जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.
लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे मा.एन. दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. ‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. दत्ताजींचा स्वभाव विनम्र व भिडस्त असल्याने त्यांनी अशा गोष्टीचं भांडवल करून चालींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
‘टॅक्सी ड्रायव्हर’पासून एस.डी. बर्मन यांचे दुसरे साहाय्यक बनलेले जयदेव मात्र परखड स्वभावाचे असल्याने अशा गोष्टी ते स्पष्टपणे बोलून दाखवत. ‘बुजदिल’ व ‘जाल’ या चित्रपटांचे निर्माते असलेल्या फत्तेचंद यांनी एन. दत्तांची प्रतिभा ओळखली होती म्हणूनच १९५५ साली राज खोसला दिग्दर्शित ‘मिलाप’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. एन. दत्तांनी फत्तेचंद यांचा विश्वास सार्थ ठरवीत पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. या चित्रपटातील ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां’ ही लता मंगेशकर व हेमंतकुमारने वेगवेगळी गायलेली गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहां’, ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’ व ‘चाहे भी जो दिल तो जाना न वहां’ ही सोलो गाणी व रफीबरोबर गायलेलं ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ या युगुलगीताने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.
बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशा भोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते.
एरवी दोन गाण्यांतलं साधम्र्य सहजासहजी लक्षात येणार नाही अशी बहारदार सुरावट व ऑर्केस्ट्रेशनची ट्रीटमेंट एन. दत्तांनी या गाण्याला दिली आहे. कोरसचा कल्पक वापर, महेंद्र कपूरचं ‘हमिंग’, लता मंगेशकरांचे उन्मनी आलाप व लडिवाळ तानांची आतषबाजी मन मोहून टाकते. अंतऱ्यात एके ठिकाणी साहिरच्या ‘परछाईंयां’ या दीर्घ काव्यातल्या काही आशयघन ओळी ‘रवां है छोटीसी कश्ती.’ जेव्हा डोकावतात तेव्हा एन. दत्तांमधला संगीतकार ज्या हळुवार व तरल अंदाजात त्यांना स्वरात गुंफताना दिसतो, ते पाहून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. ‘दीदी’ (१९५९) या चित्रपटातली एन. दत्ता यांची ‘बच्चों तुम तकदीर हो कलके हिंदूस्तान की’ व ‘ मेरे भैया को संदेसा पहंचाना’ ही गाणी कमालीची गाजली. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.
१९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. ते राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव आहे.
एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
राहुल देव बर्मन याचं मूळ आडनाव देवबर्मन. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला.त्यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. आणि सचिनदेव व मीरादेवी या सुरेल दांपत्याची सुंदर रचना म्हणजे राहुलदेव बर्मन... "वरमेको गुणी पुत्रो...‘ या पठडीतली...!
केवळ गीतकारांच्या शब्दांना फुलविण्यातच आर. डीं.नी कधी समाधान मानलं नाही. चित्रपटांना, त्यातील प्रसंगांना अधिक परिणामकारक करणारे पार्श्वासींगत देण्यात आर. डीं.चा हातखंडा होता.
त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते. पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, ""अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका "तुबलू‘ पुढे "पंचम‘ या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे... कुत्र्यांचं धापा टाकणं... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर... ताल... आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन!
पंचमदाना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता "छोटे नवाब.‘ आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं "घर आजा घिर आये बदरा सावरीया..‘ हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच "मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्श नमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या. पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं.
पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन).
नेपाळी "मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफ‘मधल्या "होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं. मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचमनं स्थगित केलं होतं.
याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. "अजनबी‘ चित्रपटातल्या "हम दोनों दो प्रेमी‘च्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्टत, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस् गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती. मजरुह, गुलजार या प्रतिभावान गीतकारांच्या अनेक मुक्तछंदात्मक कवितांना आर. डीं.नी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रवणीय संगीताने यशोचित न्याय दिला. ही गाणी आजही अगदी ताजी वाटतात. ती सहज ओठांवर येतात. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. मा.आर.डी.बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रचनात्मक कार्य कारणार्या संस्था उभारुन भरीव सामाजिक कार्य करणारे मोहन सदाशिव हळबे हे ठाण्यातील एक तरुण व्यक्तिमत्व ! मोहन हळबे हे “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” चे सुमारे ३० वर्षांपासूनचे संस्थापक व विश्वस्त आहेत. ठाण्यातील नौपाडा भागात राहणारे, बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेले, “ठाणे पीपल्स” आणि आता रुपी को-ऑप बॅंकेत काम करणारे मोहन हळबे ह्यांनी आपल्या वडिलांची आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून जिद्दीनं आतापर्यंतचं त्यांचं सर्व कार्य उभारलं आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” ची ठाण्यात स्थापना केली. त्यानंतर ठाण्यातील शिवाई नगर या भागात दोन भूखंड खरेदी करुन तेथे मंडळाच्या कार्यकरीता मंडळाच्या दोन अद्ययावत वास्तू उभ्या केल्या. जेथे “गजानन महाराज मेडिकल सेंटर” व कै. आनंदराव कृष्णराव चोणकर अभ्यासिका” या संस्थांचे काम चालते.
मोहन हळबे ह्यांनी आपल्या कार्याचे धोरण धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा असे ठेवले आहे. त्यामुळेच या संस्थांमार्फत ठाण्यात त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या सर्व कार्यासाठी त्यांना आतापर्यंत “यशवंत पुरस्कार” (२००५) तसेच ठाणे महागरपालिकेचा “ठाणे गुणीजन” (२०१०) हा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांनी उभारलेल्या अभ्यासिकेत जवळपास १५० विद्यार्थ्यांना पुस्तकांसहित सर्व सुविधा प्राप्त होतात. तसेच ठाणे शहरातील व शहरालगतच्या लोकांसाठी उभारलेल्या श्री गजानन महाराज मेडीकल सेंटरच्या माध्यमातून सर्वांना केवळ ५० टक्के खर्चात आरोगय सेवा पुरविली जाते.
त्यांनी चालू केलेले धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचे कार्य शहराच्या कानाकोपर्यात पोहचविण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भविष्यात ठाणे शहरालगत एखादा “वृद्धाश्रम” बांधण्याचं त्यांच्या मनात आहे.
अशाप्रकारे आदर्श धार्मिक स्थळ उभारून अध्यात्मिक वृत्तीने सामाजिक पण रचनात्मक कार्य कसे करावे, याचा वस्तूपाठच मोहन हळबे यांनी घालून दिला आहे.
ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात.
ना.घ.देशपांडे मराठी काव्यसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव. एक प्रतिभाशाली कवी म्हणून त्यांची दखल मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली. ‘नाघं’च्या घरातील वातावरण धार्मिक होते. त्यांचे सख्खे भाऊ वि. घ. देशपांडे हे हिंदुमहासभेचे नेते होते. मध्य प्रदेशातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांचे राहणे परंपरा जपणाऱ्या खेडय़ामध्ये होते. पण ‘नाघं’नी प्रेमाची धीट अभिव्यक्ती करणाऱ्या कविता लिहिल्या- ज्या त्या काळाच्या पुढच्या होत्या. १९२९ मध्ये लिहिलेला ''शीळ'' या कवितेमुळे ते नावारूपाला आले. १९५४ साली '' शीळ '' या नावाने त्यांचा काव्यसग्रह प्रसिद्ध झाला. १९६३ साली ‘अभिसार’. नंतर ‘खूणगाठी’, ‘गुंफण’, ‘कंचनीचा महाल’.. ‘खूणगाठी’ला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. रानारानांत गेली बाई, खरे तर निसर्ग आणि प्रेमाची महती याचे वर्णन करणारे हे स्त्री गीत, पण ते गायले एका पुरुषाने.. जी. एन. जोशी यांनी. हे मराठीतील पहिले भावगीत समजले जाते.
ना. घ. देशपांडे यांची ‘नदीकिनारी, नदीकिनारी गं’ व ‘फार नको वाकू उंच जरी बांधा’ ही गाणी सुद्धा जी. एन. जोशी यांनी गाजविली. ‘डाव मांडून भांडून मोडू नको, डाव मोडू नको’ हे ना. घ. यांचे आणखी एक प्रसिध्द गाणे, पण ते नंतर पुढे सुधीर फडके यांच्या आवाजात लोकप्रिय झाले. ‘बकुळफुला, धुंडिते तुला धुंडिते वनात’ अशी आणखी चार-दोन कवितांची गाणी झाली. आचार्य अत्रे यांनी सुचवूनसुद्धा ‘नाघं’नी मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली नाहीत. ‘नाघं’नी महात्मा गांधींवर कविता लिहिल्या आणि त्यांची तुलना बुद्ध आणि येशू यांच्याशी केली, तेवढे महत्त्वाचे स्थान विश्वेतिहासात दिले. नेहरूंना ‘उदयाचा यात्रिक’ म्हणून गौरव करणारी कविता त्यांनी लिहिली. ना.घ. देशपांडे यांचे निधन १० मे २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ना.घ. देशपांडे यांची काही गाणी
अंतरीच्या गूढ गर्भी,काळ्या गढीच्या जुन्या ,घरदिव्यांत मंद तरी ,डाव मांडून भांडून ,तुझ्याचसाठी कितीदां ,नदीकिनारीं नदीकिनारीं,फार नको वाकू जरी,बकुळफुला कधीची तुला,मन पिसाट माझे अडले रे,रानारानांत गेली बाई.
जागतिक किर्तीचे व जगातील आघाडीचे वास्तुविशारद व वास्तुशास्त्रसंशोधक शशिकिरण वझे यांच्या कार्यास अमाप प्रसिध्दी मिळाली आहे.
संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धवनियंत्रणेचे तांत्रिक नियमन करणे म्हणजे मोठे आव्हान. कारण या साऊन्ड इंजिनीअरिंगवर कार्यक्रमाचा दर्जा ठरतो. या तंत्रज्ञानावर असलेल्या हुकमतीमुळे नितीन जोशी यांनी स्वत:चे स्थान निर्माण जेके. म्हणूनच शिवमणी, शुभा मृदुल यांच्यासारख्या कलाकारांना सोबत तेच हवे असतात...
मेरी आवाज सुनो
पदार्पणातील (१९९३-९४) रणजी मोसमात ३० विकेट्स घेत त्याने डोमेस्टिक कारकीर्दीची धडाकेबाज सुरुवात केली होती.
मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲडव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते.
हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं.
चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.
पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू!
चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti