(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा

    देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
    कशासाठी?
    वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )

    एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
    असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )

    सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !

    अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
    काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !

    बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !

    काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.

    चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग साठ

    जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ५

    मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.

    आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
    ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
    नवान्न पानं गुड वैकृतम् च
    प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!

    ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
    ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.

    प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.

    हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.

    वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.

    आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,

    भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.

    त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.

    ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.

    या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
    पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
    मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
    त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
    पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.

    तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.

    पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
    पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
    सगळेच अगतिक...
    वेळेला बांधलेले....
    आयुष्याची गती कमी केलेले.....

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    5.10.2016

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १४

    संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो.
    अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ?
    कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते.
    अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.

    असे ऐकीवात आहे की, दरमहा बाहेर पडणारा रजाचा स्राव म्हणजे म्हणे अफलीत अंडे. म्हणून त्याच्यात जीव नसतो. जसं ए1 ए2 दुधाबद्दल, साबुदाण्याबद्दल, अजूनही काही जणांच्या मनात संभ्रम आहेत, तसेच काहीसे अंड्याबद्दल आहेत. पण हे नक्की की, अंडे हे शाकाहारी नाहीच. त्यात रक्त आणि मांस असतेच. कोणतेही ब्राॅयलर उत्पादक व्यापारी आपल्या प्राॅडक्टविषयी संभ्रम निर्माण करणारी किंवा काॅन्ट्राडिक्टरी माहिती कशी जाहीर करतील ?

    आयुर्वेदात जे अंडे औषधामधे वापरायला सांगितले आहे ते, जंगलात फिरणाऱ्या किंवा आपले अन्न आपल्याच पायांनी उकरून खाणाऱ्या गावठी पक्ष्यांचे सांगितले आहे. ब्राॅयलर नाही. त्याची कारणमीमांसा मागील आरोग्य टीपेमध्ये केलेली आहे.

    जे खाऊ शकतात, त्या कुपोषित बालकांसाठी मात्र अंडी हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत होऊ शकतो.

    कोंबड्याची कृत्रिम पैदास वाढवली, पण दुर्दैवाने जेवढी विक्री व्हायला हवी, तेवढी झाली नाही. अगदी 1970 पासूनचा विचार केला तरी दहा वर्षात अंड्याची किंमत फक्त दुप्पट झाली, हे नुकसान खूप मोठं होतं.अंडी हा नाशवंत माल वेळीच माल खपला नाही तर सरळ नुकसान पुनः अंड्याच्या प्रवासात नासधुस , फुटणे इ नुकसान होणे स्वाभाविकच. म्हणून हा तोटा टाळण्यासाठी अंडी उत्पादकांना खोटी का होईना पण जाहीरात करणे भाग पडले.

    मोठाले भांडवल घातल्यावर त्यात नुकसान होऊ नये म्हणून व्यवसायात नीती, संस्कृती, सभ्यता, संस्कार, प्रेमभाव, जीवदया, सर्व नियम अगदी धाब्यावर बसवले जातात, मग व्यवसाय कोणताही असो. खरं आहे ना ?

    हा व्यापाराचा नियमच आहे. तिथे नातेगोते, ओळखपाळख, मित्र मैत्री, यामधे 'बिझनेस' सोडून काही पाहू नये असं म्हणतात. आताच्या पाश्चात्य कंपन्यांच्या कोणत्याही मल्टीलिंक मार्केटिंगच्या ट्रेनिंगमध्ये हेच शिकवले जाते. तेच भारतीय कंपन्याही शिकल्या आणि व्यापारवृद्धी केली जाऊ लागली. अगदी शिक्षण क्षेत्रापासून वैद्यकीय क्षेत्रापर्यंत हे पहायला मिळते. असो.

    मुख्य विक्री मांसाची हे तत्व बाजूला होऊन मग अन्य अवयवांच्या विक्रीतून तूट भरून काढणे सुरू झाले. आणि बाय प्राॅडक्टची जागा मुख्य व्यवसायाने कधी घेतली हे कळलेसुद्धा नाही.

    मांस उद्योगामधे सर्वात मोठा खर्च पाण्यावर केला जातो. पाण्याची किती मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो त्याची नुसती आकडेवारी पहा.
    एक किलो भाजीपाला पिकवण्यासाठी शंभर दिवसात एकशेवीस लीटर पाणी लागते.
    एक किलो फळे तयार करायला दीडशे लीटर, आणि एक किलो मांस निर्माण होण्यासाठी तब्बल पाच हजार लीटर पाण्याची गरज भासते.

    एका बाजूने होळीच्या सणाला नजरेत भरणारी लाकुडतोड, रंगपंचमीच्या निमित्ताने वापरले जाणारे पाणी, दसरा, वटपौर्णिमेच्या निमित्ताने तोड होत असलेली बहुवर्षायु झाडे यांच्या तुलनेत दररोज होणारा हा पाण्याचा अपव्यय लक्षात नको का घ्यायला ? निदान महाराष्ट्रात तरी, जिथे पाण्याअभावी माणसेच तडफडून मरत आहेत !

    अन्न (किंवा मांस ) ताजे असावे, हा अतिसामान्य नियम झाला, पण मोठाल्या कत्तलखान्यातून वेगळे केलेले मांस दुसरी कडे नेण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा लागते. त्यासाठी वीजेचा खूप वापर होतो. या वीजेमधे भार नियमन चालत नाही. भारतात ही कोल्ड चेन मेन्टेन ठेवणं शक्य आहे ? काय वाटतं ?
    नक्कीच नाही.
    मांस तसेच पुढे पाठवले जाते. यातून खूप मोठा जंतुसंसर्ग होऊ शकतो.

    उत्तम प्रतीची कोल्डचेन मेंटेन केलेले मांस परदेशात पाठवले जाते. पण त्यासाठी खर्च खूप जास्त येतो. कारण त्यासाठी वीज, पाणी जास्त खर्च होते. भारतात ते परवडत नाही.

    विमानाने जाणाऱ्या मांसासाठी खर्च होणारे पाणी, वीज मात्र भारताकडून ! त्याच्यासाठी करावे लागणारे भारनियमन भारतीयांनीच सोसायचे. मांस प्रकल्पातून तयार होणारा जैवीक कचरा, त्याची दुर्गंधी, भारतीयांनी सहन करायची.. ...
    का म्हणून ???

    या अवाढव्य प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी, रक्त, मांस मिश्रीत कचरा नदीमधे तसाच सोडला जातो.
    म्हणजे एकुणच या मोठ्याल्या प्रकल्पातून देखील निसर्गावर आक्रमणच केले जाते.

    कधीतरी या गोष्टीचा विचार करावाच लागेल.
    हा विषयच वादग्रस्त आहे. म्हणून चर्चा करणेच टाळावे, लिखाण थांबवावे, असे करणे पण योग्य होणार नाही. त्यामुळे हे सर्व लिहावे लागत आहे. नाहीतर हे असेच चालायचे, यात बदल होणे भारतात तरी शक्य नाही, असे म्हणून मौन धरणे पिंडाला पटत नाही. जे योग्य आहे, तिथे ते न बोलणे, हेदेखील पाप लागणारे आहे.
    मी पापपुण्यावर विश्वास ठेवणारा श्रद्धाळू माणूस असल्याने लिहिण्याचे धाडस केले, एवढेच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    14.10.2016

  • आहाररहस्य २

    सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, नाहीतर जुलाब.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पासष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन

    धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.

    कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.

    कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !

    वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.

    एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ....

    तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.

    आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा "मिनी होम" झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?

    ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017

  • किचन क्लिनीक – सफरचंद

    An Apple A Day Keeps Doctor Away अशी एक इंग्रजी म्हण आहे त्यात कितपत तथ्य आहे हे ती म्हण निर्मात्यालाच ठाऊक असेल कदाचित.सफरचंद तसे प्रत्येकाचे आवडीचे फळ.ह्याचे अॅप्पलपाय,अॅप्पल जॅम,अॅप्पल चटणी,लोणचे,ज्यूस असे अनेक प्रकार खायला व प्यायला मिळतात.आणी ते रूचकर देखील लागतात.

    असे हे सफरचंद आपण किरकोळ शारीरिक तक्रारींमध्ये सुद्धा वापरू शकतो.हे थंड प्रदेशात पिकणारे फळ असून ह्याचा वृक्ष असतो व सफरचंद कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर लालासह गुलाबी होते.

    पिकलेले सफरचंद हे गोड थंड पित्त व कफ दोष कमी करणारे व वातकर असते.चला आता ह्याचे उपयोग पाहूयात.

    १)पचन शक्ती कमी होऊन भूक मंदावली असल्यास सफरचंद वाफवून त्यावर मिरपुड व सैंधव मीठ लावून खावे.

    २)शौचास पातळ होत असेल अथवा आव पडत असेल तर पिकलेले सफरचंद चांगले चावून खावे.

    ३)सफरचंद गरम पाण्या १० -१५ मिनिटे भिजत ठेऊन त्याची साल काढुन ते बारीक वाटून घ्यावे नंतर त्यात सफरचंदाच्याच वजना इतके मध घालावे व पुन्हा घोटावे मग त्या वेलची,केशर,गुलाबकळी,गुलाबपाणी,जायपत्री,भीमसेनी कापूर घालून ते चांगले घोटावे.ह्याला मधुचंद म्हणतात ह्याचे सेवन अशक्तपणा मध्ये करावे तसेच ह्याने हृदयाला बळ मिळते.मधुचंद सेवन करताना मासे,दही,तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

    ४)अति मांसहारी व तिखट पदार्थ खाल्ल्यावर छातीत जळजळ होणे,पित्ताचा त्रास होणे ह्यात सफरचंद खावे.

    सफरचंद खायचा अतिरेक केल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग एकोणीस

    अजून कोणी पाणी वाचवा मोहिमे अंतर्गत कागदच वापरा योजना सुरू करा योजनेची घोषणा केलेली नाही. पण पाश्चात्य देशात मात्र या कागद वाचवा योजनाच चालतात. तिथे जेवल्यानंतर सुद्धा वाटीभर पाण्यात हात बुचकळून कागदाला बोटं पुसायची पद्धत. मग नंतरच काय विचारता ?

  • किचन क्लिनीक – जव

    जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.

    तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.

    डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.

    आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:

    १) मंड:

    हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.

    २) मंथ:

    चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.

    ३) रोटी:

    चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.

    जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.

    तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.

    धन्यवाद.

    वैद्य स्वाती अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क: ९९६०६९९७०४