(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी प्रमोद व्यंकटेश महाजन

    पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली.

  • कॉमन मॅन’चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण

    कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२४ रोजी म्हैसूर येथे झाला.

    रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांनी 'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. कॉमन मॅन हे त्यांचे गाजलेले व्यंगचित्र. कॉमनमॅन या व्यंगचित्रामुळेच व्यंगचित्रकार म्हणून त्यांची देशभर ओळख निर्माण झाली. मा.रा. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की कॉमन मॅन पुतळाचा एक पूर्णाकृती पुतळाही पुण्यात "सिंबायोसिस' कॉलेजमध्ये बनविण्यात आला आहे. त्यांच्या निवडक व्यंगचित्रांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्‌स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच 'मालगुडी डेज' या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी हिटलर, मुसोनिली, नेहरू, गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींची व्यंगचित्रे काढली होती. महात्मा गांधीपासून अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधीपर्यंत राजकीय व्यक्तींच्या अनेक पिढया त्यांनी रेखाटल्या आहेत. एका साध्या रेषेतून या नेत्याचे व्यक्तिवैशिष्ट्य स्पष्ट करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केलेल्या या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले.

    “यू सेड इट” नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये एक सदर सुरू केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नव्हती. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच मराठावाडा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सन्माननीय पदवी दिली होती. आर. के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याच पुस्तकाचे ’लक्ष्मणरेषा’ नावाने मराठीत अनुवाद करण्यात आला आहे.

    आर. के. लक्ष्मण यांचे २६ जानेवारी २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
    आयडल अवर्सआर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) द टनेल ऑफ टाईम (आत्मचरित्र; मराठीत -लक्ष्मणरेषा) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
    आत्मचरित्र
    आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.

  • अभिनेत्री रिंकू राजगुरू

    अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.

    ‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने 'आर्ची'ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.

    अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.

    रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • मराठी अभिनेते यशोधन बाळ

    यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते.

  • शास्त्रीय गायिका गिरिजादेवी

    धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जाते आणि गुरू म्हणूनही ज्यांची कारकीर्द भरीव आहे, त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला.वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मदानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले. १९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा ‌देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जातो. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणतात्त, 'आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. 'इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.' मा.गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करतात. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची आहे. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात. ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ आहे. लय-तालाचा जाणीवपूर्वक वापर आहे. बोलबनावात खेचकाम आहे. बोल-बाँटची बांधणी वैविध्यपूर्ण आहे. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असते- संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेतात. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजते. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करतात. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गातात.

    पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या आहेत, अजूनही गातात. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या आहेत. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटते, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले आहे. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलतात. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणतात की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही. गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. आजही त्या शिकवतात. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले आहे. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करताहेत. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जातो. आपल्या शिष्यांना त्या सांगतात घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे. त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या मा. शुभा जोशी, मा. धनश्री पंडित राय, मा.अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सेनानी महाराणी ताराराणी

    महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.

    २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.

    १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. पण ताराबाई व इतर लोक मोघल सेनापती जुल्फिखान यांच्या तावडीत सापडले पण जुल्फिखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०० रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यु झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सुत्रे ताराराणीच्या हाती आली.ताराराणीच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ,उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव,कान्होजी आंग्रे आदि मात्तबर सेनानी होते.त्यांनी मोघलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. १७०५ साली त्यांनी मोघलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून पन्हाळा ही राजधानी बनविली.

    छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

    वास्तविक १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार छत्रपती शाहू महाराजांकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि नंतरच्या काळात मोगलांच्या कैदेत होते. महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले. १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी शाहूंची सुटका करताना ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. औरंगजेबच्या मृत्युनंतर शाहूंची मोघलांच्या कैदेतून सुटका झाली.

    शाहू सुटल्यानंतर ताराराणी व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला.१२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूचा विजय झाला. अशारीतीने ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.शाहूच्या पक्षातील बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण,चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदि सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी साताऱ्या ला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली. १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. सरतेशेवटी वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.

    मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराराणी व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे निधन झाले.

    पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराराणीची कैदेतून सुटका झाली.त्यानंतर ताराराणी सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराराणींचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.

    कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
    दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।। रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले. ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.

    सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर

    प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म २४ जुन १८९७ रोजी गुजराथ मधील भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी झाला. पंडित ओंकारनाथ ठाकुर हे ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रसिद्ध गायक होते. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींचे बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होते. ओंकारनाथ ठाकूर यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे नानासाहेब पेशवे व महाराणी जमनाबाई यांचे पदरी शुर वीर लढवय्ये होते. परंतू, 'अलोनीबाबा' नावाच्या एका योग्याच्या सानिध्यात आल्यानंतर गौरीशंकरांचे जीवनविषयक सार पुर्णपणे बदलले. त्यामूळे त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ 'ओम' अथवा प्रणव साधनेत खर्च करण्यात घालवला. ह्याच सुमारास त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाल्याने त्यांनी त्याचे नाव 'ओंकारनाथ' ठेवले. जरी गौरीशंकरांनी आपले आयुष्यांत घर उभारणीला मदत केली तरी त्यांचे मन सतत प्रणव साधनेत होतं. त्यामूळे झवेरबांना नेहेमीच प्रतारणा, घृणा व अपमानाला सामोरं जावं लागल. गौरीशंकरांच्या मोठ्या भावाने झवेरबांना खुप त्रास दिला. शेवटी मोठ्या दिराने झवेरबां व ह्या ४ छोट्या लहानग्यांना एक दिवस कठोरपणाने सगळे कपडे व दागदागिने घेऊन घराबाहेर काढले. पण झवेरबां अतिशय कष्टाळु, मानसिकरित्या भक्कम व संतुलित होत्या. त्यांनी धुणी-भांडी करण्याची चार कामं लगेच धरली. मुलं मोठी होत होती. सगळच विपरित असताना त्यांनी कधी हिंमत सोडली नाही आणि कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. आईचा धीरोदात्त स्वभाव, अतिशय प्रखर स्वाभिमान ह्यांचा ओंकारनाथजींच्या मनावर व व्यक्तिमत्वावर चांगलाच खोल ठसा उमटलेला होता.
    ओंकारनाथजींनी मोजक्या कलाकरांसारखंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पण बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. आयुष्यातल्या अतिशय कठोर शिस्तीशिवाय ओंकारनाथजी स्वतः रोज भरपूर व्यायाम करायचे. अन्न वाया घालवण्याच्या ते एकदम विरोधात होते. त्यांच्या व्यायाम प्रकारात ते सुर्यनमस्कार, पोहोणे याशिवाय 'गामा' ह्या त्यावेळच्या नावाजलेल्या मल्लाकडुन ते मल्लविद्याही शिकलेले होते. त्यांच्या पन्नाशीनंतरही त्यांनी हा व्यायाम चालू ठेवला होता. आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रणव साधना, धर्माबद्दल आस्था व संकटाना तोंड देण्याची वॄत्ती ह्या सगळ्या गोष्टी व वडिलांपुढे जाऊन 'नाद-उपासना' किंवा अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती हे ओंकारनाथजींमध्ये ओतप्रोत भरलेली होती. जेव्हा गौरीशंकरांनी संन्यास घेतला तेव्हा ओंकारनाथजींची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झालेली. एकीकडे आपली कष्टाळू आई जिच्याबद्दल त्यांना प्रेम व चिंता होती तर दुसरीकडे नर्मदेच्या काठावर संन्यासी वडिल ज्यांच्याबद्दल ओंकारनाथांना अतिव आदर होता.
    अशाच तरुण वयात ओंकारनाथांनी स्वयंपाक शिकुन घेतला व एका वकिलाच्या घरी आचारी म्हणून काम करू लागले. असं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं कारण आईच्या एकटीच्या पगारावर घर चालेना. हे सगळं करताना त्यांची खुप दमछाक होई. एकीकडे नर्मदेच्या काठावर वडिलांची झोपडी साफ करावी, त्यांना पाण्याचे हंडे भरून द्यावेत, त्यांची व्यवस्था लावावी व नंतर ४-५ मैल पळत जाऊन कामाला लागावं व स्वयंपाक करावा. मंडळी, आज हे सगळं लिहीताना हात थरथर कापताहेत आणि डोळ्यांत आसवांनी घर केलय. ज्यांनी हे भोगलय त्यांनाच ते कळणार.
    हे सगळं करत असताना ओंकारनाथजींनी एका मिलमधे मील कामगार म्हणूनही काम केलं. तेथेही मिल मालक ह्या छान दिसण्यार्यां, कष्टाळू व हुशार मुलाकडे इतका आकॄष्ट झाला की त्याला वाटलं की ह्या मुलाला आपण दत्तक घ्यावं. परंतु ओंकारनाथजींच्या वडिलांनी हे साफ धुडकावून लावलं व म्हणाले की 'माझ्या मुलाला साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे. तिच्या जोरावर तो पैसा, प्रसिद्धी मिळवेल. पण कोणा श्रीमंताच्या घराचा दत्तक मुलगा म्हणुन नाही'.
    ओंकारनाथजी नेहेमी सांगायचे की त्यांच्या वडिलांकडे बर्यादच गुढ विद्या होत्या. त्या आधारे त्यांनी आपला मृत्यू बराच आधी सांगितला होता. १९१० साली आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या लाड्क्या मुलाला ओंकारनाथजींना जवळ बोलावून त्यांच्या जीभेवर अतिशय दुर्मिळ व अमुल्य मंत्र लिहीलेला होता.
    याच्या बरीच वर्ष असलेलं ओंकारनाथजींच संगीत प्रेम उफळुन आलेलं होतं. अश्याच वेळी एक दानशूर व्यक्ती शेठ शहापुरजी डूंगाजी मंचेरजी त्यांच्यासाठी देवदुतासारखे ऊभे राहिले. शेठजींनी ओंकारनाथजींना मुंबईच्या पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळवुन दिला. हा क्षण ओंकारनाथजींच्या आयुष्यातला सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. ह्याच वेळेस ओंकारनाथजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पंडितजींच्या प्रेमळ मार्गदर्शन व तालीम ह्यांनी ओंकारनाथजींच एका उत्कृष्ट संगीतकारात रूपांतर झालं. त्या ६ वर्षांच्या काळात ओंकारनाथजींनी एका अस्सल एकनिष्ठ शिष्याप्रमाणे गुरुची सेवा करून गुरुकडुन सगळी संगीत विद्या मिळविली. पलुस्करांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की जेव्हा पलुस्करांनी लाहोरमधे गांधर्व महाविद्यालय चालु केलं तेव्हा ओंकारनाथजींना त्यांनी मुख्याध्यापक केलं. तेव्हा ओंकारनाथजींच वय अवघ २० वर्ष होतं. त्यावेळेस ओंकारनाथजींचा दिवस काहीसा असा असायचा, ६ तास झोप, १८ तास विद्यालयात स्वतःचा रियाझ व विद्यार्थांना शिक्षण. ते अतिशय शिस्तबद्ध व सात्त्विक आयुष्य जगले. १९१७ साली जेव्हा बडोद्याला संगीत परीक्षक म्हणुन पाठवले गेले तेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व दिवाण मोनुभाईंवर त्यांची चांगलीच छाप पडलेली होती. त्याच साली त्यांना अतिशय प्रसिद्ध जालंधरच्या श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाण्याचं आमंत्रणही मिळालेलं. त्याकाळी श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाणं गायला मिळणं ही एक अतिशय पर्वणी असे. अनेक मोठे मोठे कलाकार तिथे आपली कला सादर करीत. असं म्हटल जातं की त्यावर्षी तरूण ओंकारनाथजी व वयोवृद्ध भास्करबुवा बखले यांनी अशी काय मैफल सजवली की लोकांनी दागदागिने व धनसंपत्तीची खैरात दोघांवर केली. ह्या सगळ्या गोष्टींमधे जवळजवळ २५ वर्षे ओंकारनाथजींनी श्रीरामाचे 'रामचरित मानस' चे वाचन, मनन व अभ्यास रोज नियमित चालू ठेवला होता. त्याचबरोबर व्यायाम व आपल्या गुरुप्रमाणे रामधुन व रामनाम संकिर्तन चालू ठेवलं होतं. १९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
    ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुसकरांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
    आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी 'तोडी' गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ' हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..'. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
    ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना 'निलांबरी' राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की 'इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.' केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की 'माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार'. केवढी ही निष्ठा...
    पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे 'संगीत निकेतन' चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) 'डिन' म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ओंकारनाथ ठाकूर यांना १९५५ साली 'पद्मश्री', 'संगीत प्रभाकर' , - पं मदनमोहन मालवीय, 'संगीत मार्तंड' - कलकत्ता संस्कृत महाविद्यालय - १९४०, 'संगीत महामहोदय' - नेपाळ नरेश - १९४० असे अनेक पुरस्कार मिळाले. पं.ओंकारनाथ ठाकूर यांचे २९ डिसेंबर १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    पं.ओंकारनाथ ठाकूर यांचे गायन
    https://www.youtube.com/watch?v=gApWs6LO0Ww
    https://www.youtube.com/watch?v=aZ1Hx69hlSk
    पं.ओंकारनाथ ठाकूर यांनी १५ ऑगस्ट १९४७ साली गायलेले वंदेमातरम
    https://www.youtube.com/watch?v=-5BJSmf-a74

  • बॉलीवूडच्या जेष्ठ अभिनेत्री श्यामा

    श्यामा यांचे खरे नाव खुर्शीद अख्तर असे होते. निर्देशक विजय भट्ट यांनी ते नाव बदलून श्यामा हे नाव ठवले. श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये काम केले होते.

    श्यामा यांचा जन्म ७ जून १९३५ रोजी लाहोर येथे झाला होता. १९५३ साली त्यांनी दिग्दर्शक फली मिस्त्री यांच्याशी लग्न केले. १९५० आणि १९६० च्या दशकात श्यामा या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. . ‘आर पार’, ‘बरसात की रात’ आणि ‘तराना’ या चित्रपटांसाठी श्यामा यांना आजही ओळखले जाते.

    श्यामा यांनी सावन भादो, दिल दिया दर्द लिया, मिलन, शारदा या चित्रपटातही अभिनय केला होता. शारदा चित्रपटासाठी त्यांना सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

    श्यामा यांची गाणी 'ऐ दिल मुझे बता दे', 'ओ चांद जहां वो जाए', 'ऐ लो मैं हारी पिया', 'देखो वो चांद छुप के करता है क्या इशारे', 'जा रे कारे बदला' खूप प्रसिद्ध झाली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठीतील रुबाबदार नायक अरुण सरनाईक

    हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.

    अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्याात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं.

    प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलोअर' मिळाला. आजच्या पिढीला कदाचित अरुण सरनाईक हे नाव तेवढे अवगत नसेल पण ७०-८० च्या दशकात अरुण सरनाईक हे मराठीतील सुपरस्टार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला.

    त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता.

    "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन' मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यनक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वेगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट