वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.
January 25, 2018
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो. योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.
अखंड पुरुषार्थ: एकदालक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याचीशक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.
स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे. 'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे.
ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावरचढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.
अनासक्तकर्म: आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षारद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडी बहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-- विवेक पटाईत
January 2, 2016
हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.
April 16, 2022
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे यांनी लिहिलेला हा लेख
संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे चित्त शुद्ध होऊ लागले. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे. कधी त्यांचे अंतःकरण पश्चात्तापाने दग्ध होई तर कधी ते आपल्याच मनाशी सुसंवाद साधू लागले. अहंकाराची जागा नम्रतेने घेतली. सर्व चराचरात परमेश्वर भरलेला आहे ही परमेश्वराच्या सर्वात्मकतेची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या आचरणात आमुलाग्र बदल झाला. निस्पृह भावना, निरासक्त वृत्ती निर्माण झाली. 'वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि' असा त्यांचा स्वभाव बनला.
परम वैराग्य, निढळ भक्ती, अंतर्मुख वृत्ती, डोळस श्रद्धा, वाणीतील परखडपणा, कठोर आत्मपरीक्षण आणि रसाळ प्रासादिकता अशा संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगवाणीने कवित्वाचा जणू कळसच गाठला. 'भले त्यांसि देऊ गांठीची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणूं काठी' अशी भावना त्यांच्या अभंगांतून व्यक्त होऊ लागली. प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो. लोकांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी रोखठोकपणे उपदेश केला आहे.
तुकाराम बोल्होबा मोरे (आंबिले) असे त्यांचे पूर्ण नाव. जन्म देहू गावी. त्यांचे आईवडील धार्मिक प्रवृत्तीचे आणि विठ्ठलभक्त होते. ते नित्यनेमाने पंढरपूरला जात. लहानपणीच आई-वडील वारले. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन संसार तुकारामांच्या अंगावर टाकून परागंदा झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे होते ते सारे द्रव्य संपले. धंदाव्यवसायात नुकसान झाले. पहिली पत्नी रखमाई व मुलगा शिवाजी अन्नान्न करून मेले. दुसरी पत्नी अवलाई (जिजाबाई) म्हणजे पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या. कजाग आणि आक्रस्ताळी होती. धंद्याचे दिवाळे निघाले. इतक्या आपत्ती वयाच्या एकविशीच्या आतच त्यांच्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांचे मन संसाराविषयी उदास, उद्विग्न झाले. परंतु या आपत्तींनी खचून न जाता त्याचा उपयोग स्थितप्रज्ञाप्रमाणे झेलून आत्मकार्याकडे त्यांनी करून घेतला. 'बरे झालें देवा, निघाले दिवाळे' असे ते अभंगात म्हणतात. नंतरच्या उत्तरायुष्यात त्यांची साधकावरच्या, नंतर साक्षात्कार आणि सिद्धावस्था, धर्मरक्षणाचे कार्य, भक्तियोग, संतसंगती, व्यावहारिक नीती, विठ्ठलभक्ती, रामभक्ती, वैदिक धर्माचे स्वरुप, शिवरायांच्या शिवधर्मांतील लोकोत्तर कार्य. समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर कडाडून हल्ला, समाजकंटकांचा विरोध आदी प्रत्येक बाबतीत तुकोबांनी कळस गाठला. इतकी प्रसिद्धी कोणत्याही संताच्या वाट्याला आलेली नाही.
श्रीपांडुरंगासह नामदेव स्वप्नांमध्ये येऊन त्यांनी तुकोबांना स्वप्नात जागे केले आणि कवित्व कर, व्यर्थ काही बोलू नकोस हे काम सांगितले. माप करते वेळी हिशोब विठ्ठलांनी ठेवून त्यांनी थापटून सावध केले. नामदेवांनी स्वप्नात सांगितले की, मी शंभर कोटी अभंग करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी शहाण्णव कोटी अभंग झाले असून उरलेले चार कोटी तू करून संकल्प पूर्ण कर. असे तुकाराम महाराज म्हणत. नामदेवांची स्वप्नात भेट झाल्यामुळे तुकोबांना कवित्व स्फूर्तीचा प्रसाद प्राप्त झाला. स्वप्नातच तुकोबांवर सद्गुरुकृपा होऊन 'रामकृष्ण हरी' हा मंत्र मिळाला. बाबाजी हे त्यांचे गुरु !
स्वतःला पोहता येत नसता ते दुसऱ्याला शिकवू इच्छितात याला काय म्हणावे? असा सवाल तुकोबाराय करतात. मानवी गुरुची आवश्यकता नाही असे ते म्हणतात. मात्र सद्गुरूने मेघवृष्टीप्रमाणे सर्वांना समानरीतीने उपदेश करावा. त्यांच्यापैकी एकालाच निवडून आपला शिष्य मात्र करू नये. नाहीतर त्या गुरुला शिष्याच्या पापाचा अर्धा वाटा लागेल. असे विचार त्यांनी मांडले. शेवटी मन हेच आपले गुरु असते व मन हेच आपले शिष्य असते. माझा मीच व्यालो नि स्वतःच आपल्या पोटी जन्माला आलो असा एक उच्च विचार त्यांनी दिला आहे.
प.पू. तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ विचारवंत होते. त्यांच्या विनोदी अभंगांकडे पाहिले असता त्यांचे सर्वच अभंग लोकप्रिय व लोकप्रसिद्ध आहेत. 'वाघे उपदेशिला कोल्हा | सुखें खाऊं द्यावें मला ।।' या अभंगांत भुकेला वाघ आणि धूर्त कोल्हा अशी जोडी आहे. वाघ कोल्ह्याला सांगतो की, मी भुकेला आहे. तेव्हा तू माझी भूक शमवून उपकाराचे पुण्य पदरात पाडून घे. नाहीतरी तू मरणार आहेसच. चतुर कोल्हा साळसूदपणे वाघाला सांगतो, वाघोबादादा, वाघोबादादा, तुझ्या तोंडून हे पुण्यदायक सत्य ऐकून मी आनंदित झालो आहे आणि एवढे बोलून कोल्हा मोठ्या शिताफीने पळून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, वाघ आणि कोल्ह्याच्या परस्परविरोधी गोष्टीवरून दोन ठक आणि महाठकांची गाठ पडल्यावर काय होते हे जाणून घेऊन दोन धूर्तांच्या स्वभावांचे धर्म व वर्म सुजाणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व दुःखांचा, संकटांचा सन्मान 'बरे झाले देवा' या शब्दांत केला आहे. पण जेव्हा हेच तुकाराम महाराज आपल्या घराच्या स्थितीचे वर्णन उपहासात्मक विनोदी बुद्धीने करतात तेव्हा वाचक अचंबित होतो, स्तिमित होतो.
आम्ही भाग्याचे भाग्याचे ।
आम्हां तांबे भोपळ्याचे ।।१।।
लोकां घरीं गाई म्हैसी ।
आम्हां घरी उंदीरघुसी ||२||
लोकां घरी हत्ती घोडे ।
आम्हां आघोडीचे जोडे ||३||
तुका म्हणे आम्ही सुडके |
आम्हां देखोन काळ धाके ।।४।।
तुकोबांची कीर्तने ऐकून आदराने शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे दिवट्या, छत्री, घोडे व धन, अलंकार पाठविले पण तुकोबांनी या ऐश्वर्याचा, धनाचा स्वीकार केला नाही. ते परत करताना शिवबाला सोबत नऊ अभंग पाठविले. त्यांत काही विठूमाऊलीला व काही अभंग शिवबांना उद्देशून आहेत. आयुष्याच्या अखेरीस वैभवात राहण्याची संधी आपण होऊन चालून आली होती. ती त्यांनी नाकारली. 'आता येथे पंढरीराया । मज गोविशी कासया || तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ।। अशी त्यांनी प्रार्थना केली.
सर्व संतमहात्मे एकच सत्य पुनश्च सांगत आहेत, 'हा संसार कितीही सुंदर लाडाकोडाचा वाटत असला तरी तो मोहमय आहे, मायावी आहे. तरी या मृगजळात गुंतून राहू नका. परब्रह्माकडे जाणाऱ्या मार्गाने सातत्याने दृढ निश्चयाने वाटचाल करा. 'हाचि नेम आतां न फिरे माघारी' हा निश्चय येथे महत्त्वाचा आहे.
तुकोबांना झालेला स्वप्नदृष्टांत व सद्गुरुकृपा यामुळे त्यांच्या जीवनात झालेले आमुलाग्र परिवर्तन यामुळे ते एका उच्च पातळीवर गेले. दैवी योग्यता आली. ते मराठी भाषेचे मुकुटमणी झाले. त्यांनी नामस्मरणाने व भक्तियोगाने साधना करून संत ज्ञानेश्वरांच्या बरोबरीचा मान मिळविला. त्यांनी कंठरवाने आत्मतिडीकेने घणाघाती शब्दांत वज्रप्रहार करून समाजाला जागविण्याचा प्रयत्न केला. 'तुका झालासे कळस' ही उक्ती सार्थ झाली म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात,
ज्ञानदेवे रचिला पाया ।
तुका झालासे कळस ।।
सौ. नयना अशोक मेंगळे, बोरीवली (पूर्व)
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
September 6, 2022
श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे.
सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात. पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा, तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्तीची स्थापना करून मध्यरात्री शूचिर्भूत होऊन पूजा करतात.
नवमीचे दिवशी पंचोपचारांनी उत्तरपूजा करतात. व मातीच्या मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात.
हा सण उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादी क्षेत्रात विशेष थाटाने हा उत्सव साजरा होतो.
-श्री करंदीकर गुरुजी
September 6, 2023
‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे .
तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; दिल्लीतील Law & Order हें केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. दिल्लीच्या राज्य- सरकारला कांहीं गोष्टींसाठी दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरची परवानगी घ्यावी लागते ; दिल्लीचे पोलिस केंद्राच्या गृह-मंत्रालयाच्या एकप्रकारें आधीन आहेत. केजरीवालांचं दिल्ली-पोलिसांच्या मुख्याशी पटत नाहीं ; केजरीवाल यांचें दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरशी पटत नाहीं, केजरीवाल यांचें केंद्राच्या गृहमंत्रालयाशी पटत नाहीं. नुसतेंच या सर्वांशी पटत नाहीं असें नव्हे, तर संघर्ष आहे. केजरीवाल हे म्हणताहेत की दिल्लीला संपूर्ण statehood मिळालें पाहिजे , म्हणजे सगळें राज्य-सरकारच्या अखत्यारीत येईल. दिल्लीच्या इलेक्शनमध्ये AAP ला मोठें बहुमत मिळालें आहे. त्यामुळे, आतां ‘ब्रेक्झिट’च्या धर्तीवर, दिल्लीला संपूर्ण ‘स्टेटहुड’ मिळावें यासाठी, referendum, जनमत, घ्यायला हवें अस प्रचार केजरीवाल करत आहेत . तसें झाल्यास , आपल्या मताला बहुमत मिळेल, अशी त्यांना कदाचित खात्री वाटत असावी.
अमेरिकेतही (USA) राजधानी वॉशिंग्टन डी.सी. हें शहर क्रेंद्राच्या ( फेडरल सरकारच्या) अखत्यारीत आहे. तेथेंही कांहीं नेते, त्या शहरासाठी ‘स्टेटहुड’ची मागणी करताहेत, पण तेथील फेडरल सरकारनें अजून तरी त्यांना दाद दिलेली दिसत नाहीं. भारत सरकारनेंही ही गोष्ट ध्यानात ठेवावी, आणि दिल्लीची सुरक्षा या विषयावर अजिबात compromise करूं नये.
केजरीवालांची AAP जेव्हां इलेक्शनसाठी उभी होती, तेव्हांही त्यांना दिल्ली राज्याचें ‘स्टेटस’ काय आहे, हें पूर्णपणें ठाऊक असणारच. त्यांनी ‘दिल्लाला संपूर्ण राज्याचा दर्जा हवा’ या प्रश्नावर निवडणूक लढवली असती , व त्या मुद्द्यावर त्यांची पार्टी जर बहुमतानें निवडून आली असती, तर मग , हा प्रश्न धसास लावण्यासाठी केले त्यांचे प्रयत्न , ‘योग्य प्रयत्न’ या सदरात मोडले असते. पण एखाद्या प्रश्नाची आधीच माहिती असणें , व ती प्रत्याप्रक्षरीत्या स्वीकारणें, आणि नंतर जनमताचा आग्रह धरणें कितपत योग्य आहे , खास करून ‘ब्रेक्झिट’चें उदाहरण देऊन ?
मात्र प्रत्येक गोष्टीसाठी जनमत घ्यायलाच हवें, असें नाहीं ; खास करून प्रश्न जेव्हां सुरक्षेशी संबंधित असेल तेव्हां. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तेथें आपली पार्लियामेंट आहे, व राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकानेक महत्वाच्या व्यक्ती तेथें रहातात, परदेशीय वकिलाती तेथें आहेत. म्हणूनच, दिल्लीची सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतच असली पाहिजे, राज्य सरकारच्या नव्हे. आणि, या गोष्टीचा संबंध केवळ सिक्युरिटीशीच संबंधित आहे, आणि, असायला हवा ; केंद्रात कोणाचें व दिल्लीत कोणाचें सरकार आहे, या प्रश्नाशी तो अजिबात निगडित नाहीं, आणि नसावाही.
