दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.
सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.
आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.
आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.
आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.
तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.
या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.
तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.02.2017
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7
फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.
रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.
पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.
एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
कारण "तो". आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच "तो" आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी .....
तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
सैराट होऊन....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.02.2017
काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग तीन !
निसर्ग कोणासाठी थांबत नाही.
निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत.
कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार नाही.
निसर्ग शक्तीमान आहे. निसर्गाचे जसे एक मन आहे, तसेच निसर्गाचा एक आत्माही आहे. परम आत्मा! त्याची काही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये पण असतील. या सर्वांच्या आधारे निसर्ग आपला गाडा हाकत असतो.
मनुष्य ही निसर्गाची छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गामधे घडत असते, अगदी तस्सेच शरीरात देखील घडत असते. जसा निसर्गामधे सूर्य तसा शरीरात अग्नि किंवा पित्त, उष्णता. जसा निसर्गामधे चंद्र तसा शरीरात कफ किंवा थंडावा, ओलावा. जसा निसर्गामधे वारा तसा शरीरात वायु, गती, हालचाल, चंचलता.
जे बदल निसर्गात होत असतात, त्याचा परिणाम थेट शरीरावर होत असतो. बाहेर उष्णता वाढली की शरीरावर घाम यायला सुरवात होते आणि त्वचा ओली ठेवून आतील रक्त आदि थंड ठेवले जातात. साहाजिकच उन्हाळ्यात लघवीला कमी होते.
याउलट हिवाळ्यात लघवीला जास्ती वेळा जावे लागते, आणि घाम येतच नाही. त्वचेचे, घर्मछिद्रांचे आकुंचन केले जाते. आतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी जणुकाही दरवाजे बंद केले जातात.
हे सर्व बदल कोण करते ? कोण ठरवतं आता आकुंचन आता प्रसरण ? कोण ठरवतं काय खावे प्यावे ? इच्छा कोण निर्माण करतं ? ह्रदय यकृत मेंदूकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा समांतरपणे काम करीत असते. याचे नियंत्रण कोणाकडे असते ? या प्रश्नांची उत्तरे आजही अर्वाचीन शास्त्राकडे नाहीत.
उपनिषदे, वेद, पुराणे यामधे याची उत्तरे दडलेली आहेत. याला आपण निसर्ग म्हणू, ईश्वर म्हणू. अशी एक अत्यंत सूक्ष्म शक्ती की, जिच्या सुप्त इच्छेपुढे आपले विचार कस्पटासमान आहेत. या शक्तीचेच विराट रूपातील दर्शन म्हणजे अर्जुनाला झालेले विश्वरूप दर्शन होय !
म्हणजे मी अर्जुन झालो तर मला सुद्धा असे दर्शन होईल का ? याचे उत्तर हो. असेच येईल. फक्त अर्जुनाचे सर्वच्या सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ती उत्कट भक्ती, ती शक्ती, ती मैत्री, ती भावविभोरता, ती जिज्ञासा, ते वैराग्य, तो कर्मयोग, ते बंधुप्रेम, त्या प्रतिज्ञा, तो संयम, ते शौर्य, ती वीरता, ते चातुर्य, तो संन्यास, सारं काही असलं की भगवंत ( म्हणजे निसर्ग ) अनुकुल होऊन आपल्या सर्व शक्तींनी युक्त होऊन विराट रूप दर्शनासाठी आपल्यासमोर उभे ठाकतात.
जाणून घेण्याची शक्ती नसली की काही जणांना तो प्रलय वाटतो तर काही जणांना ते तांडव वाटते.
अक्राळविक्राळ रूपातील नरसिंहाला शांत करण्यासाठीचा, प्रल्हादाचा एक भक्तीकटाक्ष जरी आपल्यात आणता आला तरी निसर्ग आपल्याला अनुकुल होईल आणि निरामय आरोग्य निश्चितच मिळेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.05.2017
अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ?
नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ?
ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ?
एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज !
केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ?
अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं आयुर्वेदात काय सांगितले आहे ?
आम्हाला वैद्यांनी सांगितलेले पथ्य आणि औषध घ्यायच्या वेळा पाळता येत नाहीत, ते सोडून आयुर्वेदातील औषधे देऊ शकता का ?
बी काॅम्लेक्ससाठी आयुर्वेदात काय ?
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची नाही तर आयुर्वेदात काही आहे का ?
अशा प्रकारचे असंख्य प्रश्न वैद्य मंडळींना विचारले जात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैद्याच्या शैक्षणिक आयुष्यातील निम्मी वर्षे फुकट गेलेली असतात. किंबहुना त्यासाठीच पाच वर्षाचा सिलॅबस पूर्ण करायला काहीजणांना सात आठ वर्षे पण द्यावी लागतात.
या एक मिनीटात विचारलेल्या दोन ओळीच्या प्रश्नांची उत्तरे अशी तीन चार ओळीतच कशी देता येणार ? पाच सहा दिवस विचार केल्यानंतर लक्षात येते की उत्तरे द्यायला सात तास तरी लागतील. म्हणजे आठवडा गेला. तोपर्यंत चांगलेच नाकी नऊ आलेले असतात. आणि दहा वेळा प्रश्नांची उत्तरे सांगितली तरी आणखी अकरा जण बारा प्रश्न घेऊन तयार असतात.
आजच एका गटात विचारणा झालीय. "प्रमेहाचे सर्व पंचवीस भाग वाचले. आता साखर नाॅर्मल राहण्यासाठी काय करायचे ते सांगा." म्हणजे लोकांना किती 'इन्स्टंट फाॅर्म्युले ' हवे आहेत ते बघा.
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. ही विशिष्ट पॅथी नाही. विशिष्ट चौकट आखून त्यात औषधे आणि पथ्य कोंबायची म्हणजे आयुर्वेद नव्हे. असं जर कोणी करत असेल तर त्याला खरंतर आरोग्यच कळलेलं नाही.
समजा आपल्याकडे एखादे मशिन आणलेले आहे. तीन वर्षे वाॅरंटीचे ! काही कारणानी ते मुदतीपूर्वीच बंद पडले.
ते कसे बंद पडले, तेव्हा काय काम करीत होतो, याचे रसभरीत वर्णन ऐकवल्यानंतर तो काय म्हणतो ?
तज्ञाला दाखवल्यानंतर तो म्हणतो,
"अहो, या मशिन बरोबरचे हे 'लिफलेट' वाचले नाहीत का ? त्यावर हे बघा, स्पष्ट शब्दात लिहिले आहे, हे मशीन कसे वापरायचे ते ! तुम्ही हे मशीन तस्से वापरलेले नाही. सबब तुम्हाला या मशीनची 'वाॅरंटी' लागू होत नाही. "
आपण कपाळावर हात मारून फक्त "ओऽहोऽऽ" एवढंच म्हणू शकतो. म्हणतो. कारण तेवढंच आपल्या हातात असते. आणि ते 'लिफलेट' वाचायची वेळ निघून गेलेली असते.
जीवनाचं असच होतं. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असे हे दुर्लभ यंत्र जेव्हा तो शंभर वर्षाच्या वाॅरंटीसह, आपल्या हातात देतो, तेव्हाच एक 'लिफलेट' त्याने या यंत्राला जोडून पाठवलेले असते. हाऊ टु युज इट. लिहिलेलं असतं त्यावर !
पण आम्हाला हे 'लिफलेट' वाचून बघण्याची तसदी घ्यावी असे सुद्धा वाटत नाही. जेव्हा मशीन बंद पडते, तेव्हा हे मशीन का बंद पडले, कसे बंद पडले, कधी बंद पडले, हे शोधण्यासाठी, 'लिफलेट' शोधायची धावाधाव सुरू होते.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे होऊ नये......
या 'लिफलेटचे' नाव आहे.
" आयुर्वेद "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.02.2017
"आम्हाला हे असं लवकर जेवणं अजिबात शक्य नाही, हो!" असं सांगणाऱ्या करीता खास टीप....
सक्काळी सकाळी उठायचं, भराभरा आवरायचं डब्बा बनवायचा, पोरांना शाळेत हाकलायचं, नवरा कामाला पाठवलं की कसाबसा चहात पाव बुचकळून खायचा, म्हणजे झाला नाश्ता. वर पाणी ढोसायचं, आपला डबा करायचा, धावधाव करीत ऑफीस गाठायचं, बाॅसची बोलणी खायची, परत घरी येताना मार्केट मार्गे खरेदी करून, येऊन कंबर कसून परत कामाला लागायचं, टीव्ही समोर बसलेल्यांना तिथे नेऊन चहा बिस्कीट खायला द्यायची, कपबशासुद्धा आपणच घरात न्यायच्या. रात्रीच्या जेवणाचं बघायचं, हे करत असताना, तू आज कशी चुकलीस, हे समोर खुर्चीवर ढेंग टाकून निवांत बसलेल्याकडून निमूटपणे ऐकून घ्यायचं. तोंडातून एकही अवाक्षर न काढता, जेवणाचा कार्यक्रम पार पाडायचा, आपणच डाॅक्टरकडे जाऊन आणलेल्या गोळ्या आपणच घ्यायच्या आणि कधी एकदा पडता येतंय याची वाट बघायची ......
हे सर्व कशासाठी करताय ?
दोन घास सुखानं खाता यावेत म्हणून ना.....
खाल्लेलं अंगाला लागण्यासाठीच ना.....
पण जरं या व्यस्त दिनचर्येतून जर शेवटच्या दोन ओळी साध्य होणार नसतील तर ? सगळा खटाटोप कशासाठी करताय ?
कशासाठी ? पोटासाठी !
एकच बदल करून पहा,
फक्त जेवणाची वेळ बदला...
आता असं करता येतं का बघा.
सकाळचा नाश्ता कॅन्सल.
नाश्त्याऐवजी थेट पोटभर जेवण.
दुपारचं जेवण / डबा कॅन्सल.
सायंकाळी घरी आल्यावर पोटभर जेवण.
( जे सातला घरी पोचू शकत नाहीत, त्यांनी सायंकाळचा डबा सोबत न्यावा.)
दोन वेळा जेवण बनवायचंच नाही. फक्त सकाळी एकदाच जेवण बनवण्यात वेळ खर्च करायचा. एक पदार्थ फक्त सायंकाळी नवीन करायचा. बाकीचे तीन प्रकार सकाळचेच.
सूर्य असल्यामुळे सकाळचे तयार अन्न सायंकाळ पर्यंत नासत नाही. सायंकाळी बनवलेले मात्र सकाळी फुकट जाते.
दुपारचा डबा अगदी भुकेपुरताच. सायंकाळच्या भूकेची जाणीव ठेवणारा.
दुसरे मुख्य जेवण सायंकाळी सात वाजता.
बाकी जेवणात कोणतेही पथ्य करायचे नाही.
सूर्योदय ते सूर्यास्त सगळं खायचं, पोटभर खायचं, मनसोक्त खायचं.... कावळ्यासारखं !
पथ्य एकच ....
खाताना भीती न बाळगता खायचं. आणि खाल्ल्यानंतर खाल्लेलं सगळं विसरून जायचं. खाल्लेलं आठवायचं नाही, मनात साठवायचं नाही.
बायकांचा स्वयंपाकघरात जाणारा आणि "रांधा वाढा उष्टी काढा" मधे खर्च होणारा वेळ वाचेल.
सायंकाळी साडेसातनंतर स्वयंपाकघर बंद.
सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी शाॅपिंग, देऊळ, बाग.... थोडं मोकळे वाटेल.
स्वयंपाकघरातला वेळ वाचेल,
फॅमिली लाईफ एन्जाॅय करता येईल, हौस, मौज करता येईल.... आणि बरंच काही...
मुख्य म्हणजे निरर्थक औषधांशिवाय, निरामय जीवन जगत सगळं जेवण घेता येईल.
नाहीतर......
डोंबिवली फास्ट पकडत, दिवसभर धांगड धिंगा करत, ज्या पोटात आहार टाकल्यानंतर त्याचे रूपांतर उर्जेमधे होते, त्याऐवजी, त्याच पोटात रोज न चुकता, जन्मभर पुरणारी औषधं टाकायची आहेतच...
आणि डाॅक्टरच लिहून देतात हल्ली...
वरील सर्व औषधे पांडुरंगाच्या चरणी विलीन होईपर्यंत सुरू ठेवावीत......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.03.2017
आहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो. वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच.
ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.
एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.
कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.
ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !
बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.
ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.
अगदी अलगद लहरेदार !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.03.2017
काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात.
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हो हाच तो भोपळा ज्यात बसून वाघाला चुकवून म्हातारी लेकिच्या घरी धष्टपुष्ट व्हायला गेली होती बरं का!ह्या लाल भोपळ्यांचे घारगे,वडे,भाजी,कोशिंबीर,भजी,चटणी सगळेच कसे रूचकर लागते.
हा भोपळा मोठा असला तरी वेलींवर उगवतो बरं का.जसे स्वयंपाकात ह्याचा भरपूर उपयोग होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हा वापरू शकतो.
लाल भोपळा हा चवीला गोड,तुरट व थंड असून शरीरातील पित्त व वात हे दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.
चला ह्याचे औषधी उपयोग पाहू:
१)अतिभूक लागून वारंवार काही तरी खावेसे वाटते तेव्हा भोपळ्याची उकडून केलेली भाजी किंवा तूपात तळलेले वडे खावे.
२)तोंडास रूची नसणे व अन्न नकोसे होणे ह्यात लाल भोपळ्यांचे दह्यात केले भरीत जीरे व तूपाची फोडणी व सैंधव घालून खावे.
३)धावपळ दगदग ह्यामुळे त्रास होत असल्यास १ कप भोपळ्याचा रस+१ चमचा साखर+ १/४ चमचा सैंधव घालून प्यावे.
४)भोपळ्याच्या बिया सोलून आतील मगज तूपात तांबूस परतून त्यात साखर घालून लहान लहान लाडू करावे व ते अशक्तपणा मध्ये तसेच लहान मुलांना खायला द्यावेत.
५)आजारी व्यक्तीला भोपळा उकडून वाटून त्यात साजूक तूप व जि-याची फोडणी देऊन केलेले सूप द्यावे.
भोपळा खायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti