(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंकांची नवीन पद्धत

    अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा… ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. “वीस एक एकवीस”, “वीस दोन बावीस” वगैरे. या पद्धतीवर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे.

  • काश्मीर एक जाणीव – भाग चार

    एके काळची काश्मिरची राजधानी .
    श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
    समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !

  • सर्च ऑपरेशन @ स्युटा

    फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती.

  • हेचि दान देगा देवाsss

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला हा लेख


    संत पुरुष म्हणजे ईशतत्त्वाचे वाटाडे. जन्मभर स्वतः वारेमाप कष्ट करून सतत त्यांनी जगाचेच हित चिंतिले आहे. 'चिंता करीतो विश्वाचि ऽऽ' या वचनातून समर्थ रामदास स्वामींनी 'कल्याण करी रामराया ऽऽ' या शब्दांतून समाजाबद्दल ईश्वरीशक्तीकडे अशीच करुणा भाकली आहे. जीवनाच्या अवघ्या जेमतेम दोन दशकाच्या उण्यापुऱ्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ‘वैश्विक शांतीसाठी’ पसायदानातून हीच प्रार्थना केली आहे. 'आता विश्वात्मके देवे.....

    तेणे वाङ्मज्ञ तोषावे, तोषानि मज द्यावे पसायदान हे य....' अगदी याच धर्तीवर संत तुकारामांनी पांडुरंगापुढे फार सुरेख मागणे मागितले आहे की ज्यामुळे साऱ्या समाजाचेच भले होईल.

    'हेचि दान देगा देवा, तुझाविसर न व्हावाऽऽऽ' या शब्दपंक्तीत त्या शक्तीचे सतत अविस्मरणच चिंतून सामान्यांचा भक्तीचा मार्ग खुला कला आहे. या संतांनी स्वतःसाठी, स्वतःच्या ऐहिक सुखासाठी काहीच, कधीच मागितले नाही 'अवघे विश्वचि माझे घरss' या विचारसरणीतून सतत विश्वाच्या भल्याचा विचार केला आहे. म्हणून ही संतमंडळी आपल्यातून जाऊन (अवतार समाप्ती) अनेक शतके जरी झाली तरी आजही आम्हाला वंदनीयच आहेत.

    'मरावे परि कीर्ती रूपे उरावे' या संकल्पनेतून त्यांचे चरित्र, साहित्य, आजही आम्हाला मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या साहित्याचा प्रत्येकाला त्याच्या बुद्धीनुसार, कुवतीनुसार वेगवेगळा अर्थ लागल्याने त्याच्यावरच सखोल तपशीलवार विचार होत असल्याने प्रबंध लिहिणारे अभ्यासकदेखील भरपूर आहेत, यातच संतांच्या साहित्याची 'गहराई' (खोली) समजते. वास्तविक ते कोणत्या शाळेत वा कॉलेजात गेले होते? वा विशेष ज्ञान प्राप्त केले होते? तरी आंतरिक प्रेमापोटी व ईश्वरीकृपेने त्याचे बहुमूल्य मार्गदर्शन आमचे जीवन आजही घडवीत आहेत, संपन्न करीत आहेत हे नक्की. त्याबद्दल वादच नाही.

    ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतिऽऽ' या न्यायाने ही संत मंडळी म्हणजे ईश्वराने गउद्धारासाठी पाठविलेले प्रेषितच होते. जात, पात, धर्म, वंश इ. भिंतींच्या पलीकडे त्यांचे जगदोद्धाराचे कार्य म्हणजे ईश्वरी प्रसाद म्हणायला हवा.

    महाराष्ट्रात १७ व्या शतकात जगनियंत्याने
    तीन महान रत्ने दिली. १) संत तुकाराम, २) समर्थ रामदास स्वामी, ३) छत्रपती शिवाजी महाराज.

    ‘परित्राणाय साधूनाम् ऽऽ' या भगवद्गीतेतील तत्त्वाची ही प्रत्यक्ष प्रचितीच म्हणावी लागेल. कारण १३ ते १६ व्या शतकाच्या काळातील यावनी आक्रमणांनी पीचलेल्या, त्रासलेल्या जनतेला सावरून, त्यांना एकत्र आणून त्यांच्यात स्वत्व, आत्मविश्वास अंगी बाणणे हे महत्त्वाचे होते. या तीन संतांचा अवतार जणू त्यासाठीच होता. प्रेषितांनी ज्या घरात जन्म घेतला ती घरे खचितच साधी व सामान्य नव्हती. ह्यांच्या जन्माच्या अगोदर अनेक पिढ्याकडून ईश्वरी कार्य घडलेले आहे. थोडक्यात सर्वोत्तम समाजकार्य होण्यासाठी त्या घराण्याची सुपीक पार्श्वभूमी देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हटलेच आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी । जसे पेराल तसे उगवते. '

    १६ व्या शतकाच्या अगदी अखेरीस पिढ्यानपिढ्या पांडुरंग भक्तीने संपन्न असलेल्या मोरे कुटुंबात पुणे जिल्ह्यातील देहू (इंद्रायणी काठी) या गावी पेशाने व्यापारी (वाणी) असलेल्या घरात तुकोबांचा अवतार झाला. भगवंताच्या इच्छेनुसार व योजनेनुसार समाजातील अठरापगड जाती जमातींना शक्तीच्या माळेत एकत्र गुंफण्याचे कार्य व्हायचे असल्याने अनेकविध घराण्यात ही संत रत्ने अवतारीत झाली. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चातुवर्ण्यातील घराण्यांतून आलेली ही संतरत्ने भक्तीद्वारे समाजास ईश्वरी शक्तीप्रत नेण्यासाठी सदैव कार्यरत राहिली.

    वाण्याच्या घरात जन्मलेल्या तुकोबाने नेहमीच्या व्यापारी वृत्तीला न मानवणाऱ्या व पेलणाऱ्या वृत्तीचा अंगिकार केल्याने व्यावहारिक व्यापारी जगात संत तुकोबा कधीच यशस्वी झाले नसले तरी सचोटी, प्रामाणिकपणा स्विकारून भगवद्भक्तीने भक्तीक्षेत्रांत अत्युच्चपदी पोहोचले. म्हणूनच म्हटले जाते ना 'ज्ञाने रचयिला पाया तुका झालासे कळस ।' यावरून संत तुकोबांचे जगतकार्य ध्यानी येते. भक्तीचे बीज समाजात ज्ञानदेवाने पेरले तर तुकोबाने भक्तीचा वटवृक्ष केला. त्या वटवृक्षाच्या छायेखाली आजही कितीतरी पांथस्थरूपी भक्त, साधक आसरा घेत आहेत.

    'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे' या संत तुकोबांच्या कार्यामुळे घरात संपन्नतेचा कायमच अभाव. त्यामुळे संसाराचे गणित जुळविताना तुकोबांच्या धर्मपत्नीची (आवली) फारच कुचंबणा होत असे. विठ्ठलाच्या सतत नामस्मरणाने संसाराचा गाडा व्यवस्थित चालत नसल्याने तिची चाललेली चिडचीड. पांडुरंगाप्रतीचा राग हे सारे वास्तविकतेला धरूनच होते. पण नाम स्मरणातच असलेल्या तुकोबांना त्याचे काहीच नव्हते कारण त्यांचा पूर्ण भरवसा विठ्ठलावरच होता. त्याच्या उत्युच्च भगवत् विश्वासाची किंमत अर्थात सामान्यांना समजणारी नव्हती.

    'मना सज्जना भक्तीपंथेचि जावे' या समर्थांच्या मनाच्या श्लोकाद्वारे समाजाला भक्तीचाच महिमा सांगितला गेला आहे. ईश्वराप्रत जाण्यासाठी अगदी सामान्यातील सामान्य संसारी माणूस फक्त भक्तीच करू शकतो. हे तत्त्व संतमंडळींनी सतत समाजमनापुढे खुले केले. समर्थ दासबोधात नवविधाभक्तीचीच कास धरताना दिसतात. त्यांच्या मते भक्ती ही ईश्वराप्रत घेऊन जाणारी साधना, तपस्या (भक्ती) असून ती करणारा 'साधक' म्हणजे भक्त असतो तर साधनेमागील ईप्सित स्थळ म्हणजे मुक्ती म्हणजे 'साध्य' होय. नावे वेगळाली असली तरी त्यामागील तत्त्व हे एक असल्याचे संतांनी सतत सांगितले आहे.

    प्रत्येकाला पूजातंत्र, अर्चन, अर्पण, मंत्र, पद्धती वगैरे माहिती असेलच असे सांगता येणार नाही कारण प्रत्येकाच्या कुवतीनुसार हे असू शकते. पण प्रत्येकाला एक गोष्ट सहजी जमू शकते ते म्हणजे ईशशक्तीचे 'नामस्मरण.' थोडक्यात त्या उपकारकर्त्या ईशशक्तीला सतत आठवीत राहणे. विशेष म्हणजे ते नामस्मरण फक्त बुद्धीची देणगी लाभलेला माणूसच करू शकतो. हाच माणूस व अन्य प्राण्यात फरक आहे. भारतीय अध्यात्मानुसार आपापल्या प्रारब्धकर्मानुसार ८४ लक्ष योनी पार केल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. सोबत तो बुद्धीची देणगी घेऊन आलेला असतो. त्या बुद्धीच्या साहाय्याने त्याने स्वतः सोबत इतरांचा देखील उद्धार करण्याची त्या जगत्न्नियंत्याची अपेक्षा असते. आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्म घेणारा जीव कधीतरी संपतोच. जन्म व मृत्यू दरम्यान त्या जीवाचे अन्नवस्त्रादी योगक्षेम ईश्वरीशक्ती (जगन्नियंता) चालवीत असते. ती देखील कोणतीही अपेक्षा न ठेवता. त्या शक्तीप्रती कृतज्ञता पाळण्याची बुद्धीजीवाची जबाबदारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर जीवनात आपल्याला कित्येक जणांची आपल्या दैनंदिन कामात छोटी मोठी मदत होत असते. आपण काम झाल्यावर त्या व्यक्तीचे आभार मानतो. त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मग जी शक्ती आपला सारा योगक्षेम चालविते तिच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवीच अन्यथा आम्ही कृतघ्न ठरू. ती कृतज्ञता साध्यासुध्या 'भक्तीने' आपण साधू शकतो. ती म्हणजे स्मरण भक्ती-नामस्मरण. ती इतकी सहज व सोपी आहे की त्याला कोणत्याही वेळाकाळाचे बंधन नसते. आपापली दैनंदिन सारी कार्ये करीत असताना नामस्मरण करू शकतो.

    नामसंकीर्तन साधन पै सोपे,
    जळतील पापे जन्मांतरीची.

    संतांच्याचरित्रांतून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल की त्यांनी आपापली नित्य कर्मे कधीच सोडलेली नाहीत. उलट ती कर्मे करतानाच नामस्मरणाने सारी कर्मेच ईश्वर बनविली.

    'घेता नाम विठ्ठलाचे, जळती पर्वत पापांचे.' नामस्मरणात इतके सामर्थ्य आहे. कुणीही पापी त्या पाप कर्मातून धुवून गेल्याची उदाहरणे सर्वश्रुत आहेत.

    अत्यंत हिंसक लुटारू व क्रूर असलेला 'वाल्या कोळी. ' रामनामाने अती शुद्ध पवित्र होऊन रामचरित्राचा कवी बनला. अजामिळसारखा अत्यंत पापी, क्रूर देखील केवळ 'नारायण' नावाच्या त्याच्या शेवटच्या मुलाच्या संबोधण्यामुळे उद्धरून गेला.

    वास्तविक आपण दिवसातून सुमारे १०,००० वेळा श्वास घेत असतो. त्या प्रत्येक श्वासागणिक ईश्वराचे नाम घेतले तर वेगळ्या आणखी जपजाप्याची गरजच नसते. पण आपल्याला ते शक्य होत नाही कारण तेवढी आपली तयारी व निग्रहदेखील नसतो. श्रद्धा, विश्वास नसतो. नाम घेत असताना अनेक अनंत भले बुरे विचार सतत मनात येत असतात त्यामुळे आपण मुखाने नाव घेत असलो तरी मनापासून ते खरेखुरे नामस्मरण होत नसते. आपल्या मनावर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ या षड्रिपूंची जाड जाड पुटे असतात. त्यामुळे सदैव मन अशुद्धच असते. ते शुद्ध बनण्यासाठी मनातील विकार जाणे गरजेचे असते. त्यासाठी सत्संग, सत्पुरुषांचे मार्गदर्शन हवे असते. त्यांचा सहवास हवा असतो. विवेकवृत्ती जागृत व्हावी लागते. तेव्हाच खऱ्या अर्थाने नामस्मरण होते. मग त्या शक्तीचा प्रसिद्ध अभंग आहे -

    भक्तीवाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला, मीच खरा अपराधी.

    नामस्मरण करीत असताना प्रत्येक नामा सोबत आपले मन कणाकणाने शुद्ध, पवित्र होत जाते. सहाजिकच कणाकणाने भक्त त्या ईश्वरशक्तीप्रत जाऊ लागतो. कारण त्या ईश्वरशक्तीप्रत पोहोचल्याशिवाय शक्तीची ओळख कशी होणार? व आपण त्याच्याशी तादात्म्य कसे पावणार? प्रत्येक नामासोबत ईश्वरशक्ती सतत आपल्या सोबत असते त्यातूनच कित्येकदा अतर्क्य अशा चमत्कृती घडून येतात.

    प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी संत तुकारामांच्या किर्तनास आले असताना व यवनाच्या सैन्यानी घेरले त्यावेळी एक चमत्कृती घडली व कीर्तनात बसलेले सारेच जण शिवाजी दिसू लागले. सैनिकांना प्रत्यक्ष शिवाजी ओळखणेच अशक्य झाले व खरा शिवाजी सहजपणे तिथून सटकला. या कथेतून एवढेच घेता येईल की ईश्वरीशक्ती भक्ताचे सतत संकटातून रक्षण करीत असते. अशीच एक गोष्ट संत तुकारामांच्या बाबतीत घडली. ब्राह्मणांच्या अतिरेकी वागण्यावरून तुकारामांना त्यांनी लिहिलेल्या गाथा इंद्राणीत बुडवायला सांगितल्या गेल्या. त्यानुसार अत्यंत खिन्नपणे तुकारामांनी त्यांचे जीव की प्राण असलेल्या गाथा पाण्यात सोडून दिल्या व अन्न पाणी वर्ज्य करून तेथेच नामस्मरण करू लागले. तेरा दिवसांनी त्या गाथा कोरड्या स्थितीत परत तुकारामांना प्राप्त झाल्या. ईश्वरीकृपेने तुकारामांचे अवतार ईप्सित पूर्ण करण्यासाठी गाथा-म्हणजेच ज्ञान समाजात पसरविले गेले. वेगळ्या शब्दात बोलायचे झाले तर गाथांच्या स्वरूपात संत तुकारामबुवा आजतागायत अमर राहिले. त्यांचे साहित्य अजरामर झाले.

    देहे त्यागिता किर्ती मागे उरावी....' (मनाचे श्लोक)

    'अवली' ची कृती व्यवहाराला धरून होती त्यात भाबडेपणा नव्हता. ती जरी पांडुरंगाला काळ्या, विठ्या म्हणून दुषणे देत असली तरी संत तुकोबांची खऱ्या अर्थाने ती पतिव्रता सहधर्मचारिणी होती. ते जेवल्याशिवाय ती जेवत नसे. एकदा तर कित्येक दिवस काट्याकुट्यातून भंडाऱ्या डोंगरातून आपल्या पतीसाठी डोक्यावर जेवण घेऊन वाट तुडवीत जात असे. विठ्ठलावरची तिची भक्ती विरोधातून होती. (जशी रावण, कंसाची) म्हणून अवतारसमाप्तीच्या वेळी तुकारामांना न्यायला पुष्पक विमान आले असताना आवलीला तुकारामांनी बरोबर चलण्यास सांगितले. तिची तेवढी पात्रता होती हे विसरून चालणार नाही. अर्थात संसारातच ती अधिक रमल्याने ती त्यांचे सोबत गेली नाही ही गोष्ट निराळी. पण पतीसोबत सहगमन करायची तिची पात्रता व क्षमता नक्कीच होती.

    अशा या वैश्यवृत्तीच्या पांडुरंग भक्ताने देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता केवळ समाजाचाच विचार करून साऱ्या जगतासाठीच महत्त्वाची प्रार्थना केली की आजही ती तितकीच जिवंत ठरते.

    जीवनभर आत्मानंदात बुडून रममाण होणारे तुकोबा म्हणतात-

    'आनंदाचे डोही आनंद तरंग sss' कारणत्यांना सर्वत्र आनंदच दिसतो. दुःख कुठेच दिसत नाही. कारण ते भौतिक सुखदुःखाच्या कल्पनेच्या कधीच पलीकडे गेलेले असतात. सर्वत्र त्यांना पांडुरंगच म्हणजे चैतन्य दिसते. या साऱ्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी स्विकारलेला 'भक्तीचा' म्हणजेच 'नामस्मरणा'चा मार्ग. नामस्मरणाची अविट गोडी ते कधीच विसरू शकले नाहीत. त्यासाठीच पांडुरंगाला ते सतत प्रार्थना करतात व एकच मागणे मागतात. जे आजही नारदीय कीर्तन परंपरेत कीर्तनाच्या अखेरीस बुवा न चुकता म्हणतात. कारण भक्ती प्रचार व प्रसार हेच नारदीय कार्य आहे.

    'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.'

    -रामकृष्ण अभ्यंकर

    (दिवाळी अंक २०१६)

  • आपटेआजींचा जीभखवळू बटाटावडा 

    गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग १५

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3

    जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.

    शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.

    या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.

    आता करा यादी.
    फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
    दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
    पालेभाज्यांच्या जुड्या,
    दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
    पाकीटातील मांसाचे तुकडे,
    आईस्क्रीमचे गोळे,
    दह्याचे पातेले,
    शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
    डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
    ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
    सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....

    फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
    शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !

    असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.

    शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !

    आजची काळाची गरज,
    हे असंच चालायचं,
    काळानुसार बदलायला नको काय ?
    आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?

    एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
    या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • वसईचे पाणी पेटले…

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेला हा लेख


    मुंबई फुगत चालली होती. तेथील लोंढे मोठ्या संख्येने वसई-विरारला धडकत होते. स्वस्त घरांच्या आमिषाने भारतभरातील लोकांची वसईकडे रीघ लागली होती. पिण्याचे शुद्ध पाणी ही मानवाची आद्य गरज आहे. शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. भरपूर पाण्याचे खोटे आश्वासन देऊन बिल्डर लोकांना फसवीत होते.

    'घी देखा लेकीन बडगा नही देखा', अशी त्यांची अवस्था होत होती. नव्या वसाहतीत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यांना टँकरच्या अशुद्ध आणि अनियमित पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. शिवाय, त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागत होते. वाढणाऱ्या वस्तीला पिण्याचे पाणी पुरविण्याची कुठलीही योजना शासनाकडे नव्हती आणि अशी योजना राबविण्याची ग्रामपंचायतीची क्षमता नव्हती. त्यावर बिल्डरांनी सोपा उपाय शोधून काढला. पश्चिम वसई हा बागायती पट्टा असून, तेथील विहिरींचे पाणी पिण्यासाठी व शेतीबागायतीसाठी वापरले जात होते. बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली.

    १९८५ च्या दरम्यान निर्मळ या गावातून अतिरिक्त पाण्याचा उपसा होत होता. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या. पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढू लागले. काही सजग नागरिकांनी आंदोलन छेडून टँकर्सना बंदी घातली. त्यावेळी वसई-विरार विभाग माफिया गँगच्या दहशतीखाली वावरत होता. उपशामुळे स्थानिकात असंतोष आहे, ह्याची जाणीव टँकरमालकांना होती. अशावेळी त्यांचा एकमेव आधार होता - माफिया गँग. त्या गँगला त्यांच्याकडून नियमित हप्ते जात होते. पोलिस व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ ठरली होती.

    पाण्याचे शास्त्रीय विश्लेषण

    बागायती पट्ट्यातून दिवसरात्र कोटी, सव्वा कोटी लिटर्स पाण्याचा उपसा होत होता. समुद्र आणि खाड्या जवळ असल्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिसळत होते. त्यामुळे पाण्याची चव बदलत होती. मात्र हे सर्व शास्त्रीय तपासणीने सिद्ध होणे आवश्यक होते. १९८७) साली मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाने आगाशी विभागातील विहिरींच्या पाण्याचे सर्वेक्षण करून, पाणी दुषित झाल्याचा निर्वाळा दिला. (एम.पी. पाध्ये गोगटे-के, सीता, इंडियन जिओग्राफर्स खंड ९, क्र. २ जुलै १९८७) तो अहवाल आमच्या दप्तरी होता.

    जागतिक जलतज्ज्ञ डॉ. विल्यम बार्बर ह्यांनी भारताला अनेकदा भेटी दिल्या होत्या.
    भारताच्या किनारपट्टीतील पाण्याचे त्यांनी शास्त्रीय विश्लेषण केले होते. त्यांनी सरकारला इशारा दिला होता की पाण्याचा उपसा थांबविला तरी, पाण्याची गुणवत्ता मूळ पदावर येण्यासाठी ३० ते ४० वर्षे लागतील! 'ग्राऊंड वॉटर बजेटिंग' (भूगर्भातील पाण्याचे नियोजन) ही संकल्पना त्यांनी रूढ केली. भारताचे पाणी शेतीच्या जागेत येऊ नये म्हणून
    समुद्रकिनाऱ्यावर बांध घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, 'खस' नावाच्या
    लव्हाळ्यासारख्या वनस्पतीची लागवड करावी. कारण ती भूगर्भातील आर्द्रतेचे रक्षण करीत असते, असा उपाय त्यांनी सुचविला ('द टाइम्स ऑफ इंडिया' १.५.१९८९)

    तालुक्यातील विहिरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी 'हरित वसई संरक्षण समिती'ने अहमदनगरच्या 'ॲक्शन फॉर फूड प्रॉडक्शन' (AFPRO) या संस्थेला बोलाविले. त्यांनी तालुक्यातील २१ निवडक विहिरींच्या पाण्याचे नमुने (Ramdom Survey)
    प्रयोगशाळेत तपासले. त्यांच्या मानांकानुसार २१ पैकी फक्त चार विहिरींचे पाणी पिण्यास योग्य होते, कारण त्याच्यातील क्षारांचे प्रमाण (Total dissolved Solids) ५०० पी.पी.एम.
    (Parts per million) च्या खाली होते. बाकी विहिरीत १५०० किंवा त्यापेक्षा जास्त क्षार होते. पाण्यात कोलीफार्म बॅक्टेरियांचे प्रमाण वाढले होते, तसेच फ्लॉरॉईड कॉन्सन्ट्रेशनने धोक्याची पातळी ओलांडली होती. (अफ्रोचा २९.०१.१९९१चा अहवाल). त्यानंतर
    १२ एप्रिल १९९३ या वर्षी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक वेळी पाण्याचा दर्जा खालावत असलेला आढळला.

    महिलांचे आंदोलन

    आम्ही 'हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून पाण्याच्या सर्वेक्षणाचे अहवाल तहसिलदारांना सादर केले आणि टँकर्सवर बंदी आणण्याची मागणी केली. त्यांनी २३.४.९१ रोजी आम्हांला पत्र पाठवून कळविले की, संध्याकाळी सात ते सकाळी सात या वेळात टँकर बंदी करण्याचे आदेश त्यांनी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत! बिल्डर लॉबी व समाज विघातक शक्ती ह्यांचा दबाव तहसीलदारावर होता. त्यामुळे त्यांनी अर्धवट आदेश काढला. टँकर मालकांनी दिवसाच्या फेऱ्या वाढविल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळे वाढले. परिणामी अपघात वाढले. पाण्याच्या बेसुमार उपशामुळे विहिरी कोरड्या पडत होत्या, शेती ओस पडत होती, गरीब शेतकरी हवालदिल झाले होते. पाण्याचा पोत बिघडला होता. त्यामुळे गृहिणी हैराण झाल्या होत्या.

    'हरित वसई समिती'मध्ये महिलांचा चांगला सहभाग होता. आम्ही 'पाणी बचाव
    महिला आंदोलन' संघटना सुरू केली. महिलांनी पाणी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. माफियाचा वरदहस्त लाभल्यामुळे टँकर लॉबी उन्मत्त झाली होती. त्यांनी तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून, पाणी उपसा सुरूच ठेवला. महिलांनी टँकर अडविण्यास सुरूवात केली.

    स्त्रियांना भीती, धाक, दहशत दाखविण्याचे प्रयत्न झाले. पोलिस व शासकीय अधिकारी त्यांना अटक करण्याची भाषा करू लागले. त्यामुळे महिला अधिकच चवताळल्या. त्यांनी पोलिसांना सांगितले, “कलेक्टर आल्याशिवाय आम्ही जागेवरून उठणार नाही.” महिला आपल्या निर्णयावर ठाम होत्या. 'टँकर अडविले जाणे' म्हणजे स्थानिक एकछत्री सत्तेला दिलेले आव्हान होते. हे लोण सर्वत्र पसरत गेले तर बिल्डिंग व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, हे माफियाने ओळखले.

    शासनाचे उचललेले पाऊल

    आंदोलन करणाऱ्या महिलांवर गुंडांनी हल्ला केला. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत झळकल्या. ठाण्याचे लोकहितदक्ष कलेक्टर श्री. शांताराम सगणे ह्यांच्या आदेशानुसार वसई तालुक्यातील विहिरींच्या पाण्याचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. बहुतेक विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा अहवाल आला कलेक्टरांनी आदेश देऊन अनेक विहिरींच्या पाण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. आंदोलनाला काही प्रमाणात यश आले.

    बिल्डर ही एक चतुर जमात आहे. सारे लोक झोपी गेले असता, त्यांचे टँकर्स चोरून पाण्याचा उपसा करू लागले. काही बिल्डरांनी जमिनीखालून पाईप लाईन टाकून पाण्याचा उपसा चालूच ठेवला. अजूनही काही ठिकाणी पाणी उपसा चालूच आहे. या अनिर्बंध उपशाला बिल्डरांप्रमाणे काही धनलोभी शेतकरीही जबाबदार आहेत. चार पैसे मिळतात म्हणून ते पाण्याची विक्री करतात. काही बिल्डर्स हिरव्या पट्ट्यातील आहेत. त्यांनी खुले आम आपल्या मालकीच्या जमिनीतून उपसा सुरू ठेवला आहे.

    पाण्याच्या अतीउपशामुळे पाण्याची पातळी (वॉटर टेबल) खाली जात आहे. क्षारांचे प्रमाण वाढत आहे. दूषित पाण्याच्या सेवनामुळे पोटाच्या आजारात वाढ झाली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढळून, निसर्गाची अपरिमित हानी होत आहे. पाणी बचाव आंदोलनाला १०० टक्के
    यश मिळाले नाही ही सल मनात आहे.

    फा. फ्रान्सिस दिब्रिटो

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

  • भारतीय शब्दकोषातील पंचांगे

    पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन…..

  • जागतिक चहा दिन (१५ डिसेंबर)

    पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
    चहाची कथा
    चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
    जागतिक चहा दिना निमित्ताने
    जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो... मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील.
    केस चमकदार राहतात.
    ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.
    ग्रीन टीचा वापर कसा करावा.
    केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
    जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात. डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
    सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी बॅ्ग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल. चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात. जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही. जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
    कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील. चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रेल्वेयार्ड व तेथील कर्मचारी

    लांब पल्ल्याची गाडी अखेरच्या स्टेशनात म्हणजे मुख्य स्टेशनात आल्यानंतर तपासणीसाठी व इतर छोट्या-मोठ्या दुरुस्तीसाठी ज्या ठिकाणी नेतात ते ठिकाण म्हणजे 'यार्ड'. यार्डात प्रत्येक डब्याची कसोशीनं तपासणी होते, स्वच्छता होते व ती गाडी परत परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते. या सर्व कामासाठी अनेक कर्मचारी फार कठीण परिस्थितीत यार्डात काम करीत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील माझगाव रेल्वेयार्डाच्या प्रसिद्ध झालेल्या समस्यांकडे पाहता येईल. काही वेळा कर्मचाऱ्यांना यार्डात जाण्यास योग्य रस्ता नसतो. ज्या रुळांवरून अनेक गाड्या वेगाने धावत असतात, त्या मार्गावरून जिवावर उदार होऊनच लाईन ओलांडावी लागते. त्यात भर म्हणून पावसाळ्यात वाढलेलं गवत, पाण्यानं भरलेले खड्डे यांचा सामना करावा लागतो आणि रात्रपाळीच्या कामगारांना तर ही सगळी कसरत काळोखातून करावी लागते. मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या खाली उभं राहून काम करण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं सर्व काम वाकूनच करावं लागतं. चाकं तपासण्यासाठी बाजूनं जाण्यासाठी पुरेशी जागाच नसते. या पासून कँटीन फार दूर असल्यानं कँटीनपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच चालावं लागतं आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दुपारचा डबा अपरिहार्यपणे उन्हात कुठेतरी झाडाखाली बसून खावा लागतो. माझगाव रेल्वेया मध्ये अतिशय गलिच्छ अशी एक छोटीशी पत्र्याची शेड एका गटाराजवळ बांधलेली आहे. अशा परिस्थितीत काम उत्तम त-हेनं करणं अशक्य होत चाललेलं आहे.

    मध्य रेल्वेच्या माटुंगा व वाडीबंदर या यार्डात डब्यांची मोठी दुरुस्ती केली जाते. तिथे दिवसेंदिवस सुट्या भागांची फार चणचण भासते आहे. शेवटी ठरावीक वेळात गाडी बाहेर काढणं आवश्यक असल्यानं 'इसकी टोपी उसके सर' या म्हणीप्रमाणे एका गाडीचे पार्ट्स दुसऱ्या गाडीला लावण्यावाचून पर्याय उरत नाही.

    मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून, त्या प्रमाणात सुट्या सामानाचा पुरवठाही होत नाही. तरीही, अजून तरी गाडी रुळांवर येताना तिच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही असं रेल्वे जनसंपर्क अधिकारी ठामपणे सांगतात. हे यश यार्डातील कर्मचाऱ्यांचं आहे.

    प्रवासीगाडी पुन्हा उत्तम स्थितीत आणून रुळांवर नेणं यामध्ये रेल्वे यार्डाची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामध्ये होणारी लहानशी चूकही प्रवाशांसाठी महागात पडते हेही तितकंच कठोर सत्य आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य