आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
June 4, 2017
तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.
अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.
पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.
यासाठी युक्ती काय करावी ?
एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )
ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.
लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.
मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !
आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.
म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे.... इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.
पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.
तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.
हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.11.2016
November 17, 2016
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते.
म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते.
लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही.
ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे कळते.
एका लिंबाचे आठ भाग केल्यावर त्यातील एक भाग पानावर वाढून घ्यावा. हे प्रमाण आहे. हवाच असेल तर जास्तीचा आणखी एक भाग. पण अर्धे किंवा एक लिंबू एकावेळी घेतले गेले तर ? आणि असे रोज !!! नक्कीच त्याचा त्रास होणार. असे अति करणारे रूग्ण अवस्थेत लवकर येतात. यासाठी ग्रंथांचा आणि व्यवहाराचा तौलनिक अभ्यास असणे महत्वाचा आहे.
आंबट चवीमुळे पोटातील पाचक स्राव वाढतात. चिंच आठवली तरी तोंडाला पाणी सुटते. साहाजिकच भूकही वाढते.
वाताला शरीराबाहेर यायला मदत करणारा असतो. याला अनुलोमक असे म्हणतात. पण हा आंबट रस पित्ताला आणि कफाला थोडा वाढवतोच. लिंबाचे सरबत घेतले तर काही जणांना पित्त वाढल्याचे जाणवते, तर काही जणांना पित्त कमी झाल्यासारखे वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ना ! आंबट अति झाले तर रक्तपित्तासारखे आजार वाढतात.
ह्रदयाला हितकर असा हा आंबट रस अन्नपदार्थांची चवही वाढवतो. वरणभातावर पिळलेले लिंबू आठवतेय ना किंवा झणझणीत मिसळीवर पिळलेले लिंबू. व्वा! लिंबाचा वास येण्यासाठी मात्र लिंबू ताजेच हवे.ताज्या लिंबाच्या सालीतून येणारा विशिष्ट तेलाचा वास हा पण औषधी असतो. त्याची स्वतःची अशी वेगळी चव लागते. वरणभात असो वा मिसळपाव लिंबाशिवाय तृप्ती होत नाही. पूर्णत्व नाही.
ह.
आंबट चव ही तृप्ती करणारी सांगितली आहे.
अति प्रमाणात आंबट चव ही नुकसान करणारी असते. पेशींमधली बंधने लवकर मोकळी करतो. सैल करतो. त्यामुळे शरीराचा घट्टपणा निघून जातो. तेलाने ओषट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून, लिंबाच्या साली वापरल्या जायच्या. किंवा जेवताना हाताला लागलेला तेलाचा कट जाण्यासाठी लिंबाची फोड बोटांना चोळली जाते, ती याच गुणाचा आधार घेऊन !
अतिसर्वत्र वर्जयेत !
आवडते म्हणून रोज पाणीपुरी खाणे, आंबट साॅस खाणे, आंबट चीज खाणे, व्हिनीगर घातलेले सूप पिणे, बाजारी लोणचे खाणे, इ.इ. हे काही रोगलक्षणे वाढवतात, ते या आंबट चवीच्या अतिरेक केल्यामुळे !
जास्त आंबट खाल्ले जात असेल तर डोळ्यांचे आजार, घश्याचे जीभेचे आजार, ताप येणे, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे, रक्ताचे कमी होणे, किंवा रक्तासंबंधी आजार वाढतात. अंगावर उष्णतेचे फोड येणे, पित्ताचे व्याधी असतील तर जरा जास्तच खबरदार असावे.
पण घाबरून जायचे कारण नाही, या आंबट पदार्थांचा वापर युक्तीने केला तर फायदा होतो. त्या युक्तीसाठी वैद्याचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवडत असेल तर आंबटगोड खावे, पण फार आंबटशौकीन नसावे
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.11.2016
November 2, 2016
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
January 9, 2017
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
"आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
11.11.2016
November 11, 2016
आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
January 28, 2021
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !
काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.
आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?
निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.
जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.
औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.
निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !
पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.
आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !
ही हौस भारीच म्हणायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.05.2017
May 11, 2017
पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.
आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.
मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
आसन मांडी एकच.
आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
" बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्या, काही कमी नाहीत.
स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?
......नक्कीच वाढलेले आहेत.
.....जाडी वाढलेली आहे.
... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.
आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.
असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
18.09.2016
September 18, 2016
असे का ?
मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध.
भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. बाकी दोघांनाही शेळ्या मेंढ्या बकऱ्या चालतात. असे का ?
भारतातील जाऊ देत, जपानमधे कच्च्या मांसाचे लोणचे चटणी आवडीने खाल्ली जाते, तर इंग्लंडमधे मात्र कच्चे मांस खाणे अशिष्टपणाचे समजले जाते. असे का ?
चीन तैवान मधे कुत्र्याचे मास खाल्ले जाते, पण युरोपीयन देशात कुत्र्याचे मांस हा शब्द उच्चारला तरी ए, कुत्र्या म्हणून शिवी ऐकायला येईल. असे का ?
अरब देशात घोड्याचे आणि उंटाचे मांस प्रिय आहे, ऑस्ट्रेलियातून घोड्याचे मांस अरबांना विकले जाते, म्हणून अमेरीका, ऑस्ट्रेलियावर बंदी घालायची मागणी करते. असे का ?
डुकराचे साॅस खाणारे जर्मन, म्हणून इंग्रज लोक त्यांची टिंगल करतात, तर मासेमारीसाठी विनाकारण वेळ फुकट घालवणारे म्हणून इंग्रजांची जर्मनीमधे चेष्टा होते. असे का ?
अर्जेंटिना, मेक्सिको येथे हाॅटेलमधे जिवंत प्राणी तुमच्यासमोर आणून त्यातील कोणता अवयव तुम्हाला आहे, असे विचारून तुमच्या समोरच त्याला कापून तो अवयव तुम्हाला देतात, हे पाहून युरोपीयन माणूस चक्कर येऊनच पडतो. असे का ?
मध्यपूर्वेमधले देश प्राण्यांची हत्या करताना त्यांचा गळा चिरतात आणि वाहाणारे रक्त गर्दी करून गटागटा पितात, हे वाचताना देखील अस्सल मांसाहारींच्या अंगावर काटे येतात. असे का ?
भारतातील अस्सल मांस खाणारा जेव्हा अमेरीकेत किंवा युरोपमधे जातो, तेव्हा तेथील स्टेक म्हणजे नुसत्या वाफवलेल्या मांसाच्या तुकड्याला घश्याखाली घालवताना यांचा जीवच जातो. असे का ?
भारतातील बंगाली माणूस माशाचे डोकेपण आवडीने खातो, पण बिहारी लोकांना, साधे मासे पण खाता येत नाहीत, म्हणून बंगाली बाबु चिडवतात. असे का ?
भारतातील शीख लोक एका झटक्यात मारलेला प्राणीच खाण्यासाठी वापरणार पण मुसलमान मात्र प्राण्यांचा गळा अर्धा चिरून सारे रक्त वाहून गेल्यावर, हाल हाल होऊन मेल्यानंतरचे हलाल मांस खातात. दोघांनाही दुसऱ्या प्रकारचे मांस अजिबात चालत नाही. असे का ?
हे सर्व बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते, की मूळ संस्कार, तेथील नैसर्गिक उपलब्धता, धर्म भावना, जमिनीची कृषी उत्पादनांची सकसता आणि स्वाभाविक ओघ इथपर्यंत आपण पोचतो.
जिथे अन्नधान्यांचे उत्पादनच न के बराबर आहे तिथे जगण्यासाठी मांस खाण्यावाचून पर्यायच नव्हता. पण आता तसे नाही. काळ बदललाय, संसाधने बदलली आहेत. मेहनत केली तर, अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही एवढी उपजाऊ जमिन शिल्लक आहे, अशा देशात आता शेतीमधे बदलाचे वारे वाहू लागले आहेत....
गरज आहे आपल्या मानसिकतेमधे बदल करण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
7.10.2016
October 7, 2016
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016
September 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti