वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही.
October 19, 2019
हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे.
February 6, 2022
आता बालसाहित्याचे आयाम बदलले आहेत! कारण आता मुलांच्या भोवतालचं विश्वच झपाट्याने बदलत आहे. त्यांची 'जगण्याची भाषा' ही आता वेगळी आहे!
-- जागतिकीकरणाचा पहिला परिणाम म्हणजे 'मूल' हे मार्केटिंगचा विषय झालं! मुलाला काय पाहिजे ह्याचा सारासार विचार न करता, कुठला माल खपला पाहिजे ह्याचाच विचार करुन त्याचा आकर्षक धबधबा मिडीयाच्या मदतीने ग्रामीण तसेच नागरी भागातून वाहू लागला. वर्तमानपत्रात रविवारच्या पुरवणीत असणारं मुलाचं पान त्यांनी बंद केलं आणि दर महिन्याला 'मूल ह्या ग्राहकराजासाठी' खास प्रायोजित पुरवणी सुरू झाली!! पॉकेमॉन ची कार्डस्, चिटोस,चॉकोस, बेबलेड ही त्याची उदाहरणं आहेत.
-- दूरदर्शनवर सतत वाढत असणाऱ्या वेगवेगळ्या चॅनल्समुळे मुलांमधे नकळत एक प्रकारचा 'सामाजिक चतुरपणा' आला. स्त्री पुरुष संबंधातला मोकळेपणा ही घरच्यांबरोबर जेवताना पाहण्याची गोष्ट झाली. आणि मालिकांमधे होणारे घटस्फोट, अनैतिक संबंध, खोटारडेपणा, फसवेगिरी ह्याबाबत घराघरातून चालणारी रसभरीत चर्चा मुलांच्या कानावर सहजी येऊ लागली. पर्यायाने मुलांचे खेळ व मुलांची भाषा बदलली! 'चिटींग,लफडा,लोचा, पंगा,घटिया,सही' हे आणि असे शब्द मुलांच्या बोली भाषेत जमा झाले; जे त्यांनी मालिकांतून व घरातल्या मोठ्या माणसांच्या संवादातून उचललेले आहेत.
-- शहरातून टॉवर्स उभे राहू लागले तसे जिल्ह्याच्या ठिकाणी अपार्टमेंटस व ब्लॉक संस्कृती येऊ लागली. मैदानी खेळ कमी होऊ लागले व सायबर कॅफे मधली गर्दी वाढू लागली. क्लास सुटल्यावर सायबर मधे जाऊन तासभर खेळून,मस्त फ्रेश होऊन मुले घरी येऊ लागली.
-- घराघरात संगणकाचा शिरकाव झाला. मग घराततच मिनी सायबर कॅफे सुरू झाले. संगणक कशासाठी घेतला होता ह्याचा विसरच पडला,आणि सिनेमा,गाणी,खेळ व शक्य असेल तिथे इंटरनेट चॅटींग साठीच त्याचा अधिक उपयोग व्हायला लागला.
-- संगणक आवाक्यात येतो आहे,त्याच सुमारास पालकांना इंग्रजी माध्यमाचे आकर्षण वाटू लागले. आणि मग बालवाडी पासूनच मुले क्लास,ट्युशन,वर्कशीटस ह्या चा*ात भरडली जाऊ लागली.
ह्या आणि अशा गोष्टिंचा एकत्रित परिणाम असा झाला की जीवनाची गती वाढली व त्यातूनच सुरू झाली स्पर्धा. जे काही करायचं ते स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व इतरांवर मात करण्यासाठी. चांगलं आहे म्हणून वाचायचं नाही तर स्पर्घेत राहण्यासाठी वाचायचं.
मुलांच्या अभ्यासात, खेळात,वाचनात,सहलीत किंबहुना त्यांच्या एकंदर जगण्याचा स्पर्धा हाच अविभाज्य घटक झाला!!
मुलांच्या मानसिकतेचा विचार करताना त्याच्या पाठीमागचा कॅनव्हास हा सध्यातरी असा आहे, असा विचार करुनच पुढे जावे लागेल.
सुमारे वीस वर्षापूर्वीची ही घटना आहे.
पुण्याला “बालसाहित्त्यकारांचं आंतरभारती साहित्य संमेलन' भरलं होतं. मी त्यावेळी मुलांसाठी नव्यानेच लिहायला सुरुवात केली होती. काही बंगाली लेखकांना भेटलो. गप्पा मारताना त्यांना विचारल की 'मुलांसाठी ते काय नवीन लिहीत आहेत? लेखन संदर्भात काय नवीन प्रयोग करत आहेत?”
त्या बंगाली लेखकाने अत्यंत सहजतेने आणि मिश्कीलपणे मला उत्तर दिलं.
त्याच्या त्या सहजतेने मला नवीनच गोष्ट समजली! आपण मुलांसाठी कशाप्रकारचे लेखन केले पाहिजे ह्याची स्पष्टता आली. आणि त्याने बोलताना मिश्कीलपणेच, पण आम्हा सर्व मराठी बालसाहित्यिकांना एक सणसणीत थप्पड पण लगावली!
तो बंगाली लेखक म्हणाला,“अजी,उस रवींद्रनाथ ठाकूर ने तो हमारी गोची ही कर दी है! हम कुछ भी लिखना चाहे,कुछ भी नया प्रयोग करना चाहे तो भी हम कर नही पातें! क्योंकी हमारे पहले ही ठाकूरजीं ने वो किया ही है! और हम से शतगुना बेहतरीन किया है!! हम उनसे अच्छा क्या कर सकते है? मानो,ठाकूरजींने बालसाहित्य के बारें में एक मापदंड सा बनाया है। नही हम उस हद तक जा सकते, नही उसे पार कर के आगे जा सकते! यही तो गोची है। लेकीन बेटे,क्या तुम्हारे मराठी भाषा में,ऐसा कोई ठाकूरजी जैसा लेखक है,जो तुम्हारी गोची कर सकता है?” त्यावेळी मी त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. त्याचं एक कारण म्हणजे, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहितच होतं! आणि म्हणूनच त्यांनी तो गुगली बॉल माझ्याकडे टाकला होता! दुसरं कारण म्हणजे, त्याक्षणी मी अंतर्मूख झालो होतो! कमीत कमी वेळात किती प्रचंड काम करावं लागणार आहे ह्याचा अंदाज येऊ लागला होता.
ह्या घटनेनंतर रवींद्रनाथांचे बालसाहित्य जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. त्यांचे बालसाहित्य आणि आजचे आपले बालसाहित्य (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे ह्याची जाणीव झाली. आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा 'अडाणी किंवा मातीचा गोळा' आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला. शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र 'मुलांना काहीतरी शिकवणं!' बिचारी मुले 'त्या शरीराला' फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील 'आत्मा' मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते. रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!!
'मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही' ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती.
मुले गोष्टी वाचत, कविता- गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या 'सहज पाठ' ह्या तीन पुस्तिका लिहिल्या (आधी तिसरा भाग लिहिला,मग दुसरा व पहिला) त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!!
'करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे' असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.
आम्ही बालसाहित्यिक ह्या पासून काही धडा घेणार का?
साहित्य ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यातील एक आहे,'जे हितकारी आहे ते.' दुसरा अर्थ आहे,'सोबत करणारा किंवा सोबत चालणारा.'
आजपर्यंत अनेक बालसाहित्यिक हे एकतर मुलांना आशीर्वाद देण्याच्या किंवा त्यांना शिकविण्याच्या भूमिकेतून तरी लिहित होते किंवा आत्ममग्न असल्याने आपल्याच मस्तीत लिहित होते! पर्यायाने ते सारे मुलांच्या भावविश्वापासून अनेक योजने दूर गेले होते!! मी देणारा आणि आणि मुले घेणारी,ह्या असल्या लेखकाच्या भूमिकेतून कधी चांगले बालसाहित्य निर्माण होत नाही व माझीच 'लेखन मस्ती सही!' ह्या भूमिकेतून तर नाहीच नाही! कुठल्याही प्रकारची भूमिका घेऊन लिहिणं हे चांगल्या बालसाहित्याचं लक्षण असूच शकत नाही.
चांगल्या बालसाहित्याची जर लक्षणंच ठरवायची असतील तर असं म्हणता येईल की :
-- लेखक आणि त्याचं साहित्य मुलांच्या भावविश्वाशी एकरुप झाले आहे का? म्हणजेच ते मुलांसोबत चालते का?
-- त्या लेखकाची भाषा,मुलांना 'आपली भाषा' वाटते का?
-- मुलांच्या परिसरात-भावविश्वात घडणाऱ्या घटना, मुलांचे आपापसातील मानवी संबंध-नाती हे सारं, तो लेखक मुलांच्या नजरेतूनच समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे का? आणि त्याच तळमळीने त्यावर काही भाष्य करतो आहे का?
-- आणि सर्वान महत्वाचं म्हणजे, त्या लेखकाच्या ह्रदयातील मूल जागे आहे का? आणि तो लेखक 'त्या मुलासाठी' स्वत: मूल होऊन लिहितो आहे का?
जर ह्या सर्वच प्रश्नांची उत्तरे 'हो' असतील तर ते खचितच चांगले बालसाहित्य असेल!!
मराठीतल्या प्रस्थापित साहित्यिकांनी मुलांसाठी ही लिहिले आहे. (पण काही सन्मानिय अपवाद वगळून) त्यांनी काही जाणीवपूर्वक प्रयोग केले आहेत, लेखनाचे वेगवेगळे फॉर्मस् हाताळले आहेत, विविध माध्यमांसाठी लेखन केलं आहे, आपल्या सोबत मुलांना घेऊन ते पुढे जात आहेत असे काही जाणवत नाही. वानगी दाखल निव्वळ कथा हा प्रकार जरी निवडला तरी मुलांसाठी संवाद कथा, रहस्य कथा, गूढ कथा, प्रवास कथा, विज्ञान कथा, परी कथा, फँटसी कथा, अक्षर कथा, चित्र कथा, विनोदी कथा, जंगल कथा, प्राणी कथा, साहस कथा, रुपक कथा, लोककथा, आठवणीतल्या कथा, व्यक्ती कथा....ही यादी खूप वाढविता येईल ही, प्रश्न असा आहे की, 'आपल्या मुलांना मराठी साहित्यातील विविध प्रकार वाचायला मिळावेत ह्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे साहित्यिक, एका हाताच्या बोटंावर मोजता येतील इतके तरी आहेत का? आणि नसतील तर का नाहीत?' मराठीत मुलांसाठी संख्यात्मक लेखन करणारे चिक्कार साहित्यिक आहेत. प्रश्न आहे गुणात्मक साहित्याचा!! विंदांची कविता आहे,'माकडाचे दुकान.' त्यानंतर ह्या कवितेची नक्कल करत मग अनेक (महा) कवींनी पोपटाचे दुकान,कोल्हयाचे दुकान,गाढवाचे दुकान अशी आपापली दुकाने थाटली. हॅरी पॉटरला प्रसीध्दी मिळताच एका (महा संख्यात्मक) लेखकाने हरी पाटकर असे पुस्तक लिहिले. नकला केल्याने ह्या साहित्यिकांचं हसं तर होतंच पण वाईट ह्याचं वाटतं की, आपल्या मुलांना हिणकस दर्जाचं साहित्य मिळतं!! बालनाट्य,बालचित्रपट,एकांकीका,एकपात्रीका,द्विपात्रीका,नाट्यछटा,पपेट शो,निबंध हे तर आपल्या मुलांसाठी उपेक्षित साहित्य प्रकार! ह्याचा तर वेगळाच ताळेबंद मांडावा लागेल.
जेव्हा हॅरी पॉटरच्या पहिल्या पुस्तकाची तडाखेबंद विक्री होऊ लागली,एकाच पुस्तकाच्या दोन कोटी प्रती संपल्या तेव्हा सारेच हादरले! सगळ्यांचे सारेच आडाखे चुकले होते!! काहींना असं वाटत होतं की,'ही पुन्हा पुन्हा घडणारी घटना नसून केवळ मिडियाने घडवलेला हा एक चमत्कारच आहे.' 'एका बैठकीत मुले सातशे पानं वाचतात,ही लोणकढी थाप आहे!'
आपल्याच डबक्यात रमणाऱ्या आणि त्यालाच विश्व समजणाऱ्या काही बालसाहित्यिकांना असं वाटत होतं की,'ज्या अर्थी आपल्या साहित्याला मुलांकडून मागणी नाही त्याअर्थी संपूर्ण जगात अशीच परिस्थिती आहे.'
'चोवीस तास काळा चष्मा लावून जग ओळखता येत नाही' अशी एक चिनी म्हण आहे! हॅरी पॉटर हा काही निव्वळ चमत्कार नाही,हे जेव्हा सर्वांना समजू लागलं,त्याची ताकद जाणवू लागली तेव्हा ह्या मातीतली मुलेच विचारू लागली,'आपल्या भाषेत का नाही असा हॅरी पॉटर? केव्हा येणार?' त्यावेळी सगळेच हडबडले!! आणि त्यावेळी दोन पंथ तयार झाले.
एक,जे हॅरी पॉटरची बालप्रियता आणि लोकप्रियतेचे रहस्य,त्याची शक्तीस्थाने ह्याचा कसोशिने शोध घेऊ लागले. दोन,ज्यांनी काळा चष्मा घातला होता ते विसरुनच गेले की तो आपला चष्मा आहे. त्यांना वाटू लागलं तेच आहेत आापले डोळे!! (ह्या दुसऱ्यंा विषयी लिहून मी माझा आणि तुमचा वेळ बरबाद करत नाही.)
हॅरी पॉटरची इमारत 'टॉम अॅण्ड जेरी' व 'पॉकेमॉन' च्या मजबूत पायावर भक्कम पणे उभी आहे. लहान मुले टॉम अॅण्ड जेरी अत्यंत आवडीने,तन्मयतेने पाहतात ह्याची चार प्रमुख कारणं असू शकतात. एक,टॉम अॅण्ड जेरी हे त्या मुलांसारखेच छोटे आहेत. त्या मुलांसारखेच ते खोडकर,व्रात्य व उपद्व्यापी आहेत.काही-काही वेळा ते हरतात पण बहुतेक वेळा त्यांचा विजयच होतो. टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्या मुलांच्या बाबतीत सुध्दा काहीसं असंच होत असतं. फक्त फरक इतकाच की, काहीवेळा मुलांचा विजय हा मोठ्या माणसांच्या नजरेतून 'पराजय' असतो. दुसरं कारण म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या प्राण्यांना कधीही त्रास देत नाहीत,सतावत नाहीत किंवा त्यांच्याशी झगडत नाहीत.
टॉम अॅण्ड जेरी हे नेहमीच त्यांच्यापेक्षा शक्तीवान,ताकदवान प्राण्यांशीच भांडतात झगडतात आणि ते ही खुलेआम त्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी पंगा घेतात.
ह्यातली सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे टॉम अॅण्ड जेरी हे,त्या मोठ्या प्राण्यांच्या मागे-मागे कधीही धावत नाहीत,त्यांची कधी समजूत काढत नाहीत किंवा त्यांना कुठल्या ही विनवण्या करत नाहीत. पण टॉम अॅण्ड जेरी असे काही उद्योग करतात किंवा त्या मोठ्या प्राण्यांच्या अशा काही खोड्या काढतात की त्या मोठ्या अवाढव्य प्राण्यांना,नाईलाजाने त्या छोट्यांच्या मागे धावावं लागतं! आणि हे छोटे हाती न आल्याने त्यांच्या हुशारीला,त्यांना दाद पण द्यावी लागते. प्रत्येक मुलाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यात 'अगदी असंच व्हावं' असं वाटत असतं!! आपलीच स्वप्नं तो पडद्यावर पाहात असतो. तीसरं कारण अगदी साधं व सरळ आहे. पुढचा प्राणी कितीही मोठा असला,ताकदवान असला तरीही त्याच्यावर मात करण्यासाठी हे टॉम अॅण्ड जेरी आपल्या अक्कल हुशारीचाच उपयोग करतात. त्यांच्या समोरचा प्रसंग कितीही कठीण असो,प्रचंड मोठे संकट समोर असो अशावेळी टॉम अॅण्ड जेरी कधीही वाइट मार्गांचा उपयोग करत नाहीत. लबाडि करत नाहीत. ते त्या संकटातून सहीसलामत सुटतात ते आपल्या हूशारीनेच!! ह्यामुळे मुलांना सहजच जाणवतंतं की 'कुठलीही समस्या जरी असली तरी त्यातून आपण हुशारीने नक्कीच मार्ग काढू शकू!!' चवथं कारण हे सापेक्ष आहे. खूप मुले कार्टून पाहताना अतिशय तन्मय होतात, आजूबाजूच्या जगाचे त्यांना भानच राहात नाही. घरातल्या,शाळेतल्या ताण तणावापासून थोडावेळ तरी मुक्ती मिळावी म्हणून मुलांनी शोधलेला हा उपाय असू शकतो.
टॉम अॅण्ड जेरी पाहणाऱ्यांचा गट जिथे संपतो बहुधा तिथूनच पॉकेमॉन पाहणाऱ्यांचा गट सुरू होतो.
ह्या दोन प्रकारात एक महत्वपूर्ण फरक आहे. टॉम अॅण्ड जेरी कुठलेही काम करू शकतात! आणि ते कशाला ही घाबरत नाहीत. उदा. आग,पाणी,वादळ,वीज इ.
पण प्रत्येक पॉकेमॉनची जशी बलस्थानं वेगवेगळी आहेत तशी त्यांची काही कमकुवत स्थानं पण आहेत. उदा. एका पॉकेमॉनचं आग हे बलस्थान असेल तर तो वादळाला घाबरत असतो. दुसरा वादळांचा बादशहा असतो पण आग पाहताच त्या लोळागोळा होतो. पॉकेमॉनची आणखी एक खासियत म्हणजे,ते मुलांप्रमाणे विकसित होत जातात.
ह्यामधे जादू आहे,रहस्य आहे! खरं तर ही एक अनोखी फँटसी आहे. आणि ह्या फँटसीतला हा पॉकेमॉन बिलकूल मुलांसारखाच आहे!! 'तुम्ही कार्टून पाहता का?ठ असा प्रश्न जर मोठ्या माणसांना विचारला तर फारच कमी जणं त्याचं उत्तर 'हो' असं देतील. बाकीचे फक्त नाकं मुरडतील. ह्याचं मुख्य कारण म्हणजे, कार्टून फिल्ममधे घडणाऱ्या घटनांचा वेग इतका भन्नाट असतो की, 'पुढच्या क्षणी काय होईल ह्याचा तर्क करणे,मोठ्या माणसांसाठी केवळ अशक्य असते!' पण हीच गोष्ट लहान मुलांसाठी सहज शक्य असते!!
ह्याची पण दोन कारणं आहेत.
एक,एखाद्या घटनेचाचा वेध घेत आणि त्यासोबत विविध अंगांनी पण सुसंगतपणे त्याबाबत विचार करण्याची गती ही मोठ्यांपेक्षा लहान मुलांची अधिक असते. किंबहुना वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीशी चटकन समायोजन साधण्याची कला मुलानाच चांगली अवगत असते. दोन,अपेक्षित शेवटाची अपेक्षा करणारी माणसं,कार्टून पाहू शकत नाहीत. अशा माणसांना 'क' पासून सुरू होणाऱ्या मालिका अधिक आवडतात. मोठ्यांच्या मानाने मुलांच्या मनात विशिष्ट घटनांबाबत पूर्वग्रह फारच कमी असतात त्यामुळे साहजीकच त्यंाच्या अपेक्षा ही कमी असतात. मुले गोष्टींना म्हणजेच घटनांना साक्षी राहतात, कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय ती घटना समजून घेण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत असतात. खरं सांगायचं तर हीच मुलांची सहजता असते! हॅरी पॉटरमधे हे तर सारं आहेच पण त्याशिवाय आणखी ही अशा काही खुबी आहेत ज्यामुळे सारे चक्रावून जातात. कुठल्याही कथेचा किंवा कादंबरीचा प्लॉट म्हणजे त्याचं शरीर आणि कथाबीज म्हणजे त्याचा आत्मा. हॅरी पॉटरची खासियत म्हणजे,त्याचा प्लॉट हा वास्तवाशी,मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे पण त्याचं कथाबीज ही एक अफलातून फँटसी आहे!! हे अनोखं रसायनंच मुलांना पागल करुन टाकतं.
कारण,फँटसी आणि वास्तव ह्यातील सीमारेषा ओळखण्याची व इथून तिथे जाण्याची संधी कथालेखीका मुलांना कथेतच देत आहे. हे ह्या लेखीकेचे सर्वात मोठे बलस्थान आहे!
जगातल्या कुठल्याही मुलाच्या शाळेचे प्रतिबिंब आपल्याला हॅगवॉर्डच्या जादू शाळेत पडलेले दिसते. किंबहुना ही हॅगवॉर्डची शाळा प्रत्येक मुलाच्या शाळेचं प्रतिनिधीत्व करते! तरीही ही शाळा जादू शिकविणारी आणि फँटसी मधली आहे हे विशेष!! गंमत म्हणजे अशा शाळेत घडणाऱ्या घटना,शाळेतील मुलांचे आपापसातील नाते संबंध हे मुलांच्या भावविश्वाशी निगडीत आहेत,मग तो मुलगा जगात कुठेही राहात असो. हॅरी पॉटर हे केवळ स्वप्नरंजन नाही किंवा पलायनवाद पण नाही तर ही एक वैश्विक सदाबहार साहित्यकृती आहे!!
एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,'मुलांसाठी सहज सोपं लिहिणं, कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता स्वच्छं सकारात्मक दृष्टीकोनातून लिहिणं आणि हे लेखन मुलांच्या भावविश्वाशी त्यांच्या रोजच्या जगण्याशी नुसतं संबंधित नाही तर त्यात मिसळून जाणारं असणं...हे सर्वार्थाने कठीण काम आहे!! कठीण आहे कारण,एखादी घटना आपण समजून घेणं आणि त्या घटनेचा मुलाने त्याच्या नजरेतून अन्वयार्थ लावणं ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मुलांच्या नजरेतून एखादी गोष्ट पाहणं,त्यांच्या मानसिकतेचा विचार करुन ती समजून घेणं किंबहुना पूर्णत: बालकेंद्री विचार करण्याची ताकद सर्वांजवळ नसते, कठोर परिश्रम करुन ती कमवावी लागते. पण, ही शक्ती प्राप्त झाल्यानंतर त्याविषयी मनात जरा जरी इगो निर्माण झाला,त्याबाबत इवलासा जरी गर्व झाला तरी,प्रचंड परिश्रमाने कमावलेली ही शक्ती क्षणात विरघळून जाते.... .......आणि त्याक्षणी तो लेखक मुलांपासून खूप लांब निघून जातो!! पण जो बालसाहित्यिक आपण कमावलेल्या शक्तीची पुन्हा पुन्हा 'लिटमस टेस्ट' करण्याची हिंमत दाखवतो व रिझल्ट नकारात्मक येईल अशी पुसटशी शंका जरी आली तरी तो स्वत:त सकारात्मक बदल घडवून आणतो; तोच खरा बालसाहित्यक.
ही 'लिटमस टेस्ट' अगदी सोपी आहे.
मुलांसाठी काम करणारी, त्यांच्यासाठी लेखन करणारी मोठी माणसं कधीच एकटी एकलकोंडी नसतात. त्यांच्या ह्रदयातलं मूल सदैव जागं असतं, सजग असतं, नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला उत्सुक असतं. आणि ती मोठी माणसं 'त्या आतल्या मुलाला' साक्षी ठेवून समोरच्या मुलांसाठी काम करत असतात, लिहित असतात. जेव्हा कुणी अनोळखी मुलगा ह्या मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा तो 'त्या आतल्या मुलाला' ओळखतो, 'त्याला' साद घालतो व 'त्याची ओळख पटली की' तो अनोळखी मुलगा 'त्याच्याशी' बोलू लागतो,मैत्री करतो......त्या मोठ्या माणसाच्या माध्यमातून !!
तुम्ही अशी “लिटमस टेस्ट” कधी अनुभवली आहे का?
तुमची लिटमस टेस्ट एखादवेळेस वेगळी असेल किंवा त्याचे रिझल्ट ही वेगळे असतील. पण लिटमस टेस्ट करण्याची हिंमत दाखविणार्या मित्रांशी मैत्री करायला मला आवडेल.
-- राजीव तांबे
July 23, 2015
सर्व कलांचा अधिपती श्रीगणेश आहे. सर्व विद्यांच्या मुळारंभी देखील श्रीगणेशच आहे. मला आठवते, आमच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून श्री गणेशाची उपासना आहे. घरातील वडीलधारे बोलायचे ते कळत नसायचं पण ऐकायला यायचं. समजायचं फक्त ‘श्रीगणेश’ या वैशिष्ट्यपूर्ण आकार धारण केलेल्या देवतेचं नाती.
May 24, 2024
सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.
माझा जन्म.....
माझा जन्म हा ….
माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
या पृथ्वीवर ….
जन्म घेण्याशिवाय
मला
दुसरा पर्यायच नव्हता ....
प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.
वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……
ही साखळी अशीच चालू होती.
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.
आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.
बाबांचा शुक्राणू...
त्यांच्या मातापित्यांच्या ....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...
आअीचं बीजांड ...
तिच्या मातापित्यांच्या .....
अनेक पूर्वपिढ्यांतील ....
आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...
बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
....माझा जन्म
आणि …
आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
पुनर्जन्म..
मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - 2
शनिवार 3 डिसेंबर 2016
December 3, 2016
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे.
April 20, 2024
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला 'त्वमेव माता...' ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ?
या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती पुरवली ती पुढे देत आहे.
रविला भेटलो की ‘लोटांगण’ नाही घातले तरी ‘प्रेमे आलिंगीन’ नक्की !!!
-- रवी उवाच
विकास,
'घालीन लोटांगण' हे कॉकटेल काव्य आहे, ह्यातली पाच कडवी कुठल्या तरी भक्ताने इथून तिथून जमवून त्यांचं मिश्रण केलं आहे.
(१) पहिलं कडवं 'घालीन लोटांगण' हे तू लिहिल्याप्रमाणे नामदेवांचं आहे. त्याला बिचाऱ्याला कल्पना नसेल पुढे त्याच्या काव्याला किती ठिगळं लागणार आहेत त्याची.
(२) दुसरं कडवं 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपती किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. शंकराचार्यांनी श्रीगुरुस्तोत्रं लिहिलं, ज्यात आपल्याला माहिती असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्रविष्णु' श्लोक समाविष्ट आहे.
(३) तिसरं कडवं 'कायेन वाचा' हे श्रीमद्भागवतपुराणातलं आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलेलं. कायेन वाचा हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ ह्यामध्ये ३६ वा श्लोक आहे.
(४) चौथं कडवं 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या शंकराचार्यांच्या काव्यातून घेतलं आहे. मजा म्हणजे काव्याचं नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
(५) पाचवं आणि शेवटचं कडवं 'हरे राम हरे राम' सर्वात सोपं. ते 'कलिसन्तरण' ह्या उपनिषदातलं आहे. ह्या उपनिषदाची सुरुवात 'ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यंकरवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।' आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
तर अशी ही प्रार्थना जी आपण गणपतीसमोर म्हणतो, त्यातलं एकही कडवं गणपतीला उद्देशून नाही.
-- रवी अभ्यंकर
ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन
September 12, 2016
रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत.
भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही.
जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो.
चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या गव्हामधे आहे.
हा चिकटपणा येण्याचे कारण ?
त्यातील ग्लुटेनीन नावाचे द्रव्य. अतिशय चिकट असते.
आणि हे ग्लुटेनीन जसे हाताला चिकटते तसे आतड्यांनाही चिकटून बसते. केवळ आपणच चिकटते असे नाही तर, मागून येणाऱ्या चांगल्या अन्नालापण चिकटवते. मग ट्रॅफीकजाम होणारच !
एक गाडी अडकली की मागून येणारी सर्व वाहाने सुस्थितीत जरी असली तरी, काहीही हालचाल करू शकत नाही. जैसै थे पोझिशनमधे राहातात. अगदी तसेच होते, या ग्लुटेनीनच्या चिकटपणामुळे. म्हणजेच गव्हामुळे !
आतड्याला चिकटलेला हा ग्लुटेनीनचा भाग मागून येणाऱ्या सकस अन्नाला पण पुढे जाऊ देत नाही. म्हणजे आपण स्वतःही गडबड करतो, आणि दुसऱ्यालाही चांगले काम करू देत नाही.
या सर्व दुर्गुणांमुळे आज पाश्चात्य देशात ग्लुटेन फ्री डाएट ही संकल्पना जोर धरत आहे. त्यांच्या कुत्र्यांना देखील ग्लुटेन फ्री बिस्कीटस बनवू लागले आहेत.
दिवाळीसाठी सुद्धा ग्लुटेन फ्री बिस्कीट खायची ? अशा आशयाची एक जाहीरात आपणदेखील सध्या टीव्हीवर पाहात आहोतच.
बहुतेक पाश्चात्य देश हे थंड हवामानाचे आहेत, त्यांच्याकडे ऊत्पादीत होणाऱ्या पिकांमधे गहू हे मुख्य पिक आहे. हवामान गव्हासाठी पोषक आहे. साहाजिकच उत्पादन जास्त येते.
करायचे काय एवढ्या धान्याचे ?
मुळात लोकसंख्या कमी. मग खाऊन खाणार तरी किती ? उरलेला गहू पशुधनाचे पोषण करण्यासाठी, मांस आणि चरबी वाढवण्यासाठी वापरला जातो, अगदी धान्याची दारू, त्याच्या पीठाची दारू, कुजुन फुकट गेलेल्या गव्हाची दारू इ.इ. अनेक प्रकारची व्हिस्की ब्रॅण्डी रम असे उत्पादन करून देखील गहू उरतो.
त्यांच्या देशातील सरकारला त्यांच्या आरोग्याची खूप काळजी असल्याने ग्लुटेन फ्री डाएटची संकल्पना रूजली. आणि उरलेला गहू, शाकाहारी बहुलोकसंख्या असलेल्या आणि लोकांवर नियंत्रण नसलेल्या, देशात खपवायला सुरवात केली. जनतेची काळजी नसलेल्या सरकारला विदेशी प्रशिक्षण दिल्यावर ते सरकार नमते घेते, असा पुर्वानुभव असल्याने अशा देशात सरकारी वरदहस्ताने गहू प्रमोशन मोहीम सुरू झाली. त्यामुळे आमचे माजी कृषीमंत्री यांनी, शेतकऱ्यांनी शेती सोडून मद्य निर्मिती करावी, असा सल्ला दिल्याचे आपणाला स्मरत असेलच.
आणि.......
घरच्या उत्पादीत तांदुळाऐवजी विकतचा गहू आणून खाण्याला आम्ही भारतीय स्वतःला धन्य समजू लागलो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
25.10.2016
October 25, 2016
काही दिवसांपूर्वी २२ राज्यांची अतिरिक्त वीज खेचल्यामुळे किंवा वापरल्यामुळे ३ ग्रीड्स अचानक बंद बदली. त्यावर सुचलेली कविता.
August 18, 2012
माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।
गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।
दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।
बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।
उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।
प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।
गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।
ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।
सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।
धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।
गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।
कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।
केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।
बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।
कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।
मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।
साधू संत जमती कांही भविष्य जाणती
आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।
हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।
बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।
बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।
न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।
जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।
सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।
राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।
नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।
राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।
दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।
सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।
सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।
उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।
आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।
उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।
माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।
जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।
सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।
रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।
तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।
नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।
उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।
त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।
हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।
सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।
म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।
सर्वची सोडोनी गेला तो वनीं
एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।
निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।
एकाग्र करुनी मन लावले ध्यान
केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।
अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।
अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।
शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।
राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।
संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।
फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।
नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।
मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।
अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।
तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।
सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।
बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।
गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।
बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१७- १०११-८३
January 17, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti