जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी!
युवकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, तबलावादक श्री. मुकुंदराज देव म्हणजे भारतीय संगीताची झेप सात समुद्रपार नेणार्या अनेक रत्नांपैकी एक रत्न.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी
बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला.
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. मा.बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकीपीडीया
सुंदरता', 'नृत्य' आणि 'अभिनय' यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने.
माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती. श्रीदेवी नृत्यात काही प्रमाणात कमजोर होती आणि तिचे सौंदर्य हे काही परिपूर्ण नव्हते. माधुरी मात्र पहिली परिपूर्ण सुपरस्टार होती.
माधुरी दीक्षित यांनी १७ वर्षांची असताना पहिला चित्रपट राजश्री प्राँडक्शनचा 'अबोध' केला. 'अबोध' कुणी फारसा पाहिला नाही. पुढे माधुरी दीक्षित यांनी 'मोहरे', 'मानवहत्या' असे 'बी' ग्रेडचे चित्रपट केले. मीनाक्षी शेषाद्री प्रमुख भुमिकेमध्ये असतांना 'स्वाती' आणि 'आवाराबाप' या चित्रपटांमध्ये माधुरी यांनी सहाय्यक भूमिका केल्या. 'उत्तर दक्षिण' हा माधुरी दीक्षित यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट. ज्या माधुरी यांनी मीनाक्षी सोबत सुरवातीला चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या त्याच 'घई कॅम्प' मध्ये माधुरीने दिमाखदार प्रवेश करून मीनाक्षीचीही 'छुट्टी' केली. त्यावेळी मराठी मुली फारश्या हिंदी चित्रपटात यशस्वी होत नव्हत्या, अपवाद फक्त नूतन, स्मिता पाटील आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा. पण 'तेजाब'च्या आधी ओळीने ८ अपयशी चित्रपट देऊन 'एक दो तीन ..' असे म्हणत माधुरीने घवघवीत यश मिळवले.
नंबर १ च्या पदावर विराजमान होणारी माधुरी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली. जे निर्माते तिला 'फिजीक' नाही असे म्हणायचे त्यांनाच तिच्यात कमालीचे 'सेक्स अपील' दिसू लागले. तिच्या दिलखेचक अदांनी तर संपूर्ण सिनेसृष्टीला दिवाणे केले. तिची 'हम आपके है कौन' मधील काम कमालीचे हिट ठरले. माधुरीच्या नावाचे 'गाणे' (माधुरी दीक्षित मिली रस्ते में..) आणि 'चित्रपट' (मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ) देखील आले. तिने २ चित्रपटात (धारावी, बड़े मियां छोटे मियां) 'माधुरी दीक्षित'चीच भूमिका केली. माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती.
अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी `तेजाब`, परिंदा`, `राम-लखन`, `किशन कन्हैया`, `जीवन एक संघर्ष`, `जमाई राजा`, `खेल` `बेटा`, `जिंदगी एक जुआ`, `राजकुमार`, `पुकार` हे हिट सिनेमे केले. त्यांनी केलेल्या जवळपास ५७ चित्रपटांपैकी १६ चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना निरनिराळ्या पुरस्कारांसाठी 'नामांकन' मिळाले, तर ५ वेळा त्यांनी प्रतिष्ठेचा 'फिल्म फेअर' पुरस्कार दिल, बेटा, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटांसाठी पटकावला. 'हम आपके हैं कौन' या चित्रपटानंतर तर माधुरी दीक्षित या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. मात्र त्यानंतर आलेले राजकुमार, प्रेमग्रंथ, कोयला, मृत्युदंड, महानता असे चित्रपट न चालल्याने 'माधुरीची जादू संपली..' अशा शब्दात समीक्षकांनी त्यांच्यावर टीका करणे सुरु केले. 'दिल तो पागल है' प्रदर्शित झाल्यावर सुरवातीला समीक्षकांनी करिष्मा कपूरचेच अधिक कौतुक केले होते. मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'दिल तो पागल है' साठी मिळाल्यानंतर याच समीक्षकांचे माधुरीने आभार मानले. कारण त्यांच्याचमुळे अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळाली असल्याचे माधुरी दीक्षित यांनी नमूद करून आपल्या समीक्षकांच्या टीकेला चोख उत्तर दिले.
प्रसिध्द चित्रकार एम.एफ.हुसेन माधुरीवर अत्यंत फिदा असल्याने त्यांना एम.एफ.हुसेन ऐवजी एम.एफ. म्हणजे 'माधुरी' 'फिदा' हुसेन असे गमतीने संबोधले जायचे. माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित सर्वच नृत्यगीतं आज देखील लोकप्रिय आहेत. माधुरी दीक्षित यांची क्रेझ अजून देखील कायम आहे. माधुरी दीक्षित यांनी आपल्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. छोट्या पडद्यावर देखील त्यांनी 'झलक दिखला जा' द्वारे परीक्षक म्हणून रंगत आणली होती. माधुरी आणि संजय हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते, ते लग्नही करणार असल्याची चर्चा होती.
माधुरी दीक्षितने फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर काहीच वर्षांत आपले बस्तान बसवले. संजय दत्तही त्याकाळात एक प्रसिद्ध अभिनेता होता. दोघांच्या प्रसिद्धीचा विचार करून त्यांना साजन या चित्रपटासाठी साईन केले गेले. हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले, असे म्हटले जाते. साजन हा चित्रपट हिट झाल्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये संजय आणि माधुरी यांची जोडी झळकली. खलनायक या चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत माधुरी आणि संजयच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच सुरू झाली होती. माधुरीच्या कुटुंबीयांनी संजय आणि तिच्या नात्याला विरोध केला होता असेही म्हटले जाते.
संजयच्या आयुष्यात माधुरी येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. आज माधुरी दीक्षित या अमेरिकेमध्ये अनेकवर्षे स्थायिक होऊन देखील आपल्या दोन मुलांना पाश्चिमात्य संस्कृती ऐवजी भारतीय संस्कृतीत वाढवत आहे. लग्नानंतर माधुरी दीक्षित यांनी `गुलाब गॅंग` आणि `डेढ़ इश्किया` या सिनेमातून कमबॅक केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माधुरी दीक्षित यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=AEGYBrGVufY
https://www.youtube.com/watch?v=ErT1kN0MPTk
साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. त्यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर… मा.वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली मा.वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी’ ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.
अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो. मा.वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना – सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. ‘गूंज उठी शहनाई’मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते ‘गूंज उठी’ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही ‘झनक झनक’ च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने ‘लिबर्टी’ चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवा खाँ साहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात.
पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, व मृदुंगवादक रामदास हे वादकही ‘झनक झनक ’मुळे प्रथम चमकले. रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. ‘केदार’ रागातली ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ ही रचना इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. ‘दो आँखे बारह हाथ’ मधले ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या प्रार्थना गीताला ‘मालकंस’ रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले.
वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे.
‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा.वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले.
www.vasntdesai.com या वेब साईटवर मा.वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.
वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा २२ डिसेंबर १९७५ रोजी अपघाती निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
वसंत देसाई यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=mRx1i1puP9A
https://www.youtube.com/watch?v=jX7m86CMDIg
https://www.youtube.com/watch?v=YKMZNH5qnY0
https://www.youtube.com/watch?v=yyHK9v5Vjgg
https://www.youtube.com/watch?v=1VbcBKWYTSA
https://www.youtube.com/watch?v=QSOSKrpHvyE
हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी वगळता बंगाली, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचाही अभ्यास हिराबाई यांनी केला.
हिराबाई या चांगल्या गायिका होत्या. त्यांना गायनकला आणि नृत्यकला अवगत होती. हिराबाई यांच्या प्रतिभेमुळे तत्कालीन अनेक आघाडीच्या नाटककारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. हिराबाई या कविता लिहीत. त्यांच्या कविता तेव्हाच्या आघाडीच्या मराठी साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. दरम्यान त्यांची "माझे आत्मचरित्र" ही लघुकथा प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. त्यांच पाहिलं नाटक "जयद्रथ विडंबन" हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांचं दुसर नाटक "दामिनी" हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झालं.
हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या. सुनिता देशपांडे यांच्या लेखानानुसार तत्कालीन संगीत नाटकसृष्टीवर हिराबाई यांचा मोठा प्रभाव होता. त्या पुढे लिहीतात की कोल्हटकर आणि गडकरी यांनी वेळोवेळी नाटक संगीतबद्ध करताना हिराबाई यांची मदत घेतली. हिराबाई यांचा एवढा प्रभाव वाढला होता की एका नाटककाराने त्यांच्या जीवनाला समोर ठेऊन नाटक लिहीले आणि नायिकेचे पात्र उभे केले. हिराबाई यांच्या संगीत नाटकातील योगदानाची दखल फारशी घेतली गेली नाही. हिराबाई पेडणेकर यांचे निधन १८ ऑक्टोबर १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला.
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या.
वालुकाशिल्प बनवणाऱ्या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किनाऱ्यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकारचा किताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युट देखील स्थापन केले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti