जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यावर, महाराष्ट्र राज्याचे बावीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची २८ ऑक्टोबर २०१४ या दिवशी पक्षातर्फे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
October 28, 2014
एक साहित्यप्रेमी कवी म्हणून सोपानदेव नथूजी चौधरी यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1907 साली जळगाव येथे झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या आई बहिणाबाईं चौधरी यांना अक्षर ओळख नव्हती त्यामुळे शेतात काम करुन त्यांनी घर संसार चालवला. त्यातही कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची, येणार्या आपत्तींना सतत तोंड द्यावे लागल्यामुळे त्यांचे म्हणावे तसे शिक्षण झाले नाही. परंतु योगायोगाने विष्णू दिगंबर पलुस्कर यांची आणि सोपानदेवाची एकदा भेट झाली. भेटीचं रुपांतर स्नेहात झालं आणि त्यातूनच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या गांधर्व महाविद्यालयात सोपानदेव संगीताचे अध्ययन करु लागले. संगीताची आवड, मातोश्रींचा काव्य लेखनाचा वारसा या स्फूर्तीतून सोपानदेव 1920 च्या सुमारास काव्य रचना करु लागले. प्रतापी प्रतापसिंह आणि पुण्यश्लोक महात्मा हा महात्मा गांधींच्या जीवनावरील पोवाडा हे काव्यलेखन त्यांनी सुरुवातीच्या काळात केले. त्याच काळात नाशिकच्या गांधर्व महाविद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. 1932 `काव्यकेतकी` हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
त्यानंतर 1949 मध्ये अनुपमा हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सोपान देवांच्या मातोश्री बहिणाबाई चौधरी या एक प्रसिध्द कवयित्री होत्या. अक्षरओळख नसलेल्या बहिणाबाई काम करता करता काव्यरचना करीत. जेव्हा शक्य असेल त्यावेळेस सोपानदेव त्या म्हणत असलेल्या कविता लिहून ठेवत असत. बहिणाबाईंच्या नंतर `बहिणाबाईंची गाणी` या नावाने सोपानदेवांनी त्या पुस्तक रुपाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्रभर त्यांचे हे काव्य अतिशय गाजले. सोपानदेवांनी साहित्यातील विविध विषय हाताळले. त्यांनी नवकाव्याची विडंबने लिहिली. महाराष्ट्र संबंधीच्या प्रासंगिक रचना त्यांनी केल्या. खान्देशी भाषेतून `जानपद` गीतेही लिहिली. या शिवाय सोपानदेवांचे कोटिबाज विनोदी काव्यसुध्दा प्रसिध्द आहे. 1962 साली त्यांच्या समग्र कवितांचे संकलन असलेला सोपानदेव हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता.
March 11, 2015
फक्रुद्दीन अली अहमद हे भारताचे पाचवे राष्ट्रपती. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ २४ ऑगस्ट १९७४ ते ११ फेब्रुवारी १९७७ हा राहिला.
October 22, 2023
मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.
January 13, 2019
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न दुर्बिणीने करणारा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.
गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओ यांना वाटू लागले. १६१५ च्या दरम्यान त्यांनी या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला.
समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते. कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले. 1624 नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली. ६९ वर्षांच्या गॅलिलिओ यांना दम देण्यात आला. पाखंडी मताचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले. गॅलिलिओ यांच्या वरचे आरोप ३१ ऑक्टोबर १९९२ या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅओरिस्टॉटल यांच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओ यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. प्रयोग आणि निरीक्षण याचे महत्त्व गॅलिलिओ यांनी सिद्ध केले. केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. जड वस्तू आणि हलकी वस्तू एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर कोणती वस्तू अगोदर खाली पडेल? जड वस्तू खाली पडेल हे आपल्याला विचाराने सुचणारे परंतु धादांत चुकीचे उत्तर असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केले. आपल्याला सत्य वाटणा-या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे. वयाच्या १९ व्या वर्षी गॅलिलिओ यांनी लंबकासंबंधीचा गैरसमज दूर करून खरा नियम जगासमोर आणला.
त्याचा आंदोलनकाळ त्याने नाडीच्या ठोक्याच्या साहाय्याने मोजला आणि लंबकाचा आंदोलनकाळ त्याच्या आयामावर अवलंबून नसून लांबीवर अवलंबून आहे हे प्रयोगाने सिद्ध केले. गॅलिलिओ हे चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अॅबलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळे वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. गॅलिलिओ यांचे ८ जानेवारी १६४२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 15, 2019
प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले.
May 27, 2014
वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते पाडव्याच्या फोटोशूटसाठी. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया संस्कृती बालगुडे हिचं फोटोशूट यानिमित्तानं मी केलं. हिरव्या बॅकग्राऊंडवर बेतलेलं, संस्कृती बालगुडेचा मराठमोळा सात्त्विक चेहरा आणि उभारलेल्या गुढीचं पूजन हे सारं एकीकडे कॅमेराबद्ध करत असतानाच दुसरीकडे शूटच्या वेळच्या अनेक आठवणी तेव्हा माझ्या शिदोरीत जमा होत होत्या.
संस्कृती बालगुडेची नि माझी ही पहिलीच भेट होती. चंद्रकांत गायकवाड या नामांकित तरुण दिग्दर्शकानं ही भेट खरंतर घडवून आणली होती. अवघ्या एक दिवस आधी हे शूट आम्ही ठरवलं होत. वेळेअभावी फारसं शूटचं नियोजन आम्हाला करता आलं नव्हतं. एरव्ही एखाद्या सणासाठीच शूट करायचं झालं तर त्याची फार जय्यत तयारी करावी लागते. कलावतीचा शृंगार, पेहराव, दागिने, शूटसाठीचा लूक आणि मग हे शूट तडीस नेण्यासाठी रंगभूषा, वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे आर्टिस्ट, प्रॉपर्टी अशा नानाविध बाबींच पूर्वनियोजन करून मगच शूट आयोजित केलं जातं. मात्र वेळेअभावी भेटून, ठरवून हे शूट काही आम्हाला करता आलं नाही. सारं काही ठरलं ते फोनवर. नेमकं शूट कसं असेल, त्यासाठी काय अपेक्षित आहे, लूक कसा असेल, काय प्रॉपर्टी असेल हे सारं मी आणि संस्कृतीनं फोनवरच ठरवलं होतं. तेव्हा ‘पिंजरा’ या मालिकेत संस्कृतीची मध्यवर्ती भूमिका होती. याच मालिकेच्या सेटवर मी आणि संस्कृती भेटलो. संस्कृतीसोबत तिची आईदेखील होती.
सेटवर शूट असल्याने मेकअप, हेअर आणि कॉश्च्युम यासाठीची तयारीत आम्हाला फारसं लक्ष घालावं लागलं नाही. या मालिकेत संस्कृतीचा जो पेहराव होता त्याच पेहरावात आम्ही फोटोशूट केलं. सेटच्या आवारात असलेल्या झाडांच्या हिरव्या बॅकग्राऊंडवर आम्ही हे शूट केलं. एकीकडे मालिकेचं शूट सुरू असल्याने आम्हाला या वेळी फार कमी वेळ मिळाला होता. आतून संस्कृतीला सारखा आवाज दिला जात होता. मात्र संस्कृतीचं सगळं लक्ष फोटोशूटकडे होतं. तिचा चेहरा फार बोलका होता. संस्कृती गुढीची पूजा करत असतानाचे हावभाव, तिचा हसरा-मोहक चेहरा मी कॅमेराबद्ध करत होतो. मोजक्या वीस-पंचवीस मिनिटांत हे शूट आम्ही केलं. या वेळी संस्कृतीच्या भावमुद्रा फार महत्त्वाच्या होत्या. अन्यथा हे शूट पूर्ण करणं शक्य झालं नसतं. इतक्या कमी वेळात, एका मालिकेतल्या आपल्या मध्यवर्ती भूमिकेतून बाहेर पडून मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन त्या भूमिकेला न्याय देणं हे संस्कृतीला या वेळी उत्तम जमलं होतं. इथेच एका कसदार कलाकाराचं लक्षण या वेळी संस्कृतीत मला पाहायला मिळालं.
या शूटनंतर आमची दुसरी भेट झाली ती स्टुडिओ शूटच्या निमित्ताने. मराठमोळा चेहरा अशीच या शूटचीदेखील थीम होती. मात्र या वेळी शूटचं नियोजन उत्तम करता आलं होतं. मला हवा तेवढा वेळ या शूटसाठी मिळणार होता. कोणतेही निर्बंध नव्हते. कसलीही घाई नव्हती. संस्कृतीनेही शूटसाठीचा वेळ राखून ठेवल्याने त्याचा शूटसाठी फायदाच झाला होता. स्टुडिओतलं शूट असल्याने लायटिंगवर ताबा मिळावणं शक्य होत. शूटसाठीची थीम संस्कृतीशी बोलून मग त्यानंतर कॉश्यूम, मेकअप, हेअर आणि दागिने हे सर काही संस्कृतीला शूटच्या आधी माझ्या टीमनं सांगितलं होतं. संस्कृतीलाही ही थीम आवडली होती. त्यामुळे शूट चांगलं होईल अशी आकांक्षा मला होती.
शूटसंबंधित संस्कृतीशी बोलून आम्ही ठरल्याप्रमाणे शूटला सुरुवात केली. संस्कृतीचा लोभस चेहरा, तिने केलेली पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने हे सारं काही कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं. या वेळी ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट पोर्ट्रेट्समध्ये संस्कृती अधिक खुललेली दिसत होती.
तीन-साडे तीन तासांअंती हे शूट धम्माल मस्तीत संपलं खरं. मात्र या वेळच्या अनेक आठवणी आजही कायम आहेत. वेळेच्या गणितात बांधली गेलेली आणि वेळेच्या साच्यात न अडकलेली अशा दोन्ही भिन्न वेळेची संस्कृती मी कॅमेराबद्ध केली आहे. दोन्ही वेळी मला शूटला न्याय देणारी कलावती हवी होती. आणि ती कलावती साकारण्यात संस्कृती यशस्वी ठरली.
धनेश पाटील
February 18, 2019
दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली.
काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. 'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. 'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता.
कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे. 'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट!
त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. दादासाहेब तोरणे यांचे निधन १९ जानेवारी १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 19, 2018
चेतन जनार्दन कांबळे यांची आजवरची वाटचाल म्हणजे माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा तिन्ही मार्गांनी झगडत राहणे. औरंगाबादच्या भावसिंगपुरा या खेड्यातील या तरुणाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या त्रिसूत्रीवर ठाम विश्वास आहे.
April 19, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti