(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • नाडी ज्योतिष

    माणसावर ज्यावेळी एका मागून एक अकल्पित संकटे येतात त्यावेळी माणूस बुवा आणि ज्योतिषांचा आधार घेतो. मला स्वतःला अशा संकटातून जाताना शेवटी या शास्त्राचा आधार घ्यावा लागला.

  • प्रेमाच्या वाटेवर……..

    माझ्या वाचक मित्रांसाठी माझी ही पहीलीच दिर्घ् कथा !

  • किल्ल्यातील मुंबई ते किल्ल्याबाहेरील आधुनिक मुंबई

    मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही..... याबद्दल वाचा या लेखमालेत...


    मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.

    शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.

    नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.

    पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.

    माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.

    इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.

    मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.

    किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :

    १८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.

    १८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.

    एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.

    १८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्‍या काही लेखांमध्ये.....

    -- निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
    www.marathisrushti.com

    मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग १
    (क्रमशः)

  • सौर ऊर्जेवरील मोटारीमुळे शेतकर्‍यांना दिलासा

    हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.

  • वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

    मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे.

  • दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशा

    अमेरिकेने पाकला दिलेल्या इशार्‍यानंतरही दहशतवाद्यांच्या हालचाली थांबल्या नाहीत. अफगाणिस्तानात आय.एस.आयचे अधिकारी भारतविरोधी हालचालीसाठी दहशतवादी गटांना मदत करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांशी न्याय्य अटीवर समझोत्याचे प्रयत्न सुरू ठेवायला हवेत आणि त्यांना लोकशाही प्रक्रियेत आणायला हवे. पण याबाबत कायम आशावाद न बाळगता पावले टाकणेही महत्त्वाचे आहे.

  • आता कशाला उद्याची बात : शांता हुबळीकर

    जगातल्या संपूर्ण मानव जातीतल्या संस्कृतीत स्त्रीचे नेमके स्थान काय? वरवर सोपा वाटणाऱ्या या प्रश्नाच्या खोलात जसजसे आपण जाऊ लागतो तसतसे प्रश्नांचे जाळे आम्हाला चारही बाजूनी वेढू लागते. स्त्रीयांची शेकडो रूपे जगभरातल्या सर्वच प्राचीन अतिप्राचीन ग्रंथात व आधुनिक वाडमयात विखूरलेली आढळतात. यातील एक रूप म्हणजे वारागंना, गणिका, वेश्या. अमरकोशात हे सर्व शब्द समानअर्थी मानले गेले आहेत. ‘मेधातिथी’ हे मनूस्मृतीचे प्रचीन भाष्यकार मानले जातात. त्यांनी वेश्यांची दोन रूपे नोंदवली आहेत. पहिली जी संभोगाच्या इच्छेने अनेक पुरूषांवर अनुरक्त होते जिला त्यांनी “पुंश्चली’’ असे नाव दिले आणि दुसरी ती जी साजशृगांर करून पुरूषानां आपल्याकडे आकर्षित करते मात्र हृदयात संभोगाची इच्छा ठेवत नाही पण धन मिळताच संभोगासाठी तत्पर असते. तिला त्यांनी “गणिका” असे नाव दिले. गणिका ही वारागंना आणि वेश्येपेक्षा श्रेष्ठ समजली जाई. प्राचीन काळात वस्तुता कलारूप आणि गुणांनीयुक्त असलेल्या स्त्रीला गणिका असे समजले जात असे. ती राजदरबारात नृत्यगायन करीत असे व तिला वेतनही मिळत असे. अर्थात ही सर्व व्यवस्था पुरूषांनीच केली असल्यामुळे त्यांच्या स्वत:च्या मनोरजंनाची जबाबदारी स्त्रीयावर टाकून ते मोकळे झाले आणि परंपंरेच्या नावा खाली आजही ही व्यवस्था निर्धौकपणे चालू आहे… आज हे सर्व यासाठी आठवले की स्त्रीचे वेश्या हे रूप प्राचिन काळा पासून अधोरेखित झाल्यामुळे साहित्य,नाटक व चित्रपटात त्यांचे चित्रण येणे साहजिकच होते.

    व्ही.शांताराम हे सामाजिक वास्तवाचं भान आणि चित्रपट माध्यमाची व्यवस्थित जाण असणारे व्यक्तीमत्व. १९३९ मध्ये प्रभात या सुप्रसिद्ध कंपनीने ‘माणूस’ हा चित्रपट तयार केला. शांताराम बापू हे दिग्दर्शक. काळाचा विचार करता यातील विषय स्फोटक होता. पोलिस हवालदार आणि आणि वेश्या यांच्या संबंधावर ही कथा बेतलेली होती. एकदा वेश्येवस्तीवर पोलिसांची रेड पडते त्यात हवालदार असलेला नायक एका वेश्येची मुक्तता करतो आणि नंतर हळूहळू तो तिच्या प्रेमात पडतो. तिला यातुन बाहेर पडता यावे म्हणून लग्न करायची तयारीही करतो पण तसे काही घडत नाही. समाजाची वेश्येकडे पाहण्याची दृष्टी यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. यातील हवालदाराची भूमिका शाहू मोडक यांनी केली. तर मैना या वेश्येची भमिका शांता हुबळीकर यांनी केली. खरे तर सुरूवातीस मैनेच्या भूमिकेसाठी शांता आपटे आणि हवालदाराच्या भूमिकेसाठी संगीतकार वसंत देसाई असे शांताराम बापूच्या डोक्यात होते. पण नंतर हे दोन्ही कलावंत बदलले.

    सुरूवातीच्या काळात ‘चित्रपटात स्त्रीयांनी काम करणे हा सांस्कृतिक परंपंरेवर घाला आहे’ असा मानणारा एक वर्ग होता. त्यामुळे सोकॉल्ड उच्च शिक्षित व कुलीन घराण्यातल्या स्त्रिया या पासून लांबच होत्या. पण नंतर हळूहळू परिस्थितीत बराच बदल होत गेला व स्त्रिया देखिल चित्रपटात काम करू लागल्या. शांता हुबळीकर यापैकी एक. ‘माणूस’ मधील त्यांची भूमिका रेड लाईट एरियातील असल्यामुळे आव्हानात्मक म्हणायला हवी. कारण यापूर्वीच्या नायिका आणि ही नायिका यात खूप मोठा फरक होता. शांता आपटे ऐवजी शांता हुबळीकर यांची निवड शांताराम बापूनी का केली असावी ? त्याचे कारण बहूदा त्या दिसायला खूप आकर्षक वेगैरे नव्हत्या यात असावे. कारण ज्या रेड लाईट ऐरियातील या स्त्रीया होत्या किंवा असतात त्यांचा सामाजिक स्तर खालच्या पायरीवरचा असतो. शांता आपटे सारखा उच्चकुलीन देखणा चेहरा या व्यक्तीरेखेशी कदाचित एकरूप झाला नसता. कर्नाटकातील हुबळी या शहराजवळील अदरगुंजी या खेडेगावात शांता हुबळीकर यांचा जन्म झाला. बालपण कष्टाचेच. मात्र गाण्याची बर्‍यापैकी समज असल्यामुळे नाटक व चित्रपटात त्यानां संधी मिळाली. भालजी पेंढारकर यांच्या “कान्होपात्रा”या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम संधी मिळाली. यातील भूमिकेमुळेच शांताराम बापूना त्या या भूमिकेसाठी योग्य वाटल्या. हा एक योगायोगच म्हणावा लागेल की संत कान्होपात्रा या पण नायकिनीच्या परंपंरेतील पण नंतर संत पदास पोहचलेल्या स्त्री. शांताबाईंनी मैना ही भूमिका मिळाली तीही वेश्येची. त्यानां प्रभात फिल्म कंपनीत “माझा मुलगा”,”माणूस” या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील भूमिकांचं कौतुक झाले. शिवाय त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली. ”माणूस” चित्रपटातील “ आता कशाला उद्याची बात” हे त्यांचे गाणे आजही लोक बऱ्यापैकी आवडीने एकतात.

    लाज”,”कुलकलंक”,”मालन”,”घरगृहस्थी”, इत्यादी हिंदी चित्रपटांत देखिल त्यांनी कामे केली. विश्राम बेडेकर दिग्दर्शित ”पहिला पाळणा” मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. १९३९ मध्ये बापूसाहेब गीते यांच्या बरोबर त्यांनी लग्न केले पण लग्ना नंतरही कौटुंबिक परिस्थितीची गाडी रूळावर येत नव्हती म्हणून त्या चित्रपटातुन काम करतच राहिल्या. नंतर वयोमानामुळे त्यानां चरित्र भमिकेकडे वळावे लागले. आजच्या पिढीला त्या काळातील अभिनेत्यांचा अभिनय ओव्हरअक्ट वाटू शकतो. कारण त्यावेळी नाटकीय अभिनयाच्या प्रभावातून चित्रपट मुक्त झाला नव्हता. मला महत्वाचे वाटते ते हे की कायम सामाजिक उपेक्षा सहन करणाऱ्या या समूहाचे चित्रण करण्याचे धाडस निर्माते, दिग्दर्शक व अभिनेत्री शांताबाई यांनी दाखवले आणि त्या पात्राला न्याय ही दिला. अनेकदा चित्रपटाचा नायक त्यातील विषय हाच असतो.

    शांताबाई हुबळीकरांचे उत्तर आयुष्य मात्र अत्यंत हालाखित गेले. १९५८ साली प्रदर्शित झालेला फिल्मिस्तान बॅनरचा हिंदीतील “सौभाग्यवती भव” हा त्यांचा शेवटचा चित्रपट.यात पहिल्यांदाच त्या चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकेत होत्या. नंतर मात्र त्या चित्रपटसृष्टीतील लखलखाटा पासून दूर गेल्या. अनेक वर्षे तर त्या अनाथ आश्रमातच होत्या. नंतर १९८८ मध्ये त्या अज्ञातवासातून बाहेर आल्या खऱ्या पण कौटुंबिक सुख काही पदरी पडले नाही. पती बापूसाहेब गीते १९७७ सालीच निधन पावले होते.इ शेवटी शेवटी त्या पुण्याच्या अनाथ महिला आश्रमात राहिल्या. १७ जुलै १९९२ रोजी त्यांची ही कष्टमय यात्रा अखेर संपली. कधी काळी देशभर प्रसिद्ध असलेल्या शांता हुबळीकरांचा शेवट असा विजनवासात व्हावा हे मात्र खूप खटकते. चित्रपट ही मायावी नगरी आहे असे म्हटले जाते ते कदाचित यामुळेच. आज त्यांचा स्मरण दिवस.

    दासू भगत (१७ जुलै २०१७)

  • चीन-अमेरिकेदरम्यान नवे वाद

    गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले शीतयुद्ध अलीकडेच वाढले. नोबेल शांतता पुरस्कारआणिचलनदराच्या प्रश्नावर या दोन देशांमध्ये अलीकडे संघर्ष झाला. या दोन प्रश्नात चलनदराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा. चलनदरवाढवण्याची मागणी चीन मान्य करत नाही तोपर्यंत आर्थिक मंदीतून वर येणे अमेरिकेसाठी अवघड ठरणार आहे. अर्थकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत आहे.

  • कर्णपिशाच्च.. (बेवड्याची डायरी – भाग ३८ वा)

    आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..

    एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....

    त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..

    इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..

    दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..

    मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा वाहिनी भेटीला आल्या होत्या ना ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..

    सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • उपनगर नाही.. स्वतंत्र ओळख असलेलं डोंबिवली शहर

    डोंबिवली हे शहर खूप पुरातन आहे असे म्हणतात. मात्र इतिहासात तसा डोंबिवली शहराचा फारसा उल्लेख सापडत नाही.

    इ. स. ८४३ मध्ये कोंकणचे राज्य शिलाहारास मिळाले. शिलाहारांनी पुढील ४५० वर्षे या प्रदेशावे सुखनैव राज्य केले. इ. स. १२६५ च्या सुमारास यादवांनी शिलाहार राजवटीचे उच्चाटन केले.

    अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर उदयास आलेल्या सुलतानांच्या अंकित सरदारांची राजवटी शिलालेख सापडले आहेत. त्यात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. तुर्भे बंदरानजीकच्या माहूल गांवात इ. स. ११५६ चा एक शिलालेख सापडला आहे. त्यात ’डोंबल वाटिका’ असा उल्लेख आढळतो. परंतू त्याबाबत अनेक मतभेद आहेत.

    सन १८८७ साली डोंबिवली स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर ब्रिटीशांनी सन १९२० मध्ये मॅरहॅम वसाहतीची स्थापना केली आणि पांढरपेशा वर्गाला या नव्या वसाहतीत राहण्यासाठी उद्युक्त केले. कदाचित त्यामुळे आजच्या पश्चिम भागाला जुनी डोंबिवली तर पूर्व भागाला नवी डोंबिवली असे म्हटले जाऊ लागले. स्वच्छ हवामान ही येथील जमेची बाजू या विकासाला पोषक ठरली आणि वाढत्या संख्येने येथे कायमच्या वास्तव्यासाठी लोक येऊ लागले.

    सध्या मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडून लांबलांबच्या ठिकाणी स्थायिक होताना दिसतो. निवासाच्या जागांची स्वस्तात उपलब्धता हेच याचे कारण आहे. दादर-गिरगावमधल्या एक-दोन खोल्यांच्या बदल्यात डोंबिवली-कल्याण-बदलापूरला प्रशस्त फ्लॅट मिळतो हे गणित. त्यामुळे अगदी अलिकडच्या काळात मुंबईतून हजारो कुटुंबे डोंबिवलीला स्थलांतरित झाली.

    डोंबिवलीने स्वत:ची एक खास ओळख मात्र जपून ठेवलेली आहे. डोंबिवली शहर खरोखर शांतताप्रिय समाजाचं प्रतिक. डोंबिवलीकरांनी आपल्या संस्कृतीचा वारसा आजतागायत जपलेला आहे. डोंबिवलीकर मराठी असो की दाक्षिणात्य, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची अभिरुची उच्च असते. अनेकविध प्रांतातले लोक इथे नांदत असले तरीही ते इथल्या मूळ मराठी संस्कृतीशी समरस झालेले दिसतात.

    दंगली, मारामारी, खून, दरोडे यांपासून डोंबिवलीकर अलिप्तच दिसतो. कदाचित अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजात गुंतल्यामुळे या बाहेरच्या गोष्टी करायला त्याच्याकडे वेळच नसावा. अर्थात मुलातच सुसंस्कृत असल्याने त्याला यात रसही नसावा. कुठे खुट्ट झालं की ठाणे बंद, महाराष्ट्र बंदची हाक दिली जाते तशी डोंबिवली पूर्ण बंद असलेली कधी ऐकलीच नाही.

    डोंबिवलीकर हा अत्यंत शिस्तप्रिय असल्याचे लक्षात येते ते एकाच गोष्टीवरुन. वेळ ही तासात किंवा मिनिटातच मोजतात असे नाही तर ती सेकंदातही मोजावी आणि पाळावी लागते हे डोंबिवलीकरांनी जाणून घेतलेय. त्यामुळेच सकाळ-संध्याकाळच्या रेल्वेगाड्यांचं टाईमटेबल बहुतेकांना पाठ असतं आणि तेही ८.५७, ९.०३ अशा अगदी तास आणि मिनिटानुसार. डोंबिवलीकर “साडेआठची गाडी” असं म्हणणारच नाही. “आठ एकतीसची दादर फास्ट” हे त्याच्या सहजपणे तोंडावर येतं.

    पुलंसहित अनेक साहित्यिकांच्या लेखणीतून डोंबिवलीचा उल्लेख आला आहे. पुलंचे डोंबिवली प्रेम तर जगजाहिर आहे. शन्ना नवरे तर येथेच वास्तव्याला होते. अनेक राजकीय नेते इथेच उदयाला आले आणि मोठेही झाले. काहींना प्रेमळ सासरही डोंबिवलीतच मिळालं.

    कलाकार, खेळाडू, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात डोंबिवलीकर पुढेच आहेत आणि त्यांची ही वाटचाल अशीच सुरु रहाणार आहे.

    -- निनाद अरविंद प्रधान

    (महाराष्ट्रातील शहरांची ओळख करुन देणारी ही लेखमाला नियमितपणे प्रसिद्ध होईल. आपल्यालाही कोणत्या शहराविषयी लिहायचे असेल तर जरुर लिहा. डोंबिवलीच्या तुमच्या आठवणी आणि किस्से जरुर शेअर करा. )