे उतरणे, स्वतः पाणी प्यायला जाणे, जड वस्तू उचलणे, घराची साफ सफाई करणे.

    9. हल्ली आपल्याला मानसिक थकवा खूप येतो. पण लक्षात घ्या मानसिक थकवा घालवण्यासाठी शारीरिक थकवा खूप आवश्यक असतो.

    10. आपल्याला हव्या त्या वेळी, हवा तेवढा वेळ व्यायाम करता येतो. माणूस श्रीमंत असो कि गरीब त्याला दिवस हा २४ तासांचाच मिळतो हे लक्षात घ्या, आपल्यापेक्षा फिल्मस्टार आणि बिझनेसमन हे खूप बिझी असतात परंतु ते वेळेचे नियोजन करून व्यायामासाठी वेळ काढतात आणि आपण मात्र कारणे देतो.

    व्यायामाच्या आणि आहाराची योग्य धरा कास
    नाहीतर शरीरामध्ये आपल्या रोगाचा होईल वास
    कदान्न खाण्याचा करू नका हव्यास
    सुडौल शरीराचा घ्या जरा ध्यास !!

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017