प्राण्यांचे मांस मिळवणे आणि खाणे एवढीच ही इंडस्ट्री नाही. तर याही पुढे जात पुढील मनीमेकींग सुरू झाले. भारतीय संदर्भ, भारतीय जीवनपद्धती, भारतीय संस्कार, भारतीय ग्रामीण मानसिकता यांच्यावर आघात करणारे आक्रमण घाऊक मांस उत्पादकांनी सुरू केले. निव्वळ मांसाच्या किंवा अंड्यांच्या विक्रीतून आवश्यक तो फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर बायप्राॅडक्टस कसे तयार करता येतील, याची विक्री योजना तयार झाली.
पशुहत्येतून मिळणारे रक्त वायाच जात होते. त्यापासून रक्त वाढणारी टाॅनिक तयार केली जाऊ लागली. नव्हे ती गरज बनली. आज बाजारात अनेक कट्टर शाकाहारी रूग्णांना, अनेक कट्टर शाकाहारी डाॅक्टर ही रक्तवाढीची टाॅनिक लिहून देत आहेत. दोघांनाही माहीत नाही आपण काय करतोय !
जनावरांची चरबी वायाच जाते. तिच्यापासून अनेक नामवंत साबण बनवले जात आहेत आणि आम्ही मारे अंगाची खोलवर स्वच्छता, तंदुरुस्ती की रक्षा करने के लिए, निंबुयुक्त, अश्या विशेषणांना भुलुन, असले कचरा साबण बिनधास्त वापरत आहोत.
( वेळीच लक्षात आल्यामुळे गेली वीस वर्षे मी स्वतः कोणत्याही कंपनीचा कोणताही साबण आंघोळीला वापरत नाही. एकदम हॅप्पी. उटणे वापरतो. वर्षभर दिवाळी ! प्रत्येक दिवस हा आनंददायी वाटत असेल तर निशीदिन आम्हा दसरा दिवाळी. )
या चरबीपासूनच मेणबत्या, काही सौंदर्य प्रसाधने, तयार केली जातात. मध्यंतरी महाराष्ट्रामधेच या चरबीपासून वनस्पती तूप तयार करणाऱ्या एका छुप्या कारखान्याचा पर्दापाश केला गेला होता.
गेल्या दशकातील अॅनिमल टेलो आयात प्रकरण हातोहात दडपले गेले आणि परदेशातील चरबी निर्यातदार सुरक्षित राहीले हा इतिहास आहे.
पण आपण सोयीस्कर पणे विसरून जातो. आणि अगदी सत्यनारायणपूजेसाठी सुद्धा असले वनस्पती तूप/ डालडा वापरलेला प्रसाद खातो. ( प्रबोधन केल्यामुळे आमच्या गावातील हित जाणणाऱ्या काही पुरोहितानी, सत्यनारायणाच्या पुजेतील साहीत्यामधे प्रसादाकरीता, गावठी गाईचे तूप नसल्यास पूजा केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. आणि गावात आरोग्यदायी प्रसाद मिळू लागला. ठरवलं तर आपण काहीही बदल घडवू शकतो, याचं हे छोटसं उदाहरण )
हत्येनंतर शिल्लक राहिलेल्या हाडकांपासून कॅल्शियम फाॅस्फरस वेगळे काढून, किंवा काहीवेळा हाडकांच्या राखेचा वापर फोलगेट सारख्या नामवंत टूथपेस्ट बनवताना बेस म्हणून केला जाऊ लागला. आणि दातांची स्वच्छता करण्यासाठी ही हाडांची राख उपवासाच्या दिवशीसुद्धा तोंडात रगडू लागलो.
यातून तयार केलेले जिलेटीन हे आणखीनच एक द्रव्य. आज सर्रासपणे चाॅकलेट, टाॅफीज, आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरले जाते.
पशुंच्या लिव्हर किंवा अन्य अवयवांपासून मिळवलेली, बनवलेली काही एन्झाइम्स आज मेडीकल मार्केट मधे धडल्ले से बेची जा रही है !
पण लक्षात घेतो कोण ?
चलता है यार असं स्टाईलवर म्हणून या पापात सहभागी होत जातो. एका बाजूने पापपुण्य असलं काही नसतंच. असं ठामपणे पटवून देणारी बुद्धिमान माणसं तयार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सगळी मेंढरं. कुणीही हाका........ कुठेही जायला तयार !
किती ठिकाणी, कोणत्या रस्त्यावरून, कुठे जात, कसलं सीमोल्लंघन करायचंय, हे ठरवण्याचा आजचा दिवस.
याचा फक्त एक तासभर विचार करायचा. आणि पुनः पुढील वर्षी दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणेपर्यंत विसरून जायचं. झालं.... !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
11.10.2016

ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.
आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे.
समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव.
हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो.
आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
........आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?
पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.
जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.
मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.
पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
कधी विचार केलाय याचा ?
बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, "इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।"
स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.
शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.
प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.
इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
कुणी कुणाचे नाऽही
मग काय करायचं ?
पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.
दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत........
पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.......
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.10.2016
आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?
कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.
वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.
आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.
आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.
सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.
अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !
म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.
आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !
दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.
परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
22.09.2016
आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.
जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.
कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.
आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.
२)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.
३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात
४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.
५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.
६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.
कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक
नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे.
भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत "ड्रम किंवा बॅरल" तयार करत असत. त्यासाठी पण निसर्गाने दिलेले ( इकोफ्रेंडली ) गवतच वापरले जायचे. बांबूच्या काठ्या आणि गवत यांचा वापर करून धान्य साठवण्याच्या इकोफ्रेंडली टाक्या तयार केल्या जायच्या. आरोग्याला हानीकारक प्लॅस्टिकच्या ड्रमचा वापर, अन्न धान्य टिकवण्यासाठी ? ना रे बाब्बा ना !
धान्य एक वर्ष जुने का करायचे, कसे करायचे, त्याचे फायदे आणि तोटे काय हे प्रश्न ओघाने आलेच. त्याची उत्तरे आपणही शोधण्याचा प्रयत्न करावा.
जुना गुळ, जुने तांदुळ, जुनी कडधान्ये पचायला हलकी असतात. जुनी माणसे मात्र पचायला जरा जडच असतात. संस्कृतमधे सांगायचं तर "गुरू" असतात. "गुरू" असतात, ते पचायला जरा जडच असतात ना !
आयुर्वेदातील काही औषधे जमिनीमधे पुरून ठेवून, धान्याच्या राशीत पुरून ठेवून, नंतर ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून वापरावीत. असे सांगितलेले आहे. म्हणजे त्यातील चांगल्या गुणांमधे वाढ होते, तर "आमा" सारखे दोष कमी होतात.
फळे पिकल्यानंतरच खावीत, कच्ची खाऊ नयेत. अधमुरे म्हणजे अर्धवट दही खाऊ नये, अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये, अर्धवट वैद्याचा सल्ला मानू नये, अर्धवट ज्ञानावर फुशारकी गाजवू नये, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये इ.इ. .... म्हणजेच पक्के फळ खावे, पूर्ण लागलेले दही खावे, पूर्ण शिजलेले अन्न खावे, पूर्णपणे शास्त्रीय ज्ञान घेतलेल्या वैद्याकडूनच सल्ले घ्यावेत, आपला अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच इतरांना सांगावे, ( अभ्यासे प्रकट व्हावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकट होवोनी नासावे, हे बरे नव्हे । - इति, समर्थ रामदास स्वामी ) औषधे वापरताना देखील पूर्ण मात्रेतच वापरावीत. तर आणि तरच योग्य आणि चांगला फरक दिसतो, नाहीतर त्रासच होतो. नारळ देखील पूर्ण पिकल्यानंतरच वापरावा, कच्चे शहाळे पचायला जड होते. आरोग्य मिळवण्यासाठी जग किती विचित्र आणि उलटे चालले आहे.
प्रत्येकालाच घाई आहे, पुढे जायची, वेगानं जायची, जमाना पण इन्स्टंटचाच आहे. भाज्या सुद्धा अर्धवट शिजवून तयार विकत मिळतात. टू मिनट नूडल्स सारख्या, फक्त वर गरम पाणी ओता, की भाजी सुद्धा तयार ! तेवढा सुद्धा वेळ नाही आमच्याकडे, असे वर म्हणायचे !
धान्य वापरण्यापूर्वी काही काळ तसाच जाणे अपेक्षित आहे. म्हणजे त्यातील काही दोष काळाच्या प्रभावामुळे आपोआपच कमी होतात. म्हणजेच "काळ" हे पण मोठे प्रभावी औषध आहे.
ठराविक "काळ" निघून गेला की, मनातील राग, घुसमट देखील कमी होत जाते ना, तसेच धान्याचे देखील आहे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2
जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.
आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.
प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.
प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !
आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?
असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.
नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.05.2017
Copyright © 2025 | Marathisrushti