जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.
बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 11, 2019
‘श्रीजं’चे लेखन अत्यंत ताजं आणि टवटवीत असे. ‘पुण्यात दुमजली बस येते’, ‘हुजूरपागेच्या मुली’, ‘ओंकारेश्वर ओंकारेश्वरी गेले’,’ पीएमटी एक संकीर्तन’, ‘सदाशिव पेठ साहित्यपेठ’ अशांसारखी त्यांच्या लेखांची शीर्षकंही पुणेकरांना जवळची असत.
January 13, 2022
हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.
March 28, 2022
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच जन्म १ जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे झाला. प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्सद सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.
प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले. १९५५ मध्ये जे.जे मधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर प्रफुल्ला डहाणूकर चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून १९६१ मध्ये पॅरिसला गेल्या, आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या. त्या भित्तिचित्रांमध्ये खास प्रवीण होत्या.
भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला. जे. जे. मधून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळवत त्यांनी आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. वर्षभरातच त्यांनी स्वतःची चित्र प्रदर्शने भरवून कलाप्रेमींची मने जिंकली. चित्रकलेच्या क्षेत्रातील त्यांची कारकिर्द वाखाणण्याजोगी ठरली. चित्रकलेतल्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा गौरव म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीने त्यांना निवडक चित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्याचा बहुमान दिला होता.
फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. भारतीय दूतावासाने तब्बल तीन वेळा लंडनमध्ये डहाणूकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले होते. ही तिन्ही प्रदर्शने कलाविश्वात कौतुकास पात्र ठरली होती. सिटी बँक आणि बार्कले बँकेनेही डहाणूकर यांची विदेशात प्रदर्शनं आयोजीत केली होती. त्यांच्या दुबईतल्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या हस्ते झाले होते. प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन १ मार्च २०१४रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2019
सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या दोघांचं नाटय़वेड खरं तर कमालीचं टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात.
January 10, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला.
घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना!
नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते.
नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले.
छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता.पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.
१९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले.
नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.
१९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.
अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली.
स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली. त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली.
पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.
नानासाहेब सरपोतदार यांचे २३ एप्रिल १९४० रोजी निधन झाले.
#NanasahebSarpotdar
May 5, 2022
चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. शांता शेळके यांचा जन्म इंदापूरला, तर बालपण खेड मंचरच्या परिसरात गेले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. संस्कृत आणि मराठी भाषेतून एम. ए. करताना त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. कथा-कादंबर्याा, स्तंभलेखन लिहणार्या , भाषांतर व अनुवाद करणार्या शांताबाई कवयित्री म्हणून अधिक लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं.
उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे.
वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या.
शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. मा.शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांता शेळके यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक.
https://www.youtube.com/watch…
https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw
November 10, 2017
साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला.
February 11, 2022
शाळेत असतानाच नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मूकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवले जाई, त्या वेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले.
March 14, 2014
(१८८७-१९५९)
कोल्हापुर जिल्हयातील कुंभोज गावी (ता. हातकणंगले) एका जैन शेतकरी कुटुंबात भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेव्हिन्यू खात्यात लेखनिक म्हणून नोकरीस होते. भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी कोल्हापुरला शिक्षणासाठी ठेवले. तेथे त्यांच्यावर सत्यशोधक समाजाचे संस्कार झाले. महात्मा फुले, विठठ्ल रामजी शिंदे व मुख्यत्वेकरून शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला. परंतु मतभेद झाल्याने त्यांनी कोल्हापुर सोडून सातार्यास विक्रेता म्हणून नोकरी धरली. ही नोकरी करीत असताना त्यांना ग्रामिण भागातील लोकांना शिक्षण मिळाले तर त्यांचे प्रश्न सुटतील हे त्यांच्या लक्षात आले व त्यासाठी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेसाठी त्यांनी पैसे जमा केले. शिक्षणाच्या कार्याला वाहून घेतील अशा सहकार्यांचा संच उभा केला व खेडयापाडयातील लोकांनी त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास पाठवण्यास प्रवृत्त केले. जातीप्रमाणे वसतिगृहे असू नयेत असे भाऊरावांचे मत होते. त्यांचा स्वतःचा जैन वसतिगृहाचा अनुभव वाईट होता. म्हणून सर्व जातीधर्माच्या मुलांना खुली असणारी वसतिगृहे सुरू केली. ब्राह्यणेतर चळवळीतील इतर नेत्याप्रमाणे राष्ट्रवादी चळवळीपासून दूर न रहाता भाऊरावांनी आपल्या परीने त्या चळवळीस हातभार लावला. आयुष्यभर खादी वापरली. पण राजकीय काम करण्याऐवजी रचनात्मक कार्यास वाहून घेतले. १९४२ च्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांना मदत केली.
त्यांच्या रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात शाळा व महाविद्यालयांचे जाळे विणले. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९ मध्ये सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याच वर्षी त्यांचे पुणे येथे निधन झाले.
June 8, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti