(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • लेखक,कवी वि.स. खांडेकर

    वि.स.खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमार वयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि बालकवी, राम गणेश गडकरी, अच्युतराव कोल्हटकर यांसारख्या साहित्यिकांशी झालेल्या परिचयामुळे. गडकरींमुळे पाश्र्चात्त्य साहित्य वाचण्याचा छंदही त्यांना तेव्हा लागला होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी खांडेकरांना विनोद चांगला साधतो व काव्यात्म प्रकृतीचे लेखनही ते करू शकतात, तेव्हा या दोहोंचे मिश्रण असलेल्या गोष्टी त्यांनी लिहाव्यात असे सुचवले; तेव्हा खांडेकर यांना स्वत:त लपून बसलेला कथाकार सापडला.

    ते उत्कृष्ट वक्ते म्हणूनही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. एक कादंबरीकार म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच त्यांना महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही अफाट लोकप्रियता मिळाली. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक कांचनमृग, दोन ध्रुव, हिरवा चाफा, दोन मने, रिकामा देव्हारा, पहिले प्रेम अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सुमारे ३५ कथासंग्रह, १० लघुनिबंध संग्रह, गोफ आणि गोफण यांसारखे समीक्षालेख संग्रह असे झंझावाती लेखन त्यांनी केले. छाया, ज्वाला, अमृत, देवता, माझं बाळ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. शब्दप्रभुत्व, कोटीबाजपणा, कल्पनावैभव यांचा वारसा त्यांनी कोल्हटकर-गडकरी यांच्याकडून घेतला. मध्यमवर्गीय माणसांच्या आशा-आकांक्षा, सर्वसामान्यांची सुख दु:खे, त्यांचा आदर्शवाद त्यांनी मुख्यत्वे आपल्या कथा- कादंबऱ्यातून मांडला. त्यांचा नायक हा सामाजिकतेचे भान असलेला, आदर्शाची ओढ असलेला असे. हळूहळू बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत या प्रकारचा आदर्शवाद ही मध्यमवर्गीय तरुण पिढीची मानसिक गरज होती. त्यामुळे खांडेकर त्या काळातले सर्वांत लोकप्रिय लेखक ठरले. त्यांची क्रौंचवध ही कादंबरीही लोकप्रिय ठरली. ययाती, अमृतवेल या स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत जास्त गाजलेल्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत.

    ‘ययाती’ला १९६० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. भारत सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषण सन्मान देऊन त्यांना गौरवले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. तर भारतीय ज्ञानपीठातर्फे १९७४ मध्ये त्यांना ‘ज्ञानपीठ’ या अत्युच्च मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कथा-कादंबर्यांंवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दुरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांत व विदेशी भाषांतही अनुवाद झाले. ‘रूपककथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी होय. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी या कथांतून केली. वेचलेली फुले या संग्रहात या रूपककथा आहेत. अक्षरश: चकित व्हायला व्हावे एवढे विविध प्रकारचे, विपुल आणि तरीही दर्जेदार असे लेखन करून खांडेकरांनी मातृभाषेची सेवा केली आहे, आणि त्यायोगे मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून त्यांनी मराठी रसिकांत व साहित्यिकांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्र्वास निर्माण केला. मा.वि.स.खांडेकर यांचे २ सप्टेंबर १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    वि.स. खांडेकर यांची ग्रंथसंपदा : हृदयाची हाक, कांचनमृग, हिरवा चाफ़ा, दोन मने, रिकामा देव्हारा, उल्का, सुखाचा शोध, पहिले प्रेम, पांढरे ढग, ययाती, अमृतवेल इत्यादी कांदबर्या . कालची स्वप्ने, नवा प्रात:काल, ऊनपाऊस, दत्तक आणि इतर गोष्टी, प्रसाद, जीवनकला, स्त्री-पुरुष, पाषाणपूजा इत्यादी कथासंग्रह. चांदण्यात, वायुलहरी, सायंकाळ, मझधार, झिमझिम, कल्पकता इत्यादी लघुनिंबधसंग्रह. याशिवाय काही रुपकथासंग्रह, टोपणनावाने लिहिलेल्या काही कविता, रंकाचे राज्य हे नाटक, काही टीकात्मक लेखनाचे ग्रंथ यांचाही त्यांच्या साहित्यात समावेश होतो.

  • माझी माणसं – अंश्याबाई आज्जी

    तिच्या ‘ धाडसी ‘धडपडीच्या कथेचे तुकडे माझ्या आई कडून ऐकले . ते विसंगत तुकडे जोडण्याचा मी प्रयत्न केलाय . मला ती अजिबात आठवत नाही , मला आठवतोय तो तिचा खरखरीत मायाळू हात , हलकेच पाठीवरून फिरणारा !

  • हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

    हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. अमरनाथ यांनी आपल्या धाकट्या भावांना १९४३ साली मायानगरी मुंबईत धाडलं.

    प्रभातचा ‘चॉंद-१९४४’ हा ह्या जोडीचा पहिला चित्रपट. आणि बघता-बघता ‘दो दिलोंको ये दुनिया मिलने’ ह्या गाण्यानं संपूर्ण अखंड भारतात धुमाकूळ घातला. १९४६ साली पुन्हा या जोडीच्या वाट्याला प्रभातचाच ‘हम एक है’ आला. हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला तीन नवे कलाकार देणार होता. गुरुदासपूर/लाहोरचा देव आनंद, पेशावरचा रेहमान व मंगलोरचा गुरू दत्त पदुकोण. गंमत म्हणजे गुरू दत्त हा या चित्रपटाचा नृत्य-निर्देशक होता. यातील गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाहीत. १९४७ च्या जून मध्ये ‘मिर्झा साहिबान’ प्रदर्शित झाला. ‘मिर्झा साहिबान’ या चित्रपटाचे मूळ संगीतकार अमरनाथ होते, पण १९४५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले व अन्य काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला व शेवटी बॅकग्राऊंड संगीत व बर्यापच गाण्याचं रेकॉर्डिंग याची जबाबदारी हुस्नलाल- भगतराम यांनी समर्थपणे पार पाडल्याचे एकदा नूर जहानने स्वतः सांगितले होते.

    ‘आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाये’, ‘हाथ सीनेपे जो रख दो’ ही यातील काही आजही आवडीनी ऐकली जाणारी गाणी. या दोघांनी आपली सिने करियर ची सुरवात १९४४ मध्ये प्रदर्शित चित्रपट “चांद” पासून केली. या चित्रपटातील “दो दिलों की ये दुनिया” गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

    १९४८ पासून हुस्नलाल भगतराम जोडी खर्याल अर्थानी नावारूपास आली. ‘प्यार की जीत’ हा सुरैया, रेहमान अभिनीत चित्रपट प्रचंड गाजला व गाजली ही गाणी – ‘तेरे नैनों ने चोरी किया (सुरैया) व ‘एक दिल के टुकडे हज़ार हुए’ (मोहम्मद रफी). मूळची लाहोरची सुरैया ही त्याकाळातील अव्वल दर्जाची अभिनेत्री होती आणि तिची गाणी ती स्वतःच गात असे. तिने ९ सिनेमांमधून ६० च्या आसपास गाणी या जोडीकरिता गायिली आहेत. त्यावरून या जोडीच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते वाचकांना. एवढी गाणी तिची कोणत्याही अन्य संगीतकारा बरोबर नाहीत. ‘वो पास रहें’ (बडी बहन-१९४९), ‘इसका क्या मतलब है’ (सनम-१९५१), ‘बेकरार है कोई’ (शमा परवाना – १९५४) ही काही अविस्मरणीय सुरैय्याची गाणी त्यांच्या संगीतातील. १९४८ साली महात्मा गांधीच्या हत्येनंतर आलेल्या बापूंकी अमर कहानी या चित्रपटाला हुस्नलाल- भगतराम यांनी संगीत दिले होते. मोहम्मद रफी यांनी गायलेले राजेद्र कृष्णा लिखित हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते.

    १९४९ पासून लता मंगेशकर त्यांच्यासोबत आल्या. लता मंगेशकर म्हणजे एक हिरा., शास्त्रीय संगीताची अभूतपूर्व बैठक त्यांच्या स्वरांना, पण पार्श्व्गायनाचे पैलू या हिर्या्ला ज्यांनी पाडले असतील त्यात हुस्नलाल भगतराम यांचा प्रामुख्याने समावेश करणे आवश्यक आहे. लता मंगेशकर यांना प्रत्येक रचना हुस्नलाल पेटी अथवा व्हायोलिनवर वाजवून दाखवत असत आणि त्या मग त्या स्वरांना हुबेहूब आपल्या गायनात उतरवत असत. १९४९-५७ या ८ वर्षांच्या काळात लता मंगेशकर या जोडीच्या २५ च्या वर चित्रपटांतून शंभर हून अधिक गाणी गायल्या. लता मंगेशकर यांच्या कोवळ्या स्वरांतील ‘दर्द’ आपणांस जाणून घ्यायचा असल्यास हुस्नलाल-भगतराम यांना ऐकणे भाग आहे. साहजिकच आहे, ते स्वतःही लताबाईंच्या स्वरांवर तेवढेच भारावलेले असावेत. त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांनी लताबाईंकडून कमालीचे सुरुवाती आलाप गाऊन घेतले आहेत, जे अगदी हृदय हेलावून सोडतात.

    उदाहरणार्थ- ‘जो दिल मे’ (बडी बहन-१९४९), ‘जिगर के टुकडे किये’ (सरताज-१९५०), ‘मोहब्बत मे हंसी’ (स्टेज-१९५१), ‘जुदाई की खबर’ (आंसू-१९५३). कस काढलाय् लताबाईंचा! अन्य माझी काही आवडीची विरह गीतं आहेत – ‘लूट गयी’ (जलतरंग-१९४९), ‘दिल ही तो है’ (आधी रात-१९५०), ‘ठहर हो जानेवाले’ (बिरहा की रात-१९५०), ‘दर्द-ए-जुदाई’ (छोटी भाभी-१९५०), ‘अगर दिल किसीपे’ (गौना-१९५०), ‘आंसू अब तुम’ (काफिला-१९५२).
    असे अजिबात नाही की हुस्नलाल-भगतराम यांनी लता मंगेशकर यांना केवळ विरह गीतंच गायला दिली. ‘चूप-चूप खडे’ (बडी बहन-१९४९), ‘तेरी अंखिया’ (सावन भादो-१९४९), ‘काहे धीरे’ (राखी-१९४९), ‘ना जाना ना जाना मेरे बाबू’ (छोटी भाभी-१९५०), ‘वो आए बहारें’ (अफसाना-१९५१), ‘तेरी गली में (फर्माइश-१९५३) अशी कित्येक साध्या चालीची, परंतु अत्यंत मंजुळ गाणी देखील दिली आहेत. ‘राजा हरिश्चंनद्र-१९५२’ मधील ‘गोरी-गोरी चांदनी’ हे गाणं म्हणजे गोडव्याचा कळस आहे. हार्मोनियम व सतार पूरक आहेत लताबाईंच्या स्वरांना. कहर केला आहे या गाण्यात.

    तसेच ‘आंसू-१९५३’ मधील ‘आँखोंका तारा प्राणो से प्यारा’ रसिकांनी अवश्य ऐकावे. सुरुवातीला व्हायोलिन व त्यांनंतर इंटरल्यूडमध्ये सतार यांचा अप्रतिम वापर या गाण्याची वैशिष्ट्ये हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या लता-रफी यांच्या युगल गीतांबद्दल काय बोलावे? ‘जरा तुमने देखा’ (जल तरंग-१९४९), ‘छोटासा फसाना है’ (बिरहा की रात-१९५०), ‘पास आके हुए’ (मीना बाजार-१९५०), ‘हमे दुनिया को दिल’ (आधी रात-१९५०), ‘दिल लेके दिल दिया’ (स्टेज-१९५१), तू चंदा मै चांदनी (राजा हरिश्चंणद्र-१९५२), ‘दिन प्यार के’ व ‘सून मेरे साजना’ (आंसू-१९५३) ही त्यांची काही अजरामर गाणी. मागे मला बोलताना खय्याम म्हणाले होते की पहाडी धूनवर आधारित ‘सून मेरे साजना’ हे त्यांच्या अत्यंत आवडीचे गीत आहे. इतकेच नव्हे, तर हे गीत त्यांनी व त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गाऊन देखील दाखवलं. खय्याम व शंकर सुरुवातीच्या काळात हुस्नलाल-भगतराम यांचे सहाय्यक ही होते. मोहम्मद रफी यांच्या करीयर मध्ये हुस्नलाल-भगतराम यांचा मोठा हात आहे. हुस्नलाल-भगतराम यांनी मोहम्मद रफी यांना पहिला ब्रेक दिला होता.

    गीता दत्त, झोहराबाई, मुकेश, तलत मेहमूद, आशा भोंसले, सुमन कल्याणपूर इत्यादी कलाकार देखील त्यांच्याकरिता गायले आहेत. तलतची ही दोन गाणी – ‘मुहोब्बत की हम’ (फर्माइश-१९५३) व ‘ए मेरी जिंदगी’ (अदल-ए-जहांगीर-१९५५) तर सुप्रसिद्ध आहेत. १९५२ पासून ते व्यावसायिक पिछाडीवर पडत गेले, त्यात भर पडली त्यांच्या कौटुंबिक समस्यांची. १९५५ पासून तर त्यांना प्रतिष्ठित सिनेमे मिळणे ही कठीण होत गेले. नशिबी येत होते ते दुय्यम दर्जांचे सिनेमे. तरी देखील, लताबाईंची संपूर्ण साथ १९५७ पर्यंत त्यांना राहिली. ‘आनबान-१९५६’, ‘मिस्टर चक्रम-१९५६’ आणि ‘कृष्ण सुदामा-१९५७’ ही लताबाईंची त्यांच्यासमवेत काम केलेली शेवटची ३ सिनेमे. लताबाई १९५६-५७ साली दुय्यम दर्जांच्या सिनेमात देखील गायल्या आहेत हे कोणास सांगितल्यास विश्वाकस बसणार नाही. ‘तुने कैसी आग लगायी’ व ‘ओ आसमान वाले’ (आनबान), ‘क्यूँ झुकी जाती’ (मिस्टर चक्रम) व ‘ओ क्रिष्णा बिगडी बना दे’ (कृष्ण सुदामा) ह्या गाण्यांमधून लता मंगेशकर यांची आपल्या गुरूंबद्दल असलेली निष्ठा दिसून येते.

    १९५७-५८ पासून पंडित हुस्नलाल भारतभर व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवू लागले, आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत. १९५९ च्या सुमारास मुंबई सोडून ते अखेरीस दिल्लीला परतले. चरितार्था खातर पंडित भगतराम १९६५-६६ पर्यंत दुय्यम चित्रपटांत संगीत देत राहिले व सोबत अन्य संगीतकारांचे सहाय्यक म्हणूनही त्यांना काम करावे लागले. हुस्नलाल यांचे २८ डिसेंबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / अजय देशपांडे

    हुस्नलाल-भगतराम यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=I_Qf-B0mtak
    https://www.youtube.com/watch?v=fKndjjGwtGM
    हुस्नलाल-भगतराम यांची माहिती. https://www.youtube.com/watch?v=dflf6ixWJ4Q&index=2&list=PLII0LdyKA9i7EWfs2773wJYyXIXF_BVRl

  • कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत

    कवी केशवसुत म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी…

  • सिनेपत्रकार सतीश जकातदार

    सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत असत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत.

  • प्रसिद्ध सनईवादक पं. शैलेश भागवत

    शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे. 

  • हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

    प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग २७ आठवडे पडद्यावर झळकत होता. ‘श्यामसुंदर’ची याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यं होती. भारतातला तो पहिला ‘बाल चित्रपट’, शिवाय मराठीबरोबर त्याची हिन्दी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.

    शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शाहू मोडक अद्वितीय व्यक्तिमत्व होते शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वरांची इतकी सुंदर भूमिका साकारली होती की, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत. ‘माणूस’ चित्रपटात नायकांच्या भूमिकेत मा.शाहू मोडक, तर नायिकेच्या भूमिकेत मा.शांता हुबळीकर होत्या. शाहू मोडक यांची नायकाच्या भूमिकेकरिता निवड झाली तेव्हा ते पीळदार शरीरयष्टीचे नव्हते. रोजचा व्यायाम आणि खुराकानं त्यांची तब्येत मजबूत झाली तेव्हाच चित्रीकरणाला सुरवात झाली. अतिशय सात्त्विक भूमिका साकारणाऱ्या शाहू मोडक यांची प्रत्यक्ष जीवनातील भूमिकाही तेवढीच तेजस्वी होती. रुपेरी पडद्यावर तर शाहूरावांनी अनेक विक्रम प्रस्थापित केलेच.

    माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वरांची मानसिक अवस्था शाहू मोडकां यांच्या मध्ये सहजगत्या होती, म्हणून तितक्याच सहजतेने या दोन्ही भूमिका ते साकारू शकले. अध्यात्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांमध्ये रस असणारे शाहू मोडक हे व्याख्यानांद्वारे विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करत असत. शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. शाहू मोडक आणि प्रतिभाताई जैन यांची ही प्रेम कहाणी एक अदभूत कहाणी आहे. शाहू मोडक हे ख्रिच्शन तर प्रतिभाताई जैन. जैन साध्वीचे व्रत झुगारून प्रतिभाताईंनी शाहू मोडक यांच्याशी लग्न करून एक इतिहास घडविला. शाहू मोडक यांचे ११ मार्च १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शाहू मोडक यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी लिहिलेल्या आणि सुधीर गाडगीळ यांनी शब्दांकित केलेल्या शाहू मोडक यांच्या आठवणी म्हणजे हे पुस्तक आहे!

    शाहू मोडक प्रवास ... एका देवमाणसाचा
    लेखिका: प्रतिभा शाहू मोडक
    अनुवाद: सुधीर गाडगीळ

  • गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन

    बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले आहेत. बीटल्सनं इंग्लंडमधून अमेरिकेवर जणू सांगीतिक हल्लाबोलच केलं. मागोमाग अनेक ब्रिटिश रॉक बँड्स अमेरिकेत डेरेदाखल झाले. त्या घटनेला ‘ब्रिटिश इन्व्हेजन’ असंच म्हणतात. अमेरिकेत असणारे अनेक बँड्स त्या ब्रिटिश तडाख्यात नामोहरम झाले, त्यांचं अस्तित्व लयास गेलं. ‘दि रोलिंग स्टोन्स’सारखा कंपू हा ‘बॅड बॉईज’ची प्रतिमा सांभाळत ‘ब्ल्यूज रॉक’ वाजवत राहिला. ‘बीटल्स’ मात्र पॉपजवळचं रॉक गात होते. ते तरुण होते. देखणे होते. उत्साही होते. नवनवं शिकून आत्मसात करणारे होते. अजिबात प्रसिद्धीविन्मुख नव्हते. आणि त्यांचं गाणंदेखील अगदी तसंच होतं. सगळय़ात मोलाची गोष्ट ही, की ते प्रयोगशील होतं. तत्कालीन रेकॉर्डिग यंत्रणांच्या मर्यादा ध्यानात घेऊन बीटल्सच्या गाण्यांकडे बघितलं की त्यांचे सांगीतिक प्रयोग किती काळाच्या पुढचे होते, हे कळतं. कधी बाटल्यांचा आवाज काढ, कधी वाद्याच्या पुढय़ात माइक न ठेवता पोटात ठेव, कधी पौर्वात्य वाद्य वापर.. असं सारं त्या चौकडीनं यशस्वीरीत्या केलं. त्यांनी रॉकला कधी पॉपमध्ये बुचकळलं. कधी लॅटिन अमेरिकन सुरांमध्ये. आणि सरतेशेवटी भारतीय वाद्यांमध्ये त्यांना रॉकचा नवा अन्वयार्थ सापडला. पं. रविशंकरांची सतार जॉर्ज हॅरिसनला इतकी भावली, की ‘रागा रॉक’चा (Raga Rock) उदय झाला. ‘बीटल्स’नं संगीतामधले अनेक पायंडे प्रथमच पाडले. ‘म्युझिक व्हिडीओ’ची संकल्पना नक्की कुणाची, यावर अभ्यासकांचं एकमत नसलं तरी श्रोत्यांपर्यंत पहिल्यांदा पोचलेलं व्हिडीओ संगीत हे बीटल्सचं होतं, याबद्दल कुणालाच संशय नाही. ‘अल्बम’ हा प्रकार केवळ सात-आठ गाण्यांना कोंबून धरणारा प्रकार नव्हे, तर त्यामागे एखादं वैचारिक सूत्र पाहिजे, हेदेखील बीटल्सनं बिनचूक ओळखलं. अल्बमच्या कव्हरपासून ते विक्रीपर्यंत बीटल्सनं निर्मितीक्षम नजरेनं पाहिलं. ‘Lucy in the Sky with Diamonds’सारख्या गाण्यामधून त्यांनी ‘सायकेडेलिक रॉक’ म्हणजे काय, ते दाखवलं. अमली पदार्थ घेतल्यावर माणसाला कसं भिरभिरल्यासारखं, तरंगल्यासारखं वाटतं, हेही त्या रॉकनं दाखवलं. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला. जॉर्ज हॅरिसन यांचा बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले. बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला. हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल

    मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.

  • महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी गावदेवी, मुंबई येथे झाला. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान. त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय. कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन. या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला. चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव मा.पु. ल. देशपांडे यांच्यावर होता. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ म्हणत असत. मा.'पु लं'चे शालेय शिक्षण पार्लेच्या टिळक विद्यालयात झाले. व पुढील शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात आणि विलिंग्डन महाविद्यालयात झाले. भास्कर संगीतालय येथील दत्तोपंत राजोपाध्याय यांच्याकडून त्यांनी हार्मोनियमचे (पेटी) धडे घेतले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी शाळेमध्ये शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

    पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’ म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले. सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्यायवरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं. राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला. १९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‌‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.

    १९४७ सालच्या मो.ग.रांगणेकरांच्या ’कुबेर‘ या चित्रपटाला संगीत देऊन पु.ल.देशपांडे संगीत दिग्दर्शक झाले. चित्रपटातील गाणी त्यांनी म्हटली होती. आता ते पार्श्वगायकही झाले होते. वंदे मातरम्‌मध्ये पुल व त्यांच्या पत्नीय सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पु.ल. गायक असलेले नायक होते. त्या भूमिकेमुळे पु.ल. चित्रपट‌अभिनेते झाले. पु.ल.देशपांडे यांचा ’देवबाप्पा’ चित्रपटसृष्टीत अविस्मरणीय ठरला. ’नाच रे मोरा’ हे अवीट गोडीचे गाणे अजूनही मुलांचे आवडते गाणे आहे. ’पुढचं पाऊल‘ या चित्रपटात त्यांनी ’कृष्णा महारा‘ची भूमिका केली, आणि ते अभिनयसंपन्नट नट म्हणून प्रसिद्धीस आले. पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं असत. मराठी साहित्य व संगीतातील उत्तुंग योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय होते. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. ते उत्तम संवादिनी वादक होते. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्या मा.पु. ल. व सुनीताबाई यांनी बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. मा.पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. पु. ल. देशपांडे यांचे १२ जून २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट