वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.
तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’
त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’
आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.
सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.
कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.
जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
-- WhatsApp वरुन

बरेचजण दैनदिन जीवनात मुखवटे धारण करतात किंवा त्यांना करावे लागतात. अश्याच मुखवटे व चेहेर्यांचे कथन.
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥
भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
आचार्यश्री म्हणतात,
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात घराचे स्वप्न गरीबांच्याच नाही, तर मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे. मागणी खूप आणि पुरवठा कमी; त्यामुळे जिथे मिळेल, जशी मिळेल तशी जागा घ्या अशी आज परिस्थिती आहे.
एक अत्यंत पूरक अन्न. चणे अथवा हरभरे खाल्याने प्रचंड शक्ती वाढते. त्यामुळे माणूस कधीच थकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोड्याला नेहमी चण्याचा अथवा हरभऱ्याचा खुराक देतात. कारण या शक्तीने घोडा कितीही धावू शकतो. हरभऱ्यात काय नाही. अनेक गोष्टी हरभऱ्यातून मिळतात. हरभऱ्यात भरपूर प्रथिने असतात. अगदी त्याचप्रमाणे हरभऱ्यात आपल्याला जे इसेंशियल अमायनो ॲसिड ही सर्व प्रथिनात म्हणजे दहाही अमायनो अॅसिड असतात.
खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि "तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?" आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा माझ्या फेसबुक मित्रांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.
३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
या प्रश्नास आपले बहुतांशी बांधव उत्तर देऊ शकत नसण्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माचा विशेषत: संस्कृत भाषेचा अभ्यास नसणे. तेव्हा मी येथे सर्वांना आवाहन करतो कि त्यांनी संस्कृतचा शक्य होईल तेवढा अभ्यास करावा. तीच हिंदू धर्माची किल्ली आहे. याखेरीज इतर प्रश्न आणि शंकांसाठी मला वर दिलेल्या विद्युत पत्त्यावर संपर्क करावा.
-- विक्रम श्रीराम एडके
edkevikram@gmail.com
www.vikramedke.com
शिक्षणाने जात जाईल असं म्हटलं जात होतं, पण आजच्या २१ साव्या शतकात भारतातलं हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. माणसं जस जशी शिकतायत, परदेशात जाऊन जग पाहून, अनुभवून येतायत, तस तशी माणसं अधिकाधिक जाती केंद्रीत होतायत, असं माझं निरिक्षण आहे.
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि प्ररोहै-
रवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः |
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै-
रचंद्रार्धचूडैरलं दैवतैर्नः ‖ ३४ ‖
भगवान श्री भोलेनाथच्या ठायी असणाऱ्या अनन्य शरणतेला व्यक्त करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्री शंकरांच्या विविध वैभवांचे वर्णन करीत आहेत. या वैभवांनी युक्त असे भगवान शंकर माझे दैवत आहे ही सांगण्याची त्यांची पद्धत मोठी मनोज्ञ आहे. ते म्हणतात,
अनुद्यल्ललाटाक्षि वह्नि- ज्यांच्या मस्तकावरील डोळ्यामधून अग्नीच्या लाटा उसळत नाहीत, प्ररोहैरवामस्फुरच्चारुवामोरुशोभैः - ज्यांच्या डाव्या अंगावर अद्वितीय सौंदर्यवती शक्ती विराजित नाही,
अनंगभ्रमद्भोगिभूषाविशेषै:- ज्यांच्या अंगावर भूषण स्वरूपात सर्प रुळत नाहीत,
अचंद्रार्धचूडै:- ज्यांच्या मस्तकावर चंद्रकोर विलसत नाही
अलं दैवतैर्नः - असे कोणतेही माझे दैवत नाही.
अर्थात अशी गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या ठिकाणी नाहीत अशा कोणत्याही दैवतेला मी शरण जात नाही. हे सांगण्याच्या निमित्ताने आचार्य श्री वेगळ्या शब्दात भगवान श्री शंकराची वैभव मालिका आपल्यासमोर सादर करीत आहेत.
तृतीय नेत्रातून निघणारा अग्नी, मांडीवर बसलेली देवी पार्वती अंगावर रुळणारे सर्प आणि मस्तकावरील चंद्र या भगवान शंकराच्या सगळ्या गोष्टी वंदनीय आहेत. त्यांच्याशिवाय भगवान शंकरांची कल्पनाही करवत नाही.
या सगळ्या गोष्टींचे वैशिष्ट्य सांगण्याच्या निमित्ताने आचार्यश्री पूजना मध्ये असणाऱ्या ' सांगं सपरिवारं सशक्तिकम्' या दृष्टीचा विचार आपल्या समोर ठेवत आहेत. त्यासोबतच भगवान शंकरांच्या ठायी असणारी एकनिष्ठता अधोरेखित करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti