(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

    रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.

    स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा 'वझेबुवांची गायकी' म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते 'संगीत कला प्रकाश' या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर

    सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या.

    गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही.

    वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली. सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले होते.

    पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. मा.सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संगीतकार रवींद्र जैन

    आज ९ ऑक्टोबर
    आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी
    जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४

    भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मा.रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.*मा.रवींद्र जैन* यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    संदर्भ:- इंटरनेट

    मा.रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
    ’आजसे पहेले आजसे जादा
    ’गोरी तेरा गाव बडा प्यारा
    जब दिप जले आना
    ’राम तेरी गंगा मैली,
    सुन सायबा सुन

  • प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी

    आनंद बक्षी यांनी लिहीलेली गाणी आजून ही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा जन्म २१ जुलै १९३० रोजी झाला.आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. भगवानदादांची भूमिका असलेला 'भला आदमी' हा चित्रपटापासून गीते लिहण्यास सुरवात केली. हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला मात्र त्यापूर्वीच 'शेर-ए-बगदाद आणि 'सिल्व्हर किंग' हे त्यांचे चित्रपट झळकले. शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकाराने अनेक निर्मात्यांकडे बक्षी यांच्यासाठी शब्द टाकला तर साहिरसारख्या प्रतिभावंताने बक्षींना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 'पारसमणी' आणि 'दोस्ती'च्या गाण्यांनी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीसह 'मि. एक्स इन बॉम्बे' या चित्रपटासाठी गीते लिहिण्याची संधी आनंद बक्षी यांना मिळाली. यातील 'मेरे मेहबूब कयामत होगी' आणि 'खूबसूरत हसीना' ही गाणी लोकप्रिय झाली. यानंतर 'हिमालय की गोद में' आणि 'जब जब फूल खिले' या कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांतील बक्षींनी लिहिलेली गाणी कमालीची गाजली. आशय गर्भ, हलकीफुलकी शब्दकळा, प्रेमगीत, विरहगीत, भजन, कव्वाली, थीम साँग, क्लब डान्स.. सर्व प्रकारची गाणी झटपट लिहून देणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी असे समीकरण रूढ झाले! लक्ष्मी-प्यारे यांच्यासोबत त्यांची भट्टी जमली. या जोडीने 'मिलन, आसरा, लुटेरा, आए दिन बहार के, फर्ज, तकदीर, अंजाना, आया सावन झुम के, जीने की राह, जिगरी दोस्त' असे एकापेक्षा एक सुरेल चित्रपट देऊन ६० च्या दशकाची अखेर गाजवली. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना'ने घडवलेला इतिहास सर्वज्ञात आहे. या प्रतिभावान कवी-गीतकाराची सारी वैशिष्टय़े 'अमर प्रेम'मधील 'चिंगारी कोई भडके', 'कूछ तो लोग कहेंगे', 'ये क्या हुआ', 'रैना बिती जाए', 'बडा नटखट है रे', 'डोली मे बिठाके' या गाण्यांमध्ये होती. लक्ष्मी-प्यारेसोबत त्यांनी ३०२ तर पंचम सोबत ९९ चित्रपट केले. राज कपूर, शक्ति सामंता, मनमोहन देसाई, यश चोप्रा, राज खोसला, सुभाष घई या आघाडीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी बक्षींकडून शेकडो गाणी लिहून घेतली. आर.के ने 'बॉबी'च्या गाण्यांसाठी स्वत: बक्षी यांच्या घरी जाऊन त्यांना करारबद्ध केले. १९७० चे दशकही बक्षींचेच होते. 'आन मिलो सजना, गीत, हमजोली, कटी पतंग, खिलौना, द ट्रेन, दुश्मन, हरे राम हरे कृष्ण, हाथी मेरे साथी, अपना देश, नमक हराम, शोले, ज्यूली, सरगम' 'कर्ज, एक दुजे के लिये, हीरो, आशा, रॉकी, बेताब, लव्ह स्टोरी, अलग अलग..' या चित्रपटांद्वारे १९८०च्या दशकातही बक्षी आघाडीवर राहिले. तरुण पिढी ला आवडणारी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'दिल तो पागल है', 'ताल', 'मोहब्बते', 'गदर' या चित्रपटांतील गाणी मा.आनंद बक्षी यांनी लिहलेली आहेत. नवीन पिढीतील संगीतकारांशीही त्यांचे सूर जुळले होते आनंद बक्षी यांनी साडेतीन हजार च्या वर गाणी लिहली. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली. मा.आनंद बक्षी यांचे ३० मार्च २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    आनंद बक्षी यांची काही गाणी.
    आनेसे उसके आई बहार.
    मेरे दिवाने भी दवा नही.
    अच्छा तो हम चलते है.
    चुपके से दिल दे.
    दिल क्या करे.
    हम तुम एक कमेरे मे बंद हो.
    चिंगारी कोई धडके.
    आज मोसम बडा.
    मै शायर तो नही.
    दो मसताने.

    https://youtu.be/O10DveYR4TE

    https://youtu.be/mXkHKmuSf1Q

  • कविवर्य वि. वा. शिरवाडकर

    कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला.

    वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नण असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. शिरवाडकरांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

    काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

    कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले.

    कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. ‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’मधून नाटय़रसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले.

    १० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांचे निधन झाले. कुसुमाग्रज यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

    भालचंद्र पेंढारकर शिस्तीचे भोक्ते होतेच परंतु त्यांची रंगभूमीवर अमाप श्रद्धा होती. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच होणार आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरु करणारा एकमेव निर्माता आणि अभिनेते ते होते. मुबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवली आहेत.

  • संतूर या तंतुवाद्याची ओळख

    शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिवकुमारांनी याच वाद्याच्या जोरावर अनेक चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’ हा अप्रतिमच! संतुरला एका उंचीवर नेऊन ठेवणार्यार शिवकुमारांनंतर अनेक कलाकारांनी या वाद्याची कास धरून नंतर नाव कमावले आहे. त्यातल्या पं. उल्हास बापट यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. त्यांनी तर प्रत्येक रागानंतर स्वर जोडणी करायला लागू नये म्हणून हार्मोनियमप्रमाणे क्रोमॅटिक स्केलचे खास संतुर बनविले आहे. म्हणजे काय सांगायचे झाले, तर सा नंतर ओळीने कोमल तीव्र सर्व स्वर जोडून तीन सप्तकांची योजना केली आहे. ही तरी खूप छान सोय झाली.
    संतूर हे जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर तिथली परंपरा होती, स्वर तारांच्या खेचीतून निर्माण होतो हा तंतुवाद्यातला सर्वसामान्य नियम आहे. या नियमाला धरून शेकडो वाद्ये जगभरात उत्पन्न झाली. खरेतर या वाद्यांची गणती करावी लागेल. जितक्या संस्कृती तितकी वाद्ये, असा हा भाग आहे. धनुर्वीणेचे असेच अनंत प्रकार आहेत. हार्प हे आजही वापरले जाणारे याच वर्गातले वाद्य आहे. याचप्रकारच्या वाद्यामध्ये वेगळेपणा दाखविणारे स्वरमंडल हे अत्यंत लोकप्रिय वाद्य आपल्याला नेहमी पहायला मिळते. हे वाद्य विशेष करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक/गायिका आपल्या हातात धरून गाताना वाजवीत असतात. शिवाय सिनेमाच्या, मालिकांच्या अथवा नाटकांच्या पार्श्वयसंगीतासाठीही याचा उपयोग हमखास केला जातो. या वाद्यात वेगळेपणा आहे, असे म्हटले. याचे कारण हे वाद्य धनुराकृती नसून एका बंद पेटीप्रमाणे याचा आकार असतो. वरची बाजू मोकळी असते आणि दोनही बाजूंनी तारा खेचणारे खिळे ठोकलेले असतात. ही पेटी मंद्र स्वरांकडे रुंद असते, तर तार स्वरांकडील बाजू निमुळती असते. जास्त रुंदीचा भाग साधारण दीड फूट, तर कमी रुंदीचा भाग नऊ ते दहा इंच असतो. अशाचप्रकारचे कानून नावाचे एक वाद्य इराणी संगीतात वापरले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे वाद्यच स्वरमंडलाचे प्रेरक वाद्य आहे. तान के कप्तान असा ज्यांचा हिंदुस्थानी संगीतात लौकिक आहे, असे तानरसखाँ यांनी याचा वापर प्रथम आपल्या गायनात केला, असे म्हटले जाते. पतियाळा घराण्याच्या सर्वच कलाकारांनी स्वरमंडल आपल्या गायनासोबतीला खास करून वापरले आहे. बडे गुलाम अलीखाँसाहेब, सलामत नझाकत, मुनव्वर अली यांनी हे वाद्य अधिक लोकप्रिय केले. कालांतराने स्वरमंडल घेऊन गायची एक स्टाईलच निर्माण झाली. अजय पोहनकर, पं. जसराज, निर्मला देवी, परवीन सुलताना आणि अलीकडे उस्ताद राशीद खाँ या सर्वांनी स्वरमंडलाचा जाणीवपूर्वक वापर केला आणि आपल्या स्वरांना एक साज चढविला. या वाद्यामध्ये रागाप्रमाणे स्वर नियुक्त करावे लागतात. शुद्ध स्वर अधिक असणार्याा रागानंतर कोमल स्वर अधिक असणारा राग गायचा असल्यास स्वरजोडणी करायला थोडा वेळही लागत असतो. तेव्हा श्रोत्यांना थोडी कळ काढावी लागत असते.
    संतुर दिसायला असेच पण तंत्रामध्ये सर्वस्वी भिन्न असे संतुर हे वाद्य खूपच लोकप्रिय असे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोर्या तून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजविले जाते. वैदिक ग्रंथात वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख आहे. त्यात शंभर तारा असत. छोट्या काठ्यांनी तारांवर आघात करून ते वाजविले जात असे. संतुर या वाद्यालाही शततंत्री वीणा असे नाव आहे. एक प्रकारच्या खास काठ्यांनी तारांवर आघात करून यावर स्वरनिर्मिती केली जाते. काठ्यांच्या टोकावर एक बाक असतो, ज्यामुळे स्वराघात नाजूक होतात. चतुर्भुज आकाराची एक पेटी असणारा या वाद्याचा आकार असतो. वरील भागात दोन दोन मेरूंच्या पंधरा ओळी असतात. एका मेरूवर एकाच स्वरांच्या चार तारा जोडलेल्या असतात. याशिवाय काही संतुरांमध्ये सिंपथेटिक (सहायक ध्वनी) तारांचीही सोय केलेली असते. डलसिमर या इलेक्ट्रॉनिक वाद्याशी याचे साधर्म्य असते.

    नंदन हेर्लेकर /पुढारी
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नानासाहेब सरपोतदार

    भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आद्य शिल्पकार नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली येथे झाला.

    घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी नानासाहेब मुंबईला गेले, पण शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. जन्मजात वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षीच घर सोडून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत जाऊन राहिले. तिथे वत्सलाहरण, सैरंध्री, दामाजीमध्ये छोटया-मोठया भूमिका केल्या. आईच्या आग्रहाखातर, शिक्षणासाठी ते एका नातेवाइकाकडे इंदूरला गेले. तिथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना!

    नटश्रेष्ठ गणपतराव जोशींच्या ओळखीने २१ ऑक्टोबर १९१९ रोजी नव्यानेच स्थापन झालेल्या कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या ‘सैरंध्री’ या पहिल्या चित्रपटाचे लेखक नानासाहेब सरपोतदारच होते.

    नाना स्त्री कलाकारांच्या भूमिकाही हुबेहूब वठवत. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. महाराष्ट्र फिल्म कंपनीसाठी नानांनी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शह’ आदी चित्रपट लिहिले. काही चित्रपटांत भूमिकाही केल्या. इथल्या पाच वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी दिग्दर्शनातील बारकावेही शिकून घेतले.

    छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. त्यांच्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन नानासाहेबांनी केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा हा पहिलाच चित्रपट होता.पुढे तेलगिरीची पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी या संस्थेसाठी दोन वर्षात ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ चित्रपट दिग्दर्शित केले. नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म’ कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे ललिता पवार या नावाने प्रचंड लोकप्रिय झाली. ‘महाराची पोर’ हा चित्रपट नानांनी लिहून दिग्दर्शित केला होता. ऐंशी वर्षापूर्वी त्यांनी असा संवेदनशील सामाजिक विषय हाताळला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पाहायला सरोजिनी नायडू खास गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.

    १९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर नानांनी ‘आर्यन फिल्म’ कंपनीची स्थापना केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार, फुले घेऊन मुहूर्त केला गेला. पुढे चित्रपट प्रदर्शक, मुंबईच्या ‘कोहिनूर’ थिएटरचे मालक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले.

    नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच याशिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता ते निर्मातेही झाले होते. ‘हरहर महादेव’ हा आर्यनचा पहिला चित्रपट होता, पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे त्यांनी नाव बदलून ‘निमक हराम’ केले. या चित्रपटाची जाहिरात त्यांनी मोठया कल्पकतेने केली होती. त्यानंतर मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या १९२८ साली ‘आर्य महिला’ चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये ललिता पवार नायिका तर ‘भारतमाता थिएटर’चे मालक भोपटकर नायक होते. या चित्रपट निर्मितीसाठी नानासाहेबांचा ‘बालगंधर्व’ व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. ‘आर्यन कंपनी’चा १९२८ सालचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवारचा यांचा पहिला मूकपट होता.

    १९२८ ते १९३० या काळात नानानी, ‘मराठयाची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उणाडटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी, तलवार’ आदी चोवीस मूकपटांची निर्मिते व दिग्दर्शन केले. यातील सहा मूकपटांची नायिका अंबू ऊर्फ ललिता पवार होती. यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. १९३१मध्ये बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर नानासाहेबांनी चित्रपटनिर्मिती थांबवली.

    अर्देशीर इराणी यांच्या इम्पिरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ हा बोलपट नानांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली.

    स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिश्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांची आवडती मठी बनली. त्यानंतरही नानासाहेबांनी १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्यमहोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘श्यामसुंदर’ या बोलपटाला जातो. ‘आर्यन फिल्म’साठी नानासाहेब त्याची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार आदी कलाकारांची निवडही करण्यात आली होती. तशी ज्ञानप्रकाशमध्ये जाहिरातही आली होती, परंतु त्यांच्या भागीदारांना ही कल्पना रुचली नाही, म्हणून त्यांना हा विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने हेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. मुंबईच्या ‘वेस्ट एंड’ (सध्याचे नाझ) थिएटरमध्ये तो सत्तावीस आठवडे चालला. नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ नाटके लिहिली. ‘मौज’मध्ये ते परखड लेख लिहिले. शाहू मोडक, ललिता पवार, राजा सँडो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली.

    पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते. नानासाहेबांचा हा यशस्वी वारसा त्यांच्या कुटुंबीयांनीही पुढे चालवला. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत सरपोतदार यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. पुना गेस्ट हाउसचा कारभार चारुदत्त सरपोतदार सांभाळत असत. विश्वास सरपोतदार यांनी यशस्वी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार चित्रपट निर्मिती-लेखन व दिग्दर्शनही करत असत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करत असत.

    नानासाहेब सरपोतदार यांचे २३ एप्रिल १९४० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक पंडित रघुनंदन पणशीकर

    रघुनंदन पणशीकर यांनी आपली पहिली व्यावसायिक मैफल १९८४ मध्ये केली होती. त्या वेळी त्यांनी राग भूप सादर केला होता. सिंग बंधूंच्या ‘सूरशृंगार’ या संस्थेच्या कार्यक्रमात त्यांना पाऊण तास गाण्याची संधी मिळाली होती.

  • प्रख्यात पटकथा लेखक, दिग्दर्शक नासीर हुसेन

    नासीर हुसेन यांच्या चित्रपटाचे प्रत्येकच गीत अप्रतिम असायचे. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला. नासीर हुसेन हे भोपाळवरून मुंबईला आले व शशाधर मुखर्जी यांच्या फिल्मीस्तान स्टुडीओत पटकथा आणि संवाद लेखक म्हणून नोकरीला लागले. तेव्हा ते कारदार साहेबांच्या सहाय्यकाची पण भूमिका निभावत होते. कारदार साहेब म्हणजे त्या काळातले नामवंत दिग्दर्शक. त्याकाळात मा.नासीर हुसेन यांनी ‘अनारकली’, मुनीमजी आणि ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटांचे पटकथा लेखन केले होते. १९५८ मध्ये अचानक शशाधर मुखर्जी यांना एक वेगळी आणि स्वतंत्ररीत्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली चित्रपट होता.. ‘तुमसा नही देखा’. या चित्रपटापासूनच शम्मी कपूर सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले, सिनेमा खूप गाजला. त्यांचे यश बघून लगेच शशाधर मुखर्जी यांनी त्यांना दुसरा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. चित्रपट होता ‘दिल देके देखो’. या चित्रपटाचे विशेष असे कि यात दोन महिलांनी पदार्पण केले होते. या चित्रपटाची नायिका ‘आशा पारेख’ आणि दुसऱ्या संगीतकार ‘उषा खन्ना’. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. या चित्रपटानंतर ‘आशा पारेख’ नासीर हुसेन यांच्या प्रत्येक चित्रपटात होती अगदी १९७१ च्या ‘कारवा’ पर्यंत. ‘दिल देके देखो’ च्या यशानन्तर ‘नासीर हुसेन’ यांनी आपली स्वताची निर्मिती कंपनी ‘नासीर हुसेन फिल्म’ ची स्थापन केली आणि स्वतःच निर्माता दिग्दर्शक ची भूमिका निभावीत पहिला चित्रपट काढला देव साहेबांचा ‘जब प्यार किसी से होता है’, हा सुद्धा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट होती. त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘फिर वही दिल लाया हु’. या सर्व नावांवरून एक कल्पना येते कि नासीर हुसेन यांच्या चित्रपटात गाण्यांना किती महत्व होते आणि संगीत हा त्यांच्या चित्रपटाचा कळीचा मुद्दा होता तो अगदी ‘क़यामत से क़यामत तक’ पर्यंत. ‘फिर वही दिल लाया हु’ मध्ये त्यांनी आपल्या गुरुचा म्हणजे शशाधर मुखर्जी यांचा मुलगा ‘जॉय मुखर्जी’ यालाच आपला नायक म्हणून निवडले होते तर नायिका मा.आशा पारेखच होत्या. बंदा परवर थाम लो जिगर बन के प्यार फिर आया हु ....खिद मत मे आप की हुज़ूर फिर वोही दिल लाया हु ....'रफी ने हे गायलेले गाणे ...ओ. पी. नय्यर यांच खास रीदम....'मेलोडीयस गाणे'.....अशा अनेक ' सुमधुर ' 'क्लास्सिक' गाण्यांचा खजिना असलेला 'फिर वोही दिल लया हू...'हा खूप गाजला. मा.नासिर हुसेन हे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवत. चमकदार, प्रणयप्रसंग, गीत, संगीत, रहस्य अशा वैशिष्ट्यांचे जब प्यार किसीसे होता है, तुमसा नही देखा, दिल देके देखो, यादों की बारात हे मा.नासिर हुसेन चित्रपट असत. पण त्यातही ‘तिसरी मंजिल’ वेगळाच मानला जातो. मा.‘मजरूह सुलतानपुरी’ हे मा.नासीर हुसेन यांचे आवडते गीतकार होते म्हणूनच सर्व तरुण वर्ग घेऊन काढलेला ‘क़यामत से क़यामत तक’ चे सुद्धा गाणी त्यांनी ७० वर्षांच्या मजरूह सुलतानपुरी यांच्या कडूनच लिहून घेतली होती. मा. नासिर हुसेन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी कयामत से कयामत तकच्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. ताहिर हुसेन नासीर हुसेन यांचे भाऊ, त्यांच्या बरोबर ताहिर हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी नासीर हुसेन यांना निर्मिती आणि दिग्दर्शनात "तुमसा नही देखा', "दिल दे के देखो' अशा काही चित्रपटांसाठी मदत केली. आमिर खान चे मामा म्हणजे नासिर हुसेन.

    आशा पारेख यांचे नासिर हुसेन यांच्या बरोबर सोबत नाते होते. अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. १९५९ मध्ये 'दिल दे के देखो' सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. या सिनेमानंतर त्यांची जवळीक वाढली होती. मा.नासिर हुसेन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. नासिर हुसेन यांचे निधन १३ मार्च २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    नासिर हुसेन यांच्या चित्रपटातील गाणी

    https://www.youtube.com/watch?v=OeEYMFvcKok

    https://www.youtube.com/watch?v=iPpwwAGjySA

    https://www.youtube.com/watch?v=CC_Xndynj7E