पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $ 15,000 रोख दिले जातात.
निरंजन उजगरे यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४९ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे शिक्षण मुबंईत झाले. ते व्ही.जे.टी.आय मधून मेकॅनिकल इंजिनीअर झाले . त्यांनी वयाच्या ९ व्या वर्षी पहिली कविता लिहिली. त्यांना हा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला असावा कारण त्यांचे आजोबा भाषाभास्कर भास्करराव उजगरे , त्यांनी दाते शब्दकोशासाठी नवीन मराठी शब्दांची निर्मिती करून शब्द पुरवले. होते , म्ह्णून त्यांना ' भाषाभास्कर ' ही पदवी मिळाली होती . त्याचप्रमाणे एकट्या कवीचा काव्यसंग्रह काढण्याचा पायंडा भास्करराव उजगरे यांनी पाडला. त्यांचे पणजोबा हरिपंत केळकर हेदेखील कवी , लेखक होते , ते पनवेलचे होते त्याकाळी त्यांचीही पुस्तके प्रसिद्ध झालेली होती. निरंजन यांचे लेखन चालू होते त्यावेळी त्यांनी स्वतःची छोटी इंजिनिरिंग कंपनी सुरु केली. निरंजन उजगरे यांनी ' आधी नवे घर ' हा व्यक्तिचित्रांचा संग्रह लिहिला त्यानंतर ' त्यांचा ' दिनार ' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला , त्याचे भाषांतर उर्दूत झाले . उर्दू मध्ये भाषांतरीत झालेला हा पहिलाच मराठीतील काव्यसंग्रह होता. त्याला राज्य उर्दू अकादमीचाही पुरस्कार मिळाला. त्यांच्या या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळाला. त्यानंतर त्यांचे प्रहार , परिच्छेद , दिपवा हे काव्य संग्रह प्रसिद्ध झाले. त्यांचा ' तत्कालीन ' हा शेवटचा काव्य संग्रह होता .
निरंजन उजगरे ह्यांनी जे लेखन केले ते फार डोळसपणे केले ते लिहिण्यामागे एक वेगळी उर्मि होती . त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले ' हिरोशिमाच्या कविता ' त्यांनी अनुवादित केल्या. त्याच्या हिरोशिमाच्या कविता या काव्यसंग्रहाला सोविएत लँड नेहरू अवॉर्ड १९८९ साली मिळाले. त्याच पुस्तकाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला. सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगांवकर हे त्यांच्या आत्याचे पती होते. खरे तर पाडगावकरांमुळे ते खूप वाचू लागले कारण मंगेश पाडगांवकर त्यांना सुरवातीपासून पुस्तके देऊन वाचण्यास प्रवृत्त करत होते. अनेक वेळा पाडगावरांशी चर्चा चालू असताना वादही होत परंतु ते तेवढ्यापुरतेच असे.निरंजन उजगरे याचा स्वभाव बोलका होता आणि कुणालाही ते दुखवत नसत . अर्थात त्याचे फटके त्यांना बसत असत . असेच एका प्रसंगात त्यांना आपल्याच मित्रांकाडून कटू अनुभव आला असता ते दुःखी झाले जो प्रसंग घडला त्याच्या दुसऱ्यादिवशी सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर त्यांच्या घरी आले होते तेव्हा ते म्हणाले . ' एक लक्षात ठेव, मित्र खूप असतात , परंतु ज्याच्या खाद्यावर आपल्याला डोके ठेवून रडता येते तोच आपला खरा मित्र असतो , बाकी नुसतीच ओळख असते." त्यांच्या पत्नी अनुपमा उजगरे ह्याही उत्तम कवयत्री आहेत. उजगरे पती-पत्नी यांनी जवळ जवळ १०० कवींच्या कविता असलेल्या ' मर्ढेकरांपासून आजपर्यंत ' ह्या दर्जेदार कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही केले. ते इतके लोकप्रिय झाले की सुनीताबाई-पुलंनतर चांगल्या सादरीकरणात निरंजन-अनुपमा ह्या उजगरे दांपत्याचे नाव घेतले जाऊ लागले. निरंजन उजगरे यांनी हिब्रू कवितांचे भाषान्तर देखील केले . त्याच्या हिब्रूतून भाषांतर केलेल्या काव्य संग्रहाचे नाव आहे ' विणू लागली आजी ' . त्यांनी मूळ सिंधी कवितांचा अनुवाद ' फाळणीच्या कविता ' या नावाने केला . मूळ तेलगू भाषेतील पाणी या विषयाला वाहिलेल्या दीर्घ कवितांचा अनुवाद ' पाण्याचं गाणं ' या पुस्तकात केला आहे. त्यांनी भारतातील विविध भाषेतील उत्तमोत्तम कवींच्या कविता मराठीत आणल्या हे महत्वाचे. निरंजन उजगरे यांना चित्रकलेचाही नाद होता. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन त्यावेळी विख्यात चित्रकार आरा यांनी मुबंईत भरवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी ' जायंटव्हील ' नावाची एक अनोखी कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत वस्तूप्रदर्शन भरवणाऱ्या व्यवसायाशी निगडित असलेल्या एक अनोख्या विश्वाशी मराठी वाचकांचा पहिल्यांदा परिचय झाला. त्यांनी उर्दू कवी ' पाश ' ह्याच्या कवितांचे भाषांतर केले ' पाशच्या कविता ' या नावाने तो निरंजन उजगरे यांचा शेवटचा अनुवादित संग्रह ठरला.
सतत नवीन, वेगळे करण्याचा त्यांचा ध्यास होता त्यात कुठलेच राजकारण नव्हते किंवा कुठलाही स्वार्थ नव्हता. त्यांना अनेक मनसन्मान मिळाले , अनेक ठिकाणच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले खरे परंतु अशा गोष्टीत ते जास्त रमले नाहीत. त्यांनी अनेक भाषांमधील कविता मराठीत आणून मराठी कविता समृद्ध केलेच परंतु ते नुसते अनुवादक नाही झाले तर त्याच दर्जाचे स्वतंत्र लेखनही चालू ठेवले हे महत्वाचे. बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात निरंजन उजगरे यांनी वर्तमानपत्रातून आव्हान करून तरुण कवीकडून कविता मागवल्या होत्या ६५० कवीकडून सुमारे १४०० कविता आल्या होत्या त्यांची योग्य प्रकारे निवड करून ५० कवीच्या ५० कविता निवडल्या होत्या. हे काम अथकपणे निरंजन-अनुपमा उजगरे यांनी केले. पुढे त्या कवितांचे पुस्तक झाले.निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ' काव्यपर्व ' या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत. परंतु या व्यापामुळे, प्रदूषणामुळे त्यांची फुफुस्से निकामी झाली हे डॉक्टरांच्या लक्षात आले . त्याचा शेवटचा काव्यसंग्रह ' तत्कालीन ' हा होता, त्यात त्यांच्या जानेवारी ते डिसेम्बर २००३ पर्यंतच्या कविता त्यात होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचा ' कांगारूचे आप्त ' ह्या नावाचे ऑस्ट्रेलिया येथील मराठी बांधवांच्या लेखनाचे पुस्तक ' ग्रंथाली ' ने काढले. त्यांचे ' काव्यपर्व ' तर साकार झाले परंतु त्यांचे ' जीवनपर्व ' मात्र अकाली संपुष्टात आले . हळूहळू त्याची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे १२ डिसेंबर २००४ रोजी ठाण्यात अकाली निधन झाले.
-- सतीश चाफेकर
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले. ‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत. मा.सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. मा.सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील 'आंख का तारा', 'भक्त और भगवान', व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, 'शमशरे आलम' या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली होती. दुर्द्व्याने त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यांचे पहिले गाणे त्या दहा वर्षाच्या असतना १९३४ साली एच.एम्.वी ने रेकॉर्ड केले होते. मा.राजकुमारी म्हटले की आठवतात तो मा.मधुबाला आणि मा.लता मंगेशकर या दोघीनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा "महल". या चित्रपटात 'घबराके हम" आणि "एक तीर चला" ही मा.राजकुमारी यांची दोन गाणी अप्रतिम होती. मा.लता मंगेशकर यांनी राजकुमारी बरोबर काही सुंदर गाणी गायली आहेत. यातील काही कोई नैनो में मेरे आके न जाए (मेहरबानी) संगीत-हफीज खान, हम आह भी करते है (वफा) संगीत-विनोद, जिंदगी बदली मुहब्बत का मजा आने लगा (अनहोनी) मा.श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ.पी.नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही मा.राजकुमारी फार गाजल्या नाही. रोशन यांनी "बावरे नैन", "अनहोनी" अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना संधी दिली होती.
राजकुमारी यांची उतरत्या वयात इतकी वाईट परिस्थिती झाली की त्या पाकीजा चित्रपटात कोरस गाताना दिसल्या, संगीत कार नौशाद हे होते,त्यांना हे न बघवल्याने त्यांनी पाकीजासाठी राजकुमारी यांना चित्रपटासाठी काही ठुमरी गाण्याला सांगीतल्या,पण त्या कमाल अमरोही यांनी न वापरता बॅगराऊंडला वापरल्या,त्या अजुन ही एच.एम.व्ही व अमरोही कुटुंबाकडे असल्याचे म्हणतात.
राजकुमारी दुबे यांचे १७ मार्च २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अमित सयानी यांनी घेतलेली राजकुमारी दुबे यांची मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=gVWMPSI2SNo#action=share
राजकुमारी यांची काही गाजलेली गाणी
'सुन बैरी बलमा कछू सच बोल', नजरिया की मारी-मरी मोरी दइया', 'मुझे सच सच बता दो कब मेरे दिल में समाए थे', 'जब तुम पहली बार देखकर मुस्कराए थे','आंख गुलाबी जैसे मद की प्यालियां', जागी हुई आंखों में है शरम की लालियां', 'एक तीर चला और घबरा के जो हम सर को टकरायें तो अच्छा हो', 'चुन चुन घुंघरवा'
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’, ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. मा.फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्या काळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते.
२००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. २००३ साली त्यांनी फरदीनलाच घेऊन ‘जाँनशीन’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याच चित्रपटाद्वारे त्यांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती. मा.फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठीतले विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांचा जन्म १९४५ रोजी झाला. बँकेत नोकरी करणाऱ्या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत ‘सायन्स टुडे’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या जेम्स गुन यांच्या ‘द रोड टू सायन्स फिक्शन’च्या १९८९ च्या आवृत्तीसाठी निवडली गेली.
आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत. कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे.
त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे. वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबऱ्याही लिहिल्या. लक्ष्मण लोंढे यांचे ६ ऑगस्ट, २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
‘सुरभि’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमाने घराघरांत पोचलेले रेणुका शहाणे हे नाव घराघरात पोचले. त्यांचा जन्म २७ मार्च १९६५ रोजी झाला.त्यांचे ते दिलखुलास हसून ‘नमस्कार’ म्हणणे आजही लोकांच्या कानांत आणि डोळ्यांसमोर आहे. या कार्यक्रमातून त्या एक उत्तम निवेदिका दिसल्या तशी त्यापाठोपाठ आलेल्या मालिकांमधून अभिनय निपुणताही प्रेक्षकांनी वाखाणली. भारतीय दूरचित्रवाणीवर गाजलेल्या मालिकांपैकी अनेक रेणुका शहाणे यांच्या नावावर आहेत. सर्कस, सैलाब, इम्तिहान आदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.
मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुका शहाणे यांनी १९९२ मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरवात केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती १९९३ ते २००१ या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर १९९४ मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हम आप के है कौन’मुळे ‘भाभी’ म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 'हम आपके है कोन' नंतर रेणुका या फक्त महेश कोठारे दिग्दर्शित 'मासूम' या एकमेव हिंदी चित्रपटातून दिसल्या. रेणुका शहाणे या हिंदी चित्रपटातूनही, बराच काळ झाला तरी दिसल्या नाहीत,याबाबत त्या सांगत म्हणतात, 'हम आपके है कोन' चे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचे पिताजी राजकुमार बडजात्या यांनी मला त्यावेळी सांगितले की, या एकाच चित्रपटाने तुला अशी ओळख व लोकप्रियता मिळाली आहे, की तू यापुढे जास्त चित्रपटातून भूमिका साकारल्या नाहीस, तरी चालेल. १९९४ सालचा 'हम आपके है कोन' आजही झी सिनेमा वाहिनीवर सातत्याने दाखवला जात असून, तो आवर्जून पाहिला जातो. जोपर्यंत आपल्या देशात लग्नसंस्कृती कायम आहे, तोपर्यंत या चित्रपटाबाबतचे आकर्षण असेच कायम राहणार आहे. त्या लोकप्रिय प्रतिमेमध्ये न अडकता रेणुका शहाणे यांनी पुढील भूमिका सावधपणाने निवडल्या. नृत्य, खाद्यपदार्थ आणि विनोदाला वाहिलेल्या रिअॅमलिटी शोमधूनही त्या सहभागी झाल्या. आपली आई आणि प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या कादंबरीवर आधारित ‘रिटा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांच्यातील दिग्दर्शिकेशी ओळख झाली. रेणुका शहाणे यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतात भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्याला त्याच्या मूळ ‘साधीर’ शैलीतून त्यांनीच पुनरुज्जीवित केले. पूर्वी भरतनाट्यम हे नृत्य देवदासी करत असल्यामुळे ह्या नृत्याला प्रतिष्ठा नव्हती. ह्या नृत्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी ह्यांनी केले. शिवाय त्या एक थीयोसोफिस्ट सुद्धा होत्या. त्या काळी भरतनाट्यमला समाजात अत्यंत खालच्या दर्जाचे व अश्लील असे समजत असत.
बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.
एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने अक्षरशः भारून जाणे म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवण्यास सुरवात केली. मंचावरील सर्व मंडळी आसनांवर स्थानापन्न झाल्यावर व दीपप्रज्वलन, प्रास्ताविक इ. उपचार आटोपल्यानंतर कलाम साहेब बोलण्यास उभे राहणार एवढ्यात ध्वनिक्षेपण यंत्रणा अचानक बंद पडली आणि आयोजकांचे धाबे दणाणले व यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरु झाली. मी पहिल्या रांगेत बसलो होतो व सर्व घडामोडी मला अगदी जवळून बघायला मिळत होत्या. मला वाटलं, ते आयोजकांजवळ नाराजी व्यक्त करतील, पण तसं न घडता त्यांनी खाणाखुणा करून यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या माणसाचे स्वतःकडे लक्ष वेधले आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्याला समजावून सांगितले. काही क्षणातच ध्वनिक्षेपण यंत्रणा सुरु झाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. विलक्षण प्रेरणादायक असलेलं ते भाषण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात संपलं आणि राज्य मंत्री मंडळातील काही मंत्री व बारामतीतील अतिविशिष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी कलाम साहेब त्या परिसरातील अतिथीगृहाकडे रवाना झाले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मिटींग सुरु होण्यास काही मिनिटं राहिली असताना मी तिथे पोहोचलो. सभागृह अनेक अतिविशिष्ठ मंडळींनी गजबजून गेले होते. डॉ. कलामांना मी स्वतःची ओळख करून देऊन भेटीचा उद्देश सांगताच त्यांनी माझा हात धरून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. ‘तुमची मिटींग आटोपल्यावर आपण बोलू’ असं मी म्हणताच ते म्हणाले ‘या मिटींगपेक्षा आपल्या चर्चेचे विषय मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांचा संबंध थेट आपल्या शेतकरी बांधवांशी आहे.’ विजेच्या वापराशिवाय सिंचन, स्वयंपूर्ण खेडी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर मला अनेक प्रश्न विचारून ते थांबले नाहीत तर त्यावर तयार केलेल्या नोट्स तिथेच वाचून त्यांनी उपस्थित मंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. संसद भवनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आराखडयावरही आमची चर्चा झाली. पाच मिनिटात संपेल असं वाटणारी चर्चा तब्बल वीस मिनिटे झाली तरी सुरूच होती. उपस्थितांमध्ये वाढू लागलेली अस्वस्थता बघून मी कलाम सरांचा निरोप घेण्याची तयारी करताच त्यांनी मला चहा घेण्याची व मान्यवरांच्या मिटींगमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी वस्तुस्थिती कथन करताना विलक्षण खिन्नतेने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता व डोळे पाणावले होते. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपती किती संवेदनशील असू शकतो हे बघून मी थक्क झालो.
मिटींग संपल्यानंतर चर्चेनंतर उपस्थितांची फोटो सेशनसाठी लगबग सुरु झाली. आम्ही सर्वांनी फोटोसाठी पोझ दिली, पण कॅमेऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला आणि आयोजकांना घाम फुटला. ग्रुपमध्ये माझ्या शेजारी उभे असलेले कलाम साहेब शांतपणे फोटो काढण्याची धडपड करणाऱ्या तरुणाकडे गेले, कॅमेऱ्याचं निरीक्षण करून त्याच्याशी काहीतरी बोलले आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये येऊन सुहास्य वदनाने उभे राहिले. त्यांचा विलक्षण साधेपणा व निगर्वीपणा बघून मी थक्क झालो असतानाच फोटो सेशन संपले व पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला.
ज्यांच्या भेटीने उभ्या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी, ज्यांच्या विलक्षण प्रेरणादायी पण तितक्याच सध्या व्यक्तिमत्त्वाने भारून जावे, आदर्शांचा दुष्काळ पडलेल्या या देशात ज्यांचा आदर्श जिवापाड जपून एखादे महान कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळावी असे थोर शास्त्रज्ञ, लेखक, कवी, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायक स्मृती आपल्या देशातील तरुणांना सतत प्रेरित करत राहतील. या महामानवाला माझी अंत:करणापासून श्रद्धांजली.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti