जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बाळ कोल्हटकर हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते.
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला.
भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.
भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. मा.भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
"आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांना “यमला जट’ या पंजाबी सिनेमात अभिनय करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना उपकार, आँसू बन गये फूल, बेईमान या चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. याशिवाय अन्य अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार.त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१० रोजी झाला.विश्वनाथ नागेशकर, हे कोल्हापूरचे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसत असे. विश्वनाथ नागेशकर यांचे फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण गेले. त्यांनी कोल्हापूरचे कलाप्रेमी छत्रपती मा.शाहू महाराजांच्या मदतीने मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. तेथे डिप्लोमा घेतल्यानंतर १९३५ साली उच्चशिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. पॅरिसच्या एकोल नॅशनल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जर्मनीतील म्युनिच आर्ट स्कूलमध्ये २ वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करताना सन्माननीय अलेक्झांडर वॉन, हॅम्बोल्टची स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर बर्लिन अकादमीच्या भव्य आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सतत कलासाधनेत मग्न असा भारतीय हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळख. प्रो. स्टुब यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. जर्मन कलाजगतात चांगली ओळख निर्माण झाली. प्रो. स्टुब आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्यांची चित्रे पाठवत. म्यूरल्स हा खास आवडीचा विषय त्यामुळे युरोपात बदलत गेलेल्या शिल्पकलेचाही अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात स्वतःचे घर, स्टुडिओ, पेटिंग्ज बेचिराख होताना पाहिले. नाझींच्या त्रासातून लंडनला जावे लागले. एडना नावाच्या जर्मनीशी त्यांनी विवाह केला. एकना यांनी मा.विश्वनाथ नागेशकर यांना आणि त्यांच्या चित्रकलेला आयुष्यभर जपले. या दोघांच्या जीवनप्रवासाची, कलाप्रवासाची ही कहाणी आहे. आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने निर्माण केलेल्या चित्रकृतींमुळे नागेशकरांनी परदेशात अभूतपूर्व यश व किर्ती मिळवली. भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार. लंडनचा निरोप घेतल्यावर संपूर्ण युरोपचा प्रवास, म्युझियम, कलादालन पटात राहिले. १९५५ नंतर पुन्हा जर्मनीला स्थायिक. एडना व त्यानंतर विश्वनाथ नागेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व उपलब्ध चित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू कोल्हापूरला मा.जयसिंग नागेशकर यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पुढाकार घेवून या पुस्तकाची लेखनाची जबाबदारी माधवीताई देसाई व प्रकाशनाची जबाबदारी मुक्ता पब्लिशिंग हाऊसवर सोपविली. तसेच मुंबई, पुणे, गोवा, सांगली येथे चित्र प्रदर्शने भरविली. अशा प्रकारे देशी व परदेशी चित्रकलेतील विविध प्रकारांचे ज्ञान आत्मसात करुन आपल्या कलेच्या सामर्थ्यावर तेथेच स्थायिक झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमाहूनही त्याचा परिणाम आपल्या चित्रकृतींवर न होवू देता आपल्या असंख्य कलाकृतींनी जागतिक कीर्ती संपादन केली. मा.विश्वनाथ नागेशकर यांचे १८ मार्च २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या मातृभूमीशी परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर विश्वरंग नावाचे पुस्तक आहे. पुस्तकात त्यांची १६ रंगीत चित्रे दिली आहेत.
http://www.discountpandit.com/products/Rohtak/books/Vishwarang-Paperback-Marathi-price-in-
india-NzUxNzI=.html
विश्वनाथ नागेशकर यांची वेबसाईट.
http://www.nageshkarart.com/
‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्या असंख्य हिर्यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.
केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.
धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात.
दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.
लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला, अशी पुस्तके गाजली. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे. शिरीष पै यांचे दोन सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
मराठीतील ‘हायकू’ला प्रतिष्ठा मिळवून देणा-या शिरीष पै यांच्या गाजलेल्या काही हायकू…
पाहिला नाही असा उन्हाळा
उगवतानाच
सूर्य भडकलेला
दुरून पाऊस पाडेन
काळा ढग येतो आहे
लांबूनी जोर दिसतोय
आठवून सारे हसू येते
याचसाठी का मी
रडले होते
केव्हापासून करत आहे
काव काव कावळा
एवढा का भरून
येतो त्याचा गळा
केळीचे पान वा-यावर डुलतय
पण त्याला माहीत नाही
टराटरा फाटतंय
बागेमध्ये आनंदात फुलपाखरू
गेलं बागडून
पाऊस थांबला म्हणून
प्राचीन किल्ल्यात पाय ठेवताच
आपल्याला कळले
भूतकाळात काय घडले
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले.
राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता.
जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
Copyright © 2025 | Marathisrushti