(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अन्न हे पूर्ण ब्रह्म

    आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती..... जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
    निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
    गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.

    अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.

    दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....

    मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
    त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
    लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
    वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
    पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......

    "अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....

    कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
    पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....

    तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
    सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
    मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
    अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........

    माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
    "सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
    अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
    " हि तुमची डिश आहे ना ??
    " होय, मी परत उत्तरलो .
    " हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "

    मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
    "आहो थोडे राहिले अन्न ?
    काय हरकत आहे .
    नाही अंदाज आला.
    म्हणून काय घरी न्यायचं" ??

    "रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
    हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
    होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....

    म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....

    का ???

    कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
    " आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
    हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
    खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......

    इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......

    (आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)

    मग एक तर ती भिकारी भोजन पद्धत बंद करून पाने वाढा अन्यथा अन्नावाचून, अन्न पिकवणारा आत्महत्या करतोय.......खाऊन माजावे, टाकून नाही......


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.

  • प्रगल्भता म्हणजे काय ?

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं कोणाला तरी आदर्श मानता आणि त्या आदर्शा प्रमाणेच आपले विचार आणि आचार करता.

    आणि शेवटी अती महत्वाचे

    प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं आत्मिक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.

  • रूटीन व्हेरिफिकेशनपासून सावधान

    " Everybody must be alert of Fake Phone Calls"

    पनवेल फ्लायओव्हरवर काम करीत असतांना २०१२ ला मी कामोठे, नवी मुंबई येथे रेडी पझेशन घर बुक केलं. त्यासाठी आयडीबीआय बँकेतुन लोन घेतलं होतं आणि त्यासाठी नेरूळच्या शाखेत खातं ऊघडलं होतं.लोनचा हप्ता मोठा होता आणि तो चुकू नये म्हणून मी माझ्या खात्यात पाच सहा हप्त्यांची तरतूद करून ठेवली होती.रक्कम मोठी होती. एप्रिलमध्ये मी ईकडे रहायला आलो.

    जूनमध्ये फ्लायओव्हरचं ऊद्घाटन झालं आणि माझी बदली वडाळ्याला ईस्टर्न फ्री वे वर झाली.
    सप्टेंबरमधल्या एके दिवशी आॅफिसमध्ये बसलो होतो. दुपारची वेळ असेल आणि मला एक फोन आला.
    "क्या मेरी बात सारंगजीसे हो रही है?"
    "हां जी बोलिये, आप कौन?"
    "सर, आयडीबीआय बँकसे एक्झिकेटीव्ह रिंकु बर्मन बोल रहा हूँ|"
    "बोलिये"
    "सर, आपका हमारी नेरूल ब्रँचमे अकांउंट है, उस सिलसिले में रूटीन व्हेरिफिकेशन करना है|"

    असं म्हणुन त्याने माझा अकांउंट नंबर ,जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, नॅामिनीचंं नांव सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर माझ्या अकांउंट मधला बॅलन्स, मागचे चारपाच ट्रान्झॅक्शनस् वगैरे सर्व माहिती दिली आणि हे सर्व बरोबर आहे का विचारलं,मी हो म्हणून सांगितलं. माझी खात्री झाली होती कीं हा बँकेचाच माणूस आहे. हे सर्व सांगितल्यावर तो म्हणाला "सर आपका व्हेरिफिकेशन हो गया है, अब आपके मोबाईलपर एक व्हेरिफिकेशन कोड नंबर आयेगा, मै दूबारा आपको फोन करूंगा आप मुझे वह नंबर बता देना फिर यह प्रोसेस पुरा हो जायेगा|हो सकता है आपको एेखादा डेबिट क्रेडिटका मेसेज आयेगा लकिन ऊसको ईग्नोर करना|"

    त्याने सांगितल्याप्रमाणे कोड नंबरचा मेसेज आला त्यानंतर त्याचा फोन आला आणि मी तो नंबर त्याला सांगितला. कांही वेळानंतर माझ्या खात्यातून पन्नास हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. त्याने ईग्नोर करायला सांगितलं होतं तरी मला शंका आली, मी त्याला लगेच त्याला फोन लावला पण फोन बंद होता. मी नेरूळ ब्रँचमध्ये फोन लावला पण ब्रँच बंद झालेली होती.

    दुस-या दिवशी सकाळी मी नेट बँकींगने माझं अकांउंट तपासलं आणि हादरलोच खात्यातून खरोखरच पन्नास हजार रूपये गेले होते.एका दिवशी एकावेळी पन्नास हजारची लिमिट असल्यामुळे तेव्हढेच गेले होते. लगेेच परत मी रिंकू बर्मनला फोन लावला पण तो बंदच होता. मी ब्रँचमध्ये फोन लावला आणि मॅनेजरशी बोललो,मॅनेजरने ऐकुन सांगितलं की तुमचं अकांउंट हॅक झालं आहे आणि तुम्ही तात्काळ ब्रँचमध्ये या. मी जायला निघालो आणि परत पन्नास हजार रूपये गेल्याचा मेसेज आला.अश्या त-हेने माझ्या खात्यातून एक लाख रूपये गेले होते.

    मी बँकेत पोहचलो, मॅनेजरच्या केबिन मध्ये गेलो, त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि माझं नेट बँकिंग आधी बंद करायला सांगितलं.खरंतर आजची पन्नास हजारांची लिमिट संपली होती त्यामुळे अजून पैसे जाण्याची शक्यता नव्हती. मॅनेजरचे आणि माझे बरेच वाद झाले.त्याचं म्हणणं होतं कीं तो नंबर सांगुन तुम्ही चूक केली. मी त्याला म्हणालो कीं तुमची सिस्टिमच फुलप्रुफ नाही. माझं अकांउंट हॅक झालंच कसं? त्याने ईंत्यंभूत माहिती बरोबर दिली त्यामुळे तो बँकेचाच कर्मचारी असल्याची खात्री पटल्यामुळे मी तो नंबर त्याला दिला.

    सर्व खातं बघिल्यावर लक्षात आलं कीं रिंकु बर्मनने लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्सच्या शाखेतून हे व्यवहार केले होते.आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरने तिकडे त्वरीत फोन करून त्यांना सर्व घटना सांगितली आणि रिंकु बर्मनच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद करण्याची विनंती केली.हे खुप त्वरेने झालं पण तोपर्यंत त्या ठगाने एटीएमद्वारे ७६००० हजार रूपये काढून घेतले होते.मी पोलीस केस केली तर पुढेे सर्व सहकार्य करू अशी मॅनेजरने मला खात्री दिली आणि तेथून मी निघालो.मॅनेजरने माझ्या खात्यात गैरव्यवहार झाल्याचं मला लिहून दिलं.

    तेथुन निघुन मी तडक सीबीडी बेलापूरचं नवी मुंबई पोलीस मुख्यालय गाठलं आणि सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार नोंदवली एफआयआर केला. त्यांनी लवकरात लवकर तपास करायचं आश्वासन दिलं.

    एकदा गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाहीच, ते अक्कलखाती जमा करून टाकायचे असं ठरवुन टाकलं आणि कामाला लागलो. एक लाख रक्कम कांही कमी नव्हती. मनात रूखरूख होतीच.एकदोन दिवसांनी माझे एक हितचिंतक आणि आर्थिक सल्लागार श्री. दिपक लाला यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांनाही ऐकून धक्काच बसला पण त्यांनी रिझर्व बँकेच्या 'बँकिंग ओम्ब्डसमॅन' (लोकायुक्त)कडे मला आॅनलाईन तक्रार करून ठेवण्यास सांगितलं. मी त्याप्रमाणे सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करून तक्रार नोंदवली.

    ईस्टर्न फ्री वे चं काम जोरात चालू होतं, रोज कोणाची न कोणाची तरी व्हिजिट असायची. हळुहळु कामाच्या रामरगाड्यात मी पैश्यांचं विसरून गेलो होतो. एक दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली आणि तपासाचा आढावा घेतला पण हाती कांही लागलं नाही. रिंकुु बर्मनच्या अकांउंटमध्ये दिलेल्या कळव्याच्याा पत्त्यावर पोलीस जाऊून आले पण तो ही बोगस निघाला.

    डिसेंबरमध्ये एके दिवशी साईटवर एमएमआरडीएचे कमिश्नर आले होते, कामाची पाहणी चालू होती आणि अचानक माझा फोन वाजला,आवाज महिलेचा होता, त्यांनी मला सांगितलं कीं मी बँकिंग ओम्ब्डसमॅन बोलतेय.तुमच्या बँक खात्यात झालेल्या गैरव्यवहाराची आम्ही चौकशी केली आहे आणि त्यात आम्हाला तथ्य आढळुन आलंय.आम्ही ओरिएंटल बँक अॅाफ कॅामर्स लोखंडवाला शाखेला तुमचे एक लाख रूपये देण्याचे निर्देश दिलेले आहेत.तुम्ही तिकडे जावून तुमचे पैसे कलेक्ट करा. ते ऐकुन मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी त्यांच्याकडे फक्त आॅनलाईन तक्रार केली होती पण त्यांनी सखोल कार्यवाही करून मला माझे पैसे परत मिळण्याचे निर्देश दिले होते.

    दुस-या दिवशी सकाळी मी तिकडे गेलो. तिथल्या बँक मॅनेजरने माझ्याकडून ईंडेम्निटी बाँड लिहून घेतला आणि एक लाखाचा डिमांड ड्राफ्ट मला दिला.

    त्या घटनेनंतर मी सतर्क झालो आणि कोणत्याही अनोळखी कॅालला मी आता कोणताही रिस्पॅान्स देत नाही. प्रत्येकाने हे पथ्य पाळावेत हीच माझी ईच्छा आहे.
    The main reason of sharing this experience is that by mistake if anything goes wrong everybody should know about "Banking Ombudsman"

    - सारंग प. चपळगांवकर. मुंबई. (मुळगाव - बीड )


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो..

  • RAM, अर्थात ‘रॅम्डम अक्सेस मेमरी’..

    काल दहावीचा निकाल लागला. जवळपास २०० च्या आसपास मुलांना १०० टक्के मार्क्स मिळाले हे वाचून खुप छान वाटलं. त्या सर्व हुशार मुलांचं अभिनंदन. या मुलांबद्दल कौतुक असलं तरीही माझ्या दुसऱ्या मनात कुठेतरी काळजीची पालही चुकचुकली.

  • राम गणेश गडकरी यांची चिमुकली इसापनिती

    गडकरी यांची ओळख मुख्यत्वे करुन नाटक आणि कविता वरुन होते.... परंतु त्यांच्या या पैलु विषयी फार थोड्या रसिकांना माहिती असेल.

    चिमुकली इसापनिती हे गडकर्‍यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम १० पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनितीतल्या गोष्टी गडकर्‍यांनी लिहील्या आहेत. त्या गोष्टींचं वैशिष्ट्य म्हणजे गडकर्‍यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेलं नाही. त्यातील काही कथा--

    कथा-१

    कथा पहिली

    एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.

    कथा दुसरी

    रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, ''रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन.'' असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लौकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, ''काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले?'' रामा बोलला, ''हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे.'' हे ऐकून हरी फारच खजील झाला.

    कथा ३

    एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.

    कथा चौथी

    एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, ''देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.''देवाने सांगितले की, ''बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत?'' देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.

    संदर्भ :- रामगणेश गडकरी यांचे संकेत स्थळ

    संकलन - समीर सप्रे

  • अष्टभुजा नारायणी

    अष्टभुजा नारायणी' या अवस्थेचा अनुभव जर आपल्याला रोज सकाळी घेता आला तर खरंच किती बरं होईल!धावणारं घड्याळ आणि रेंगाळणारे घरातले यांचा तोल साधायला जरा तरी मदत होईल.अष्टावधानी या शाळेत वाचलेल्या शब्दाचा अर्थ आपण दिवसाच्या पहिल्याच प्रहरात घेत असतो.साफसफाई,स्वयंपाक, आवराआवरी,दिवसभराचे कामांचे नियोजन अश्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर आपण लढत असतो.हात, पाय,मेंदू, तोंड आणि हो आपलं मनसुद्धा या वेळी प्रचंड व्यस्त असतं.पहाटे पाच वाजेच्या आसपास सुरु झालेलं हे शरीराचं यंत्र रात्री बारा वाजेपर्यंत आई,बायको,सून,मुलगी,बहीण, भावजय याच जोडीला जवाबदार कर्मचारी अश्या आखलेल्या परिघात वेगवेगळ्या अपेक्षांच्या ओझ्याचा पिंगा घालत नाचत असतं.

    ...........आणि अचानक महिला दिन किंवा women's day येतो आणि सगळ्यांना या गोष्टीचा साक्षात्कार होतो.या दिवसापुरते स्त्रीच्या समर्पणाचे, त्यागाचे गोडवे गायले जातात.स्त्रीच्या कष्टांची,तिच्या परिश्रमाची,तिच्या संघर्षाची,तिच्या जिद्दीची जाणीव सगळ्यांना होते.

    पण वर्षानुवर्षे या चक्रातून जाणाऱ्या तिच्या शरीराला मात्र ही जाणीव हळूहळू रोज व्हायला लागलेली असते.वाढत जाणारे वजन,दुखणारे गुडघे,पित्ताचा त्रास,कंबरदुखी,पाळीचा त्रास,कमी हिमोग्लोबिन,दम लागणे,टाचा प्रचंड दुखणे,रात्री झोप न येणे,अनामिक दडपण जाणवणे,केस गळणे,भेगा पडणे,त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अश्या असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.
    या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरचं यासाठी वेळ कुठून आणायचा हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

    या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

    Energy boosting:

    पाव किलो खारीक पावडर,पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.
    दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

    बस्स पांच मिनीटवाला नाश्ता with देशी अंदाज:

    नाश्ता compulsary प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात,तुपसाखर पोळी,लोणीसाखर पोळी,राजगिरा लाही व दुध,लाह्यांचे पीठ व ताक,नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी,पुलाव,थालीपीठ,उपमा,शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.
    ओट्स, कॉर्नफ्लेक्स,packed juices, बेकरी पदार्थ,शिळे पदार्थ,मॅगी यांना ठामपणे NO म्हणायचे.

    किचन क्लिनिक:

    फोडणी करतांना हिंग,मेथी दाणे,हळद,कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.
    एक वेळेच्या जेवणात वरण,भात, तूप,लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
    ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.
    कणकेत चिमूटभर चुना add करून,कडीपत्ता चटणी,जवस चटणी,तीळ चटणी,शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

    Fitness मन्त्र:

    सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठीदेऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल
    सकाळी उठल्यानन्तर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास
    दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊयात

    सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी शोधून खूप हसूयात

    आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना,मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूयात,स्वतःची ओळख घडवून आणत,महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर निरामयतेच्या वाटेने जाता जाता फिरुनी नवे जन्मेन मी हे promise स्वतःशीच करूयात.

    वैद्य सौ दिप्ती धर्माधिकारी
    ९३७०७२०५०२
    diptisdharmadhikari@yahoo.com


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो..

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पासष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन

    धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.

    कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.

    कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !

    वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.

    एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ....

    तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.

    आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा "मिनी होम" झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?

    ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.06.2017

  • सदगुरु आणि देव

    एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".

    जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."

    शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."

    जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.

    देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.

    पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.

    आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.

  • सदगुरु आणि देव

    एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , "तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस".

    जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात "मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर."

    शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो "तुझ्या सदगुरुंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणले आहे, त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला सांगितला त्यामुळं पहिला सदगुरूंच्या चरणांपाशी जा."

    जेव्हा भक्त सदगुरूंच्या चरणांजवळ जातो तेव्हा सदगुरु म्हणतात, मी तुला फक्त भक्तीचा मार्ग सांगितला *पण् देवाने तुला निर्माण केलय,नाही कां ?त्या मुळे जा आणि पहिला देवाच्या चरणाशी नतमस्तक हो. त्यानंतर तो भक्त देवाच्या चरणाजवळ गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे . पण आता मी तुला देवाची आणि गुरूंची प्रमुख तत्व सांगणार आहे.

    देवाच्या तत्वात - : माझ्या कडे न्याय व्यवस्था आहे. जर कां तु चांगलं कार्य केलंस तर तुला त्याचं चांगलंच फळ मिळेल, चांगलं आयुष्य मिळेल आणि मुक्ति मिळेल.

    पण जर कां तु वाईट कर्म केलीस तर तुला तर त्याचे वाईटच फळ मिळेल. तुला शिक्षा होईल . तु या मायाजालात अडकशील आणि त्यात बुडुन जाशील आणि तुझा आत्मा संघर्ष करीत राहील.

    आता तुला गुरूंची तत्वे सांगतो. : जेव्हा तुम्ही सदगुरुकडे जाता तेव्हा ती प्रेमळ शांत मूर्ति असते. तुम्ही कसेही असाल, कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेतात. ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्यामुळे सदगुरु कधीही कोणालाही स्वतःहून आपल्या पासून दूर लोटत नाहीत. तर उलट ते आपल्या शिष्यात हिऱ्या प्रमाणे पैलू पाडतात त्याला शुद्ध करून मग माझ्या चरणाशी आणतात.

    त्या मुळे मी नेहमी पृथ्वीवर सदगुरूच्या रूपातच येतो.

  • ती छडी हरवलीय

    सर्वांनीच आत्मसात करणयासारखा अप्रतिम व उत्कृष्ट लेख....

    ""ती छडी हरवलीय.....""

