प्रसिद्ध राजकीय इतिहासकार प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या आजवरच्या जडणघडणीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि विचारांचे भव्य दालन खुले करून देते. त्यातील विसाव्या शतकात समाज आणि संस्कृतीच्या अंगाने होत गेलेल्या वैचारिक स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘ओपनिंग रोझबड्स’ या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यावरील लेखावर आधारित हे टिपण...
संस्कृती ही एकरेषीय संकल्पना नाही. ती कप्प्या-कप्प्यातही मांडता येत नाही. कारण ती व्यामिश्र, गुंतागुंतीची, खूपशी व्यापक-पसरट अशी असते. ज्या देशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम व जैन धर्म एकाच वेळी नांदले, त्या देशाची सांस्कृतिक व्याख्या संकुचित धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या सांस्कृतिक विश्वाच्या खोल गुहेत अलगद घेऊन जाताना याच वास्तवाची खोलवर जाणीव करून देते.
गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजींपर्यंत व पुढे विल्यम जोन्सपासून धीरुभाई अंबानी यांच्यापर्यंत ५० लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचा वैचारिक वेध घेत हे पुस्तक आपल्याला भारताच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या बौद्धिक संपृक्ततेचा अनुभव देते. हा वेध केवळ व्यक्तिमत्त्वांची ओळख व त्यांच्या कार्यापुरती मर्यादित नाही तर तो आपला आपल्याशी संवाद आहे. कधी हा संवाद वादविवादाचा, तर कधी आपल्या वैश्विक जाणिवा अधिक समृद्ध, विस्तारित करणारा आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या ‘भारतरत्न’ एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे काळाच्या एका टप्प्यावर प्रभाव टाकणारे रोमहर्षक जीवन या पुस्तकात समाविष्ट करून लेखकाने एक मोठे सांस्कृतिक- सामाजिक संचित नव्याने उलगडून दाखवले आहे.
भारत ब्रिटिशांची वसाहत होण्याअगोदर राजेरजवाड्यांकडून देवदासी प्रथा चालवली जात असे. परंतु ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर संस्थानिक, राजेरजवाड्यांची संस्थात्मक रचना मोडकळीस येऊन देवदासी पद्धतीचे स्वरूपही बदलू लागले. विल्यम जोन्स व अन्य ओरियँटिलिस्ट इतिहास संशोधकांनी भारतीय प्राचीन इतिहास तसेच संस्कृत भाषेच्या गौरवशाली इतिहासाची पाश्चात्त्य नजरेतून मांडणी केल्यामुळे, त्याचबरोबर अॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफी सोसायटीच्या प्रभावी चळवळीमुळे भारतीय कलांच्या सादरीकरणाला नवा आयाम मिळाला. नव्या ब्रिटिश कायद्यांमुळे या प्रथेवर बंधने आली, पण त्यात भारतीय संगीत गुदमरले नाही. अशा वातावरणात मदुराईमधल्या एका सायकल दुकानासमोर वयाच्या दहाव्या वर्षी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनास प्रारंभ झाला.
‘एम. एस.’ या आद्याक्षरांनी ओळखल्या गेलेल्या सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म मदुराईचा (१९१६). एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. याच काळात ग्रामोफोनचा शोध लागला. सामाजिक-सांस्कृतिक बंधने गळून पडत संगीताशी नाते अधिक घट्ट होत गेले.
१९३६ मध्ये सुब्बुलक्ष्मी यांची एका प्रसिद्ध मासिकात मुलाखत प्रसिद्ध झाली. या मासिकाचे संस्थापक-संपादक होते, सदाशिवम. हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा होता. सदाशिवम हे जन्माने ब्राह्मण होते, कॉम्रेड चिदंबरम पिल्लई यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. सदाशिवम यांची सुब्बुलक्ष्मी यांच्याशी भेट झाली, तेव्हा सदाशिवम ३३ वर्षांचे होते, तर सुब्बुलक्ष्मी केवळ १९ वर्षांच्या. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मींशी लग्न करायचे होते, पण या लग्नाला सुब्बुलक्ष्मीच्या आईचा कडवा विरोध होता. आपल्या मुलीला मिळणाऱ्या पैशासाठी सदाशिवम लग्न करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत. याच काळात खुद्द सुब्बुलक्ष्मी या प्रसिद्ध कर्नाटक संगीताचे गायक व अभिनेते जी. एन. बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रेमात होत्या.
सुब्बुलक्ष्मी यांनी या काळात काही प्रेमपत्रे बालसुब्रह्मण्यम यांना लिहिली होती. या पत्रात दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिसत होता. या पत्रात तृप्ती, समाधान, स्थिरचित्त, अात्यंतिक आनंदी अशा शब्दांचा वारंवार उल्लेख केल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर सुब्बुलक्ष्मी यांना आपली आई व सदाशिवम यांच्यापासूनही दूर राहायचे होते, असेही स्पष्ट जाणवत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. १९४०च्या आसपास सदाशिवम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी गुप्तपणे विवाह केला. सुब्बुलक्ष्मींचे संगीतावरील प्रेम व तादात्म्य वृत्तीमुळे सदाशिवम यांनी या विवाहाचा आदर राखत, त्यांच्या गायनाला अधिक अवकाश देण्याचे ठरवले. या काळात देवदासी प्रथा मोडकळीस आल्याने या प्रथेतील भरतनाट्यम हे नृत्य व कर्नाटक संगीताला उच्चवर्णीयांनी आश्रय दिल्याने त्याला अभिजनाचा दर्जा मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फायदा घेत सदाशिवम यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाचे देशभर कार्यक्रम ठेवण्यास सुरुवात केली. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्वर्गीय सुरात रसिक न्हाऊन जात होतेच, पण त्यांच्या अत्यंत साध्या निगर्वी व्यक्तिमत्त्वामुळे सुब्बुलक्ष्मी यांची लोकप्रियता जनमानसात उत्तरोत्तर वाढत होती.
त्या वेळच्या तामीळ चित्रपटात संगीताला विशेष स्थान मिळाले होते. त्याला अधिक उंची सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाने मिळाली होती. सुब्बुलक्ष्मी यांचा स्वर्गीय स्वर व भारतीय स्वातंत्र्यलढा तसा समांतर होता. पण त्यांच्या स्वराने या लढ्याला राष्ट्रीय अभिमानाचे रूप दिले. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मीचे जीवन पडद्यावर आणायचे होते, पण ते मांडण्यासाठी त्यांनी भक्ती संगीत परंपरेतील मीराबाई हिच्या जीवनप्रवासाचा आधार घेतला. १९४५मध्ये ‘मीरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तामीळ भाषेबरोबर हिंदीतही डब करण्यात आला. हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, “संत मीरा यांचा जीवनप्रवास हा भारतातील श्रद्धास्थानांचा, भक्तीमार्गाचा व अलौकिक स्वर्गप्राप्ती देणाऱ्या परंपरांचा आहेच, पण सुब्बुलक्ष्मी यांची या चित्रपटातील अदाकारी पाहता त्यांनी साकारलेली मीरेची व्यक्तिरेखा मीरेची नाही, तर खुद्द त्यांचीच भासते आहे.” सदाशिवम यांना जे अपेक्षित होते, ते त्यांना मिळाले.
सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय पातळीवर नेण्याची पराकाष्ठा सदाशिवम करत होते, त्यात त्यांना यश मिळत गेले. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय नेत्यांमध्ये पोहोचवले. म. गांधी, नेहरू यांच्यापुरते ते मर्यादित न राहता परदेशात, युनोमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. पं. नेहरूंनी त्यांना ‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. रुग्णालये, शाळा, अनाथाश्रम, क्षयरोग केंद्रे ते हिंदू देवळे अशा सार्वजनिक ठिकाणी सुब्बुलक्ष्मी यांनी हजारो कार्यक्रम केले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला. सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने विनम्रता, एकनिष्ठा, ईर्षा, महत्त्वाकांक्षा, निराशा, अलिप्तता आदी भाव-भावनांचे दर्शन होत गेले.
१९९७ मध्ये त्यांना केंद्र सरकारने सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. असा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्याच गायिका ठरल्या. हा पुरस्कार सोहळा पाहण्यास सदाशिवम जिवंत नव्हते, ते एक वर्षाआधी गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनातून सुब्बुलक्ष्मी यांनी निवृत्ती घेतली होती. २००४मध्ये त्यांचे निधन झाले. संस्कृती-परंपरा-समाज राजकारण यातील परस्परप्रभावाचे, समाजाच्या वैचारिक बदल आणि उत्क्रांतीचे प्रतीक सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने सर्वार्थाने इतिहासाच्या पटलावर कोरले गेले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला...
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सुजय शास्त्री
प्रेमनाथ यांचे वडील रायसाहेब कर्तारनाथ यांची अशी इच्छा होती की, आपल्या मुलाने लष्करात सामील व्हावं. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२६ रोजी जबलपुर येथे झाला. ते स्वत: ऐकेकाळी रेवा स्टेटचे आय.जी.पी. होते. आपल्या मुलानेही प्रामाणिक आणि शिस्तप्रिय जीवन जगावं अशी त्याची भारी इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी प्रेमनाथला लष्करात पाठवलं सुध्दा, पण प्रेमनाथची स्वत:ची आवड वेगळीच होती. त्याला मुंबईच्या हिंदी चित्रपटसृष्टीत उडी घ्यायची होती.
एवढयासाठी त्याने सैन्यातून पळ काढला आणि मुंबई गाठली. इथे आल्यावर इंदौरचे एक नातेवाईक पृथ्वीराज कपूर यांच्या नाटक कंपनीतच होते. त्यांचा त्यांनी आश्रय घेतला. पण पृथ्वीराज कपूराना सगळी हकीकत कळल्यानंतर त्यांनी आपला मुलगा राज कपूर यांना सोबत घेऊन प्रेमनाथ यांना घरी जाण्यास सांगितलं. नाराज मनानं प्रेमनाथ घरी परतला. पण इथे एक भलतंच नाटक घडलं. प्रेमनाथबरोबर आलेल्या राज कपूरने प्रेमनाथची बहीण कृष्णा हिला बघितलं आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. नंतर हे नातं अगदी घटट् झालं.
प्रेमनाथने याच नात्याला यशाची पायरी बनविण्याचं ठरवलं. पृथ्वी थिएटर्सच्या 'दीवार' नाटकात प्रेमनाथने ब्रिटीश माणसाची रंगविलेली भूमिका सगळयांना आवडली. ही भूमिका त्याला कपूर घराण्याशी जवळचं नातं जोडलं गेल्यामुळेच मिळाली होती. नंतर राज कपूरच्या 'आग' चित्रपटात 'चित्रकार राजाबाब' ची महत्त्वपुर्ण भूमिका प्रेमनाथला मिळाली. या चित्रपटातली प्रेमनाथची भूमिका खूप गाजली. प्रेमनाथला नायक म्हणून पहिला चित्रपट 'अजित' या नावाने मिळाला होता. यात त्याची नायिका होती मोनिका देसाई.
१९५१ साली प्रेमनाथची सात चित्रपट पडद्यावर आले. नंतर त्यांनी अनेक टॉपच्या हिरोईन्सबरोबर काम केले. हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.
ऐंशीच्या दशकात प्रकृती स्वास्थ्य खालावल्याने प्रेमनाथ यांनी चित्रपटात काम करणे काही अंशी कमी केले. या काळात त्यांच्या कर्ज, क्रोधी, देशप्रेमी यांसारखे चित्रपट प्रदर्शित झाले. १९८५ मध्ये आलेला हम दोनो हा प्रेमनाथ यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. निर्माता निर्देशक सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांची जोडी. बरीच नावाजली गेली.
सुभाष घई यांसोबत प्रेमनाथ यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, आणि क्रोधी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. प्रेमनाथ यांचे ३ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जीवन म्हणजे काय, ते कशा पद्धतीने जगले पाहिजे. स्वतःमधील ईंश्वर ओळखा व आनंदी जीवन जगा हा संदेश अखिल मानव जातीला देणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू श्री. रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी झाला.
एक मानवतावादी नेता, अध्यात्मिक गुरु आणि शांतीचे दूत म्हणून श्री श्री रवी शंकर यांची ख्याती जगभरात आहे. तणावमुक्त व हिंसामुक्त समाजाचे हे त्यांचं स्वप्न आह. हे स्वप्न साकार होत आहे ते दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरे आणि सेवा कार्यांमारफत. परिणामी, जगातील करोडो लोक एकत्रित नांदत आहेत.
चार वर्षाचे असताना ते श्रीमद्भगवद्गीता तोंडपाठ म्हणून दाखवू शकत आणि ते अनेकदा ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत. त्यांचे पहिले गुरु होते सुधाकर चतुर्वेदी, ज्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर खूप वर्षे काम केले. त्यांच्याकडे वेद साहित्य आणि भौतिकशास्त्र अशा दोन्ही पदव्या आहेत . श्री श्री रवी शंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा इथे असताना दहा दिवसांच्या मौनात होते. ह्या काळातच सुदर्शन क्रिया, एक शक्तिशाली श्वसन तंत्र, याचा जन्म झाला. कालांतराने सुदर्शन क्रिया ही दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचे मुख्य गुणवैशिष्ट्य बनली. श्री श्री रवी शंकर यांनी आंतरराष्ट्रीय, नफा न कमावणारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून दि आर्ट ऑफ लिविंगची स्थापना केली. या संस्थेचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम हे तणाव निर्मुलनासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी लागणारी प्रभावी तंत्र शिकवतात. केवळ एका प्रकारच्या जनसमुदायाला आवाहन न करता हे कार्यक्रम जगभरात आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरले आहेत.
१९९७ साली त्यांनी इंटरनॅशनल (आंतरराष्ट्रीय) असोसिएशन (संस्था) फॉर हुमन (मानवतावादी) व्हॅल्यूज (मुल्ये) (आय.ए.एच.व्ही) ही संस्थासुद्धा प्रस्थापित केली. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे दीर्घकालीन असे विकासाचे उपक्रम राबवणे व दि आर्ट ऑफ लिविंगबरोबर समन्वय साधून संघर्ष निवारण करणे. भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका इथे गावागावातून या दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते युद्धपातळीवर दीर्घकालीन विकास-कामे हाती घेत आहेत. ४०,२१२ गावांमध्ये संस्थेचे काम सुरु आहेत. एक नावाजलेले मानवतावादी नेता म्हणून श्री श्री रविशंकर यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या प्रेरणेने नैसर्गिक आपत्तीग्रस्त, अतिरेकी हल्ल्यात आणि युद्धात बचावलेले, उपेक्षित आणि सतत संघर्षात भरडल्या जाणा-या जमातीतील मुले अशा विविध परिस्थितीतील लोकांना दिलासा देण्याचे काम चालू आहे.त्यांच्या संदेशाच्या ताकदीने अध्यात्मावर आधारित एक सेवा कार्याची लाट समस्त कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जगभर हे कार्यकर्ते आणीबाणीच्या परिस्थितीत या उपक्रमांना पुढे नेत आहेत.
एक अध्यात्मिक गुरु म्हणून श्री श्री रवी शंकर यांनी योग आणि ध्यान या परंपरांना पुनरुज्जीवीत केले आहे आणि २१व्य शतकाला शोभेल अश्या प्रकारे जागासमोर ठेवले आहे. प्राचीन ज्ञानाला पुनरुज्जीवन देण्याच्या पलीकडे जाऊन, श्री श्री रवी शंकर यांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाची नवीन तंत्रे निर्माण केली आहेत. यात समावेश आहे तो सुदर्शन क्रिया या तंत्राचा ज्याने तणावापासून मुक्ती मिळवण्यात आणि आंतरिक उर्जेचे स्रोत्र शोधण्यात आणि दैनंदिन जीवनात शांती मिळवण्यात करोडो लोकांना मदत केली आहे. ३१ वर्षांच्या अल्पावधीतच त्यांच्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या उपक्रमांनी १५२ देशांमध्ये जवळजवळ ३७ करोड लोकांचे आयुष्य पालटले आहे.
जागतिक स्तरावर संघर्ष निवारण व हिंसामुक्तीचा प्रसार जगभरातील सार्वजनिक व्यासपीठे आणि सभांद्वारे केला जातो.
शांती हे एकच उद्देश्य असलेले एक तटस्थ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच युद्धग्रस्त भागातील लोकांच्या आशांचे प्रतिनिधित्व श्री श्री करतात. इराक, आयव्हरी कोस्ट, काश्मीर आणि बिहार येथे विरोधी पक्षांना वाटाघाटी करण्यास एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांना खास मान्यता मिळाली आहे. (भारतातील कर्नाटक सरकारने) कृष्णदेव राय याच्या राज्याभिषेकाच्या ५००व्या तिथी निमित्त त्यांना स्वागत समितीचे अध्यक्ष नियुक्त केले होते. (भारतातील जम्मू आणि काश्मीर सरकारने) त्यांना अमरनाथ मंदिराच्या बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. विविध उपक्रम आणि भाषणांतून श्री श्री रवी शंकर हे सातत्याने मानवी मूल्यांचे प्रबलीकरण करण्यावर जोर देतात. मानवतावाद ही आपली सर्वप्रथम ओळख आहे याची जाणीव करून देतात. सर्वधर्मसमभाव वृद्धिगत करणे आणि बहु-सांस्कृतिक शिक्षणाकरिता ते साद घालीत आहेत कारण धर्मांधतेवर हाच उपाय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महत्वाच्या ठिकाणी कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यांच्या कामामुळे जगभरातील करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. वंश, राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन “वासुदैव कुटुंबकम” स्थापित करण्याची प्रेरणा जगभर देत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी माणसांची ‘डिस्को दांडिया’शी जानपहचान करून दिली ती याच बाबला शहा यांनी. दोन काठ्या घेऊन तलवारबाजी केल्यागत नाचणाऱ्या तरूण पिढीला नवरात्रीत दांडियात शिस्तबद्ध कसं नाचायचं याचं बाळकडू मिळालं या बाबलांच्यामुळे.
स्थापना : ४ फेब्रुवारी १७६८
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे.
मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्याहमुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.
या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.
त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला.
आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.
मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना "बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" अशी जबरदस्त आहे...
हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छ.शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.
१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक".हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली.
नंतर आपल्या लोकांनी 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत मर्दमुकी गाजवत आपले नाव प्रतिभेच्या सर्व दालनांवर सुवर्णाक्षरांनी कोरले.
राहुलचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूर इथं एका महाराष्ट्रीय कुटुंबात या प्रतिभावान क्रिकेटपटूचा झाला. मात्र द्रविड कुटुंब कर्नाटकला वास्तव्याला असल्याने त्याचं शालेय शिक्षण बंगळुरूमधील सेंट जोसेफ बॉईस या शाळेत तर कॉलेज सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून झालं. शरद आणि पुष्पा या द्रविड दाम्पंत्याचा हा मुलगा अभ्यासात हुशार आणि सिनसिअर होता. याशिवाय त्याला क्रिकेटचीही तेवढीच आवड होती. राहुलने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
शालेय क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या राहुलला ३ एप्रिल १९९६ मध्ये प्रथम टीम इंडियासाठी दरवाजे उघडले. यानंतर त्याच वर्षी जूनमध्ये त्याची प्रथमच टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली. यानंतर गेली जवळपास १५ वर्ष द्रविड टीम इंडियाचा एक भक्कम अविभाज्य घटक बनला आहे. त्याने अनेकदा टीम इंडिया संकटात असताना विकेटवर टिच्चून भारताची लाज राखली आहे. त्याच्या या चिकाटी आणि मेहनतीमुळेच त्याला 'द वॉल' ही बिरुदावली चिकटली.
द्रविडने आतापर्यंत १६२ टेस्टमध्ये ५२.८२ च्या सरासरीने १३ हजार अधिक रन्स केल्या आहेत. यामध्ये ३६ सेंच्युरी आणि ६३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर ३४४ वन-डेमध्ये त्याने ३९.१६ च्या सरासरीने १० हजार ८८९ रन्स केल्या आहेत. यामध्ये १२ सेंच्युरी आणि ८३ हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. द्रविडची बॅटिंगची शैली ही जगातिल सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे. तंत्रशुद्धता हा त्याच्या बॅटिंगचा आत्मा आहे. याशिवाय मैदानावर आणि मैदानाबाहेरील त्याची वागणूक ही कोणाही क्रिकेटपटूसाठी एक आदर्श आहे. एप्रिल २०१६ पर्यंत राहुल द्रविड हा कसोटी क्रिकेटमधील सचिन तेंडूलकर, रिकी पाँटिंग आणि जॅक कॅलिसनंतर चवथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तसेच कसोटी आणि एकदिवसीय ह्या दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १०००० धावा करणारा सचिन तेंडूलकर नंतर तो भारताचा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे. २००४ मध्ये, चट्टग्राम येथे बांगलादेशविरूद्ध शतक केल्यानंतर, सर्वच्या सर्व दहा कसोटी खेळणार्या देशांत शतके करणारा, तो जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज बनला. एप्रिल २०१६ पर्यंत, यष्टीरक्षकाव्यतिरीक्त, कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जास्त झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने एकूण १६४ सामन्यांत २१० झेल घेतले आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये, इंग्लंडविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी अचानक निवड झाल्यानंतर, त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मधून निवृत्ती जाहीर केली आणि मार्च २०१२ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेट मधूनही निवृत्ती जाहीर केली. २०१२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. सिडनी येथे १ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सातव्या वार्षिक ब्रॅडमॅन पुरस्कार सोहळ्यात राहुल द्रविडचा, ग्लेन मॅकग्रासोबत सन्मान करण्यात आला होता. भारत सरकारने राहुल द्रविडला पद्मश्री आणि पद्म भूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये, राहुल द्रविड बंगळूर स्थित गोस्पोर्टस् फाऊंडेशमध्ये सल्लागार मंडळाचा सभासद म्हणून सामील झाला. गोस्पोर्टस् फाऊंडेशनच्या सहकार्याने राहुल द्रविड मार्गदर्शक कार्यक्रमाअंतर्गत तो भविष्यातील ऑलिंपिक आणि पॅरालिंपीक खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहे.[१६] भारताचा बॅडमिंटन खेळाडू प्रणॉय कुमार, पॅरा-जलतरणपटू शरथ गायकवाड आणि तरूण गोल्फपटू चिक्करंगप्पा एस. हे तो मार्गदर्शन करीत असलेल्या सुरवातीच्या गटातील खेळाडू आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले.
मराठीतील निवेदक, मुलाखतकार, लेखक, पत्रकार मा.सुधीर गाडगीळ यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९५० रोजी झाला.
सुधीर गाडगीळ यांनी विविध क्षेत्रातील २८०० हून अधीक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. या मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्योगपती शंतनु किर्लोस्कर, अभिनेत्री माधुरी दिक्षित, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, गायक आशा भोसले, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण. यांचा समावेश आहे.
त्यांच्या मुलाखती म्हणजे मान्यवरांशी मारलेल्या अनौपचारिक दिलखुलास गप्पा असतात. प्रास्ताविक आणि पाहुण्यांची नावं तपासत लाडे लाडे निवेदन करण्याच्या काळात मा.सुधीर गाडगीळ यांनी स्वत:चं मुलाखतकार आणि निवेदक म्हणून हुकमी स्थान निर्माण केलं. त्यासाठी पत्रकारितेतील अनुभवाचा त्यांना खूपच उपयोग झाला. सुधीर गाडगीळ यांची कारकिर्द १९७० च्या सुमारास सुरु झाली. १९७१ मध्ये मुंबईत ‘तेजस्वी’ साप्ताहिक सुरू झाले होते. तिथे ते मुंबईचा ब्युरो इन्चार्ज म्हणून काम करू लागले. कॉमर्समधून पदवी घेतल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रची ऑर्डर हातात असतानाही मा.सुधीर गाडगीळ ‘मनोहर’ साप्ताहिकात सहसंपादक म्हणून काम करू लागले.
१९७३ ते १९८० पर्यंत त्यांनी ‘मनोहर’मध्ये काम केलं. ‘मनोहर’ ही त्यांची शेवटची नोकरी. त्यानंतर मुक्तपत्र कारिता केली. ‘मुलखावेगळी माणसं’ ‘प्रतिमा आणि प्रतिभा’, ‘गजरा’, ‘युवदर्शन’, ‘मुखवटे आणि चेहरे’ असे अनेक दूरदर्शन साठी कार्यक्रम त्यांनी केले. विशेष म्हणजे, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर या मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रकट मुलाखती घेण्याचा मान सुधीर गाडगीळ यांच्या कडे आहे. मा.आशा भोसले यांच्या जाहीर मुलाखती तर ते सलग २७ वर्ष घेत आहेत. जुलै १९८५ मध्ये त्यांनी आशा भोसले यांची पहिल्यांदा मुलाखत घेतली.
प्रकट मुलाखती घेण्याच्या बाबतीत तर मा.सुधीर गाडगीळ यांच्या नावावर राष्ट्रीय उच्चांक आहे. त्यांनी आतापर्यंत ३ हजार ६८२ प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. त्यांनी टीव्हीवर घेतलेल्या मुलाखतींवर आधारित ‘मुलखावेगळी माणसं’ असा एकपात्री स्वतंत्र कार्यक्रम केला. पण, तो फक्त परदेशांकरिता. टीव्हीवर त्याच नावाचा कार्यक्रम होता. पण, तो वेगळा होता. तिथे मी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या होत्या आणि इथे त्यांनी घेतलेल्या सगळया माणसांचं मुलखावेगळंपण एकत्र किस्से-कथनाच्या माध्यमातून मांडत होतो.
अमेरिकेतल्या तर ५१ शहरांमध्ये आठ वेळा जाऊन त्यांनी हा कार्यक्रम केला. दक्षिण पूर्व अमेरिका, मॉरिशस, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका अशा सर्व ठिकाणी महाराष्ट्र मंडळातून हे कार्यक्रम केले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुधीर गाडगीळ यांची माहिती, मुलाखत वाचण्यासाठी
http://mulakhat.com/sudhir-gadgil/
http://thinkmaharashtra.com/node/1885
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत
त्यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी चाफळ जिल्हा सातारा येथे झाला.
कवी यशवंत तथा यशवंत दिनकर पेंढारकर यांना आपण चाफळचे रहिवासी आणि जुन्या कालखंडात सांस्कृतिक उत्थानासाठी भरीव कार्य केलेले पुण्यपुरूष समर्थ रामदास चाफळचे, या योगायोगाबद्दल त्यांना अत्यंत अभिमान वाटायचा. समर्थ रामदास आणि शककर्ते छत्रपती शिवाजीमहाराज ही त्यांची श्रद्धास्थाने. संस्कारक्षम वयात डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची लोकमान्य टिळकांची युयुत्सू राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांना स्फूर्तिप्रद वाटायची. ""छंद लागला टिटवीला । तिने समुद्रहि आटविला हे शब्द त्यांच्या अंतःकरणावर कोरलेले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती ऊत्सवाचा संस्कार त्यांच्यावर झालेला. तेव्हापासून त्यांच्या भावविश्वासत समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांना महत्त्वाचे स्थान मिळालेले. कवी यशवंत यांच्या लौकिक जीवनाचा मार्ग अत्यंत खडतर होता. शालेय शिक्षणास ते सांगलीला राहिले. तेथील सिटी हायस्कूलमधून डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही. त्यातही जमेची बाब ही की त्या शाळेतील शिक्षक, नामवंत कवी आणि कादंबरीकार साधुदास ऊर्फ गो. गो. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कवी यशवंत यांच्यावर पडला. पुढे यशवंत पुण्याला गेले.
अभिरुचिसंपन्न कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले. प्रा. श्री. बा. रानडे आणि सौ. मनोरमा श्रीधर रानडे या प्रेमळ दांपत्याची पाखर त्यांना लाभली. मनोरमा रानडे तर सर्वांची आवडती जिजी होती. माधव जूलियन यांच्यासारख्या व्युत्पन्न, प्रतिभावंत आणि मनस्वी कवीचा सहवास त्यांना लाभला. दिवाकरांसारखे चोखंदळपणे वाचन करणारे मित्र होते. शिवाय वि. द. घाटे, प्रा. द. ल. गोखले आणि ग. त्र्यं. माडखोलकर होते. या समानधर्मी मित्रांच्या सहवासामुळे यशवंतांना नवीन क्षितिज खुणावू लागले.
औपचारिक शिक्षणाची उणीव त्यांनी चौफेर आणि चोखंदळ वाचनाने भरून काढली. एकीकडे लौकिक जीवनातील वैशाखवणवा होता, तर दुसरीकडे अलौकिक काव्यानुभूतीचे मोरपीस अंतर्मनाला आल्हाद देत होते. अशा संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अनन्य निष्ठा यशवंतांनी ढळू दिली नाही. त्याविषयीची मानसप्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणतात, ""कारकुनी म्हणजे असेल नसेल त्या अभिरुचीची राखरांगोळीच! अशा परिस्थितीत कवितेच्या आवडीचे कोवळे मुगारे करवून जायचे. पण वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळून ठेवावी त्याप्रमाणे अंतर्यामीची असलेली कवितेची आवड मी जोपासली. काव्य ही एक उपासना आहे, ते एक व्रत आहे, अशी त्यांच्या मनाची धारणा होती.
उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्व त जीवनमूल्यांचा त्यांनी उद्घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या "आई' या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.
"आई' म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
या ओळींतील आर्तता आणि करुणा अंतःकरणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.
आई! तुझ्याच ठायी सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे
"दैवतें माय-तात' या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दुःखाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. "समर्थांच्या पायांशी', "माण्डवी' व "बाळपण' अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. "लाह्या-फुले' या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाह्या-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्वईर्य अनन्त हेंच आम्हां!
यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. "प्रीतिसंगम', "प्रेमाची दौलत', "चमेलीचे झेले' आणि "एक कहाणी' या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. "एक कहाणी' मध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे.
"चमेलीचे झेले'मध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. "एका वर्षानंतर' या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते... ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुझ्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्या मुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो... सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. ""आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) ""स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) "तुटलेल्या तारा' या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. "सिंहाची मुलाखत' या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात.
"गुलामाचे गाऱ्हाणे' आणि "इशारा' या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. "तुरुंगाच्या दारात' या कवितेत कवी उद्गारतो... वाढु दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती मन्मना नाही क्षिती भिंतिच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी? मुक्त तो रात्रंदिनी
शृंखला पायात माझ्या चालताना रुमझुमे घोष मंत्रांचा गमे या ओळीतून आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी दर्शन घडते. "मायभूमीस अखेरचे वंदन' या कवितेत मृत्यूवर मात करणारी वृत्ती दिसून येते.
जीवनाचे विविध पैलू कवी यशवंत यांनी आपल्या कवितेतून उलगडले. त्यांच्या कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. "बंदीशाळा' हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. "काव्यकिरीट' हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणा विषयावरील खंडकाव्य आहे. "जयमंगला' मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी "छत्रपती शिवराय' हे महाकाव्य रचले. "मुठे, लोकमाते' हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे.
"मोतीबाग' हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे. यशवंतांनी लिहिलेली ’घायाळ’ ही कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) रूपांतर आहे. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते. कवी यशवंत यांचे २६ नोव्हेंबर १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti