(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे

    १९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले.

  • रजनीकांत

    रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.

  • अरविंद इनामदार

    अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला. नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर.

    नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होते, त्या वेळी नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील."

    त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ' नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुबंईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ' देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ' बॅरिस्टर की बीबी' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ' धुवादार' चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ' दुर्गा', नया संसार', ' कंगन', ' आझाद ' या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ' माली ' या हिंदी चित्रपटात आणि ' भक्तीचा मळा ' या मराठी चित्रपटात भूमिका दिली.

    'माल' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.

    त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असत' आणि १९६३ च्या ' फकिरा ' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या ' द गुरु ' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले ' की त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.' त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.

    नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ' कानून ' ह्या चित्रपटातील भुमीकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरची पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे त्यांना १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतहोत्सवानिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. नाना पळशीकरांनी कंगन, कुवारा बाप (१९४२) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी, कानून क्या करेगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.

    नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व फक्त ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.

    नाना पळशीकर यांचे २ जून १९८४ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

  • सीताराम कुंटे

    कुंटे, सीताराम

    सुबोधकुमारांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली. सुबोधकुमार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीबरोबरच कामगार संघटना व इतरांशीही सुबोधकुमार कायम फटकून वागले. कुंटे हेही कडक शिस्तीचे असले तरी सौम्य प्रकृतीचे मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

    राजकीय मंडळी आणि कामगार नेत्यांशी खेळीमेळीचे संबंध ठेवून गोड बोलून ते पालिकेत सौहार्दाचे वातावरण ठेवू शकतील. कुंटे हे १९८५ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी. राज्य शासनाच्या सेवेत ते तब्बल २६ वर्षे असून त्यांनी सांभाळलेल्या विविध पदांपैकी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गृहनिर्माण सचिव पदावरील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी गृहनिर्माणाच्या विविध योजना त्यांनी राबविल्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’ मधील सुधारणांसह गृहनिर्माणविषयक कायदे व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांसाठी त्यांनी भरीव काम केले. बिल्डरांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या गृहरचना संस्थांना जमिनीचीही मालकी मिळावी, यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ ची तरतूद करण्यामध्ये कुंटे यांचे योगदान आहे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुंटे यांनी लाला लजपतराय विधी महाविद्यालयातून २००६ ते २००९ या काळात कायद्याची पदवी मिळविली. ‘सिरक्यूस विद्यापीठा’अंतर्गत असलेल्या मॅक्सवेल स्कूलमधून त्यांनी ‘सिटिझनशिप अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्स’ विषयात प्रमाणपत्र मिळविले, ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठामधील स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्राबरोबरच प्रशासन, शासकीय धोरणे, विधी आदी बाबींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. महापालिकेत आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्याचा बराच उपयोग होईल. मुंबई महापालिकेत त्यांनी याआधी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. अर्थसंकल्पात पाणीपट्टीसह अन्य सेवांसाठी करवाढीचा बोजा टाकलेल्या मुंबईकर जनतेला ते कोणता दिलासा देतात, हे लवकरच दिसून येईल.

  • रघुवीर मुळगावकर

    प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली.

  • प्रभा राव

    महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक महिला नेत्यांनी आपल्या कार्याद्वारे स्वत:ची छाप पाडली, त्यात प्रभा राव याही होत्या. राजस्थानच्या राज्यपालपदी असलेल्या प्रभाताईंनी राज्य मंत्रिमंडळात सहकार, पर्यटन, सांस्कृतिक आणि महसूलसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली. अ. भा. काँग्रेस समितीच्या सरचिटणीस तर त्या पुढे झाल्याच, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षपदही त्यांनी दोनदा भूषविले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या भूमीत वाढलेल्या प्रभाताईंवर लहानपणापासूनच आधुनिक विचारांचे संस्कारही झाले.

    त्यांचे वडील गुलाबराव वसू हे वर्धा जिल्ह्याच्या सहकार चळवळीतील कार्यकर्ते होते. जातीपातीच्या पलीकडे पाहणारे हे घराणे होते. यामुळेच प्रभाताई व त्यांच्या बहिणीने त्या काळात केलेल्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा पाठिंबा होता. वर्धा जिल्ह्यात राजकारणाची सुरुवात करणाऱ्या प्रभाताईंना १९७२ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली, तेव्हा चंद्रशेखर, मोहन धारिया आदी तरुण तुर्काचा दबावगट काँग्रेसमध्ये जोरात होता. महाराष्ट्रात शरद पवार, उल्हासदादा पवार हे काँग्रेस फोरम फॉर सोशालिस्टद्वारे सक्रिय होते. या दबावगटांमुळेच अनेक तरुण कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली होती, प्रभा राव यांचा समावेश त्यातच होता. प्रभाताई प्रथम उपमंत्री, राज्यमंत्री, मग कॅबिनेट मंत्री झाल्या. इंदिरा, राजीव आणि सोनिया या गांधी घराण्यातील तीनही नेत्यांच्या त्या जवळच्या मानल्या जात. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. पराभवानंतर खचून न जाता इंदिरा गांधी यांनी देशभर दौरे सुरू केले, तेव्हा प्रभा राव प्रवासात त्यांच्याबरोबर होत्या. इंदिरा गांधी प्रवास करीत असलेली गाडी उत्तर प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर थांबताच, जमाव त्यांच्या बोगीवर चालून गेला. त्यावेळी प्रभाताई जमावाला सामोऱ्या गेल्या, त्यांना मारहाण झाली, पण जमाव इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. गांधी घराण्याशी एकनिष्ठ असल्या तरी चंद्रपूर येथील घटनेनंतर आपल्या पत्राची दखल इंदिरा गांधी यांनी घेतली नाही, म्हणून १९८० च्या सुमारास त्या काही काळ शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये गेल्या. खमक्या राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. यामुळेच राजीव गांधी यांनी हरयाणामध्ये भजनलाल यांना चाप लावण्यासाठी प्रभाताईंकडे हरयाणा काँग्रेसच्या प्रभारीपदाची सूत्रे दिली. आयाराम-गयारामांच्या राजकारणासाठी प्रसिद्ध असलेल्या भजनलाल यांना तिकीट वाटपात झुकते माप मिळू नये याची खबरदारी तर तेव्हा प्रभाताईंनी घेतलीच, पण हरयाणा, केरळ आदी राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता असताना काँग्रेसच्या त्या-त्या राज्यांच्या प्रभारी म्हणून नियुक्ती झालेल्या प्रभाताईंनी काँगेसची सत्ता आणण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. १९८५ मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता पुन्हा आल्यावर वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रिपदी फेरनिवड झाली. मात्र प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांची झालेली निवड दादांना रुचली नाही आणि त्यांनी तीन महिन्यांतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुढे २००४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आली असताना सोनिया गांधी यांनी प्रभा राव यांच्याकडे दुसऱ्यांदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपविले. २००४ ते २००८ अशी एकूण चार वर्षे त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद भूषविले. दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपदी आल्यावर विलासराव देशमुख यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला त्यांनी जेरीस आणले. काँग्रेस संघटनेचे काम करण्याची इच्छा असतानाही काँग्रेस नेतृत्वाने निवडणुकीच्या तोंडावर विलासरावांना मुक्त वाव देण्याच्या उद्देशाने प्रभाताईंची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानायचे त्यांचे धोरण असल्याने त्यांनी सिमल्याच्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त होण्याचा निर्णय घेतला. तरी सुरुवातीचा काही काळ त्यांचे महाराष्ट्राचे दौरे कमी झाले नव्हते. पुढे त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. खो-खो, अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या प्रभाताई संगीत क्षेत्राच्या जाणकार होत्या. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी २००७ मध्ये त्यांच्याकडे चालून आली होती, पण नशिबाचे फासे तेव्हा योग्य पडले नव्हते.

  • गोपीनाथ तळवलकर

    बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व “आनंद” मासिकाचे संपादकपद ३५ वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यांनी  प्रौढसाक्षरांसाठीही लिखाण केले.

  • डॉ. अमोल कोल्हे

    अमोल कोल्हे हे मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिकासृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते अभिनय क्षेत्रासोबत राजकारण क्षेत्रातही सक्रिय आहेत. सध्या ते खासदार पदावर कार्यरत आहेत.२०१९ , मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

  • ललकारचे नानासाहेब आपटे (यशवंत सीताराम आपटे)

    यशवंत सीताराम आपटे उर्फ नानासाहेब आपटे हे मुळचे साताऱ्याजवळील सायगावचे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १९०९ रोजी झाली. नानासाहेबांचे आईवडील प्लेगने गेले त्यामुळे पुण्यात आजोबांकडे आजोळी आले, शिक्षण पुण्यातच घेतले व पुणेकर झाले. नानासाहेब आपटे यांनी नोकरी कधीच केली नाही. पुण्यात बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातच डेक्कन जिमखान्यावर आज जिथे जिमखाना पोस्ट ऑफिस आहे त्याच्याच ओळीत एक दुकान घेऊन, स्टेशनरी सामानाचा व्यवसाय केला. नंतर ६०२ सदाशिव, या सदाशिव पेठ हौदाजवळच्या आपल्या राहण्याच्या ठिकाणी रस्त्यालगतच्या जागेत त्यांनी ‘रेकॉर्ड लायब्ररी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. तिथे हिंदी, मराठी रेकॉर्डस ऐकायला लोक यायचे. तिथे एका खोलीत बसून लोकांना आपल्या पसंतीची गाणी अल्पदरात ऐकायला मिळायची. त्या दुकानाच्या आतल्या बाजूला असलेल्या खोलीत रेडिओ-दुरुस्ती आणि विक्री ही कामे चालायची.

    नानासाहेब आपटे यांना असल्या गोष्टींसाठी लागणारे तंत्रज्ञानही न शिकता अवगत होते. १९४० च्या दशकात काही काळ मा.नानासाहेबानी अमेरिकन मोटारसायकलींची एजन्सी घेतली होती. त्यांनी ‘म्युझिक’ या नावाची एक रेकॉर्ड लायब्ररी १९४३-४४ च्या सुमारास साताऱ्यातपण उघडली होती. नानासाहेब आपटे उपक्रमशील असल्यामुळे त्याची झेप रेकॉर्ड लायब्ररीपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी सातारकरांसाठी साताऱ्यात बालगंधर्व, गजाननराव वाटवे, गोविंद कुरवाळीकर यासारख्या लोकप्रिय गायकांचे गाण्याचे कार्यक्रमही आयोजित केले होते. पुढे १९४२ मध्ये त्यांनी रेडीओची एजन्सी घेऊन त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी रेडीओ सर्व्हीसिंगचा अमेरिकन पोस्टल कोर्स त्या काळी केला. त्यांनी रेडीओच्या तंत्राचा अभ्यास करून “आकाशवाणी “ नावाचे पुस्तक १९५० साली लिहून प्रसिद्ध केले.

    दुसऱ्या महायुद्धामुळे रेडीओची आयात बंद झाल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भानुविलासमध्ये नाटकाचे वेळी आणि संभाजी उद्यानात मनोरंजनासाठी ग्रामोफोन रेकॉर्ड्स वाजवण्याचे कंत्राट घेतले व त्यातूनच रेकॉर्ड लायब्ररी आणि ध्वनिक्षेपण(लाउडस्पीकर) या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. त्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी कर्णे वापरले जात. नानासाहेबांनी त्यात बदल करून बॉक्स स्पीकर वापरात आणले. नानासाहेब आपटे हे तंत्रज्ञानाचे पाईक होते. ते काळाच्या पुढे दोन पावले असत.

    गजानन वाटवे, सुधीर फडके यांची व नानासाहेबांची रेकार्डसच्या निमित्ताने मैत्री होतीच, गजानन वाटवे, सुधीर फडके कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम नानासाहेबांना मिळू लागले. या व इतर कलाकाराकडून कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था नानांचीच उत्तम असा विश्वास त्यांनी मिळवला. यामुळे १९५२ मध्ये सवाई गंधर्व पुण्यतिथी ची व्यवस्था साहजिकच नानासाहेबांकडे आली त्यानंतर १९५४ मध्ये खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचे हस्ते झाले, या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम त्यांच्या कडे आले व हे अत्यंत मोठे आणि जबाबदारीचे काम यशस्वी झाले. त्यानंतर ललकारची पुण्यातील सास्कृंतिक क्षेत्रात घोड दौड सुरु झाली. साहजिकच पुणेकर नानासाहेबांना ललकार”चे नानासाहेब आपटे या नावाने ओळखू लागली.

    नानासाहेब आपटे यांना सर्वदूर लोकप्रियता आणि आर्थिक स्थैर्य दिले ते ध्वनिक्षेपण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे. त्यांच्या लाऊडस्पीकर्सच्या व्यवसायाचे ‘ललकार’ हे नाव जवळजवळ शिकागो या ध्वनिक्षेपण व्यवसायातील दुसऱ्या एका प्रसिद्ध नावाइतकेच गाजले. सवाई गंधर्व महोत्सव, सुधीर फडके यांचे गीत-रामायणाचे कार्यक्रम, भीमसेन, वसंतराव देशपांडे यांचे गायनाचे कार्यक्रम, मोठमोठे समारंभ, भाषणे, असे कित्येक कार्यक्रम ललकारने पुरवलेल्या ध्वनिक्षेपण सेवेच्या साह्य़ाने झाले आहेत. ललकार म्हणजे निर्दोष, समाधानकारक सेवा असे समीकरणच झाले होते. जसजशी मोठी कामे येऊ लागली त्याबरोबरीने अधिक चांगल्या कामाची अपेक्षा होऊ लागली. नानासाहेबांना माणसाबरोबर तांत्रिकतेची पण ओढ होती. नानांनी नवीन मोठ्या शक्तीचे अम्प्लीफायार्स वापरायला सुरवात केली.

    त्या बरोबरीने नवे मायक्रोफोन आणले. स्पीकर बॉक्सेस स्वतः बनवून घेत असत. त्यासाठी देवदार लाकूड वापरत. ते आपल्या सहकार्यांना ट्रेनींग देत असत. माईक सेट करताना वोल्युम कंट्रोल बंद करायची सवय सर्व ऑपरेटरना लावत असत. त्या काळी लाउड स्पीकर मधून शिट्या येणे हे नॉर्मल होते. प्रत्येक वेळी स्पीकरची व माईकची जागा याचा अंदाज घेऊनच सर्व व्यवस्था का करावी लागे की ज्यामुळे फीडब्याक/ शिट्या येणार नाहीत. पूर्वी एक /दोन माईक असले की पुरत पण मोठ्या कार्यक्रमासाठी ४/५ माईक लावणे, अवघड होते. अम्प्लीफायारला १/२ माईकचीच सोय असे. नानांनी ५ माईक लावता येणारे अम्प्लीफायार बनवून घेतले. राष्ट्रपती ,पंतप्रधान यांचे कार्यक्रमासाठी मुख्य वक्त्यासाठी २ माईक लागत. एकाच स्टॅडवर २ माईक त्यांनी एक आडवी पट्टी लावुन व्यवस्था केली आजही ती सर्वत्र वापरली जाते. त्या काळी पुण्यात नाटके मांडव वजा थेअटर मध्ये होत. संगीत नाटकांना व्यवस्था करताना अनेक क्लुप्त्या नानासाहेब वापरत.

    मंदारमाला मध्ये शेवटच्या जुगलबंदीच्या जलशात राम मराठे व प्रसाद सावकार यांचे समोर पानदानात माईक ठेवून अत्यंत उत्तम प्रकारे सर्वांना ऐकण्याची व्यवस्था होई. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या ठिकाणी वीज गेल्यावर लगेच बॅटरी वर स्पीकर चालू राहण्याची व्यवस्था करून नानासाहेबांनी सर्वांची व संयोजकाची वाहवा मिळवली होती. गीतरामायण गाताना बाबूजींना काटेकोर व्यवस्था लागे. माईक व दिवे यांची विशेष योजना नानासाहेब करुन देत. स्टीरीओ सिस्टीमचा पाया पुण्यात प्रथम नानासाहेबांनी महेशकुमार यांच्या ऑर्केस्ट्राचे वेळी घातला.

    बालगंधर्व रंगमंदिरात किशोरकुमार यांच्या कार्यक्रमाचे आधी त्यांनी स्वतः येऊन ट्रायल घेऊन ललकारला शाबासकी दिली होती. या व्यवसायामुळे नानासाहेब आपटे यांचे गायन, वादन आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी संबंध आला. त्याच्यापैकी अनेक जणांशी घरगुती संबंधही निर्माण झाले. संगीत नाटकासाठी गायक कॉर्डलेस माईकचा उपयोग हल्ली सर्वत्र केला जातो. नानासाहेबांच्या मनात हीच कल्पना १९६० पासून होती. पण त्या काळी तंत्रज्ञान इतके पुढारलेले नसल्याने ती त्यावेळी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. नानासाहेबांनी घातलेला तंत्र ज्ञानाचा पाया त्यांचे अनेक शिष्य आजही पुढे नेत आहेत.त्यात प्रामुख्याने श्री वामन रहाळकर, प्रदीप माळी,खांबे बंधू जॉन पाटोळे इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. ललकारच्या यशात दिग्गज कलाकार आणि रसिक यांच्या असलेल्या जिव्हाळ्या बरोबर नानासाहेबांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी आत्मसात केलेले तंत्रज्ञान पण तेवढेच महत्वाचे !!!

    नानासाहेब आपटे यांचे २० मार्च २००० साली निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NanasahebApte #YashwantSitaramApte