वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इथे हरणं खूप. रस्त्याच्या कडेला, मोटारींच्या धडकेने मरून पडलेली हरणं हे तर कायमच दिसणारं दृश्य. संध्याकाळी, रात्री गाडी चालवताना त्यांचं भान ठेवावं लागतं. बहुतेक सारा रस्ता दाट झाडीतून आणि माळरानांतून जाणारा. त्याला काही ठिकाणी रस्त्याच्या कडेचं कुंपण, पण बराचसा भाग कुंपणाशिवायचा. त्यामुळे हरणांना रस्त्त्यावर यायला काहीच अडचण नसते. संध्याकाळच्या उतरत्या उन्हात, एखाद्या टेकडीच्या उतारावर, चार-पाच हरणांचा कळप चरतांना बरेचदा नजरेस पडतो. चरता चरता बरेचदा हरणं रस्ता ओलांडून पलीकडे जातात. कधी कधी गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात, एखादं चुकार हरीण अवचीत् रस्त्यात उभं असलेलं दिसतं. अचानक आलेल्या प्रकाशझोतामुळे आंधळं झालेलं ते हरीण, कावरंबावरं होऊन गोंधळल्यासारखं जागच्या जागी उभं रहातं आणि मग अचानक भानावर येऊन लांब उडी मारून बाजूच्या अंधारात मिसळून जातं. काही वेळा रस्त्याच्या कडेला, गाडीच्या दिव्याच्या झोताच्या किनार्याशी, काजव्यासारखे डोळे चकाकतात आणि अंधारात हरणं स्तब्ध उभी आहेत असं लक्षात येतं. बहुतेक ड्रायव्हर्स सावधपणे गाडी चालवत असतात आणि हरणांना रस्ता ओलांडू देतात; पण कधी कधी गाडी पटकन थांबवता येत नाही किंवा बावचळलेलं हरीण नेमकं गाडीवर येऊन थडकतं. माझ्याच गाडीवर दोनदा अशी हरणं येऊन थडकली होती; सुदैवाने दोन्ही वेळां फारशी दुखापत न होता, ती हरणं उठून पळून जाऊ शकली.
बहुतेक वेळां कळपांमध्ये फक्त माद्या आणि पिल्लंच दिसतात. एकदा मात्र मला एक एकांडा नर दिसला होता. सकाळी १०-१०॥ च्या सुमारास मी लॅबला चाललो होतो. रस्ता मोकळा होता. अचानक माझ्या पुढ्यात सुमारे १०० फुटांवर, बाजूच्या झाडीतून एक चांगला डौलदार, शिंगवाला नर बाहेर आला आणि रस्त्यावर चालूं लागला. त्याची पाठ माझ्याकडे होती. मी गाडी हळू केली. त्याने एकवार मागे वळून माझ्या गाडीकडे पाहिलं मग दोन्ही बाजूला मान वेळावून अंदाज घेतला आणि एक मोठी झेप घेऊन, जसा आला तसाच तो बाजूच्या झाडीत नाहीसा झाला.
**
तब्बल तीन वर्षं या यु.एस.रूट नंबर ६ वर मी आठवड्यातले पाच-सहा दिवस ये जा केली. दिवसा रात्रीच्या बहुतेक सर्व वेळा आणि ऋतुचक्राच्या सार्या चाकोरीतून या यु.एस.रूट नंबर ६ची सारी रूपं बघीतली. रोज बघून बघून, रस्त्यावरचे चढ उतार, वळणं, आजूबाजूचा परिसर, ठरावीक झाडं, शेतं, सारं काही परिचयाचं होऊन गेलं. तरी देखील हा इतका ओळखीचा झालेला रस्ता, रोज नव्या वळणावर एक नवं रूप सादर करून मला विस्मीत करून सोडायचा. त्याच्या नित्य नव्या अविष्कारानं शेवटच्या दिवसापर्यंत मला मोहीत करून सोडलं.
मोठाल्या शहरांतल्या रस्त्यांवर आपण कधीच एकटे नसतो. सहप्रवाशांची गर्दी, वाहनांची झुंबड़, एकंदर कोलाहलाने आपलं आणि रस्त्याचं असं नातं कधी फारसं जुळतच नाही. किंबहुना रस्ता म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्याचं निर्जीव साधन असतं. गर्दीच्या लोंढ्याबरोबर तो निर्जीव रस्ता शेअर करून आपण नुसते यंत्रासारखे पळत असतो. परंतु यु.एस.रूट नंबर ६ वर माझ्या गाडीतून प्रवास करताना, रोजचा दीड तास मी एकट्याने या रस्त्याच्या सहवासात घालवला. तुरळक वाहतूक, गर्दीचं नामोनिशाण नाही, कर्कश्श कोलाहल नाही आणि आजूबाजूला बघावं तिकडे निसर्गाचं नित्य नवं रूप! त्यामुळे यु.एस.रूट नंबर ६चा, हा ३०मैल लांबीचा छोटासा तुकडा मला माझा वाटावा, यात काही नवल नाही.
३२०५ मैल लांबीच्या, १४ राज्यांतून जाणार्या आणि अटलांटिक महासागरापासून ते पॅसिफिक महासागरापर्यंत जाणार्या, ह्या यु.एस.रूट नंबर ६ वर, कधी तरी या टोकापासून त्या टोकापर्यंत गाडीने प्रवास करण्याची माझी जबरदस्त इच्छा आहे. माझ्या माहितीतल्या त्या छोट्याश्या ३० मैलाच्या तुकड्यासारखाच सारा यु.एस.रूट नंबर ६ सुंदर आहे का, हे जाणून घेण्याचं मला मोठंच कुतूहल आहे. पण तो प्रवास करेपर्यंत, माझ्या परिचयाचा हा “माझा यु. एस. रूट नंबर ६”, मला “मर्मबंधातल्या ठेवीसारखा” जपून ठेवायचा आहे.
१९४० च्या दशकापर्यंत घरगुती स्वरूपाची, नवरा-बायको मिळून चालवणारी किरकोळ किराणामालाची दुकाने ठायी ठायी असायची. या दशकाच्या उत्तरार्धात खाद्य संस्कृतीच्या किरकोळ विक्रीच्या अंगाचे खर्या अर्थाने व्यापारीकरण सुरू झाले. निरनिराळ्या सुपर मार्केट्सच्या शाखा, मोठ्या आणि मध्यम वस्तीच्या शहरा-गावांमधे उघडू लागल्या. १९७० सालापर्यंत अनेक छोट्या स्थानिक सुपर मार्केट्सचं एकत्रीकरण होऊन त्यांच्या मोठमोठ्या देशव्यापी साखळ्या झाल्या होत्या.
ही प्रक्रिया ९० च्या दशकाच्या सुरवातीच्या काही वर्षांपर्यंत अनिर्बंध चालू होती. वॉलमार्टने तोपर्यंत किरकोळ विक्रीच्या क्षेत्रामधे आपले अढळ स्थान निर्माण केले होतेच. आपल्या प्रचंड मोठ्या पसार्याचा अचूकपणे फायदा उठवीत, अल्पावधितच वॉलमार्टने ‘अमेरिकेतील सर्वात मोठे किरकोळ अन्नाचे विक्रेते’, हा किताब आरामात पटकावला. याला प्रत्युत्तर म्हणून, इतर मोठमोठ्या देशव्यापी सुपरमार्केटच्या साखळ्यांनी, छोट्या छोट्या स्थानिक साखळ्यांना विकत घेऊन किंवा इतर मोठ्या साखळ्यांशी हातमिळवणी करून, स्वत:चा मार्केटमधला हिस्सा वाटण्याचा सपाटा लावला. याचा परिणाम म्हणजे आज अमेरिकेतले निम्म्याहून अधिक खाद्यपदार्थांचे नियंत्रण फक्त सहा अवाढव्य साखळ्या करत आहेत.
अशाच स्वरूपाची प्रक्रिया “घरापासून दूर” (away from home) या खाद्य संकल्पनेच्या क्षेत्रात झाली. आता ठायी ठायी दिसणार्या मॅकडोनल्डच्या सोनेरी कमानींचा, १९५० च्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षांमधे प्रसार वाढू लागला. हळू हळू त्यांनी स्थानिक रेस्टॉरंट्सचा व्यवसाय काबीज करायला सुरुवात केली. पिझ्झा हट आणि कॆंटकी फ्राईड चिकन (KFC) सारख्या प्रतिस्पर्ध्यांनी फारसा वेळ न गमावता, मॅकडोनल्डच्या पावलावर पाऊल ठेवून ठिकठिकाणी आपले झेंडे रोवायला सुरुवात केली. या प्रकारच्या रेस्टॉरंट्सचे पेव फुटायला हातभार लावला तो गृहिणींनी ! त्यासुमारास ‘चूल आणि मूल’ हे आपलं परंपरागत कार्यक्षेत्र सोडून, महिला मोठ्या प्रमाणात कामानिमित्त घराबाहेर पडायला लागल्या होत्या. घराबाहेर पडून विविध कार्यक्षेत्रांची वाट चोखाळू पहाणार्या आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगू पहाणार्या या महिला वर्गाने या नवीन प्रकारच्या रेस्टॉरंट्सना मोठाच आश्रय दिला. आज अमेरिकेत अन्नावर खर्च होणार्या एकूण डॉलर रकमेपैकी निम्मी रक्कम ही अशा ‘घरापासून दूर’ खाल्लेल्या अन्नावर खर्च होते. त्यातही विशेष म्हणजे या ‘घरापासून दूर’ अन्नावर खर्च केलेल्या रकमेपैकी, अर्धीअधिक रक्कम ही फास्ट फूडवर खर्च होते. ‘घरापासून दूर’ या अन्न संकल्पनेच्या क्षेत्रात देखील काही मोजक्याच मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी दिसून येते. उदाहरणार्थ Yum! Brands Inc ही कंपनी, पिझ्झा हट , KFC, टाको बेल, लॉंग जॉन सिल्व्हर्स आणि A & W रेस्टॉरंट अशा पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सच्या साखळ्या नियंत्रित करते. अशाप्रकारे शेकडो, हजारो रेस्टॉरंटसवर नियंत्रण ठेवणार्या कंपन्या किती प्रभावशाली असतील याची कल्पनाच केलेली बरी!
-- डॉ. संजीव चौबळ
तसं बघायला गेलं तर भारत हा प्रगतीशील देश तर अमेरिका म्हणजे अतिप्रगत देश. आपल्याकडे ग्रामीण भागातून शहराकडे वळणारा ओघ हा तसा गेल्या काही दशकांतला. आपली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या २८%, तर अमेरिकेतली शहरी लोकसंख्या ही एकूण लोकसंख्येच्या तब्बल ८२%. थोडक्यात म्हणजे अमेरिका हा एक बहुतांशी शहरी / नागरी लोकवस्तीचा देश आहे. पण जसं मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोरू, कोलकोता म्हणजे भारत नाही तसंच न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी.सी., लॉस एंजेलीस, शिकागो, ह्युस्टन म्हणजे अमेरिका नाही. या छोटया मोठया अतिप्रगत, अद्ययावत, नागरी, शहरी केंद्रांच्या अल्ल्याड पल्ल्याड दुसरी देखील एक अमेरिका विखुरलेली आहे. परंतु एकंदरीत अमेरिकेबद्दलची आपली कल्पना इतकी ठरावीक आणि साचेबंद असते की त्यापलीकडे जाऊन बघण्याची आपल्याला फारशी जिज्ञासा नसते. ‘आपल्या आसपासच्या किंवा कल्पनेतल्या झगमगीत, रंगीबेरंगी, बेगडी, भोगवादी, चंगळवादी अमेरिकेच्या पडद्याआड काही आहे का ? साधंसुधं दैनंदिन जीवन जगणारी, शेतात राबणारी, खाणीत काम करणारी, आपल्या पंचक्रोशीच्या बाहेरचं फारसं जग न बघितलेली, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, टंचाईने ग्रासलेली, कष्टकरी, देवभोळी अशी एखादी अमेरिका आहे का ?’ असे प्रश्न आपल्याला सहसा पडत नाहीत.
मला देखील हे प्रश्न पडले नसते. परंतु माझे कार्यक्षेत्र पशुपालनाशी निगडीत असल्यामुळे, आमचे अमेरिकेतील वास्तव्य हे मुख्यत्वे ग्रामीण / निमग्रामीण भागात झाले. आम्ही आयोवा, कनेक्टिकट आणि पेनसिल्व्हेनीया या तीन राज्यांमधे प्रत्येकी दोन ते चार वर्षे राहिलो. यातील आयोवा आणि पेनसिल्व्हेनीया ही बहुतांशी ग्रामीण राज्ये तर कनेक्टिकट हे थोडे आधुनिक आणि औद्योगिकीकरण झालेले राज्य. परंतु त्यात देखील ‘लॅंड ग्रॅंट स्टेट युनिव्हर्सिटी’ म्हटली की ती सहसा ग्रामीण भागातच असायची. त्यामुळे आमचे कनेक्टिकटमधले वास्तव्य देखील तसे निमग्रामीण भागातच झाले. ही तीनही राज्ये अमेरिकेच्या ईशान्य (Northeast) आणि उत्तर मध्य (Upper midwest) भागात येतात. या सर्व ठिकाणी हवामान साधारण सारखेच. तशीच कडाक्याची थंडी आणि ऋतुमान देखील तसेच. कामानिमित्ताने आणि पर्यटनासाठी आजूबाजूच्या म्हणजे व्हरमॉंट, मॅसेच्युसेट्स, न्यूयॉर्क, न्यूहॅंपशायर, साउथ डाकोटा, मिनेसोटा, विस्कॉनसीन, नेब्रास्का, मिसुरी वगैरे राज्यांतून फिरणे झाले होते. पण ही देखील राज्ये बहुतांशी ग्रामीण आणि शेतीप्रधान.
त्यामुळे आमच्या पाहण्यातली ग्रामीण अमेरिका ही मुख्यत्वे ईशान्य (Northeast) आणि उत्त्तर मध्य (Upper midwest) या भागांतली. अमेरिकेच्या पश्चिम किंवा दक्षिण भागांत फिरायचा योग अजून फारसा आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण अमेरिकेचे हे वर्णन सर्वच ठिकाणी लागू होईल असे समजणे चूक ठरेल. हा खंडप्राय देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या तिप्पट. भौगोलिक आणि नैसर्गिक वैविध्याने संपन्न. त्यामुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाबद्दलचे लिखाण हे सर्वसमावेशक असेल असे मानणेच मुळी गैर. किंबहुना कोणत्याही देशाबद्दल आणि त्यातही अमेरिकेसारख्या खंडप्राय देशाबद्दल लिहीणं म्हणजे आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडून त्याचं वर्णन करण्यासारखं आहे.
सात आठ वर्षांत मला ग्रामीण अमेरिका समजली, असे मला अजिबात म्हणायचे नाही. किंवा ग्रामीण अमेरिकेच्या भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अंगांवर विद्वत्तापूर्ण आणि अधिकारवाणीने लिहिण्याचा आव देखील मला आणायचा नाही. या लिखाणांत, अमेरिकेच्या आणि भारताच्या ग्रामीण जीवनाची किंवा शेती व्यवसायाची तौलनिक मिमांसा नाही किंवा कसली तात्विक चर्चा नाही. हे एका मध्यमवर्गीय, भारतीय आणि मराठी माणसाने कुतुहलाने केलेलं अमेरिकेच्या ग्रामीण भागाचे वर्णन आहे.
काही लिहायचे, असा संकल्प सोडून काही इथे आलो नव्हतो. लिहिण्यासाठी विषय शोधण्यासाठी आडवाटेला गेलो नव्हतो. परंतु कामाच्या, व्यवसायाच्या स्वरूपामुळे ग्रामीण / निम ग्रामीण भागात झालेला प्रवास आणि वास्तव्य जसंजसं वाढूं लागलं तसतसं या सर्वस्वी वेगळ्या विश्वाचे धागेदोरे माझ्यापुढे उलगडू लागले. हे जीवन सगळ्यांनाच आवडेल असे नाही. आडवाटेच्या लहानशा गावात, आधुनिकतेपासून काहीसे मागे, शहरी सुखसोयींपासून दूर, असं राहणं कोणी आपणहून पसंत करेल असं देखील वाटत नाही. किंबहुना शहरी लोकांना या आयुष्याचा पटकन उबग येईल. सहसा कोणाच्या वाट्यास न येणारा हा ग्रामीण अमेरिकन जीवनाचा अनुभव आम्हाला उपभोगता आल्यामुळॆ, तो इतरांपर्यंत पोहोचवून बघावा असा विचार सुमारे दोन वर्षांपासून माझ्या मनात घोळू लागला. अमेरिकेमध्येच परंतु मोठमोठ्या शहरांमधे रहाणार्या मराठी लोकांना ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू उमजावा आणि भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना वास्तवाचे थोडे भान यावे, हा त्या मागचा उद्देश. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे हा आंधळ्या माणसाने हत्ती चाचपडण्याचा प्रकार आहे. जे काही बघितलं, समजलं, उमजून घ्यायचा प्रयास केला, ते शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न !
पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र.
मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी रंग बर्फाच्या आवरणाखालून डोकं वर काढायला लागलेला असतो; पोपडे पडलेल्या भिंतीखालचा जुना रंग दिसावा तसा. जागोजागी वितळलेल्या बर्फाखाली, सुकलेल्या गवताचे पिवळे तुकडे इतस्तत: दिसत असतात. झाडांच्या फांद्या देखील अंगावरचं बर्फ झटकून पुन्हा तरतरीत होत असतात.
हळूहळू पिवळ्या गवतावर हिरव्या छटा चढायला लागतात. झाडांच्या बुंध्यांच्या पायथ्याशी, झुडपांच्या काटक्यांचे जंगल माजलेले असते. या उघड्या, बोडक्या, सुकलेल्या तपकिरी काटक्या, एकाएकी टोकाकडे हिरवट पिवळ्या व्हायला लागतात. काही ठिकाणी जुनाट काटक्यांच्या टोकाला नवीन पिवळ्या पोपटी नाजुक वेलांट्या उमलतात. हा पिवळा रंग अगदी डोळ्यात भरण्याएवढा गर्द असतो. आणि हे रंगायतन इतक्या अचानक होतं की काल परवापर्यंत रुक्ष, तपकिरी, वठल्यासारखी वाटणारी झुडपं, एकाएकी सजीव आणि तजेलदार दिसायला लागतात. अशातच एके दिवशी अचानक, पोपटी रंगाचे शिंतोडे पडल्यासारखी छोटी छोटी पाने अवतरतात.
झाडांच्या टोकांच्या बारीक फांद्या लाल गुलाबी कळ्यांनी (buds) मोहरून जातात. कळ्यांनी लगडलेल्या झाडांच्या दाट गर्दीमुळे, डोंगरांवर गुलाबी छटा दिसायला लागते. गुलाबी रंगाने रंगून गेलेल्या फांद्यांची टोकं आणि झाडांच्या पायतळींच्या झुडपांचा पोपटी रंग यामुळे झाडांनी गुलाबी फेटे आणि पोपटी मोजे असा मजेशीर पोशाख केल्यासारखं वाटायला लागतं. ‘वीपींग विलो’ च्या झाडाचे लोंबणारे झुपके पोपटी होतात. सर्व झाडांमधे या झाडावर वसंताचा स्पर्श प्रथम जाणवतो. वितळलेल्या बर्फामुळे बर्याच झाडांचे बुंधे आणि फांद्या, शेवाळाने माखून गेलेल्या असतात.
डोंगरकड्यांच्या दगडांच्या मधून आलेलं गवत देखील हिरवटसर व्हायला लागलेलं असतं. दगडांच्या पुढे आलेल्या टोकांखाली, जिथे थिजलेल्या बर्फाचे लोलक झाले होते, ते वितळून नुसताच पाण्याचा ओलावा राहिलेला असतो आणि त्यात शेवाळाची हिरवट झाक डोकवायला लागलेली असते.
हळू हळू रान रंगू लागतं. रुक्ष करड्या तपकिरी रंगाचा एकसुरीपणा जाऊन, हिरव्या, पोपटी रंगाच्या विविध छटा जागो जागी दिसू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाची झाक गडद होऊन किरमिजी रंगाची होते. वर्षभर हिरवे रहाणारे सूचिपर्ण वृक्ष, आपले गडद हिरवे पिसारे फुलवून, नेहमीच्याच दिमाखात उभे असतात. त्यांच्या आगे मागे, नवीन पालवी फुटणारी पानगळीची झाडं, आपल्या नव्या नवलाईचं कौतुक अंगाखांद्यावर लेवून उभी असतात. झाडांच्या या सरमिसळीकडे पाहून, पिढीजात श्रीमंतांच्या वडिलोपार्जित वाड्यांच्या आसपास, नवीनच हातात पैसे खुळखुळू लागलेल्या चाकरमान्यांनी रंगीबेरंगी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उठवावेत तसं वाटतं. म्हातार्या आजी आजोबांचं सुनसान घर एकदम मुला नातवंडांनी भरून जावं, लेकी सुनांनी नव्या कोर्या साड्या नेसून लगबग करावी आणि नातवंडांनी घरभर गोंधळ घालावा तसे डोंगर गजबजून जातात.
एप्रिल मे मधे इथे भरपूर पाऊस पडतो. पण पाऊस आपल्या मान्सूनसारखा धुवाधार नाही. मधून मधून सरी तेवढ्या येऊन जातात. या सीझनमधे चेरी ब्लॉसम, क्रॅब अॅपल, मॅग्नोलिया, डॉगवूड वगैरे झाडांवर फुलांचा बहर येतो. या झाडांवर तोपर्यंत पानांचा मागमूस नसतो. नुसत्या फांद्या, काटक्या आणि फुलांची लयलूट ! पण हा बहर जेमतेम २-३ आठवडे टिकतो. हळू हळू फुलं सुकून पडायला लागतात आणि फुलांच्या भरगच्च संभारात जिथे जिथे मोकळी जागा होईल तिथे तिथे हिरवी पाने दिसायला लागतात. फुलांची आणि पानांची जणू रस्सीखेच सुरू असते. शेवटी हिरवाई वरचढ ठरू लागते. झाडाझुडपात दिमाखात डुलणारी फुले जमिनीवर लोळण घेऊ लागतात. पुढचे काही दिवस झाडांच्या पायतळी ह्या गळून पडलेल्या फुलांचे गालिचे पडून राहिलेले असतात. एकदा हे गालिचे वार्यावर उडून गेले किंवा पाचोळ्याचा भाग होऊन मातीत एकजीव होऊन गेले की सारे संपले. त्यानंतर पुढचे ५-६ महिने, नुसत्या हिरव्या पानांचा भार वागवत झाडं उभी रहातात. जणू एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात, मोठ्या माणसांच्या आधी लहान पोराटोरांचे कार्यक्रम उरकून घेतले जावेत, तसे पानांचं साम्राज्य पसरायच्या आधी, फुलांची रंगी बेरंगी होळी उरकून घेतली जाते.
सामिष किंवा आमिष खाद्य संस्कृती ही झाली शेती व्यवस्थापनाची अंतिम पायरी. परंतु खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण जितक्या झपाट्याने झाले त्यामानाने प्रत्यक्ष शेती व्यवसायाचे औद्योगीकरण बर्याच धीमेपणाने झाले. याची सुरुवात झाली ती शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला तेव्हापासून. परंतु या बदलाची झळ जाणवण्यासाठी विसावे शतक निम्मे सरून जावे लागले. दुसर्या महायुद्धानंतर खर्या अर्थाने शेतकी व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपाने अमेरिकन शेतीचा आणि त्यायोगे एकंदरीत ग्रामीण अमेरिकेचाच चेहरा मोहरा बदलून टाकला. महायुद्धाच्या समाप्तीनंतर, युद्धसाहित्यासाठी लागणार्या रासायनिक उद्योगांचे, तत्परतेने शेतीसाठी लागणार्या रासायनिक खतांच्या कारखान्यात परिवर्तन करण्यात आले. रासायनिक खतांच्या सढळ वापरामुळे वाढणार्या शेती उत्पादनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी, शेतीव्यवसायाला नियोजनबद्ध व्यवस्थापनाची आणि अधिकाधिक यांत्रिकीकरणाची गरज भासू लागली. यामुळे शेती उत्पादन अधिकाधिक साचेबद्ध आणि एकसुरी होत गेले खरे आणि त्यातच तेलबिया, धान्य, गुरं, कोंबड्या, पालेभाज्या, फळं अशा विविध आणि संमिश्र उत्पादन करणार्या छोट्या छोट्या कौटुंबिक फार्म्सच्या र्हासाची बीजं रोवली गेली.
संपूर्ण विसावं शतकभर रासायनिक, जैविक, यांत्रिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शेती उत्पादनाची कमान सतत चढतीच राहिली. त्यामुळे भरमसाठ उत्पादन, त्यातून शेतीमालाच्या पडणार्या किंमती आणि त्यातून उद्भवणारी शेतकर्यांवरची आर्थिक बिकट संकटे, अशा दुष्टचक्रांची आवर्तनं ठरावीक कालावधीनंतर येतच राहिली. बहुतेक नवीन तंत्रज्ञानाचा भर हा महागडी उपकरणं, अवजड आणि मोठाली यंत्रसामग्री, लांब आवाक्याची फवारणी यंत्रणा, अशा साधनांच्या जोरावर उत्पादन वाढवण्यावर असायचा. अर्थात अशा गोष्टींचा लाभ छोट्या शेतकर्यांपेक्षा मोठ्या शेतकर्यांनाच अधिक व्हायचा. याचा परिणाम म्हणजे येणार्या प्रत्येक नव्या आरिष्टाबरोबर हजारो, लाखो छोटे शेतकरी शेती व्यवसायातून उठवले जायचे आणि त्यांची जमीन गिळंकृत करुन मोठे फार्म्स अधिकाधिक मोठे होत जायचे.
औद्योगिकरणाची अंतिम पायरी म्हणजे ‘उभे एकत्रीकरण’ (vertical consolidation); जे उत्पादनाच्या विविध टप्प्यांमधे किंवा कार्यात्मक स्तरांवर (between stages or levels) होते. यात उत्पादनाच्या बरोबरच प्रक्रिया (processing), वितरण आणि किरकोळ विक्रीचा देखील समावेश होतो. याच्या उलट ‘आडवे एकत्रीकरण’ (horizontal consolidation) हे उत्पादनाच्या विविध टप्प्यांअंतर्गत (within stages) होते. अमेरिकन खाद्य संस्कृतीमधे ‘आडवे एकत्रीकरण’ प्रथम सुरू झाले ते अन्नपदार्थांच्या प्रक्रियेच्या (food processing) क्षेत्रामधे आणि त्यानंतर हे लोण किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात देखील पोहोचले. शेतीच्या क्षेत्रात आडव्या एकत्रीकरणाची प्रक्रिया त्यामानाने लवकर सुरू झाली परंतु तिची प्रगती मात्र संथ गतीने होत गेली.
ज्या कंपन्यांनी आडव्या एकत्रीकरणामधे आपले प्रस्थ निर्माण केले होते त्या कंपन्यांना ‘उभे एकत्रीकरण’ करण्याची उत्तम संधी होती. उदाहरणार्थ अन्न पदार्थांवर प्रक्रिया करणार्या सर्वात मोठ्या कंपन्यांनी स्वत:चं कार्यक्षेत्र केवळ प्रक्रियेपुरतं मर्यादित न ठेवता, सर्वप्रथम उत्पादनाच्या आणि वितरणाच्या क्षेत्रात देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. अगदी १९३० च्या दशकात देखील भाजीपाल्यावर प्रक्रिया करणार्या कंपन्यांनी स्वत: देखील भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रात उडी घेतली होती. एवढंच नव्हे तर इतर स्वतंत्र भाजीपाला उत्पादकांशी करार करून त्यांचे सारे उत्पादन विकत घेण्याची प्रथा देखील सुरू केली होती. सरतेशेवटी अन्न पदार्थांवर प्रक्रिया करणार्या मोठमोठ्या कंपन्यांनी उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधल्या घाउक विक्रेत्याला घरी बसवले आणि त्यांच्या पायाभूत सुविधां (infrastructure) च्या जागी स्वत:चे बांधील विक्रेते, स्वत:च्या मालकीची अद्ययावत गोदामे, आणि शीतगृहे, मालाच्या वाहतुकीसाठी ट्रक्स आणि मालगाड्यांचा ताफा, असा सारा कारभार उभा केला. स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी आणि संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी या कंपन्यांनी दोन मार्गांचा अवलंब केला. एक म्हणजे सर्व कारभारावर स्वत:चा मालकी हक्क प्रस्थापित करायचा, दुसरा म्हणजे स्वत: उत्पादनाची जबाबदारी न घेता वेगवेगळ्या फार्म्सबरोबर सर्वसमावेशक असे करार मदार करायचे. या दुसर्या प्रकारामधे उत्पादनाची जबाबदारी वेगवेगळ्या फार्म्सच्या गळ्यात टाकून त्यांचे सारे उत्पादन बांधून घ्यायचे अशी पद्धत असते. मांस उत्पादनाच्या क्षेत्रामधे हा दुसरा प्रकार अधिक प्रचलित झालेला दिसून येतो.
-- डॉ. संजीव चौबळ
“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक..... “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल...
“मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.
सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.
अमेरिकेत दहा वर्षाहून जास्त काळ ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या डॉ.संजीव चौबळ यांनी तिथल्या ग्रामीण जीवनाचं सुंदरसं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. आजकाल मुंबई-महाराष्ट्रात वास्तव्याला असणार्या बहुतांशी मराठी माणसांचाही मराठीत लिहिण्याचा (आणि बोलण्याचाही) सराव हद्दपार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.संजीव चौबळ यांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे इतका मोठा काळ अमेरिकेत घालवूनही त्यांची आपल्या मातृभाषेची नाळ तुटलेली नाही. पुस्तकाचं हस्तलिखित पाहिल्यावर प्रथमदर्शनीच त्याची साक्ष पटली. अत्यंत स्पष्ट आणि सुवाच्य अक्षर, खाडाखोड तर अजिबात नाही. भाषाही सुंदर आणि हवी तिथे अलंकारिकही.
या पुस्तकावर संपादकीय प्रक्रिया करताना काही बाबी ठरवून ठेवल्या होत्या. लेखक दशकभरापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रात वास्तव्य करत नसतानाही त्याने केलेला प्रयत्न स्तुत्य आहेच. त्यामुळेच शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या चौकटीत संपूर्ण पुस्तक बसवताना या बाबींचा अतिरेकी आग्रह मुद्दामहून टाळला आहे. काही ठिकाणी बोली भाषा मुद्दामहून तशीच ठेवली आहे.
दोन-चार महिने परदेशातील मुलाबाळांकडे वास्तव्याला जाऊन आल्यावर मराठीत बोलताना फाडफाड इंग्रजी शब्दांची पेरणी करणार्या “फॉरेन रिटर्नड” पालकांकडे बघितलं तर अमेरिकेतील घरातही मराठीतच बोलणार्या चौबळांच्या कुटुंबाचंही कौतुक करावसं वाटतं. पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होता आणि म्हणूनच “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाची निर्मिती एक वेगळा आनंद देऊन गेली.
आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.
प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्या आणि लिहू इच्छिणार्याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!
निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
पाऊस जणू आपल्या बरोबर हिरव्या रंगाचे डबे घेऊन येतो आणि रानावनात ओतत राहतो. रानांत पाचूचा चुरा उधळावा तसं कोवळ्या पानांनी फुललेलं रान सजू लागतं. ठिपक्यां एवढी पानं कले कलेने वाढत, रुपयाच्या नाण्याएवढी, वाटीएवढी किंवा हाताच्या पंजापेक्षा मोठी होत जातात. जमिनीवर हिरव्या गवताचं साम्राज्य पसरतं तस तसे, वाढणार्या हिरव्या गवतात आधीच्या वर्षात गळून पडलेली सुकलेली पानं, काटक्या, फांद्या झाकून जातात. काही मोडून पडलेल्या फांद्यांना देखील नवीन पालवी फुटलेली असते. जमिनी लगतचे दाट गवत, त्यावर १०-१५ फुटांपर्यंतची जागा व्यापून टाकणारी झुडपांची गच्च दाटी आणि त्या गर्दीतून माना वरती काढून, त्यावरचे ६०-७० फूट व्यापून टाकणारी झाडांची न संपणारी भिंत, असा तिपेडी हिरवा वेढा आसमंतात पडून जातो. पावसाने ओली झालेली झाडांची खोडं, काळी भोर दिसत असतात. त्या दणकट काळ्या सरळसोट बुंध्यांच्या, फांद्यांच्या पार्श्वभूमीवर, नव्याकोर्या नाजुक पानांचा चैतन्यपूर्ण हिरवा रंग मोठा खुलून दिसत असतो.
डोंगर झाडीने भरून जातात. महिन्याभरापूर्वींपर्यंत निष्पर्ण वृक्षांनी भरलेले मातकट रंगाचे डोंगर आणि टेकड्या आता हिरव्यागार झालेल्या असतात. एखाद्या हडकुळ्या मुलाच्या अंगावर चांगलं खाऊन पिऊन मांस चढावं तसं रसरशीत पानांनी लगडलेल्या झाडांमुळे डोंगर देखील अंग भरल्यासारखे वाटायला लागतात. झाडी एवढी दाट की फांद्या एकमेकात मिसळून त्यांचं एक छ्प्पर होऊन जातं. त्यात झाडं पानांनी भरून गेली की दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणं मुश्कील! डोंगरांच्या रांगां मागून रांगा नुसत्या गच्च झाडीने व्यापलेल्या. एखाद्या माकडाला एखाद्या झाडावर चढवलं, तर मैलोन मैल जमिनीवर पाय न लावता पालथं घालू शकेल अशी परिस्थिती! एखाद्या उंचश्या ठिकाणाहून, गर्द राईने भरून गेलेल्या या डोंगर टेकड्यांच्या मुलखावर नजर टाकली की एखादं अजस्त्र जनावर आपलं वळ्यावळ्यांचं अंग पसरून पहुडल्यासारखं वाटतं. त्याची हिरवी चामडी खवल्या खवल्यांनी भरून गेलेली असते. आणि या निबर जाड चामडीवर एखादा ओरखडा उठावा तसा झाडीतून गेलेला रस्ता दिसत असतो. पावसाळ्यातला ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो. ढगांच्या सावल्या डोंगरावरून सरकत असल्या की ऊन सावलीचे तुकडे एकमेकांचा पाठलाग करत धावतायत असं वाटायला लागतं.
माझ्या लॅबपासून घरापर्यंतच्या रस्त्यात जवळ जवळ ५-७ मैलांचा एक भाग असा आहे की सस्कुहाना नदी, रस्ता आणि एक रेल्वे लाईन एकमेकांना समांतर धावत असतात. रस्ता डोंगरावरून जात असतो. रस्त्याच्या एका बाजूला डोंगराचा अधिक उंच भाग, त्यानंतर रस्ता, रस्त्याच्या दुसर्या अंगाला छोटीशी दरी, त्या झाडीतून जाणारी रेल्वे लाईन, त्याच्यापलीकडे सस्कुहाना नदी, नदीच्या अल्याड पल्ल्याड झाड झडोरा आणि त्याच्याही पलीकडे गवताळ माळ. ही आडबाजूची कुठलीशी छोटीशी रेल्वे लाईन असावी, कारण फारच कमी वेळा इंजीनगाड्या ये जा करताना दिसतात. जी काही ये जा होते ती मालगाड्यांचीच. कधी कधी सस्कुहाना नदीमधे एखादी बोट दिसते. पावसाळ्यात डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावरून खाली वाहत जातं. रात्री बघावं तर नदीचं पात्र चांदण्यात चमकत असतं. झाडांच्या सावल्यांनी नदीचे काठ झाकोळून गेलेले असतात. रात्रीच्या अंधारात, आजूबाजूचे झाडीने भरलेले डोंगर आणखीनच काजोळी फासल्यासारखे वाटत असतात.त्या गच्च झाडीमधे डोंगरातून जाणारे रस्ते झाकून टाकले असतात. त्या लपलेल्या रस्त्यांवरून जाणार्या गाड्यांचे दिवे मधेच एखाद्या वळणावर दृष्टीस पडतात.झाडांच्या गर्दीतून या गाड्यांच्या दिव्यांचा लपंडाव चाललेला असला की जणू रात्रीच्या वेळी कंदील घेऊन भुतांचा खेळ चाललाय असं वाटतं.
माझ्या लॅबच्या जवळच एक मोठासा डोंगर आहे. त्यावरून उतरणारा रस्ता म्हणजे जणू मोठी घसरगुंडीच वाटते. जवळ जवळ ५००-६०० फुटांचा हा उतार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरीतून वर येणारी झाडं भिंतीसारखी भासत असतात. चहूबाजूंनी डोंगर असल्यामुळे डोंगरावरून उतरताना एखाद्या प्रचंड मोठ्या द्रोणामधे उतरल्यासारखं वाटतं. रस्ता असा उतरून पुढे साधारण मैलभर सरळ सपाटीवरून जातो त्यामुळे गाडीतून डोंगरावरून खाली उतरताना जणू एखादं विमान जमिनीवर उतरताना वाटतं तसं वाटतं. उतारावरून खाली येत असताना बाजूच्या दरीतली झाडं झपाट्याने वर वर येत आहेत असं वाटतं.
एप्रिल मे मधे झाडांवरच्या फुलांचा बहर संपता संपता गवतामधे उगवणार्या तणांना देखील फुलं यायला लागतात. पिवळ्या रंगाच्या बटणांसारख्या फुलांनी कुरणं, रस्त्याकाठचे गवताचे पट्टे भरून जातात. त्या मागोमाग, पांढर्या रंगाच्या तंतूंच्या गुच्छासारखी फुलं असलेली तणं तरारून येतात. काही दिवसांनी ही पांढरी बोंडं फुटून, त्यातून पांढर्या तंतूंच्या पंखांवर बसून, तणाची बियाणं वार्यावर वहात जाऊन दूर दूर पोहोचतात. तणांच्या या पिवळ्या पांढर्या फुलांपाठोपाठ जंगली फुलांचं नुसतं पेव फुटतं. पिवळा, गुलाबी, पांढरा आणि जांभळा हे प्रामुख्याने दिसणारे रंग. रस्त्याकडेचे, झाडांच्या पायथ्याचे, शेतांच्या बांधावरचे, कुरणातले, दगडांच्या खाचखळग्यातले गवत, तर्हेतर्हेच्या फुलांनी सजून जाते. फुलांचे प्रकार देखील किती वेगवेगळे ! काही अगदी लहान तर काही चांगली वाटी एवढी मोठी, काही एकएकटी डुलणारी तर काही गुच्छामधे लगडून जाणारी, काही साधी सुधी सदाफुलीसारखी तर काहींच्या डोक्यावर तुरे आणि कोंबडे! या सगळ्यामधूनच गर्द शेंदरी रंगाची bird of paradise सारखी फुले लक्ष वेधून घेत असतात.
विसाव्या शतकामधे अमेरिकन शेती व्यवसाय आणि एकंदरीतच ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीस अमेरिकेची एकूण लोकसंख्या होती ७६ दशलक्ष. या पैकी निम्याहून अधिक वस्ती ही ग्रामीण भागातच एकवटलेली होती. त्यावेळी शेती व्यवसाय हा प्रामुख्याने, प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान फार्म्सवर व्हायचा. (अमेरिकन शेतीच्या संदर्भात, ‘फार्मिंग’ ही संज्ञा किंवा संकल्पना लवचिकपणे वापरायची आहे. धान्योत्पादन आणि पशुपालन हे परस्परांशी संलग्न किंवा पूरक उद्योग असल्यामुळे बरेच फार्म्स हे संमिश्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रांशी निगडीत अशा उत्पादनाला ‘फार्मिंग’ अशा ढोबळ संज्ञेने संबोधले जाते). विसाव्या शतकाच्या सुरवातीस शेती आणि ग्रामीण भागाची अजोड अशी सांगड होती. एकंदर काम करणार्या लोकांपैकी ४०% लोक शेती व्यवसायात होते. या प्रचंड मनुष्यबळाला, शेतांवर राबणार्या सुमारे २२ दशलक्ष जनावरांची (मुख्यत्वे घोडे, खेचरं, बैल) जोड होती. बहुतेक फार्म्सवर त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार काही धान्यं, कुठे तेलबिया, कुठे फळं, भाजीपाला, जोडीला वराहपालन, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, अशा चार पांच तरी वैविध्यपूर्ण गोष्टींचे संमिश्र उत्पादन व्हायचे.
याच्या उलट विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून, शेती व्यवसाय हा दिवसेंदिवस संख्येने कमी, परंतु आकारमानाने मोठमोठ्या अशा फार्म्सवर एकवटत चालला आहे. फार्म्सचे संमिश्र उत्पादनाचे स्वरूप लोप पावत चालले आहे आणि त्यांना एका ठरावीक साच्याच्या, यांत्रिक उत्पादन करणार्या कारखान्याचे रूप येत चालले आहे. फार्म्सची उत्पादकता कैक पटींनी वाढली आहे. मनुष्य आणि पशुबळाच्या जागी यांत्रिकीकरणाने आपले हात पाय पसरले आहेत. एकविसाव्या शतकातल्या एकूण काम करणार्या लोकांपैकी आज केवळ २% लोक शेतीव्यवसायात आहेत. हे मर्यादित मनुष्यबळ सुमारे ५ दशलक्ष ट्रॅक्टर्सच्या मदतीने, पूर्वी जे काम २२ दशलक्ष घोडे, खेचरं आणि बैल करत होते, त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक आणि कमी वेळात करत आहेत. दिवसेंदिवस तरूण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे आणि ग्रामीण भागातून, उच्च शिक्षणासाठी, नोकरी व्यवसाया निमित्त शहराकडे जाणार्यांचा ओघ वाढतच चालला आहे. याचाच परिणाम म्हणजे, एकेकाळी मुख्यत्वे ग्रामीण स्वरूपाच्या असलेल्या अमेरिकेत आज ग्रामीण भागात जेमतेम २०% लोक उरले आहेत. एके काळी ग्रामीण भागातील बहुतेक सर्व जिल्हे (counties) हे मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायावर अवलंबून असायचे. परंतु २००० साली, एकूण ग्रामीण, निम-ग्रामीण जिल्ह्यांपैकी केवळ २०% जिल्हे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून होते.
एक गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे अमेरिका हा दानशूर देश आहे. दुसर्या महायुद्धापासून, जगाच्या कान्याकोपर्यात नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, उपासमारी सारखी संकटे जिथे जिथे उद्भवली आहेत, तिथे तिथे अमेरिकेएवढी सातत्याने सढळ हाताने मदत फारच कमी देशांनी केलेली आहे. यामागील राजकारण, अर्थकारण, व्यापारी वृत्ती, युध्दपिपासू भूमिका, वगैरे छटांचा विचार बाजूला ठेवला तर सामान्य अमेरिकन माणसाच्या दानीपणाबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही. अर्थात अमेरिकन माणसाचे खिसे जगातील इतर अनेक सामान्य माणसांच्या खिशापेक्षा गरम आहेत ही गोष्ट खरी. परंतु केवळ खिशात पैसे असून चालत नाही; सत्कारणी दान देण्यासाठी तशी वृत्ती देखील लागते आणि ती सामान्य अमेरिकन माणसात निश्चितच आहे.
दुसर्या महायुद्धाच्या पूर्वी ही मदत मुख्यत्वे सर्व सामान्य नागरिकांकडून होत असे. महायुद्धानंतर बेचिराख झालेल्या युरोपियन देशांना मदत करण्यासाठी, राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांच्या प्रशासनाला, एखाद्या मोठ्या केंद्रवर्ती संस्थेची गरज भासू लागली. त्यावेळी गाजलेल्या ‘मार्शल प्लॅन’ अंतर्गत, अमेरिकेने युरोपला तब्बल १३ अब्ज डॉलर्सची मदत केली. पुढे याच ‘मार्शल प्लॅन’च्या धर्तीवर परंतु लहान प्रमाणात, आफ्रिका, एशिया आणि मध्य व दक्षिण अमेरिकेतील गरीब देशांना मदत पुरवण्याचा उपक्रम जारी करण्यात आला. त्यानंतर आलेल्या विविध राष्ट्राध्यक्षांच्या प्रशासनांनी देखील हा मदतीचा ओघ अव्याहत चालू राखण्याची काळजी घेतली. या मदतीमधे आर्थिक पाठबळ आणि तंत्रज्ञानाबरोबरच अन्नपदार्थांचा देखील मोठाच वाटा असायचा.
अमेरिकेत नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता नाही. अफाट पसरलेली सुपीक जमीन, मुबलक पाणी, पोषक हवामान, आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचे भक्कम पाठबळ आणि एकंदरीत कृषी / पशुपालनाचे कित्येक दशकांपासून होत आलेले यांत्रिकीकरण, यामुळे अमेरिकेने कृषी / पशुपालनाच्या क्षेत्रांमधे जगामधे अव्वल स्थान पटकवावे यात काही नवल नाही. या अफाट कृषी उत्पादनाच्या जोरावर अमेरिका जणू काही जगाचे धान्य कोठारच बनून गेली. त्यामुळे जगाला मदत पुरवण्याच्या भव्य – दिव्य योजनांमधे, अमेरिकन शेतकर्यांनी उगवलेल्या धान्य आणि पशुजन्य अन्नपदार्थानी सिंहाचा वाटा उचलावा ही गोष्ट ओघाने आलीच. गेल्या ५०-६० वर्षांत या मूळ कल्पनेचा गाभा जरी तोच राहिला असला तरी त्यात फरक हा झाला आहे की, १९६० साली एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे २६ लोकांना खाऊ घालत होता तर २००८ सालचा एक अमेरिकन शेतकरी जगातील सुमारे १४४ लोकांना पुरेल एवढं अन्न उत्पादन करत आहे.
प्रांजळपणे सांगायचे तर मी कधी काळी मराठीत पुस्तक लिहीन असे वाटले नव्हते. शालेय शिक्षण सारे मराठी माध्यमातून झाले होते खरे पण मराठीत लिहिण्याचा संबंध दहावीनंतर (१९७७ साली) कायमचाच संपला होता. पूर्वी मराठी वाचन खूप केले होते, परंतु गेली दहा वर्षे अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे ते अगदीच आटून गेले होते. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर जवळ जवळ ३०-३२ वर्षांनी मराठीत पुन्हा काही लिहिता येईल का हा प्रश्नच होता.
परंतु कधी काळी शाळेत केलेले वाचन-लेखन बघून, माझ्या आईला का कोण जाणे माझ्यात एक सुप्त लेखक असल्याचे जाणवले असावे. त्यामुळे गेली तीन दशके येता जाता ती माझ्यामागे “काही तरी लिही, काही तरी लिही” अशी भूणभूण लावत असायची. कधी हसण्यावारी नेऊन तर कधी वैतागून मी तिच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करायचो. कामाच्या व्यापात लेखनासाठी आणि त्यातही मराठी ललित लेखनासाठी वेळ काढणं देखील अशक्यप्राय वाटायचं.
पण ते मराठीचं बीज जे आतमधे रुजलं होतं, ते काळाच्या प्रवाहामधे, विज्ञानशाखेच्या प्रभावाखाली आणि अमेरिकेतल्या वास्तव्यामधे देखील टिकून राहिलं. योग्य वेळ आणि समर्पक विषय यांची वाट बघत राहिलं. त्या बीजाच्या अस्तित्वाची जाणीव मला वरचेवर करून दिल्याबद्दल आणि त्या बीजातून कधी काळी रोपटे उगवेल असा दुर्दम्य आशावाद उराशी बाळगल्याबद्दल, या पुस्तकाचे खरे श्रेय माझ्या आईला द्यायला हवे.
माझे दिवंगत सासरे (विनायक नाडकर) स्वत: अमेरिकेत १९५१ साली उच्च शिक्षणासाठी आले होते आणि फोर्ड, जी.ई. सारख्या प्रख्यात कंपन्यांमधे काम करून १९६२ साली भारतात परतले होते. त्यांच्या उदाहरणाचा व कर्तृत्वाचा माझ्या अमेरिकेत येण्यावर मोठाच प्रभाव पडला होता. आज या पुस्तकाच्या रुपाने त्यांना एकप्रकारे मी श्रद्धांजलीच वहात आहे.
प्रत्यक्ष पुस्तकाच्या लेखनात माझ्या पत्नीची, मृणालची मदत दोन प्रकारे झाली. एक म्हणजे माझ्या कामाच्या वेळा आणि व्याप संभाळून लेखनासाठी मला सवड मिळेल याची जबाबदारी तिने उचलली. दुसरं म्हणजे या वेगळ्या वाटेवरची सहप्रवासी म्हणून, काही अनुभव व आठवणी मला तिच्याबरोबर पडताळून पहाता आल्या.
आपले बाबा पुस्तक लिहितायत ही कल्पनाच आमच्या १६ वर्षाच्या मुलाला, सिद्धार्थला भन्नाट वाटली असावी. पुस्तकातील विविध लेखांविषयी, प्रसंगांविषयी, मी काढलेल्या स्केचेसबद्दल त्याचे कुतूहल कायम जागृत असायचे. पुस्तक प्रकाशित होण्यामागची त्याची निरागस तळमळ व उत्सुकता हे या पुस्तक -प्रकल्पामागील माझे मोठेच प्रेरणास्तोत्र होते.
नवोदित लेखकांचे हस्तलिखीत मान्यवर प्रकाशकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून पसंतीची पावती मिळणे ही किती अवघड गोष्ट आहे हे ‘जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे’. सुरवातीला माझी मेव्हणी सौ. अंजली राजे हिने पुण्यात काही प्रकाशकांकडे या दृष्टीने प्रयत्न करून बघितले. तिला मिळालेल्या फिडबॅकवरून काही लेखांमधे मी थोडेफार फेरफार केले आणि दोन लेख पूर्णपणे नवीन लिहिले. पुस्तकाला पूर्णत्वाला नेण्यातल्या तिच्या प्रयत्नांचा ऋणनिर्देश करणे माझे कर्तव्य ठरते.
या पुस्तकाच्या हस्तलिखीत स्वरुपापासून ते त्याच्या अंतिम स्वरुपापर्यंतच्या प्रवासाचे शंभर टक्के श्रेय जर कोणाला द्यायचे असेल तर ते माझी बहिण सौ. निरंजना व माझे मेव्हणे श्री. चंद्रशेखर दामले यांनाच निर्वीवादपणे द्यायला हवे. प्रकाशक शोधण्यापासून, त्यांच्याकडे हेलपाटे मारण्यापासून, प्रुफ रिडींग, एडिटिंगमधे मदत करण्यापासून ते पुस्तकाच्या कॉपीज मुंबईहून अमेरिकेला पाठवण्यापर्यंत या पुस्तकासाठी या दोघांनी जे अपार कष्ट घेतले ते केवळ भाऊ, बहिणच घेऊ शकतील. आपापल्या करिअर्स सांभाळून रात्री बेरात्री जागून, लिहीलेला, टाईप केलेला शब्दन शब्द पुन्हा पुन्हा वाचून, त्यातील शुद्धलेखन तसेच इंग्रजी उच्चारांच्या व इतर चुका, मराठी शुद्धलेखनाची पुस्तके, डिक्शनरी, संदर्भग्रंथांचा आधार घेऊन, वेचून काढण्यासाठी त्यांनी जी धडपड केली ती खरोखरच अजोड आहे. त्या दोघांचे औपचारिक आभार मानण्यापेक्षा त्यांचा आजन्म ऋणी रहाणेच मी पसंत करीन.
नवोदित व मराठी लेखनाची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या लेखकांचे हस्तलिखीत मोकळ्या मनाने स्विकारणे, त्यातला वेगळेपणा उमजून घेणे व त्याला एका पुस्तकाचे मूर्त स्वरुप देणे, यासाठी प्रकाशक देखील वेगळ्या पठडीतला लागतो.
‘मराठीसृष्टी’चे श्री निनाद प्रधान हे अशा वेगळ्या पठडीतले प्रकाशक आहेत. भारतीय भाषांना संगणकीय क्षेत्रात नाव मिळवून देण्यासाठी गेली १५-२० वर्षे अव्याहत धडपड करणारे श्री प्रधान, मराठीतील विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण लिखाणाला इंटरनेटद्वारा अधिकाधिक वाचक वर्गापर्यंत पोहोचवण्यात धन्यता मानतात. त्यामुळे आधुनिक इलेक्ट्रॉनिक रुपात तसेच पारंपारिक पुस्तक रुपात अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवून त्यांचा प्रवास चालू आहे. ‘मराठीसृष्टी’च्या माध्यमातून ही ‘गावाकडची अमेरिका’ वाचकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल श्री निनाद प्रधान यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
या पुस्तकाच्या हस्तलिखीताचे मराठीत संगणकावर टायपींग करण्याचे किचकट काम श्री. श्रीकृष्ण जोशी (जोशी काका) यांनी ठरलेल्या वेळात व उत्कृष्टपणे पार पाडले याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !
पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या संकल्पनेबद्दल कु. धनश्री प्रधान व कु. पूजा प्रधान तसेच श्री उदय कानिटकर यांचे आणि या पुस्तकाच्या प्रॉजेक्टवर काम केलेल्या ‘मराठीसृष्टी’च्या सार्या टीमचे मन:पूर्वक आभार !
सारा उंचसखल भाग असल्यामुळे ठिकठिकाणहून वहात येणार्या पाण्याने रस्त्याच्या दोहोबाजूस ओहोळ झालेले असतात. ते पाणी वाहून, बर्याच ठिकाणी रस्त्याची सोबत करत, दोन्ही बाजूंना खोलगट पन्हाळी तयार झालेल्या असतात. पावसात त्यातून डोंगरावरचे तांबडे मातकट पाणी वहात असते. इतर वेळेला पन्हाळीत ओल टिकून रहाते. त्या ओल्या मातीत, गवताच्या साथीनं रामबाण उगवलेले असतात. रंगीबेरंगी फुलं, गवताची डुलणारी पाती, रामबाणाचे जागोजागी उगवलेले पेव आणि त्यांवरची असंख्य फुलपाखरं, किडे, चतुर यांनी, रस्त्याकडेच्या या पन्हाळी नुसत्या गजबजून गेलेल्या असतात.
रस्त्याकडेच्या घरांपुढे लोक आपापल्या बागांमधे काम करताना दिसायला लागतात. विविध प्रकारच्या फुलांचे ताटवे बागांची शोभा वाढवायला लागतात. एप्रिल मे हा tulip फुलांचा सिझन. अनेक घरांपुढे ट्युलीपच्या रंगी बेरंगी फुलांची पखरण झालेली दिसते. Daffodils देखील खूप दिसतात. थंडी कमी झाल्यामुळे लोकं घराबाहेर अधिक पडायला लागतात. चांगलं ऊन पडलं असलं तर जॉगिंग करायला, सायकलिंग करायला बाहेर पडलेले लोक दिसतात. पण इथे सायकलिंग म्हणजे आपल्यासारखं पायजम्यामधेच सायकलवर टांग मारली असा प्रकार नसतो. सायकल चालवणार ते देखील हेल्मेट, टाइट शॉर्टस्, गॉगल्स, पाण्याची बाटली, शूज असा सरंजाम हवाच! संध्याकाळी रस्त्याकडेच्या ग्राउंड्सवर कुठे कुठे गावातल्या मुलांचा बेसबॉलचा खेळ रंगात आलेला असतो. त्यांचे आई, वडील गाड्या, पिकअप ट्रक्स पार्क करून गप्पा मारत उभे असतात.
शेतांत आधीच्या हंगामात कापलेल्या मक्याचे खुंट तसेच राहिलेले असतात. ते हारीने उभे असलेले खुंट, सुकून पिवळे पडलेले असतात. त्या सुकलेल्या खुंटांच्या मधली सगळी जमीन पावसाच्या आगमनासरशी हिरव्या तणांनी, गवताने भरून जाते. मे च्या सुरवातीस नांगरणी सुरू होते. शेतांतून ट्रॅक्टर्स फिरताना दिसायला लागतात. काळीभोर माती पुन्हा नवीन बीज स्वीकारण्यासाठी उतावीळ होऊन जाते. नांगरलेली काळीभोर शेतं आणि चराऊ गवताची हिरवीगार कुरणं असा संमिश्र बाज माळरानांवर पसरतो. कुरणांत गवत पुरेसं वाढलं की गायींना आणि वासरांना बाहेर चरायला सोडलं जातं. टेकड्यांच्या हिरव्यागार उतारांवर काळ्या पांढर्या गायींचे कळप अधाश्यासारखे चरू लागतात.
जूनच्या मध्यापर्यंत पेरणी संपून मक्याच्या रोपांची टोकं मातीतून वर यायला लागलेली असतात. दिवस चांगलाच मोठा झालेला असतो. रात्री ९-९॥ वाजता देखील चांगला प्रकाश असतो. सूर्य मावळून गेला तरी मावळतीचं आकाश चांगलंच प्रकाशमान असतं. सूर्याचा परावर्तित प्रकाश आसमंतात भरून राहिलेला असतो. कधी कधी रात्री लॅबमधून परत येताना पूर्वेकडे चंद्र उगवत असतो आणि मावळतीला बुडालेली सूर्याची किरणं अजून आपला प्रभाव सोडायला तयार नसतात.
सूचिपर्णी वृक्ष जरी वर्षभर हिरवेगार दिसत असले तरी निरखून बघितल्यावर त्यांच्यावर देखील वसंताचा हात फिरल्याचं जाणवतं. ज्युनीपरच्या हिरव्यागार फांद्यांमधून पोपटी रंगाचे नाजुक बड्स उगवलेले दिसतात. सारं झाड या पोपटी बड्सनी भरून जातं आणि एखाद्या ख्रिसमस ट्री वर रंगीत दिव्यांच्या माळा लावाव्यात तसं वाटायला लागतं. झाडाच्या जुन्या सुया गर्द शेवाळी रंगाच्या असतात. या सुयांच्या टोकाला निळसर हिरव्या रंगाच्या नव्या सुया वसंतात येतात त्यामुळे सारं झाड ही दोन रंगांची रंगसंगती अंगावर वागवतं - झाडांच्या बुंध्यांजवळचा फांद्यांचा रंग गर्द शेवाळी तर परीघाजवळ फांद्यांचा रंग निळसर हिरवा!
जुलै ते सप्टेंबर म्हणजे उन्हाळा, मोठे दिवस, बर्यापैकी सूर्यप्रकाश, मधून मधून पडणारा पाऊस, हिरव्या रंगाचं एकछत्री साम्राज्य! पशु, पक्षी, किटक, फुलपाखरं सार्यांची लगबग जाणवण्या इतपत वाढलेली. रान आता सहस्र कंठांनी बोलायला लागलेलं असतं. दिवसा मधमाश्या आणि फुलपाखरं आणि रात्रीच्या वेळी काजवे (fire flies) भरपूर दिसतात.
ओढ्यांच्या काठांवर झाडाझुडपांची गर्दी झालेली असते. झाडांच्या सावल्यांनी पाणी झाकोळून गेलेलं असतं. बालकवी ठोंबरे यांच्या कवितेतल्या औदुंबरासारखी काही झाडं जळात पाय सोडून बसलेली असतात. जुन्या मोडून पडलेल्या फांद्या ओढ्यातल्या दगडांत, चिखलात रुतून बसलेल्या असतात, आणि त्यांची वेडीवाकडी धडं पाण्याबाहेर डोकावत असतात. अशाच एखाद्या ओढ्यात, वरच्या झाडांची सावली शोधून, एखादी बदकीण आपला पोरवडा सांभाळत, किडे शोधत पाण्यात डुबक्या मारत असते.
Copyright © 2025 | Marathisrushti