(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सोन्यातील गुंतवणुकीचे शास्त्र

    भारतात सोने गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत . गुंतवणूकदार सध्या ‘ सोने ‘ गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत . कोविड- १ ९ च्या साथीने जागतिक बाजार कोलमडला असताना जागतिक उत्पन्नातही निरंतर घट होत आहे .

      October 27, 2022


  • सप्टेंबर २० – पहिला एदिसा त्रिक्रम आणि अनिल दलपत

    २० सप्टेंबर १९८२ या दिवशी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासातील पहिला त्रिक्रम घडला. अधिकृत एदिसांच्या यादीतील हा १५८ वा सामना होता. स्थळ : नियाझ स्टेडीयम, हैदराबाद, सिंध (पाकिस्तान). कांगारू कर्णधार किम ह्युजेसने नाणेकौल जिंकून यजमानांना आमंत्रण दिले. निर्धारित ४० षटकांअखेर पाकिस्तानने ६ बाद २२९ धावा केल्या.

      September 18, 2010


  • श्री शिव नामावल्यष्टकम् – ३

    भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.

      August 7, 2020


  • श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर

    श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’  व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल.

      September 15, 2018


  • अरसिबो दुर्बिणीचा शेवट…

    दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

    १९६०च्या दशकात उभारल्या गेलेल्या या दुर्बिणीत आणि तिच्यावरील विविध उपकरणांत वेळोवेळी दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या गेल्या. परंतु, दुर्बिणीवरील सांगाडा तोलणारे दोरखंड हे काळानुरूप खराब होत होते. तसंच २०१४ सालच्या जानेवारी महिन्यातील भूकंपामुळे आणि २०१७ सालच्या चक्रीवादळामुळेही या दुर्बिणीच्या बांधणीवर परिणाम झाला होता. त्यानंतर या दुर्बिणीवरचा एक दोरखंड गेल्या ऑगस्ट महिन्यात एक आणि तर आणखी एक दोरखंड नोव्हेंबर महिन्यात तुटला. आता जर यापुढे आणखी दोरखंड तुटले तर पुर्ण सांगाडाच तबकडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच या अवस्थेतील दुर्बिणीची दुरुस्तीही शक्य नव्हती. त्यामुळे दुसरा दोरखंड तुटल्यानंतर, या दुर्बिणीचा वापर बंद केला जात असण्याची घोषणा, या दुर्बिणीची मालकी असणाऱ्या, अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन या संस्थेनं केली. त्याचबरोबर या दुर्बिण विविध भाग कसे वेगळे करायचे, याचा विचारही सुरू झाला. परंतु, दुर्बीण उतरवण्याचा हा विचार सुरू असतानाचा या दुर्बिणीवरली साधनं ज्यावर बसवली आहेत तो सांगाडा खालील तबकडीवर पूर्णपणे कोसळला व दुर्बिणीचं आयुष्यच संपुष्टात आलं.

    प्युर्तो रिकोवरील डोंगराळ भागातील एका घळीत उभारलेल्या या रेडिओ दुर्बिणीची बांधणी १९६३ साली पूर्ण झाली. त्यानंतरची पाच दशके ही दुर्बीण एकाच तबकडीचा वापर करणाऱ्या दुर्बिणींमध्ये सर्वांत मोठी दुर्बीण ठरली होती. या प्रचंड दुर्बिणीनं रेडिओ खगोलशास्त्रात मोठी कामगिरी केली आहे. बुध आणि शुक्राच्या पृष्ठभागाचे सविस्तर नकाशे याच दुर्बिणीद्वारे तयार केले गेले, तसेच बुधाचा स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा ५९ दिवसांचा काळही याच दुर्बिणींद्वारे मोजला गेला. स्पंदनांच्या स्वरूपात रेडिओलहरी उत्सर्जित करणाऱ्या, स्पंदक ताऱ्यांच्या जोडीच्या निरीक्षणांद्वारे गुरुत्वीय लहरींचा अप्रत्यक्ष पुरावा याच दुर्बिणीनं मिळवून दिला. स्पंदक ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध याच दुर्बिणीद्वारे सर्वप्रथम लावला गेला.

    रेडिओ खगोलशास्त्राच्या विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अरसिबो दुर्बिणीच्या निकामी होण्यानं खगोलशास्त्रज्ञ अत्यंत व्यथित झाले आहेत. कारण अरसिबो दुर्बीणीचा शेवट झाल्यानं खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळातील रेडिओस्रोत यांच्यात संवाद साधून देणारा एक महत्त्वाचा दूवा नष्ट झाला आहे!

    चित्रवाणी:

    https://www.youtube.com/embed/b3AASKr_iHc?rel=0

    -- डॉ. राजीव चिटणीस.

    छायाचित्र सौजन्य: SPACE.com / Twitter

      November 30, 2021


  • नाट्य-चित्र कानोसा – “७२ मैल-एक प्रवास”

    आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.

      August 19, 2013


  • रेल्वे अपघात : दोषी कोण

    आपल्या देशात आज अशी पिढी निर्माण झाली आहे, जी कुठल्याही कायद्याचे व नियमांचे पालन करत नाही. या पिढीला स्वत:च्या जीवाची सुद्धा चिंता नाही. परिणाम एकच, अश्या दुर्घटना होत राहतील. राजनेता एका-दुसर्यावर खापर फोडत राहतील. कुणाला तरी दोषी ठरवून, त्याच्यावर कार्रवाई होईल.  मुख्य कारण दूर करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही.

      October 23, 2018


  • मोबाईल लाईफस्टाईल

    अतिशयोक्ती वाटेल... पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे.... आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्‍याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल... “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. आजी आजोबांना विचारेल “अहो त्या लाल कॅप्सूल घेतल्या का?”.

    काही दिवसांपूर्वी ठाण्यातले प्रतिथयश आणि लोकप्रिय कार्डिओलॉजिस्ट डॉ. दयानंद कुंबळा यांच्या व्याख्यानाला हजर रहाण्याची संधी मिळाली. त्यांच्या डॉक्टर तुमच्या भेटीला या उपक्रमाद्वारे ते पेशंटना मोलाचे मार्गदर्शन करत असतात. २००२ पासून सुरु असलेला हा उपक्रम अव्याहतपणे दर महिन्यातून एकदा सहयोग मंदिराच्या सभागृहात पार पाडला जातो. आजपर्यंत अनेक नामांकित आणि मानांकित डॉक्टरांनी या कार्यक्रमातून ठाणेकरांशी संवाद साधला आहे.

    हे व्याख्यान शरीराची काळजी घेण्यासाठी फिटनेस, व्यायाम वगैरेबाबत होते. व्याख्यानाचा विषयच मुळात “Exercise - Good or Bad” असा होता. त्यामुळे उत्सुकता वाढली होती. अनेक नवीन गोष्टी शिकायलाही मिळाल्या.

    या विषयावरील व्याख्यानासाठी माझ्या मते आजच्या तरुण पिढीनेही उपस्थित असणे मला अपेक्षित होते. मात्र तरुण पिढीची अशा कार्यक्रमांबाबतची अनास्था बरेच काही सांगून जाते.

    आज आपण सर्व एका अशा लाईफस्टाईलचे घटक झालो आहोत की Activeness आपल्या आयुष्यातून हद्दपार होत आहे का अशी शंका यावी. कदाचित आज सर्वच गोष्टी आणि सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी अशा प्रकारच्या कार्यक्रमांपासून दूर रहात असावी. मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती नेहमीच विश्वसनीय असतेच असे नाही. त्याचप्रमाणे सध्या सोशल नेटवर्कस, WhatsApp वगैरे माध्यमातून कोणीही “अनाहूत, अनावश्यक सल्ले” अतिशय ठामपणाने मांडताना आणि शेअर करताना दिसतात. विषयाची संपूर्ण माहिती न घेता केवळ फॉरवर्ड करणे ही सध्याची एक मोठी समस्या आहे. अनेकदा या फॉरवर्ड करण्याच्या नादात अक्षरश: वर्षभरापूर्वीचे मेसजही नवेच आहेत असे समजून फॉरवर्ड केले जातात. यातून बर्‍याचदा अनावश्यक समस्याही उदभवलेल्या आहेत. अमूक एका रुग्णाला तातडीने रक्त हवे आहे वगैरेसारखे मेसेज बर्‍याचदा जुने असतात. असो... विषयांतर नको.

    आज आपण ज्या मोबाईल किंवा रिमोट लाईफस्टाईलचे बळी झालो आहोत त्यामुळे एकूणच आपली चालण्या-फिरण्याची (Physical Movements) गरज कमी झाली आहे. तरुण काय किंवा प्रौढ आणि वृद्ध मंडळी काय... ही तर सगळ्यांचीच समस्या आहे.

    पूर्वी टीव्ही लावायला किंवा चॅनेल बदलायला उठून टिव्हीपर्यंत जायला लागायचे. आता हेच काम रिमोटने होते. पूर्वी जाते किंवा पाटा वरवंट्याचा वापर होत असे, आता सगळीकडे मिक्सर आणि फूड प्रोसेसर आले. पूर्वी मनोरंजनासाठी आजोबा-आजी लहान मुलांना बागेत घेउन जात असत. आता तेच आजोबा-आजी टिव्हीसमोर बसून सिरियल्स बघत असतात आणि नातवंडं मोबाईलमध्ये गर्क असतात. पूर्वी वाण्याकडे किंवा भाजी आणायला निदान एकतरी फेरी घराबाहेर व्हायची. आता मात्र सगळीकडेच होम डिलिव्हरीचा जमाना आलाय त्यामुळे बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही. पूर्वी निदान महिन्यातून एक-दोन वेळा तरी बॅंकेत पैसे काढायला भरायला जावे लागे. विजेची किंवा दुरध्वनीची बिले भरायला जावे लागे. आता बिले भरणं इंटरनेटवरुनच होतं आणि रोख रक्कम अभावानेच लागते कारण सगळी कामं कार्डावरच होतात.

    आता तर अगदी सगळीच कामे मोबाईलवरुन होतील अशी व्यवस्था जन्माला आलेय. टिव्हीचं सोडा.. पण पंखा, दिवे लावणं आणि बंद करणं आणि इतकंच कमी म्हणून पडदे वगैरे उघडणं, बंद करणं हेसुद्धा मोबाईलवरुनच करायची सोय झाली आहे. यावर कळस म्हणजे घराची बेल वाजल्यावर कोण आलंय ते मोबाईलवरच बघा आणि मोबाईलवरचंच बटण दाबून दरवाजाही उघडा... खिडक्यांचे पडदेही रिमोटने उघडण्याइतकं तंत्रज्ञान प्रगत झालंय.

    डॉक्टर कुंबळांचं व्याख्यान संपल्यावर सहज विषय निघाला. तंत्रज्ञानाने माणसाला आळशी बनवलं आहे का? माझ्या मते थोडंफार आळशी बनवलं आहे. डॉक्टरांच्या मते मात्र हा आळस आत्ताच झटकला नाही तर मात्र कठीण आहे. दवाखान्यांची पायरी जवळंच आहे. नव्या तंत्रज्ञानाचा हा महिमा आहे. जितकं चांगलं आहे तेवढंच वाईटही. तेव्हा काय करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे.

    -- निनाद प्रधान

      September 25, 2015


  • भगवान श्री गौतम बुद्घ

    माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
    कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।

    गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
    दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।

    दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
    भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।

    बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
    नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।

    उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
    शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।

    प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
    मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।

    गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
    ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।

    ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
    धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।

    सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
    चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।

    धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
    घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।

    गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
    लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।

    कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
    प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।

    केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
    प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।

    बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
    अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।

    कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
    परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।

    मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
    ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।

    साधू संत जमती कांही भविष्य जाणती
    आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।

    हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
    विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।

    बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
    पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।

    बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
    संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।

    न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
    महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।

    जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
    न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।

    सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
    विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।

    राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
    बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।

    नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
    बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।

    राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
    सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।

    दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
    एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।

    सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
    न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।

    सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
    लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।

    उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
    प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।

    आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
    विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।

    उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
    दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।

    माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
    जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।

    जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
    निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।

    सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
    लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।

    रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
    उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।

    तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
    लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।

    नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
    सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।

    उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
    सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।

    त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
    मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।

    हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
    परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।

    सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
    तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।

    म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
    दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।

    सर्वची सोडोनी गेला तो वनीं
    एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।

    निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
    तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।

    एकाग्र करुनी मन लावले ध्यान
    केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।

    अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
    सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।

    अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
    रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।

    शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
    भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
    षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।

    संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
    सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।

    फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
    तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।

    नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
    तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।

    मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
    मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।

    अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
    तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।

    तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
    आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।

    सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
    आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।

    बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
    अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।

    गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
    महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।

    बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
    जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    १७- १०११-८३

      January 17, 2018


  • मृत्यूनंतरही अवयवदानाने जिवंत राहा

    आपण जीवनभर इतरांच्या उपयोगी पडत असतो. आपण मृत्यूनंतरही इतरांच्या उपयोगी पडू शकतो. त्यासाठी उपाय आहे अवयवदान किंवा देहदान!
    आपल्या मृत्यूनंतर आपले , चांगल्या स्थितीत असलेले अवयव , दुसऱ्याला दान करण्याची किंवा संपूर्ण मृतदेह दान करण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. त्याबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.

      March 2, 2026