रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना मा.रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष, सविता, घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नयन भडभडे च्या रीमा लागू झाल्या.
रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते. मा.रीमा लागू यांचे १९ मे २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो.
"वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.
अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले.
बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले.
पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले. १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले.
मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्याीच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.
१७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.
खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्यांतना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली.
१७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांूच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले. १७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला.
इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली.
सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्यातला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे २ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एक भावकवी आणि ‘मृगावर्त’ या नाविन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कविवर्य कृ. ब. निकुंब मराठी साहित्यसृष्टीला परिचित आहेत. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. ‘घाल घाल पिंगा वार्याा माझ्या परसात...’ असे हळूवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते.
कृ. ब. निकुंब कॉलेजमध्ये ‘साहित्यातील परंपरा आणि संप्रदाय’ हा विषय समरसून शिकवायचे. शिकविण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब प्रयत्न करायचे. त्यांच्या व्याख्यानातून विद्वतेचा फार मोठा ओघ विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा. कितीतरी कविता, ज्ञानेश्व्री सरांना पाठ होती. गर्व, अहंकार यापासून लांब राहून विद्यार्थ्यांत मिसळून निकुंब समजावून द्यायचे.
कृ.ब.निकुंब यांची 'घाल घाल पिंगा वाऱ्या' ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. या कवितेला कमलाकर भागवत यांनी अत्यंत करुण चाल लावली अन त्यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी आर्त स्वरात हे गाणं असं काही गायलं की पुर्वी रेडीओवर हे गाणं लागलं की सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत !! आजही या गाण्याची अवीट गोडी टिकून आहे एक भावकवी आणि `मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते म्हणून कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब परिचित आहेत.
`पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुंबाना अचूक गवसली होती. कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत.
मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. कवी निकुंब यांचे ३० जून १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड.
मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस् या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.
संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले.
डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एस.एम.जोशी यांनी आयुष्यभर सामान्यांसाठी जीव ओतून काम केले. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी येथे झाला.त्यांच्या स्फटिकासारख्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिली. एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. युसूफ मेहेर अली यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेसमध्ये एस.एम.जोशी सहभागी झाले. पुढे १९४२ चे भारत छोडो आंदोलन व भूमिगत राहून केलेले काम, एकूण सात वष्रे भोगलेला कारावास, त्यातली अर्धीअधिक सक्तमजुरीची शिक्षा- हे सर्व करत असताना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताची जडणघडण ही आíथक व सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित समाजनिर्मितीची असली पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन १९३६ मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेत ते सहभागी झाले.
माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल वाटणारी सहानुभूती आणि प्रेम हेच जीवनमूल्य प्रधान समजले पाहिजे आणि तेच शाश्वत सत्य आहे, या समाजवादी मूल्यावरच समाजाची उभारणी केली पाहिजे, हा मूलभूत सिद्धान्त त्यांनी आपलासा केला. स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच मा.एस.एम यांनी कामगार चळवळीत भाग घेतला तो एका मोठय़ा ध्येयासाठी. त्यांनी कामगार चळवळीकडे फक्त कामगारांच्या वाजवी मागण्या मान्य करून घेण्याचे एक साधन म्हणून कधीच पाहिले नाही. या लढय़ाचा उपयोग समताधिष्ठित नवसमाजाची उभारणी करण्यासाठी होईल, असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच कामगारांच्या न्याय्य लढय़ाला विधायक वळण देण्याचा आणि कामगारांना सामाजिक बांधीलकीची शिकवण देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. कामगार चळवळ अहिसक व सहिष्णू मार्गाने लढत असताना तिला समाजपरिवर्तनाची दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रथम त्यांनी पुण्यातील लहान-लहान कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या भांडी कामगारांची संघटना बांधली. नंतर हळूहळू रेवडी कामगार, तपकीर कामगार, विडी कामगार यांच्या युनियन बांधल्या. पण त्यांचे मुख्य काम पुण्यातील खडकी- देहू रोड येथील संरक्षण कारखान्यातील कामगारांच्यात होते.
सर्वप्रथम ५१२ कमांड वर्कशॉपच्या युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नंतर त्यांनी ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनची स्थापना करून त्याचे ते पहिले जनरल सेक्रेटरी झाले. कामगारांनी कारखान्याची शिस्त पाळली पाहिजे, प्रामाणिक राहिले पाहिजे, जास्तीत जास्त मेहनत करून चांगले उत्पादन केले पाहिजे; तसेच दारू, जुगार अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, घरातील स्त्रियांना सन्मानाने व समानतेने वागविले पाहिजे- या सर्व गोष्टींवर ते कामगारांशी संवाद साधत असत.
राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवूनच एस.एम कामगार चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळ याचबरोबर एस.एम यांची दोन फार महत्त्वाची योगदाने म्हणजे राष्ट्र सेवादल आणि संयुक्त महाराष्ट्र. एस.एम यांनी जरी पक्षीय राजकारणात हिरिरीने भाग घेतला तरी त्यांचा मूळ पिंड रचनात्मक आणि विधायक काम करण्याचाच होता. राष्ट्र सेवादलाच्या उभारणीत व राष्ट्र सेवादलाचे पहिले दलप्रमुख म्हणून त्यांनी तरुणांच्या एका संपूर्ण पिढीलाच पुरोगामी विचारांनी भारून टाकले. त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
एस.एम यांच्या राजकीय प्रवासातील संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आक्रमक असूनही अहिंसक होते. लोकांचा उद्रेक, गोळीबार वगरे झाला नाही असे नाही. पोलिसांच्या गोळीबारात १०५ निरपराध माणसे मारली गेली; पण त्या वेळेस मुंबई व महाराष्ट्राची जनता नेतृत्वहीन होती. जनतेच्या प्रक्षोभाला एका संघटित व अहिंसक आंदोलनाची योग्य दिशा देण्याची नितांत गरज होती. कुठलेही आंदोलन सफल होण्यासाठी कणखर, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व लागते. अशा कठीण परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि समितीचे सरचिटणीस म्हणून एसेमच्या नावाची घोषणा झाली. समितीचे सरचिटणीस या नात्याने एस.एम यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नेतृत्व दिले.
आंदोलनाला एक नतिक दिशा दिली आणि सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून संयुक्त महाराष्ट्र संसदीय व सत्याग्रहाच्या मार्गाने खेचून आणला. संयुक्त महाराष्ट्र समिती हे अनेक पक्षांचे एक कडबोळे होते. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेकाप, हिंदू महासभा, रिपब्लिकन पक्ष अशा भिन्न विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तारेवरची कसरत एसेमच करू शकत होते. याचे कारण त्यांच्यावर सर्व पक्षांतील नेत्यांचा असलेला पूर्ण विश्वास. एसेमबद्दल सर्वाना खात्री होती की, हा अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस असून वैयक्तिक स्वार्थ तर सोडाच, पण ध्येयपूर्तीसाठी स्वत:च्या पक्षाचे हित पण ते बाजूला ठेवतील. डॉ. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दाजीबा देसाई, बी. सी. कांबळे, दत्ता देशमुख, डॉ. नरवणे, जयंतराव टिळक असे दिग्गज नेते होते आणि त्या सर्वाना खात्री होती की, एस.एम आपली कधीच फसवणूक करणार नाहीत.
एस.एम यांच्या बाबतीत आत एक आणि बाहेर दुसरेच, असा प्रकार नसायचा. जे काही बोलायचे-करायचे ते सर्व उघडपणे आणि सच्चेपणाने. त्यामुळे खूपदा न पचणारे, न आवडणारे निर्णयदेखील हे नेते एस.एम यांच्या विश्वासामुळे मान्य करीत असत. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी खास आपल्या शैलीत एस.एम म्हणजे संयुक्त (एस) महाराष्ट्र (एम) असे समीकरण केले. एस.एम १९५७ मध्ये विधानसभेवर निवडून आले. नंतर १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि प्रजा समाजवादी पक्ष समितीतून बाहेर पडला. त्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांची दाणादाण करून काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले. नानासाहेब गोरे त्या वेळी पुण्याहून लोकसभेसाठी आणि अण्णा परत विधानसभेसाठी उभे होते.
प्र.स.प. आणि समाजवादी पक्षाचे ऐक्य होऊन संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६५ मध्ये झाली आणि एस.एम हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. पण पक्षनिर्मिती होतानाच प्र.स.प.चे लोक त्यातून वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडले. काही ध्येयधोरणे आणि कार्यक्रम यांवर मतभिन्नता होऊन पक्षातून बाहेर पडणे लोकशाही तत्त्वांना धरून झाले असते. पण एकदा बिनशर्त एकोपा झाल्यावर केवळ वैयक्तिक विरोध किंवा नाराजीसाठी पक्षात फूट पाडणे चुकीचे आहे, असे अण्णांचे ठाम मत होते. त्यामुळे अण्णा संयुक्त समाजवादी पक्षातच राहिले. पक्ष दुभंगून अण्णा एकीकडे आणि अनेक वर्षांचे सोबती सहकारी दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या काळात अण्णांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनी अण्णांवर जे आक्षेप घेतले, त्यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करणारी पत्रके काढली; त्यामुळे अण्णांना प्रचंड आत्मक्लेश झाले.
एस.एम पुण्यातून १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रसचे राष्ट्रपतिपदासाठीचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना उभे केले होते. एक एक मत महत्त्वाचे होते. बाबू जगजीवनराम इंदिराजींच्या वतीने अण्णांना भेटायला घरी आले होते. बाबूजी अण्णांना म्हणत होते, ‘‘एसेम आप जैसे चारित्र्यवान नेताओं की कांग्रेस को जरूरत है.’’ पुढे जाऊन ते म्हणाले, ‘‘इंदिराजीने कहा है की, आप कांग्रेस में आकर कांग्रेस को सुधार सकते हो और कॅबिनेट मंत्री बनकर अपना योगदान दे सकते हो.’’ मा.एस.एम.जोशी यांनी हसत-हसत बाबूजींना उत्तर दिले- ‘‘बाबूजी मं अभी तक खुद की पार्टी को नहीं सुधार सका हूँ, तो कांग्रेस जैसी बडी पार्टी को कैसे सुधार सकता हूँ? आप इंदिराजी को बताईये की मेरा वोट जरूर व्ही. व्ही. गिरीजी को मिलेगा लेकिन उसके लिए कांग्रेस में आनेकी जरूरत नहीं है।’’
प्र.स.प. व सं.सो.पा.चे १९७१ मध्ये परत एकदा एकत्रीकरण होऊन समाजवादी पार्टीची निर्मिती झाली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात व पुढे जनता दल पार्टीच्या निर्मितीत एसेमनी भरीव योगदान दिले. समाजवादी पक्ष १९७७ मध्ये जनता दलात विलीन झाला. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ राजकीयदृष्टय़ा कमकुवतच होत गेली आणि जुना समाजवादी पक्ष असा उरलाच नाही. मा.एस.एम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे त्यांना शोषित आणि वंचितांबद्दल वाटणारी कणव. नुसतीच कणव नाही तर त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी ते कायम धावून जायला तयार असत. अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारची जादू होती. त्यांचे ते निळेशार डोळे जितके तेजस्वी होते, तितकेच करुणेने भरलेले होते. लाल-गोरी कांती, भव्य कपाळ आणि मागे ओढलेले भरदार केस. प्रत्येकाला असे वाटे की, या माणसाकडे गेलो तर आपली व्यथा, आपले दु:ख निश्चितच कमी होईल. सानेगुरुजी जर आधुनिक महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत होते, तर एसेम हे आधुनिक महाराष्ट्राचे राजकारणी संत होते. एस.एम.जोशी यांचे १ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अभय जोशी निवृत्त विंग कमांडर(मा.एस.एम.जोशी यांचे चिरंजीव)
झीनत अमान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ रोजी झाला. ग्लॅमरस दिसणं म्हणजे नक्की काय, हे आपण जेव्हा जेव्हा झीनत अमान ला पाहतो तेव्हा आपल्याला कळतं. हिंदी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक सौंदयवती ने आपल्या सौंदर्याचे मोहिनी घातले, आपला फॅशन सेन्स आणि पडद्यावरील ड्रॅमॅटिक भूमिकांमुळे सदैव चर्चेत राहणा-या झीनत अमान यांचे खरे आयुष्यही तसेच ड्रॅमॅटिक होते. १९७० साली मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी करणा-या झीनत अमान यांनी लॉस एंजलिसमधून आपले शिक्षण पूर्ण केले होते. झीनत अमान यांनी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७१ साली ओ.पी. राल्हन यांच्या 'हलचल' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९७० मध्ये झीनतने वेस्टर्न लूकचा ट्रेंड स्थापित केला. ७० च्या दशकात झीनत यांची लोकप्रियता इतकी होती की, प्रत्येक मॅगझिनच्या कव्हरपेजवर त्या झळकत होत्या. सुरुवातीच्या काळात झीनतला बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. मात्र नंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये सेक्स सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. सिनेमांत त्याकाळी हुक्का आणि सिगारेट ओढणे खूप मोठी गोष्ट होती. झीनतने 'हरे रामा हरे कृष्णा'मध्ये हुक्का आणि सिगारेट ओढले होते. १९८० साली 'अब्दुल्लाह'च्या सेटवर झीनत आणि संजयची भेट झाली. फिल्म इंडस्ट्रीत अशीही चर्चा होती, की संजय आणि झीनत यांचे लग्न झाले होते.
मात्र काही सूत्र या बातमीचे खंडन करतात. काही काळानंतर या दोघांच्या अफेअरबद्दल संजयची पत्नी झरीनला समजले होते. मात्र कालांतराने संजय आणि झीनत यांच्यात वाद होऊ लागले. झीनत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "मला लग्न करायचे होते, फॅमिली हवी होती, मजहरमध्ये ती क्वालिटी नसतानाही मी त्याला लाईफ पार्टनर म्हणून निवडले." १९८५ साली झीनत आणि मजहर यांचे लग्न केले. त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र मजहर आणि झीनतचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते. असे म्हटले जाते, की मजहर तिला मारहाण करायचे. त्रासाला कंटाळून झीनतने मजहरबरोबर घटस्फोट घेतला. सप्टेंबर १९९८ मध्ये मजहर खानचे निधन झाले. संजय खान आणि झीनतचे अफेअर बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होते. मात्र संजय खान विवाहित होते. शिवाय त्यांना तीन मुलेही होती.
राज कपुर हे सत्यम शिवम सुंदरम साठी, राज कपुर एक बोल्ड व्यक्तीमत्वाच्या शोधात होते. असे सांगितले जाते कि झीनत अमान ने आपण किती बोल्ड आहोत हे सिध्द करण्यासाठी जेव्हा राज कपुर ने सांगितले, तेव्हा झीनत ने न्हाणी घरातुन एक बादली पाणि आपल्या अंगावर ओतुन घेऊन थेट राज कपुरांच्या समक्ष उभी राहिली होती, तिथेच तिचे सत्यम शिवम सुंदरम मध्ये वर्णी लागले. सत्यम शिवम सुंदरम मध्ये झीनत ने एकदम नॉन ग्लॅमरस रोल केले, पण एकच गाणं आहे, "चंचल कोमल निर्मल", या गाण्यात त्यांनी अंग प्रदर्शन तर केलेच आहे, पण पुर्ण चित्रपटात असणारे डिग्लॅम लुक तिने ह्या गाण्यात भरुन काढले आहे.
संपूर्ण कारकिर्दी दरम्यान झीनत अमान यांना "प्रणय प्रतीक" मानले गेले. तिने 'शालीमार', 'यादों की बारात', 'अजनबी', 'धर्मवीर', 'छलिया बाबू', 'डॉन', 'हीरा पन्ना', 'द ग्रेट गॅम्बलर', 'अलीबाबा आणि चालीस चोर', 'दोस्ताना', 'कुर्बानी', 'राम बलराम', 'लावारिस', 'गोपीचन्द जासूस', 'अशान्ति', 'क्रोधी', 'चोर के घर चोर', 'पु्कार' आदी चित्रपटात भूमिका केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ' पहिली पावले' ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.
आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.
त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.
एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!" ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दुनिया जिसे कहते है', 'होश वालों को खबर क्या', 'चुप तुम रहो, चुप हम रहें' यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली. एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले. नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले.
सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले. विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या 'रझिया-सुलतान' चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका 'सैलाब'च तसेच 'जाने क्या बात हुई' आणि 'ज्योती' यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांच्या यादगार गझला आणि शायरींची यादी लांबलचक आहे. परंतु ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता,’ ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है.... ’ आणि ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या जीवनातील क्लिष्टता सहजसाध्या तऱ्हेने मांडणाऱ्या या गझला निदा फाजलींच्याच.
निदा फाजली यांच्या बहुतांश गझलांना जगजित सिंह यांनीच आवाज दिला. १९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम 'इनसाईट' मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले. मा.फाजली यांना १९९८ साली 'साहित्य अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर 'सूर' या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी 'उत्कृष्ट गीतकारा'चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवले. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
फाजली यांची साहित्यसंपदा काव्यसंग्रह : - लफ़्ज़ों के फूल - मोर नाच - आँख और ख़्वाब के दरमियाँ - खोया हुआ सा कुछ (१९९६) - आँखों भर आकाश - सफ़र में धूप तो होगी
फाजली यांच्या लोकप्रिय गझल्स व गीते : - तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट - रझिया सुलतान) - आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट - रझिया सुलतान) - होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट - सरफ़रोश) - कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - आ भी जा.. ( चित्रपट - सूर) - चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट - इस रात की सुबह नहीं) - दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल) - हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल) - अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल) - टी.व्ही. मालिका 'सैलाब'चे शीर्षकगीत
प्रसिद्ध राजकीय इतिहासकार प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या आजवरच्या जडणघडणीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि विचारांचे भव्य दालन खुले करून देते. त्यातील विसाव्या शतकात समाज आणि संस्कृतीच्या अंगाने होत गेलेल्या वैचारिक स्थित्यंतराचा वेध घेणाऱ्या ‘ओपनिंग रोझबड्स’ या एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्यावरील लेखावर आधारित हे टिपण...
संस्कृती ही एकरेषीय संकल्पना नाही. ती कप्प्या-कप्प्यातही मांडता येत नाही. कारण ती व्यामिश्र, गुंतागुंतीची, खूपशी व्यापक-पसरट अशी असते. ज्या देशात हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम व जैन धर्म एकाच वेळी नांदले, त्या देशाची सांस्कृतिक व्याख्या संकुचित धर्माच्या चौकटीत बसवता येत नाही. प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुनील खिलनानी यांचे ‘इनकार्नेशन्स’ हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केलेले पुस्तक आपल्याला भारताच्या सांस्कृतिक विश्वाच्या खोल गुहेत अलगद घेऊन जाताना याच वास्तवाची खोलवर जाणीव करून देते.
गौतम बुद्धांपासून छत्रपती शिवाजींपर्यंत व पुढे विल्यम जोन्सपासून धीरुभाई अंबानी यांच्यापर्यंत ५० लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांचा वैचारिक वेध घेत हे पुस्तक आपल्याला भारताच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या बौद्धिक संपृक्ततेचा अनुभव देते. हा वेध केवळ व्यक्तिमत्त्वांची ओळख व त्यांच्या कार्यापुरती मर्यादित नाही तर तो आपला आपल्याशी संवाद आहे. कधी हा संवाद वादविवादाचा, तर कधी आपल्या वैश्विक जाणिवा अधिक समृद्ध, विस्तारित करणारा आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या ‘भारतरत्न’ एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे काळाच्या एका टप्प्यावर प्रभाव टाकणारे रोमहर्षक जीवन या पुस्तकात समाविष्ट करून लेखकाने एक मोठे सांस्कृतिक- सामाजिक संचित नव्याने उलगडून दाखवले आहे.
भारत ब्रिटिशांची वसाहत होण्याअगोदर राजेरजवाड्यांकडून देवदासी प्रथा चालवली जात असे. परंतु ब्रिटिशांची राजवट आल्यानंतर संस्थानिक, राजेरजवाड्यांची संस्थात्मक रचना मोडकळीस येऊन देवदासी पद्धतीचे स्वरूपही बदलू लागले. विल्यम जोन्स व अन्य ओरियँटिलिस्ट इतिहास संशोधकांनी भारतीय प्राचीन इतिहास तसेच संस्कृत भाषेच्या गौरवशाली इतिहासाची पाश्चात्त्य नजरेतून मांडणी केल्यामुळे, त्याचबरोबर अॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफी सोसायटीच्या प्रभावी चळवळीमुळे भारतीय कलांच्या सादरीकरणाला नवा आयाम मिळाला. नव्या ब्रिटिश कायद्यांमुळे या प्रथेवर बंधने आली, पण त्यात भारतीय संगीत गुदमरले नाही. अशा वातावरणात मदुराईमधल्या एका सायकल दुकानासमोर वयाच्या दहाव्या वर्षी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनास प्रारंभ झाला.
‘एम. एस.’ या आद्याक्षरांनी ओळखल्या गेलेल्या सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म मदुराईचा (१९१६). एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला. एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. याच काळात ग्रामोफोनचा शोध लागला. सामाजिक-सांस्कृतिक बंधने गळून पडत संगीताशी नाते अधिक घट्ट होत गेले.
१९३६ मध्ये सुब्बुलक्ष्मी यांची एका प्रसिद्ध मासिकात मुलाखत प्रसिद्ध झाली. या मासिकाचे संस्थापक-संपादक होते, सदाशिवम. हा काळ स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीचा होता. सदाशिवम हे जन्माने ब्राह्मण होते, कॉम्रेड चिदंबरम पिल्लई यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. सदाशिवम यांची सुब्बुलक्ष्मी यांच्याशी भेट झाली, तेव्हा सदाशिवम ३३ वर्षांचे होते, तर सुब्बुलक्ष्मी केवळ १९ वर्षांच्या. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मींशी लग्न करायचे होते, पण या लग्नाला सुब्बुलक्ष्मीच्या आईचा कडवा विरोध होता. आपल्या मुलीला मिळणाऱ्या पैशासाठी सदाशिवम लग्न करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत. याच काळात खुद्द सुब्बुलक्ष्मी या प्रसिद्ध कर्नाटक संगीताचे गायक व अभिनेते जी. एन. बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रेमात होत्या.
सुब्बुलक्ष्मी यांनी या काळात काही प्रेमपत्रे बालसुब्रह्मण्यम यांना लिहिली होती. या पत्रात दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला दिसत होता. या पत्रात तृप्ती, समाधान, स्थिरचित्त, अात्यंतिक आनंदी अशा शब्दांचा वारंवार उल्लेख केल्याचे दिसत होते. पण त्याचबरोबर सुब्बुलक्ष्मी यांना आपली आई व सदाशिवम यांच्यापासूनही दूर राहायचे होते, असेही स्पष्ट जाणवत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. १९४०च्या आसपास सदाशिवम यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी गुप्तपणे विवाह केला. सुब्बुलक्ष्मींचे संगीतावरील प्रेम व तादात्म्य वृत्तीमुळे सदाशिवम यांनी या विवाहाचा आदर राखत, त्यांच्या गायनाला अधिक अवकाश देण्याचे ठरवले. या काळात देवदासी प्रथा मोडकळीस आल्याने या प्रथेतील भरतनाट्यम हे नृत्य व कर्नाटक संगीताला उच्चवर्णीयांनी आश्रय दिल्याने त्याला अभिजनाचा दर्जा मिळण्यास सुरुवात झाली होती. त्याचा फायदा घेत सदाशिवम यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाचे देशभर कार्यक्रम ठेवण्यास सुरुवात केली. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्वर्गीय सुरात रसिक न्हाऊन जात होतेच, पण त्यांच्या अत्यंत साध्या निगर्वी व्यक्तिमत्त्वामुळे सुब्बुलक्ष्मी यांची लोकप्रियता जनमानसात उत्तरोत्तर वाढत होती.
त्या वेळच्या तामीळ चित्रपटात संगीताला विशेष स्थान मिळाले होते. त्याला अधिक उंची सुब्बुलक्ष्मी यांच्या गायनाने मिळाली होती. सुब्बुलक्ष्मी यांचा स्वर्गीय स्वर व भारतीय स्वातंत्र्यलढा तसा समांतर होता. पण त्यांच्या स्वराने या लढ्याला राष्ट्रीय अभिमानाचे रूप दिले. सदाशिवम यांना सुब्बुलक्ष्मीचे जीवन पडद्यावर आणायचे होते, पण ते मांडण्यासाठी त्यांनी भक्ती संगीत परंपरेतील मीराबाई हिच्या जीवनप्रवासाचा आधार घेतला. १९४५मध्ये ‘मीरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट तामीळ भाषेबरोबर हिंदीतही डब करण्यात आला. हा चित्रपट पाहून सरोजिनी नायडू म्हणाल्या की, “संत मीरा यांचा जीवनप्रवास हा भारतातील श्रद्धास्थानांचा, भक्तीमार्गाचा व अलौकिक स्वर्गप्राप्ती देणाऱ्या परंपरांचा आहेच, पण सुब्बुलक्ष्मी यांची या चित्रपटातील अदाकारी पाहता त्यांनी साकारलेली मीरेची व्यक्तिरेखा मीरेची नाही, तर खुद्द त्यांचीच भासते आहे.” सदाशिवम यांना जे अपेक्षित होते, ते त्यांना मिळाले.
सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय पातळीवर नेण्याची पराकाष्ठा सदाशिवम करत होते, त्यात त्यांना यश मिळत गेले. त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांचे गायन राष्ट्रीय नेत्यांमध्ये पोहोचवले. म. गांधी, नेहरू यांच्यापुरते ते मर्यादित न राहता परदेशात, युनोमध्ये त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले. पं. नेहरूंनी त्यांना ‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले. रुग्णालये, शाळा, अनाथाश्रम, क्षयरोग केंद्रे ते हिंदू देवळे अशा सार्वजनिक ठिकाणी सुब्बुलक्ष्मी यांनी हजारो कार्यक्रम केले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला. सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने विनम्रता, एकनिष्ठा, ईर्षा, महत्त्वाकांक्षा, निराशा, अलिप्तता आदी भाव-भावनांचे दर्शन होत गेले.
१९९७ मध्ये त्यांना केंद्र सरकारने सर्वोच्च अशा ‘भारतरत्न’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. असा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्याच गायिका ठरल्या. हा पुरस्कार सोहळा पाहण्यास सदाशिवम जिवंत नव्हते, ते एक वर्षाआधी गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर सार्वजनिक जीवनातून सुब्बुलक्ष्मी यांनी निवृत्ती घेतली होती. २००४मध्ये त्यांचे निधन झाले. संस्कृती-परंपरा-समाज राजकारण यातील परस्परप्रभावाचे, समाजाच्या वैचारिक बदल आणि उत्क्रांतीचे प्रतीक सुब्बुलक्ष्मी यांच्या रूपाने सर्वार्थाने इतिहासाच्या पटलावर कोरले गेले. आपल्याकडे व्यक्तीची लोकप्रियता व तिचे कार्य विभूतीपूजेकडे जाते. परिणामी, सुब्बुलक्ष्मी यांचे दैवतीकरण होऊ लागले. देवदासीची मुलगी ते अभिजनांचे दैवत हा प्रवास एका टप्प्यावर येऊन स्थिरावला...
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सुजय शास्त्री
पद्मा गोळे या मराठी कवयित्री ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितिपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला,तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले.
स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये! स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti