वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आम्ही युरोपच्या ‘टूरवर’ असताना, नेदरलँड ला उतरलो. ‘अॅन फ्रॅंक हाऊस ‘ नावाने जागतिक प्रसिद्धी पावलेल्या आणि ऐतिहासिक म्युझियम ला भेट देण्यास निघालो. तेंव्हा हा रस्ता जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी फुलून गेला होता. इमारतीच्या दर्शनी भागाच्या समोर उभे राहून शेकडो पर्यटक ‘म्युझिअमचे ‘ फोटो काढून घेत होते. आम्ही प्रथम तिकीट काढून रांगेत उभे राहिलो आणि जेंव्हा त्या ‘वास्तूत ‘ मी पहिले पाऊल टाकले तेव्हा माझे अंग थरारले. विशेष लक्षवेधी बाबी म्हणजे अॅन फ्रॅंक हिचे ‘बोलके मंतरलेले डोळे’ असणारे चित्तवेधक चित्र आणि प्रवेशद्वारा समोरचा ‘पुतळा’.
त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते.
जागतिक मांजर दिवस हा २००२ पासून इंटरनॅशनल अनिमल वेलफेअर या संस्थेने साजरा करण्यास सुरवात केली. युरोप मध्ये १७ फेब्रुवारी व रशिया मध्ये १ मार्चला मांजर दिवस साजरा केला जातो.
कुत्र्यानंतर पाळीव म्हणून मानमरातब मिळवणारा प्राणी म्हणजे मांजर. प्रत्येकालाच लहानपणापासून प्राणी-पक्षिजगताची जाणीवदीक्षा दिली जाते ती चिऊ, काऊ आणि अखेरीस माऊच्या ओळखीने. पूर्वी वाडे, चाळी, बंगले संस्कृतीमध्ये अनेक दारांआड तरी या वाघाच्या ‘पाळीव’ मावशीचा वावर असायचा. अन् अनेक घरांचा तिच्यावर मौखिक दावा असायचा.
गंमत म्हणजे हा दावा असणारे मांजर मालक असल्याच्या भ्रमात राहणाऱ्या प्रत्येक घराला चकवा देत ऐटीत बागडायचे. चार घरांतील स्वयंपाकघरात आवश्यक पदार्थाची हक्कवसुली, सात उंबऱ्यांमध्ये फिरवत त्या घरांत पिल्लांना दाखवत गुपचुप गुडूप होण्याची कसरत करणारी मांजरे प्रत्येकाच्या स्मृतिकोशात दडली असतील. खाणे हवे असले, लाड करून हवे असले की जवळ येणारे आणि एरवी जगातल्या कोणालाही फुकटचा भाव न देता आपल्या जागेवर पहुडणे हे या प्राण्याचे सार्वत्रिक वैशिष्टय़.
मांजर पाळीव असले, तरी स्वत:चे स्वातंत्र्य आणि आब राखून असते. पाळीव असूनही मांजरांचा अनेक उंबऱ्यांवरचा भटका शिरस्ता आजही गाव आणि शहरांत सारखाच आहे. मात्र फ्लॅट संस्कृतीमुळे शहरी-निमशहरी भागांमध्ये कुत्र्याप्रमाणेच घरामध्ये जाणीवपूर्वक मांजर बाळगले जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. चार घरी फिरणाऱ्या मांजरींचे चित्र एकाच घरात २४ तास विसावणाऱ्या मांजरामध्ये परावर्तित झाले आहे. लोकांमध्ये मांजराच्या बाबतीत अनेकदा टोकाच्या भूमिका दिसतात.
मांजर अत्यंत आवडते असल्यास पाहताक्षणी तिच्या डोक्यावर कुरवाळण्यास हात पुढे होतो. तर नावडते असल्यास तिच्या कोणत्याही वर्तवणुकीबाबत हातातली वस्तू फेकून मारावी इतका संताप येतो. घरा, वाडय़ांमध्ये आगंतुक येणारे मांजर उंच इमारतींमधील फ्लॅटमध्ये दुरापास्त बनल्यानंतर आज मांजर विकत घेऊन पाळण्याचे प्रमाण वाढत आहे.
आपल्याकडे स्थानिक प्रजातीच्या मांजरात बरेच वैविध्य पाहायला मिळते. रंग, केस, आकार, गुणवैशिष्टय़े असे वैविध्य असूनही त्याच्या नेमक्या प्रजातींची किंवा वंशावळीची नोंद करण्यातच आलेली नाही. त्यामुळे गावठी किंवा देशी मांजर आणि परदेशी प्रजाती अशी ढोबळ वर्गवारी केली जाते.
स्वतंत्र प्रजाती म्हणून नोंद असलेल्या मांजरांमध्ये आपल्याकडे मिळणाऱ्या मांजरांची गुणवैशिष्टय़े दिसत असली, तरीही त्याची भारतीय प्रजाती म्हणून नोंद नाही. पाळीव मांजरातील स्वतंत्र प्रजाती म्हणून साधारण ७३ प्रजातींची नोंद जगात वेगवेगळ्या संस्थांनी केली आहे. त्यामध्ये अमेरिकन प्रजातींचा वरचष्मा आहे. नोंद झालेल्यापैकी जवळपास ४० प्रजाती या अमेरिकन आहेत. त्यामध्ये नैसर्गिक किंवा मूळ प्रजातींबरोबरच ‘हायब्रिड आणि मिक्स ब्रिड प्रजातींचाही समावेश आहे.
हायब्रिड म्हणजे दोन नोंद झालेल्या प्रजातींची गुणवैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांचे मुद्दाम ब्रिडिंग करून तयार करण्यात आलेली प्रजाती. दोन प्रजातींचे मुद्दाम न ठरवता ब्रिडिंग झाल्यानंतर त्यातून जन्माला आलेल्या पिल्लात काही पूर्णपणे वेगळी गुणवैशिष्टय़े दिसली, तर त्याची नोंद मिक्स ब्रिड म्हणून केली जाते.
भारतातील परदेशी मांजरांचे वेड वाढवण्यात हॉलीवूडपटांनी मोठा वाटा उचलला आहे. ‘स्टुअर्ट लिटिल’ या चित्रपटानंतर पर्शिअन, बॉबटेल या प्रजातींच्या मांजराची मागणी वाढली. ‘प्रिन्सेस डायरी’ या चित्रपटानंतर पांढरे अंग आणि काळे तोंड असणारे रॅग डॉल मांजर आपल्याकडे पसंतीस उतरले. आता हळूहळू इतरही अनेक वंशावळीची मांजरे भारतात आपले बस्तान बसवू लागली आहेत. येथेच त्यांचे ब्रिडिंगही होऊ लागले आहे. देशी मांजराशी ब्रिडिंग होऊन काही नव्या प्रजातीही जन्माला येत आहेत. घरी मांजर ठेवणे या पलिकडे जाऊन त्याच्यासाठी तयार खाणे, कपडे, शाम्पू, पावडर अशी उत्पादने आणि पार्लर, हॉस्टेल अशा सेवांनी भारतीय बाजारात जम बसवला आहे.
साधारणत: गेल्या दोन दशकांपासून आपल्याकडे परदेशी मांजरे मार्जारप्रेमींच्या घरी लाडोबा झाली आहेत. पर्शियन ही मूळ इराणमधील प्रजाती, तुर्किश अंगोरा ही तुर्कस्तानात मूळ असलेली प्रजाती, एक्झॉटिक शॉर्ट हेअर, माइन कून, रॅग डॉल या अमेरिकन प्रजाती, सयामी ही थायलंडमधील प्रजाती पाळण्याकडे सध्या प्राणिप्रेमींचा कल आहे. बहुतेक घरात ‘बेंगाल’ या प्रजातीची मांजरे असतात.
ही मांजरे बहुतेकदा आपल्या कबऱ्या, ठिपकेवाल्या देशी मांजरांशी साधम्र्य असलेली असतात. त्याचप्रमाणे पूर्ण काळी कुळकुळीत आणि हिरवे डोळे असलेली ‘बॉम्बे’ या प्रजातीशी साधम्र्य असलेली मांजरेही दिसतात. मात्र बेंगाल किंवा बॉम्बे अशी नावे असली, तरी याची नोंद अमेरिकन प्रजाती म्हणून आहे. साधारणपणे किमान ५ हजार ते कमाल ८० हजार या अशा किमतीत ही मांजरे मिळतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता.
आजच्या दिवशी १९४२ साली भारत छोडो चा ठराव पास करण्यात आला.
७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली.
चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा १२ कलमी होता. ८ ऑगस्ट, १९४२ च्या रात्री महात्मा गांधी, मिराबेन, कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले, तसेच पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोिवद वल्लभपंत यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते गोठविण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दरवर्षी मुंबईत ७ ऑगस्ट हा दिवस बेस्ट-दिन म्हणून साजरा केला जातो. उपनगरी रेल्वेच्या बरोबरीने मुंबईकर प्रवाशांची जीवनवाहिनी बनलेली 'बेस्ट' सेवा मुंबई महानगर पालिकेने ताब्यात घेतल्याला आज ७४ वर्षे पूर्ण झाली. मुंबईत वीज व ट्राम सेवा चालवण्याचा परवाना बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रामवेज या खाजगी कंपनीकडे होता. पण देशाला स्वतंत्र्य मिळायच्या आठवडाभर आधीच ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही कंपनी मुंबई महापालिकेने ताब्यात घेतली म्हणून 'बेस्ट दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुंबईत बेस्टने शहराच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम ते वातानुकूलीत बस असा मोठा प्रवास बेस्टने केलेला आहे. तर आता शहरात मोनो आणि मेट्रो ट्रेनही सुरु झाल्या आहेत. गेल्या दिडशे वर्षांमध्ये मुंबईने ही गतीमान प्रगती केली आहे.
खरंतर मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रामची कल्पना एका अमेरिकन कंपनीने १८६५ साली मांडली होती. त्या कंपनीला त्याचा परवानाही मिळाला होता. मात्र ती योजना प्रत्यक्षात आली नाही. बॉम्बे ट्रामवे कंपनी, महापालिका, 'स्टर्न्स अँड किटरेज' कंपनी यांच्यामध्ये करार करण्यात आल्यानंतर १९७३ साली बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. मुंबई प्रांतासाठी बॉम्बे ट्रामवेज अॅ क्ट १८७४ संमत करुन त्यानुसार बॉम्बे ट्रामवे कंपनीला ट्राम चालवण्याचे हक्क देण्यात आले. ९ मे १९७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. कुलाबा ते पायधुणी आणि बोरीबंदर ते पायधुणी अशा मार्गांवर धावलेल्या ट्रामसाठी केवळ तीन आणे भाडे ठरवण्यात आले मात्र कोणतेही छापिल तिकीट तेव्हा देण्यात आले नाही. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट कमी करुन ते दोन आणे करण्यात आले होते. नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापण्यात आली. स्टर्न्स अँड किटरेज कंपनीने ट्रामसाठी ९०० घोडे पाळल्याचे सांगण्यात येते.
इंग्लंडच्या 'ब्रिटीश इलेक्ट्रीक ट्रॅक्शन कंपनी'ने १९०४ साली विजेच्या वितरणाच्या परवान्यासाठी विनंती केली. त्यासाठी 'ब्रश इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग कंपनी'ने एजंट म्हणून काम पाहिले. 'बॉम्बे ट्रामवे कंपनी', 'मुंबई महानगरपालिका', 'ब्रश कंपनी' यांच्यामध्ये ३१ जुलै १९०५ रोजी करार होऊन हा परवाना देण्यात आला. १९०५मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनी'ची स्थापना करण्यात आली. १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करुन मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली तर १९२६ साली डबलडेकर ट्रामही शहरात आली. त्यानंतर या कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. १५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अपगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली. १९४७ साली कंपनीते नाव 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अॅंड ट्रान्सपोर्ट' (BEST) असे करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०१५ साली ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा करण्याचे घोषित करण्यात आला होते.
हातमाग उद्योगाला अच्छे दिन
खूप वर्षापूर्वी म्हणजे भारतात इंग्रज लोक येण्यापूर्वी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांच्यात आपापसातील व्यवहार हे फारच वेगळ्या पद्धतीची होती. कामाच्या मोबदल्यात धान्य द्यायची पद्धत खरोखरच लोकांना सर्व काही मिळवून देत होती. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला काम मिळत होते आणि त्याच्या मोबदल्यात खाण्यास लागणारे अन्नधान्य मिळत होते. शेतात उत्पादित झालेले धान्य त्याच गावात फिरत राहत होते. पैसा नावाची वस्तू त्यांना माहीतच नव्हते, त्यामुळे जो तो आपापली कामे अगदी चोख आणि व्यवस्थितपणे करीत असत. यांच्यासाठी गावात बारा बलुतेदार ही पद्धत आस्तित्वात आली होती. ज्यामुळे प्रत्येकाचे काम अगदी सहजपणे कुठलीही समस्या निर्माण न होता पूर्ण होत असे.
ज्याचे काम त्यानी करावे जसे की वारकांनी केस कापावी, वरटी लोकानी कपडे धूवावी,चांभारानी चपला शिवाव्यात,गुरवानी मंदिरांची देखभाल करावी, कुणब्यानी शेती करावी, साळयानी कपडे विणावी आणि रंगारी लोकानी त्यास रंग लावावी ही पद्धत लोकाना स्वावलंबी जीवन जगवायला शिकवायचे. मात्र इंग्रजानी भारतात व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू पाय पसरवीत संपूर्ण देशावर आपले वर्चस्व निर्माण केले. कपड्यांचा बाबतीत भारत हा स्वयंपूर्ण व संपन्न देश होता कारण येथील लोक फारच सुंदर कलाकूसर करून कपडे तयार करीत असत. आजही खादीचा कापड भारतात प्रसिद्ध आहे. त्या कापडाची वैशिष्ट्य म्हणजे हे कापड जाडजूड, टिकाऊ आणि अनेक वर्षे ते कापड फाटले तरी फाटत नव्हते.
उन्हाळ्याच्या दिवसात तर या कापडाला जास्तीची मागणी असते . भारताचा खरा कपडा म्हणजे खादीचा कपडा. हा कपडा खेड्यातील पद्मशाली समाजातील लोक हातमागावर विणून तयार करीत असत. आज ही ह्या समाजातील बरीच मंडळी हा उद्योग करतात. देशात आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात भिवंडी, सोलापूर, जालना, नांदेड, चंद्रपूर सारख्या ठिकाणी हा समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. या समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे कपडे विणणे ; परंतु इंग्रजांनी भारतात येऊन ज्याप्रमाणे इतर व्यवसायावर घाला घातला तसेच या हातमाग उद्योगांवर सुध्दा घाला घातला गेला.
इंग्रजांनी भारतात येऊन जाडजुड कपड्यांच्या जागी मऊ तलम व वजनाने हलकी वाटणारी टेरीकॉट कापड तयार करण्याची यंत्रणा आणली आणि या खादी उद्योगाला घरघर सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशीचा तीव्र लढा सुरू करण्यात आला होता. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकाने परदेशी कापडाच्या गाडीसमोर आपले बलिदान देऊन स्वदेशीचा लढा सर्वदूर पोहोचविला होता. याच दिवशी भारतात जागोजागी परदेशी कापडाची होळी करण्यात आली होती .
यावरून विदेशी कपड्याने भारतात किती मोठे साम्राज्य निर्माण केले होते, याची जाणीव होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी या खादी कपड्यांच्या उद्योगाला चालना मिळेल अशी छोटी आशा होती. मात्र झाले उलटेच. खादी उद्योगाला स्वातंत्र्यानंतर सुध्दा घरघर लागली. ज्या समाजातील लोकांचा हा मुख्य व्यवसाय होता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या लोकांना पोट भरण्यासाठी इतर कामाच्या शोधात भटकत रहावे लागू लागले यातूनच हा समाज जो पूर्वी एका ठिकाणी स्थिर होता तो संपूर्ण देशात पसरलेला दिसून येतो. तरी ही त्या॑नी मूळ व्यवसाय सोडलेली नाही. आज ही या समाजातील ४३ लाख हून अधिक लोक खास करून हातमागाचा व्यवसाय करतात.
ग्रामीण भागातील महिला आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणारी कुटूंबातील महिलांसाठी हाच व्यवसाय उदरनिर्वाहचे एक साधन आहे. या खादी व्यवसायास चालना मिळावी, प्रोत्साहन मिळावे, या राष्ट्रीय हॅण्डलूम दिवसा मुळे सरकारच्या या निर्णयाने भविष्यात खादी हातमाग उद्योगाला अच्छे दिन येतील असा विश्वास करण्यास काही हरकत नाही. आपण सर्व भारतीय नागरिकांनी देखील या उद्योगास चालना मिळावी म्हणून वर्षातून एक तरी खादीच्या कापडाचा पोशाख वापरावे, असे वाटते.
- नागोराव सा. येवतीकर
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
मंगलगाणी दंगलगाणी' पासून सुरू झालेला अशोक हांडे यांच्या चौरंग चा प्रवास आज पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
७ ऑगस्ट १९८७ रोजी सुरु झालेल्या 'चौरंग' या संस्थेने २०२१ पर्यत मंगलगाणी दंगलगाणी, गाने सुहाने, आजादी ५०, अमृत लता, मधुरबाला, अत्रे- अत्रे- सर्वत्रे, आवाज की दुनिया, माणिकमोती, गंगा जमुना, मराठी बाणा, मी यशवंत!, स्वर स्नेहल असे दर्जेदार कार्यक्रम रसिकांना बहाल केले आहेत. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यात दौरे केले.
लंडन, अमेरिका, दुबई, युरोप आदी ठिकाणी पण कार्यक्रम केले आहेत.
रंगमंचीय सांस्कृतिक विद्यापीठ, चैतन्याचा अखंड वाहणारा झरा, दैदिप्यमान कार्यक्रमांची शृंखला लाभलेल्या 'चौरंग' च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त अशोक हांडे, समस्त चौरंग परिवारातील सदस्य आणि सर्व रसिकांना अंतःकरणपूर्वक मंगलमय सदिच्छा व पुढील उज्ज्वल यशस्वी वाटचालीस अनेकोत्तम मंगलकामना.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
प्रसन्ना यांच्या गोलंदाजीचे विशेष असे होते की ते चेंडू ‘ लूपिंग ‘ पद्धतीने स्पिन करायचे . असेही म्हटले जाते त्यांचा चेंडू इतका फिरत येई की जर तो कानाजवळून गेला तर वेगळा विशीष्ट ‘ चेंडू फिरण्याचा ‘ आवाज येत असे.
६ ऑगस्ट १९२० साली पहिल्या स्थानिक सेन्सॉर बोर्डची मुंबईत स्थापना झाली. याच बरोबर कलकत्ता, मद्रास, व रंगून स्थानिक सेन्सॉर बोर्डची स्थापना केली गेली.
पहिले सेन्सॉर प्रमाण पत्र गोउमुंट कंपनी ला देण्यात आले.
अमेरिकेत हॉलीवूडमध्ये चलचित्राच्या सेन्सॉरशिपची पहिली घटना घडली १८९७ मध्ये जेव्हा जेम्स कॉर्बेट व रॉबर्ट फिट्झसिमन्स यांच्यातील हेवीवेट वजनी गटातील सामना दाखवायला बंदी घातली गेली होती. १९१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्युच्युअल फिल्म कॉर्पोरेशन वि. इंडस्ट्रिअल कमिशन ऑफ ओहायो यांच्यातील खटल्यात सिनेमा हा तद्दन व्यवसाय असल्याने त्यावर सेन्सॉरशिपला विरोध दर्शविला होता. मात्र, १९१५ ते १९५२ या काळात स्थानिक, राज्य व केंद्र सरकारी पातळीवर सेन्सॉरशिप लागू करण्याचे बरेच प्रयोग झाले. अमेरिकन शासनाने सेन्सॉर बोर्ड स्थापन करू नये यासाठी १९२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा वकील व वजनदार अशा विल हेज याच्या नेतृत्वाखाली प्रोड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशन (PDA) ही संघटना स्थापन झाली जिने शासनाने हस्तक्षेप करण्याआधी स्वतःच काही बंधने घालून घेतली. १९३४ साली जोसेफ ब्रीनच्या नेतृत्वाखाली प्रॉडक्शन कोड अॅडमिनिस्ट्रेशन (PCA) या संघटनेने १ जुलै, १९३४ पासून पुढे येणाऱ्या सर्व सिनेमांना प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. ब्रीनने हा कायदा अतिशय कडक व त्रासदायक केला.
तथाकथित नैतिकता व धार्मिकता पाळणे हे अक्षरशः बंधनकारक केले. पुढे १९५२ साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात PCA चा अधिकार खूपच कमी केला. हा निर्णय 'मिरॅकल' या सिनेमाशी संदर्भित खटल्याशी संबंधित असल्याने त्याला 'मिरॅकल डिसीजन' (जादुई निर्णय!) म्हटले जाते. यानंतर 'द मून इज ब्ल्यू' या १९५३ च्या सिनेमात Virgin, Seduce इ. शब्दांचा प्रथमच वापर करण्यात आला. जगभरातील बहुतांश देशांत चित्रपटाच्या सेन्सॉरशिपशी संबंधित कायदे व बोर्ड अस्तित्वात आहेत. भारतात पहिला सिनेमा १९१३ साली आला आणि सेन्सॉर बोर्डाची स्थापना १९२० साली झाली.
सिनेमेटोग्राफ एक्टच्या खाली सेंट्रल बोर्ड ऑफ़ सेन्सॉर ची १९५२ मधे स्थापना झाली. कालांतराने त्यात काही नवे बदल घडवून १९८३ मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ़ सर्टिफिकेशन असं नामकरण करण्यात आलं. आधी फक्त ‘यु’आणि ‘ए’अशी दोनच प्रमाण पत्रे दिली जायची..नंतर ती ‘यु’, ’यु/ए’, ’ए’ आणि ‘एस’ अशी विविध वयोगटानुसार,प्रेक्षकवर्गानुसार देण्यात येतात.मात्र हे देण्यासोबतच काही सीन्स, शब्द, वाक्यांना सेन्सॉर बोर्ड बिनबोभाटपणे कात्री लावते.प्रदर्शनाला बंदी घालते.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
६ ऑगस्ट १९४५ ची सकाळ ही जगाला हादरून टाकणारी सकाळ ठरली होती. या दिवशी अमेरिकेने जपानचे शहर अणुबॉम्बचा वापर करून उध्वस्त केले. याला आज ७४ वर्षे पुर्ण झाली.
उद्धवस्त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निर्माण होणा-या फिनिक्स पक्षासारखी पुन्हा झेप घेतली. आज संपूर्ण हिरोशिमा शहर एक नवं रूप घेऊन उभे आहे. आज कुणालाचा वाटणार नाही या शहरात, कधीकाळी अणुबॉम्ब फुटला होता आणि हे शहर बेचिराख झाले होते. हिरोशिमाही आज जपानमधील इतर शहरांसारखे विकसित झाले आहे. आपला भुतकाळ विसरून हे शहर प्रगती करत आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. चोहीकडे मोठमोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत. या शहराचा भुतकाळ विसरता येत नसला तरी वर्तमानामध्ये हे शहर आनंद आहे. उद्धवस्तो झालेल्या या शहरात आज दोन लाख नागरिक राहात आहेत. अणुबॉम्बने बेचिराख झालेले हिरोशिमा पुन्हा उभे राहिले आहे. विध्वंसाच्या पाऊलखुणा मात्र आज कुठेच दिसत नाहीत.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. त्यानंतर आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. जपानच्या शरणागतीची कलमे जाहीर करण्यासाठी अमेरिकेचे हॅरी ट्रमन, इंग्लंडचे चर्चिल आणि तैवानस्थित चँग कै शेक यांची बैठक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांमुळे लांबत होती. जगातील पहिली अण्वस्त्र चाचणी अमेरिकेने जुलै १६ रोजी केल्यानंतर ट्रमन यांनी ती बातमी २४ जुलै रोजी स्टालिन यांना दिली. हेरगिरीतून ही बातमी स्टालिन यांना आधीच कळाली होती. सोविएत रशियाने जपानवर हल्ला करण्याची जोरदार तयारी चालविल्याची बातमी ट्रमन यांनादेखील हेरगिरीतूनच कळाली होती. महायुद्धाने स्पर्श न केलेल्या हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची आज्ञा जनरल कार्ल स्पाट्झ यांना २५ जुलै रोजी मिळाली.
दुसऱ्याच दिवशी जपानला शरणागतीचा निर्वाणीचा इशारा देणारी ती लांबलेली बैठक जर्मनीतील पोस्टडॅम येथे झाली. त्याच दिवशी तो इशारा आणि इशारा न पाळल्यास ‘न भूतो..’ हानी करण्याची धमकी नभोवाणीवरून प्रथम इंग्रजीत आणि नंतर दोन तासांनी जपानी भाषेत जपानकडे पोहोचविली. राजनैतिक पातळीवरून हा इशारा मात्र जपानी शासनाला पोहोचविला नाही. रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला.
हिरोशिमानंतर तीनच दिवसांत नागासाकीवर अमेरिकेने असाच आणखी एक अणुबॉम्ब टाकला. पुन्हा तसाच नरसंहार झाला. काही दिवसांतच जपानने शरणागतीचे पांढरे निशाण फडकवले. दुसरे महायुद्ध संपले; ते अमेरिका व दोस्त राष्ट्रांनी जिंकले पण माणुसकी मात्र पराभूत झाली. आजच्या दिवशी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक जागवितात. ‘हिरोशिमा पुन्हा नाही’ असे म्हणत पुन्हा कधीही कोणीही अणुबॉम्बचा वापर करू नये अशी इच्छा व्यक्त करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti