वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजकाल खळखळून हसणे आढळत नाही. सभ्यतेच्या कृत्रिम बुरख्यामुळे माणसाची झोप आणि चैन हरवून गेली आहे. स्वतःला अतिव्यस्त केल्यामुळे त्याच्याजवळ कोणत्याही कामासाठी वेळ नाही. चुकून जर कधी वेळ मिळालाच तर ताण-तणाव चिंता-विवंचनेतच तो खर्च होतो.

जगात दोन प्रकारची माणसे सापडतात…
पहिली असतात फक्त रडतखडतच जगणारी..
अगदी बचपनसे बुढापे तक..
ही लोक भरभरुन जगणं कधी समजूच शकत नाहीत..
अगदी मरेपर्यंत..
यांच्या अगदी विरुद्ध जगणारे लोकही असतात..आहेत..
जिवनाच्या प्रत्येक स्टेजमधे ते जगाला फाट्यावर मारुन जगतात…अगदी..अर्धी लाकडं 'वैकुंठा'ला पोचली तरीसुद्धा..(विनोद पुण्या बाहेरच्या लोकांनाही कळेल म्हणून टाकलाय बरं..)
तर या दुसऱ्या जातकुळीतल्या लोकांसाठी हे गाण बनलय..हे लोक आपलं आयुष्य उतारवयातही मजा करत घालवतात...म्हणजे 'गळ' टाकतात..फ्लर्ट करतात..प्रेमात पडतात..
ही माणसं अगदी मुन्नाभाई एम बी बी एस मधल्या गाण्यासारखे..'बचे चार आणे..वेस्ट न करना यार..' असे ठणकावून सांगणारे..अन 'डंके की चोटपर' तसे वागणारेही..
शौकीन मधले तीन म्हातारडे असलेच अवलिये आहेत..
(होते म्हणवत नाही,तिघे काळाच्या पडद्याआड गेले तरी)
अशोक कुमार, ए.के.हंगल आणि (अच्छाs)उत्पल दत्त..
आपापल्या इलाक्यात गुलहौशीपणा करणारे तीन मित्र..
ए के हंगल हा बिझनेसमन आहे आणि आपल्या सेक्रेटरीलाच पटवायचा प्रयत्न करतोय..
उत्पल दत्त घरमालक आहे व विधवा भाडेकरु बाईवर जाळे टाकतोय..
आणि आपले दादामुनी…
रोज घरासमोरुन जाता येता दिसणाऱ्या फटाकडीला डोळे भरुन पाहतात.. दुरुनच.'चंदा को चकोर निहारे' हे गाण्यातले वाक्य या सिनसाठीच..
तर असे हे तिघे शौकीन..खरं तर आंबट शौकीनच..
जीवाचा गोवा करायला निघतात. एका गोड तरुण पोरीला पटवायसाठी (हाय..हाय...रती अग्निहोत्रीss) काय काय उद्योग करतात हे या सिनेमात दाखवलाय.
अर्थात सिनेमाची सगळी स्टोरी सांगणार नाही कारण हा लेख यातल्या गाण्यावर आहे..पण नमनाला घडाभर तेल यासाठीच की पार्श्वभूमी माहित असेल तर गाणे बघताना पटकन रिलेट होईल..
हे गाणे मी हा सिनेमा दूरदर्शनवर रात्री पाहिला तेंव्हा पहिल्यांदा ऐकले..अन त्याच्या प्रेमात पडलो..
परदेशी गेलेल्या मैत्रीणी प्रमाणे अनेक वर्ष हे गाणे फक्त मनात राहिले..कारण रेडिओवर हे फार वाजत नाही..
तेंव्हा युट्यूब आणि गाण्याला वाहिलेले साइट्स नव्हते..
तीन चार वर्षापूर्वी परत गाणं शोधून काढलं..
अन पुन्हा या गाण्याच्या प्रेमात पडलो..
गीतकार योगेश हा माणूस दिग्दर्शक बासू चॅटर्जीचा आवडता..पण यात संगीतकार म्हणून सलीलदांऐवजी आर.डी..आणि गाणे गायला किशोरकुमार..
आहाहा..
मग काय म्हणता...अशी मस्त भट्टी जमलीय..
की इथे पिउन उठणारा फुल्ल टाईटच..
एकतर योगेशजींनी हे गाणं इतकल चपखल लिहिलय की बस्स..आंबटशोकीन म्हाताऱ्यांची मनोवस्था बरोबर पकडलीय त्यांनी. आर.डी.ने खरे तर वडिलांच्याच एका बंगाली गाण्यावरुन ही चाल बेतलीय म्हणे.. (मेरे बापका माल है..तेरेको क्या..?)पण या गाण्यासाठी चाल इतकी भारी जमलीय की यंव रे यंव..
आणि त्यात त्याने मधला अंतऱ्यातला जो जिवघेणा म्युझीक पिस टाकलाय की प्रत्येकवेळेला मी ऐकताना मी मागे जाउन तो पुन्हा ऐकतो..आई.ग..ss
आणि किशोरदानचे तर काय सांगावं…
आमच्या सांगली कोल्हापूरच्या भाषेत 'जाळ आणि धुर संगाटच'..! एकतर किशोरच्या आवाजातल्या गाण्यात अशोककुमार डान्स करताहेत हा दुग्धशर्करा योग या गाण्यात आलाय..किशोरदाने इतक तब्येतीत गाणे गायलय की बस्स..आपण फक्त म्हणायचं..मजा आ गया..
तर असे हे गाणे..
किशोर-आर डी च्या 'बडव्यां'ना नक्कीच माहित असणारे..पण हा लेख प्रपंच इतर वारकऱ्यांसाठी आहे..
बघा मग गाणं...लिंक देतोय..
ता.क- हे गाणे ऐकून दादामुनी इस्टाईल नाचावेसे वाटल्यास ते काम घरात न करता बिल्डींगच्या टेरेसवर करावे.. लॉकडाउन मुळे घरीच असणाऱ्या बायका पोरांना (आणि शेजारणींना) फेफरं यायला नको..
इत्यलम..!
-- सुनील गोबुरे.

सध्या गड-कोट – किल्ले ह्यासंबंधी खूपच कुतूहल वाढलेले आहे. ह्याठिकाणी पर्यटकांची रीघ लागलेली आहे आणि हे उत्तमच आहे. अगदी त्याचप्रमाणे पर्यटकांची लेण्यांकडेही रीघ लागू दे, अर्थात अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आदी लेण्यांकडे रीघ आहेच. पण छोट्या छोट्या उपेक्षित लेण्यांकडेही रीघ लागू दे…
व्हेगन डायट. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात.
गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे.
कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात.
भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
अष्टलक्ष्मीस्तोत्रम् हे स्तोत्र १९७० च्या आसपास श्री श्रीनिवास वरदाचारियर स्वामी यांनी रचलेले आहे. या स्तोत्रात लक्ष्मीची विविध आठ रूपे वर्णन केली आहेत. त्याची रचना दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) (२३अक्षरे) या वृत्तात केली आहे. तथापि ती काही श्लोकात थोडीशी विस्कळित वाटते. काही ओळीत अक्षरांची संख्या कमी जास्त झालेली तसेच लघु-गुरु क्रमही बदललेला दिसतो. शब्दांची आणि कल्पनांची पुनरावृत्ती जाणवते. असे वाटते की हे सर्व श्लोक वेगवेगळ्या वेळी एक एक रचून नंतर ते एका स्तोत्राच्या स्चरूपात गठित केले असावेत.
अष्टलक्ष्मी मंदिरे मुख्यत्त्वे दक्षिण भारतात व परदेशातही अनेक ठिकाणी आहेत.
आदिलक्ष्मी
सुमनसवन्दित सुन्दरि माधवि, चन्द्रसहोदरि हेममये
मुनिगणमण्डितमोक्षप्रदायिनि, मञ्जुळभाषिणि वेदनुते ।
पङ्कजवासिनि देवसुपूजित, सद्गुणवर्षिणि शान्तियुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, आदिलक्ष्मि परिपालय माम् ।। १ ।।
मराठी- सज्जन लोक जिला नमन करतात, अशा रूपमती, माधवाची पत्नी, चंद्राची बहीण असलेल्या, सुवर्णमयी, मुनिजनांचे जिला कोंदण लाभते, जी (भक्तांना) मोक्ष देते, जिचे बोलणे मृदु आणि सौम्य आहे, वेद जिची स्तुती करतात, जिचे वास्तव्य कमळात आहे, देवगण जिची पूजा करतात, जी (आपल्या भक्तांवर) सद्गुणांचा पाऊस पाडते, शांतीने परिपूर्ण असणार्या मधुसूदनाच्या भार्ये आदिलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
सुजन प्रणाम, सुरेख रमेस, शशीभगिनीस, सदा करिती
कनकमयी, मुनि-कोंदण, मुक्ति प्रदा, मृदु बोल, श्रुती स्तविती ।
कमलनिवास, करी बरसात गुणां सकलांप्रति, शांत अती
हरिसहचारिणि आदिसुधे जय हो तव राख मला जगती ॥०१॥ (सुधा – लक्ष्मी)
धान्यलक्ष्मी
अहिकलिकल्मषनाशिनि कामिनि, वैदिकरूपिणि वेदमये
क्षीरसमुद्भवमङ्गलरूपिणि, मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते ।
मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि, देवगणाश्रित पादयुते
जयजय हे मधुसूदनकामिनि, धान्यलक्ष्मि परिपालय माम् ।। २ ।।
मराठी- हे कलियुगातील दोषांचा नाश करणार्या, जी वेदस्वरूप आहे, जिने सर्व वेद व्यापून टाकले आहेत, जी क्षीरसागरातून बाहेर आली आहे, जिचे रूप मंगल आहे आणि जी सर्वांचे मंगल करते, जिचा निवास मंत्रात आहे आणि मंत्रच जिची प्रशंसा करतात जी कमळात रहाते आणि जिच्या पायी सर्व देव आश्रय घेतात अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
कलियुग दोष निवारक, वेदस्वरूप, श्रुतीमय, पावन ती
पयधिसुते, घर अम्बुज, मंत्र, तुझीच ऋचा करितात स्तुती ।
सुरगण आश्रय घेत पदी तव, पावन करण्या सक्षम ती
हरिसहचारिणि धान्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०२॥
धैर्यलक्ष्मी
जयवरवर्णिनि वैष्णवि भार्गवि, मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये
सुरगणपूजित शीघ्रफलप्रद, ज्ञानविकासिनि शास्त्रनुते ।
भवभयहारिणि पापविमोचनि, साधुजनाश्रितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धैर्यलक्ष्मि परिपालय माम् ।। ३ ।।
मराठी- जी (भक्तांना) विजयाचे वरदान देते, जी विष्णूची (भार्या) व भ्रुगु ऋषींची मुलगी आहे, जी मंत्रस्वरूप आणि मंत्रमय आहे, देवगण जिची पूजा करतात, जी केल्या कृत्यांचे तात्काळ फळ देते, जी सर्वांचे ज्ञान वाढविते, (षट) शास्त्रे जिचे गुणगान करतात, सांसारिक जगताची भीती जी हरण करते, संतमहात्मे जिच्या चरणी आश्रय घेतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धान्यलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
भृगुतनया, वर दे विजया, करिती सुर पूजन, लाभ तयां
चटकन दे, हरते भवभीति, नि वाटत ज्ञान मुकुंदप्रिया ।
मुनिजन आश्रय घेत पदी, गुणगान सहा नित जे करिती (सहा- षट शास्त्रे)
हरिसहचारिणि धैर्यसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०३॥
टीप- शास्त्र या संज्ञेखाली वेदान्त, सांख्य, न्याय, योग, मीमांसा, व्याकरण, छन्द, निरुक्त, ज्योतिष अशा अनेक विषयांचा समावेश केला जातो. त्यांचा साधारणतः सहा शास्त्रे असा उल्लेख करण्यात येतो.
गजलक्ष्मी
जयजय दुर्गतिनाशिनि कामिनि, सर्वफलप्रद शास्त्रमये
रथगजतुरगपदादिसमावृत, परिजनमण्डितलोकनुते ।
हरिहर-ब्रह्म-सुपूजितसेवित, तापनिवारिणि पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, गजलक्ष्मि परिपालय माम् ।। ४ ।।
मराठी- सर्व प्रकारच्या हाल अपेष्टांचा नाश करणारी, सर्व इच्छांची पूर्तता करणारी, रथ, हत्ती, घोडे व पायदळ यांनी सर्व बाजूंनी वेढलेली, (साही) शास्त्रांना व्यापून राहिलेली, सेवकांच्या कोंदणात (गराड्यात) असणारी, जनसामान्य तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेशही जिची पूजा करतात, जी सर्व कष्ट समाप्त करते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये गजलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
सकळ व्यथा हरते, पुरवीत मनोरथ, व्यापुन वेद-स्मृती
रथ-हय-कुंजर पायदळासह, सेवक संघ सवे असती । (हय- घोडा, कुंजर- हत्ती)
शिव-चतुरानन-विष्णु-प्रजाजन पूजित, कष्ट तसे सरती
हरिसहचारिणि हस्तिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०४॥ (हस्ती - हत्ती)
सन्तानलक्ष्मी
अहिखगवाहिनि मोहिनि चक्रिणि, रागविवर्धिनि ज्ञानमये
गुणगणवारिधि लोकहितैषिणि, स्वरसप्तभूषितगाननुते ।
सकलसुरासुरदेवमुनीश्वरमानववन्दितपादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, सन्ततिलक्ष्मी पालय माम् ।। ५ ।।
मराठी- जिचे वाहन सापाला पकडून उडणारा पक्षी (घुबड) आहे, सर्व जगताला जिचा मोह पडतो, जिच्या हाती चाक आहे, (संगीतातील) विविध रागांच्या द्वारा जिचा महिमा अधिकच वाढतो, जी मूर्तिमंत ज्ञानच आहे, जी विविध गुणांचा सागर आहे, सर्वसामान्य जनांचे जी हितच करते, सात सुरांनी सजलेल्या गाण्यातून जिची स्तुती केली जाते, सर्व देव, दैत्य, मुनी आणि मनुष्य प्राणी जिची पूजा करतात, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये सन्तानलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
विविध स्वरावलि वाढविती महिमा, वलयांकित हात असे
सकल जगा भुलवी, घुबडा निवडून, खरोखर ज्ञान दिसे ।
हित सकलां, गुणसागर, दैत्य मुनी सुर मानवही नमती
हरिसहचारिणि वंशसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०५॥
टीप- येथे लक्ष्मीचा उल्लेख ‘अहि-खग-वाहिनी’ म्हणजे सापाला पकडून उडणारा पक्षी (गरुड) जिचे वाहन आहे असा असला तरी, घुबड हेच तिचे वाहन आहे अशी परंपरागत मान्यता आहे व उल्लेखही आहेत.
विजयलक्ष्मी
जय कमलासनि सद्गतिदायिनि, ज्ञानविकासिनि गानमये
अनुदिनमर्चितकुङ्कुमधूसर-भूषित वासित वाद्यनुते ।
कनकधरास्तुति वैभव वन्दित, शङ्कर देशिक मान्य पदे
जयजय हे मधुसूदन कामिनि, विजयलक्ष्मि परिपालय माम् ।। ६ ।।
मराठी- हे कमळात निवास करणार्या, (आपल्या भक्तांच्या) (ब्रह्म) ज्ञानाचा विकास करून त्यांना सद्गति देणार्या, गायन स्वरूप असणार्या, दररोज पूजा केली गेल्याने सर्वांगावर पसरलेल्या कुंकवाने सुशोभित झालेल्या, सुमधुर वाद्ये वाजवून जिची पूजा केली जाते, श्रीमद शंकराचार्यांनी कनकधारा स्तोत्रात जिच्या पावलांची प्रशंसा केली आहे, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विजयलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
कुमुद निकेतन, गानस्वरूप, नि ज्ञानविकास करून गती
सकलजनां, तनु पिंजर पूजित, वाद्य स्वरे मधु गुंजत ती ।
कनकधार स्तवनी गुरु शंकर वंदुन पाय स्तुती करिती
हरिसहचारिणि सिद्धिसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०६॥
विद्यालक्ष्मी
प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि, शोकविनाशिनि रत्नमये
मणिमयभूषित कर्णविभूषण, शान्तिसमावृत हास्यमुखे ।
नवनिधिदायिनि कलिमलहारिणि, कामित फलप्रद हस्तयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, विद्यालक्ष्मि परिपालय माम् ।। ७ ।।
मराठी- देवतांची देवी असलेल्या, भारती, भृगुकन्या भार्गवी, दुःखांचा नाश करणार्या, जिला तर्हे तर्हेची रत्ने शोभा देतात, जिच्या कर्णभूषणांना रत्ने जडवलेली आहेत, जिचा चेहर्यावर शांतता पसरलेली असून ती हसतमुख आहे, जी आपल्या भक्तांना नवनिधी प्रदान करते, कलियुगातील दोष हरण करते, आपल्या वरद हाताने इच्छिलेली फळे देते, (हे भक्तांनो) तिला नमस्कार करा. अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये विद्यालक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
भृगुतनया भवदोष हरी, वर देत, मणी सजले भवती
हसतमुखावर शांति विराजत, कुंडल संग मणी झुलती ।
नवनिधि दान नि दुःख विनाश, प्रणाम करू सुर देविप्रती
हरिसहचारिणि ज्ञानसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०७॥
टीप- धर्मशास्त्रानुसार या श्लोकात उल्लेखलेले नवनिधी खालील प्रमाणे आहेत.
१. पद्म निधि, २. महापद्म निधि,३. नील निधि, ४. मुकुंद निधि, ५. नंद निधि, ६. मकर निधि, ७. कच्छप निधि, ८. शंख निधि आणि ९. खर्व / मिश्र निधि. यातील क्र. १ ते ८ निधी पद्मिनी विद्येने साध्य होतात.
१. पद्म निधिमुळे मनुष्य सात्विक गुण युक्त होतो. त्याची संपदाही सात्विक असून पिढ्या न पिढ्या टिकते.
२. महापद्म निधि - पद्म निधि प्रमाणे सात्विक असतो आणि त्याचा प्रभाव सात पिढ्यांपलिकडे रहात नाही.
३. नील निधि मध्ये सत्व आणि रज गुणांचे मिश्रण असते व त्याची प्राप्ती व्यापारा द्वारे होते.
४. मुकुंद निधि मध्ये रजोगुण अधिक प्रबळ असतो व त्याला राजस स्वभावाचा निधी म्हटले जाते.
५. नंद निधिमध्ये रज आणि तमो गुणांचे मिश्रण असते.
६. मकर निधीला तामसी निधि असे म्हटले जाते. ही व्यक्ती अस्त्रे आणि शस्त्रे यांचा संग्रह करणारी व पराक्रमी असते.
७. कच्छप निधि असणार्या व्यक्ती आपली संपत्ती गव्हाणीतील कुत्र्याप्रमाणे लपवून ठेवतात. त्याचा वापर करीत नाहीत व इतरांनाही करू देत नाहीत.
८. शंख निधि असणार्या व्यक्ती धनाचा वापर फक्त स्वतःसाठीच करतात.
९.खर्व निधि असणार्या व्यक्ती या वरील सर्व प्रकारांचे मिश्रण असतात व त्यांच्याबद्दल अंदाज बांधणे अवघड जाते.
धनलक्ष्मी
धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि धिंधिमि, दुन्दुभि नाद सुपूर्णमये
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते ।
वेदपुराणेतिहास सुपूजित, वैदिकमार्ग प्रदर्शयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि, धनलक्ष्मि परिपालय माम् ।। ८ ।।
मराठी- ढोलाच्या धिमिधिमी अशा आवाजात जी पूर्णपणे गुरफटून गेली आहे, शंखाच्या घुम घुम अशा आवाजाने जिची पूजा होते, वेद पुराणे आणि इतिहास यांद्वारे पूजा होणारी ही देवी भक्तांना वैदिक मार्ग दाखवते, अशा देवते, मधुसूदनाच्या भार्ये धनलक्ष्मी, तुझा विजय होवो. तू माझे पालन कर.
धिमिधिमि धिंधिम ढोल ध्वनी तुज वेढुन टाकत पूर्णपणे
घुमघुम घुंघुम शंख ध्वनी तुज पूजत काय न त्यात उणे ।
श्रुति इतिहास पुराणहि पूजति, ने जन सगळे वेदपथी
हरिसहचारिणि वित्तसुधे, जय हो तव, राख मला जगती ॥०८॥
फलश्रुती
अष्टलक्ष्मी नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि ।
विष्णुवक्ष:स्थलारूढ़े भक्तमोक्षप्रदायिनी॥
शंखचक्रगदाहस्ते विश्वरूपिणि ते जय: ।
जगन्मात्रे च मोहिन्यै मंगलम् शुभ मंगलम्॥
मराठी- इच्छा (पूर्ती) स्वरूपात असणार्या, वर देणार्या, श्रीविष्णूच्या वक्षस्थळी विराजमान असलेल्या, भक्तांना मुक्ती देणार्या, हाती शंख चक्र गदा धारण करणार्या, सर्व विश्वाला व्यापून टाकणार्या अष्टलक्ष्मी तुला नमस्कार करतो. तुझा विजय होवो. या जगताची आई असलेल्या मोहिनी तू आमचे कल्याण, मंगल कर.
इच्छापूर्तीस्वरूपी तू, होसी सर्वां वरप्रदा
भुजांतरी हरीच्या तू, होसी भक्तांस मोक्षदा ।
शंख चक्र गदा हाती, जगा सर्वत्र व्यापूनी
सकलांचे भले साधी, माता जगतास मोहिनी ॥
॥ इति श्रीअष्टलक्ष्मी स्तोत्रं सम्पूर्णम् ॥
-- धनंजय बोरकर.
९८३३०७७०९१
तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही.
भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही.
एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात अन्यत्र असतात.
रस्सा असो वा मिसळ.
त्यावर तरंगणाऱ्या तर्रीचा तिखट तर्रेबाजपणा कमी करण्यासाठी आंबट लिंबू वापरले जाते. भेळेचा भडकपणा कमी होण्यासाठी त्यावर चिंचखजुराच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. चटणीमधे कैरी किंवा साॅसमधे टोमॅटो असतोच. या आंबटपणामुळे तिखटपणा थोडासा का होईना कमी केला जातो.
जेवण झाल्यावर बोटांना लागलेले तेल काढण्यासाठीच जेवताना ताटात उरलेल्या लिंबाची फोड पिळून बोटांना चोळली जाते, ती यासाठीच ! प्रत्येक रस एकमेकांना खूप मदत करीत असतो.
तशी आंबट, गोड आणि खारट यांची छुपी युती असते. सामील होणार नाही, पण बाहेरून पाठींबा जाहीर केलेला असतो. तसंच कडू तिखट तुरट चवींची मैत्री जरा जास्तच आहे. एक गट जेव्हा सत्तेत चलती नाण्याच्या बाजुला असतो, तेव्हा बाकीचे तीन विरोधी पक्षात बोंबाबोंब करत बाके बडवायला बसलेले असतात. कुरघोडी करण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही.
तिखट झालेल्या रसभाजीमधला तिखट तोरा कमी करण्यासाठी काय करावे ?
रसभाजीमधे पाणी वाढवून तिखटपणा कमी होईल पण भाजीची मूळ चव पण बिघडून जाते, यासाठी आंबट चव मदतीला धावत येते. झणझणीत झुणक्यामधे देखील आमसोलाचे आंबट घातल्याखेरीज भाकरीलापण बरे वाटत नाही. तळलेल्या मिरच्यावर मीठ घालून लिंबू पिळून घेतले की.. व्वा, क्या बात है ! हे आपण व्यवहारात पण पहातो. मिरच्यांचा खर्डा मात्र काही वेळा या आंबटाशिवाय लांब जाऊन भांडून फटकून बसल्यासारखा असतो.
आंब्बट्ट म्हटले तरी दोन्ही डोळे एकदम बंद होतात.
आंबटगोड हा युती शब्द उच्चारला की फक्त एक डोळाच बंद होतो.
आणि तिखटात आंबट नाही घातले, तर मात्र दोन्ही डोळे हेऽ एऽवढे उघडतात.
तिखट लोणच्याची, कधी गोडाशी मैत्री होऊच शकत नाही. तिथे तिखट-आंबट युतीच कामी येते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.11.2016
Copyright © 2025 | Marathisrushti