(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

    भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले. भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
    पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
    आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे

    आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
    एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही

    तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
    भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे

    आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
    त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला

    जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
    लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे

    येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
    जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा

    कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
    गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी

    सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
    अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला

    विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
    कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला

    हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
    तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी

  • ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस

    वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव रघुनाथ दामोदर सबनीस.

    बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे. मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.

    ४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • वीर खुदिराम बोस

    भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला.त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला.पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.

    मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.

    यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली.1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.

    बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.

    पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.

    किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले.सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.

    24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.

    यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि या भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.

    संदर्भ - मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - वि श्री जोशी

  • पंचम, उर्फ राहुल देव बर्मन अर्थातच आर. डी. बर्मन

    राहुल देव बर्मन यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. त्यांचा जन्म २७ जून, १९३९ रोजी झाला. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. पंचम ऊर्फ आर. डी. बर्मन यांचे संगीत म्हणजे... एकीकडे तरल.. भावूक... संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू... चैतन्याचा झंझावात... उल्हास... जोश आणि जल्लोष...! नवसंगीताचा प्रवाह पन्नास वर्षापूर्वी सुरु करणार्याव आर.डी.बर्मन यानं खर्यात अर्थानं अभिजात नवसंगीत निर्माण केलं. वडील मा.सचिनदेव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून त्यानं आपली कारकीर्द सुरु केली. वडिलांच्या अखेरच्या वर्षापर्यंत तेच सहाय्यक होते. केवळ गीतकारांच्या शब्दांना फुलविण्यातच आर. डीं.नी कधी समाधान मानलं नाही. चित्रपटांना, त्यातील प्रसंगांना अधिक परिणामकारक करणारे पार्श्वासींगत देण्यात पंचम यांचा हातखंडा होता. त्यांना आजही बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते.

    पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, ""अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका "तुबलू‘ पुढे "पंचम‘ या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे... कुत्र्यांचं धापा टाकणं... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर... ताल... आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन!

    पंचमदाना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता "छोटे नवाब.‘ आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं "घर आजा घिर आये बदरा सावरीया..‘ हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच "मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि र्हिदम सेक्श नमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या. पंचममध्ये एक खोडकर पोरगं सतत असायचं. तो त्याला विविध प्रयोग करण्यापासून कधी दूर ठेवत नव्हता. तबल्यावर हातोडी घासून एक विचित्र साऊंड क्रिएट करून पंचमदांनी तो एका विनोदी गाण्यात वापरला. अर्थात, हा प्रयोग होता आपला लाडका दोस्त मेहमूद याच्यासाठी आणि त्यानेच गायलेल्या गाण्यासाठी. मेहमूदबरोबर खास दक्षिण भारतीय आवाजातले हेल देत हे गाणं गायलंय आपल्या आशाताईंनी. मुत्तूकुडी कव्वाडी हडा.. (दो फूल) हे ते गाजलेलं गाणं.

    पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आणून वापरायचं आणि इतर संगीतकारांनी त्याचा वापर आपापल्या संगीतात नंतर करायचा असा पायंडाच त्या काळी पडून गेला होता. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. १९७० ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन).

    नेपाळी "मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफ‘मधल्या "होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचम यांचे पण मादल काही काळ उपलब्ध झालं नव्हतं म्हणून या गाण्याचं रेकॉर्डिंगसुद्धा पंचम यांनी स्थगित केलं होतं.

    याच मादलचा भरपूर वापर पंचमदांनी पुढं आपल्या बऱ्याच गाण्यांत केला. "अजनबी‘ चित्रपटातल्या "हम दोनों दो प्रेमी‘च्या रेकॉर्डिंगच्या दरम्यान इंडस्ट्रीमधल्या वादकांचा संप होता; पण गाणं रेकॉर्ड करण्याची खुमखुमी आरडींना गप्प बसू देईना. त्यांनी मग आपले प्रमुख चार सहायक घेऊन गाणं पूर्ण केलं. नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल, की या गाण्यात ऑर्केस्ट्रेशन नाहीच मुळी. स्वतःच्या संग्रहात रेकॉर्ड करून ठेवलेला रेल्वे इंजिनचा इफेक्टत, मादलचा सलग ताल, बासरी, शिटी आणि इंटरल्यूड म्युझिक म्हणून त्या चौघांचा कोरस, भूपेंद्रचा आलाप, आणि किशोर-लताचा मेन व्हॉईस.. बस्‌ गाणं पूर्ण. मादल किती सुरेख वाजू शकतो, याची ही एक देखणी प्रचिती होती. मजरुह, गुलजार या प्रतिभावान गीतकारांच्या अनेक मुक्तछंदात्मक कवितांना आर. डीं.नी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रवणीय संगीताने यशोचित न्याय दिला. ही गाणी आजही अगदी ताजी वाटतात. ती सहज ओठांवर येतात. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते. मा.आर.डी.बर्मन यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    आर डी बर्मन यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=5-iu86NhFfc
    आर डी बर्मन यांच्या सांगीतिक वाटचाली वर ही दोन पुस्तके वाचनीय आहेत.
    R D Burman, the Man and the Music - Aniruddha Bhattaraji
    Prince of Music - Khangesh Dev Burman

  • ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर

    क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.

    वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.

    ‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.

    मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.

    पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.

    जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

    क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.

    पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.

    १९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.

    खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.

    देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन 'महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे'ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.

    बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भावगीत गायिका मालती पांडे बर्वे

    ‘खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.

  • बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज

    आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असेच होते. त्यांची २००६-२०१० या कालावधीकरिता राज्यसभेकरिता खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच आय.आय.टी. रुरकीसहित ७ विश्वविद्यालयांची डॉक्टरेट ही मानद पदवीदेखील त्यांना प्रदान करण्यात आली होती.

  • बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद

    आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.

    मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला "दो बिघा ज़मीन" व "प्यासा" " या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले. नंतर मेहमूद यांनी त्याच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाउस चालू केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठ च्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.

    मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.

    हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. 'कुंवारा बाप', 'लाखो में एक जैसा'सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. 'कुंवारा बाप' ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.

    आई एस जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले.

    मेहमूद यांचे २३ जुलै २००४ रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

    ‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.

  • गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर

    ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत.