वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपती संदर्भात वेगवेगळे चित्रपट आले असतील परंतु अष्टविनायक गणपतींचा संदर्भ असलेला तोपर्यंत एकही चित्रपट नव्हता आणि आता असे म्हणावे लागेल आणि अजूनतरी या विषयासंदर्भात कोणी चित्रपट निर्माण केलेला नाही. हे ‘अष्टविनायक’ चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक
षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.
या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.
आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.
खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.
भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.
आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.06.2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ दुर्लक्षित केलेले आहे. रोजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार (फास्टफूड), स्पर्धात्मक युगातील टेंशन्स, रोज पूढे येणाऱ्या असंख्य अडचणी, अति जनसंपर्क, अॅलोपॅथी औषधांचा अतिवापर या सगळ्या गोष्टी शरीर मनावर अतिरिक्त ताण उत्पन्न करतात, असंतुलन वाढते. शरीरातील सकारात्मक उर्जा कमी होते. नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, ऊर्जावाहिनी नाड्यांमध्ये या कारणाने अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम म्हणून शरीरातील ऊर्जा संतुलन बिघडते, भौतिक शरीरावर परिणाम दिसू लागतो. शरीर रोगांनी दुषित होते. आपल्या अन्नमय कोषात आजार दिसू लागतात. यावर आपण उपचार घेऊ शकतो. पण प्राणमय आणि मनोमय कोषातील व्याधी दिसत नाहीत. सगळे रिपोर्टस नॉर्मल येतात. पण रोगाची लक्षणे मात्र नाहीशी होत नाहीत.
आरोग्याची व्याख्या वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन (WHO) या संस्थची अशी आहे की, रोगाचा किंवा अपंगत्वाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवर पूर्ण स्वास्थ्याची भावना होय.
आपल्या भारत देशामध्येच हजारो वर्षांपूर्वी ऋषीमूनींनी तपश्चर्येद्वारे, ध्यान धरणा करून जाणून घेतलेले विश्वातील प्रत्यक्ष रहस्य, विश्वचैतन्य, कुंडलिनी शक्ती, आत्मा-परमात्मा शरीरांतर्गत 7 चक्र, त्यांचे शरीरातील अवयवांशी असणारा संबंध, याचा अभ्यास केला होता. मानवी शरीर हे तीन स्तरांमध्ये असते. शरीर, ऊर्जा व मन. शरीर म्हणजे स्थूल देह (व्हिजीबल फिझिकल बॉडी) ऊर्जा म्हणजे ऊर्जा शरीर (ऑरा) किंवा सूक्ष्म देह आणि तिसरे म्हणजे मन या तीनही गोष्टींचा योग्य समन्वय झाला तरचं आपल्याला निरोगी (शरीर) आयुष्य मिळू शकते. भौतिक म्हणजे स्थूल देहाला (दिसणऱ्या) ऊर्जा पुरवण्याचे काम सूक्ष्म देह अथवा ऊर्जा शरीर करत असते. सुक्ष्म देहाचा स्थूल देहावर सतत प्रभाव पडत असतो. ऑरा म्हणजे आभामंडळ म्हणजेच ऊर्जा देह एक तेजस्वी ऊर्जामय क्षेत्र आपल्या भोवती उत्पन्न करते. भौतिक शरीरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊर्जेचा पुरवठा या ऊर्जामधून केला जातो. ही जैविक ऊर्जा सूर्यप्रकाश, हवा, वृक्षवल्ली, जमीन अशा वेगवेगळ्या नैसर्गिक स्त्रोतातून पुरवली जाते आपले शरीर निरोगी ठेवायला ही जैविक ऊर्जाच उपयुक्त ठरते.
पाश्चात्य देशातील संशोधकांनी केलेल्या शरीररचना शास्त्राप्रमाणे (Anatomy) आणि शरीरकार्य शास्त्राप्रमाणे (Physiology पाहिल्यावर सूक्ष्म शरीरातील चक्र ही शरीरांतर्गत असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथीशी (Glands ) जोडलेली आहेत.
सर सी डब्लू लीडबीटर यांनी साधनेद्वारे उर्जा देहाचे रहस्य, 1927 साली प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी 1696 साली सर गिचटेलने स्वत: बघितलेल्या नाभी चक्राचा फोटो दिला आहे.
डॉ. किरली ऑन यांनी 1949च्या सुमारास किरलीअन फोटोग्राफी शोधून काढली. शरीराच्या चुंबकीय ऊर्जेमुळे शुध्द पांढऱ्या प्रकाशाचे पृथ:करण होऊन वेगवेगळ्या रंगांच्या छटा बघण्याची ही प्रणाली आहे.
सर हॅरि ओल्डफिल्ड यांनी 1989 मध्ये पॉलीकॉनट्रास्ट इन्टरफेरन्स फोटोग्राफीचा विकास केला. किर्लियन फोटोग्राफीने हे सिध्द केले आहे की कोणताही आजार शरीरात येण्यापूर्वर् तो आभामंडळावर रंगांच्या रुपात स्पष्ट दिसतो. म्हणूनच भौतिक शरीरावर इलाज करण्यासाठी प्रथम आभामंडळ (तेजोवलय) साफ केले जाते.
शरीराला होणारे आजार हे शरीराला पुरवल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या असंतुलनामुळे झालेले असतात. आपण दुर्लक्षित केलेल्या आजारांचे रुपांतर पुढे मोठ्या व्याधीत (रोगात) होते.
बिघडलेले ऊर्जा संतुलन सुधारण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी, सुक्ष्म शरीरातील ऊर्जेच्या प्रवाहाच्या अभ्यासावर उपचार प्रणाली व विविध औषधे जगभर विकसीत झालेली आहेत. शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती प्रबळ करण्याचं कार्य याद्वारे केले जाते.
गेली 50 वर्षे रशियामधे,आणि इग्लंडमधे गेली 15 वर्षे, आभामंडळावर (तेजोवलय) सतत संशोधन चालू आहे.
भारतामध्ये सुध्दा पुण्यातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) कॉलेजशी संलग्न असलेली सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्स (CBS) ही संस्था गेली 5 वर्ष याच क्षेत्रात काम करत आहे इथल्या अभ्यासकांच्या मते सध्याच्या प्रचलित रक्त चाचण्या, ए-क्सरेज, एमआर आय इ. चाचण्या करण्यापेक्षा आभामंडळ (ऑरा) चिकित्सा पध्दती भविष्यकाळात अधिक श्रेष्ठ ठरणार आहे. महिलांसाठी ही चिकित्सा पध्दती अधिक उपयुक्त आहे.
आभामंडळ (तेजोवलय ऑरा) याच्यावरच्या चिकित्सा पध्दतीमध्ये ऊर्जेचे अडथळे पाहिल्यावर खालील माहिती उपलब्ध होते.
1) आजार होण्याच्या आधी सूक्ष्म देहावर होणारे बदल (मानसिक, शारीरिक व भावनिक स्तरावर असणारे बदल)
2) आजार शरीराच्या (स्थूल) स्तरावर दिसू लागल्यावर...
3) आजारासाठी औषधे व इतर उपचार प्रणाली केल्यानंतर शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम.
आता हे सिध्द झाले आहे की, स्थूल देहात ऊर्जा पुरवण्याचे कार्यसूक्ष्म देह म्हणजे ऊर्जा करत असते. एका देहाचा प्रभाव सतत दुसऱ्या देहावर पडत असतो. मानवी शरीर निरोगी ठेवण्यास सूक्ष्म देह सतत ऊर्जा पुरवित असतो. जी ऊर्जा त्याला निसर्गातून मिळत असते, तसेच वापरलेली निरुपयोगी ऊर्जा शरीराबाहेर टाकली जाते.
आपली ही अदृश्य ऊर्जा पध्दती कमी खर्चात, कमी जागेत, कोणतीही साधन सामुग्री न वापरता, कोणतीही त्रासदायक ऊर्जा न सोडणारी, शरीराला स्पर्श न करता ऊर्जेचें अडथळे शोधून काढणारी, ऊर्जावलयावर आधारित आभामंडळ चिकित्सा पध्दत (नॅशनल हेल्थ स्कॅनिंग सिस्टीम)विकसित केली आहे.
ऊर्जा शरीराला ऊर्जा उपचारच अधिक योग्य ठरतो. कारण ह्या विश्वाची उत्पत्तीच ऊर्जेतुन झाली आहे.(बिग बँन्ग थिअरी ). ग्रह, तारे आणि सर्व जगच मुळात ऊर्जारुप आहे.
विषेश कॅमेऱ्यातून, ऊर्जेच्या प्रतिमेतून (काढलेल्या आभामंडळाचा फोटो-ऑरा फोटोग्राफी) सूक्ष्म शरीरातील चक्र, नाड्या यांना प्रत्यक्ष पाहून, त्यांची वैद्यकिय शास्त्राशी सांगड घालून भविष्यात असलेल्या व्याधी व त्यावर ऊर्जेच्या उपचारानंतर झालेला सकारात्मक बदल याचा अभ्यास चालू आहे.
त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्र शास्त्राचा वनस्पतींवर होणारा परिणाम विविध आयुर्वेदिक औषधांचा तसेच शिळे आणि ताजे अन्नपदार्थ खाल्यावर शरीरावर होणारा परिणाम दृश्य स्वरूपात ऑरा फोटोग्राफीत दिसतो.
संशोधन कार्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याचे कार्य चालू आहे. कमी खर्चाच्या उपचार प्रणालीला ऊर्जीतावस्था आणणे, उपचारापूर्वी व उपचारानंतरचा सकारात्मक बदल दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
यापुढेही जाऊन ऊर्जाशास्त्र आणि आभामंडळाचा अभ्यास याचे संशोधन करून आभामंडळ चिकित्सा पध्दत विकसित करणे. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था पाहता, ऊर्जावलयावर आधारित आभामंडळ चिकित्सा पध्दत विकसित करणे. हे आत्तापासूनच करायचे कार्य आहे.
सेंटर फॉर बायोफिल्ड इव्हॅल्युएशन ( आभामंडळाचे संशोधन व विश्लेषण सेंटर ) ठाणे, ही संस्था काही नि:स्वार्थी, नि:धर्मी, सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन स्थापन केली आहे.
ऊर्जा शरिराला ऊर्जा उपचार अधिक योग्य ठरू शकतात. यावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींनी या शास्त्राची माहिती, संघटीत/असंघटीत संस्था, संघटना, कंपन्या, कॉरपोरेट वर्ल्ड यांच्यापर्यंत पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेथे काम करणारे सभासद वा कमर्चारी (Key Person) ह्यांच्या शरीरिक, मानसिक व भावनिक संतुलनाचा विचार ह्यांचा ऑरा काढुन स्पष्ट करणे, आणि योग्य उपचार पध्दतीने त्यांचे आरोग्य व कार्यक्षमता वाढविणे. हे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.
हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन संस्थेने या कामाला सुरुवात केलेली आहे. हे कार्य खूपच अवघड आहे, याची सर्वांनाच जाणीव आहे.
या मोठ्या कार्यासाठी त्यांचा विस्तार करण्यासाठी आपणा सर्वांचेच सहकार्य व आशिर्वाद अपेक्षित आहे. आजच्या तरून पिढीला विज्ञाननिष्ठ समज लवकर येते, त्याचा फयदा घेऊन भारतीय योगशास्त्राला अवगत असलेले हे गुढ विज्ञान आज पुन्हा विज्ञानाच्या सहा्याने प्रसतुत करणे हा या संस्थेचा हेतू आहे. नि:शुल्क व्याख्यान देताना ऑडियो, विडिओज स्लाइड शो यांचाही अंतर्भाव केला आहे.
या व्याख्यानामध्ये खालील मुद्दे स्पष्ट करण्यात येतात :-
(1)आभामंडळ (तजोवलय) म्हणजे काय? आणि संपुर्ण आरोग्य याबद्दल जागृकता.
(2) वैश्व चैतन्य (परमात्मा) वैश्वीक ऊर्जा, संकल्पना.
(3) कुंडलिनी शक्ती, नाड्या, चक्र, यांची संकल्पना.
(4) सूक्ष्म शरीर आणि त्यातल्या ऊर्जेच्या प्रवाहाची संकल्पना.
(5) सूक्ष्म ऊर्जेच्या वलयांचे (आभामंडळाचे ) छायाचित्रिकरण.
(6) निरोगी स्वास्थ्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार.
हे व्याख्यान सर्वांसाठी नि:शुल्क ठेवलेले आहे. कारण जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही इच्छा आहे.
संपर्कासाठी फोन नंबर :-
डॉ. अनुप देव 9969679160 / 2532 2875
डॉ. जयकृष्ण शिंदे 98339 55595
प्रवीण शिंदे 98214 57772
हार्दिक शहा 90297 30657
सौ. स्नेहल कोरगावकर 98696 13712.

कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो.
इतिहास - समृध्दी आणणाऱ्या आपल्या धरणांचा - भंडारदरा धरण, अकोले अहमदनगर.....
शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला... अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून आजपर्यंत सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर धो- धो कोसळणा-या पावसाचे पाणी भंडारदरा धरण आपल्या पोटात घेत आहे.
निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या भांडारद-याचे पाणी जसे शेतात खेळू लागले, तशी समृद्धीची बेट फुलली. सहकारी साखर कारखानदारी उद्योगधंद्याची भरभराट झाली. वर्षेनुवर्षे दुष्काळानं गांजलेल्या भूमिपुत्राच्या उदासवाण्या जीवनात या धरणाच्या पाण्यानं चैतन्याचे रंग भरले ते असे....
उत्तर रतनगडाच्या माथ्यावरील रत्नाबाईच्या गुहेत प्रवरा नदी उगम पावते. पुढे शेंडी गावाजवळ बांधलेल्या दगडी भिंतीमुळे भंडारद-याचा हा प्रचंड जलाशय तयार झालेला आहे. अतिशय राकट आणि डोंगराळ भागातील हा जलाशय समुद्र सपाटीपासून २४०० फुट उंचीवर आहे. त्यामुळे देशातील काही मोजक्या, खूप उंचीवरील जलाशयांमध्ये याची गणना होते. त्याच्या निर्मितीपासून आजवरची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे. .....
दुष्काळी भागास पाणी देण्याच्या दृष्टीने एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून पावले टाकायला सुरुवात झाली होती. १९०२ च्या सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्या्च्या गरजेवर भर दिला होता. प्रवरा नदीवरील ओझर येथे सन १८९९ मध्ये बांधलेला बंधारा त्या दिशेने उचललेले पहिले पाऊल म्हणावे लागेल. या बंधा-यातून बारमाही पाणी पुरविणे शक्य व्हावे, यासाठी म्हाळादेवी (ता. अकोले ) येथे मातीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. काही कारणांनी हा प्रस्ताव बारगळला. सर्वेक्षणानंतर शेंडीजवळील दोन टेकड्याजवळ जागा निश्चित करण्यात आली. ९ ऑगस्ट १९०७ रोजी भंडारदरा धरणाला तत्कालीन सरकारची मान्यता मिळाली. धरणाच्या बांधकामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला तो एप्रिल १९१० मध्ये. तत्कालीन चीफ इंजिनिअर ऑर्थर हिल यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाण्याखाली बुडालेली एकूण जमीन होती २२ हजार ९०० एकर. जमिनीच्या संपादनासाठी विशेष अधिकारी नेमण्यात आला. धरणाच्या बांधकामासाठी स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. धरणासाठी आवश्यक यंत्रसामग्री व इतर साहित्य घोटी रेल्वेस्थानकावर उतरविले जाई. तेथून सध्याच्या घोटी - कोल्हार मार्गावरून पोचवण्यासाठी पेंडशेत चिंचोडी ते भंडारदरा असा ४ मैलाचा नवीन रस्ता तयार केला गेला. धरणाच्या दगडी बांधकामास आवश्यक दगड मिळवण्यासाठी परिसरातच दगडी खाणींच्या जागा निश्चित करण्यात आल्या. हळूहळू जसजसे धरणाचे काम पुढे जाऊ लागले. तसा भंडारद-याचा शांत परिसर गजबजून गेला. अधिकारी, मजूर यांची निवासस्थाने उभी राहिली. निसर्गाच्या कुशीत भौतिक जगापासून कोसो योजने दूर असलेल्या या भागात दूरध्वनी, टपाल, दवाखाने अशा मुलभूत सोयी सुविधा आल्या. त्यावेळच्या लोकांना याचे केवढे कुतूहल वाटत होते.
भंडारदरा धरणाच्या भिंतीच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले. वाळू उपलब्ध नसल्याने दगडांचा चूरा वाळू म्हणून वापरण्यात आला. थोडे थिडके नव्हे तब्बल १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफूट बांधकाम करावयाचे होते. जसजसे बांधकाम उंची गाठत होते, तसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर १९२० मध्ये धरणात २०० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले होते. त्याच वर्षी सर्वप्रथम धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बांधकामाने पुढे चांगलाच वेग घेतला होता. नियोजनाप्रमाणे भिंतीची उंची २५० फुटापर्यंत बांधण्याचे ठरले होते. पुढे त्यात बदल केला गेला. ही उंची २० फुटांनी वाढवून २७० फुट करण्यात आली. भिंतीत एकूण चार मो-या असून,त्या अनुक्रमे ७० फुट, १२० फुट, १७० फुट व २२० फुट अशा अंतरावर आहे. या मो-यांचे अर्धा फुट जाडीचे व्यास ३ फुट पाईप आणि त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक झडपा खास इंग्लंडमधून आणण्यात आल्या. ७१.२८ मीटर भिंतीच्या तळाची रुंदी असून, माथ्यावरील रुंदी ७ मीटर आहे.
जून १९२६ मध्ये धरणाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण झाले. त्यासाठी खर्च झाला होता १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रुपये. ६५० फुट रुंदीचा सांडवा दक्षिण बाजूला ठेवण्यात आला. याच वर्षी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पावसाळा आला. शिखर स्वामिनी कळसुबाई अलंग, कुलंग, मदन यासह शिंदोळ्या, रतनगड या सह्यागिरीच्या पर्वत माथ्यावर कोसळणा-या पावसांच्या सरीमुळे अवतीर्ण झालेले ओढे - नाले कवेत घेऊन प्रवरामाई पहिल्यांदाच काळ्या पाषाणाच्या भिंतीमुळे सह्यागिरीच्या डोंगरद-यांच्या कुशीत विसावली होती. १० डिसेंबर १९२६ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली ओर्मी विल्सन यांच्या हस्ते धरणाचे औपचारिक उदघाटन झाले. सर्वेक्षणापासून बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पडलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ऑर्थर हिल याचेच नाव धरणाच्या जलाशयाला देण्यात आले. परंतु जवळच असलेल्या भंडारदरा या खेड्याच्या नावावरून धरणास भंडारदरा धरण असेच नाव पडले. मात्र असे असले तरी कागदोपत्री आजही हे धरण विल्सन यांच्याच नावाने ओळखले जाते. या धरणाने उत्तर नगर जिल्ह्याचे चित्रच पालटले.साठवलेले पाणी नियोजन करून लाभक्षेत्रावरील जमिनीला कालव्यांद्वारे मिळू लागले. दुष्काळाने गांजलेल्या भूमिपुत्रांच्या जीवनाला हिरवे वळण मिळाले. ओसाड - उजाड जागेवर हिरवीगार पिके मोठ्या डौलान डोलू लागली. समृद्धी आली. साखर कारखाने उभे राहिले. उद्योग सुरु झाले. उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट झाला. पण सारे कसे व्यवस्थित सुरु असतानाच १९६९ च्या सप्टेंबर महिन्यात धरणाच्या भिंतीला तडे गेले. काळजीचे वातावरण सर्वत्र पसरले. तंत्रज्ञानी जीव धोक्यात घालून अहोरात्र खपून या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड दिले.
भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला. धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले. धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.
अधिकृत नाव : भंडारदरा. विल्सन डॅम / ऑर्थर लेक
अडवलेली नदि: प्रवरा
स्थान : शेंडी.
सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
उंची : ५०७ मीटर.
रुंदी : (तळाशी) ८२.२९.
बांधकाम सुरू: १९१०.
उद्घाटन दिनांक: १९२६.
बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०
क्षमता : 11 टीएमसी
भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७० गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.
दरवाजे: प्रकार : S - आकार लांबी : १९८.१० मी.
सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी.
क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य
क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
वीज उत्पादन: टप्पा १
जलप्रपाताची उंची : ६५ मी
जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट.
टप्पा २
जलप्रपाताची उंची :
५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र x:
१ X ३४ मेगावॅट
धरणाची माहिती :
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची :
८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.
मानवी शरीरातील एक महत्वपूर्ण पण दुर्लक्षित अवयव म्हणजे पाठकणा होय.
श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल?
१ मार्च १९२२ रोजी स्थापन झालेली रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूल ही रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण देणारी एक नाविन्यपूर्ण संस्था आहे. दि न्यू एज्युकेशन सोसायटी ही संस्था १९४० मध्ये स्थापन केली गेली असली तरी ही शाळा १९२२ पासून अस्तित्वात आहे.
लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये माओवाद्यांविरुद्ध एक अक्षर लिहीले गेले नव्हते. 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माओवाद्यांना विरोध हा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा विषय बनला पाहिजे.
Copyright © 2025 | Marathisrushti