    पालकसभा संपली.
    मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं.........
    गृहपाठ केला नाही वा वर्गात काहीही आगळीक केली तरी त्याला व्यवस्थित शिक्षा करा."
    "कमाल आहे. अहो, साधी एक पट्टी मारली तरी दुसर्‍या दिवशी पालक प्रिन्सिपाॅलना भेटतात. आम्हाला समज दिली जाते. तुम्ही तर शिक्षा करा असं सांगताय !"
    "योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग आहे असं मला वाटतं. शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायला हवा."
    मला समर्थ विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी पहिली शिक्षा आठवली. हिशेबाचं उत्तर चोरुन लिहिल्याबद्दल भाटवडेकर बाईंनी केलेली.
    वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरुन तासभर उभं केलं होतं त्यांनी. अश्रूंची धार लागली होती. शिक्षा संपली न् जवळ घेऊन, थोपटून त्या म्हणाल्या, "अरे, आता हिशेबच काय, कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही."
    हे आठवलं न् हसू आलं
    '"शिक्षा '" याचा अर्थ फक्त मारहाण, उपासमार, तणावपूर्ण अबोला असा नाही. शिक्षेचे रुपरंगही बदलत जातात. मुळात शिक्षा करणार्‍यामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं. तेच नसेल तर त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य प्रकटत नाही.
    शिक्षा म्हणजे क्रोधाचा आविष्कार नव्हे; तर हितचिंतनाचा तो एक प्रकार आहे. आठवतं—अभ्यास सोडून मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाहीत हा वडीलांनी केलेला उपदेश विसरुन संध्याकाळी पाहुण्या आलेल्या नातेवाईंकाच्या रंगलेल्या गप्पा मी ऐकत असल्याचे पाहताच काही कळायच्या आत त्यांनी गुडघ्याच्या खाली पोटरीवर वेताच्या छडीने विलक्षण वेगाने प्रसाद दिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच ती छडी बंबात टाकण्याची दक्षता मी घेतली.
    पाच—सहा दिवसांनी बाजारपेठेत फिरायला गेल्यावर छडीच्या दुकानाशी वडील थांबले न् म्हणाले, " बघ, तुला कुठली बरी वाटते ती?"
    आज वेळीच झालेल्या त्या शासनाचा वारंवार उपयोग होतो. आज पालकांच्या हातातली ती छडी हरवलेली दिसते. पालक आणि शिक्षक यांच्या पाच बोटांतली चार बोटे मायेची असावीत, पण एक बोट वेळीच कर्तव्यकठोर होणारं असावं. योग्य शिक्षा हेही वात्सल्यच, हे न कळल्याने, काटछाट न केलेल्या झाडासारखी मुलं कशीही वाढतात. तसं झाड सुंदर दिसेलही, पण मुलांना मात्र आकार द्यावाच लागतो.
    मिठाचं प्रमाण बदलल्यावर पदार्थाचं जे होतं तेच शिक्षेचं प्रमाण अती झाल्यानंही होतं. तेव्हा हा विचार सारासार विवेकानंच घ्यावा.
    भिंतीवर नको तो मजकूर लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून 'श्यामची आई ' मधील दहा पानं लिहून आण म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यानं पंधरा दिवसानं अख्खं पुस्तकच लिहून आणल्याचा प्रसंग आजही आठवतो. 'श्यामची आई ' चं ते हस्तलिखित बाड पाहून मी चक्रावलो. ' सर, तुम्ही दहाच पानं सांगितलीत. पण मला पुस्तक एवढं आवडलं की लिहावंसंच वाटलं.
    श्यामची आई मरण पावल्यावर जेव्हा ती श्यामच्या स्वप्नात येते, तेव्हा सर खूप रडलो मी ! माझ्या चुका कळल्या. आईला यापुढे त्रास द्यायचा नाही, असा मी निश्चय केलाय सर."
    मी म्हटलं, " आता तुझ्या हातून वाईट लिहिलं जाणं शक्यच नाही. कारण साने गुरूजींनी 'श्यामची आई ' लिहिलं, त्यानंतर तूच लिहिलंस "
    काळ बदलतोय. आता प्रत्येक वर्षी नव्या, अधिक निगरगट्ट मुलांची पिढी वर्गात येताना दिसते. प्रसारमाध्यमांमुळे मुलं एका बाजूला चुणचुणीत, 'जनरल नाॅलेज' ने 'करोडपती' झालेली दिसतात ; पण बिनधास्त, आगाऊ, रगेलही झालेली ही मुलं पाहिली की वाटतं— यामध्ये निदान आपलं मूल तरी नसावं.
    मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष पाहिजे. कारण शब्दात ' चारित्र्य ' नसेल तर धाक निर्माण होत नाही. घरात आपण कसं वावरतो यातूनच मुलं शिकत असतात. अधिकार 'पदा' त तेव्हाच येतो जेव्हा तो स्वत:च्या आचरणात असतो.
    शाळेच्या सहलीला गोव्याला गेलेल्या मुलीला बाबा जेव्हा 'गोव्याची' घेऊन ये, सांगताना आम्ही शिक्षक ऐकतो, तेव्हा त्या मुलीच्या सैरभर आयुष्याची तयारी घरातूनच होते, हे हताशपणे पाहतो.
    घरात सर्व वस्तु आहेत. चैनीच्या, विलासाच्या......,
    देह अगदी पूर्ण सुखात लोळेल याची काळजी आपल्यात आर्थिक अनुकूलतेनं घेतली आहे.
    आपल्या घरात बघा. काय नाही आपल्या घरात?
    सर्व ...... सर्व आहे!
    फक्त दोन गोष्टी आहेत का, बघा?

    कोपर्‍यातली " छडी ''आणि "देवघरातलं निरांजन" !


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.