समाजाच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक त्याग करणाऱ्या, अतुलनीय धैर्य दाखविणाऱ्या, कठीण प्रसंगांना धाडसानं सामोरे जाणाऱ्या देशोदेशीच्या नागरिकांना ब्रिटीश महाराणीच्या नावाचा नागरी सन्मान देऊन गौरविण्याची प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली, त्याला आता जवळपास ९५ वर्षे होत आली आहेत. तेव्हाचे ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या नावाने १९१७ साली ही प्रथा सुरू केली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
यंदा यातला एक सन्मान मुंबईकर जॉन पिंटो यांना जाहीर झाला आहे. ज्ञात-अज्ञात मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे काम करणारी एक व्यवस्था ख्रिश्चन समाजामध्ये अस्तित्वात आहे. अंडरटेकर या नावाने ती परिचित आहे. जॉन पिंटो हे अशा प्रकारचं अंडरटेकिंगचे काम करणारे ख्रिश्चन समाजातलं एक समाजोन्मुख व्यक्तिमत्व. ९२-९३ सालातल्या दंगलकाळात अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठेच काम जॉन पिंटोंवर येऊन पडले, जे त्यांनी मनोभावे स्वीकारले आणि हातावेगळेही केले. जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या या सेवा उपक्रमाचे नाव.
बाबरी पतनानंतर मुंबई शहरातल्या भीषण दंगलीत हकनाक मारल्या गेलेल्या असंख्य निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे वा त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वाचे काम जॉन पिंटोंनी केले. संचारबंदी असण्याच्या त्या काळात ऑफिस उघडे ठेवण्याची आणि या अशा कामासाठी जीव धोक्यात घालून फिरण्याची मुभा पोलिसांनी दिली होती, ती फक्त त्यांच्याच संस्थेला.
पिंटो आणि त्यांची पत्नी एडना यांनी हा सेवा व्यवसाय सुरू केला तो जेकब सर्कलमधल्या एका अगदी छोटेखानी जागेत, तोही १९८१ च्या सुमारास. त्यांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे याबरोबरच मृतदेहाचे पावित्र्य राखत तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे काम पिंटोंची कंपनी करत असते. तीस वर्षांत भारतीय नागरिकांबरोबरच देशविदेशातील ज्या पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू भारतात घडले, त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम पिंटोंनी केले आहे. या व्यक्तींनी भारतात येताना आणलेलं सामान त्या मृतदेहांबरोबर पाठवणे शक्य नसते. अशा असंख्य व्यक्तींच्या सामानाची गाठोडी आजही पिंटोंच्या कार्यालयात निगुतीनं रचून ठेवली आहेत.
१५-१५, १६-१६ र्वष होऊनही त्यातल्या काही सामानाची विल्हेवाट अद्यापही पिंटोंनी लावलेली नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई महानगरावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मूठभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच शे-दीडशे निरपराध नागरिकांचे बळी घेतले. पिंटोंच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे जे काम केले ते अतुलनीयच होते. जवळजवळ ९५ टक्के मृतदेह एकटय़ा जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं उचलले. त्यातले काही परदेशी पाठवावे लागले. काहींची अवस्था इतकी भीषण होती, की ते तसेच्या तसे पाठवणं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना वाढवणे होते.
पिंटोंच्या सहकाऱ्यांना ती भीषणता घालवण्यासाठी काम करावे लागले. तब्बल पाच दिवस त्यांचे काम अथकपणे सुरू होते. ते मृतदेह ओळख पटविण्याजोग्या अवस्थेला आणून ठेवणे हे सोपे नव्हते. त्या कामाची दखल ब्रिटीश हायकमिशनने तर घेतलीच, पण अन्य अनेक देशांनीही त्या कामाचे मनमोकळे कौतुक केले. ज्या प्रकारचे काम पिंटो करतात, त्याच प्रकारचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्था वा यंत्रणा जगभर आहेत. अब्दुल सत्तार एढी यांचे एढी फाऊंडेशन पाकिस्तानमध्ये तसेच काम करते.
ब्रिटनच्या महाराणीनं दिलेल्या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ सन्मानाने त्या कामाला जगन्मान्यता मिळाली आहे, त्या कामाचा बहुमान झाला आहे. आता गरज आहे ती उशीरा का होईना भारत सरकारनं त्याची दखल घेण्याची. पिंटोंनी सन्मानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे.
August 5, 2017
श्री. उमेश इनामदार यांचा जन्म १९६० साली मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण मुंबई येथील पोद्दार हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पूर्ण केले.
December 7, 2011
जन्माने मराठी नसूनही महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलेल्या काही उद्योजकांपैकी एक नाव, श्री विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता.
October 8, 2010
निंबाळकर, वामन
‘शिका आणि संघटित व्हा,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्ह मानून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या पिढीला विद्रोहाचा हुंकार देण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील साठोत्तरी दशक उजाडले. या पिढीने विद्रोहाचा हुंकार दिला आणि साहित्य-समाजकारण-राजकारण अशा विविध क्षेत्रात मानवतावादी परिवर्तनाच्याही मशाली पेटल्या.
विद्रोहाचे धुमारे प्रज्वलित करणाऱ्या आघाडीवरील गटात वामन निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बुलढाणा जिल्ह्य़ातील लांजुळ येथे १३ मार्च १९४३ रोजी जन्मलेल्या वामन निंबाळकर नावाची मशाल आंबेडकरी प्रेरणांच्या अदृश्य इंधनावर अखेरच्या क्षणापर्यंत कोणतीही तडजोड न स्वीकारता तेवत राहिली. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर शिक्षण घेता-घेता त्यांच्या गावकुसाबाहेरच्या कवितांनी वेदनेचा आणि विद्रोहाचाही एक वेगळा हुंकार मराठी साहित्यात उमटवला. गावकुसाबाहेरची ती वेदना हा काही व्यक्तिगत अनुभव नव्हता तर ते एक विद्रोहाचे समूहगान होते. जाणिवा पक्व होण्याच्या त्या काळापासून ते परवा, अखेरचा श्वास घेईपर्यंत वामन निंबाळकर तीच वेदना, तोच हुंकार आणि तोच विद्रोह समंजस एकनिष्ठतेने व्यक्त करत राहिले. इतिहास आणि हिंदी या दोन विषयात एम.ए.ची पदवी घेतल्यावर आंबेडकरांची विचारधारा हीच त्यांची जीवननिष्ठा राहिली. याच विषयात त्यांनी एम.ए.ची तिसरी पदवी संपादन केली आणि मराठी कवितेतून घडणाऱ्या आंबेडकर दर्शनावर संशोधन करून पीएच.डी.ची सन्माननीय पदवी संपादन केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आंबेडकर विचारधारा विभागात १३ वर्ष विद्यादान केल्यावर आंबेडकर विचारांचा पूर्णवेळ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि अखेरच्या श्वासापर्यंत प्रचारकाची ही भूमिका अविरतपणे निभावलीही. प्रचारकाची भूमिका स्वीकारल्यावर त्यांनी कविता टोकदार केली तशीच स्वत:तला समीक्षकही जोपासला. या समीक्षकाने नवोन्मेषाचे अंकुर जोपासण्याची सर्जनशील आणि संवेदनशील भूमिका स्वीकारली. त्यामुळे मराठीत नवे कवी-लेखक मिळाले तसेच, मराठी साहित्यात तोवर अव्यक्त राहिलेल्या वेदनेची वेगवेगळी रूपेही उमटली. समीक्षकाच्या भूमिकेतून ते प्रकाशकाच्याही भूमिकेत शिरले आणि त्यांच्या प्रबोधन प्रकाशनाने अनेकांना प्रसिद्धीचा मार्ग दाखवला. साप्ताहिक ‘आजचे प्रबोधन’ आणि ‘परिचारक’ यातून संपादक म्हणून पत्रकाराचाही रोल निभावला. दिवसेंदिवस आणि वर्षोगणती त्यांच्या कवितेतला अनुभव विराट सामूहिक होत होता.
भारतात प्रत्येक माणसाची
एक जात असते
येथे आग लावणारी
ती हमखास वात असते
सामूहिक स्वप्नभंगाचे विशाल दु:खही ते अशा संयत शब्दात नेमकेपणाने व्यक्त करत होते. निंबाळकरांचे ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ नंतर ‘धर्मयुद्ध’ आणि ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कवितेसोबतच अन्य ठाशीव लेखनही ते अनेक वर्ष सातत्याने करत होते. हे नुसतेच लेखन नव्हते तर त्यातून नवी माहिती देण्याची निंबाळकरांची ओढ कशी तीव्र होती, यासाठी ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. आंबेडकर’ आणि प्रा.म.भि. चिटणीस समग्र वाङ्मयाचा आढावा घेणारा ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ या दोन ग्रंथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांना बंदिस्त करण्यात आलेल्या जात व धर्माच्या बंधनापलीकडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, हे आंबेडकरांवरील ग्रंथातून पुरेसे स्पष्ट होते. वामन निंबाळकर व्यक्ती न राहता ते एक संस्था झाले होते. मात्र, या संस्थेचे आपण सर्वेसर्वा आहोत, याचा भ्रम न बाळगता मनस्वीपणे वामन निंबाळकर संचार करत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातली या मनस्वी विद्रोहाची एक मशाल विझली आहे.
August 5, 2017
कॉंग्रेस पक्षातील ठाणे जिल्हा अध्यक्ष राहिलेल्या बाळकृष्ण पुर्णेकर यांचा लौकिक नेहमीच सामान्यांना सहज उपलब्ध होणारे, ठरविलेले काम पूर्ण करणे व सामाजिक संवादातून कल्पक विकासकार्य उभे करणे अशी ओळख पुर्णेकर यांनी मिळविली आहे. १९९७ पासून ठाणे जिल्ह्याचे युवाध्यक्ष पदापासून ते २०१४ पर्यंत ठाणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाच्या बळकटी करणासाठीचे त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे.
झेंडा मार्च असो वा काँग्रेस इतिहासाचा इव्हेंट, अशा महत्वाच्या प्रसंगाना त्यांचे संघटनगुण व व्यक्तित्वाच्या विविध छटा नेहमी अधोरेखित झाल्या आहेत. ठाणे शहराचे नागरीकरण अत्यंत वेगाने वाढीत असून त्या अनुषंगाने शहरी लोकांनामहत्वाच्या व मूलभूत ठरणार्या गोष्टी त्यांना मिळवून देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी शासनाकडे व ठाणे पालिकेकडे केलेला पाठपुरावा अत्यंत फलदायी ठरला आहे.
मध्यंतरीच्या काळात बाळकृष्ण पुर्णेकरांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणार्या विविध दाखल्यांसंदर्भात मोठा व भव्य उपक्रम राबवून हजारो नागरिकांना दाखले मिळवून दिले होते. युवकांचा मोठा रोजगार मेळावा आयोजित करुन तब्बल ८५० बेरोजगारांच्या मुलाखती घेवून त्यांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत; यावरुन त्यांच्यातल्या सामाजिक बांधिलकी व तळमळीची पुरेपूर साक्ष देते.
January 14, 2015
पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे.
August 16, 2011
प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला.
June 8, 2022
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे.
June 29, 2022
श्री विद्याधर अनास्कर व्यवसायाने कर सल्लागार आहेत. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत.
October 29, 2012
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
March 13, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti