(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • वसंत रामजी खानोलकर

  • ज्योती गवते

    मुंबईची स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपली विद्यार्थिनी ज्योती गवते ही पहिल्या क्रमांकाने विजेती ठरेल हे तिचे प्रशिक्षक रवि रासकटला यांनी सांगितले होते. काही वृत्तपत्रांनी त्यास तशी प्रसिद्धीही दिली होती. तथापि जेव्हा तिचा तिसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हा त्यांना, ज्योतीला धक्काच बसला. ज्या दोघी पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे जाहीर करण्यात आले, त्यांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केले होते.

    यामध्ये त्यांनी केलेली ती फसवणूक नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या या ‘यशा’वर शिक्कामोर्तब होते, तर जी योग्य मार्गाने यशस्वी झाली तिच्यावर अन्याय झाला असता. गेल्या वर्षी जी मुलगी अनवाणी पळली होती आणि तिला तेव्हा दुसरा क्रमांक मिळाला होता, ती ज्योती गवते या खेपेच्या मॅरॅथॉन स्पर्धेची विजेती ठरली आहे. यंदा तिला तीन तास पाच मिनिटे आणि तीस सेकंद एवढा वेळ लागला. रासकटला यांनी ती हे अंतर तीन तासातच पार करील, असे गृहित धरले होते. गवते ही परभणीची आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ज्योती खेळामध्ये करिअर करू इच्छित असली, तरी तिला लागणाऱ्या सुविधा पुरवू शकण्याची ऐपत त्या कुटुंबाकडे नाही. अशा स्थितीत तिची जिद्द तिला स्वस्थ बसू देईना. रासकटला यांनी तिला धीर दिला आणि एक पैसाही न घेता तिला प्रशिक्षण दिले. आपल्याला या यशापर्यंत जायचे आहे असे तिने मनाने ठरवले होते आणि ते तिला मिळाले. तिचा आत्मविश्वासच तिला यशाच्या या पायरीपर्यंत घेऊन गेला आहे. गेल्या वर्षी तिला यशाने हुलकावणी दिली होती, पण यंदा तिने मुंबई जिंकली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे ते आपण कधीही पाहात नाही, असे सांगणारी ज्योती हिची वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रवि रासकटला यांची भेट झाली आणि त्यांना तिच्यात असलेल्या ध्येयापर्यंत जाण्यायोग्य तडफ पाहायला मिळाली. चेहऱ्यावर दरिद्री परिस्थितीचे भान बाळगणारी ज्योतीने रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला प्रारंभ केला. ती रासकटला यांना २००३ मध्ये भेटली होती. त्यांनी तिच्या आई-वडिलांना तिच्यामध्ये असलेल्या गुणांची माहिती देऊन म्हटले, की तिला खेळात प्रावीण्य कमवू द्या. ज्योती पुढल्या वर्षी पदवीधर होईलसुद्धा. दोन दिवसांपूर्वी तिने मिळवलेल्या यशाची तयारी तिने गेल्या वर्षभरामध्ये केली होती. नाशिक जिल्ह्य़ातल्या कविता राऊतचा दरम्यान विक्रम तिने अनुभवला. एका आदिवासी समाजातून आलेली एक मुलगी जर राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धेत पदक मिळवू शकते, तर मग मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन आपल्याला त्या यशापर्यंत का जाता येणार नाही असा विचार तिने केला. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ती रोज सराव करते. तिचे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बँकेत शिपाई आहेत. घरच्या गरिबीची ज्योतीला चांगलीच जाणीव आहे, पण त्यावर मात करायची तर हे दिव्यही करायला हवे, असे तिने ठरवले आणि त्यानुसार तिने ते मिळवून दाखवले. गेल्या वर्षी तिने जिंकलेले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ३८ हजारांचे होते. त्या वेळचे ते पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. ज्योतीचे दोन्ही भाऊ शिकत आहेत. परभणीत ती ज्या घरात राहते ते घर अगदी छोटेसे आहे. सहजासहजी कुणाच्याही नजरेस न भरणारे आहे. अशा या स्थितीत तिने मिळवलेले यश हे देदीप्यमान आहे आणि आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्या दृष्टीने तिला अर्थातच अधिक मार्गदर्शनाचीही गरज भासणार आहे.

    -----------------------------------

    Aniket

    ज्योती गवते

    ज्योती गवतेचा जन्म परभणीमध्ये अत्यंत गरीब व हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितींमध्ये झाला. लहानपणापासून काटक व चपळ असल्यामूळे पळण्याची व विविध मैदानी खेळ लीलया खेळण्याची सवय तिला होती. धावण्याचे वेड, कसब व जिद्द या तिन्ही गोष्टी तिच्याजवळ मुबलक असल्या तरी आर्थिक चणचणींमूळे या क्रीडाप्रकाराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे तिला शक्य नव्हते. तिचे बाबा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु उत्तम शाडूच्या मातीला कलात्मकतेने आकार देवून तिला रेखीव गणरायाचे रूप देणारा शिल्पकार मिळावा, त्याप्रमाणे तिला कुठल्याही धनाची अपेक्षा न बाळगता, अस्सल व्यावसायिक प्रशिक्षण देणारे रवि रासकटला यांच्यासारखे गुरू मिळाले व तिच्या स्वप्नांची गाडी भरधाव सुटली. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तिने धावण्याचा कसून सराव केला. यावर्षीच्या मुंबईच्या स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवून तिने दैदिप्यमान यशाची नोंद केली. यंदा तिला हे अंतर पार करण्यासाठी केवळ तीन तास पाच मिनीटे एवढा वेळ लागला. गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिने रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी धावण्याची किमया केली होती व तरीदेखील द्वितीय क्रमांक पटकाविला होता. गेल्या वर्षी तिला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली, पण यंदा तिने मुंबई जिंकून दाखवली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे हे ती कधीही पाहात नाही, असे जेव्हा ती पत्रकारांना सांगते, तेव्हा तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास तिच्या आजवरच्या कठोर साधनेची व धावण्यावरील एकनिष्ठतेची प्रचिती देत असतो. धावण्याप्रमाणेच आभ्यासातही तिला गती असून पुढील वर्षी पदवीधर बनण्यासाठी तिची धावण्याच्या सरावाची कसरत सांभाळता सांभाळता, आभ्यासाची तयारीही जोरदार सुरू आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमूळे तिच्या कुटुंबियांना भरपूर आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या वर्षी तिने जिंकलेले पारितोषिक २ लाख ३८ हजार रूपयांचे होते. त्या वेळचे पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करीत आहे.

  • गोपाळ गणेश आगरकर

    बूद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक

  • महादेव काशीनाथ कारखानीस

    शिक्षणतज्ज्ञ, बालवाङ्मयकार महादेव काशीनाथ कारखानीस  यांनी शिक्षकांसाठी पुस्तके लिहिली होती.

  • मकरंद देशपांडे

    मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट रिस्क, डरना जरूरी है, हनन, एक से बढकर एक, स्वदेश, चमेली, विस्फोट, मकडी, लाल सलाम, रोड, प्यार दिवाना होता है, जंगल, घात, सरफरोश, सत्या, उडान, नाजायज, अंत, तडीपार, पहला नशा, सर इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला.

  • गीतकार दासू वैद्य

    दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 'दासू' ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.

    "आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो," असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी 'भारत सासणे यांच्या दीर्घकथा' तर पीएच.डी.साठी 'भारत सासणे यांचे साहित्य' हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत 'शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९' त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.

    १९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला 'तूर्तास' हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'मराठी कविता राजधानी पुरस्कार', बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

    विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत 'तूर्तास' या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या 'कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार', ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत 'चौघांच्या कविता' या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.

    दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. 'भुर्रर्र' या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून 'क-कवितेचा' या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या 'आसवं गाळती कासवं' या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या 'सुगम भारती' क्रमिक पाठ्यपुस्तकात 'पक्ष्यांना घर हवे' या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या 'वाळवी' या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.

    मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून 'एक लेखक लिहिणार आहे..' 'आम्हाला बांधायचय मंदिर..' या सारख्या एकांकिकांसाठी व 'च्यानल झीरो' या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, 'तूर्तास' या कविता संग्रहाचा तसेच 'देता आधार का करू अंधार' या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

    दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. 'बिनधास्त' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. 'भेट' या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व 'सावरखेड एक गांव' या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. 'सोनियाचा उंबरा' या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर 'पदरी आलं आभाळ'च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.

    'गाभ्रीचा पाऊस', 'खाली डोकं वरती पाय' तसेच 'तुकाराम', सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील 'पिंपळपान', 'टिकल ते पॉलिटिकल', 'एक होता राजा', 'आपली माणसं', 'रंग माझा वेगळा', 'घर श्रीमंताचं' इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर 'लेक वाचवा' अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DasuVaidya

  • सुरेशचंद्र नाडकर्णी

    नाडकर्णी, सुरेशचंद्र

    प्राणिशास्त्र हा आयुष्यभराचा अभ्यासाचा विषय. फक्त डॉक्टरेट मिळविण्याएवढाच या विषयाचा अभ्यास न करता ४० वर्षे विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याचे भाग्य लाभलेले डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे लौकिक जीवन मात्र त्यांच्या अन्य अनेक कलागुणांमुळे सतत नजरेसमोर राहिले.

    क्रीडा, संगीत, साहित्य आणि विज्ञान अशा क्षेत्रांत चौफेरपणे वावरणाऱ्या नाडकर्णी सरांचे निधन त्यामुळेच चटका लावणारे ठरले आहे. फारसी आणि उर्दूमिश्रित स्वरोच्चाराने समोरच्यावर सहजपणे छाप पाडणारे नाडकर्णी जेव्हा हिंदीतून बोलायला लागत, तेव्हा ते बहुधा पेशावरचे असावेत, असा समज व्हायचा. गजल हा जसा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय, तसाच संगीत! बेगम अख्तर या त्यांच्या गुरू आणि त्यांची ठुमरी हा त्यांचा श्वास! अख्तरबाईंवर ते बोलायला लागले की, श्रोताच हरखून जायचा. त्या वेळी हे गृहस्थ ‘सर्प’ या विषयावर तपश्चर्या करीत होते, यावर कुणाचा कसा विश्वास बसणार? प्राणिशास्त्रावर डॉ. नाडकर्णी यांची १०-१२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि क्रीडा ज्ञानकोशकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खो खो, कुस्ती, मल्लखांब, हॉकी, ब्रीज या खेळात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या नाडकर्णी सरांनी टेबल टेनिस या खेळात महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते. ज्ञानाची तहान भागली नाही म्हणजे जी तडफड होते, ती नाडकर्णी यांच्यामध्ये दिसत असे. वेगवेगळय़ा विषयांवर अक्षरश: प्रभुत्व असतानाही आणखी काही करण्याएवढी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून यायची, हे सगळय़ांना पडलेले कोडे असे. आकाशवाणीवर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्व. सुरेशबाबू माने यांच्यावर कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. मग अनेकांना भेटून त्यांचे ध्वनिमुद्रण मिळविले आणि एक सुरेख कार्यक्रम सादर केला.अशा कामांमध्ये त्यांना जो आनंद मिळत असे, तो त्यांच्यालेखी अवर्णनीय असे. बहुतेक सगळय़ा क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत असल्याने आणि अनेक भाषांवरही प्रभुत्व असल्याने अशा सगळय़ा खेळांसाठी ते निवेदनआणि समीक्षा करीत असत. ‘उर्दू काव्यातील देशप्रेम’ अशा विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवणाऱ्या नाडकर्णी सरांचे ‘गज़्‍ाल’ हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उर्दू मुशायरे आयोजित करण्याची त्यांची धडपड असे. या सगळय़ा व्यासंगावर मात म्हणून नाडकर्णी यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक याही विषयात विशेष अभ्यास केला. मानवाच्या पृथ्वीवरील उत्पत्तीसंबंधी नवीन शास्त्रीय विवेचन करणारे ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले. नॉस्ट्रेडेमस या भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा खटाटोपही नाडकर्णी यांनी केला. इतक्या सगळय़ा विषयांचा पसारा आपल्या आयुष्याला बांधणारा हा माणूस गप्पांच्या मैफलीत बादशहा न होता, तरच नवल! पण माणसांच्या गराडय़ात राहूनही स्वत:चा व्यासंग सतत वाढवीत नेणारा संशोधक आणि अभ्यासक म्हणून आपले स्थान त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांच्या निधनाने या सगळय़ाच विषयांमध्ये नव्याने प्रवेशणाऱ्यांचा एक फार मोठा आधार गेला आहे.

  • अरविंद पिळगावकर

    सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या.

  • डॉ. व्यंकटराव गडवाल

    वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्‍या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.

  • पं. तुळशीदास बोरकर

    पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते.