(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • कल्याणवृष्टिस्तव – ७

    सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूतॆ
    दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः ।
    किं च स्फुरन्मकुटमुज्ज्वलमातपत्रं
    द्वॆ चामरॆ च महतीं वसुधां ददाति ॥ ७ ॥

    आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की कोणकोणते अतिदिव्य लाभ होतात, हे सांगतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः- हे आई जगदंबे तुझ्या अंघ्री म्हणजे चरण, सरसीरूहयो: म्हणजे कमलावर जो कोणी वंदन करतो, त्याला या जगात,

    सर्वज्ञतां - सर्व प्रकारच्या विद्या आणि कलांमध्ये अक्षुण्ण गती,

    सदसि वाक्पटुतां- सभेमध्ये वाक कौशल्य,

    प्रसूतॆ- प्राप्त होते.
    यातील सभेतील वाक् कौशल्य हा शब्द महत्त्वाचा आहे. बोलता तर सगळ्यांनाच येते. पण सभेत याचा अर्थ विद्वानांच्यासमोर, शास्त्रशुद्ध, मुद्देसूदरीत्या, अकाट्य तर्कपूर्ण रीतीने बोलता येणे. अशावेळी अनेकांची फक्त त -त ,प -प होते. आई च्या कृपेने माणसाला अशा ठिकाणी वक्तृत्व संपन्नता येते.

    किं च- आईच्या कृपेचे आणखीन काय लाभ सांगू? शेवटी सर्व एकत्र करून सांगण्याची माऊलींची 'किंबहुना' शब्द रचनेतील भूमिका या 'किं च' मध्ये आली आहे.

    स्फुरन्मकुट- देदीप्यमान मुकुट अर्थात साम्राज्य पद.

    उज्ज्वलमातपत्रं- चमचमते छत्र. त्यात उज्ज्वल शब्दात पांढरा रंग अपेक्षित आहे. एकछत्री सम्राटाचे छत्र पांढऱ्या रंगाचे असते.तो भाव.

    द्वॆ चामरॆ च - दोन्ही बाजूला चवऱ्या. राजाच्या दोन्हीकडे उभ्या राहून त्याला वारा घालणाऱ्या सेविका, हा सामान्य अर्थ. हा कोणत्याही लहानसहान राजाला लागू पडतो.
    येथे जणू सूर्य आणि चंद्र याच दोन चवऱ्या आहेत महान अर्थ अपेक्षित आहे.

    महतीं वसुधां - विशाल पृथ्वी. अर्थात समुद्र वलयांकित साम्राज्य.

    ददाति- आईची कृपा हे सर्व काही प्रदान करते.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – ८

    कल्पद्रुमैरभिमतप्रतिपादनॆषु
    कारुण्यवारिधिभिरम्ब भवत्कटाक्षैः ।
    आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम्
    त्वय्यॆव भक्तिभरितं त्वयि बद्धतृष्णम् ॥ ८ ॥

    आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाचे वैभव सांगतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणत आहेत की दृष्टीनेच या जगात सर्व काही प्राप्त होऊ शकते. आई सर्वकाही देते पण त्यासाठी आपण तिचे भक्त असणे अपेक्षित आहे.

    अभिमत- साधकाला, भक्ताला, उपासकाला, जे जे हवे असते ते. मनोवांच्छित

    प्रतिपादनॆषु- प्रदान करण्याच्या बाबतीत,

    कल्पद्रुम- कल्पवृक्ष. अशी आई जगदंबेची दृष्टी आहे. अर्थात एकदा ही दृष्टी प्राप्त झाली की भक्ताच्या मनात जे येते ते सर्व प्राप्त होते.
    जसा एकच कल्पवृक्ष सर्व काही देतो, तशी आईची एकच कृपा सर्व काही प्रदान करते.

    अम्ब भवत्कटाक्ष- हे आई तुझे नेत्र कटाक्ष,

    कारुण्यवारिधी- वारी म्हणजे पाणी त्याचा धी म्हणजे साठा.अर्थात समुद्र. आईची दृष्टी म्हणजे कारुण्याचा जणूकाही समुद्र. सागर जसा अथांग असतो , अपार असतो, जसे त्यात केवळ पाणीच पाणी असते, तशी आईची करूणा अथांग, अपार आहे. त्या दृष्टीत कारुण्याशिवाय अन्य काहीच नाही.

    आलॊकय त्रिपुरसुन्दरि मामनाथम्- हे त्रिपुरसुंदरी, अनाथ असलेल्या माझ्याकडे पहा. तू माझ्याकडे पाहिले नाही तर तीच अनाथता.
    हे आई माझ्याकडे पहा कारण,

    त्वय्यॆव भक्तिभरितं- मी केवळ तुझ्याच भक्तीने भरलेला आहे. मला अन्य काही समजतच नाही.

    त्वयि बद्धतृष्णम्- माझ्या सगळ्या इच्छा तुझा ठिकाणी बांधलेल्या आहेत. मला अन्य कोणाचाही आश्रय नाही. मग मी मागू तरी कोणाला?

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – ९

    हन्तॆतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ
    भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु ।
    त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि
    त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव ॥ ९ ॥

    आई जगदंबेच्या एकमेवाद्वितीय सर्वश्रेष्ठत्वाला अधोरेखित करताना आचार्य श्री म्हणतात,

    हन्त- अरेरे! या अर्थाचा हा उद्गार. कितीही समजावून सांगितले तरी न ऐकणाऱ्या सामान्य दीन जनांकडे पाहून आलेला हा कनवाळू उद्गार आहे.

    काय समजावून सांगत होते आचार्य? काय ऐकत नव्हते सामान्य जन? तर,

    इतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ

    भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु - हे आई जगदंबे, हे सर्व तुला सोडून इतर सामान्य दैवतांच्या ठाई मन एकवटून उपासना करतात‌.

    यातील पामर देवता हा शब्द मोठा चिंतनीय आहे. अन्य अनेक देवता आपल्यापेक्षा जरी श्रेष्ठ असल्या तरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा असतात. श्रीअग्नीदेवांना फक्त जाळण्याची शक्ती आहे ते पाणी देऊ शकत नाहीत तर भगवान वरूणांना पाणी देण्याची शक्ती आहे ते काडिपेटी देणार नाहीत.

    या अर्थाने या देवतांना पामर असे म्हटले आहे. जर अशा स्वरूपात या देवताच मर्यादित असतील तर त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने, कृपा अमर्याद कशा असतील? याच अर्थाने आचार्यश्री वरील कथन करीत आहेत. ते या सर्व देवतांना पामर देवता म्हणताहेत. सामान्य जन अशा दैवतांच्या मागे लागतात.

    आई मला मात्र वास्तविकता कळली आहे. माझी परिस्थिती विचारशील तर,

    त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि- हे आई मी मनाने फक्त तुझेच स्मरण करतो.

    त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव- मी केवळ तुलाच शरण आलो आहे तूच माझी आई आहेस.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – १०

    लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
    आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् ।
    नूनं मया तु सदृशः करुणैकपात्रं
    जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा ॥ १० ॥

    भक्ताच्या आणि भगवंताचे नाते माता पुत्रासमान असते. इथे तर भगवती आई जगदंबेचाच विषय आहे. त्या पुत्र वात्सल्याचे विविध पैलू आचार्यांच्या विवेचनात प्रकट होत आहेत. आईला अनेक लेकरे असतात. सगळेच तिला प्रिय असतात. पण त्यातही जे लेकरू थोडे दुर्बल असते, असहाय्य असते, हतबल असते, त्यावर आईचे थोडे अधिक लक्ष असते. व्यवहारातील मातेचा हा स्वभावविशेष येथे आधार करीत आचार्य श्री आई जगदंबे ला स्वतःकडे लक्ष द्यायला सांगत आहेत.

    आईच्या विश्वजननी स्वरूपाला मान्य करत ते आरंभी म्हणतात,

    लक्ष्यॆषु सत्स्वपि कटाक्षनिरीक्षणानां
    आलॊकय त्रिपुरसुन्दरि मां कदाचित् - आई जगदंबेच्या कृपाकटाक्षाने निरीक्षण करावे असे असंख्य जीव असले तरी ही त्रिपुरसुंदरी माझ्याकडे कदाचित पाहील.

    अर्थात तिच्या कृपेला पात्र जगात असंख्य लोक आहेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत मी अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे पहिल्या आवेगात माझ्याकडे लक्ष जाणार नाही हे ठीक आहे. पण तरी ती त्रिपुरसुंदरी माझ्याकडे पाहील.
    हा एक तर माझा विश्वास आहे आणि दुसरा माझा नाईलाज.
    विश्वास यासाठी की ती जगज्जननी आहे तर मग माझा अव्हेर कसा करेल? आणि नाईलाज यासाठी की तिच्या शिवाय मला आहे तरी कोण?
    आई जशी हतबल लेकराकडे अधिक पाहते तशी ती माझ्याकडे पाहणारच. कारण,

    नूनं - खरोखरच

    मया तु सदृशः- माझ्या समान.

    करुणैकपात्रं- करूणेला पूर्णपणे पात्र.

    जातॊ जनिष्यति जनॊ न च जायतॆ वा - आजवर कोणी जन्माला आला नसेल किंवा कदाचित भविष्यात जन्माला येणार ही नाही.

    मग माझी आई ! तुला माझ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – ११

    ह्रीं ह्रीमिति प्रतिदिनं जपतां तवाख्यां
    किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ ।
    मालाकिरीटमदवारणमाननीया
    तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः ॥ ११ ॥

    आई जगदंबेच्या कृपा प्रसादाचे वैभव सांगतांना आचार्य श्री पुढे म्हणतात,

    ह्रीं ह्रीमिति - ह्रीं, ह्रीं अशा स्वरूपात,

    प्रतिदिनं - नित्यनियमाने, अनवरत.

    जपतां तवाख्यां- तुझे नाव जपले असताना.
    अर्थात ही आई जगदंबे जो रोज तुझ्या नावाचा असा जप करतो त्याला. यातील प्रतिदिन हा शब्द फार महत्त्वाचा आहे.
    सामान्यतः लोक भगवंताचे नाव त्याच वेळी घेतात ज्या वेळी त्यांच्यावर काहीतरी संकट येते. अशा तात्कालिक भक्तांना भगवान पावत नाही असे नाही. पण त्याचे आवडते भक्त तेच असतात जे प्रतिदिन भजन करतात. संकटाचा मागमूस नसतानादेखील भगवंताचे नामस्मरण करतात.

    अशा भक्तांचे भाग्य सांगताना आचार्य म्हणतात,

    किं नाम दुर्लभमिह त्रिपुराधिवासॆ- हे त्रिपुराधिवासिनी ! तुझ्या अशा भक्तांना या जगात दुर्लभ असे काय आहे? अर्थात त्यांना सर्व काही सहजतेने प्राप्त होते.

    काय काय प्राप्त होते? याची एक झलक दाखवताना आचार्य श्री म्हणतात,

    माला- मोत्यांच्या माळा, अर्थात सर्व प्रकारची रत्ने,

    किरीट- मुकुट अर्थात साम्राज्य.

    मदवारण- मदोमत्त हत्ती. संपत्तीचे हे सगळ्यात मोठे प्रतीक वर्णिले आहे. दारात झुलणारा असा हत्ती अफाट श्रीमंतालाच परवडू शकतो.

    माननीया- या सगळ्याने सन्मानित झालेली,

    तान् सॆवतॆ वसुमती स्वयमॆव लक्ष्मीः- अशी देवी लक्ष्मी त्यांना स्वतःहून प्राप्त होते.
    वर वर्णन केलेले सर्व वैभव देवी लक्ष्मीचे असले तरी अशी लक्ष्मी मिळाली की हे सर्व त्याला आपोआपच मिळते.
    दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी देवी लक्ष्मी म्हणजे वैभव त्याला स्वतःहून प्राप्त होते. त्यासाठी तो काहीही प्रयत्न करीत नाही.

    भक्त केवळ आई जगदंबेची उपासना करतो. त्याला या सर्व गोष्टी आई स्वतःहून देते. हे आचार्य कथन मोठे मर्म पूर्ण आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – १२

    संपत्कराणि सकलॆन्द्रियनन्दनानि
    साम्राज्यदाननिरतानि सरॊरुहाक्षि ।
    त्वद्वन्दनानि दुरिताहरणॊद्यतानि
    मामॆव मातरनिशं कलयन्तु नान्यम् ॥ १२ ॥

    मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.

    सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.

    येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.

    त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
    कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
    ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.

    सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.

    शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.

    साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.

    दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.

    अशी ही आईची वंदना,

    मामेव- माझ्यावरच, मलाच.

    मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.

    कलयन्तु- प्राप्त होत राहो.

    अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.

    नान्यम् - मला अन्य काहीही नको.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • सामूहिक अध्यात्मिक उपासना

    ….. अर्थात सामूहिक अध्यात्मिक उपासनेने कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो! आत्ताच म्हणजे संध्याकाळी नेहमी प्रमाणे ७.२५ ला दिवे लावण्याचा वेळी आम्ही घरातील सगळे (सुट्टीच्या निमित्ताने) परवचा म्हणायला बसलो, किती तरी वर्षांनी असा योग जुळून आला.

  • श्रीमत् आदिशंकराचार्यांचे श्रीलक्ष्मीनृसिंहपंचरत्नम् मराठी अर्थासह

    नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीमत् शंकराचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण वाळवंटासारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे.

  • कल्याणवृष्टिस्तव – १३

    कल्पॊपसंहृतिषु कल्पितताण्डवस्य
    दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य ।
    पाशाङ्कुशैक्षवशरासनपुष्पबाणा
    सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका ॥ १३ ॥

    आई जगदंबेच्या परांबा, परमेश्वरी स्वरूपाला भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे एका वेगळ्याच पद्धतीने सादर करीत आहेत.

    सत्व ,रज आणि तम या तीन गुणांच्या तीन देवता म्हणजे अनुक्रमे भगवान विष्णु, भगवान ब्रह्मदेव आणि भगवान शंकर.

    यापैकी भगवान शंकरांचे कार्य म्हणजे विश्वाचा विलय. ज्यावेळी भगवान हे कार्य करतात त्यावेळी ते रुद्रतांडव नृत्य करतात. त्यामध्ये सर्व चराचर सृष्टीचा विनाश होतो. या भीषण तांडवनृत्याचे अधिष्ठान वापरून आचार्य श्री आई जगदंबेचे वर्णन करतात.

    त्यासाठी आरंभी या नृत्याचे वर्णन करताना ते म्हणतात,

    कल्पॊपसंहृतिषु- कल्पाच्या शेवटी केल्या जाणाऱ्या उपसंहार नृत्याच्या वेळी, कल्पितताण्डवस्य- तसे घडावे अशी कल्पना करून केलेल्या तांडवनृत्य समयी,

    दॆवस्य खण्डपरशॊः परभैरवस्य- पर भैरव अर्थात भगवान महादेवाचा परशु खंड खंड विखंड झाला असताना.
    हा संहार इतका भयानक आहे की त्यात भगवान शंकरांच्या हातातील परशु देखील खंडित होतो. यातून त्याची तीव्रता लक्षात यावी.

    आचार्यश्री म्हणतात हे आई जगदंबे,

    पाश,अंङ्कुश,
    ऐक्षवशरासन- इक्षु म्हणजे ऊस. त्यापासून बनविलेले ते ऐक्षव. शर म्हणजे बाण त्याचे आसन म्हणजे धनुष्य.
    पुष्पबाणा- फुलांचे बाण.

    अशा आयुधांनी सुशोभित असणारी,
    सा साक्षिणी विजयतॆ तव मूर्तिरॆका- तुझी एकच मूर्ती, अर्थात तू एकटीच या सर्व गोष्टींची साक्षीदार असतेस. त्यात तुझा विजय असो.

    भगवान शंकराचा विश्वविलयलीलेची साक्षी असते आई जगदंबा.
    ज्यावेळी काही शिल्लक राहत नाही आणि अन्य कोणीच नसते, त्यावेळी जगदंबे 'असणे' तिचे खरे वैभव आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • कल्याणवृष्टिस्तव – १४

    लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं
    तॆजः परं बहुलकुङ्कुमपङ्कशॊणम् ।
    भास्वत्किरीटममृतांशुकलावतंसं
    मध्यॆ त्रिकॊणनिलयं परमामृतार्द्रम् ॥ १४ ॥

    विश्व प्रलयाच्या वेळी भगवान श्री महाकालांना सोबत करीत असणाऱ्या चैतन्यशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन केल्यावर आचार्य श्री येथे या साहचर्याच्या सातत्याची कामना करीत आहेत.

    आई जगदंबेचे साह्य आहे म्हणूनच भगवान शंकर काही कार्य करू शकतात. ती शक्ती दूर झाली तर शिव हे शव आहेत. अमंगल शवाला परममंगल शिव करणारी ही शक्ती. तिचे स्वरूप वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
    लग्नं सदा भवतु मातरिदं तवार्धं- आई अर्धनारीनटेश्वर स्वरूपातील तुझे हे अर्धे शरीर, भगवान शंकरांशी सदैव लग्न म्हणजे जुळलेले असो. या एकत्रीकरणाचा कधीही वियोग न होवो.

    कसे आहे आईचे हे स्वरूप? तर ते म्हणतात,

    तॆजः परं- परम तेजस्वी. बहुलकुङ्कुमपङ्कश- प्रचुर प्रमाणात अर्पण केलेल्या कुंकवाने,

    शॊणम्-
    लालबुंद दिसणारे. शोण म्हणजे रक्त. पण त्याचा प्राधान्याने विचार आहे गर्भाशयातील रक्ताशी. गर्भाशयाचा संबंध आहे नवनिर्मितीशी. भगवान महाकाल विनाशाची दैवता आहेत. त्यांच्या सोबत असणारी जगदंबा नवनिर्मितीची शक्ती. यातून ते अर्धनारी नटेश्वर स्वरूप परिपूर्ण आहे. केवळ भकास विनाश नव्हे तर नवनिर्मितीसाठी केलेला साफ-सफाई स्वरूप विनाश.

    भास्वत्किरीट- तेजस्वी मुकुट धारण केलेले.

    अमृतांशुकलावतंसं- अमृत अर्थात शांतता दायक. अंशू म्हणजे किरण. कला म्हणजे भिन्नभिन्न अवस्था. अर्थात चंद्र. त्याला अवतंस म्हणजे मस्तकावर धारण केलेले.

    मध्यॆ त्रिकॊणनिलयं- श्री यंत्राच्या त्रिकोणात निवास करणारी. परमामृतार्द्रम्- श्रेष्ठ अशा अमृतमय करूणेने आर्द्र असणारे, हे तुझे अर्धे अंग कायम भगवंताशी जुळलेले असो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड