मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांचा जन्म २१ जुन १९७१ रोजी पुणे येथे झाला.तसेच ‘रमा माधव’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षण घेत असताना ‘स्वामी’ या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
‘राजवाडे अँड सन्स’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘कशाला उद्याची बात’, ‘यल्लो’ या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच ‘आशिक’, ‘राम गोपाल वर्मा की आग’, ‘रास्ता रोको’, ‘छोडो कल की बातें’, ‘मेड इन चायना’ या हिंदी चित्रपटांमधूनही मृणाल झळकली होती. पण, ‘सोन परी’ या मालिकेने त्यांना खरी ओळख देत घराघरात पोहोवले. ‘राजा शिवछत्रपती’, ‘मीरा’, ‘स्पर्श’, ‘गुंतता ह्रदय हे’, ‘अवंतिका’ या मालिकांद्वारेही त्यांनी अनेकांच्याच मनावर राज्य केले. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. मृणाल यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे.
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आणि 'रमा माधव' या मराठी सिनेमांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. मृणाल या प्रसिद्ध साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. साहित्यिक वीणा देव त्यांच्या आई आहेत. मृणाल कुलकर्णी यांचे चिरंजीव विराजस याने जाहिरात माध्यमातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिवाय सुभाष घईंच्या विस्लिंग वूड या संस्थेतून त्याने फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे दिग्दर्शक सिद्धार्थ बसू यांच्यासोबत काम करण्याची त्याला संधी मिळाली आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे.
सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.
हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने ॲपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला ॲपल-१ हा पीसी लाँच केला. ॲपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे ॲनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या ॲपलच्या सल्लागारपदावर ते परतले. २००७ मध्ये ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला.
२००१ साली ॲपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. ॲपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.
ॲपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी ॲपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स ॲपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार ॲपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव ॲपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले ॲपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.
२००७ वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.
जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. ॲपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
कवी मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. पन्हाळगड इथे पराडकर कुळात इ.स. १७२९ मध्ये मोरोपंतांचा जन्म झाला.
पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले.
वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरुन बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कर्हां नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्याम मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतानी ७५ हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे.
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
मोरोपंत यांचे १५ एप्रिल १७९४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुरूवातीला सी.आर.व्यास यांनी महाराष्ट्रातील बासरी गावातील पंडीत गोविंदराव भातांबेकर यांच्याकडे धडे घेतले. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी झाला. पुढे पंडीत सी. आर. व्यास मुंबईमध्ये स्थायिक झाले पण त्यांनी ग्वालियर घराण्यातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे प्रशिक्षण घेणे सुरू ठेवले. आग्रा घराण्याच्या पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सांगितिक कौशल्य अधिक बहरले. अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे. संगीताच्या दुनियेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल १९८७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९२ साली पद्मभुषण पुरस्कार आणि १९९९ साली तानसेन पुरस्कार मिळाले.
सी.आर.व्यास यांचे १० जानेवारी २००२ रोजी त्यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
’सुखाचे सोबती’, ’बोलकी बाहुली’, ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ’मानाचा मुजरा’, ’करावं तसं भरावं’, ’दीड शहाणे’, ’ठकास महाठक’, ’गडबड घोटाळा’, ’तुझी माझी जमली जोडी’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राजा बारगीर यांचे १८ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
यश चोप्रा यांनी पाच दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.
वंदनीय माई मंगेशकर ह्यांच्या लेखाचे शब्दांकन करण्याची सुवर्णसंधी मला लाभली होती. "स्वरमंगेश" ह्या गौरवग्रंथामध्ये "मालक" ह्या शीर्षकाने, २४ एप्रिल १९९५ रोजी प्रसिद्ध झालेला हा लेख ! लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, पं हृदयनाथजी ह्या पंचामृताने माझं कौतुक केलं ! आज चोवीस एप्रिल २०१७ रोजी वंदनीय मास्टर दीनानाथांची पंचाहत्तरावी पुण्यतिथी आहे,
|| मालक ||
"माझ्या घरांत मी तुला काही काम पडू देणार नाही", असं मालकांनी मला लग्नाच्यावेळीच सांगितलं होतं ! अगदी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही कधी. एकदा मालक आंघोळीला निघाले म्हणून मी धोतराच्या नि-या करून ठेवल्या, तर किती रागावले माझ्यावर, "तू काय हमालाची बायको आहेस का ?"
आज माझ्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मी मालकांच्या आठवणी आठवू पहाते, तर अगदी काल परवा घडल्या असाव्यात, अशा सा-या स्मृती माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागतात !
माझ्या माहेरी जेवणानंतर, मला पान खायची सवय होती ! लग्नानंतर दोन दिवसांनी मालकांना काय वाटले, कोणास ठाऊक ? "यापुढे पान बंद", असं मालक म्हणाले. पानाचे सगळे साहित्य मालकांनी फेकून दिले. नंतर काय झाले, मालक गड्याला म्हणाले, "जेवण झालं की एक विडा करून हिच्या उशापाशी ठेवत जा" !
एक दिवस मालक, खालूनच "माई, माई", अश्या मोठ्याने हाका मारीत आले. "अहो काय झालं?" मी विचारलं, पाहते तर काय, एका खिशात पानाचं सगळ साहित्य, नि दुस-या खिशात पिकलेली पानं, म्हणाले, "तुला लागतात ना, म्हणून पिकलेली पानं घेऊन आलोय"! मालकांचा असा भोळा अन् प्रेमळ स्वभाव !
माझी सासू फार कडक होती. मी खानदेशातली म्हणून सासू मला "घाटी" म्हणायची, पण मालक इतके शांत की, आईला कधीही काहीही बोलायचे नाहीत. मी थोडी रागावले की, मालक म्हणायचे, "अगं माई, कां रागावलीस ? प्रेमाच्या राज्यांत तलवारीचं आणि भाल्याचं काय काम ?"
इतका शांत स्वभाव होता ह्यांचा ! हं दिवसभर शब्दांच्या कोट्या करायचे आणि दुस-याला हसवायचे !
मालाकांचं जेवण अगदी कमी असायचं, पण षोक मात्र खूप जेवण करून ठेवायचा. ह्यांना ओल्या हरभ-याची भाजी फार आवडायची. मटण, मासे,कोंबडी सगळं एकदमच करून ठेवायचं. दर पंगतीला ह्यांना कुणीतरी लागायचं. कधीही एकटे जेवले नाहीत, कुणीच नसलं, तर गॅलरीत उभे राहायचे आणि लोकांना हाका मारायचे, " काय रे बाबा, कुठे चाललास ? जेवलास कां नाही ? नाही तर ये आणि जेवून जा."
काही वेळा मालक अगदी बेफिकीर असायचे. एकदा गोव्याला रस्त्यानं आम्ही दोघे चाललो होतो. ते पुढे आणि मी मागे. ह्यांनी शर्टामध्ये गळ्याशी नोटा खोचून ठेवल्या होत्या. जोराचा वारा आला आणि शर्टामधल्या काही नोटा उडून खाली पडल्या. मी त्या नोटा उचलायला खाली वाकले, तर माझ्यावर ओरडलेच, "खाली पडलेल्या नोटा भिका-यासारख्या उचलू नकोस, गेले पैसे तर गेले, त्याच्या मागे कधी जाऊ नये."
प्रसंगी मालक अगदी लहान मुलासारखे हळवेही व्ह्यायचे. एकदा पुण्याला भाजीमंडईमध्ये, मी भाजी आणायला गेले होते, मुलं माझ्या बरोबर होती. घरी यायला आम्हाला जरा उशीर झाला तर इकडे जीव कासावीस होऊन, बायको-मुलं हरवली, अशी मालकांनी पोलिसात तक्रारही केली !
मालाकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी ही त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही. बैठकीचं गाणं ठरवायला कुणी आलं, तर म्हणायचे."माईला विचारा, तिने सांगितलं तर एका रुमालावरही गाईन."
मालक अगदी सनातनी होते. मुलींच्या लहानपणी, त्यांची सक्त ताकीद होती की, मुलींनी स्टेजवर यायचं नाही. मुलींनी पावडर लावायची नाही.
मालक उदार वृत्तीचे होते. एकदा मुंबईला रेडिओवर गायला गेले होते तर हातातल्या अंगठ्या कुणाला तरी देऊन, रिकाम्या बोटांनी घरी आले. मैत्री कशी करावी, हे तर मी मालकांच्या स्वभावातूनच पाहिलं. आयुष्यात फार मोठा दानधर्म मालकांनी केलेला मी स्वतः जवळून पाहिला आहे. पण शेवटी मालकांच्या अंगावर काय आलं तर भगवं धोतर !
मला चार मुली झाल्या, पण लोकांसारखे मालकांनी कधी, "मुलीच कां झाल्या ?" असं नाही म्हटलं. त्यांना मुलींचीच भारी हौस होती. मुलीना रागे भरलेले त्यांना आवडायचे नाही. मुलींना ते जराही दृष्टीआड होऊ द्यायचे नाहीत.
श्रीमंगेशावर मालकांची अगाध श्रद्धा होती ! लताच्या, बाळच्या आजारपणांत अगदी हळवे व्ह्यायचे. लताच्या आजारपणांत मालक कुंडली उघडून बसायचे. तंबोरा वाजवीत तोंडाने सारखी रामरक्षा म्हणायचे. लता देवीच्या आजारातून उठल्यावर तर मालकांनी बँड लावला होता. जेवढ्या बायका, लताला पहायला आल्या होत्या, तेवढ्या सगळ्यांची मी खणा-नारळांनी ओटी भरली होती ! उषाच्या पाठीवर मला मुलगा झाला, म्हणून उषाच्या वाढदिवसाला मालक उषाच्या पाठीची पूजा करायचे. उषा उगवली की प्रकाश येतो, म्हणून बाळला हे प्रकाश म्हणायचे. लताला हे "तताबाबा" म्हणायचे. आशा अगदी भोळसट म्हणून तिला हब्बू म्हणायचे. तर नाकाचं टोक जरा वरती म्हणून उषाला बुंडरी म्हणून हाकारायचे.
आम्ही सांगलीला होतो, तेव्हाची एक आठवण ! मालक नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने नेहमी मुंबईला जायचे. एकदा रुसून मी ह्यांना म्हणाले, "इतके नेहेमी मुंबईला जाता, तर माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणा". मालकांनी येतांना खरंच माझ्यासाठी दोन चांगली लुगडी आणली, त्यातल्या एका लुगड्याची मी घडी मोडली, तेवढ्यात दाराशी एक भिकारीण गात गात आली. तिच्या बरोबर तिची बारा-तेरा वर्षांची पोरगी होती, ती नाचत होती. ते पाहून मालकांना रडू आलं, मला म्हणाले, "पोटासाठी ती पोर नाचवीत आहे, ते मला बघवत नाही. तुझ्या अंगावरचे हे लुगडं, तिला देऊन टाकशील कां ?" काय करणार ? अंगावरचे लुगडं सोडून, मी त्या भिकारणीला देऊन टाकले. दिलदार असे की, एकदा त्यांनी नव्या आणलेल्या चादरी, दुस-याला देऊन टाकल्या.
मालक म्हणजे देवमाणूस होते ! लग्न झाल्यावर मी कधी माहेरी गेलेच नाही. कंपनीच्या किल्ल्या माझ्यापाशीच असायच्या.
मालकांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली, पण त्यांच्या संगीताचा जराही विसर पडला नाही.त्यांच्या गायकीपुढे आजचे तरुण गायक नम्रतेने मान झुकवतात. मालकांचा विलक्षण पल्लेदार आवाज, त्यांच्या नाट्यसंगीताला असलेला शास्त्रीय संगीताचा जबरदस्त आधार, रागदारी आणि लय यावरची त्यांची हुकमत, पंजाबी आणि राजस्थानी संगीताचा त्यांच्या गायकीत झालेला गोड मिलाफ, यामुळे त्यांच्या गाण्याने मनाला घातलेली मोहिनी सुटत नाही. मालक दिवसभर गाणं म्हणायचे. पहाटे चार वाजता उठून तंबोरा घेऊन बसायचे. आपला आवाज ताब्यात ठेवायचे. मालक गातांना कधी वेडे-वाकडे तोंड करायचे नाहीत. लता, मीना, आशा, ह्यांच्याजवळ गाणं शिकायच्या. केव्हां केव्हां गणूलाही (गणपत मोहिते) मालक शिकवायचे. नाटकाच्या पदांच्या तालमी तेवढे मालक घ्यायचे.
नाटक नसलं की, रिकाम्यावेळी मालक गाण्याच्या बैठकी करत. व-हाडामध्ये मालकांच्या गाण्याचे खूप कार्यक्रम झाले. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धारवाड, इंदूर, ग्वाल्हेर, सिमला अश्या कितीतरी ठिकाणी ह्यांच्या गाण्यांच्या मैफली रंगल्या ! मालकांची सर्व नाटकं मी आवर्जून बघितली. प्रत्येक पटाला वन्समोअर घेणारे, टाळ्यांच्या गजराने, डोक्यावर घेतलेले थिएटर मी पाहिलेय !
मालकांना ज्योतिषाचा भारी नाद होता. ज्योतिष विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. मालकांनी मला पत्रिका बघायला शिकविलं. "हे तारे बघ, त्या कुंडल्या काढ," असं सारखे मला म्हणायचे. आपली पाची मुलं पुढे नामवंत होतील, हे भाकीत फार पूर्वीच त्यांनी वर्तविले होते !
मालकांनी पुण्याला घर घेतलं, तेव्हां गृह्शांतीला ब्राह्मण नाही बोलावले. आपल्या मुलांकडून, त्यांनी संस्कृत मंत्र म्हणवून घेउन, घराची शांती केली. मालकांची स्मरणशक्ती तल्लख होती. संस्कृत भाषेचं त्यांना खूप वेड होतं ! ते सामवेद म्हणायचे. मोठमोठी पुस्तकं वाचली होती त्यांनी. मालकांनी मला खूप हिंडवले, फिरवले !
मालकांना शिकारीची आवड होती. कधी कधी ते शिकारीला जातांना मलाही बरोबर न्यायचे. एकदा तर तान्ह्या आशाला बरोबर नेले होते. कधी सांगलीच्या रानात, तर कधी थेट बेळगावपर्यंत जायचे. शनिवार, रविवार, बुधवार कंपनीची नाटकं असायची, तर बाकी दिवस शिकारीचे. मी रान उठवायची. ते, तितर, सश्यांची शिकार करायचे. मालकांनी वाघ मात्र कधी मारला नाही, कारण, "ते आमचे कुलदैवत आहे," असे ते म्हणायचे !
मालकांनी "बलवंत सिनेटोन" ही चित्रपट कंपनी काढून, "कृष्णार्जुन युद्ध" हा चित्रपट निर्माण केला. दुर्दैवाने ह्यांना चित्रपट निर्मितीमध्ये यश लाभलं नाही आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि झालेला तीव्र मनस्ताप फार कठीण काळ होता तो. त्या परिस्थितीमध्ये मालकांची तब्येत ढासळली, ती कायमचीच !
सोळा डिसेंबर एक्केचाळीसचा तो दिवस, लताचं रेडिओवरून पहिल्यांदा गाणं झालं, तेव्हां मालकांनी आपल्या लताचं गाणं, घरी बसून ऐकलं मात्र, मला म्हणाले, "माई, आज मी माझं गाणं ऐकलंय, आता मला जायला हरकत नाही". मालकांनी लताला शेवटची चीज शिकविली ती, "म्हारा मुजरा". मालकांनी लताला स्वतःची चिजांची वही आणि तंबोरा दिला. पुढचं भाकीत मालकांना उमजलं होतं !
मालकांनी लताचं गाणं ऐकलं पण वैभव पाहायला दैव नाही लाभलं. मालकांचं राज्यच वेगळं होतं, आता हे राज्यही मोठंच आहे, पण ते सत्तेच होतं......
शब्दांकन : उपेंद्र चिंचोरे
संदर्भ.इंटरनेट
रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना २ एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ.ब.लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला. याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले.
शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश!
Copyright © 2025 | Marathisrushti