जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रवीण कुमार सोबती हे ६० आणि ७० च्या दशकातील भारतातील प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक होते. हॅमर आणि डिसक्स थ्रोमध्ये त्यांनी दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व केले.
अँडी रॉबर्ट्स यांचे बाउन्सर सर्वाधिक धोकादायक समजले जात असत. बाउन्सरच्या आधीचा चेंडूही काहीसा उसळे, पण तो मऊ भागावर आपटवला जाई.
काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.
मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पाश्र्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले.
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.
त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- ग्लोबल मराठी / विकिपिडीया
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे बिगरहिंदी भाषक हिंदी लेखक पुरस्कार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार ठाण्याच्या डॉ. वसुधा सहस्रबुद्धे यांना मिळाला आहे.
स्वातंत्र्य संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्वसामान्य महिलांनीदेखील शौर्य गाजवले. या पराक्रमाची गाथा देशाच्या कानाकोपर्यात पोहचवायची असेल तर ती हिंदीत अनुवादित करायला हवी, हे डॉ. सहस्रबुद्धे यांनी ओळखले होते. त्यांचे माहेर कोकणातले. घरात संस्कृत भाषेचा दरवळ कायमच. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदार्या पार पाडताना शिकण्याच्या उर्मीने त्यांनी एम. ए. केले. एम. ए. साठी हिंदीची निवड केली. त्याहीपुढे जात ' डॉ. शंकरशेष का नाट्य साहित्य ' या विषयात त्यांनी चाळीसाव्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. त्याच दरम्यान त्यांनी त्रिपुरारी शर्मा यांच्या ' दहलिज ' या मालिकेचा व भीष्म सहानींच्या ' माधवी ' या नाटकाचा रेडिओसाठी मराठीत अनुवाद केला. यानंतर मात्र त्यांना अनुवादाची गोडी लागली व ' स्वातंत्र्योत्तर कालीन मुंबई का हिंदी रंगमंच ' आणि ' प्रयोगशील रंगमंचीय आंदोलन में आविष्कार का योगदान ' या शोधप्रबंधांतून त्यांनी आपल्यातील अनुवादकाच्या प्रगल्भतेची चुणूक दाखवली. या शोधप्रबंधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना पु. ल. देशपांडे यांची शाबासकी देऊन गेले.
मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करताना त्यांचा परिचय राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी गवाणकर यांच्याशी झाला. आझाद हिंद सेनेच्या महिला पलटणीचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी व मानवती पांडेय, जानकी दावर, पी. नारायण कुट्टी, शकुंतला गांधी, बेला मुखर्जी, प्रतिभा पाल यांच्यासारख्या वीर महिला सैनिकांनी गाजवलेला पराक्रम व त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या कर्तव्यभावनेची ओळख देशभरातील जनतेला व्हावी, यासाठी गवाणकर यांच्या पुस्तकाचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला. कोणताही मोबदला न घेता अनुवादाची जबाबदारी स्वीकारण्याचे एका अर्थाने धाडस डॉ. सहस्रबुद्धे यांनी त्यावेळी केले. संहितेच्या अनुवादातून मिळणारा पैसा हे एकमेव उद्दिष्ट न मानता सृजनाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहस्रबुद्धे यांनी हे आव्हान पेलवून दाखवले. पुढे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिलेल्या अनुदानातून ते २००३ मध्ये कोलकात्यात प्रसिद्ध झाले.
डॉ. वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या ' कॅप्टन लक्ष्मी व झाशी रेजिमेंट - एक अकथित कथा ' या पुस्तकाच्या हिंदी अनुवादासाठी या राष्ट्रीय गौरवाला त्या पात्र ठरल्या आहेत. भाषेची चौकट व मोबदल्याच्या चौकटीत जखडून न राहता उगवत्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्यसमरातील महिलांच्या योगदानाची माहिती देणार्या या अनुवादाबद्दल त्यांचा झालेला हा गौरव सार्थ म्हणायला हवा.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाजवल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. पुढे याच नावाने त्यांचे मराठी व इंग्रजी भाषेत पुस्तक प्रकाशित झाले.
अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.
लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंदोर येथे झाला.
पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध कैदी म्हणून जपान्यांच्या हाती सापडले. पुढे त्यांची भरती आझाद हिंद सेनेत केली गेली.
त्यांनी सांगितल्या आठवणीनुसार ते आझाद हिंद सेनेतला बहुतांश वेळ नेताजी सुभाषचन्द्र बोस यांचे असिस्टंट होते. तिथून त्यांची रवानगी जनरल जगन्नाथ भोसले यांचा ऑन फिल्ड असिस्टंट म्हणून करण्यात आली. त्यांनी आझाद हिंद रेडियोचे देखील काम सांभाळलं. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटिशांच्या विरुद्ध विजयी होऊ शकली नाही. नेताजींचे विमान कोसळले, आझाद हिंद सेनेची वाताहत झाली. युद्ध संपल्यावर पु.ना. ओक पायी चालत सिंगापूरहून अनेक देश, जंगले ओलांडून कोलकात्याला आले. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. पु.ना ओक नी वार्ताहार म्हणून हिंदुस्तान टाईम्स, द स्टेटसमन अशा वृत्तपत्रांमधून काम केलं. पुढे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.
एवढेच नाही तर अमेरिकी दुतावासात देखील संपादनाचे काम केले. या दरम्यानच्या काळात भारतात इतिहास हा स्थानिकांच्यावर अन्याय करणारा लिहिण्यात आला आहे असे त्यांच्या निरीक्षणात आले. मग त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करायची जबाबदारी उचलली. आणि त्यांनी नवा इतिहास घडवलां… भारतीय इतिहास पुनर्लेखन संस्थेची स्थापना १९६४ साली केली. पुढे त्याचेच रुपांतर विश्व इतिहास पुनर्लेखन संस्थेत केले.
फक्त भारताचाच नव्हे तर जगाचा इतिहास पाश्चात्य लेखक आणी त्यांना धार्जिण्या भारतीय इतिहासकारांनी हिंदूच्या विरोधात लिहिला असे त्यांनी ठासून सांगितले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. यातले सर्वात प्रसिद्ध पुस्तक म्हणजे “ताजमहल नव्हे तेजोमहालय”
ताजमहल हा शहाजहानने बांधला नसून तो अग्रनगरच्या अग्रसेन महाराजांनी अग्रेश्वर महादेवासाठी बांधलेला तेजोमहालय आहे असे या पुस्तकाचे म्हणणे आहे.या पुस्तकातील बरीचशी पाने ताजमहाल शहजाहान ने कसा बांधला नाही यात खर्ची केली आहेत पण ज्या अग्रसेन महाराजांनी तेजोमहालय बांधल्याचा दावा ओक करतात त्याच्या बद्दल विस्तृत माहिती द्यायला ते कमी पडतात. फक्त शहाजहान पूर्वी ५०० वर्षापासून हे मंदिर अस्तित्वात होते असे त्यांनी सांगितले आहे आणि बाकी सर्व पुरावे मुघलानी, इंग्रजानी आणि त्यानंतर आलेल्या सेक्युलर सरकारांनी दडवले असा आरोप ते करत राहतात. या पुस्तकाबद्दल अनेक वाद झाले.
त्यात अनेक तज्ञ इतिहासकारांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार देऊन ओक यांचा समज खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना आणि त्यांचा इतिहास पटणाऱ्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात गेले.
तिथे झालेल्या सविस्तर चर्चेनंतर १३ जुलै २००० साली न्यायमूर्ती एस.पी.भरूचा यांच्या नेतृत्वाखालील बेंचने निर्णय दिला कि हि वास्तू तेजोमहल नसून ताजमहलच आहे. फक्त एवढे करून न्यायालय थांबले नाही तर विनापुरावा सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल पु. ना. ओक यांची कानउघडणी केली.
पु. ना. ओक यांचे ४ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
आदित्य हा एक नावाजलेला जलतरणपटू आहे ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti