(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अंथरूणातून सूर्य बघू नये
    अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.

    पण आता जमाना बदल गया है.
    आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )

    लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.

    एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.

    आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
    गादीवर जास्त लोळू नये
    असे आई सांगते.

    मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
    "मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
    डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......

    सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
    काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)

    ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.

    कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )

    आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • मदनफळ

    ह्याचा १० मीटर उंचीचा झाडीदार वृक्ष असतो.ह्याची पाने आघाड्याच्या पानांसारखी दिसणारी किंचीत गोल असतात.पानाच्या मध्य शिरेवर लांब व तीक्ष्ण काटे असतात.ह्याचे फळ पियर्सच्या सारखे दिसते व गोल,पिवळट धुरकट असून फल मज्जा विशिष्ट गंधयुक्त असते.मज्जेमध्ये कवचयुक्त काळ्या बिया असतात ह्यांना मदनफळ पिंपळी म्हणतात.

    ह्याचे उपयुक्तांग फळ असून मदनफळ चवीला गोड,कडू,तुरट,तिखट असून उष्ण गुणाचे असते हे हल्के व रूक्ष असून प्रभावाने उल्टी करवते.हे अल्प मात्रेत वापरल्यास गोड चव सोडल्यास इतर गुणांनी कफनाशक आहे व उष्ण असल्याने वातनाशक आहे.पण जास्त मात्रा वापरल्यास कफपित्त शोधन करते.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)मदनफळ साल वेदना व सूज कमी करते म्हणून वातव्याधीमध्ये अभ्यंगास ह्याचे तेल वापरतात.

    २)कफप्रधान विकारात उल्टी करविण्यास मदनफळ उपयुक्त.

    ३)अल्पमात्रेत वापरल्यास कफनिस्सारक आहे म्हणून सर्दी,दमा,खोकला ह्यात मदनफळ उपयुक्त आहे.

    ४)मदनफळ तीक्ष्ण,उष्ण,कडू,तिखट,तुरट असून
    त्वचा रोगात क्लेद व दुष्ट कफाचा नाश करते.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग २

    जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.

    आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.

    जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
    जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
    जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
    तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.

    म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.

    वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.

    हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.

    जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.

    पण कोणाला ?
    ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
    दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    23.09.2016

  • आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

    सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
    तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.

    हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.

    सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.

    हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )

    स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.

    रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !

    आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !

    तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.

    रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.

    शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !

    केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !

    मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी

    स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !

    हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !

    गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.

    यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    26.11.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणसत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन

    जसे इंधन तशी काजळी.
    जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
    भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
    यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
    जायते तादृशी प्रजा।

    झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.

    आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.

    या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.

    जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.

    खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.

    आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !

    बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.

    तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.

    या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
    आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.

    "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 36

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग दहा

    नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठ किंवा सेंदेलोण किंवा उपवासाचे मीठ चालते. हे मीठ खनिज प्रकारातील आणि औषधी गुणांनी भरपूर असते.

    शक्यतो केळीच्या पानावर नैवेद्य वाढायचा असतो. आदर्श वाढलेले पान कसे असावे, याचे प्रात्यक्षिक म्हणजे नैवेद्याचे पान होय.
    याचे वर्णन मागे एका टीपेमधे केलेले आहे.

    सर्वसाधारणपणे आजच्या भाषेत ही राईसप्लेट असते. पण त्यावर वाढलेल्या अन्नपदार्थांचे प्रमाण तुलनात्मक किती असते, ते महत्त्वाचे आहे. पानाची डावी बाजू उजवी बाजू या संतुलीत असतील तर वेगळे प्रोटीन व्हिटामिन्स मोजत बसण्याची आवश्यकता नाही. लिंबामधे कितीही व्हिटामिन सी असले तरीही, नैवेद्याच्या पानावर, डाव्या बाजूला एका लिंबाच्या आठ फोडींपैकी एकच फोड घ्यायची असते. कोशिंबीरीमधे कितीही फायबर असले तरीही कोशिंबीर फक्त दोन चमचेच. दही पण चमचाभरच असते, पापड पण एकच. लोणच्याची एकच फोड. भजी दोन चिकोडी कुरडया प्रत्येकी एकेक. चटणी चमचाभर. उजवीकडे दोन मूद भात, त्यावर वरण तूप. एक मूद मसालाभात, एखादा गोड पदार्थ, आमटी, उसळ, सुकी भाजी, पुरी किंवा भाकरी,
    एवढे आदर्श प्रमाण आपल्याला या नैवेद्याच्या पानातून मिळत असते. खरंतर तेवढीच गरज असते. नंतरचे असतात ते जीभेचे चोचले ! हे जास्त खाल्लेले अन्न पचविण्यासाठी जास्त हालचाली, जास्त श्रम करावे लागतात. नाहीतर हे अन्न तसेच साठून राहते आणि अंगाखांद्यावर नाचू लागते.

    हा नैवेद्य सेवन करून म्हणा, आपल्या सर्व देवी देवतांची शरीरयष्टी किती आखीव रेखीव असते ना ! एकही देवता बेढब नाही. (लंबोदराचे उदर लंब आहे कारण त्याने एका दैत्याला पोटात धारण करून ठेवले आहे. मोदक खाऊन नव्हे, किंवा गणेशजी नरमांसभक्षक होते, असा विकृत विद्रोह कुणी करू नये, प्राकृत डोक्यात असं काही येणार नाही, पण आहेत काही टाळकी, त्यांच्यासाठी हा खुळासा खुलासा. )

    नैवेद्य प्रोक्षण करण्यासाठी तुळशीची मंजिरी वापरतात. गायत्री मंत्र म्हणत, वाढलेल्या सर्व पानावर तुळशीच्या मंजिरीने पाणी शिंपडून घेतात. हे पान तुळशीचेच का तिथे कडूनिंब किंवा आंब्याचे पान का नाही ? यामागे देखील शास्त्र असेल, फक्त आमचा शास्त्र शोधण्याचा दृष्टीकोन प्राकृत नसल्यामुळे उलगडा होत नाही. देवाच्या षोडशोपचार पूजेमधील स्नानाचे अभिमंत्रित जल आंब्याच्या पानानी उडवले जाते. तिथे तुळस नाही वापरली जात. किंवा औषधी गुणांनी भरलेला असला तरी कडूनिंबाची पाने नाही वापरली जात. कडूनिंब गुढीच्या वेळीच गुढीला बांधावा, तिथे तुळस नाही बांधत. आंब्याची पाने तोरणासाठी, आणि विष्णुला सहस्त्र तुलसीदलेच वाहातात.

    या केवळ रूढी परंपरा नाहीत, यामागे विशिष्ट ज्ञान किंवा शास्त्र आहे. आयुर्वेद हा असाच आहे. विज्ञानवादी शास्त्रोक्त !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    29.06.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

    आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू.

    धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा एसेमेस त्वरीत फाॅरवर्ड होतो. त्या पदार्थाच्या स्वागतासाठी आतमधे तयारी सुरू होऊ लागते. असलेल्या बत्तीशी ने तो बत्तीस वेळा सावकाश चावला की त्यात लाळ चांगली मिसळली जाते. अगदी बत्तीस वेळा असं काही मोजत बसत नाही कुणी पण, त्याचा गिळण्याएवढा गिळगिळीत गोळा तयार झाला की तो अन्ननलिकेत जीभेने ढकलला जातो. तेव्हा श्वासनलिका एका पडद्याने पूर्णपणे बंद होते. अन्नाचा एकही थेंब त्या टाईट बसलेल्या झाकणातून श्वासनलिकेत लिकेज होत नाही.

    या पडद्याला कुठेही थ्रेड नाही, कुठेही फेवीकाॅल नाही, कुठेही कडीकुलुप नाही, पण काही सेकंदामधे पूर्ण बंद, तर काही सेकंदात पूर्ण उघडतो देखील !
    अन्न कसे गिळावे, पडदा कसा बंद करावा, याचे कोणीही वर्कशाॅप घेतलेले नाही, कोणीही ट्रेनिंग दिलेले नाही, तरी हे काम जन्माला आल्यापासून अव्याहतपणे सुरू असते. हा एकच पडदा नाही तर असे असंख्य पडदे / व्हाॅल्व्ह, आतबाहेर आपल्याला दिसतात, डोळे, ओठ, मूत्रद्वार, मलद्वार हे बाहेर दिसणारे सगळे अवयव कसे उघडायचे कसे बंद करायचे, हे शिकवूनच त्याने जन्माला घातलंय.

    कदाचित आधीच्या जन्मी हे सगळं अनुभवलेलं असतं, ते संस्कार घेऊनच आपला मनुष्य जन्म झालेला असतो. आजच्या भाषेत डिफाॅल्ट प्रोग्राम असा काही पक्का झालेला असतो, की कधीही परत फाॅर्मॅट मारावाच लागत नाही.

    शेवटी हे यंत्र बनवणारा कोण आहे ?
    तोच, जो आपल्या शरीरात राहून सर्व करवून घेत असतो.
    तो
    सर्वशक्तीमान !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.03.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौऱ्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 31

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग पाच

    गणेशजी आपल्याकडे येतात. काही जणांकडे दीड दिवस, काही जणांकडे पाच, सात, अकरा, एकवीस दिवस मुक्कामी असतात. जणुकाही घरातलाच एक घटक होऊन जातात. विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावतात. ते (तेज) घरातून जाऊ नयेत, असे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच वाटत असते.
    गणेशजी आपल्या घरातील एक ज्येष्ठ आदरणीय व्यक्तीच बनून गेलेले असतात. सर्वगुणसंपन्न असलेली ही सगुण देवता आपल्या अवतीभवती आहे, याचा विलक्षण आनंद यावेळी आपल्या मनात असतो. केवळ एका ज्ञातीचे हे दैवत नसून समस्त समाजाला देशभक्तीच्या एका सूत्रात बांधून ठेवणारे हे सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील दैवत. जेव्हा गणेशजी येतात, मनातली सर्व सुख दुःख प्रत्येक जण त्यांना सांगत असतात. कोणावर जबरदस्ती नाही, कडक सोवळे ओवळे नाही. घरातली सर्वजण अगदी मनोभावे यथासांग, यथा मिलितोपचार द्रव्यांनी षोडशोपचार पूजा करत असतात.

    या निमित्ताने नवीन खरेदी, बाजारात खरेदीला गर्दी, एका घरातील पैसा बाहेर येतो, दुसऱ्याच्या घरात जातो. चलन हलते फिरते राहाते, पैसा फिरला तर देशाचा आर्थिक विकास होतो, हा अर्थशास्त्रातला नियम. सणांच्या माध्यमातून भारतात हा नियम केवळ पुस्तकात राहिलेला नाही तर व्यवहारात उतरवला गेलाय. त्याचा परिणाम म्हणून भारतात इंग्रज येऊन गेल्यानंतर परिस्थिती दुष्काळी असली तरी आर्थिक मंदीची लाट तशी कधी जाणवली नाही, ती या अशा सणांमुळे आणि त्यातल्या कर्मकांडामुळे !

    पाच फळं, पाच भाज्या, पाच पक्वान्न, सणाच्या निमित्ताने का होईना, खरेदी होते, सण म्हणून वेगवेगळे पदार्थ. एकत्रित भोजन, एकत्रित भजन, एकमेकांच्या सहवासात येत असतो. घराला जणुकाही देवालय बनवून टाकलेलं असतं. घराघरातील गणेशतत्व जरी एकच असले तरी प्रत्येकाच्या घरी जावून, प्रत्येक घरातील प्रत्येक गणेशाचे दर्शन होते. एक निमित्त असते, लोकसंग्रह वाढवायचे ! नातेसंबंध वाढवायचे, पौष्टिक खायचे, आरोग्य सुधारायचे !

    सकाळी लवकर उठून गणपतीची मनोभावे केलेली पूजा, आरती, शंख, घंटा यातून निर्माण होणारे ध्वनी, झांज, टाळ, तबला, पेटी, पखवाज, घुमट इ. अनेक वाद्यांचे गजर, शब्दलहरी, मंत्रलहरी, त्यांचे नाद, सूर, ताल, लय यांनी घरातील वायुमहाभूताची, आकाश महाभूताची शुद्धी होत असते.

    काही आठवतंय पहा,
    प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशजीना पहिला नमस्कार.
    आपण जेवायला बसलो की गणेशजीना नैवेद्याचे पान पहिल्यांदा. "तुमच्यामुळे आम्हाला मोदक मिळती खायाला, गणपती बाप्पा मोरया" असं म्हणत गणपतीसाठी केलेले सर्व मोदक आपणच खाऊन टाकायचे....

    हे पंचपक्वान्नाचे ताट नैवेद्य म्हणून दाखवून परत सगळ्यांनी समान वाटून घ्यायचे. कोणताही भेदाभेद नाही. कोणाशीही भेदभाव नाही.

    पण....
    हा असा भरलेल्या ताटाचा नैवेद्य फक्त दुपारी दाखवला जातो.( नाव गणेशाचे खातो आपणच ! )
    आणि रात्रीची पेटपूजा ?
    ?????
    नैवेद्याला काय असते ?
    आठवावं लागतंय ना !
    जशी षोडशोपचार पूजा सकाळी केली जाते, तशी सायंपूजा केली जात नाही. सायंकाळी केली जाते, त्या पूजेला सायंपूजा असे म्हणतात.
    सायंकाळी फक्त पंचोपचार आणि आरती ! आणि नैवेद्याला काय असतं ?

    फक्त एखादा लाडू, किंवा लाह्यांचं गुळखोबरं घातलेलं पंचखाद्य, किंवा एखादा मोदक किंवा एखादी करंजी किंवा नेव्हरी. ( गोवा, कोकण भागात करंजीला नेवरी म्हणतात.)

    बास्स बास्स बास् !
    संध्याकाळी झालेल्या या पूजेनंतर गणेशजींचा हा जो नैवेद्य असतो, इथे आरोग्य दडलेलं आहे.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायानुसार आपणही तेवढे आणि तसेच अन्न खायचे असते.
    सकाळ दुपार भरपूर जेवायचे आणि सायंकाळी कमी, रात्रीचे तर नाहीच, हा नियम पुनः एकदा सिद्ध होतो.

    सकाळी झालेल्या पूजेनंतर पंचपक्वान्न खाल्ली तरी चालतात. आणि सायंकाळी मात्र एखादाच लाडू किंवा लाह्या सदृश्य काही तरी भाजलेलं, फुलवलेलं, पचायला एकदम हलकं असंच अन्न घ्यावं हा त्यामागील आरोग्य संकेत . समजून घेणाऱ्या समंजसांना हा समज समजतो. बाकी सगळे बुद्धीवादी, भक्ती सोडून ज्ञानाची सालपटं काढत रहातात, आणि आपण मात्र लंबोदर होतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.06.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    04.04.2017

  • किचन क्लिनीक – कढिपत्ता

    किचन क्लिनीक – कढिपत्ता

    हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता .

    ह्याचा व्रुक्ष असतो.ह्याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो.चवीला कडू,तिखट,तुरट अशी मिश्र चव आणी थंड असा हा कढिपत्ता शरीरातील वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतो.

    ह्याचा उपयोग देखील आपण घरगुती उपचारांमध्ये करू शकतो बरे का!अगदी डोळयांपासुन ह्रूदयाचा पर्यंत ब-याच अवयवांना हा हितकर आहे.चला मग पाहूयात ह्याचे औषधी उपयोग.

    १)एॅसीडीटी मध्ये २ चमचे कढिपत्ता रस+१ चमचा लिंबु रस+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण चाटावे.

    २)गजकर्ण,खरूज,इसब अशा त्वचा रोगात कढिपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी.

    ३)ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारण पणे १५-२० दिवस १ चमचा कढिपत्ता चटणी गुळात मिसळून पाण्यासोबत गिळावी.

    ४)मार लागणे,ठेचलागणे,मुरगळणे ह्यामुळे आलेल्या सुजेवर कढिपत्ता + हळद ह्याच्या पोटीसाने शेकावे.

    ५)बरेचदा गांधीलमाशी,मधमाशी,कोळी असे किटक अंगावर चिरडून मरतात आणी त्या जागी विखार होतो आणी मग आग होणे,खाज सुटणे,पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कढिपत्ता चुरून त्या भागावर लावावा.

    कढिपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते,संडासला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४