स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.
दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.
मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.
आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.
रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.
१९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.
नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.
राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.
दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.
दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.
#DattatrayPotnis
मराठी प्रायोगिक रंगभूमीचे जनक आणि बुजूर्ग नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी झाला.
दामोदर काशिनाथ केंकरे उर्फ दामू केंकरे यांनी तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा केली. दामू केंकरे हे मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. या दरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली. चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. त्यांनी हॅल्मेट या नाटकात हॅम्लेटची मुख्य भूमिकाही केली होती. वाजे पाऊल आपुले हे नाटक १९६७ साली दामू केंकरे यांच्या अभिनयाने गाजले होते.
अरविंद देशपांडे दिग्दर्शित तुघलक व बादल सरकार यांच्या सारी रात या नाटकाचे नेपथ्य दामू केंकरे यांनी केले होते. तुघलक व सारी रात या नाटकांच्या नेपथ्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काभराने सन्मानित करण्यात आले होते. 'सुर्याची पिले' या गाजलेल्या नाटकाने त्यांनी मराठी रंगभूमीला समृध्द करण्यात मोठे योगदान दिले.
दामू केंकरे यांचा गोवा कला अकादमीच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. दामू केंकरे यांनी डारेक्टर ऑफ कल्चरल अफेअर महाराष्ट्र राज्य म्हणून काही वेळ काम केले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांची जन्मशताब्दी २००२ मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी हा नाटय़ोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला. दामू केंकरे यांच्या निधनानंतर पासून हा महोत्सव दामू केंकरे यांच्या नावाने साजरा केला जातो.
दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. या नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर व दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे या दोघी बहिणी. ललिता केंकरे यांनीही नाटकातून काम केले. मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे त्यांचे चिरंजीव. गोवा हिंदू असोसीएशनने दामू केंकरे यांच्या वर “३ अंकी गुरुकुल” या नावाने गौरवग्रंथ लिहिला आहे.
दामू केंकरे यांचे २८ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.
#DamuKenkare
अवघे १५०० रुपये घेऊन १९९१ साली नाशिकमध्ये आलेले विराज लोमटे यांनी यशश्री ग्रुप या बांधकाम कंपनीची सुरुवात करून २० वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत मराठी पाऊल पडते पुढे हे दाखवून दिले आहे.
सांगली येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विराजने आई - वडिलांच्या आग्रहाखातर बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेतले. सांगलीसारख्या छोट्या शहरात कर्तृत्वाला संधी नाही म्हणून नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. आर्किटेक्ट जयंत देशमुख यांच्या कंपनीत दोन वर्षे नोकरी करून १९९४ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
पीडब्ल्यूडीमधील बांधकाम ठेकेदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक औद्योगिक इमारती, खासगी बंगलो व अनेक संस्थांच्या इमारती बांधल्या. स्वत:ची आवड म्हणून प्लॅनिंग करीत आर्किटेक्चरल फर्मही काढली. या फर्मला पहिल्याच वर्षी सांगली येथे वसंतदादा स्मारकाच्या डिझाइनसाठी पारितोषिकही मिळाले.
सांगली, नाशिक, शिर्डी, कोपरगांव, देवळाली, सटाणा, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, विविध बँका आदींच्या आर्किटेक्चरल पॅनलवर त्यांची संस्था काम करते आहे. शिर्डी येथील हॉटेल, नाशिक येथील बंगल्यांसाठी त्यांची डिझाइन्स वापरली जात आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅनही त्यांच्या संस्थेने बनविला आहे.
बांधकाम व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता व पारदर्शकता यामुळे यशश्री, भाग्यश्री, धनश्री, विजयश्री, श्रीगणेश, अपूर्वाई, गझल, धन्वंतरी, श्रीयोगेश्वर, श्रीसूर्यमाला हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उदघाटनापूर्वीच पूर्ण बुक होणारा त्र्यंबकचा श्रीवरद व पुण्याच्या डी. एस. के. समूहाबरोबर साकारण्यात येत असलेला सुवास्तू प्रकल्प हे त्यांच्या व्यवसायाच्या मानांकनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपताना पर्यावरण रक्षणासाठी ३०० वृक्षांचे रोपण व संगोपन, मोदक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. लघुउद्योग भारती या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मानद सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६० टक्के इतके मतदान घडविण्यासाठी नाशिक सिटीझन फोरमने राबविलेल्या मतदार जागृती अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
फडके, (डॉ.) अनंत
प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.
यशस्वी होण्याच्या सर्व संधी उपलब्ध असूनही काही वेडी माणसे ही चाकोरी सोडतातात आणि वेगळी वाट तयार करतात. किरण पुरंदरे अशांपैकीच एक आहेत.
पक्ष्यांचा आवाज
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आपल्या कलेच्या जोरावर मुंबईसारख्या कलेची पंढरी मानल्या जाणार्या मयानगरीच्या मुख्य प्रवाहात येणे, वाटते तितके सोपे नसते. अनेक कलावंतांचे ते केवळ स्वप्नच ठरले आहे. पण अनेक कलावंत आपले कर्तृत्व व नशीब यांच्या तारा जोडून तिथवर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत व मग कय विचारता त्यांच्या संपुर्ण आयुष्याचेच तिथे सुंदर व सुरमय असे गाणे झाले आहे.
अशा कलावंतांमध्ये बीडच्या संजीवनी बीडकर होत्या. त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले होते. परंतु त्यांच्याकडे अतिशय अप्रतिम व साक्षात नटराजाचे पृथ्वीवरील दर्शन घडविणारी अशी नृत्यकला होती. व्यक्तिमत्त्व आकर्षक होते.
महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी युरोपातील क्रांतीकारकांशी संफ साधून भारताबाहेर राहून सशस्त्र लढा देणारे क्रांतिकारक आणि प्रसिद्ध कृषितज्ज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पालकवाडी या गावी दि. ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपणापासूनच त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल ओढ होती.
भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला.
संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म २१ जून १८५६ रोजी झाला.
व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि “मराठी भाषेची घटना”, “मराठी शब्दसिद्धी” असे ग्रंथही लिहिले.
“अलंकार विवेक”, “बालबोध व्याकरण”, “मराठी पद्य वाचन” आदी भाषाभ्यासाची, तर “लग्नविधी आणि सोहळे”, “धर्म आणि नीतिपर व्याख्याने” ही समाजविषयक पुस्तके त्यांनी लिहिली.
७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांचे निधन झाले.
# Joshi, Ramchandra Bhikaji (Sr)
Copyright © 2025 | Marathisrushti