(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • जनकवी पी सावळाराम यांचा जन्मदिन

    सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.

  • प्रतिभावंत गायक शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली उर्फ कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. त्यांचे वडीलही गायक होते. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले.

    १९३६ सालच्या अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता.

    १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली.

    माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या- जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली त्यांनी केल्या.

    कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही गायक आहेत. त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या 'कालजयी कुमार गंधर्व' या ग्रंथात कुमार गंधर्व यांची प्रयोगशीलता आणि वैचारिकता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिला खंड मराठीमध्ये असून, दुसरा खंड हिंदी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४५ मान्यवरांचे लेख, कविता आणि मुलाखतींचा या ग्रंथात समावेश आहे. प्रसिद्ध गायक आणि विश्लेषकांनी कुमार गायकीचं मर्म उलगडून दाखवलं आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, अविनाश पसरिचा आणि कोमकली कुटुंबियांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रंही ग्रंथाच्या दोन्ही खंडात समाविष्ट करण्यात आली आहेत. मा.कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर

    संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे वडील तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे काका. चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले. तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. ‘गारंबीचा बापू’मधील मा.चित्तरंजन कोल्हटकर यांच्या एन्ट्रीला तर टाळ्या पडत असत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ. शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.चित्तरंजन कोल्हटकर यांना आदरांजली
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • वारकरी संप्रदायचे सोनोपंत दांडेकर

    सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

  • ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

    तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे.

    मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही. एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले.

    पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते. अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.

    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.
    अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.

    अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
    https://www.youtube.com/watch?v=j0cZearkZss
    https://www.youtube.com/watch?v=fXvijeN-m-w
    https://www.youtube.com/watch?v=Qi26eVirOhw

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

    दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. दभि कुलकर्णी या संक्षिप्त नावाने ते प्रसिद्ध आहेत. पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

  • मॉडेल, अभिनेत्री, व भाजपच्या एक मातब्बर नेत्या स्मृती इराणी

    स्मृती इराणी याचे माहेरचे नाव स्मृती मल्होत्रा. स्मृती या तीन बहिणींपैकी सर्वात मोठ्या आहेत. दहावीच्या वर्गात असल्यापासूनच त्यांनी काम करायला सुरवात केली. एक ब्यूटी प्रॉडक्टच्या प्रचारासाठी त्यांना दिवसाला २०० रूपये मिळत असत. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मा.स्मृती इराणी दिल्लीतून मायानगरी मुंबईत आल्या. त्यांचे पूर्ण बालपण दिल्लीतच गेले. मा.स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री म्हणून आपल्या कामाला सुरवात केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्या तुलसी विरानी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. छोड्या पडद्यावर स्वताची वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्या आघाडीवर होत्या. १९९८ मध्ये मिस इंडियाचा मुकुट मिळवण्यासाठी मा.स्मृती इराणी यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना तो मिळाला नाही. पहिल्या पाचमध्येच त्यांना समाधान मानावं लागलं. मा.स्मृती इराणी यांनी या मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी आपल्या आईकडून काही रक्कम घेतली होती. ती रक्कम परत करण्यासाठी इराणी यांनी नोकरीसाठी शोधा-शोध सुरू केली. जेट एअरवेज मध्ये त्यांनी फ्लाईट अटेडेंट पदासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. अनेक ऑडीशनसाठी मध्येही त्यांना रिजेक्ट करण्यात आले. सुरवातीला मॅकडोनाल्ड मध्ये काम करणाऱ्या मा.स्मृती इराणी यांनी प्रसिध्दीचा दरवाजा खटखटवला जरूर, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मल्टीनॅशनल कंपनीच्या नियमानुसार मॅकडोनाल्ड सारख्या कंपनीतील कामगारांना हॉटेलचे अकाऊंट सांभाळण्यापासून ते टेबल किंवा फरशी पुसण्यापर्यंत सर्व कामं करावी लागतात. ही सर्व कामं त्यांनी केली. एकता कपूरच्य़ा ओह ला ला ला शोमधील एका भागात निलम कोठारीच्या ऎवजी त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

    क्योंकी सास भी कभी बहू थी या सिरीयलमध्ये काम करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी आतिश आणि हम है कल आज और कल या सिरीयलमध्ये काम केले होते. मात्र त्यांची खरी ओळख झाली ती तुलसी विरानी या भूमेकेतून. बघता बघता सिरीयलच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावरची सर्वात लाडकी बहू बनली. छोट्या पडद्यावरील सर्वात शांत सून म्हणून ओळखली जाणारी तुलसी प्रत्य़क्ष आयुष्यात मात्र वेगळ्या आहेत. आपल्या विरोधकांवर तिखट टीका करताना स्मृती इराणी यांना अनेकांनी पाहिलं आहे. त्यांनी २००३ साली राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या भाजपच्या स्टार प्रचारक बनल्या. २००४ साली काँग्रेसचे नेते मा.कपील सिब्बल यांच्या विरोधात स्मृती यांनी निवडणूक लढवली होती. मा.स्मृती इराणी यांना त्यात अपयश आले होते. २०१० मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. २०११ मध्ये गुजरातमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्य़ा याच स्वभावामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपने त्यांना राहूल गांधींच्या विरोधात अमेठीतून उभे केले. त्यात स्मृती इराणी यांना अपयश आले मात्र राहूल गांधींना त्यांनी कडवी टक्कर दिली.मा. मोदी सरकार मध्ये स्मृती इराणी या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होत्या. सध्या स्मृती इराणी या सध्या केंद्रीय टेक्सटाईल मंत्री आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    स्मृती इराणी यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
    आतिश, क्यूँ की सास भी कभी बहू थी, थोड़ी सी ज़मीन थोड़ा सा आसमाँ, रामायण, विरुद्ध, हम हैं कल, आजकल और कल

  • मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकांचे संपादक पु. वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे

    १९५९ साली मुंबईहून प्रकाशित झालेल्या ‘मेनका’च्या पहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून त्यांना हे मासिक मराठीमध्ये काहीतरी भयंकर करणार असे वाटले. पुण्याच्या अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे यांनीही खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहेरे दांपत्याला सोसावा लागला. पण त्या खटल्यामुळे मेनका मासिकाची बरीच चर्चा होऊ लागली आणि त्यामुळे चांगलीच प्रसिद्धीही झाली.

  • रूपाली शिरोडे

    मनात जिद्दीचा अंकुर जपून ठेवून त्याला सातत्यपूर्ण मेहनतीची जोड दिली तर अडीअडचणींच्या वादळवार्‍यांतही यशाचा वटवृक्ष बहरू शकतो, हे धुळ्याच्या रूपाली शिरोडेने दाखवून दिले आहे. एमपीएससीने २०११ मध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत रूपालीने राज्यात मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

  • कॉश्च्युम डिझायनर भानु अथैया

    त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड ॲ‍टनबरो यांच्या ‘गांधी’ (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली. देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा होता.