देविका राणी चौधरी हे देविका राणी यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला. रवींद्रनाथ टागोरांच्या भगिनी सुकुमारीदेवी या त्यांच्या आजी. देविका राणी जेव्हा लंडनमध्ये स्थापत्यशास्त्र शिकत होत्या तेव्हा त्यांचा परिचय तेथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशु रॉय यांच्याशी झाला. हिमांशु रॉय यांना नाटक आणि चित्रपटांत अतिशय रस होता. त्यांनी देविका राणीला आपल्या 'लाइट ऑफ एशिया' या चित्रपटाच्या नेपथ्यासाठी बोलावले. नंतर त्यांनी लंडनमध्ये असतानाच देविका राणींना घेऊन 'करमा' नावाचा हिंदी-इंग्रजी चित्रपट बनवला. तो प्रदर्शित झाल्यावर 'स्टार लंडन'च्या समीक्षकाने लिहिले होते की, "देविका राणी यांचे सौंदर्य आणि इंग्रजीचे उच्चारण याला चित्रपटसृष्टीत तोड नाही". नंतर हिमांशु रॉय देविका राणीला घेऊन जर्मनीत गेले आणि त्यांनी तिथे रंगमंचांवर भूमिका केल्या. पुढे लग्नही केले. लंडन आणि बर्लिन येथे नाव मिळवल्यावर हिमांशु रॉय मुंबईत आले. लंडनहून चित्रपटाच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या हिमांशु रॉय, राजनारायण दुबे आणि देविका राणी यांनी १९३४ मध्ये "बॉंबे टॉकिज' या संस्थेची स्थापना केली. बॉंबे टॉकिजच्या मुंबईतल्या स्टुडिओत चित्रपट निर्मितीसह ध्वनिमुद्रण, संकलन, कपडेपट, यासह सर्व सुविधा होत्या. या संस्थेच्या तिन्ही संस्थापकांनी चित्रपट हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, याचे भान कायम ठेवून सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. त्या काळात चित्रपटात चांगली कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या घरातल्या मुलींनी चित्रपटात काम करणे हे सामाजिक अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. गरीब घरातल्या गरजू मुली अभिनेत्रीचे काम करीत. पण त्यांच्याबद्दलही समाजात चर्चा होत असे. मुलांना तर चित्रपट पहायला परवानगीच नव्हती. अशा काळात बॉंबे टॉकिजने चित्रपटसृष्टीला वैभव मिळवून दिले. चित्रपटाबद्दलची जनतेची नजरही बदलून टाकली. प्रेक्षक वर्ग चित्रपटांकडे वळवला. देविका राणी या संस्थेच्या चित्रपटात भूमिका करीत. नंतर त्यांनी हिमांशु रॉय यांच्याशी विवाह केला. "बॉंबे टॉकिज' ही संस्था फक्त चित्रपट निर्मितीचा स्टुडिओ नव्हता. या संस्थेने हिंदी आणि अन्य भाषातल्या चित्रपटसृष्टीला शेकडो कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री दिल्या. दिलीपकुमार, देवआनंद, केदार शर्मा, सत्यजित रे यांच्यासह अनेक दिग्गजांचा चित्रपटसृष्टीतला प्रवेश याच संस्थेत झाला. या संस्थेत सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ हे मासिक वेतनावर काम करीत असत. हिमांशु रॉय आणि राजनारायण दुबे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या कर्तबगारीने आणि दर्जेदार चित्रपट निर्मितीने प्रतिष्ठा मिळवून दिली. अछूत कन्या, बंधन, किस्मत, हम सब एक हैं, जिद्दी यासह सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती याच संस्थेत झाली. अशोक कुमार यांची भूमिका असलेला "किस्मत' हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. मुंबईतल्या एकाच चित्रपटगृहात सलग ३५० दिवस तो चालला होता. त्या संस्थेत शशधर मुकर्जींचे नातेवाईक अशोक कुमार गांगुली, फिल्म लॅबॉरेटरीत काम करीत होते. सन १९३३ मध्ये प्रदर्शित झालेल्या कर्मा या चित्रपटात अभिनेत्री देविका राणी व अभिनेता हिमांशू राय यांनी चार मिनिटांचे चुंबनाचे दृष्य दिले होते. (खऱ्या खुऱ्या आयुष्यात ते पती-पत्नी होते). हे हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले चुंबन दृश्य असावे. मा.देविका राणींनी सुचवल्यामुळे हिमांशु रॉय यांनी अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अछूत कन्या' नावाचा हिंदी चित्रपट १९३६ मध्ये केला. ब्राम्हण तरुण आणि हरिजन युवती यांची कथा असलेला हा चित्रपट अतिशय गाजला. त्या वेळी हिमांशु रॉय यांचा मुख्य तंत्रज्ञ जर्मन होता. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्या तंत्रभारत सोडून जावे लागले. त्यामुळे हिमांशु रॉय यांना आपले अर्धवट राहिलेले चित्रपट पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली. त्यांतच त्यांचा अकाली मृत्यू झाला आणि सर्व जबाबदारी देविका राणींवर पडली. संस्थेचे भागीदार शशधर मुखर्जी यांनी, हिमांशु रॉय यांचे समाज प्रबोधन विषयांवरील चित्रपट करण्याचे धोरण बदलून गल्लाभरू चित्रपट करण्याचे ठरवले. हे देविका राणींना आवडले नाही, त्यांनी चित्रपट संस्थेतून आपली भागीदारी काढून घेतली. त्यांनी पुढे रशियन चित्रकार सोव्हित्सलाव्ह रोरिच यांच्याशी विवाह केला आणि ते दोघे बंगलोरमध्ये स्थायिक झाले. १९७० साली देविका राणींना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पहिलाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. देविका राणी यांचे ८ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.कारण महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती.
१९२६ साला पासून या स्टॅन लॉरेल व हार्डी जोडीनी खरी धमाल सुरू केली. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता.
राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.
कल्पवृक्ष कन्येसाठी, गंगा यमुना डोळ्यात उभ्या कां?, लिंबलोण उतरता, जिथे सागरा धरणी मिळते, सप्तपदी ही रोज चालते, रिमझिम पाउस पडे सारखा, घट डोईवर, अशा एकसे एक सुंदर गाण्यांचे जनक म्हणजे नामवंत गीतकार म्हणजे कवी पी. सावळाराम. त्यांचा जन्म ४ जुलै १९१४ रोजी झाला.
पी.सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती रावजी पाटील. पी.सावळाराम यांना शालेय वयापासूनच काव्याची गोडी लागली होती. पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला महाविद्यालयात दाखल झाले, तेथे त्यांना तिथे शिक्षक लाभले, ते थोर कवी माधव ज्युलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन तेथेच ह्या सर्जनशील मनाच्या पी.सावळाराम यांची काव्यकळा फुलू लागली. त्यांच्या संपर्कात ते आले, तेव्हा त्यांनी ‘सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली ‘काळा गुलाब’ शीर्षकाची कविता लिहिली. ही कविता तेव्हा कॉलेजमधल्या वर्णाने काळी, परंतु दिसायला सुंदर असलेल्या एका मुलीवर लिहिली होती.
पी.सावळारामांपाशी विलक्षण प्रतिभा होती. पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. महाविद्यालयीन शिक्षण झालेले निवृत्ती पाटील, ठाणे येथे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरीसाठी रुजू झाले. काव्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नव्हती. एच. एम.व्ही. कंपनीच्या वसंत कामेरकरांनी पाटलांना संधी दिली आणि ह्या पी.सावळाराम यांची गट्टी जमली ती संगीतकार वसंत प्रभू ह्यांच्याशी. त्यांची पहिली दोन गाणी प्रसिद्ध झाली, निवृत्ती पाटील ह्या नावाने, पण त्याचवेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर निवृत्ती पाटील नावाचेच बासरीवादक कलाकार होते, ह्या नामसाधर्म्यातुन त्यांना बाहेर यायचे होते, त्यावेळी पी. सावळाराम ह्यांचे एक मित्र उपयोगाला आले. ते मित्र होते, विधानसभेचे माजी अध्यक्ष वि. स. पागे होय. तर ह्या पागे यांना, ह. ना. आपटे ह्यांच्या त्यावेळी गाजत असलेल्या, "उषःकाल" ह्या कादंबरीमधील "सावळ्या" ह्या व्यक्तिरेखेने भारावून टाकले होते. पागे ह्यांना, आपला मित्र निवृत्ती पाटील ह्याच्या व्यक्तिरेखेत ह्या "सावळ्या"चे साधर्म्य जाणवायचे. ते निवृत्ती पाटील ह्यांना "सावळ्या" नावाने हाकारायचे. झाले. अशा रीतीने निवृत्ती पाटील ह्यांनी आपले "पी.सावळाराम" हे नाव धारण केले.
पंढरपूरला बडव्यांचे असलेले वर्चस्व पाहिल्यावर ‘पंढरीनाथा झडकरी आता। पंढरी सोडुनि चला। विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत त्यांनी लिहिले. १९४९ साली ‘राघु बोले मैनेच्या कानात ग’ हे पहिले गीत त्यांनी लिहिले. वसंत प्रभू, माधव शिंदे व दिनकर पाटील हे त्यांचे स्नेही होते. मराठी चित्रपटांचा तो ऐन बहराचा काळ होता. जिथे चित्रपटगृहे होती, तिथे प्रदर्शित होणाऱ्या बऱ्याच चित्रपटांतून पी. सावळारामांची गाणी असायची. सर्वसामान्य लोकांपर्यंत ती अशी थेटपणे पोहोचली होती. परंतु पी. सावळाराम यांच्या गीतांचा संग्रह फार उशिरा म्हणजे १९९१ साली कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्ध झाला. पण त्याआधी कित्येक वर्षे तुकारामांच्या अभंगांप्रमाणे सावळारामांची गीते लोकांच्या मनात आणि कंठात कायमची बसली होती. त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. १९६४-६५ साली ते ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. येऊर पाणी योजना आणि ड्रेनेज सिस्टमसंबंधी त्यांनी विशेषत्वाने लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्या. शिक्षकांच्या पगारात त्यांच्याच काळात वाढ झाली. ६३-६४ साली ते शिक्षण समितीचे सभासदही राहिले. ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजच्या स्थापनेत इतरांबरोबर त्यांचाही सहभाग होता. त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेने या कॉलेजने ‘पी. सावळाराम गौरवग्रंथ’ प्रकाशित केला.
पी. सावळाराम यांची गीते अशी लोकमानसात त्यांचा ठेवा म्हणून स्थिरावली आहेत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांच्या अभंग व ओव्यांना हे भाग्य लाभले होते. अलीकडल्या काळात ग. दि. माडगूळकर यांच्या बरोबरीने कवी पी. सावळाराम यांना ते लाभले. या अर्थाने ते ‘जनकवी’ आहेत.
‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गीतातील भावना लग्न होऊन सासरी जाणाऱ्या कुणाही मुलीच्या आईच्या आहेत. आपल्याला दुरावणार म्हटल्यावर होणारे दु:ख अतिशय अल्पाक्षरी, पण अर्थपूर्ण शब्दांत त्यांनी साक्षात् उभे केले आहे. म्हणूनच त्यातली भावना कुणा एका ‘क्ष’ आईची न उरता कुणाही आईची असू शकते. त्यांच्या गीताच्या या सामर्थ्यांमुळेच ते महाराष्ट्रात अजरामर झाले आहेत.
‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘सखू आली पंढरपुरा’ ही गीते. ती लोकभाषेला सहजपणे जवळ जाणारी आणि तिच्यातील नादमाधुर्य टिपणारी आहे. पण त्याचबरोबर एखादी लावणी लिहिताना ते लावणीचा म्हणून जो ठसका असतो, तिथे नायिकेची प्रेमासंबंधातली जी धिटाई असते ती ते नेमक्या शब्दांमध्ये टिपतात. उदाहरणार्थ, ‘काल रातीला सपान पडलं’ किंवा ‘तुला बघून पदर माझा पडला’ या त्यांच्या लावण्या पाहाव्यात.
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. मा.पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे..‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे. सावळारामांनी गद्यलेखनही केले. आकाशवाणीच्या ‘कामगार सभे’साठी ‘सहज सुचलं म्हणून’ कार्यक्रमात त्यांनी संहितालेखन केले.
‘माणसाला पंख असतात’ या चित्रपटाचे लेखन, ‘माणसा आधी हो माणूस’ व ‘मंगल कलश’ हे लघुपट व एस. टी.वर ‘सारे प्रवासी घडीचे’ हे वार्तापत्र त्यांनी लिहिले. याशिवाय त्यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’, ‘नांदायला जाते’, ‘कन्यादान’, ‘सलामी’ आणि ‘बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मा.पी. सावळाराम यांचे २१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले.
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले.
आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली.
एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते.
उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले. १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तर'मधून मिळाली. या सिनेमातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत. मा.उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
Copyright © 2025 | Marathisrushti