(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • त्यांच्या प्रतिभेला सलाम !!

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.

    त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -

    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.

    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील 'झुंझुरता' ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.

    आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर

    चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुर भांडारकर यांचे आवडते दिग्दर्शक. मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा.

    घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं परवडत नसल्याने त्याने रस्त्यावर, मेळ्यांमध्ये, सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत असे साधारण १५०० चित्रपट त्यानं पाहिले. ज्या वयात मुलं अमर चित्रकथा, चांदोबा वाचायचे, त्या वयापासून तो स्टारडस्ट, फिल्म फेअर अशी मॅगेझीन्स वाचायचा.अशोक गायकवाडांकडे इंटर्नशिप केली. नंतर रंगिला, रात, रेवती अशा चित्रपटांत राम गोपाल वर्मांना असिस्टही केलं.

    त्रिशक्ती हा मधुरचा पहिला सिनेमा. त्याच्या इतर सिनेमांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा होता. चांदनी बार या चित्रपटानं मधुरला खरी ओळख मिळवून दिली. त्याविषयी बोलताना मधुर भांडारकर म्हणतात 'स्ट्रगलिंगच्या काळात माझा मित्र मला एका बारमध्ये घेऊन गेला. तो लेडिज बार होता. म्हणजे एकदम वेगळच वातावरण. शिफॉन साडीतल्या बायका, लाउड म्युझिक सगळं वातावरणच वेगळं होतं. मी मित्राला म्हटलं अरे कुठे घेऊन येतोस मला… लोक म्हणतील फिल्म फ्लॉप झाली म्हणून मधुर आता इकडे दिसायला लागला. मी लवकरात लवकर तिथून बाहेर पडलो. पण घरी आल्यावर मला जाणवलं की त्यातलं ते जे गाणं होतं मुंगळा मुंगळा ते गाणं माझ्या डोक्यात बसलं होतं. दुसर्याल दिवशी मी मित्राला म्हटलं मला बारमध्ये जायचय. मग आम्ही तीन-चार बार फिरलो.

    शेवटी सायन-कोळीवाड्यातल्या एका जुनाट बारमध्ये मी निर्णय घेतला की आपण बारवर फिल्म बनवायची. मग मी त्यावर रिसर्च केला. ४-५ महिने मी वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन बसायचो. कनेक्शन्स काढली. कॉन्टॅक्ट्स मिळवले आणि मग पिक्चर बनवला. मधुर भांडारकर यांना तीन वेळा नॅशनल अॅववॉर्ड् मिळाले आहे. मधुर भांडारकर यांचे प्रमुख चित्रपट:- चांदनी बार, सत्ता, पेज थ्री, कॉर्पोरेट, ट्राफीक सिग्नल.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :-इंटरनेट

  • उस्ताद अमीर खॉं

    अमीर खॉं यांचा महाराष्ट्रातील अकोला गावी जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्याव साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१२ रोजी झाला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“. अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते. शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.

    “हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
    हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?. उस्ताद अब्दुल वहिद खॉं यांच्या विलंबित लयीतील गायनाचा प्रभाव त्यांच्या गायनात होता, तसेच, इंदौर घराण्याचे रजाब अलि खॉं यांची तान गायकी आणि अमान अलि खॉं यांचे मेरुखंड पद्धतीचे रागविस्तार यांच्या प्रभावामुळे अमीर खॉं यांनी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र गायकी विकसित केली होती. अमान अलि खॉं यांचे शिष्यत्व पत्करून ते चांगले तयारीचे गायक झाले. अभिजात शास्त्रीय संगीतातील ख्यालगायकीतच त्यांनी विशेष मेहनतीने सौंदर्यप्रधान अशी शैली अमीर खॉं यांनी विकसित केली. अधिकतर गंभीर प्रकृतीच्या रागगायनात ते स्वत: अंतर्मुख होऊन रसिकांनाही अंतर्मुख करीत असत. अमीर खॉं यांची गायकी म्हणजे स्वरप्रधान व आलापप्रधान. 'झूमरा' किंवा 'एकताला'च्या अतिविलंबित लयीतील ख्यालासाठी ठेका अगदी साधा असे. ख्यालाची बढ़त, मेरुखंड पद्धतीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, बोलआलाप, आलंकारिक सरगमयुक्त ताना आणि क्लिष्ट व अवघड ताना सहजतेने गाण्याची क्षमता यांनी त्यांच्या गायनाला सौंदर्यपूर्णता आणि सूक्ष्मता लाभली होती. क्वचित मुर्की व कणस्वराचा वापर करून ते गाण्यात सौंदर्य आणत असत. मंद्र व मध्य सप्तकांतील रागविस्तारात न्यास स्वरांनी गायनाला उठाव आणून ते रसिकांना मंत्रमुग्ध करीत. कधी कधी ते अंतरा घेतही नसत. त्यांच्या मते, ख्यालरचनेत शब्द महत्त्वाचे; तर स्वरांच्या रंगांना विशेष अर्थ त्यांनी दिला. त्यांनी स्वत:च्या अनेक रचना लोकप्रिय केल्या. अनेक रुबाईदार तराणे, ख्यालनुमा आणि बंदिशी अमीर खॉं यांनी रचल्या. "हृदयातून निर्माण झालेले, आणि आत्म्याला स्पर्श करणारे ते खरे संगीत" असे ते नेहमी म्हणत. मा. अमीर खॉ यांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली. पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीर खॉं यांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीर खॉ यांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी मा.अमीर खॉं यांनी गायली. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई. ग़ालिबच्या माहितीपटासाठी त्यांनी ग़ज़लही गायली. मा.अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले. पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. खर्या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठात ही काही काळ संगीत शिकवले.

    सरोदवादक अमज़द अली खॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसर्यारदिवशी सकाळी संपायचा, (आपल्या गंधर्व महोत्सवाप्रमाणेच.) परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते. शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”

    पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”
    त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.” पं. हृदयनाथ मंगेशकर, कंकणा बॅनर्जी, कमल बोस, अमरजीत कौर, ए. कानन, भीमसेन शर्मा हे सर्व उस्ताद अमीर खॉं यांचे शिष्य आहेत. अमीर खॉं यांना 'संगीत नाटक अॅकॅडमी अॅवॉर्ड', 'पद्मभूषण', 'राष्ट्रपति अॅवॉर्ड', सूरसिंगार, 'स्वरविलास' पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. उस्ताद अमीर खॉं यांचे १३ फेब्रु. १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर

    महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते.

  • भारताचे आठवे राष्ट्रपती आर. वेंकटरामन

    गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे तसेच चीनला अधिकृत भेट देणारे वेंकटरामन हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती । कामराज यांच्या रशिया भेटीवर आधारित प्रवासवर्णनासाठी त्यांना सोव्हिएट लँड-नेहरू पारितोषिक देण्यात आले.

  • मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथा लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता  चैतन्य ताम्हाणे

    एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.

  • प्रसिद्ध गणितज्ज्ञ उमर खय्याम

    एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे उमर खय्याम हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त

    हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरुदत्तचा सिनेमा हा अनेकांच्या आवडीचा विषय. लोकांनी त्याला शोमन, डिरेक्टर ऑफ मिलेनिअम अशा काही पदव्या दिल्या नाहीत. पण हिंदी सिनेमाच्या संवेदनशील रसिकांचा तो जिव्हाळ्याचा विषय. मग तो त्यांचा सिनेमा असो वा त्याचं वैयक्तिक आयुष्य. सिनेमा या माध्यमावरील पकड, संगीताची जाण आणि नव्या प्रवाहात सामावून जाण्याची सहजता यामुळेच मा.गुरुदत्त कालातीत ठरले.

    त्यांचे बालपणीचे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण होते. वसंत कुमार शिवशंकर पदुकोण यांच्यावर बंगाली संस्कृतीचा इतकी मोठी छाप होती, की त्यांनी बालपणीचे नाव बदलून गुरुदत्त ठेवले.

    गुरुदत्त हे सिनेसृष्टीत १९४४ पासून १९६४ पर्यंत सक्रिय होते. यादरम्यान त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. त्यामधील काहींमध्ये त्यांनी अभिनयसुध्दा केला. एका सर्वेनुसार, त्यांना सिनेसृष्टीच्या १० वर्षांच्या इतिहासात उत्कृष्ट दिग्दर्शकसुध्दा मानले गेले आहे. टाइम मासिकानुसार त्यांनी दिग्दर्शित केलेला 'प्यासा' सिनेमा जगातील १०० उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की गुरुदत्त कधीच संतुष्ट नव्हते. कितीही चांगला सिनेमा तयार झाला किंवा ते प्रसिध्द झाले तरी आणखी जास्त असायला हवी अशी इच्छा असायची. क्रिएटीव्हीची त्यांची तहान कधीच कमी झाली नाही.

    गुरुदत्त यांच्या आयुष्यातील अनेक क्षण आहेत, ज्याविषयी अनेकजण अज्ञात आहेत. गुरुदत्त यांचे सर्वात पहिले गीता यांच्यावर प्रेम झाले, दोघांचे लग्नदेखील झाले. त्यानंतर त्यांना वहीदा रहमान आवडायला लागल्या. दोघींवर एकाचवेळी प्रेम करण्याच्या प्रयत्नात दोघीही त्यांच्यापासून दूर होत गेल्या. गीता यांच्यासोबत लग्न केल्यानंतर गुरुदत्त यांचे सिनेमे हिट होऊ लागले होते. मात्र गीता यांच्या करिअरचा आलेख घसरला होता. यादरम्यान गुरुदत्त यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. वहीदा यांना स्टार करण्याची जबाबदारी गुरुदत्त यांनी घेतली. अभिनेत्री होता होता कधी वहीदा आणि गुरुदत्त यांना एकमेकांवर प्रेम झाले हे त्यांनासुध्दा माहित नाही. दोघांनी कधीच हे नाते स्वीकारले नाही. मात्र त्यांच्या या नात्याने गीता नाराज झाल्या होत्या. गुरुदत्त यांना ना गीता यांना सोडण्याची इच्छा होती ना वहीदाला. कदाचित या सर्वातून सुटका करण्यासाठी त्यांनी आत्महत्या केली.

    खरं तर देव आनंदच्या आणि त्याच्या मैत्रीबाबत लोकांना माहिती आहे. दोघांनी बोलताना एकमेकांना शब्द दिला होता. गुरुदत्त म्हणाले, की जर ते निर्माते झाले तर देवानंद यांना हीरो म्हणून घेतील. देवानंद यांनी सांगितले होते, की जर ते निर्माता झाले तर सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडूनच करून घेतील. देवानंद यांनी आपला शब्द पाळला. निर्माता बनताच 'बाजी' सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडे दिले. मात्र गुरुदत्त यांनी आपला शब्द अर्धवट पाळला. गुरुदत्त यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या 'सीआयडी' सिनेमात देवानंद हीरो होते, मात्र सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी सहायक दिग्दर्शक राज खोसला यांच्याकडून करून घेतले. नंतर गुरुदत्त यांनी 'जाल' सिनेमात देवानंद यांना डायरेक्ट केले होते. पण बलराज साहनीशी त्याच्या मैत्रीचा उल्लेख फार कमी ऐकायला मिळतो.

    बलराज साहनी आणि गुरुदत्त यांची दोस्ती एवढी होती की त्याच्या पहिल्या सिनेमाची कथाही बलराज साहनीने लिहिली होती. नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ' गुरुदत्त : अ लाइफ इन सिनेमा ' या पुस्तकात, गुरुदत्तचं एक माणूस म्हणून असलेलं वागणं आणि त्याचे चित्रपट याचा विचार त्यात केला आहे. केवळ सिनेमाचे पोस्टर्स रंगवणारे त्याचे काका एवढीच काय ती गुरुदत्तची सिनेमाशी ओळख होती. पण जणू काय त्याच्या रक्तातच सिनेमा होता , अशी कामगिरी त्यानं करून दाखवली. अगदी पहिल्या सिनेमापासून त्याचं सिनेतंत्र काही और आहे , हे लक्षात आलं. प्रवाहाविरोधात जाताना लोकांना काय आवडतं , याचा विचार करणाऱ्या गुरुदत्तची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने होते. गुरुदत्त यांचे १० ऑक्टोबर १९६४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकी पिडीया

  • कथाकार, कादंबरीकार, कवी विलास गोविंद सारंग

    अक्षरांचा श्रम केला, आतंक, मॅनहोलमधला माणूस, सिसिफस आणि बेलाक्वा, सोलेदाद, रुद्र, चिरंतनाचा गंध, कविता : १९६९ -१९८४, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

  • सुप्रसिध्द संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले. पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले. दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत. प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते. पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1