मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती.
हिंदी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रभावी वापर करणाऱ्या संगीतकार नौशाद, यांनी लहान वयात वाद्याचे दुकानात नोकरी करताना वादनात हुकमत मिळवली तेव्हा दुकानाच्या मालकांनी - गुरबत अलींनी तिथली एक उत्तम हार्मोनियम त्या मुलाला भेट दिली. हाच मुलगा पुढे ‘संगीतकार नौशाद अली’ म्हणून नावारूपाला आला!
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांवर सहज दृष्टिक्षेप टाकला तर दिसून येईल की, त्यांचे जवळपास प्रत्येक गाणे कोणत्या ना कोणत्या रागावर आधारित आहे. उदाहरणादाखल आपण ‘बैजू बावरा’मधली गाणी बघू. ‘मोहे भूल गये सावरिया..’ या गीतातील आर्त भाव आणि विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग भैरव वापरला. तर ‘तू गंगा की मौज मैं..’ला त्यांनी राग भैरवीची डूब दिली. ‘ओ दुनिया के रखवाले..’साठी त्यांनी भारदस्त अशा राग दरबारी कानडाचा वापर केला, तर ‘मन तडपत हरी दर्शन को आज..’मधली व्याकुळता व्यक्त करण्यासाठी राग मालकंसचे सूर वापरले. ‘दूर कोई गाये..’ हे लोकगीताचा बाज असलेले गीत त्यांनी राग देसमध्ये बांधले. ‘आज गावत मन मेरो झूम के..’ या तानसेन आणि बैजू यांच्या जुगलबंदीसाठी, देसी या गोड रागाचा वापर त्यांनी केला. ‘घनन घनन घन..’साठी राग मेघ, तर ‘बचपन की मुहब्बत को..’साठी त्यांनी राग मांड वापरला. ‘झूले में पवन की आयी बहार..’ या युगुलगीतावर त्यांनी राग बसंत पिलू या जोडरागाचा साज चढविला.
‘बैजू बावरा’चं संगीत प्रचंड लोकप्रिय ठरलं. १९५२ मध्ये नुकतीच ‘बिनाका गीतमाला’ सुरू झाली होती. ३ डिसेंबर १९५२ रोजी सादर झालेल्या ‘बिनाका’ कार्यक्रमात पहिलं वाजलेलं गीत होतं- ‘बैजू बावरा’मधील ‘तू गंगा की मौज मैं जमुना का धारा..’!
‘बैजू बावरा’नंतर १९६० मध्ये मोठय़ा थाटामाटात प्रदर्शित झालेल्या के. असिफच्या ‘मुघल-ए-आझम’चं संगीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यातील ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे..’ या ठुमरीसाठी त्यांनी राग ‘गारा’चा वापर केला. या गाण्याच्या म्युझिक पीसमध्ये केवळ एकच सतार वाजत नाही, तर अनेक सतारी झंकारतात. आणि लताबाईंच्या आवाजाबद्दल काय बोलावं! ‘कंकरिया मोहे मारी गगरिया फोर डाली..’नंतरची छोटीशी तान त्या इतकी सुरेख घेतात, की पुन:पुन्हा ती ऐकत राहावी. ‘ये दिल की लगी कम क्या होगी..’ हे ‘मुघल-ए-आझम’मधील आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गाणं! जयजयवंती रागातील या गाण्याचा प्रत्येक अंतरा वेगळ्या चालीत आहे. ‘बेकस पे करम कीजिए..’मधली आर्तता त्यांनी राग केदारच्या सुरांतून साकारलीय, तर ‘खुदा मेहेरबाँ हो तुम्हारा..’साठी यमन! नौशादजींनी संगीतबद्ध केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे..’ या ‘कोहिनूर’मधील राजदरबारातल्या गीतासाठी त्यांनी राग हमीर या जोशपूर्ण रागाचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटातलं ‘सावन आये या न आये..’ हे युगुलगीत त्यांनी राग वृंदावनी सारंगमध्ये बांधलं, तर ‘कोई सागर दिल को..’ या गाण्यातली उद्विग्नता व्यक्त करण्यासाठी त्यांनी राग कलावतीचा वापर केला. ‘दिल दिया दर्द लिया..’साठी सदाबहार अशा यमनची सुरावट त्यांनी वापरली.
मारवा हा खरं तर हुरहूर लावणाऱ्या कातरवेळेचा राग. पण ‘साज और आवाज’मधील ‘पायलिया बावरी..’ हे सुंदर नृत्यगीत मारव्यामध्ये त्यांनी छान खुलवलंय. याच चित्रपटातलं ‘साज हो तुम आवाज हूँ..’ हे रफीसाहेबांनी गायलेलं आणखी एक सुंदर गीत पियानोच्या सुरात सुरू होतं. त्रितालात बांधलेलं हे गाणं राग पटदीपमध्ये आहे. पण ‘प्रेम तराना रंग पे आया..’ या दुसऱ्या अंतऱ्यात सुरावट बदलते, आणि ती मधुवंती-काफीच्या अंगाने पुढे जात पुन्हा पटदीपमध्ये येते. चित्रपटाचे शीर्षकच ‘साज और आवाज’ असल्याने यातल्या गाण्यांत नौशादसाहेबांनी जवळजवळ सर्व वाद्यांचा बहारदार वापर केलेला आहे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘रतन’, ‘अंदाज’, ‘दीदार’, ‘उडन खटोला’, ‘गंगा जमुना’, ‘कोहिनूर’, ‘मेरे मेहबूब’, ‘साज और आवाज’, ‘बैजू बावरा’, ‘मदर इंडिया’ आणि ‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटांतली सगळीच्या सगळी गाणी हिट् झाली. उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद आमीर खाँ आणि पं. डी. व्ही. पलुस्कर या शास्त्रीय संगीतातल्या दिग्गज गायकांकडून चित्रपटांसाठी गाऊन घेण्याची किमया नौशादजींनी ‘बैजू बावरा’ आणि ‘मुघल-ए-आझम’मध्ये करून दाखविली. नौशादजींनी चित्रपट संगीतकारास प्रतिष्ठा मिळवून दिली. ते उत्कृष्ट पियानिस्ट होते. पाश्चात्य स्वरांचंही त्यांना उत्तम ज्ञान होतं. ते वापरत असलेल्या प्रत्येक वाद्याची त्यांना सखोल माहिती होती. कोणत्या म्युझिक पीससाठी कोणतं वाद्य उचित ठरेल, हे त्यांना अचूक समजे. १९४९ मध्ये पडद्यावर आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातील नायक दिलीपकुमार ‘तू कहे अगर जीवनभर..’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे..’, ‘झूम झूम के नाचों आज..’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना..’ ही चारही गाणी पियानोवर बसून म्हणतो.
जन्म : २५ डिसेंबर १९१९
मृत्यू : ५ मे २००६
-- अनिल सांबरे
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
संगीतकार व गायक शंकर महादेवन यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला. केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली.
संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. मा.अटलबिहारी वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.
आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या ,मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेय सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील २०४४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानानातर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट / भा.ज.प
अटल बिहारी यांची कविता आओ फिर से दिया जलाएँ
आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अंधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें-
बुझी हुई बाती सुलगाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ
हम पड़ाव को समझे मंज़िल
लक्ष्य हुआ आंखों से ओझल
वतर्मान के मोहजाल में-
आने वाला कल न भुलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ।
आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज़्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएँ।
आओ फिर से दिया जलाएँ
बाहुबली चित्रपटात देवसेनाची भूमिका करणारी अनुष्का ही रियल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनुष्का शेट्टी हे साऊथ सिने इंडस्ट्रीतील एक मोठं नाव असून तिकडे ती टॉपची हिरोईन आहे. इतकेच नाहीतर सिनेमासाठी पैसे घेण्याबाबतीतही ती साऊथमधील सर्व अभिनेत्रांच्या कितीतरी पुढे आहे.
तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला.
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले.
इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात आले की हवामानात जसजसे बदल होतात तसतसा हवेतील दाबही चढतो व उतरतो; सहसा दाबात घट झाल्यास वादळ येण्याचा संभव असतो. वातावरणातील आर्द्रतेचे मापन करणारे यंत्र अर्थात आर्द्रतामापक १६६४ साली तयार करण्यात आले. मग १७१४ साली डॅनियल फॅरनहाइट यांनी पाऱ्याचा तापमापक शोधून काढला. या उपकरणाच्या साहाय्याने अचूक तापमान मोजणे शक्य झाले.
आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचे १६ सप्टेंबर १७३६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विष्णुदास भावे यांचे संपूर्ण नाव विष्णु अमृत भावे. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८१९ रोजी झाला. सांगली संस्थानाचे श्रीमंत चितांमणराव ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन ह्यांच्या खाजगीकडे ते नोकर होते. कथा-कविता लिहिण्याचा नाद विष्णूदासांना होता.
१८४२ मध्ये कर्नाटकातून 'भागवत' नावाची एक नाटकमंडळी सांगलीत आली होती. तिचे खेळ पाहिल्यानंतर तशा प्रकारचे नाट्यप्रयोग काही सुधारणा करून मराठीत केले, तर त्यांचे चांगले स्वागत होईल, अशी कल्पना आप्पासाहेबांच्या मनात आली व हे काम त्यांनी विष्णुदासांवर सोपविले. त्यांची आज्ञा प्रमाण मानून १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक `सीता स्वयंवर' नाटकाचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी कानडी नाट्यपरंपरेत आवश्यक तेथे बदल केले.
भाव्यांनी स्वत:च नवीन पदाची रचना केली. `सीता स्वयंवर आणि अहिल्योध्दार` आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथेच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानुसार विष्णुदासांनी १८४३ मध्येसीतास्वयंवर ह्या स्वतःच रचिलेल्या नाटकाचा यशस्वी प्रयोग करून दाखविला. त्यानंतर रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. तेही लोकप्रिय झाले.
सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नचहर्त्या गजाननाचे स्त वन, सरस्व्तीस्त्वन, गजानन व सरस्वती ह्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ, अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. नाटकाच्या आरंभापासून त्याची अखेर होईपर्यंत सूत्रधारास काम असे. सादर होणाऱ्या नाट्यप्रसंगांचे वर्णन सूत्रधाराने पद्यातून केल्यानंतर संबंधित पात्रे रंगभूमीवर येवून आपापली भाषणे करीत. सर्वच भाषणे आधी लिहीलेली नसत.
नट स्वयंस्फूर्तीनेही तेथल्या तेथे प्रसंगोचित भाषणे करीत. नृत्य-गायनाला ह्या नाटकांतून बराच वाव दिला जाई. नाटकातील प्रवेशाला 'कचेरी' असे नाव दिलेले होते. भावे ह्यांनी पुढेमहाभारतातील कथानकांवरही नाटके लिहिली. विष्णुदास नाटकांत पखवाजाची साथ प्रमुख असे. नाट्यप्रसंगाला अनुकूल असे कोमल, गंभीर वा तीव्र असे बोल पखवाजावर वाजविले जात असत. ह्या पखवाजाच्या आवाजावरून ह्या नाटकांना ' तागडथोम नाटके ' असे म्हटले जाई. तसेच त्यांतील राक्षसांच्या 'अलल् डुर्र' अशा डरकाळीमुळे ' अलल् डुर्र ' नाटके असे त्यांना संबोधिले जात असे.
५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदासांनी `सीता स्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटार्याचत पडून राहिल्या होत्या व भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीनचार संहिता उपलब्ध आहेत.
विष्णुदास भावे यांनी तयार केलेल्या आणि आता जीर्ण झालेल्या कळसूत्री बाहुलीचे रुप प्रख्यात रंगभूषाकार प्रभाकर भावे यांनी बदलले असून ती बाहुली सांगलीच्या विष्णुदास भावे रंगमंदिरात कायमस्वरुपी जतन करण्यात आली आहे. द्रौपदी स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे असून या कठपुतळ्या लाकडी असल्यातरी अतिशय हलक्या होत्या. रेखीव आकार, प्रमाणबध्दता असून त्या चाकावर बसविलेल्या होत्या. त्या लोंखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोही प्रकारे खेळवता येत. भावे ह्यांची नाटके बरीचशी पद्यमय होती आणि त्यांचील पद्यरचनेचे, प्राचीन मराठी आख्यानकरचनेशी निकटचे नाते होते. त्यांच्या नाटकांसाठी त्यांनी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख ' नाट्याख्याने ' असाही करण्यात येतो. विष्णुदासी नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत.
भावे ह्यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह १८८५ साली प्रसिद्ध झालेली आहेत. विष्णुदासांच्या ह्या नाट्याख्यानांना स्वरसाज चढविताना विविध रागरागिण्यांचा आणि त्यांच्या मिश्रणांचा विष्णुदासांनी प्रभावीपणे उपयोग करून घेतला होता. विष्णुदासांच्या नंतरच्या ५०-६० वर्षांत मराठी पौराणिक नाटके लिहिणाऱ्यांना विष्णुदासांनी निर्माण केलेला पौराणिक नाटकाचा साचा उपयोगी पडला. इतकेच नव्हे, तर विष्णुदासकृत पदांचा उपयोगही काही नाटककारांनी आपल्या नाटकांतून केल्याचे दिसते. नाट्यप्रयोगाची एक निश्चित संकल्पना समोर ठेवून नाटक सादर करणारी पहिली नाटकमंडळी महाराष्ट्रात विष्णुदासांनी उभी केली.
विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. चिंतामणराव पटवर्धनांचे निधन झाल्यावर (१८५१) विष्णुदासांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे त्यांना नाट्यप्रयोगासाठी गावोगावी दौरे काढावे लागले.
नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इ. सर्व काही विष्णुदास स्वतःच असत. १८४३ साली मुंबईच्या दौर्याापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुदासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरु केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करुन १८५१ ते १८६२ सालापर्यत एकूण सात दौरे केले. १४ फेब्रुवारी १८५३ रोजी प्रथमच वृत्तपत्रातून जाहिराती आल्या.
मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच गोपीचंद या हिंदी नाटकाचा प्रयोग १९५४ मध्ये झाला. त्यामुळे मराठी बरोबरच हिंदी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदासांचे नाव झाले. या विष्णुदास भावे यांनी एकूण ५२ नाटके लिहिली. यांची सर्व नाटके पौराणिक होती. हा काळ धर्मप्रबाल्याचा असल्याने ते स्वाभाविक होते. नाटक मंडळीत पुढे १८६२ सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला. पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटकमंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळींनी विष्णूदास भावे यांच्या पध्दतीची नाटकांची परंपरा १९१० सालापर्यत चालू ठेवली.
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती विष्णुदास भावे पुरस्कार दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाच्या दिवशी देते. १९५९ मध्ये बालगंधर्वांना सर्वप्रथम हा पुरस्कार देण्यात आला होता. या वर्षीचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात आला. विष्णुदास भावे यांचे ९ ऑगस्ट १९०१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / रणजीत कुलकर्णी
उद्योग जगातला संत रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम.
सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच ‘टाटायन’!
रतन टाटा यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्टा होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.
आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले.
आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती.
रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्यांा वरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली, मा.रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती.
कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते.
१९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव.
याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले. जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वर्ष निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.
रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणेही बंद केले. हे करत असतांना मा.रतन टाटा यांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.
राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उपेंद्र चिंचोरे यांनी ज्येष्ठ गायिका मालती पांडे – बर्वे यांची सांगितलेली आठवण.
'सुगंध त्याचा लपेल कां "? … ज्येष्ठ गायिका मालती पांडे - बर्वे ह्यांच्या सहवासातील सुगंधित आठवणी :आज १९ एप्रिल त्यांची जयंती
माझ्या लहानपणी रेडिओ हे मनोरंजनाचे मोठे आकर्षण होते ! त्याकाळी आम्ही रहात असलेल्या वाड्यामध्ये सर्वात आधी म्हणजे आमच्या घरी मर्फी कंपनीचा रेडिओ आला. माझ्या आईमुळे मलाही गाण्याची आवड लागली !
मालती पांडे ह्यांची पहिली ओळख झाली, ती त्यांनी गायिलेल्या सुमधुर गाण्यातून, कवी श्रीनिवास खारकर ह्यांची रचना, गजानन वाटावे ह्यांच्या संगीतामध्ये मालती पांडे ह्यांनी गायिलेले गाणे - उठ जानकी मंगल घटिका, आली आनंदाची, ग. दि. माडगूळकरांचे - सुधीर फडके ह्यांची सुरावट असलेले - त्या तिथे पलीकडे, माझिया प्रियेचे झोपडे, मधुकर पाठक ह्यांनी स्वरबद्ध केलेलं, अनिल भारतींच गाणं - खेड्यामधले घर कौलारू, मधुकर पाठक आणि अनिल भारती ह्या द्वयींच - पाहिजेस तू जवळी, राजा बढे ह्यांच्या काव्याला, श्रीनिवास खळे ह्यांचं संगीत लाभलेलं - कशी रे तुला भेटू ? गीतरामायणातील आज मी शापमुक्त झाले, कोण तू कुठला राजकुमार ? ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी मालती पांडे हे नांव खूप मोठ्ठ झालं होतं !
गाणं एकदा ऐकलं ,की ते चालीसकट माझं तोंडपाठ होत असे. वहीमध्ये गाणं उतरवून ठेवायची मला सवय लागली, ती तेव्हांपासून, गाणही लगेच पाठ व्हायचं ! माझ्या आईचं ऐकून मी ही गाणं म्हणायचो. तो आनंद काही वेगळाच होता !
मालती पांडे - बर्वे ह्यांची नि माझी पहिली भेट झाली, तो प्रसंग मोठा गमतीचा आहे, ऐका, अकरा जून १९८२ चा तो दिवस होता. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मालतीबाईंची आणि माझी ओळख कॉलेजमध्ये होईल ! होय, पण झालं अगदी तसंच ! पुण्याच्या कर्वे रोडवरील एम ई एस गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मी नोकरी करीत होतो. दहावीचा बोर्डाचा निकाल लागला होता आणि अकरावीच्या प्रवेशाचे काम चालू होते. अकरा जूनला सकाळी ऑफिसमध्ये प्रवेशाचे काम सुरु असतांना, माझं लक्ष कार्यालयाच्या दारावर खिळले, अन् मी बघतच राहिलो, माझ्या शेजारीच बसलेल्या सहक-याला - श्री शाळीग्राम ह्याना म्हणालो, "अरे ते बघ, कॉलेजमध्ये मालती पांडे आल्यात". ते म्हणाले, "कसं शक्यय, त्या कशाला इथं येतील, तुला सगळीकडे गाण्यातली लोकं दिसतात".
"अरे हो, नक्की मालती पांडेच आहेत त्या, थांब मी बोलून येतो" , असं म्हणून मी दाराजवळ उभ्या असलेल्या मालती पांडे ह्यांचे जवळ गेलो आणि त्यांना म्हणालो, "नमस्कार, अहो आपण इथं कश्या आलात ? कुणाच्या प्रवेशाला ?" मालती पांडे माझ्या प्रश्नाला उत्तरल्या, "अहो माझ्या मुलाच्या - राजूच्या प्रवेशासाठी आलेय" !
"अहो मालतीबाई मी आपल्याला एका झटक्यात ओळखले, अन् त्यांना म्हणालो, आपण आत या, बसा इथं ! राजू जवळची कागदपत्रं मी तपासली, प्रवेशाची बाकीची प्रक्रिया सुरु होती, त्या पटकन मला म्हणाल्या, "तुम्ही कसं काय मला ओळखलं ?" "अहो, मला गाण्याची खूप आवड आहे, आपण गायिलेली गाणीसुद्धा मला आवडतात, इतकंच नाही तर आपलीही गाणी माझी तोंडपाठ आहेत"! त्यावर त्या म्हणाल्या, "कसं शक्यय, आता खूप काळ लोटलाय, हा लता आशाचा जामानाय …. " त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, मी पटकन माझ्या आवडीचं त्यांचं गाणं तिथेच तोंडपाठ म्हणलो - गद्यात …।
लपविलास तू हिरवा चाफा,
सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?
जवळ मने पण दूर शरीरे । नयन लाजरे, चेहरे हसरे
लपविलेस तू जाणून सारे । रंग गालिचा छपेल का ?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे । उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे । घडल्यावाचुन चुकेल का ?
पुरे बहाणे गंभिर होणे । चोरा, तुझिया मनी चांदणे
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे । केली चोरी छपेल का ?
माझं गद्य संपलं तेव्हां मालतीबाई माझ्याकडे बघतच राहिल्या, "वा छान वाटलं, आजही माझे रसिक मला लक्षात ठेवतात", त्यांच्या चेहे-यावरचा आनंद लपत नव्हता. राजूच्या प्रवेशाचे काम तर केव्हांच झालं होतं, त्या घरी जायला निघाल्या तेव्हांच त्यांनी मला घरी यायचं आमंत्रण दिलं !
ऑगस्ट १९८२ मधील अशीच एक हृद्य आठवण ! माझी आई वैदेही भजनी मंडळात जायची ! ते मंडळ दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करायचे. कालिंदी केसकर, भार्गवराम आचरेकर, जयराम शिलेदार, जयमाला शिलेदार असे मातब्बर कलावंत त्या मंडळाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. मी आईला म्हणालो, "अगं मालती पांडे ह्यांना विचारू कां?" मी फोन करून मालतीबाईंच्या घरी गेलो, त्यांनी त्यांचे पती - शास्त्रीय गायक, मा. पं पद्माकर बर्वे ह्यांचीही ओळख करून दिली. मी भीत भीत मालतीबाईंना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकाराल कां, असं विचारलं आणि काय आनंद झाला म्हणून सांगू, त्यांनी मला तत्काळ होकार भरला. "फक्त एकच करा, मला तिथं गायचा आग्रह करू नका, बाकी माझी मी वेळेवर येते, तुमचं काम चालू ठेवा "! इति मालती पांडे - बर्वे …
पुण्यातील नारायण पेठेतील कन्याशाळेच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम २७ ऑगस्ट रोजी झाला होता ! कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती, मालतीबाई साडेतीन वाजताच हजर ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचपदीने सुरुवात झाली, थोडा वेळ होताच, मालतीबाई मला म्हणाल्या, "चिंचोरे, मी तुम्हाला आधी नाही म्हणले खरं, पण काळी पाचचा तंबोरा मिळेल कां ? मीही म्हणीन काही…। "
मी पटकन उठलो आणि कन्याशाळे समोरच्याच वाड्यात दुस-या मजल्यावरील एका घरात गेलो, तिथं पिता-पुत्रीचा गाण्याचा रियाज सुरु होता. मला बघून, गात असलेली ती सुकन्या आणि तिचे गुरु म्हणाले, "या, या चिंचोरे सर". मी त्यांना सांगितले, "अहो, समोर कन्याशाळेच्या हॉलमध्ये चक्क मालतीबाई पांडे आल्यात, त्या काळी पाचचा तंबोरा मागतायत", … माझं बोलणं संपत न संपत तोच ते गानगुरू म्हणाले, "अरे वा, हा तर खूपच चांगला योग चालून आलाय, चला लगेच, आम्ही दोघंही त्यांच्या साथीला बसतो", असं म्हणून दोन तंबो-यांसह ते दोघेही माझ्याबरोबर कार्यक्रमस्थळी आले. मालतीबाई त्यांना बघताच म्हणाल्या, "कर्वे साहेब काय छान योग जुळून आलाय"… होय, ते गानगुरु होते, आकाशवाणीचे ए ग्रेड कलावंत पंडित मोहनबुवा कर्वे आणि त्यांची सुकन्या म्हणजे मंजिरी कर्वे होय, आत्ताची मंजिरी कर्वे - आलेगावकर ! झालं, कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगविला तो मालतीबाईंनी, कर्वेबुवा आणि मंजिरीच्या साथीने ! इथं अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो, तो म्हणजे, माझ्या आपुलकीच्या स्वभावामुळे मालतीबाईंनी कार्यक्रमाचे मानधन घेतले नव्हते !
एरवीही मी त्यांच्याकडे जाऊ लागलो, माझ्या छंदाबद्दल त्या उत्सुकतेने बोलत असत. गप्पांच्या ओघात, एकदा त्या म्हणाल्या, "मालती-माधव" चित्रपटातील रेकॉर्डिंगसाठी लताबाई पुण्यात प्रभात कंपनीत आल्या होत्या, तेव्हां आमची ओळख झाली होती, आतामध्ये खूप गॅप पडली, त्या खूप मोठ्या आहेत, आता ओळखणारही नाहीत"… मालतीबाईंचं बोलणं मध्येच थांबवत मी म्हणालो, " नाही, मालतीबाई, दीदींची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, त्या अजूनही तुम्ही समोर गेल्यावर तपशीलवार आठवण सांगतील". त्यावर मालतीबाई म्हणाल्या, "अहो चिंचोरे, कसं शक्यय ?"
चोवीस एप्रिल १९८७ ह्या दिवसाची एक आठवण मुद्दाम सांगतो, ऐका, मास्टर दीनानांथांची पुण्यतिथी त्या दिवशी, पुण्यातील सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या मैदानावर संपन्न झाली होती. प्रतिष्ठानचा पुरस्कार सोहळा पहिल्या सत्रात झाला तर दुस-यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम होता. पहिलं सत्र संपलं आणि पुढच्याची तयारी सुरु होती, त्या मधल्या वेळात, मी चटकन, श्रोतृवृंदामध्ये मालतीबाई जिथं बसल्या होत्या तिथं गेलो अन् त्यांना म्हणालो, "चला मालतीबाई, दीदींना भेटा", त्या म्हणाल्या "अहो नको, त्या ओळखणार नाहीत, खूप वर्ष झाली," चला, चला लवकर, पुढचा कार्यक्रम सुरु होण्याआधी भेटा". झालं मालतीबाईंना घेऊन, मी लतादीदी जिथं बसल्या होत्या, तिथं आलो, मी दीदींना म्हणालो, "दीदी, बघा तुम्हांला भेटायला कोण आलंय"? दिदींनी डावीकडे मागे वळून पाहिलं मात्र आणि पटकन म्हणाल्या, " वा वा मालतीबाई या या," असं म्हणून त्यांनी मालतीबाईंना आपल्याशेजारी बसवलं अन् पुढं बोलू लागल्या, "आपण खूप वर्षांनी भेटत आहोत, आपण प्रभात फिल्म कंपनीच्या, मालतीमाधवच्या रेकॉर्डिंगला भेटलो होतो, इतकंच काय, मी मुंबईला जाण्यापूर्वी तुमच्या रूमवर आले होते, आपण कॉफी घेतली होती …।" दीदी जुन्या आठवणीत रमल्या होत्या, बोलत होत्या आणि मालतीबाई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या… "अहो, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे," मालतीबाई उत्तरल्या…
दुस-या दिवशी सकाळीच मालतीबाईंचा आनंदाने मला फोन आला, म्हणाल्या, "कालचा क्षण मी कधीच विसरू शकणार नाही"।
मालतीबाईंच्या प्रत्येक जन्मदिवसाला - एकोणीस एप्रिलला शुभेच्छा देणारा फोन मी करायचो ! मात्र, २७ डिसेंबर १९९७ नंतर तसा फोन करण्याची संधी नियतीने हिरावून घेतली होती. नंतर एकोणीस एप्रिलला मालतीबाईंची "जयंती" असं म्हणू लागलो. दिवस गेले, वर्षही गेली, तरीही त्यांच्याच गाण्याच्या ओळीत म्हणावसं वाटतं 'सुगंध त्याचा लपेल कां "? …।
-- उपेंद्र चिंचोरे
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti