वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
टाइम्स हायर एज्युकेशन' या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करणा-या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2017-18 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही.
देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.
‘टाइम्स’ या संस्थेकडून दरवर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. यावर्षी संस्थेने 77 देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून मंगळवारी जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत आॅक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर 27 देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या 200मध्ये आहे. मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होवू शकलेला नाही.
एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ 42 संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या 300 संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.
देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संयुक्तपणे सातवा क्रमांक पटकावला असून पारंपारिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर होते. यंदा विद्यापीठाने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाला मागे टाकले आहे. जागतिक पातळीवर पुणे विद्यापीठ 601 ते 800 या क्रमावारीत आहे. या क्रमवारीत देशातील एकूण 11 विद्यापीठांचा समावेश आहे. मागील वर्षीही याच क्रमवारीत विद्यापीठाला स्थान मिळाले होते.
यंदा विद्यापीठाला एकूण 30.6 गुण मिळाले असून, एकूण कामगिरीचा विचार करता विद्यापीठाच्या गुणांकनात यंदा काहीशी सुधारणा झाली आहे. आशियाई देशांमध्ये विद्यापीठ 161 ते 170 या क्रमवारीत असून ब्रिक्स व विकसनशील देशांच्या यादीत 143वे स्थान मिळाले आहे. पुणे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही पारंपरिक विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा जगातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही.
अध्यापनात चौथ्या स्थानी-
संशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे राहिले असले तरी अध्यापनात मात्र विद्यापीठाने देशात चौथे स्थान मिळविले आहे. तर पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात अव्वल ठरले आहे. अध्यापनात विद्यापीठाला 38.9 गुण मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. आयआयएस (बंगळुरू), आयआयटी मुंबई व दिल्ली पाठोपाठ विद्यापीठाचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, उद्योगांशी सांगड याबाबतीतही विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे.
संशोधनात तळाला-
सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एकुण कामगिरीत देशात सातवा क्रमांक मिळविला असला तरी संशोधनात मात्र हे विद्यापीठ तळाला गेले आहे. देशात संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ 41व्या क्रमांकावर घसरले आहे. ‘टाइम्स’ने दिलेल्या गुणांकनामध्ये मागील दोन वर्षात जवळपास निम्म्याने घट झाली आहे. यावर्षी विद्यापीठाला केवळ 7.2 गुण मिळाले आहेत.
देशातील संस्थांची क्रमवारी ( टाइम्स क्रमवारी)-
१. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स, बंगळुरू (251-300)
२. आयआयटी, मुंबई (351-400)
३. आयआयटी, दिल्ली (501-600)
४. आयआयटी, कानपूर
५. आयआयटी, खरगपूर
६. आयआयटी, रुरकी
७. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (601 ते 800)
September 30, 2017
श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
January 10, 2018
सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.
एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.
रक्तदाबाचे प्रकार
अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.
साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.
अनुषंगिक अति रक्तदाब (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.
अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)
ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :
कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.
क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.
ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.
ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.
इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. गजानन रत्नपारखी
January 9, 2017

शिवमहिम्न स्तोत्र – भाग ४ मराठी अर्थासह
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः ।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम् ।।३५।।
मराठी- सदाशिव सोडून दुसरा (कोणीही श्रेष्ठ) देव नाही. महिम्न स्तोत्राहून अन्य (कोणतेही श्रेष्ठ) स्तुतीस्तोत्र नाही. अघोर मंत्राहून दुसरा श्रेष्ठ मंत्र नाही. गुरू (शिव) पेक्षा श्रेष्ठ असे दुसरे तत्त्व नाही.
सर्वश्रेष्ठ शिव स्थानी, श्रेष्ठ स्तोत्र महिम्न से ।
अघोरापरि ना मंत्र, श्रेष्ठ तत्त्व गुरू असे ॥ ३५ ॥
टीप- शैव उपासकांमध्ये – ‘ॐ अघोरेभ्योऽथ घोरेभ्यः घोर घोरतरेभ्यः सर्वतः सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रुपेभ्यः’ हा अघोर मंत्र प्रचलित आहे. काही अभ्यासकांच्या मते ‘ ॐ नमः शिवाय ’ हा अघोर मंत्र आहे.
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।
महिम्नः स्तवपाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।३६।।
मराठी- (गुरूंकडून) घेतलेला उपदेश, (केलेला) दानधर्म, शरीर कष्टवून केलेली तपस्या, तीर्थयात्रा, अभ्यासातून मिळवलेले ज्ञान, होमा हवन इत्यादी कर्मे ह्या सार्या गोष्टी महिम्न स्तोत्र पाठाच्या सोळाव्या कलेच्याही योग्यतेच्या नाहीत.
तपस्या दान वा तीर्थे होम अभ्यास कर्मही ।
पासंगा न पुरे पाठा महिम्नाच्या कलेसही ॥ ३६ ॥
टीप- कला म्हणजे एक सोळांश भाग. चंद्राच्या प्रतिपदा ते पौर्णिमा अशा १५ आणि सोळावी अमावास्या.
कुसुमदशननामा सर्वगन्धर्वराजः
शिशुशशधरमौलेर्देवदेवस्य दासः।
स खलु निजमहिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्
स्तवनमिदमकार्षी दिव्यदिव्यं महिम्नः ।। ३७।।
मराठी- ज्याच्या मस्तकी बालचंद्र आहे असा देवांचा देव शंकर. गंधर्वांचा राजा पुष्पदंत त्याचा दास (होता). खरोखर, त्याच्या (शंकराच्या) क्रोधाने (तो पुष्पदंत राजा) आपल्या अधिकारपदापासून पिटाळला गेला. तेव्हा त्याने या अत्यंत दिव्य स्तोत्राची रचना केली.
सुरगण-गवयांचा भूप त्या पुष्पदंता
शशिशिखर शिवाचा क्रोध हो चूक होता ।
नृपपद हटवीले स्थान गेले तयाचे
रचुन शिवमहिम्ना धन्य तो दिव्य साचे ॥ ३७ ॥
सुरवरमुनिपूज्यं स्वर्गमोक्षैकहेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्यचेताः ।
व्रजति शिवसमीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम् ।। ३८।।
मराठी- जो कोणी मनुष्य हात जोडून आणि एकाग्र चित्त होऊन स्वर्ग आणि मोक्षाचे एकमेव साधन असलेले, पुष्पदंताने रचलेले, स्वर्ग आणि मोक्षाचे अमोघ साधन असलेले हे स्तोत्र पठण करतो, तर किन्नरांकडून स्तुती केला गेलेला तो शिवाच्या जवळ पोचतो.
सुर-मुनि स्तुति चाले, लाभती स्वर्ग-मुक्ती
कर मन जुळवोनी भक्त जे स्तोत्र गाती ।
हयमुख स्तुति गाती, शंभु सन्नीध नेती (हयमुख- घोड्यासारखे तोंड असणारे, तुंबरु, किन्नर)
शिव स्तुति रचली ही भक्तिनें पुष्पदंती ॥ ३८ ॥
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्वभाषितम् ।
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम् ॥ ३९ ॥
मराठी- असे हे गंधर्वाने रचलेले (सुरुवातीपासून) शेवटपर्यंत पावन, अनुपम, आनंददायी, शंकराच्या वर्णनाचे स्तोत्र पूर्ण झाले.
पूर्ण झाली स्तुती रम्य, सुरगायक गातसे ।
अतुल्य शिवरूपाचे त्यात वर्णन जे असे ॥ ३९ ॥
त्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः ।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः ।।४०।।
मराठी- ही अशी शब्दरूपी पूजा (मी) भगवान शंकराच्या पायावर वाहिली आहे. या पूजेने तो महेश माझ्यावर संतुष्ट होवो.
शब्दांची ही अशी पूजा वाहिली मी शिवापदी
तेणे संतुष्ट होवो तो भूतनाथ मजप्रती ॥ ४० ॥
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर ।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ॥४१॥
मराठी- हे शंकरा, तुझे खरे स्वरूप मला ठाऊक नाही. तू कसा आहेस (हेही ठाऊक नाही). तुझे स्वरूप जसे आहे, तशाच तुझ्या रूपाला माझा पुनः पुनः नमस्कार !
तुझे रूप नसे ठावे, कसा आहेस शंकरा ।
आहेस तुजला जैसा, प्रणाम मम साजरा ॥ ४१ ॥
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपापविनिर्मुक्तः शिवलोके महीयते ॥४२॥
मराठी- जो मनुष्य दिवसातून एकदा, दोनदा वा तीनदा या स्तोत्राचे पठण करील तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात महान होईल.
एकदा दोनदा किंवा तीनदा स्तोत्र गायने ।
शिवलोकी थोर होई, पापनाशार्थ कारणे ॥ ४२ ॥
श्रीपुष्पदन्त-मुखपङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्विषहरेण हरप्रियेण।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः ।।४३।।
मराठी- – श्री पुष्पदंताच्या मुखकमलातून निघालेले, पापांचा नाश करणारे व शिवाला प्रिय असणारे हे स्तोत्र जो मुखोद्गत करून एकाग्र चित्ताने पठण करील, त्यावर भूताधिपती महादेव प्रसन्न होईल.
श्रीपुष्पदंत वदनांबुज दिव्य गीता
जे दोष नाश करिते, प्रिय भूतनाथा ।
गाती मुखोद्गत तसे प्रतिबद्ध चित्ता
त्यासी प्रसन्न शिवशंकर मुक्तिदाता ॥ ४३ ॥
इति शिवमहिम्न स्तोत्रम् ।
*************************
-- धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
August 25, 2022

कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड' म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत:
१. फ्लॅट: ज्या जागी साधारण प्रत्येक दिवशी ५०० डबे जोडले जातात.
२. हम्प: या जागी ५००० डबे प्रत्येक दिवशी जोडले जातात.
या मार्शलींग यार्डांमध्ये उंच मार्गावरून डबे त्यांच्या मूळ वजनांमुळे खाली आणले जातात. त्यामुळे अर्थातच ते हलवण्याकरता होणाऱ्या खर्चात बचत होते. परंतु अशा ठिकाणी जागा भरपूर मोठी असावी लागते.
एके काळी मुगलसराई (वाराणसीपासून १९ कि.मी. अंतरावरील स्टेशन) हे आशियातील सर्वांत मोठं मार्शलींग यार्ड होतं. आता टर्मिनल यार्डस् जास्त प्रमाणात आहेत, जिथे एका स्थळाहून दुसऱ्या ठरलेल्या स्थळाकडे मालगाड्या जातात. उदाहरणार्थ, वाडीबंदर (मुंबई) पासून ते थेट शालीमार (कलकत्ता) येथपर्यंत मालगाड्या जाऊन पोहोचतात. यामुळे सर्व माल लवकर पोहोचण्यास मदत होते.
मालगाड्यांचं प्रवासी गाड्यांसारखं पक्कं छापील टाईम टेबल नसतं, परंतु त्यांना वेगळा क्रमांक व नावं असतात. त्यावरून त्या ओळखल्या जातात. कोणत्याही मधल्या स्टेशनावर थांबा नसल्यानं त्या चांगल्या वेगात जातात. रेल्वेचं उत्पन्न या माल पोहोचविण्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असल्यानं या गाड्यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. रशियामध्ये मालगाड्यांचं महत्त्व मेल एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
August 30, 2022
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 21, 2018
नाम घ्या श्री हरीचे......
गजर करणे, जयजयकार करणे म्हणजे देवाचे नाव घेणे, त्याला हाक मारणे, आणि त्याला आपली सतत आठवण करून देणे.
या अन्नप्रार्थनेमधे खूप मोठा अर्थ सामावलेला आहे.
तू दिलेल्या वाचेने, तुझे नाम अगदी सहजपणे मी घेतोय, त्यासाठी कोणतेही मोल मला द्यावे लागत नाही. तुच दिलेले अन्न सेवन करतोय, पोटात ढकलतोय, आता पुढची जबाबदारी हे दयाघना, आता तू स्विकार !
कारण भगवंता, तूच गीतेमधे सांगितले आहेस,
अहं वैश्वानरो भूत्वां
प्राणीनां देहमाश्रितम ....
"*मीच* जठराग्नि आहे. चारही प्रकारचे अन्न मीचपचवतो. (तुम्ही फक्त माझ्यापर्यंत आणून पोचवा.) तुमच्या कर्मसिद्धांतानुसार मीच त्याचे योग्य ते फळ, योग्य त्या वेळी देणार आहे. आणि या मिळणार्या फळाची आसक्ती न ठेवता, तू तुझे कर्म केवळ कर्तव्य म्हणून करीत रहा."
तुझ्याशिवाय हे अन्न पचवणारा कोण आहे ? हा भाव मनी ठेवावा.
हे खरेच आहे.
आपण फक्त अन्न खातो. त्यापासून लाल रंगाचे रक्त तयार करणे, घट्ट असलेले मांस हाडे यांची निर्मिती करणे, मातृस्तनी पांढरे दूध निर्माण करणे, पाण्याच्या रंगाचे मूत्र बाहेर काढणे, इ. सर्व नियंत्रित करणारी एक शक्ती आहे,
(तिलाच आध्यात्मिक भाषेत ईश्वर आणि आयुर्वेदीय भाषेत अग्नि असे म्हणतात.)
आणि हे सर्व आपल्याच पोटात चालले आहे, याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नसणे हेच, त्याच्या अस्तित्वाचे लक्षण आहे. अदभुत यंत्र आहे हे शरीर ! म्हणूनच तर समर्थ म्हणतात, "या शरीरासारीखे दुसरे यंत्र नाही "
हे शरीर त्याने एवढे गुंतागुंतीचे बनवले आहे, पण प्रत्येक स्पेअर पार्टचे काम अगदी चोख.
कशासाठी हे अन्न मी सेवणार? याचा विचार अन्न घेत असताना व्हायला हवा. माझ्या आहाराने मला शक्ती मिळते आहे, आणि ही देहशक्ती मला देशभक्ती वाढवण्यासाठी वापरायची आहे, हेच माझ्यासाठीचे जीवन कर्म असेल,
उदरभरण नोहे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ही देवाला दिलेली जणुकाही आहुतीच आहे, माझ्या मीपणाची, अहंकाराची, आहुती मी या यज्ञात हवन करतोय, असा भाव निर्माण करणारी बुद्धी, याच अन्नातून निर्माण होणारी आहे, ती उत्तम गुणी बुद्धी फक्त तू मला दे ! हा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून तू स्वतःच अन्नरूप ब्रह्म आहेस !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
05.09.2016
September 5, 2016
चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे ।
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात,
चन्द्रोदभासितशेखरे - मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक.
स्मरहरे - स्मर म्हणजे भगवान मदन. श्रीशंकरांनी मतदानाचे दहन केल्यामुळे त्यांना स्मरहर म्हटले आहे.
गड्गाधरे - मस्तकावर गंगा धारण करून संपूर्ण जगाच्या पावनतेची धुरा ज्यांनी आपल्या मस्तकावर घेतली आहे असे,
शंकरे - शम् म्हणजे कल्याण. संपूर्ण विश्वाचे कल्याण करतात ते भगवान शंकर. सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे - ज्यांनी गळ्यात मोत्यांच्या माळांप्रमाणे आणि कानात कुंडलां प्रमाणे सर्प धारण केले आहेत असे.
नेत्रोत्थवैश्वानरे - ज्यांच्या तृतीय नेत्रातून विश्व विनाशकारी प्रलयाग्नी प्रगट होतो असे,
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे - दंती म्हणजे हत्ती. त्याची त्वचा म्हणजे कातडे ज्यांनी वस्त्र प्रमाणे गुंडाळले आहे असे. गजासुर नावाच्या राक्षसाला सोबत झालेल्या संग्रामाचा इथे संदर्भ आहे.
त्रैलोक्यसारे- संपूर्ण त्रैलोक्याचे सार असणाऱ्या,
हरे- भक्तांची दुःखे दूर करणाऱ्या,
मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः - हे भगवान शंकरा ! माझ्या मोक्षासाठी कारणीभूत ठरणारी माझी वृत्ती निर्मल करा. अन्य स्तवनाचा अर्थात मागणीचा उद्देश तो काय?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 31, 2020
मद्रासमधील चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत दोघांचे सूर जुळले व राजा परांजपे यांचे सोबत तो तरुण पुण्याला आला व त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातून सहायक दिग्दर्शक म्हणून त्याने चित्रपट सृष्टीतील ‘श्रीगणेशा’ केला… तो तरुण म्हणजेच आज नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक, ऋषितुल्य राजदत्तजी!!!
April 2, 2023
प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥
पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे.
भगवंताचे नाम ही भक्ताची सर्वात आवडती गोष्ट. नामाच्या आधारे नामी पर्यंत पोहोचणे हे साधनेचे वर्म.
प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री आई लालितेच्या विविध नावांचा विचार प्रस्तुत करीत आहेत.
आरंभी स्मरण, त्यानंतर वंदन आणि आता नामोच्चारण.
बौद्धिक स्तरावर स्मरण, मानसिक स्तरावर वंदन आणि शरीराच्या मुखाने सातत्याने नामोच्चारण अशी ही रचना.
त्यासाठी आचार्य म्हणतात,
प्रातर्वदामि- मी सकाळी बोलतो. नाम घेतो.
वचसा- वाणीने.
ललिते - हे आई ललितांबे !
तव पुण्यनाम- तुझी पुण्यदायक नावे.
कोणकोणती आहेत ही नावे? तर
कामेश्वरी- सकल कामनांची ईश्वरी. अर्थात भक्तांच्या सकलं कामना पूर्ण करणारी.
कमला- कमळामध्ये निवास करणारी. कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्ती असणारी. ती वृत्ती प्रदान करणारी.
महेश्वरी- महेश्वराची सहलीलाचारीनी.
श्रीशाम्भवी- शंभू अर्थात भगवान शंकर. शम् म्हणजे कल्याण. तर भू म्हणजे निर्माण होणे. ज्यांच्या चरणाशी जगाचे कल्याण निर्माण होते ते शंभू. त्यांची चैतन्यशक्ती ती शंभूची शांभवी.
जगतां जननी - सकल विश्वाची जननी. आदिशक्ती. मूळमाया.
परा- परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ.
परा हा एक वाणी चा प्रकार देखील आहे. चौथ्या प्रकारच्या या वाणीत साधकाला अखंड ओंकार नाद ऐकू येतो. तो ओंकार आईचे स्वरूप आहे .
वाग्देवता- वाणीची देवता. जगातील सर्वच पशूंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवाज काढता येतो. त्यांना देखील ध्वनी आहे. पण त्यांना वाणी नाही. त्यांना आपल्या मनातील सर्व भावना पाहिजे तशा बोलता येत नाही. वाणी हे माणसाचे वैभव आहे. आई ललिता त्या वाणीची देवता आहे. सोप्या शब्दात ती आपल्याला मनुष्यत्व प्रदान करणारी आहे.
त्रिपुरेश्वरी- या आई जगदंबा ललितेची उपासना श्री त्रिपुरसुंदरी रूपात केली जाते.
त्रिपुर शब्दाचा अर्थ स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. तर देहाच्या बाबतीतला अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या सगळ्यांची स्वामिनी.
सकाळी मी वाणीने तिचे भजन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti