(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • लोककवी मनमोहन नातू

    मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत.
    शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते.

  • कृष्णदेव मुळगुंद

    मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

  • सरोजिनी नायडू – भारतीय स्त्रिया – राजकीय क्षेत्र

    सरोजिनी नायडू  या एक भारतीय राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर संयुक्त प्रांतांच्या पहिल्या राज्यपाल म्हणून काम केले . ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली . त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

  • नाना पाटील (क्रांतिसिंह)

    जन्म- ३ ऑगस्ट, १९००
    मृत्यू- १९७६

    क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

    महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
    नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला.

    लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

    १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

    ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

    या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

    १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

    यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी गांधी -विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

    स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे १९७६ मध्ये निधन झाले.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • सुप्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅन

    वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रूस ली च्या ‘ फिस्ट ऑफ फ्यूरी ‘ आणि ‘ एंटर द ड्रॅगन ‘त्याने मध्ये स्टंटमन म्ह्णून काम केले. एटर द ड्रॅगन मध्ये तो ब्रूस ली बरोबर फाईट करताना दिसतो. पुढे त्याने अनेक चित्रपटात कामे केली . रश अवर , पोलीस स्टोरी , शांघाय नून , शांघाय नाइट्स अशी कित्येक नावे घेता येतील. तो अनेक वेळा स्टंट करताना जखमीही झालेला आहे.

  • श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार

    ना. सं. इनामदार हे मराठीतील श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरीकार होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला.

    इतिहासकाळातील उपेक्षित पात्रांना न्याय देणारा लेखक अशी त्यांची कायमची ओळख मराठी वाचकाला राहिलं. कादंबरीमधे काय सांगितले आहे, त्याच्याएवढेच महत्त्व ते कसे सांगितले आहे, या गोष्टीला असते. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता व चित्रदर्शी शैली, यामुळे ते लोकप्रिय कादंबरीकार ठरले. त्यांच्या ऐतिहासिक कादंबरी लेखनाला महाराष्ट्रात तोड नाही.

    ऐतिहासिक वास्तवातून वर्तमानाचे परिक्षण करणारे, ते थोर कादंबरीकार होते. एकीकडे काय घडले याचे तपशील गोळा करणे, उपलब्ध माहितीतून जरूरी तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधणे, इतिहासाचा आदर करणे, आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दृष्टिला दिसलेला, भावलेला इतिहास उभा करणे, ही दुहेरी तारेवरची कसरत ऐतिहासिक कादंबरीकाराला करावी लागते आणि इनामदारांनी ती लीलया किती सहजपणे साधली होती हे त्यांच्या लेखनातून दिसून येते.

    १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी, परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र १९९६ साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यानी ती लिहीली होती. झेप ही त्यांची प्रथम प्रसिध्द झालेली, दुसरी ऐतिहासिक कादंबरी, १९६३ सालामधे प्रकाशित झाली.

    ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले. इतिहास पुन्हा पुन्हा तपासण्याची 'शिकस्त' केली. त्यांची ही 'झेप' मराठी वाङमय जगताला एका नव्या क्षितिजाकडे नेणारी ठरली.

    कथा लेखनाने त्याच्या लेखनाची सुरूवात झाली. इनामदारांनी आपले वाङमयीन लेखन १९४५ मध्ये 'अनिल' साप्ताहिकातून सुरू केले. १९५८ पर्यंत त्यांनी 'हंस', 'मोहिनी', 'किर्लोस्कर', 'साप्ताहिक स्वराज्य' वगैरे नियतकालिकांतून लेखन केले. मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तींचा मागोवा त्यांनी घेतला. त्यांची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टि अतिशय निकोप होती. नोकरीच्या निमित्ताने हिंडत असताना ऐतिहासिक दस्तावेजांचे संशोधन करण्याचा छंदच त्यांना लागला होता.

    त्रिंबकजी डेंगळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर त्यानी लिहीलेल्या 'झेप' या कादंबरीच्या एकंदर १० आवृत्त्या निघाल्या. या त्यांच्या कादंबरीस राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर १९६६ साली आलेल्या त्यांच्या 'झुंज' या कादंबरीने पुन्हा एकवार राज्य शासनाचा पुरस्कार पटकाविला. मल्हारराव होळकर यांची सून अहिल्याबाई होळकर. त्यांच्या मुलाचे निधन झाल्यावर होळकर घराण्यातील तुकोजी होळकर याने सारी सुभेदारी सांभाळली. 'यशवंतराव होळकर' हे तुकोजी होळकरांचे अनौरस पुत्र. यशवंतराव होळकरांना पुणे जाळणारा पेशव्यांचा सरदार म्हणून सारेच ओळखतात. जुन्या मराठी माणसांनी प्रात:काळी ज्यांची नावे उच्चारू नयेत अशा त्रयीत यशवंतरावांची गणना केली. पण मराठी वाचकांना परिचित नसलेला यशवंतराव होळकर 'झुंज' मधे ना. सं. इनामदारांनी पेश केला आहे.

    जदुनाथ सरकार यांच्या साहित्याने प्रेरित होऊन ना. सं. इनामदारांनी, 'शहेनशहा' ही कादंबरी लिहीली. पार्वतीबाईसाहेब पेशवे यांच्या जीवनावरील 'शिकस्त' मधे पानिपत युध्दात धारातिर्थी पडलेल्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नीच्या वेदना त्यांनी मांडल्या. 'राऊ' मधे, थोरल्या बाजीरावांचा पराक्रम, मस्तानी प्रकरण, या प्रकरणाचे बाजीरावांना बसलेले चटके, यांचा मागोवा घेतला आहे. दुसरा बाजीराव त्यांनी मंत्रावेगळा कादंबरीतून उभा केला. राजेश्री या कादंबरीमधे शिवचरित्राचा उत्तर भाग येतो.

    झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजेश्री, अशा त्यांच्या कादंब-यांनी तो काळ भारून टाकला होता. ही सारी निर्मिती १९६२ ते १९८६ या दोन तपांत झाली. त्यांची 'घातचक्र' ही कादंबरी देखील प्रकाशित झाली आहे. मंत्रावेगळा, झुंज आणि झेप या तिन्ही कादंब-यांना राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. १९९७ येथे झालेल्या नगर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चे ते तीन वर्ष उपाध्यक्ष होते. ना.सं.इनामदार यांचे १६ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कथाकार अच्युत बर्वे

    अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते.

  • ब्रिटिश अभिनेते डॅनियल क्रेग

    जेम्स बॉंड या जगप्रसिदध गुप्तहेराची भूमिका तब्बल पाच चित्रपटांच्या माध्यमातून निभावणाऱ्या डॅनियल क्रेगला खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणाऱ्या ‘कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अॅन्ड सेंट जॉर्ज- सीएमजी’ (Companion of the Order of St. Michael and St. George -CMG) पुरस्कार गेल्या वर्षी डॅनियल क्रेग यांना देण्यात आला आहे.

  • लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर

    लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर

    कलेची हरवली प्रतिष्ठा पुन्हा कमावली आणि पांढरपेशा रसिकांसमोर घायाळ करणारी लावणी मोठय़ा दिमाखात पेश केली ती सुरेखा पुणेकर यांच्या पिढीतल्या कलावतींनी.

    ‘नुसत्या भुवया उंचावून अन् बोटं हवेत फिरवून अंगभर नऊवारीतही लावणीतली मादकता पेश करता येते. त्यासाठी उघडी पाठ दाखविण्याची गरजही नाही,’ हे पुणेकर यांनी सिद्ध केलं. चांगल्या घरची मंडळी कुटुंबासहित ‘लावणी शो’ पहायला नाट्यगृहात धडकू लागली आणि सारा माहोलच बदलला.

    सुरेखा पुणेकर यांची शिक्षण घेऊन चांगले करिअर करण्याची मनात इच्छा होती. मात्र, वडील कोंडिबा टाकळीकर यांचा तमाशाचा फड होता. वडिलांकडील कुणीही नातेवाईक तमाशात काम करत नव्हते. मात्र आई, आजी, मावशी, मावसबहीण आदी नातेवाइकांना तमाशात थिरकताना त्यांनी पाहिलेले होते. शाळेत जाण्याची इच्छा होती, मात्र वडिलांनी तमाशाच्या फडातच खरी शाळा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे १९८६ पासून आपण लावणी सादर करण्यास सुरुवात केली. ज्या गावी मुक्काम असायचा त्या गावात हॉटेल नसल्यामुळे ग्रामस्थांकडून ‘माधुकरी’ मागून जेवण आणले जात होते. घरातील गृहिणींचा मात्र जेवण देण्यास सक्त विरोध असायचा. १९९८ पर्यंत "नटरंगी नार' बदनामच होती. त्यामुळे महिलांच्या मनातील लावणीविषयी असलेली अश्लीलता काढण्याचा सुरेखा पुणेकर यांनी निश्चय केला. त्याचाच एक भाग म्हणून जून १९९८ मध्ये तमाशाच्या फडातून लावणी बाहेर काढून पहिल्यांदा मुंबईच्या थिएटरमध्ये त्यांनी आणली.

    यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील सादरीकरणानंतर हळूहळू पुण्याच्या ‘बालगंधर्व नाट्यगृहात’ ढोलकीची थाप अन् लावणीचे स्वर गुंजले. त्यानंतर महिलांसाठी पहिल्यांदा "नटरंगी नार' अभिजनवर्गाच्या पुण्यातील ‘बालगंधर्व’मध्येच सादर केली. त्या वेळी १५ हजार रुपयांचे बुकिंग झाले होते. सुरेखा पुणेकर यांनी नटरंगी नार या कार्यक्रमाचे आज पर्यंत साडेसात हजार प्रयोग केले आहेत. त्यापैकी शाळांच्या आर्थिक मदतीसाठी १५०० प्रयोग केले आहेत. मंदिराच्या जीर्णोधारासाठी त्यांनी हजार प्रयोग केले आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून जवळपास हजार प्रयोग केले आहेत. त्यातून अंध-अपंगांना मदत, तर झालीच, शिवाय रुग्णवाहिकाही रस्त्यावर धावत आहेत. फक्त महिलांसाठी म्हणून त्यांनी ६०० प्रयोग केले आहेत.

    सुरेखा पुणेकर यांनी अमेरिकेच्या मॅडिसन चौकातही लावणी सादर केली आहे. सुरेखा पुणेकर यांची पिकल्या पानाचा देठ कसा हिरवा, या रावजी बसा भावजी, कारभारी दमान ही गाणी खूप गाजली आहेत.

    नारायणगाव ते शिवाजी मंदिर ते अमेरिका हा माझ्या कलेचा प्रवास मोठा खडतर होता, पण तो सुकर झाला केवळ प्रेक्षकांमुळे व कलेवरच्या प्रेमामुळे,’ असे सुरेखा पुणेकर या एका मुलाखतीत म्हणतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गणितज्ञ गुरू लाभलेला इंजिनिअर कलाकार – चिन्मय कोल्हटकर

    चिन्मय कोल्हटकर हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या जगातील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि संगीतकार. पंडित बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, गानसरस्वती किशोरी आमोणकर या सारख्या दिग्गजांना हार्मोनियम वर साथ दिलेल्या व इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या चिन्मयने मी घेतलेल्या आपल्या मुलाखती मध्ये एक कलाकार त्याच्या इंजिनिअरिंग मधील कौशल्यांचा वापर करून आपल्या साधनेच्या जोरावर शास्त्रीय संगीतासारख्या क्षेत्रामध्ये आपले नाव कसे कमवू शकतो हे दाखवून दिले आहे.