मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील 'हिंग लावणे' हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो.
चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव.ह्याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात,त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास हिराहिंग म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो.हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणी उष्ण असतो.त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अतिवापराने पित्त मात्र वाढवू शकतो.हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा.तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१)अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२)भूक लागत नसल्यासवअथवा तोंडास रूची नसल्यास १/४चमचा हिंगपूड +२चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासा सोबत घ्यावे.
३)१/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापुर्वी चावून खावे ह्याने जीभेवर साचलेला मळ आणी तोंडास दुर्गंध येणे ह्या समस्या कमी होतात.
४)जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणी हिंग ह्यांची पेस्ट जखमेवर लावणे.(क्रूपया डायबेटिस मुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५)गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणी सूज कमी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
नमस्कारानंतर करायची प्रार्थना. या पूजेमधे माझे काही चुकले असेल तर देवा मला क्षमा कर. क्षमा मागण्यात कोणताही कमीपणा नाही. प्रत्येक धर्मात या प्रार्थना आहेत. प्रार्थनेमधे मोठी शक्ती आहे. सामुहिक प्रार्थनेत तर आणखी जास्त शक्ती मिळते. येथे शक्ती हा शब्द शब्दशः अर्थाने वापरायचा नाही.
शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.
आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.
या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.
मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.
एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.
तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.
एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !
इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.
परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.
मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.
तसेच या चवींचे आहे.
कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.11.2016
आपल्याला चुकुन खूप राग आला तर आपण सहजपणे काय म्हणतो ?
"कच्चा चबा के खा जाऊंगा"
याचा दुसरा अर्थ असा होतो की, आपल्या भावना बदलल्या की राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा भावना तीव्र असतातच, पण त्या आणखीन तीव्र होण्यासाठी कच्चं खाण्याची भाषा केली जाते.
याचा अर्थ असा आहे, की कच्चे अन्न खाऊ नये. भावना बदलतात.
कच्चे अन्न आपणा मनुष्याना हितकर नाही. माणसाला देवाने बुद्धी दिली आहे. अन्न शिजवण्यासाठी अग्नी दिला आहे. विज्ञानाने अग्नी संरक्षित करण्यासाठी साधने दिली आहेत. भारतात जन्माला येऊन सुसंस्कार शिकवले आहेत. आणि या सर्वांचा वापर केला गेला नाही तर समर्थांच्या भाषेत "करंटा" ही पदवी प्राप्त होते.
(हाती आहे पण वापरायचे नाही, आणि नंतर रडत बसायचे. म्हणजे हातात लाॅटरीचे तिकीट आहे. सर्वात मोठे बक्षिस लागलेले आहे, पण अंतिम तारखेपर्यंत तिकीट दाखवून बक्षिस न आणणे याला करंटेपणा म्हणतात.)
शाकाहारी प्राण्यांना देखील त्यांचा शाक आहार पचवण्यासाठी तो पोटातून परत मागे तोंडात आणून रवंथ करावे लागते, तरच तो आहार त्यांना पचतो. त्यासाठी त्या शाकाहारी प्राण्यांच्या पोटात ईश्वराने वेगळा कप्पा ठेवलेला असतो, पण माणसाला रवंथ करण्याची सोय नाही.
भाज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत.
शाक म्हणजे भाजी. पालेभाजी, फळभाजी, कंदभाजी, वेलीची भाजी, शेंगभाजी, असे प्रकार सांगता येतील.
आजकाल पाश्चात्य बुद्धीचे डाएटिशियन असे सांगतात, कच्च्या भाज्या खा. सॅलेडस खा, मोड आलेली कडधान्ये कच्चीच खावा.
पालेभाज्या या वातुळ आहेत. तुरट चवीच्या आहेत. कच्च्या खाल्ल्यातर पचतच नाहीत, किंवा त्या पचवण्यासाठी आपली पचनशक्ती किंवा ऊर्जा संपून जाते.
आठवड्यातून एखादा दिवस, प्रमाणात थोडी, सुसंस्कारीत, पचायला जड असणारे भाजीतील काही घटक भाजीतून निवडून, आधीच काढून टाकलेली, नीट शिजवलेली, मसाल्यांचा युक्तीने वापर करून पचायला सुलभ बनवलेली, भाजी पचवायला शरीराला कष्ट पडत नाहीत, पण रोज रोज, असा कच्चा पाला पोट किती सहन करणार ना ?
कच्चं खायची एक मर्यादा सांगून ठेवतो, ताटात कच्ची कोशींबीर, पचडी घ्यावी. पण किती ? जास्तीत जास्त दोन चमचे. चार चमचे. यापेक्षा अधिक नको.
पोट तरी कायकाय करणार? आणि किती करावं ना पोटाने तरी ?
पण, अन्न पचवण्याचा.........
जो वादा किया है ऽऽऽ, निभाना पडेगा ।
या तत्वाने पोट आपल्या परीने हा सगळा पाला पचवण्यासाठी, रोके जमाना चाहे, आपले सारे कसब पणाला लावते.
पण सरतेशेवटी आतली उर्जा संपल्याने पचन बिघडते, आणि हमखास वात वाढतो.
लिमिट की भी कुछ हद होती है यार !!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.10.2016
तहान तर लागली आहे आणि अनावश्यक पाणी प्यायचे पण नाहीये, अशा वेळी काय करावे?
साधे उदाहरण घेऊ.
दुपारच्या वेळी भर उन्हात बाजारात गेलाय, आजच्या भाषेत शाॅपिंगला !
प्रचंड तहान लागली आहे. आणि तुम्हाला थंडगार पाणी ऑफर केले, तर एक ग्लास थंडगार पाणी अगदी एका दमात पिऊ शकाल. पण तहान भागली, असं वाटणार नाही. पाणी साधे असेल तर, एक ग्लास प्यायले जाईल पण तेवढा आनंद मिळणार नाही. उकळून गार केलेले असेल तर अर्धे ग्लासच पाणी प्यायला होईल. हेच पाणी गरम गरम असेल तर अर्धे ग्लास कुठचे, पाव ग्लास पण जाणार नाही. आणि याच पाण्यात उकळताना सुंठ, धने, जिरे आले, यापैकी एक तिखट फ्लेवर दिला असेल तर ? चार घोट सुद्धा पिणार नाही आणि पुरे म्हटले जाईल.
तहान लागली असता, तहान भागली तर पाहिजे आणि पाणी कमी प्यायचे ठरवले तर काय करावे लागेल, हे स्पष्ट होत गेले.
मनाची तृप्ती करत, आवश्यकता असेल तेवढे पाणी घेतले गेले आणि प्रमाणात पण कमी गेले. त्यात मिसळलेल्या औषधांचा, मिळणारा फायदा अतिरिक्तच !
म्हणजेच हे मसाला पाणी अल्प प्रमाणात जाऊन मस्त काम करते. मधुमेह, ह्रदयरोग, संधीवात यासारख्या आजारात असे मसालाजल अधिक चांगले काम करते.
व्यवहारात हा योग जुळवून आणायचा असेल तर काय करावे लागेल ?
दररोज एक मसाला पिण्याच्या पाण्यात घालून ठेवावा. जसे जिरे, दालचिनी, वेलची, मिरी, तमालपत्र, आले, बडिशेप, सुंठ.... झाली आठ. आठवड्यातील सातही दिवशी रोज एक मसाला वापरायचे ठरवले तरी पुरतील.
अर्थात आधी आपली प्रकृती, आपला रोग पाहून औषधाची निवड वैद्याच्या देखरेखीखाली करावी.म्हणजे परफेक्ट गुण दिसेल.
अर्धा ते एक चमचा एक मसाला लीटरभर म्हणजे तांब्याभर साध्या पाण्यात घालून तसाच ठेवला तर त्याला आयुर्वेदीय परिभाषेत हिम असे म्हणतात.
गरम पाणी घेऊन त्यात एखादा मसाला घालून ठेवला तर या संकल्पनेला फांट म्हणतात.
पाणी घेऊन त्यात मसाला घालून उकळले तर त्याला काढा म्हणतात. जसजसा अग्नि संस्कार जास्त तसतसा पचायला तो पदार्थ हलका होतो, हा आपला नियम आहे. या वैश्विक नियमानुसार क्रमशः या औषधांचा पाण्यात उतरणारा अर्क आणि फ्लेवर बदलत जाईल. पाणी पचायला हलके होत जाईल.
मधुमेहासारख्या आजारात हळकुंड, मेथीदाणे, आवळा, दालचिनी, तमालपत्र इ. ह्रदयरोगामधे ओवा, मिरी, वेलची, बेलपान, संधीवातामधे जवस, बडिशेप, लघवीच्या त्रासासाठी धने जिरे, पित्त आजारात दुर्वा, बेलपान, लवंग अशा प्रकारे मसाले आणि पाने यांचा वापर हिम फांट किंवा काढा करून वापरू शकतो.
साध्या पाण्याऐवजी, किंवा साध्या पाण्याबरोबर हे मसाला पाणी प्यायचे !
मसाल्याऐवजी फुलांचा वापर केला तरी चमत्कारिक गुण दिसतात. जसे वाहाणारी सर्दी असेल तर झेंडूची फुलांचा हिम, पायाची टाच दुखत असेल तर दुर्वा कुस्करून हिम इ.
युक्ती वापरून आयुर्वेदातील लुप्त होणाऱ्या या संकल्पना दैनंदिन जीवनात वापरून, औषधाची तहान पाण्यावर भागवता येते.
आयुर्वेदही जगेल, आपल्याला जगवेल.
फक्त योजकस्तत्र दुर्लभः ।
इथे योजना करणाऱ्यांची वानवा आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
16.12.2016
सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.
हे थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फळ.ह्याला मराठी मध्ये नाश्पती असे म्हणतात.हे फळ बऱ्याच जणांना आवडते.
हे हिरवट पिवळ्या रंगाचे पेरूच्या आकाराचे फळ असते.ह्याची चव आंबट गोड असते व त्याला मंद मादक सुवास येतो.
हे फळ थंड गुणाचे असून वात पित्त नाशक असून थोडे कफकर आहे.
चला आता ह्याचे घरगुती उपचार पाहुया:
१)संडासला पिवळसर काळे,भसर,भरपूर वारंवार होत असेल तर अर्ध कच्चा पेअर खावे व इतर आहार घेऊ नये.
२)पोटात जळजळ,भुक मंदावणे,आव पडणे,पोट दुःखी ह्या तक्रारी असल्यास जेवणासह पेअरचे तुकडे खावे.
३)जीभेवर पांढरा थर,दात व हिरड्या शिवशिवणे,हिरड्या मधून रक्त वाहणे ह्यात कडक पेअर चावून खावे.
४)थकवा येणे,तोंड सुकणे,घशाला कोरड पडणे,शरीरातील उष्णता वाढणे ह्यात पेअरचा रस थोडे सैंधव मीठ घालून प्यावा.
अती पेअर खाल्ल्याने सर्दी,खोकला होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !
जसा देश जसा वेश तसे खावे… जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे…
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग एक !
बरेच जण विचारतात, आम्हाला आमच्या लाईफ स्टाईलमधे बदल करणे खरोखरच शक्य नाही.
आमची लाईफ स्टाईल आमची आम्हीच बनवलेली आहे. निसर्ग नाही थांबू शकत कोणासाठी ! सूर्य उगवायचा आणि मावळायचा नाही ना थांबणार.
काही गोष्टी या निसर्गावर अवलंबून असतात. देश, काल, ऋतु, वातावरण, हवा, पाऊस पाणी, या गोष्टी आपण नाही बदलू शकत. आणि हे सर्व आयुर्वेदात लिहिलंय हं !
(दूष्यं देश बल काल...यावर सविस्तर भाष्य पूर्वी झालंय.)
जेव्हा दुसरा बदलू शकत नाही, तेव्हा आपणच बदलायचं असतं, हा साधा सोपा नियम आहे. निसर्गाच्या काय किंवा शरीराच्या काय, विरोधात गेलात तर पुनः विरोध हा होणारच. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे ते परत आपल्याकडेच उलटणार, यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधे कर्माचा सिद्धांत म्हणतात.
भारतीय संस्कृतीतील, इतिहासातील, पुराणातील, दाखले देण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हाही काही जणांची नाके मुरडतात. काही जणांचा जातीयवाद उफाळून येतो, काही जणांचा बुद्धीवाद, काही जणांचा समाजवाद असा उफाळून येतो, की बोलायचं काम नाय.
हे सगळं का करायचं ? कशासाठी करायचं ? का जगायचं ?
आयुर्वेद सांगतो,
पुरूषार्थ प्राप्तीसाठी !
झालं....
टीकाकार आता विचारतील,
"म्हणजे स्त्रीयांन्ला काहीच म्हत्त्व दिलं न्हाई म्हणाकी, तुमच्या आयुर्वेदात "
या शब्दांचे योग्य अर्थ समजून घेण्यासाठी भारतीयत्व समजून घ्यावं लागेल, तरच आयुर्वेद नीट समजून घेता येईल. समजून घ्यायचा तो भावनेच्या स्तरावर !! बुद्धीच्या स्तरावर शिकायचे ठरवले तर त्याचे असे अनेक वेगवेगळे विकृत अर्थ निघतात. असो !
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ मिळवण्यासाठी, आरोग्य दिलं जातंय, हे महत्त्वाचे आहे. ते जर करणार नसाल, तर आरोग्य मिळवून तरी काय करायचंय ?
तर आपण या निसर्गाला समजून घेतलं पाहिजे. त्याअनुसार मला बदलून घेतलं पाहिजे, ही धारणा तयार करायला पाहिजे. नाहीतर आरोग्यापासून आपण दूर जातोय हे लक्षात ठेवावे.
निसर्गातील अन्य पशुपक्षी, प्राणी यांचा अभ्यास केला, त्यांच्या आरोग्याचा अभ्यास केला, त्यांच्या राहणीमानाचा, फूड हॅबिटॅटचा विचार केला, तर अनेक रहस्य आपणाला उडगलतील.
जो निसर्गाने केलेला नियम मोडतो, तो आजारी पडतो, असे लक्षात येते. आणि निसर्गाच्या बरोबरीने जो जगतो, त्याला नियत आयुष्य आनंदाने जगता येते.
निसर्गाने केलेले नियम, हे वैश्विक नियम आहेत, उत्तरधृवासारख्या काही अत्यंत प्रतिकुल परिस्थिती सोडल्या तर निसर्गाने केलेला कोणताही नियम मोडण्याची तशी गरज भासत नाही.
फक्त आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. आजच्या भाषेत, आरोग्यासाठी आपण इकोफ्रेंडली व्हावं !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.05.2017
Copyright © 2025 | Marathisrushti