(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • मराठी रंगभुमी दिवस

    आज ५ नोव्हेंबर.. आज मराठी रंगभुमी दिवस
    १८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'संगीत सीतास्वयंवर ' नाटकाचा प्रयोग सदर करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. १५० हून अधिक वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी रंगभूमीवर अनेक प्रयोग केले गेले ,आणि आजही अनेक नवे प्रयोग सातत्याने होत आहेत मा.विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. मराठी रंगभूमी स्थापनादिन प्रतिवर्षी ठिकठिकाणी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची ’अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती’ ही १९६० सालापासून ’विष्णुदास भावे गौरवपदक’ देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी या दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्यार ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार वसंत कानेटकर, पु.श्री.काळे, मास्टर कृष्णराव, दुर्गा खोटे, छोटा गंधर्व, केशवराव दाते, प्रभाकर पणशीकर, मामा पेंडसे, भालचंद्र पेंढारकर, नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, विश्राम बेडेकर, ज्योस्ना भोळे, ग.दि.माडगूळकर, बापूराव माने, माधव मनोहर, शरद तळवलकर, दिलीप प्रभावळकर,रामदास कामत, शं.ना. नवरे , फय्याज इमाम शेख, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, महेश एलकुंचवार, डॉ.जब्बार पटेल आदींना मिळाला आहे. या वर्षीचा पुरस्कार मा. अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते मा. जयंत सावरकर यांना मिळाला आहे. छोट्या मोठ्या कोणत्याही भूमिकेत असले तरी आपली अभिनयाची स्मृती रसिकांच्या मनात उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झाला, यातच या व्रतस्थाला मिळालेली सन्मानाची पावती आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, आज पाच नोव्हेंबरला सांगलीत वितरण होत आहे.या पुरस्काराने अभिनयाची साठी गाठलेले आणि सहस्रचंद्रदर्शनांकित अभिनेते असलेल्या सावरकर यांना त्यांच्या आयुष्यभराच्या भूमिकांना मिळालेली दाद आहे. त्यांचा हा नित्यनूतन उत्साह असाच राहो, हीच या पुरस्काराच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश जोहर

    "कल हो ना हो '," कुछ कुछ होता है' यश जोहर,या ब्लॉकबस्टर चित्रपटचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्याच्या चित्रपटात भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले चित्रपट ही त्याची खासियत होती. १९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये त्यांनी अग्निपथ, सारखे चित्रपट दिले.

    यश जोहर यांचे २६ जुन २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ

    वयाच्या ९५ व्या वर्षी डॉक्टर कारंत यांनी पक्षांवर ‘ बर्डस ‘ पुस्तक लिहावयास घेतले होते. ते लिहूनही पूर्ण झाले होते परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर २००२ साली प्रकाशित झाले.

  • भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

    जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.

    महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.

    या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.

    पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे

    खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
    पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
    मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
    जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
    खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
    रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
    कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
    पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
    ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।

  • ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे

    १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले.

  • खानदानी कविराज मंगेश पाडगावकर

    खानदानी कविराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.

    शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील मा.पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.मा. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले.

    ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.

    पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.

    मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं.

    मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • तारकांचे जन्मरहस्य संशोधिणारा : डॉ गुरुराज वागळे

    आकाश दर्शनाचे संस्कार जर शालेय वयात झाले तर या कुतुहलाचे रुपांतर जिज्ञासात होऊ शकते. तसे झाले तर खगोल शास्त्राचा अभ्यास करण्याचा ध्यास त्या विद्यार्थांना शालेय वर्षातच लागतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सरस्वती सेकंडरी स्कूलचा माजी विद्यार्थी डॉ. गुरुराज वागळे.

  • उद्योग जगातला संत रतन टाटा

    उद्योग जगातला संत रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम.

    सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच ‘टाटायन’!

    रतन टाटा यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्टा होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.

    आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले.

    आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती.

    रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्यांा वरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली, मा.रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती.

    कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते.

    १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव.

    याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनो ची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले. जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वर्ष निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.

    रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये जाणेही बंद केले. हे करत असतांना मा.रतन टाटा यांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

    वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते.

  • शिक्षणतज्ज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ वि वि. बोकील

    १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’.मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट झळकला.