केजरीवाल यांचा व माझा कांहींच संबंध नाहीं ; आणि बादरायण संबंध जोडायचा असलाच तर, आम्ही दोघेही आय्. आय्. टी. खरगपुरचे विद्यार्थी आहोत , एवढाच तो आहे. पण मी त्यांना ( आय्. आय्. टी. मधून पास कधी झालो, या निकषावरून) बराच सीनियर आहे ; त्यामुळे त्यांचा माझा तेथेंहीं संबंध येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. तसेंच, मी AAP चाच काय, कुठल्याही राजकीय पार्टीचा सभासद नाहीं. हे सर्व सांगायचा हेतू इतकाच की, माझें वरील analysis हें केवळ तर्काधिष्ठित आहे, त्याचा संबंध देशाच्या राजधानीच्या सुरक्षेशी आहे, अन्य कशाशीही नाहीं.
‘दिल्लीला संपूर्ण स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे न देणे’ या प्रश्नाचे राजकीय व अन्य पैलू तपासणें हा या लेखाचा उद्देश नाहीं. मात्र, ब्रिटनमधील ‘ब्रेक्झिट’साठीचें जनमत, हें दिल्लीसाठी योग्य उदाहरण, किंवा precedent, असूंच शकत नाहीं. देशाच्या राजधानीच्या सुरक्षेचा विचार करून, इतकें नक्कीच वाटतें की, केंद्र सरकारनें कोणाच्याही कसल्याच दबावाला बळी पडूं नये, व दिल्लीची सुरक्षा-व्यवस्था स्वत:च्याच हातात ठेवावी.
-- सुभाष स. नाईक.
June 25, 2016
प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दंबिम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् ।
आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ़्यं
मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ।।१।।
आई जगदंबेचे एक नितांत सुंदर नाव आहे ललिता. कोमल, मनोज्ञ, चित्ताकर्षक असा या शब्दाचा अर्थ. आई जगदंबेचे स्वरूप तसेच आहे.
शाक्त उपासनेतील दशमहाविद्या मध्ये देवी त्रिपुरसुंदरी स्वरुपात ललितांबेचे अर्चन केले जाते.
त्या ललितांबेचे स्तवन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
प्रात: स्मरामि ललितावदनारविन्दम् - मी सकाळी आई ललितांबेच्या वदन अरविंद अर्थात मुखकमलाचे स्मरण करतो.
यातील स्मरण शब्द अधिक सुंदर आहे. आई जगदंबेचे दर्शन घ्यायचे तर किमान देवघरापर्यंत जावे लागेल. पण स्मरणासाठी त्याची आवश्यकता नाही. अगदी आंथरुणात पडल्यापडल्या पडता, डोळे न उघडतात देखील स्मरण शक्य आहे. अर्थात प्रत्यक्ष कोणतीही शारीरिक क्रिया करण्याच्याही पूर्वी आईचे स्मरण हा प्राधान्याचा विषय आहे. हा भाव.
कसे आहे आईचे मुखकमल?
बिम्बाधरं- बिंब अर्थात उगवता सूर्य किंवा पिकलेली गुंज. ज्याप्रमाणे लालबुंद असे अधर म्हणजे ओठ असणारी. जगातील सर्वाधिक आकर्षक रंग आहे लाल. त्यामुळे स्वाभाविक पहिली नजर गेली ती लाल रंगाचा ओठांकडे.
पृथुल म्हणजे टपोरा, मोठा.मौक्तिक म्हणजे मोती. शोभिनासम् म्हणजे नासिका असणारी. अर्थात आई जगदंबेच्या नाकात मोठ्या मोत्याची नथ घातली आहे.
सामान्यतः सकाळी या अवयवाचे स्मरण करू नये , नाव काढू नये असे संकेत आहेत. ते अपशकुनी मानले आहे .पण आई जगदंबेच्या बाबतीत सर्वच गोष्टी शुभच असतात.
आकर्णदीर्घनयनं- कानापर्यंत जिचे नयन अर्थात पापण्या किंवा भुवया लांबलेल्या आहेत अशी. मणिकुण्डलाढ़्यं- त्या कानांमध्ये दिव्य रत्न युक्त कुंडलांनी शोभून दिसणारी.
मन्दस्मितं- आईच्या मुखावर मंदस्मित झळकत आहे. मृगमद- मृगाच्या नाभीतून मिळणारी कस्तुरी. उज्ज्वलभालदेशम्- त्या कस्तुरीच्या तिलकाने जिचा भालप्रदेश अर्थात कपाळ उजळले आहे अशी.
अशा अवयवांनी युक्त असलेल्या आईच्या मुखकमळाचे मी स्मरण करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 28, 2020
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात.
-श्री करंदीकर गुरुजी
August 30, 2023
काही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.
June 26, 2026
मुंबईची महालक्ष्मी. तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. नवरात्रात महालक्ष्मीचा सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मीच्या देवळात हजेरी लावतात..
October 17, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti