(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • स्वाईन फ्लूचा भस्मासुर !

    सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला. मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.

    ” हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ? ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष? तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”

    अचानक प्रकाशाचे तेज वाढल्याचे जाणवले. समोर काही तरी हालचाल जाणवली. आणि शब्द ऐकू येऊ लागले. मी एकाग्रतेने ऐकू लागलो.

    ” मीच ह्या सर्व विश्वाचा निर्माता. नदी नाले तलाव डोंगर वृक्ष वेली विविध वन्य प्राणी, आणि मानव. सर्वानीच आनंदाने जगावे ही योजना. माणसाला विचार करण्याची झेप बऱ्याच वरच्या दर्ज्याची दिली गेली. हेतू हा कि त्याने माझ्या निर्मितीला सहकार्य करावे. साह्य करावे. परंतु तो स्वार्थी वा अहंकारी बनत चालला. हे सारे जग त्याचाचसाठी असल्याचा त्याने गृह करून घेतला. सर्व नैसर्गिक योजनांना त्याने खीळ घालण्यास सुरवात केली. झाडे झुडपे, वृक्षलता, जीवप्राणी, ह्यांची बेसुमार कत्तल चालविली, हवा पाणी अन्न ह्यांचे संतुलन बिघडून टाकण्याचा सपाटा चालविला. पर्यावरण खलास होऊ पाहत आहे. एक जीव निर्माण केला गेला. त्यात कांही गुणधर्म दिले गेले. ते त्याच्या रक्त मास पेशीत घातले. त्यातून तसेच पुनर्निर्मिती करण्याची योजना दिली. परंतु ह्या सरळ साध्या मार्गाची वाट चालण्या ऐवजी मानवाने दिलेल्या ज्ञानाचा अहंकारी दुरुपयोग सुरु केला. त्याच रक्त मास पेशी यांच्या गुणधर्माचा गैर उपयोग करून, संमिश्र करून एक नवीन रक्त पेशी वा मास निर्माण करण्याचे दु:साहस केले. कोणत्याही पेशीचे एकत्रीकरण करून वेगळ्याच जीवाची निर्मिती केली. सर्वात जो सूक्ष्म विषाणू निर्मिला होता, त्याचे म्यूटेषण होत होत त्यापासून विविध विषाणूची निर्मिती होत गेली. ह्याच दुर्देवी मानवी दु:साहसात आणि त्याच्या निरनिराळ्या रासायनिक प्रयोगात स्वाईन फ्लूच्या विषाणूची निर्मिती झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तोच आता फोफावत आहे. ” - – -

    मी एकदाच भस्मासुराला निर्माण केले होते, त्याची खंत आजही वाटते. पुन्हा तो तसा निर्माण झाला नाही. परंतु हा स्वार्थी अहंकारी मानव तर आपल्याच दुष्ट प्रवृतीने अनेक भस्मासुर निर्माण करीत आहे. जे ह्या माझ्या सुंदर निर्मित जगाचा नाश करतील. ह्याला मी पायबंध घालण्यास असमर्थ आहे. कारण जे मी ज्या नियमाच्या आधारे निर्मिले, त्यात बदल मुळीच केला जाणार नाही. पुढे काय होणार हे फक्त तो मानवच जाणे. “

    अत्यंत निराश मानाने मी हे शब्द ऐकत होतो

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • शब्दाला जागणारे लालबहादूर

    पं. जवाहरलाल नेहरू याच्यानंतर भारताची समर्थपणे धुरा सांभाळणारे लालबहादूर शास्त्री यांचे व्यक्तीमत्त्व कमालीचे सोज्वळ शांत व तेवढेच कणखर होते. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनाही अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते नैनी कारागृहात असताना घडलेली एक घटना.

    कारागृहात असताना त्यांची पुष्पा अचानक आजारी पडली व थोड्याच दिवसानी तिची प्रकृती गंभीर झाली. घरून निरोप आल्यावर कारागृहातील सहकाऱ्यांनी त्यांना पॅरोलवर सुटून घरी जाण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शास्त्रीजींनी पॅरोलसाठी अर्ज केला. त्यांचा पॅरोल मंजूरही झाला.

    मात्र तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्यांना अट घातली की, पॅरोलवर असताना बाहेरच्या सत्याग्रहींना कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही. शास्त्रीजींना ती अट मुळीच मान्य नव्हती. त्यामुळे पॅरोलवर सुटून घरी जाण्यास त्यांनी नकार दिला. तिकडे मुलीची प्रकृती जास्तच गंभीर झाली तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यानेच अट काढून टाकली व शास्त्रीजींची विनाअट पॅरोलवर सुटका केली. मात्र घरी जाईपर्यंत मुलीचे निधन झाले होते.

    शास्त्रीजींनी शोक आवरून तिच्यावर अंत्यसंस्कार गेले. मात्र नंतर ते घरी गेले नाहीत. तर थेट तुरुंगात जाण्याची त्यांनी तयारी केली. आजुबाजूच्या लोकांनी त्यांना पॅरोलची अजुन मुदत आहे, त्यामुळे तुम्ही घरी राहू शकता असे वारंवार सांगितले. त्या लोकांना शास्त्रीजी म्हणाले, ज्या कारणासाठी मला पॅरोल मंजूर झाला ते कारणच आता राहिले नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे मला थेट तुरुंगातच गेले पाहिजे आणि सर्वाचा निरोप घेऊन शास्त्रीजी थेट तुरुंगातच गेले. त्याच्या या निर्णयामुळे तुरुंगाचा अधिकारीही विस्मयचकित झाला.

  • वास्तु विशेषांक

    दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, पण त्यांच्या एका पूर्वजाने एका दमात 10 हंडे दही न थांबता घुसळले आणि त्या प्रयत्नात शेवटी दमून त्यांच्या हातून रवी सांडली तेव्हापासून त्यांचे घराणे ताकसांड्याचे रवीसांडे झाले ! ( जिज्ञासूंनी ताकसांडे -रवीसांडे घराण्याचा इतिहास, प्रकाशक पहाटप्रेस पहावा ) अर्थात ताकसांड्याचे रवीसांडे कसे झाले याचा आजच्या कथानकाशी तसा काही संबंध नाही. पण सहज ओघात आले म्हणून उल्लेख केला एवढेच ! तर सांगायचा मुद्दा, सूर्याजी रवीसांडे काका सरधोपटांची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. तोच काका प्रवेश करते झाले !

    काय काका ? केवढा हा उशीर ? या रविवारी आपला खास वास्तुविशेषांक काढायचा आहे हे विसरलात ?

    छे ! छे ! कसा विसरेन ? या क्षेत्रातील चार महान वास्तुतज्ञांची नावे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊनच आलोय. म्हणून थोडा वेळ लागला.

    मग ठीक आहे. कोण कोण आहेत हे वास्तुतज्ञ ?

    शंखमणी, शंकर रुद्राक्ष अल्पविराम लहरीनाथ आणि चालू ! मोठे मोठे बिल्डर त्यांच्या सल्ल्यासाठी रांगा लावून तिष्ठत बसलेले असतात !

    अरे वा छान ! पण आधी त्यांच्या बिल्डरांकडून जाहिराती मिळवल्या का ? आणि हे चालू हे काय नाव आहे का ?

    जाहिरातींचे काम पहिले केले. आणि साहेब हे चा लू म्हणजे चालू नाही. ते दोन शब्द आहेत. चा आणि लू. म्हणजे ब्रूस ली, यांग लू, लू सांग तसे चा लू !

    अच्छा म्हणजे हे कोणीतरी चिनी किंवा जपानी वास्तुतज्ञ दिसतात. या चिन्यांची पण कमाल आहे बरं का. आता या धंद्यातही घुसले का ते ?

    छे छे ! चिनीबिनी कोणी नाही. आपले मराठीच आहेत. का म्हणजे चारुहास आणि लू म्हणजे लुकतुके ! चा लू ! स्वतःला फेंगशुई तज्ज्ञ म्हणवतात !

    असू दे, असू दे. बरं आता लागा कामाला !

    जाहिरातींचा मजकूर संपादकांच्या हवाली करून काकांनी गळ्यात धोकटी अडकवली आणि थेट शंखमणींचे ऑफिस गाठले !त्यांचे ऑफिस वरळीला आकाशभरारी या चाळीस मजली भव्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. शंखमणी शंखाच्या आकाराच्या एक ऐैसपैस खुर्चीवर बसले होते. त्यांचे टेबल ही 4 शंखाकृती पायांवर उभी होते. त्यांचा अवतार शंखातून तोंड बाहेर काढणाऱ्या गोगलगाई सारखा दिसत होता.

    काकांनी क्षणभरही वेळ न दवडता मुलाखत सुरू केली. कमीत कमी प्रश्न विचारून, कमीत कमी वेळात महत्त्वाची माहिती काढून घ्यायची आणि मग इतर भरमसाठ मजकुराने मुलाखत सजवायची यात काकांचा हातखंडा होता. एका दिवसात चार चार, पाच पाच मुलाखती ते अगदी चुटकीसरशी संपवायचे. असो. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला.

    शंखमणी साहेब आपले नाव नाविन्यपूर्ण वाटते. ते आपले खरे नाव का व्यवसायानिमित्त घेतले ?

    चांगला प्रश्न. आम्ही प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या शंखाचे वंशज म्हणून हे नाव धारण करतो.

    वा छान ! पण त्याचा वास्तूशी काय संबंध ?

    आहे तर, आपल्या पुरातन वास्तुशास्त्राची सुरुवातच मुळी शंखनादाने झाली !

    शंखनादाने ? काय सांगता काय ? ती कशी झाली ?

    शंखनादाने ज्या लहरी उत्पन्न झाल्या त्यातूनच तर हे शास्त्र संपन्न झाले ! आमचे पूर्वज स्वामी शंखनाद यांनी ते ज्ञान शंखपद. शंखरत्न, शंखमणी आणि शंखसंभव या ग्रंथातून शब्दबद्ध करून ठेवले. त्यात वास्तूच्या विविध अंगांचा सांगोपांग विचार केला आहे. तोच वारसा आम्ही चालवतो म्हणून आम्ही शंखमणी !

    वा फारच अद्भुत ! या शास्त्राची काय वैशिष्ट्ये ? ती आजच्या काळात कशी लागू होतात ?

    काका, पंचमहाभूते आजही आहेत, पूर्वीही होती आणि भविष्यातही राहणार आहेत. ती अखिल विश्वाला घेरुन आहेत. त्यांना सांभाळून राहावे लागते. त्यांच्याशी जराही दंगामस्ती चालत नाही. त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते. त्यासाठी स्वामी शंखमणी यांनी शंख पद्धती म्हणजे शंख थिअरी शोधून काढली.

    तिचे आपण थोडक्यात स्वरूप सांगाल का ? आणि आधुनिक काळात ती कशी उपयुक्त आहे ?

    काका, मुळात प्राचीन काळ, आधुनिक काळ हे जे आपण म्हणतो ना, ते खरे नाही. काळ हा कधीच पुरातन व आधुनिक नसतो. ज्याला आपण शंभर वर्षे म्हणतो तो ब्रह्मदेवाचा एक क्षणही नसतो. असो. आपण नेहमी ऐकतो की अमुक तमुक एकाने असे चुकीचे केले आणि आता बसलाय संकरित. तसेच लोक या पुरातन वास्तुशास्त्राला विसरून तथाकथित आधुनिक वास्तु शास्त्रज्ञांच्या, ज्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो, यांचे ज्ञान पाश्चात्त्य विद्येच्या उथळ पायावर आधारित असते, त्यांच्या सल्ल्याने इमारती, घरे बांधतात आणि मग पस्तावले की येतात आमच्याकडे शंख करीत !

    त्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल का ?

    एकच का ? शेकडो देता येतील. या अफाट शहरात माझ्या सल्ल्याने इमारती बांधणारे शेकडो कंत्राटदार आहेत. आम्ही शंखमणींच्या सल्ल्याने आमची संकुले बांधतो,असा ते नुसता उल्लेख करतात त्यांच्या जाहिरातीत, तर हातोहात त्यांचे बुकिंग हाउसफुल होऊन जाते ! आणखी काय पुरावा हवा ?

    साहेब आपले मूळचे शिक्षण काय आणि वास्तूमध्ये आपण कुठून पदवी, पदविका घेतली ?

    मी वकील आहे. फावल्या वेळात वकिली करणे पण मुख्य व्यवसाय वास्तु ! हा माझा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. त्याचे कुठेही शिक्षण मिळत नाही. पूर्वसुरींचे ज्ञान हेच काय ते खरे शिक्षण. हा महान ठेवा जपणे हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो.

    मग कायद्यानुसार नसतो वाटत आपला सल्ला ?

    कायदा ? कसला कायदा ? ते कोर्टाचे कायदे वेगळे. इथे मी सांगेन तोच कायदा ! विश्वास असेल तर या नाहीतर बसा शंख करीत !

    आपल्या सल्याचा एखादा नमुना सांगाल का ?

    हो सांगतो की अल्पविराम परवाच प्रसिद्ध बिल्डर शेठ चांदीमल यांच्या 100 इमारतींच्या भव्य संकुलासाठी शंख यज्ञ संपन्न केला.

    शंखयज्ञ ? ते काय असते ?

    शंख यज्ञ म्हणजे शंखध्वनी करून इमारतीच्या जागेवर चहूबाजूंनी ध्वनिलहरींचा अदृश्य भक्कम पडदा निर्माण करायचा !

    वा हे फारच अद्भुत वाटते. ते आपण कसे करता ?

    इमारतींचा जागेवर चारी बाजूंना काही विशिष्ट अंतरावर आमचे शंख तज्ञ उभे राहतात. एक आठवडाभर त्या जागेवरून अखंड शंखनाद करून शंखनाद लहरींचा अखंड नाद पडदा उभा करतात. एकदा का हा पडदा उभा राहिला की कोणतीही अभद्र शक्ती इमारतीला स्पर्श करू शकत नाही. यज्ञ पाहायला शेकडो लोक आले. यज्ञाचा प्रसाद खाल्ला. तोही साधासुधा नाही, पंचतारांकित ! आणि जाता जाता बुकिंगही करून गेले. यज्ञ संपला तेव्हा सर्व संकुलाचे बुकिंग पूर्ण झाले. कित्येकांना निराश होऊन परतावे लागले. ज्यांनी बुकिंग केले त्यांना एक एक मंतरलेला शंख फुकट दिला. शिवाय तो फुंकायची विशिष्ट पद्धत शिकवली. शंख फुंकणे आणि शंख करणे यातला फरक त्यांना समजावून दिला.

    वावा शंख मणी साहेब, आपल्या सल्ल्याने शेठ चांदी मल यांची चांगलीच चांदी झाली म्हणावयाचे ?

    होय तर, त्यांनीच खुश होऊन ही आलिशान जागा दिली मला. एवढ्यात संकटसमयी वाचतो तसा सायरन वाजू लागला. काकांच्या टकला वरचे दोन केस ताठ उभे झाले.

    शंखमणींनी शंखहास्य केले. काका, घाबरू नका. हा आमच्या स्वागतिकेने केलेला शंख इशारा आहे. त्याचा अर्थ आपली वेळ संपली. माझे दुसरे अशील वाट पाहत आहे. या आपण, नमस्ते !

    त्यांचे आभार मानून काकांनी तिथून पाय काढला.

    टॅक्सी केली आणि अंधेरीला शंकर रुद्राक्ष यांच्या ऑफिसमध्ये बरोबर एक वाजता जाऊन पोहोचले.

    त्यांच्या केबिन बाहेर एक रुद्राक्ष माला मंडित बुवा बसले होते. तो हसून म्हणाला अल्पविराम वत्सा कोण हवंय तुला ?

    मी काका सरधोपट. शंकर रुद्राक्षांची मुलाखत घ्यायला आलोय.

    हो का ? जा आत ते आपलीच वाट पाहत आहेत.

    काकांनी चेंबरमध्ये प्रवेश केला. शंकर रुद्राक्ष अगदी अपटूडेट पोशाखात, सूट,बूट, टायघालून बसले होते. फक्त एकच वेगळे होते ते म्हणजे एखाद्या पर्यंत रुळणारे लांब केस ! त्या केसांच्या त्यांनी छोट्या छोट्या वेण्या घातल्या होत्या. त्यात जटांसारख्या लोंबत होत्या. त्या प्रत्येक वेळी च्या टोकाला एक रुद्राक्ष लावला होता. बोलताना मान हलली की शंकराच्या लोलकाप्रमाणे त्या वेण्या हलत होत्या.

    काकांनी पहिला प्रश्न विचारला.

    शंकर रुद्राक्ष आपण कोणते वास्तुशास्त्र शिकलात ? या शास्त्राचे शिक्षण कोठे मिळते ? किती वर्षाचे असते ?

    काका, हे ज्ञान विद्यापीठात मिळत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जंगलात हिंडून, निसर्ग निरीक्षण करून , थंडीवाऱ्यात प्रचंड तपश्चर्या करून स्वल्पविराम हिमालयात भगवान शंकरांची आराधना करून हे रुद्र वास्तू ज्ञान संपादन केले.अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी ते रुद्र मंडलम या बृहत ग्रंथात ग्रंथित केले. त्या थोर वारशाचे आम्ही पुनरुज्जीवन केले.

    ते ठीक आहे. त्यासाठी आपण काही संशोधन करून काही नवीन अभ्यासक्रम बनविला आहे का ? त्याला शासनाची मान्यता घेतली असेलच ?

    छे छे ! त्याला कशाला हवी आहे मान्यता ? अहो तो आपला स्वयंभू पुरातन वारसा आहे एवढे पुरेसे नाही का ? आपण आपल्या वर्तमानपत्रात रोज भविष्य छापता. ते लिहिणारे कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर असतात ? नाही ना ? तसेच आहे हे, विश्वासाचा मामला आहे.

    बरे असो. या रुद्र मंडला नुसार आपण काय सल्ला देता ?

    रुद्र मंडळात मुख्यत्वे पाच तत्त्वे सांगितली आहेत. ती म्हणजे माती, दगड , दिशा, वारा-जल, वृक्ष आणि अग्नी. याचा विचार करून आम्ही सल्ले देतो .

    तो कसा ?

    मातीची चव घेऊन आम्ही घरातल्या फरश्या कशा असाव्यात हे सांगतो. दिशा, वारा, पाऊस,जल या तत्त्वानुसार घराची दारे, खिडक्या कुठे, केवढ्या असाव्यात ते सांगतो. पाण्याचे माठ, लोट्या, पेले, पिंप यांच्या जागा ठरवतो. गच्चीत, बाल्कनीत आजूबाजूला वड, पिंपळ, आंबा वगैरे मोठमोठे वृक्ष कुठे लावायचे ते सांगतो. अग्नी पेटवून त्याच्या धुराच्या दिशेवरून गॅस शेगड्या, हिटर, गिझर, इस्त्री,फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी अग्निजन्य उपकरणे कुठे असावीत याचे मार्गदर्शन करतो.

    अग्नी कसा पेटवता ?

    काडी ओढून ! काडी ओढून ती भोकाच्या रुद्राक्ष समोर धरून त्या भोकातून धुराची दिशा पाहतो.

    वा ! फारच सूक्ष्म विचार करता आपण !

    होय तर, शिवाय त्यातूनही समाधान नाही झाले तर आम्ही एक अत्यंत खात्रीशीर सल्ला देतो.

    असं ? तो कोणता ?

    प्रत्येकाला एक रुद्राक्ष माला देतो. सर्व उपाय थकल्यावर ती मला हातात घेऊन पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी स्नान करून रुद्राक्ष नमः हा जप दहा हजार वेळा करायचा. सर्व बाधा हमखास दूर होतात. अहो काका, या आमच्या सल्ल्याने काही जणांना तर या संसाराचीच उपरती होऊन त्यांनी कायमची कैलासाची वाट धरली. एकदम मोक्षप्राप्तीच.

    काय सांगता काय? मग घरच्या लोकांचे काय?

    काका, जो चोच देतो तो चारापण देतोच. शेवटी तर सगळेच भस्मीभूत व्हायचे असते ना? तो योग त्यांना आमच्या सल्ल्याने आयताच येतो. केवढे भाग्य.

    होय, होय, खरेच. थोर भाग्यच म्हणायचे त्यांचे. आपले भाग्य फार उज्वल दिसते रुद्राक्ष साहेब. शुभेच्छा.

    काका मुलाखत संपवून निघाले तसे शंकर रुद्राक्षांनी त्यांना एक रुद्राक्ष माळ देऊन सल्ला (फुकटचा) दिला. रोज कमीत कमी हजार जप करा. तुमचे कल्याण होईल. बरे या आता. नमस्कार.

    बाहेर पडल्यावर काकांनी ती रुद्राक्ष माला काऊंटरवरच्या बुवांना घातली आणि ते थेट वास्तुतज्ञ लहरी नाथांकडे पोहोचले.

    लहरी नाथ ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आणि समोरचे टेबल आणि त्या टेबलसमोरच्याखुर्च्या हे सगळे एका मोठ्या झोपाळ्यासारख्या पाटावर ठेवले होते. पाट जमिनीपासून सुमारे सहा इंच वर होता आणि अगदी हळूहळू पुढे मागे हालत होता. काकांनी हळूच एक पाय वर ठेवला आणि एक खुर्ची पकडून ते खुर्चीवर बसले. लगेचच त्यांनी मुलाखत सुरू केली.

    लहरी नाथ ही झोपाळ्याची कल्पना फारच अभिनव दिसते. याचा वास्तूशी काय संबंध?

    काका, वास्तूवर सर्व बाजूंनी सर्व काळी सुष्ट आणि दुष्ट लहरींचा मारा होत असतो. या झोपाळ्यामुळे सतत हलत्या लहरी निर्माण होऊन त्या रोखल्या जातात.

    वा. हे फारच अजब तंत्र दिसते आहे. पण मला सांगा, हे सर्वसामान्यांना कसे परवडायचे?

    त्यांच्यासाठी फार सोपे उपाय असतात.

    ते कोणते?

    या लहरींच्या नियंत्रणासाठी दरवाजे, खिडक्या, भिंती यांना योग्य ठिकाणी आडव्या, तिडव्या फटी पाडाव्या लागतात. ते मी तपासून सल्ला देतो.

    ते कसे तपासता?

    त्यासाठी घराची कुंडली, घरातील माणसांच्या कुंडल्या, पशु पक्षांच्या कुंडल्या, उदाहरणार्थ. कुत्रा, मांजर, पोपट वगैरे, तपासाव्या लागतात. काही अमानवी शक्तीचा संचार आहे का हे त्यावरून समजते.

    हे फारच अजब वाटते. एखादे उदाहरण देता का?

    हो देतो ना.परवाच शेठ माणिकचंदनी आले होते. त्यांच्या चाळीस मजली इमारती वरचा पेंट हाउस फ्लॅट त्यांचे गिऱ्हाईक शेठ घिसूमल चांदीमलयांच्या बायकोला पसंत नाही म्हणून शेठ घिसूमल परत करत होते. माझ्या सल्ल्याप्रमाणे काम चालू असूनही असे का झाले म्हणून मला जाब विचारत होते.

    मग आपण काय मार्ग काढलात?

    मी त्यांची माहिती तपासली. तेव्हा लक्षात आलं की माणिकचंदानी शेटजींची आणि त्यांच्या बायकोची जन्मतारीख चुकीची दिली होती. शेटजींनी दिली होती तीन आणि शेठाणींचीही तीन.पण मुळात शेठाणींची होती सहा. म्हणजे 36 चा आकडा. मग भांडण नाही होणार तर काय मुके घेणार?

    मग? कसा सोडवलात आपण हा तिढा?
    मी सल्ला दिला की बायकोच बदला म्हणून.
    काय सांगता? मग बदलली बायको?
    हो बदलली. म्हणजे दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि ठेवलेल्या बायकोला दिले पेंट हाउस. दोघीही खुश. माणिकचंदानीचा ही दुप्पट फायदा झाला.

    वा, वा. लहरी नाथ आपण महान आहात. त्यांना शुभेच्छा देऊन काका चार वाजता पेडर रोडवर, चा लू यांच्या मुलाखतीला त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा चा लू यांची चहाची वेळ झाली होती. काकांनाही चहाची गरज होती. मग एका चहाच्या कपावर म्हणजे ओव्हर अ कप ऑफ टी, त्यांनी मुलाखत सुरू केली.

    चा लू , हे फेंगशुई काय प्रकरण आहे?

    हे चिनी शास्त्र आहे असे म्हणतात, पण खरे तर ते प्राचीन भारतीय शास्त्रच आहे.

    काय सांगता?

    हो ना, फार पूर्वी बौद्ध भिक्षूंनी ते चीनला नेले. या पद्धतीने गृहसजावट केली म्हणजे घरात जंगलांची शांतता निर्माण होऊन मन विपश्यना तपश्चर्येसाठी तयार होते आणि अंतिम मोक्षाकडे जायची आत्म्याची तयारी होते. या शास्त्राला त्याचे मूळ स्वरूप आणि पावित्र्य प्राप्त व्हावे म्हणून मी लवकरच अजिंठ्याला फेंग शुई विपश्यना समाधी संस्था स्थापन करत आहे.

    वा वा ! चा लू आपण हे फारच महान कार्य हाती घेत आहात. आपणास शुभेच्छा. आपल्या सल्ल्याने घरोघरी अजंठा गुहा निर्माण होवोत ही प्रार्थना. धन्यवाद. काकांनी मुलाखत आटोपली.

    वास्तु विशेषांकाची विक्रमी विक्री झाली. पाश्चिमात्य ज्ञानाने शेफारलेल्या आर्किटेक्ट लोकांचे पुरतेच कंबरडे मोडले. त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी म्हणून विशेषांक सम्राट, सूर्याजी रवीसांडे यांनी आता वास्तुशास्त्र आणि आधुनिक आर्किटेक्चर आणि आर्किटेक्ट या विषयावर एक पाचशे पानी दणदणीत विशेषांक काढायची घोषणा केली आहे.

    काका सरधोपट मुलाखतींसाठी आणि जाहिरातींसाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि ठेकेदार यांची नावे गोळा करत आहेत. इच्छुकांनी त्वरीत नावे नोंदवावीत. संधीचा फायदा घ्यावा.

    पत्ता - संपादक, रोजची पहाट, वरळी, मुंबई - ४२०४२०

    - वि. रा. अत्रे

  • नातीच्या खोड्या

    सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.

    लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार करु लागली. ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “

    ” काय केले मानसीने?” मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.

    ” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”

    देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.

    आज तरी ह्या जगाचा, ह्या मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही. जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी आहे. निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी गुणधर्म, असे समजण्यास हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.

    तेव्हा मीच म्हणेन - -

    ती म्हणजे- – - मानसी- – - शिकलेली शहाणी माझी नात.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • नातीच्या खोड्या

    सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही.

    लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार करु लागली. ” बाबा हिने आज खूप उच्छाद मांडला. तिला शिक्षा करा. “

    ” काय केले मानसीने?” मी तिच्याकडे कौतुकाने बघत विचारले.

    ” बाबा मी स्वयंपाक करीत असताना, ती नजर चुकावून देवघरात गेली, आणि तिने देव्हाऱ्यातले देव ओढून पाडून अस्ताव्यस्त केले.”

    देवघरातील देव ज्यांना भक्तिभावाने देवत्व दिले जात होते. आणि हे शुषु अवस्थेतील मुल, ज्यालाही एका द्र्ष्टीकोनातून देवत्व दिले जाते. अशा ह्या दोन देवांचे ते एक प्रकारे द्वंदच नव्हते काय? त्यात फक्त दर्शनी अस्ताव्यस्तपणा दिसला होता. त्यांच्या त्या लढाईमध्ये मी हतबल झालो असल्याचा भास होत होता. डोळे मिटून मी क्षमा मागत प्रार्थना करीत होतो. नातीला न समजणारी व देवाला ती पोहोंचली असेल का? हे मला न समजणारी.

    आज तरी ह्या जगाचा, ह्या मिथ्या विश्वाचा तिला स्पर्श नाही. जो पर्यंत हे सभोवतालचे खोटे मुखवटे, आचरण, तिच्यावर आघात करून तिला तथाकथित सुसंस्कृत मानवामध्ये बदलणार नाहीत, तोपर्यंत हे लहानगे लेकरू, म्हणजे निसर्गाचीच एक अप्रतिम देणगी आहे. निसर्गाचा तो ठेवा आहे. एक ईश्वरी गुणधर्म, असे समजण्यास हरकत नाही. कश्यावरून मानसीच त्या आदिमायेचे जगदंबेचे स्वरूप नसावे? आज तरी आहे. काळाच्या ओघात तीचातले, नैसर्गिक ईश्वरी गुणधर्म लोप पावू लागतील व त्याची जागा कृत्रिमता घेईल.

    तेव्हा मीच म्हणेन - -

    ती म्हणजे- – - मानसी- – - शिकलेली शहाणी माझी नात.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जुलमी राजाची किंमत

    तैमूरलंग हा इतिहासातील एकप्रसिद्ध सरदार. तो पराक्रमी होता परंतु तेवढाच अत्याचारी. हल्ले करून जिंकलेल्या प्रदेशातील लोकांवर तो अत्याचार करायला मागेपुढे पहायचा नाही. अशा लोकांना गुलाम करण्यासाठी तो जबरदस्ती करायचा. एकदा त्याने असेच खूप गुलाम पकडले. त्या गुलामांना विकण्यासाठी तो स्वतः सौदेबाजी करायचा व त्याने ठरविलेल्या भावात सौदा झाला की त्या गुलामांना विकायचा. एकदा त्याने पकडलेल्या गुलामामध्ये तुर्कस्तानामधील एक अध्यात्मिक संत अहमदी देखील होते. तैमूरलंगाला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती समजली होती. सर्व गुलामांना एकत्र केल्यानंतर तैमूरलंगाने त्यातील दोन गुलामांना बाहेर काढले व अहमदीजवळ येऊन तो त्यांना म्हणाला, सांगा या दोन गुलामांची किंमत किती असेल.

    अहमदीने त्या दोन गुलामांकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, हे गुलाम समंजस वाटतात त्यामुळे त्यांची किंमत पाच हजार मोहराहून कमी असू शकत नाही. त्यांचे उत्तर ऐकून तैमूर लंगाला अहमदी यांची थट्टा करण्याची इच्छा झाली. तो त्यांना म्हणाला बरं, आता सांगा की, माझी किंमत किती असेल? त्यावर अहमदी चटकन म्हणाले, फक्त दोन मोहरा. त्याचे उत्तर ऐकून तेमूरलंग खूप संतापला. तो अहमदी यांच्या अंगावर धावून ओरडत म्हणाला, तू माझा अपमान करतोस? माझ्याजवळ असलेल्या दस्तीचीच (रुमाल) किंमत दोन मोहरा आहे. त्यावर अहमदी म्हणाले, मी त्या दस्तीचीच किंमत सांगितली. तुझ्यासारख्या अत्याचारी सरदाराची किंमत तर केवडीचीही नाही. त्यानंतर अहमदी यांनी तैमूरलंगाने केलेल्या अत्याचारांची सर्व गुलामांसमोर जंत्रीच सादर केली. सर्व गुलामांना वाटले आता अहमदी यांना तैमूरलंग ठार मारणार.

    मात्र अहमदी यांच्या सत्य वाणीने तेमूरलंगाची विवेकबुद्धी जागी झाली व त्याने अहमदी यांची गुलामगिरीच्या जोखडातून मुक्तता केली.

  • माझे श्रद्धेवर जगणे ?

    श्रद्धेचा जन्मच ज्ञानातून होतो. जस जसे ज्ञान प्राप्त होऊ लागते, समज येऊ लागते, जाणीव होऊ लागते, माणसाच्या विचारांना तशा “ विश्वासाच्या  चौकटी ” निर्माण होऊ लागतात. चौकटीचे निर्माण केलेले अस्तित्व म्हणजेच श्रद्धा होय.

  • त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

    मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत. ' मनोरुग्ण ' हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ? तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ? गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ? त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ? कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.

    त्यांचा काय दोष ?

    दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर ' मनोरुग्ण ' ? होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी 'मनोरुग्ण' होण्याचे आले आहे. ? परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.

    अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ' जळते त्यानाच कळते ' ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.

    आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.

    सहानुभीतीची गरज.

    ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.

    मनोरुग्णाचे प्रकार

    मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते. तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.

    सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.

    भयानक वातावरण

    मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी, सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा. त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात. रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.

    केवळ भोग भोगणे हेच जीवन

    जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.

    स्वतंत्र यंत्रणा असावी

    आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • चुकलेला अंदाज!

    जीवनाच्या दैनंदिनीत अनेक घटना घडतात. त्याकडे बघण्याचा द्रीष्टीकोन,  त्याला सामोरे जाताना भिन्न असतो. त्यामध्ये दडला असतो, लपला असतो, एक बंदिस्त त्रिकोण. ज्यात असतो स्वार्थ, प्रासंगिक भावना, आणि परिस्थिती बद्दलचे अज्ञान. ह्याची जाणीव तिव्रतेने होती. जेंव्हा आपले अन्दाज चुकतात. विशेषकरुन जे इतर अपरिचिताना अनपेक्षित हानिकारक ठरतात त्या वेळीच.

  • संगीत आणि समाधान

    संगीताचा सखोल अभ्यास असलेले एक गुरु होते. संगीत हेच जीवन मानून त्यांनी संगीताची आराधना केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दूरवरून संगीत शिकायला तरुण येत असत. त्यांच्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता गुरूही त्यांना संगीत शिकवित असत.

    एकदा एक तरुण त्यांच्याकडे सतार शिकण्यासाठी आला. त्या तरुणाला संगीताचे उपजतच ज्ञान होते. त्यामुळे तो लवकरच सतारवादन शिकला. परंतु तो तरुण वृत्तीने फारच चंचल होता. त्याचे स्वतःचे कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तो अनेकदा दुःखी व असमाधानी असायचा. त्याच्या गुरूच्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली होती.

    जीवनात सुख आणि समाधान कसे असते व ते मानायचे असते हे त्याला संगीताच्या आधारेच पटवून सांगायचे असा गुरूंनी निश्चय केला. एकदा हा तरुण असाच एकटा विमनस्क अवस्थेत बसला असताना गुरू त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो दुःखी व असमाधानी असल्याचे त्यांना कळले. याचे कारण मात्र त्या तरुणालाच माहीत नव्हते. तेथे बाजूलाच एक सतार होती. गुरूंनी तिच्या सर्व तारा सैल केल्या व त्या तरुणाला सतार वाजविण्यास सांगितले.

    त्यावर तो तरुण म्हणाला, या तारा इतक्या सैल आहेत की, कोणालाही सतार वाजविणे अशक्य आहे. त्यावर गुरूंनी पुन्हा सतार हातात घेतली व तिच्या तारा एकदम ताणून बसविल्या व त्याला पुन्हा सतार वाजविण्यास सांगितले. तो तरुण लगेच म्हणाला तुम्ही सतारीच्या तारा एवढ्या ताणल्या आहेत की, ती वाजवायचा प्रयत्न केला तर ताराच तुटू शकतील. त्यावर गुरू त्याला म्हणाले की, तुझ्या दुःखाचे कारण तूच सांगितले आहेस. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास दुःख निर्माण होऊ शकते, जसे सतार अगदी सैल व फार ताणली तर तिच्यातून चांगले सूर येत नाहीत. तसेच जीवनात प्रत्येक गोष्टीत समतोल साधला तरच सुखासमाधानाचे संगीत निर्माण होऊ शकतं. त्या तरुणाला गुरूंचा हा उपदेश पटला व त्याने त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.