(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • याला जीवन ऐसे नाव भाग ६

    वेगान् न धारयेत
    न प्रवृत्तयेत
    वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये.
    म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे.

    तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही.

    जसे, उलटी होते, शिंक येते, लघवी होते, ही शरीराच्या चांगल्यासाठीच असते. पण उलटी होत नसताना उगाच सुके ओकांबे काढणे म्हणजे निव्वळ दमछाक करून घेणे आहे.

    शिंक आल्यावर जरूर शिंकावे. पण उगाचच टा. पा. (टाईमपास) म्हणून नाकात काड्या घालतात, ते नाकाला हुळहुळ निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही.

    तशीच तहान लागणे आणि पाणी पिणे हे करावेच. तसेच तहान लागली नसताना पाणी पिणे म्हणजे किडनींची निव्वळ दमछाक होते. जेव्हा शरीराला पाण्याची गरज लागेल तेव्हा, शरीर तहान हे लक्षण निर्माण करतेच. तहान कळलीच नाही तर घश्याला कोरड पडेल, लघवीला पिवळसर होईल, लालसर होईल, जळजळ होईल, अर्थात अशावेळी सुद्धा साधे पाणी पिऊ नये तर, धने जिरे घालून उकळलेले पाणी थोडे थोडे घोटघोट प्यावे.

    तहान लागणे आणि सारखी तहान लागणे, यातील सूक्ष्म फरक समजला पाहिजे. मधुमेहासारख्या आजारात जी वारंवार तहान लागते ती, रोग स्वरूपात असते. ती पाणी पिऊनदेखील थांबत नाही, भागत नाही, अशावेळी तो वेग नसून रोग आहे असे समजावे. ( ज्यावेळी पाणी पिऊन त्याचे समाधान होते, त्यावेळी तो शरीराकडून निर्माण झालेला वेग असतो. आणि तहान लागून पाणी पिऊनही जेव्हा त्याचे समाधान होत नाही, असे जेव्हा तोआपल्याला सांगतो, तेव्हा "आता वैद्याला दाखवून घ्या" असे तो, आपल्याला सूचित करतो. हे समजले पाहिजे.)

    जसे कफ झाला असता उलटी होणे वेगळे आणि रोग म्हणून उलटी होणे वेगळे आणि तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन म्हणजे पंचकर्मातील उलट्या करवणे वेगळे !

    यातील फरक, पुस्तक वाचून किंवा वाॅटसप मेसेज वाचून कळणार नाही. याकरीता पूर्वीचा आपला स्वतःचा किंवा तज्ञ वैद्याचा अनुभव महत्वाचा आहे.

    हे सर्व करवून घेणारा तो असतो.

    दैनंदिन दिनचर्येतील त्याचे महत्व, त्याचे अस्तित्व, त्याचा आपल्याशी होणारा सुसंवाद,
    हे समजून घेणाऱ्याला, नक्कीच समजून येईल. हे जो समजून घेईल, त्याला दुःख कधीच होणार नाही.
    कारण तो म्हणजे फक्त सत् चित् आनंद !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    13.12.2016

  • किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण

    १)गाईचे तुप:

    बुद्धि,कांती,स्मृती,धारणाशक्ती वाढविते,स्त्रोतसांचे शोधन करते,वातनाशक,स्वर चांगला ठेवते,पित्तनाशक,पुष्टीदायक,भुक वाढविते,वृष्य,आयुष्यकारक,गोड असून सर्व तुपांत श्रेष्ठ आहे.हे विषनाशक,डोळ्यांना हितकर,रसायन असून आरोग्यदायक आहे.

    २)म्हशीचे तुप:

    धारणाशक्तीवाढविणारे,सुखदायक,
    कांतीवर्धक,कफवातनाशक,शक्तिवर्धक शरीरवर्ण सुधारणारे,मुळव्याध नाशक,भुक वाढविणारे व डोळ्यांसाठी हितकर आहे.

    ३)शेळीचे तुप:

    भुक वाढविते,डोळ्यांनाहितकर,बलवर्धक,
    खोकला,दमा कमी करणारे,पचायला अत्यंत हल्के असते.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग तेवीस

    धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत.

  • किचन क्लिनिक – कांदा

    आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.

    कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही.औषधे पोटात घयायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.

    चलातर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!

    १)मुळव्याधी मध्ये ब-याच जणांना संडासला घट्ट होते त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.

    २)जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.

    ३)कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात प्रत्येक चकतीवर खंडीसाखर घालून एकावरएक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी ,खोकला ह्यात कफसुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.

    ४)खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाज देखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.

    ५)मार लागणे,मुरगळणे,सुज ह्यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करून कोमट करून दुखणा-या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सतरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग आठ

    औषध घेतलं पण गुणंच आला नाही. असं बऱ्याच वेळा होतं. असं का होत असेल. काही तरी चुकतंय, कुठेतरी चुकतंय, हे शोधून काढलं की दोष निघून जातो. कोणत्याही समस्या या याच पद्धतीने सोडवायच्या असतात. ही आयुर्वेदीय दृष्टी प्राप्त व्हायला हवी.

    जसं आपली एखादी टुव्हीलर सुरूच होत नाहीये, बंद पडली आहे. तिची काय काय कारणं असू शकतात, याचा विचार करतो तेव्हा पहिलं कारण इंधन संपलेलं असणं,इंधनाचा दर्जा योग्य नसणं, इंधनामधे कचरा असणं, टाकीमधे असलेलं इंधन कार्बोरेटरला न मिळणं, कार्बोरेटरमधे कचरा अडकणं, कारबोरेटरमधे एअर येणे, दुसरं, बॅटरी संपलेली असणं, अन्य पार्टस मधे काहीतरी गडबड निर्माण होणं, सायलेन्सर साफ नसणं, अशी अनेक कारणांचा विचार एकाच वेळी करावा लागतो.

    घरातलं उदाहरण घेऊ, पुरणपोळी योग्य लुसलुशीत न होण्याची कारण काय असतील, याचा नीट विचार केला तर अनेक कारणांचा शोध घ्यावा लागतो. जसं चणाडाळ योग्य प्रतीची नसणं, ती नीट न शिजणं, नीट वाटली न जाणं, शिजल्यावर कटाचे पाणी नीट निथळून न घेणं, नीट न ढवळता आल्याने पातेल्याच्या बुडाला शिजलेली डाळ करपणं, दुसरं गुळ चांगला नसणं, तो योग्य प्रमाणात न घेणं, त्याचा पाक योग्य न होणं, डाळीमधे एकत्र करताना योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळी एकत्र न करणं, नीट न ढवळणं, तिसरं पीठंच चांगले नसणं, योग्य तेवढं तिंबलं न जाणं, त्या पीठात सढळ हस्ते तेल न घालणं, तिंबून झाल्यावर योग्य तेवढा वेळ जाऊ न देणं, तवा योग्य नसणं, विस्तव नीट नसणे, पोळपाट नीट नसणं, नीट लाटताच न येणं, तव्यावर पसरवणं, ती फिरवणं, परतणं,खमंग भाजल्यावर वाफ जाईपर्यंत पसरून ठेवणं, अतिरिक्त पीठ हळुवार काढून घेणं,तिची नीट घडी करून ठेवणं......इ.इ.
    पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेता येत नाही, याची ही एवढी कारणं असू शकतात. ही अगदी वरवरची कारणे झाली, सूक्ष्म कारणांचा विचार केलेलाच नाही. इ.इ. अनेक कारणे जेव्हा लक्षात घेतली जातील, आणि ती जेव्हा दूर केली जातील, तेव्हा पुरणपोळी अगदी म न प सं त झालीच पायजे.
    बरोबर ना !

    अगदी हीच, अशीच कारणे, औषधं लागू न पडण्याची आहेत,

    वैद्याचे निदान चुकणे, वैद्याकडून औषधाची निवड चुकणे, अनुपान सांगायला विसरणे, चुकणे, इ.

    औषधे देणाऱ्या मदतनीसाकडून, औषध द्यायची वेळ चुकणे, चुकीचे औषध देणे, चुकीच्या वेळी देणे, औषध देताना विश्वासाने न देणे, वैद्याने सांगितलेले अनुपान न निवडता, स्वतःच्या मनाने त्याअनुपानात बदल करवून देणे, इ.इ.

    रुग्णाने, दिलेले औषध पूर्ण मात्रेत न घेणे, अर्धे औषध वाटीत तसेच ठेवून पटकन वाटी धुवून टाकणे, गोळी घेतल्याचे नाटक करून, ती तोंडातच लपवून, चुळ भरण्याच्या बहाण्याने ती गोळी थुंकुन टाकणे, कंटाळत औषध घेणे, विश्वासाने न घेणे, "एवढी औषधे संपवली, आता ह्या एवढ्याश्या गोळीने काय होणारे" असा नकारात्मक विचार औषध घेताना मनात निर्माण होणे, इ.इ.इ.

    औषधाचा दर्जा योग्य नसणे, खूप जुने (एक्स्पायर्ड) दळ गेलेले औषध वापरणे, जसे सांगितलेले आहे तस्सेच औषध न मिळणे, काही औषधांचा संग्रह हा विशिष्ट ग्रहणाच्या वेळी, विशिष्ट नक्षत्र असताना, विशिष्ट दिशेचे, विशिष्ट मंत्र म्हणून, त्या वनस्पतीला प्रार्थना करून, विशिष्ट विधी करून, तोडून संग्रहीत करायची असतात. वाळवताना सावलीत वाळवणे, कडक उन्हात वाळवणे, वाळवून झाल्यावर ती योग्य त्या ठिकाणी संग्रहीत न करणे, काही औषधे भाताच्या राशीत, काही जमिनीमधे पुरून, काही औषधे मधात बुडवून, काही औषधे लाकडी कपाटात, काही काचेच्या बरणीत ठेवायची असतात. तर काही औषधे तयार करताना सूर्य हवा, तर काही औषधे तयार करताना चंद्राचा प्रकाश त्यावर पडायला हवा, काही औषधे तयार करताना विशिष्ट मंत्र म्हटले असता, औषधांची कार्यशक्ती वाढते, इ.इ.इ.इ.

    अबबबबब एवऽढीऽ कारणे असू शकतात, याला ग्रंथकार चिकित्सेचे चतुष्पाद असा शब्द योजतात. वैद्य, परिचारक, रूग्ण आणि औषध.
    पाचवे कारण दैव अनुकुल असणे वा नसणे, हा दैववाद देखील आयुर्वेद मानतो.

    हे परम्युटेशन काॅम्बीनेशन, ज्याचे जुळले त्याला औषधांचा गुण आलाच म्हणून समजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    26.04.2017

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ९

    जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही.
    प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते.

    भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते ती निसर्गाच्या विरोधात नसते, उलट हे निसर्ग पूरक काम असते. अन्नधान्य फळं मिळवण्यासाठी लावलेली झाडे वगैरे आपल्याला प्राणवायुच पुरवतात. कार्बन शोषून घेतात. वातावरणाचे रक्षण करीत असतात. निसर्गाला पूरक कार्य चाललेले असते.

    मालकाच्या विरोधात जाऊन केलेले काम आणि मालकाचा फायदा होईल असे केलेले काम. यात मालकाला कोणते काम अधिक आवडेल ?

    पोट भरण्यासाठी शाकाहार हा स्वस्त आणि मस्त होतो. आज हाॅटेलमधे मिळणाऱ्या कोणत्याही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या डिश पहा. जगात कुठेही जाऊन शोधा, मांसाहारी डिश महाग आहेत.
    असे का ?
    त्यांचे निर्माणमूल्य जास्ती आहे म्हणून !
    ज्या वस्तू कोणाचे नुकसान न करता तयार होतात, त्या स्वस्त बनतात.

    एक परिक्षण असे सांगते की, एक किलो मांस तयार करण्यासाठी किमान सत्तर किलो चारा वा खाद्य पशुंना खावे लागते. हे खाद्य ज्या जमिनीवर तयार केले जाते, त्याच जमिनीवर जर धान्य उत्पादन केले गेले तर दरदिवशी किमान सत्तर जणांचे एका वेळेस पुरेल एवढे भोजन तयार होऊ शकते.

    मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे परावलंबी रहावे लागते. निसर्गदत्त मांस देणारे प्राणी कमी होत आले आणि खायला दुसरे अन्न निसर्ग देत नाही, अशा विपरीत स्थितीमधे माणसाला कृत्रिमपणे प्राण्यांची पैदास करावी लागली. निसर्गाच्या विरोधात जाऊन, निसर्गावरच त्यांच्या पोषणाचा अनावश्यक भार टाकून, कृत्रिमपणे तयार केलेल्या प्राण्यांचे मांस माणसाचे पोषण कसे बरे करील ? आज जे मांस उत्पादन कारखाने दिसत आहेत ती केवळ पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे. पण यातून कधीही शांती मिळत नाही. म्हणून ही शांती अनुभवण्यासाठी भारतामधे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे.

    मांसाहार करणाऱ्या प्रदेशात शांती कुठुन मिळणार ? आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कुठुन येणार ?
    त्यांची सुरू असते फक्त धडपड,
    जगण्यासाठी.
    सतत अस्वस्थपणे....
    केवळ स्वतः जगण्यासाठी !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    9.10.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पंधरा

    ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट.

    तसेच अन्नरस तयार झाला की, त्यातून दोन घटक बनवले जातात. एक चांगला सार भाग दुसरा टाकावू किट्ट भाग. सार भागापासून सात धातुंची निर्मिती केली जाते. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे ते सात धातु. (धातु म्हणजे धातु, मेटल नव्हे.) आणि किट्ट भागापासून मल, मूत्र आणि स्वेद निर्माण होतात. या निर्माण कार्यात सात धातुंचे सात अग्नि, पंचमहाभूतांचे पाच अग्नि आणि मुख्य जाठराग्नि असे एकुण तेरा प्रकारचे अग्नि भाग घेतात. सार भागापासून उत्तम धातु निर्माण कसे केले जाते याचे वर्णन गेल्या वर्षीच्या आरोग्यटीपेमधील अन्नपचन या मालिकेमधे केलेले आहे.

    टाकावू भाग जर योग्य वेळी, योग्य मार्गाने शरीराबाहेर टाकला गेला नाही, तर चांगला सार भाग कितीही उत्तम रीत्या तयार झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसे उसाचा रस काढला जात असताना त्यातील कचरा रसात येऊ नये म्हणून रस दोन वेळा गाळून कचरा वेगळा केला जातो. ऊसाच्या रसापासून गुळ करताना देखील वारंवार त्यातील मळी वेगळी केली जाते, तरच उत्तम प्रतीचा गुळ तयार होतो. म्हणजे कचरा साफ करणारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.

    तसेच अन्नरसातील कचरा, विषारी पदार्थ वेगळे करणारी यंत्रणादेखील शरीरात काम करत असते. यामधे यकृत, वृक्क हे प्रमुख अवयव आहेत. अन्नरसाचे रूपांतर शुक्रापर्यत करीत असताना वेळोवेळी त्यातील टाकावू भाग वेगळा केला जातो. योग्य त्या मलमार्गामधे ( वेशीवर ) आणून ठेवला जातो. घन भाग गुदमार्गाने, आणि द्रव भाग मूत्र आणि स्वेद (म्हणजे घाम ) मार्गाने बाहेर काढला जातो. हिवाळा पावसाळ्यात ऋतु बदलला की, लघवी जास्ती होते आणि उन्हाळ्यात घाम जास्ती येतो. हे बाहेरील ऋतु ओळखून तसे बदल आतमधे करवणारा तो सिंपली ग्रेट !

    गावातील गटारे, कचऱ्याच्या कुंड्या, रस्त्यावरील घाण, जर योग्य वेळेला साफ केले गेले नाहीत, तर केव्हाही, साथीचे आजार वेशीवर, घुसखोरीच्या संधीची वाट बघत बसलेलेच असतात. म्हणून ही स्वच्छ भारत यंत्रणा पुनः एकदा नीट लक्ष देऊन कार्यरत करण्यासाठी आपण सगळे झटत आहोत.

    जसे देशासाठी, तसेच देहासाठी सुद्धा जागरूक राहीले पाहिजे. जर देशातील आणि देहातील हा कचरा योग्य वेळी, योग्य यंत्रणामार्फत, सदैव जागरूक राहून, देहाबाहेर बाहेर काढला गेला नाही, तर वेशीवरचे राक्षस आत आलेच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    30.03.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – तांदुळजा (चवळीचा पाला)

    तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.

    हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:

    १)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.

    २)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.

    ३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.

    ४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.

    ५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.

    हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    04.04.2017