(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • धैर्यधर’ – मास्टर दीनानाथ मंगेशकर

    स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर ह्यांनी गौरविलेला, मी लिहिलेला हा लेख मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झाला होता.

    बलवंत संगीत मंडळीच्या मानापमान नाटकामध्ये मास्टर दीनानाथांनी धैर्यधराची भूमिका करण्यास १९२७ मध्ये सुरुवात केली ! मास्टर दीनानाथांच्या आधी अनेकांनी रंगभूमीवर धैर्यधर साकारला होता. "मानापमान"मध्ये मास्टर दीनानाथांनी पदांच्या चाली बदलण्यापासून सर्व ठिकाणी नाविन्य निर्माण केले !

    गरिबी-श्रीमंतीचा झगडा, शौर्याच्या पार्श्वभूमीवरील शृंगाररसाने ओथंबलेले मानापमान नाटक ! त्याला कालमानाचे, वेशांतराचे बंधन कशाला ? म्हणून मास्टर दीनानाथांनी आपल्या पहिल्या रुपामध्ये आमुलाग्र बदल केला. पहिल्या अंकातील साधा लष्करी नोकरीमधला एक सेनापती, आपल्या वधूची निवड करावयास येतो, म्हणजे तो गणवेशात नसणारच ! दुस-या अंकाचेवेळी, छावणीभोवती चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतो, त्यावेळी त्याला गणवेश हवाच ! तिस-या अंकात त्याला पृथ्वीवर महाराजांकडून तीन चांदीची सरदारी आणि पंचवीस लाखांची जहागिरी मिळालेली असते, म्हणजे धैर्यधर त्याच दिमाखात दिसावयास हवा ! चौथ्या अंकात त्याचा ऐश्वर्यभोगांकित शृंगाररस सादर करावयाचा आहे म्हणून मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेतील वेशाविश्करण वेळोवेळी बदलून, रंगभूमीवर आणले, याचे नाट्याचार्य खाडिलकर ह्यांनी खूप कौतुक केले. ते म्हणाले, "माझे हे नाटक कालमानानुरूप आणि विधानककुशल आहे, असा जो मला सुरुवातीपासून एक आत्मविश्वास होता, तो या स्थित्यंतरित मास्टर दीनानाथांच्या भूमिकेनेही बळावला !"

    रणदुंदुभी नाटकामधील मास्टर दीनानाथांची तेजस्विनीची भूमिका बघून, श्रीमान पसारे अप्पा ह्यांनी मास्टर दीनानाथांना बक्षीस म्हणून चांदीची ढाल आणि तलवार दिली होती. ह्या चांदीच्या ढालीचा आणि तलवारीचा उपयोग मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या भूमिकेसाठी केला !

    मानापमान नाटकामध्ये धैर्यधराची भूमिका करतांना, दुस-या अंकात, मास्टर दीनानाथांचा वेष इंग्रजी चित्रपटातील एखाद्या जुन्या काळच्या सेनापातीप्रमाणे दिसे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते रुदाल्फ व्हलेंटिनो हे अशा पद्धतीचा पोषाख करीत. या सेनापतीच्या पोषाखात मास्टर दीनानाथ रुबाबदार दिसायचे !

    मास्टर दीनानाथांनी धैर्यधराच्या पदांना रसानुकुल नव्या चाली लावल्या. "माता दिसली" या पदात, "नेत सकल रणवीर रणासी" ही ओळ गातांना मास्टर दीनानाथ तानांची उसळी घेत. रणवीरांचे ठिकाण रणांगण हे ते पटवून देत असत, "चंद्रिका ही जणू" हे पद मास्टर दीनानाथ दुर्गा रागात गायचे. त्रिताल बदलून, रूपक तालात, म्हणायचे. "दे हाता या शरणांगता" या पदाच्यावेळी तर हा वीरपुरुष केवळ वनमालेच्या दृष्टीक्षेपात घायाळ झाल्यामुळे हतबल, दीन होऊन, तिची प्रेमभराने मनधरणी करीत असल्याचा गोड भास रसिकांना होत असे. "रवी मी चंद्र कसा" ही चाल मास्टर दीनानाथांनी कवीच्या भावनांची सुयोग्य गुंफण करून केली, असे वाटते. धैर्यधराच्या त्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी ठेक्याची योजना केली.

    "प्रेमसेवा शरण" हे ऐकतांना तर रसिक प्रेक्षाकांची खात्री व्ह्यायची, की रणांगणावरील हा सेनापती, रमणीच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालून घायाळ झालाय ! मूळ भिमपलास मधले हे पद मास्टर दीनानाथांनी मुलतानी अंगाने म्हणण्यास सुरुवात केली. मास्टर दीनानाथांच्या ह्या भूमिकेला, या पदांना संगीतप्रेमींनी प्रत्येक खेळास उदार आश्रय दिला. प्रत्येकवेळी वन्समोअर मिळणारे पद होते, "शूरा मी वंदिले"!

    मानापमानच्या प्रयोगास सुरुवात होताच, मास्टर दीनानाथांच्या उत्साहाला जणू उधाण फुटायचे ! आपल्या नवीन चाली रसिकांना आपण कधी ऐकवितो, असे त्यांना व्ह्यायचे. नाटकातील संभाषणे आवरून, ते गाण्यावर स्थिर होत असत. गाण्याची सुरुवात करतांना, मास्टर दीनानाथ पेटीवाल्यांच्या साथीची वाट पाहायचे नाहीत. त्यांच्या गाण्यावरून, जणू पेटीवाल्यांनी सूर लक्षात घ्यायचा ! रंगभूमीवरच्या गायनात पेटीची साथ न घेता, गाण्याची अचूक फेक करणारे मास्टर दीनानाथ पहिलेच !

    मानापमानमध्ये "माता दिसली समरी" या प्रथम पदापासून ते "प्रेम सेवा शरण" या अखेरच्या पदापर्यंत, प्रत्येक पदाला, प्रत्येक वेळी टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर मिळविणारे दीनानाथ साक्षात "स्वरनाथ" होते !

    एकदा शनिवारी कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये मानापमानचा प्रयोग जाहीर झाला होता. त्याच दिवशी, त्याच वेळी, कोल्हापूरमध्येच देवल क्लबमध्ये मंजीखाँसाहेबांचे गाणे ठरले होते. बाबा देवल चिंतातूर झाले. ते वसंत देसाई ह्यांना म्हणाले, "अरे वसंता, आज आपल्याकडे मंजीखाँसाहेबांचे गाणे आणि तिकडे दीनाचे मानापमान, सगळेजण तिकडेच जाणार". हे ऐकताच वसंत देसाई ह्यांनी आनंदाने जोरात टाळी वाजवली !

    पॅलेस थिएटर हाउसफुल्ल होते. धैर्यधराची भूमिका केलेल्या विद्यमान नटांनी कळत-नकळत "बलवंत"च्या या धैर्यधराला चार-आठ वेळा पैसे खर्चून मानाचा मुजरा केला होता.
    बळवंत संगीत मंडळीने हैद्राबादहून आपला मुक्काम मुंबईस आणला, तेव्हां एकट्या मानापमान ह्या नाटकावरच मुंबईचा मुक्काम नवीन नाटकाप्रमाणे अत्यंत यशस्वी केला.
    नटसम्राट बालगंधर्व, विनायकराव पटवर्धन, कृष्णराव फुलंब्रीकर, बापूराव पेंढारकर, आदी कलावंतांनी, मास्टर दीनानाथांची धैर्यधराची असामान्य भूमिका औत्सुक्याने पाहून गौरविली !

    गोवा येथील मानापमानचा प्रयोग पाहून, लयभास्कर कपिलेश्वरी ह्यांनी मास्टर दीनानाथांना विचारले, "भाळी चंद्र"ची ठेवण आपण अशी कां योजली ?" त्यावर मास्टर दीनानाथ उत्तरले, "धैर्यधर जर मस्तकावर चंद्र धारण केलेला सुचवलाय, तर अशा उंच स्वरांची ठेवण नको कां ? प्रथम भावना आणि मग स्वर निर्माण झाला." मास्टर दीनानाथांचे हे उत्तर, कपिलेश्वरी ह्यांना मनोमन पटले !

    श्रीमदजगत्गुरू श्री शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी ह्यांनी मास्टर दीनानाथ ह्यांना, वैशाख वद्य ४ शके १८४४ म्हणजेच १४ मे १९२२ रोजी अमरावती येथे, "संगीतरत्न" हे बिरूद बहाल केले. त्याचे पूर्वपुण्य मास्टर दीनानाथांना धैर्यधराच्या निमित्ताने मिळाले !

    बलवंत संगीत मंडळीने, १९३८ मध्ये कंपनीच्या पुनरुज्जीवनानंतर पहिला "रणदुंदुभी"चा तर दुसरा प्रयोग "मानापमान"चा केला होता. तेव्हांची एक आठवण ! त्या दिवशी पुणे येथे नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचा पहिला अंक झाल्यावर, मास्टर दीनानाथांचे स्नेही दादासाहेब जेस्ते त्यांना भेटण्यासाठी रंगपटात गेले. पाहतात तो काय ? मास्टर दीनानाथ तापाने कण्हत होते. जवळच औषधाची बाटली होती. "एवढा ताप आहे, तर आज काम कां करता ?" असे जेस्ते ह्यांनी विचारले. त्यावर मास्टर दीनानाथ म्हणाले, "संपूर्ण महिन्यात बलवंत संगीत मंडळीने लावलेली सर्व नाटके, माझ्या अनुपस्थितीमुळे बंद करावी लागली." प्रेक्षक तर मास्टर दीनानाथांशिवाय नाटक पाहण्यास तयार नव्हते. कंपनी चालविणे भाग होते. त्यामुळे तापातसुद्धा काम करणे, हे मास्टर दीनानाथांनी

    आद्यकर्तव्य मानले होते. विशेष म्हणजे दुस-या अंकापासून त्यांनी नेहेमीप्रमाणे आपले आकर्षक गायन सादर केले !

    या दिलदार आणि दानशूर धैर्यधराने गिरगावच्या एका शाळेच्या इमारत निधीसाठी मदत म्हणून "मानापमान"चा प्रयोग केला होता.

    धुळ्याला १९४१ मध्ये बलवंत संगीत मंडळीची इतिश्री झाल्यानंतर, केवळ लोकाग्रहास्तव मास्टर दीनानाथांनी सांगली मुक्कामात मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका केली. ती रंगभूमीवरील त्यांची शेवटची भूमिका ठरली ! हा प्रयोग राजाराम संगीत मंडळीने केला होता. कंपनीचे मालक गंगाधरपंत लोंढे ह्यांनी मास्टर दीनानाथांना आग्रहपूर्वक विनंती केली होती.

    सांगली मुक्कामात १९४१ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारावून टाकणारा हा एक प्रसंग ! मास्टर दीनानाथांनी, "दे हाता शरणांगता" ह्या पदातील "आपदा भोगी नाना" या ओळी म्हणताच, त्यांना गहिवरून आले. भावनेने ओथंबलेल्या स्वरात, पद चालू असतांनाच ते म्हणाले, "मला याच ठिकाणी आपदा भोगाव्या लागल्या." मास्टर दीनानाथांचे, हे वाक्य उपस्थित रसिक श्रोतृवृंदाने ऐकले मात्र आणि काही क्षण, सा-या थिएटरमध्ये गंभीर अशी शांतता पसरली. प्रत्येकाच्या चर्येवर मास्टर दीनानाथांविषयी वाटणारी सहानुभूती दिसू लागली. या व्यावहारिक जगात मास्टर दीनानाथांचे म्हणणे काय चूक होते ?

    नाटकातील हा "धैर्यधर" कलावंत, वास्तव जीवनातही कृतीने आणि वृत्तीने तसाच "धैर्यधर" होता !

    {मास्टर दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी २० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झालेला लेख}

    लेखक : उपेंद्र चिंचोरे

  • ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम

    आज २० ऑक्टोबर. ख्यातनाम मराठी लेखक बाबा कदम यांची पुण्यतिथी.

    बाबा कदम यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव वीरसेन आनंदराव कदम असे असले तरी ते आपल्या वाचक परिवारात `बाबा कदम' म्हणूनच परिचित होते.

    त्यांच्या कथा, कादंबर्या त मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, कोर्ट, रेसकोर्स इ. हमखास येणारच याचं आश्चर्य वाटत नाही. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. त्यामुळेच एक खानदानी आदब त्यांच्यामध्ये जाणवते अन् नकळत कुर्निसात करण्यासाठी हात पुढे होतो, मान अदबीनं झुकते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांची `अजिंक्यतारा' कथा रेसकोर्सच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या बालपणातच वडिलांचा मृत्यू झाला. प्राथमिक शिक्षण वसतिगृहात राहून झाले. स्वावलंबी जीवनाचे धडे त्यांनी आश्रमातच घेतले. इथेच त्यांची चित्रकलेशी ओळख झाली. पुढे ते राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाले. याच काळात बाळ गजबरांचाही परिचय झाल्याने चित्रकलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. घरच्या परिस्थितीमुळे पुढे त्यांनी एस. टी. महामंडळात काही काळ सेवाही करतानाच शिक्षणाची ओढ त्यांना गप्प बसू देत नव्हती.

    ते १९५४ मध्ये एल.एल.बी.झाले. फौजदारी वकील डी.एस.खांडेकर यांच्याकडे ते काम करु लागले १९५९ साली ते सरकारी वकील म्हणून नियुक्त झाले. १९५९ ते १९८७ पर्यंत सरकारी वकील म्हणून २८ वर्षे काम करुन ते १९८७ साली सेवानिवृत्त झाले. याच त्यांच्या न्यायालयीन कामकाजाचाही त्यांच्या लेखनावर प्रभाव पडलेला दिसतो.

    १९६५ साली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. `प्रलय' याच कादंबरीवर पुढे `देवा शपथ खरं सांगेन' हा चित्रपटही निघाला. १९६६ ला इन्साफ या कादंबरीवर ही `अधिकार' हा चित्रपट निघाला. भालु, सन्ना, ज्योतिबाचा नवस, पाच नाजूक बोटे, बिनधास्त, गर्लफ्रेंड, डेझर्ट क्वीन, डार्लिंन, निष्पाप बळी, गजरा, बॉंबे पोलीस, रमी, ज्वालामुखी, दगा, न्याय, रिवॉर्ड अशा सुमारे ८० च्या आसपास कादंबर्याप त्यांनी लिहिल्या. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हात लिहिता राहिला. व्यक्तिचित्रण करणार्या् लेखमाला ही त्यांनी वृत्तपत्रातून चालविल्या. कोणत्याही वेळी, कुठेही असतांना माझ्याजवळ लिखाणाची वही जवळ असते. एकटाकी लिखाण करतो अगदी न्यायालयात एखादा तास मिळाला की, मी लिहित बसायचो, शेवट जास्तीत जास्त प्रभावी कसा होईल याबाबत मनात संघर्ष सुरु होतो. हातात एखादा घेतलेली कादंबरी संपल्याशिवाय खाली ठेवायला मला नको वाटते, असे ते सांगत. त्यामुळेच त्यांच्या कादंबर्यां च्या तीन-तीन प्रती सार्वजनिक ग्रंथालयात घेऊन देखील वाचकांची मागणी पुरविणे ग्रंथपालांना अशक्य होते.

    विषयातही विविधता असल्याने कादंबर्या वाचकप्रिय झाल्या. सन्ना ही सिखसेकापू तरुणीवरील, अजिंक्य ही रेसवरील, राजधानी ही संस्थानिकांवरील `शोभा' ही वेश्येवरील, वसंतदादा व शालिनीताईंच्या जीवनावरील `निर्मला' पद्मा चव्हाण यांच्यावरील `अभिनेत्री' बापू बिरु वाटेगांवकरांच्या जीवनावर `दगा' स्वत:च्या बालपणाच्या आठवणीवर `शाळा सुटली पाटी फुटली' अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयावर त्यांनी लिहिले. लिहितांनाही त्यांनी आपल्या मनातला कलाकार जपला. निसर्ग जसा आहे तसाच चित्रित करण्याचा माझा प्रयत्न असतो असे ते म्हणत. नवरा-बायको ह्या पु.ल.देशपांडे यांच्या कथेवरील चित्रपटातही त्यांनी काम केलं.

    बाबा कदम यांचे २० ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विजय बक्षी/.mymarathi.

    (या लेखासाठी बाबा कदम यांचे छायाचित्र शोधण्यासाठी गुगलवर प्रयत्न केले. एकही छायाचित्र मिळाले नाही. सर्च रिझल्टमध्ये बाबा रामदेव यांची शेकड्यांनी छायाचित्रे दिसली. विकिपिडियावर बाबा कदम यांच्याविषयीच्या पानावर केवळ एकच ओळ.. मराठी साहित्यिकांचे आणि मराठीचे दुर्दैव.. आणखी काय?)

  • अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर

    “मॅन ऑफ क्रायसिस’ हा किताब त्यांना ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिला, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. एकनाथ सोलकर यांची कारकिर्द : २७ कसोटी १०६८ धावा, एक शतक, ६ अर्धशतके, १८ विकेट्‌स, ५३ झेल. ७ वनडे २७ धावा, ४ विकेट्‌स, २ झेल. १८९ प्रथम श्रेणी सामने, ६८९५ धावा, ८ शतके,३६ अर्धशतके, २७६ विकेट्‌स, १९० झेल.

  • गीतकार योगेश्वर अभ्यंकर

    योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होऊन गेले. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.'अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले' यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. सर्जनशील कवी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस

    गणपतराव बोडस यांचे संपूर्ण नाव गणेश गोविंद बोडस; पण गणपतराव याच नावाने ते ओळखले जात. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला. संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली.

    गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले.

    रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

    के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता.

  • बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर

    २००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.

  • पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला.

    त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.

    पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. नंतर त्यांची छ्त्तीसगड राज्यातील खैरागढ येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली. तसेच शीव येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले. त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर. भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो. त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या.

    आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे. त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे

    आज हार्मोनियम वादक,अभिनेते व संगीतकार,पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक,गोविंदराव टेंबे यांची पुण्यतिथी.

    जन्म :- ५ जून १८८१

    मा.गोविंदराव टेंबे ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक, होते. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका करून ते भारतभर गाजलेले नट होते. संगीत नाटकांचे लेखक, ‘मानापमान’ नाटकाचे संगीतकार व त्याच नाटकात धैर्यधराच्या भूमिकेने मराठी रंगभूमि गाजवणारे गायक नट, ‘माझा संगीत विहार’ व ‘माझा जीवन विहार’ या आत्मचरित्रपर रसाळ ग्रंथांचे लेखक अशीही मा. गोविंदराव टेंबे यांची ओळख सांगता येईल. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. पेटीचे सूर महाराष्ट्रात कायमचे उमटून ठेवणारे मा.गोविंदराव टेंबे यांची यांची खूप माहिती इंटरनेट वर नाही.

    ‘माझा जीवन विहार’ या ग्रंथात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.

    ” मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची ; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. मा.गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.गोविंदराव टेंबेयांना आदरांजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- स. ह. मोडक

  • पतियाळा घराण्याचे गायक सुरेश वाडकर

    सुरेश वाडकर यांना लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.

    १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.

    ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. सुरेश वाडकर यांची पत्नी पद्मा वाडकर याही गायिका आहेत. या दोघांनीही गायकीच्या जगात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केले आहे. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.

    कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही सुरेश वाडकर यांना मिळाला आहे. तसेच २०१९ मध्ये सुरेश वाडकर यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=-KTx-FJE3Y0
    https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
    https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
    https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg

    सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
    https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
    https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE