केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापुरातच होता. ‘विद्याविलास’कार शंकरशास्त्री गोखले यांच्या मध्यस्थीने, त्यांची आई घरकामासाठी कंपनीत जाऊ लागली.
आईबरोबर दत्तू आणि केशवही होतेच. दोन्ही मुलगे मोठे चुणचुणीत होते. कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी त्या दोघांना वरकामासाठी कंपनीत ठेवून घेतले. त्यावेळी दत्तू नऊ वर्षांचा आणि केशव अवघा चार वर्षांचा होता.
‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक मंडळी हे एक मोठं कुटुंबच होतं. कुटुंब प्रमुख जनुभाऊ मोठे व्यवहार कुशल आणि करड्या शिस्तीचे होते. व्यवसाय नाटकाचा असला तरी कंपनीचं वातावरण अगदी घरगुती होतं. कुठे नाटकाची तालीम सुरू आहे, कुणी आपली नक्कल पाठ करतो आहे, कुणी तंबोरा जुळवून रियाज करतो आहे, कोणी ताला-सुरात आपलं गाणं पक्क करतो आहे. अशा अनोख्या पण आवडत्या वातावरणात दत्तू आणि केशव तिथे रंगून जात होते.
कंपनीतल्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी दत्तूबुवा जांभेकर होते. दत्तूबुवा जांभेकर हे केशवरावांचे गानगुरू आणि जनुभाऊ निमकर हे नाट्यगुरू. इतर मुलांबरोबर केशव कंपनीत गाणं शिकू लागला. त्याची गाण्यातली चमक लक्षात यायला बुवाना वेळ लागला नाही. ‘हे पाणी काही वेगळं आहे’ अशी बुवांची खात्री पटली आणि बुवा त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले.
बालकलाकार म्हणून केशव हळूहळू रंगभूमीवर वावरू लागला. कधी त्याला स्त्री पात्राची भूमिका करावी लागत असे. तो प्रेक्षकांच्या प्रथम नजरेत भरला तो ‘शारदा’ नाटकातल्या ‘वल्लरी’च्या मिष्किल भूमिकेत. ते काम तो मोठ्या ठसक्यात करी. त्याचं कौतुकही होऊ लागलं.
कंपनीचा मुक्काम पंढरपूरला होता. खेळ चालू होते. शनिवारचा कंपनीचा पेटंट खेळ ‘शारदा’ जाहीर झाला होता. गुरूवारपासून तिकीट विक्री चालू झाली होती. पण नाटकात ‘शारदे’ची भूमिका करणारा कृष्णा देवळी हा अचानक आजारी पडला. तो तापाने फणफणत होता. शनिवारचा खेळ रद्द करावा अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात छोटा केशव जनुभाऊंसमोर येऊन धीटपणे म्हणाला, ‘खेळ बदलू नका, मी करतो शारदा! माझी नक्कल पाठ आहे.
गाणी तयार आहेत! घ्या म्हणून हवी तर...’ तो एका दमात भराभर बोलत होता. मालक जनुभाऊ म्हणाले, ‘अरे वेड्या, एवढं मोठं काम तुला एकदम कसं झेपेल?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, ‘मी खरंच करीन! एकदा पहा तर खरं! माझं काही चुकलं तर थोबाडीत मारा!’ जनुभाऊ कौतुकानं त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक? मॅनेजर म्हैसकरना ते म्हणाले, ‘यादीत ‘शारदे’साठी केशवचं नाव टाका!
दोन दिवस कसून तालमी झाल्या.केशव आनंदाने फुलून आला होता.
शनिवार उजाडला. रात्री नाटकाचा पडदा वर गेला. जनुभाऊंच्या पायावर डोकं ठेवून केशव रंगभूमीवर गेला. स्टेजवर तो असा वावरत होता की जसं काही तो नेहमीच रोजचंच काम करत होता. शारदेच्या भूमिकेत तो सुरेल गायला आणि सुंदर दिसत होता. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद असं गायला की प्रेक्षकांतून ‘वन्समोअर’ वर ‘वन्समोअर’ मिळत होते. प्रेक्षक शारदेला रंगभूमीवरून आत जायलाच देत नव्हते. शेवटी जनूभाऊ स्टेजवर आले आणि केशवला जवळ घेऊन प्रेक्षकांना म्हणाले, ‘‘पोरगं लहान आहे, दमलं आहे. सांभाळून घ्या. क्षमा करा!’’ जनुभाऊंचे आणि प्रेक्षकांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या दिवसांपासून केशव ‘हितचिंतक’ ‘रंगशारदा’ ठरला. वय होतं फक्त दहा वर्षे! साल होतं, १९०१!
‘शारदे’चं अपरंपार कौतुक झालं. प्रयोग रंगू लागले. पैशांचा पाऊस पडू लागला. उभ्या महाराष्ट्रात केशवरावांचं नाव झालं. सौभद्र, मृच्छकटिक, इत्यादी खेळ रंगू लागले. सुभद्रा, वसंतसेना केशवरावांकडेच आल्या. प्रेक्षक खेळांना गर्दी करू लागले. साहजिकच आपल्यामुळेच उत्पन्न भरपूर मिळतं. हे दत्तोबा आणि केशवराव यांच्या मनात यायला वेळ लागला नाही. कौतुक होत होतं. पण त्यांच्या हातात पैसे अधिक पडत नव्हते. आईला आता जास्त पैसे पाठवावेत, असं त्यांना वाटत होतं. पण ते जमत नव्हतं. जनुभाऊंकडे विषय काढला तरी ते लक्ष देत नव्हते. खूप धीर धरला, पण शेवटी एक दिवस सगळ्या मित्र मंडळींनी उचल खाल्ली आणि सगळेजण कंपनी सोडून बाहेर पडले.
‘जो पगार घेणार नाही तो मालक’ या तत्त्वावर नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरलं. नोकरांपेक्षा मालकच जास्त! सुरूवातीला वीस-एकवीस मालक होते, पण कंपनी सुरू झाली तेव्हा दत्तोबा आणि केशवराव हे दोघे भाऊ, आणि वीरकर बेडेकर असे स्नेही मिळून सात आठ मालक झाले. कंपनीची स्थापना हुबळी मुक्कामी, सिद्धरूढ स्वामींच्या शुभाशीर्वादाने झाली. कंपनीचं नाव केशवरावांनी सुचवलं. ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ तो दिवस होता. एक जानेवारी १९१० आणि तेव्हा केशवराव होते अवघे अठरा वर्षाचे! त्या काळातली ‘ललित कलादर्श’ ही एकमेव नाटक मंडळी आज शंभर वर्षानंतरही भालचंद्र पेंढारकर यांच्या रूपाने कार्यरत आहे.
सौभद्र, शारदा, गोपीचंद असे खेळ संस्था करत होती. पण कंपनीचा जम बस नव्हता. सावकार तगादा लावत होते. केशवराव जीव तोडून आपल्या भूमिका करत होते. कंपनी उत्तम चालवत होते, पण वर्षा, दोन वर्षातच, एकेका मालकाने अंग काढून घेतले आणि कंपनीची जबाबदारी दोघा भोसले बंधूंवर पडली.
केशवराव नव्या नाटकाच्या शोधात होते. त्यांनी आ. रा. दोंदे यांचं ‘मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचं ‘दामिनी’ अशी दोन नाटकं बाहेर काढली. पण, त्यांनी दम धरला नाही. हिराबाई या तत्कालीन ‘अकुलिना स्त्री’चं नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी तत्कालीन सामाजिक प्रतिष्ठेचा आशयही साकार केला. याच सुमाराला त्यांनी वीर वामनराव जोशी यांचं ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक मिळवलं.
२० सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईत बॉम्बे थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकाचा विषय, आशय, याला पूरक असं सुसंग नेपथ्य, सिद्धहस्त कलाकार आनंद मेस्त्री यांनी दिलं होतं. प्रथमच इथे मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. या नाटकातील केशवरावांच्या ‘मृणालिनी’च्या भूमिकेने आणि तेजस्वी गायनाने रसिक दिपून गेले. कंपनीवर पैशांचा पाऊस पडला. कर्ज तर फिटलेच पण गाठीशी पैसाही खूप आला. यावेळी मुंबई रसिकांनी आणि मित्र परिवाराने केशवरावांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली होती. या समारंभाला केशवरावांचे गुरू दत्तोपंत जांभेकर मुद्दाम आले होते. केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक नम्रपणे त्यांना मिळालेली थैली गुरूचरणी अर्पण केली.
तिथून पुढे केशवराव कंपनी घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर गेले, तेही स्पेशल ट्रेन घेऊन. ट्रेनवर फलक झळकत होता, ‘ललित कलादर्श नाटक मंडळी.’ त्याकाळी नाटक कंपन्या संस्थानिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयावर, सहाय्यावर चालायच्या. पण केशवराव आपल्या कंपनीचा उल्लेख, खास लोकाश्रयाखालील असा मोठ्या अभिमानाने करीत होते.
‘राक्षसी महत्त्वाकांक्षे’च्या जोडीला दुसरं नवं नाटक आणण्याच्या विचारात केशवराव होते. इतक्यात त्यांना ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाचे हक्क मिळाले. याच वेळी बापूराव पेंढारकर त्यांना मिळाले. ‘मानापमान’ च्या तालमी जोरात सुरू झाल्या आणि ‘मानापमान’चा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईत डिसेंबर १९१५ मध्ये बॉम्बे थिएटरमध्ये सादर केला. धैर्यधर (केशवराव) भामिनी (बापूराव पेंढारकर) आणि लक्ष्मीधर (दत्तोपंत भोसले)! खुद्द काकासाहेब खाडिलकर यांनी, ‘मला तुमचा धैर्यधर खूप आवडला!’ असं केशवरावांचं कौतुक केलं.
‘कर्ज फिटेपर्यंत कपाळाला गंध लावणार नाही’ असा केशवरावांनी पण केला होता. म्हणून ते गंध लावत नसत. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मानापमान’ च्या अपूर्व यशानंतर ते नरसोबावाडीला गेले. दत्त हे त्यांचं दैवत. तिथे षोडशोपचारे पूजा केली. सहस्त्रभोजन घातलं आणि मंत्रघोषात आशीर्वाद घेऊन कपाळी केशरी गंध लावलं आणि मग पुण्याला परतले.
पुढचा मुक्काम होता कोल्हापूर. वयाच्या चौथ्या वर्षी घर सोडल्यापासून जन्मभूमीत ते प्रथमच पाऊल टाकत होते. दोन महिन्याच्या मुक्कामात सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, मानापमान अशा खेळांनी कोल्हापूर दुमदुमून गेलं. उत्पन्नही अफाट मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. कोल्हापूरला मिळालेला पैसा कोल्हापूर वेशीच्या बाहेर नेला नाही.
मामा वरेकर हे नवे नाटककार आता ललित कलेला लाभले होते. त्यांची ‘हाच मुलाचा बाप’ आणि ‘संन्याशाचा संसार’ ही दोन नवी सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली आणि त्यातून हुंडा आणि पतित परिवर्तन, अशा सामाजिक विषयांना त्यांनी कलारूप साकार केलं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात पशू डॉक्टरचं काम, दामू अण्णा मालवणकर यांनी केलं होतं. प्रेक्षक त्यांच्यावर बेहद्द खूष झाले होते.
गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दल केशवरावांच्या मनात अतिव आदर होता. ललितकला नाट्य कंपनीचे ते गुरू! वझेबुवांची गायकी आक्रमक होती. त्यांना केशवरावांसारखा तडफदार आवाजाचा शिष्य लाभला.
१९२१ हे ललितकलाचं वैभवाचं वर्ष होतं. केशवरावांच्या कारकीर्दीचं ते सोनेरी वर्ष होतं. पुण्यात किर्लोस्कर थिएटरमध्ये तेव्हाचं नाट्यसंमेलन भरलं होतं. या नाट्य संमेलनाचं यजमानपद ललितकलेकडे होतं. संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनी केला होता. जमलेले सर्व रसिक संमेलनात, केशवरावांचं मनापासून कौतुक करीत होते.
याच वर्षी, आप्पासाहेब टिपणीस यांचं ‘शहाशिवाजी’ हे नाटक केशवरावांनी १४ मे १९२१ रोजी रंगभूमीवर आणलं. शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. केशवरावांचा ‘संगीत शिवाजी’ प्रेक्षकांना इतका पसंत पडला की खरा शिवाजी असाच दणदणीत गात असला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटू लागले.
१९२० साली लो. टिळकांचं निधन झालं आणि देशाने गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं. गांधीजींनी लोकमान्य स्वराज्य फंडासाठी एक कोटी रूपयांचा संकल्प सोडला होता. या संकल्पामुळेच रंगभूमीवर एक अभूतपूर्व प्रयोग घडला. तो म्हणजे संयुक्त ‘मानापमान’चा! यात केशवराव धैर्यधर होते, तर बालगंधर्व भामिनी, इतर पात्रांची विभागणी करताना गणपतराव बोडस म्हणाले, ‘केशवराव, शिपाई ललितकलेतले आणा, चोर गंधर्व कंपनीत आहेत.’
या प्रयोगाला त्यावेळी पहिले तिकीट होते १०० रूपये आणि पिटातले तिकीट होते पाच रूपये. प्रयोग केव्हाच हाऊसफुल्ल झाला होता. केशवरावांच्या तेजस्वी ताना आणि बालगंधर्वांच्या गळ्यातील गोडवा, यांनी रसिकांची मने तृप्त झाली. या प्रयोगानंतर रसिकांच्या पसंतीची टाळी केशवरावांच्या गाण्याकडे झुकलेली होती असे इतिहास सांगतो.
या प्रयोगात खर्च जाऊन प्रत्येकी साडेचार हजार रूपये आले. कर्जबाजारी झालेल्या बालगंधर्वांना केशवराव म्हणाले, ‘दादा, कर्ज—कर्ज काय घेऊन बसलात? मनात आणलं तर असे प्रयोग करून कर्जाचे डोंगर आपण फेकून देऊ!’
प्रयोगाच्या वेळी ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी सर्वप्रथम केशवरावांचा उल्लेख ‘संगीतसूर्य’ असा केला. ललित कलादर्श नाट्य संस्थेच्या रूपाने रसिकांचे ऋण मान्य करणे, मखमली पडद्याचे वास्तव नेपथ्य सुरू करणे आणि आपल्या मालकीची, आपण निर्माण केलेली, वाजती, गाजती आपली नाट्यसंस्था आपल्या कलेच्या वारसदाराकडे बापूराव पेंढारकरांकडे सोपवणं हे करायला मन केवढं मोठं असावं लागतं. कौटुंबिक वारसांचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. इथे ओढ होती ती रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या संस्थेच्या भवितव्याची!
मराठी रंगभूमीवरच्या अनेक मूलभूत उपक्रमांचे केशवराव धनी होते.आणखी एक महत्त्वाचा केशवरावांनी राबवलेला उपक्रम म्हणजे नाटक ठरल्यावेळी घड्याळाच्या ठोक्याला सुरू करण्याचा. केशवरावांच्या ललितकलाच्या नाटकाच्या तिकिटावर ‘रात्री नऊ’चा आकडा छापलेला असे. याचा अर्थ, नाटक रात्री नऊच्या ठोक्यालाच सुरू होणार.
यासंबंधी एक आठवण सांगितली जाते. एकदा एका संस्थानात ललितकलाच्या नाटकाचा प्रयोग होता. वाड्यावरून निरोप आला की, ‘राजेसाहेब नाटकाला येणार आहेत, तेव्हा प्रयोग अर्धातास उशिरा म्हणजे साडेनऊला सुरू करावा.’ केशवरावांनी ठरल्या वेळी नऊ वाजता तिसरी घंटा दिली आणि नांदी सुरू केली. केशवरावांच्या तेजस्वी तडफदार आवाजात प्रेक्षकांना त्या दिवशी अर्धातास नांदी ऐकायला मिळाली.
महाराज साडेनऊला आले. तोपर्यंत नांदी चालू होती आणि नांदी संपल्यानंतर साडेनऊला नाटक सुरू झाले.
पुढे ‘माझा सूर ज्या क्षणी कमी होईल, त्याक्षणी मला मृत्यू यावा’ असा संकल्प केशवरावांनी केला आणि त्यांना ताप येऊ लागला. त्याही अवस्थेत त्यांनी बालगंधर्वासोबत ‘सौभद्र’ नाटक केलं पण ताप त्यांचा पिच्छा सोडेना. अखेर तो टायफॉईड ठरला आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी या केशव भोसले नावाच्या संगीतसूर्याचा अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं.
वामन काळे
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ रोजी झाला.
वसंत देसाई हे नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. १९६० साली बडोद्यात भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जाते. विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.
मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, बालगंधर्व-व्यक्ती व कला, रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड, संगीत विभाग, विधिलिखित, अमृतसिद्धी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ साली हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या. तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात..
या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. १९३७ मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. शब्द वसंत शांताराम देसाई यांचे व मास्तर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाट्यपदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’
वसंत शांताराम देसाई यांचे २३ जून १९९४ रोजी रोजी निधन झालं.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
December 27, 2021
‘कटीपतंग’, ‘अमरप्रेम’, ‘आराधना’ आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी आपल्या कारकीर्दीत ४३ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
त्यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी झाला.त्यात ३७ हिंदी, ६ बंगाली चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचे डेहराडून येथे प्रारंभीचे शिक्षण झाले. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर हिंदी चित्रपटात अभिनेता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने ते मुंबईला आले. दापोली येथे त्यांनी काही काळ शिक्षकाची नोकरी केली. १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले व साहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. राज कपूर अभिनित सुनहरे दिनचे ते साहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उदा., फणी मजुमदार दिग्दर्शित बादबान व धोबी डॉक्टर. बहुहा त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला कथाचित्रपट होय. त्यानंतर त्यांनी इन्स्पेक्टर, शेरु, डिटेक्टिव्ह व हिलस्टेशन हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांच्या यशानंतर त्यांनी ‘शक्ती फिल्म्स’ ही स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था १९५७ मध्ये स्थापन केली. या संस्थेच्या निशाणाखाली त्यांनी हावडा ब्रिज हा पहिला चित्रपट निर्माण केला. त्याने लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला व त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. त्यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय व मनोरंजक चित्रपटांमध्ये हावडा ब्रिज, चायना टाऊन, काश्मीर की कली, इव्हनिंग इन पॅरिस, आराधना, कटी पतंग, अमर प्रेम इ. उल्लेखनीय आहेत. एकच चित्रपट दोन भाषांत (हिंदी व बंगाली) निर्माण करण्याचा प्रयोग प्रथमतः करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी अमानुष हा चित्रपट हिंदी व बंगाली या दोन्ही भाषांत १९७४ मध्ये निर्माण केला. भारत व बांगला देश यांच्या संयुक्त विद्यमाने, सहनिर्मिती असलेला पहिला चित्रपट सामंतांनी १९८४ मध्ये बनवला. १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत सामंतांनी प्रामुख्याने शम्मी कपूरला नायक घेऊन चित्रपट दिग्दर्शित केले. नंतरच्या काळात राजेश खन्ना यांना नायक म्हणून घेऊन त्यांनी चित्रपट काढले. त्यांपैकी आराधना, कटी पतंग व अमर प्रेम हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले. राजेश खन्नाला सुपरस्टार पदावर पोहोचवण्यात या चित्रपटांचा मोलाचा वाटा होता. आराधना ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. मा.शर्मिला टागोर यांनी ‘अॅ न इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटात बिकिनी घातली आणि प्रचंड खळबळ उडवून दिली. चित्रपटाची नायिका ही पॅरिससारख्या ठिकाणी स्वत:च्या जीवावर युरोपभर प्रवास करत असल्याने तिचे अत्याधुनिक असणे अटळ होते. साहजिकच ही बिकिनी अत्यंत वेलस्क्रिप्टेड होती आणि मा.शक्ती सामंत या दिग्दर्शकाने ती अत्यंत योग्य रितीने शूट केली होती. ‘अमर प्रेम’ मधील ‘चिंगारी कोई भडके...’ या गाण्याचे शुटिंग कोलकता येथील हावडा ब्रिजखाली असलेल्या पाण्यामध्ये एका जहाजात करायचे, अशी योजना ठरली परंतु दिग्दर्शक मा.शक्ती सामंत यांना राजेश खन्नाच्या लोकप्रियतेची जाणीव होती. लोकांची हावडा ब्रीजवर एवढी गर्दी जमेल की, तो ब्रीज तुटेल अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे त्यांनी एका स्टुडिओमध्ये हावडा ब्रीजचा सेट उभारुन शुटिंग करण्याचे ठरवले. काश्मीर की कलीपासून सामंत रंगीत चित्रपटनिर्मितीकडे वळले. त्यांच्या अन्य उल्लेखनीय चित्रपटांत जाने-अन्जाने, मेहबूबा, आनंद आश्रम, अनुरोध, बरसात की एक रात व अलग अलग इत्यादींचा समावेश होतो. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत, लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही त्यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची बलस्थाने होत. सामंतांच्या पत्नी व त्यांचे बंधू त्यांच्या काही चित्रपटांचे निर्माते होते. त्यांचा मुलगा अशीम सामंत याने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट त्यांनी निर्माण केले. १९८५ मध्ये त्यांच्या शक्ती फिल्म्स संस्थेने ‘आराधना साऊंड सर्व्हिस’ ही ध्वनिसेवा सुरु केली. मुंबईच्या बॉलिवुड व पाश्चात्त्य हॉलिवुडमध्ये तयार झालेल्या काही चित्रपटांना या यंत्रणेने ध्वनिसेवा पुरवल्या आहेत. त्यांच्या हावडा ब्रिज, आराधना आणि बरसात की एक रात या अभिजात चित्रपटांचे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सद्वारे फिल्ममध्ये रुपांतर करण्यात आले.
सामंत यांना आराधना, अनुराग व अमानुष ह्या चित्रपटांसाठी ‘फिल्मफेअर’ चे सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार मिळाले. तसेच त्यांना ‘झी’ वाहिनीतर्फे ‘झी जीवनगौरव पुरस्कार’ एकूण चित्रपट कारकीर्दीसाठी देण्यात आला. त्यांचे काही चित्रपट बर्लिन, ताश्कंद, मॉस्को, कैरो, बैरुत इ. ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून दाखवले गेले. भारतीय चित्रपट-निर्मात्यांच्या संघटनेचे अध्यक्ष, केंद्रीय चित्रपट-प्रमाण मंडळाचे अध्यक्ष तसेच कोलकात्याच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ चे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. शक्ती सामंत यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शक्ती सामंत यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=yVz_p49D75s
https://www.youtube.com/watch?v=6M71CD_nUa0
https://www.youtube.com/watch?v=aCMdJwiG_-I
मा.शक्ती सामंत यांचेअमर प्रेम, आराधना, अनुराग, अमानुष चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=H-V8o6u9HO0
http://www.hotstar.com/movies/aradhana/1000062780
https://www.youtube.com/watch?v=w-VLyNa5w54
https://www.youtube.com/watch?v=HaXN1uJmw94
April 9, 2017
मराठी मालिकांमध्ये विविध कामं केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला जगतापने रौद्र सिनेमातून पदार्पण केले. एप्रिलमध्ये रौद्र हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातल्या उर्मिलाच्या कामाचं कौतुक झालं होतं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आयोजीत ७ व्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये उर्मिलाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
June 20, 2022
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला.
महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली. नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली.
त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे.
त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कधी तो सकारात्मक असतो, कधी नुसताच आशावादी असतो तर कधी निराशावादी असतो. विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, असे म्हणावे लागेल. दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा. यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. टेलिव्हिजन या त्यामानाने नवीन माध्यमात प्रवेश करण्याआधी भट्टी दैनिक ‘ट्रिब्यून’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. कमीत कमी शब्दांत जास्त कोरडे ओढण्याची त्यांची शैली इथपासूनची. ‘फ्लॉप शो’नंतर सुरू केलेली ‘उल्टा पुल्टा’ ही मिनी कॅप्सूल होती. म्हणजे १५ मिनिटांचा विनोदाचा डोस. जो दोन कार्यक्रमांच्या मध्ये दाखवला जायचा. पण, त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विनोदाला कारुण्याची झालर असते, असे म्हणतात.
सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली.
जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 5, 2018
पंकज मलीक हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते.
February 19, 2018
मिलिंद सोमण यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९६५ रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. तो पहिली सात वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. नंतर त्याचे कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. मिलिंदला कारकीर्दीच्या सुरूवातीला जलतरणपटू व्हायचे होते. त्याने विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या मिलींदला ठाकरसी फॅब्रिक्सची पहिली जाहिरात मॉडेल म्हणून मिळाली आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले. गायिका अलिशा चिनॉय हिच्या मेड इन इंडिया या संगीत व्हिडीओत केलेल्या भूमिकेपासून मिलींद प्रकाशझोतात आला. मात्र अभिनेता म्हणून मिलींद कारकिर्द कमीच यशस्वी राहिली. त्याने मराठी ,हिंदी आणि तमिळ चित्रपटातुन अभिनय केला आहे.
'टफ' या ब्रँडच्या पादत्राणासाठी मॉडेल मधू सप्रेसोबत त्याने केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली.
'प्यार का सुपरहिट फॉर्म्युला' या चित्रपटाची मिलींद सोमण यांनी केली आहे.गेल्या वर्षी जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
November 4, 2016
त्यावेळी दूरदर्शनच्या एका लोकप्रिय क्वीज कार्यक्रमात ग्रीक पुराणांवर आधारित प्रश्न विचारले जात. मात्र भारतीय पुराणांचा या प्रश्नावलीत समावेशच केला जायचा नाही,कारण त्याविषयी कुणाला माहितीच नसायची. त्यांना या घटनेनं अस्वस्थ केलं आणि मग जन्म झाला अमर चित्र कथेचा.जी.आर. मीरचंदानी यांच्या इंडिया बुक हाऊस या प्रकाशन संस्थेच्या मदतीने त्यांनी अमर चित्र कथा सुरू केली.
September 17, 2021
कानन देवी यांचे नाव 'कानन बाला' होते. कानन देवी यांचा जन्म बंगाली परिवारात झाला. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. आपल्या वडिलाच्या निधनामुळे लहानपणीच आईला मदत करू लागल्या होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी 'ज्योति स्टूडियो' निर्मित 'जयदेव' या बंगाली चित्रपटात काम केले. १९३४ साली आलेल्या मा या चित्रपटापासून नाव झाले. नंतर कानन देवी मुंबईला आल्या व न्यू थिएटर मध्ये हिंदी चित्रपटात गाणे व अभिनय असे दोन्ही काम करू लागल्या, त्या साठी उस्ताद अल्ला रखा व भीष्मदेव चटर्जी याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागल्या. १९३७ मध्ये आलेल्या 'मुक्ति' या चित्रपटाने कानन देवी यांना न्यू थिएटरच्या पहिल्या कलाकारा मध्ये नेऊन बसवले. १९४१ मध्ये कानन देवी यांनी न्यू थिएटर सोडले व स्वतंत्रपणे काम करू लागल्या. १९४२ साली आलेल्या 'जवाब' हा चित्रपट कानन देवी यांचा सर्वाधिक हिट समजला जातो. यातील "दुनिया है तूफान मेल", हे गाणे खूपच गाजले. या नंतर कानन देवी यांचे 'हॉस्पिटल', 'वनफूल' व 'राजलक्ष्मी' असे हिट चित्रपट आहे.
१९४८ साली आलेला 'चंद्रशेखर' हा कानन देवी यांचा शेवटचा चित्रपट. ज्यात अशोककुमार हिरो म्हणून होते. १९४९ मध्ये कानन देवी यांनी 'श्रीमती पिक्चर्स' या नावाखाली वामुनेर में, अन्नया, मेजो दीदी, दर्पचूर्ण, नव विद्यान, आशा, आधारे आलो, राजलक्ष्मी ओ श्रीकांता, इंद्रनाथ, श्रीकांता, औ अनदादीदी या चित्रपटांची निर्मीती केली होती. १९७६ साली त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कानन देवी या पहिल्या बंगाली अभिनेत्री होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी साठ चित्रपटात काम केले. त्यांचे उल्लेखनीय चित्रपट 'जयदेव', 'प्रह्लाद', 'विष्णु माया', 'माँ', 'हरि भक्ति', 'कृष्ण सुदामा', 'खूनी कौन', 'विद्यापति', 'साथी', 'स्ट्रीट सिंगर', 'हार-जीत', 'अभिनेत्री', 'परिचय', 'लगन', 'कृष्ण लीला', 'फैसला' और 'आशा'.
कानन देवी यांनी अभिनय व पार्श्वगायन या दोन्ही क्ष्रेतात नाव कमवले होते. कानन देवी यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 22, 2017
पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी झाला. मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक.१९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली.
प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्याा मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.. श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री.पु.भागवत यांचे २१ ऑगस्ट २००७ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 27, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti