जीवन ही एक कला आहे. मानवी जीवनात कला नसेल तर औदासिन्य , दैन्य असेल. कलाकार आपली कला जीव ओतून सादर करत असतो.रसिक त्यास प्रतिसाद देतात. रसिकांचा प्रतिसाद हा कलाकारांचा खरा आनंद असतो. कलाकाराच्या दृष्टीने कला हे त्याच्या जगण्याचे आणि इतरांना आदर्शवत जगवण्याचे माध्यम असते. चित्रकार रंगरेषांच्या, गायक आवाजाच्या, वादक वाद्यांच्या तर लेखक लेखनीच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतो. कला त्याच्यासाठी जीव की प्राण असते. तो कलेत रमतो.कला जगतो.कला जोपासतो. कला परंपरेने आणि आवडीने त्याचबरोबर कौशल्याने साध्य होते. कलेच्या साधनेसाठी कठिण परिश्रमाची गरज असते.तरच ती अवगत होते.
लग्नकार्यात गायक गातात. वर्हाडीमंडळीचे मनोरंजन करतात. सनई ,चौघडा, बासरीबरोबर ढोल आणि बँडवादनही होते. किर्तनात पकवाज, टाळ, हार्मोनियम अशी वाद्ये असतात तर गायक , वादक , किर्तनकार सहभागी असतात. लोककलेतही तमाशामध्ये ढोलकीवादक, नृत्यकला, अभिनय कला असते. जागरण गोंधळामध्ये संबळ, ढोलकी , तुणतुणे या वाद्यांसह वाघ्या-मुरळी हे कलाकार असतात. देवीच्या मंदीरात आराधी आपली कला सादर करतात. कवड्याच्या माळा, ज्योत आणि एकासुरात लोकगीते म्हणणारी कलावंत मंडळी येथे असते.चित्रपट, नाटक यांतूनही कलाच आविष्कृत होते.त्याचबरोबर पोतराज, मसनजोगी, कुरमुडेवाले, नंदीबैलवाले यांचेसह असंख्य लोककला जोपासणारे कलाकारच असतात. त्यांचे जीवनमान आज कसे आहे ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जागतिकीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या स्पर्धेच्या युगात नुसती भागंमभाग चालू आहे. रस्त्यावरचा डोंबार्याचा खेळ पाहण्यात कोणालाही रूची नाही. कलाकार जीव ओतून, मेहनतीने कलेचे सादरीकरण करत असतो. ज्याच्या कलेला समाजाचा आधार मिळाला तो कलावंत यशस्वी होतो. यश, प्रसिध्दीच्या जोरावर अर्थप्राप्ती होते. सिनेतारका , सिनेकलावंत यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. टीआरपीवाढीसाठी चढाओढ लागते. झगमगाटी दुनिया असते.अशा कलाकारांचा वेगळा समुह होतो. आज लाखो कलावंत असे आहेत की कला सादरीकरणासाठी त्यांना संधी नाही.मंच नाही.जी व्यवस्था आहे ती कमकुवत आहे. आराधी, गोंधळी किंवा इतर लोककलावंताना चरितार्थ चालविण्याचे साधन त्यांचेकडे नसते. एकतर समाजाचा आधार संपुष्टात येत असताना उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अनेक कलावंत खितपत पडलेले आहेत. तमाशातील वगामध्ये राजाचे पात्र करणारे कलावंत स्वतःच्या जीवनाचा तमाशा करून बसले आहेत! कलेच्या माध्यमातून जे काही मिळते त्यातून उपजिवीका न भागल्याने कित्येक कलावंतांनी एकतर ती कला सोडून दिली किंवा स्वतः नैराश्याच्या गर्तेत गेलेले आहेत. काहींनी व्यसनाला जवळ केले आहे.
प्राचिन काळात कला जाणिवपुर्वक जोपासली जायची. राज्याच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे भर पडायची. युग बदलले. यांत्रिकीकरणामुळे पोटाचेच प्रश्न निर्माण झाले.गतीमान युगात नवनवे शोध लागत गेले तसा लोककलेचा वारसा कमी होत गेला. पुढील पिढीत हे गुण उतरत नाही. त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत अथवा कालौघात दुर्लक्षित झाले. त्यामुळे झाले काय की जी वैभवशाली परंपरा आपण निर्माण केली होती.जी बाब समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप मोलाची भर टाकत होती. सुसंस्कृत समाजासाठी ज्याचा मोठा हातभार होता अशा कला लोप पावत चालल्या आहेत. एकेकाळी रसिकजनांनी डोक्यावर घेतलेली कला नावापुरतीच राहीलेली आहे. जत्रा, यात्रा, उत्सव , बाजार असे समाजसमुहाचे उपक्रम कमी होत आहेत तसा या कलांची र्हासाकडे वाटचाल सुरू आहे. शिवकालात याच लोककलेने महत्वाची भूमिका बजावलेली आहे.तमाशा, पोवाडा, भजन किंवा कोणतीही लोककला असो आता समाजमान्यता कमी होतेय. राजमान्यतेच्या बाबतीतही तेच आहे. त्या कलावंतासमोर आज खूप अडचणी आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील. किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल ते सोडविण्यासाठी कुणालाही त्यात रस नाही.कितीतरी वृध्द कलावंत जर्जर आजाराने त्रस्त आहेत. त्यांना विमाकवच नाही कि सुरक्षाकवच नाही. जोपर्यंत कलावंताच्या अंगात रग आणि धग आहे तोपर्यंत धरपड करण्यातच त्याची कला संपते. सिनेमा,ऑडिशनच्या , चित्रपटात काम देण्याचा स्वप्नापायी कितीतरी कलाकाराची फसवणूक होऊन जीवन बरबाद झालेले आहे. त्यासाठी आज काहीतरी उपाययोजना करावीच लाजेल.. हजारो स्वप्न उराशी घेऊन आलेले तरूण कलाकार गैरमार्गास गेलेले आहेत. हे वास्तव स्वीकारण्यावाचुन पर्याय नाही.
वृध्द कलावंताना व्यवस्थेकडून मानधन मिळते . कितीतरी वर्षापासुन त्यात वाढ झालेली नाही. कितीतरी कलावंत अजुनही मानधनापासुन वंचित आहे. 'क' दर्जाच्या कलावंताला दरमहा दीड हजार इतके मानधन मिळते. ते त्याच्या उपजिविकेसाठी पुरते का ? निवड प्रक्रिया किती पारदर्शक होते हेही महत्वाचे असते. बँकेच्या दारात मानधनासाठी तासन् तास ताटकळत बसणार्या कलावंताला मिळणारी वागणूक आश्चर्यचकित करणारी आहे. तालुक्यातून दरवर्षी फक्त तीन चारच प्रस्तावाची शिफारस होते. यातून काही अडाणी दुर्गम भागातील लोककलावंत पुढे येत नाहीत किंवा त्यांच्या कलेचे मुल्यमापन करण्याचे कोणतेच परिमाण उपलब्ध नाही. संगणक क्रांतीमुळे या लोककला लोप पावत चालल्यात. तसे काही वृद्ध कलावंताचा तर मानधन न मिळताच मृत्यूही झालेला असतो.
लोककला असो की इतर कला असो ही जाणिवपुर्वक जोपासायला हवी. तिचे संगोपन, संवर्धन हे शासन आणि समाजव्यवस्थेने केले पाहिजे. सुसंस्कृत समाजासाठी ते गरजेचे आहे. कला, क्रिडा क्षेत्रात नैपुण्य मिळवार्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस गुण देण्याचा निर्णय असताना खूप मुलं त्यापासून वंचित राहतात किंवा ज्यांचे पालक सुशिक्षित आहेत अशांचीच दखल घेतली जाते. लोककला सादर करणार्या विद्यार्थ्यांचा या गुणवाढीसाठी काही उपयोग नाही. लोककला जतन झाल्या. तिचे संगोपन झाले तर समाजजीवनात रस निर्माण होईल. मान्यताप्राप्त कलावंताच्या पाल्याला नोकरी आणि शिक्षणात सवलती देता येतील.
पुण्यनगरी
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड
संपर्क-9421442995
सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.
सत्तावीस नक्षत्रांपैकी 17 व्या क्रमांकाचे हे नक्षत्र. अनुराधा हे नावच स्त्रीलिंगी आहे. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती ही मातृत्व जागरूक आणि जागृत असलेली असते. मृदू स्वभावाच्या या नक्षत्रावरील जन्मलेल्या व्यक्ती या पृथ्वीतत्त्वाचा असल्यामुळे यांनी शीतरंग हे वस्त्र प्रावरणाच्या रंग निवडीत अधिक प्रमाणात उपयोगात आणावेत. निळा मोरपंखी हिरवा हॅलो आकाशी लीफ ग्रीन आणि कधीतरी सप्ताहातून एखादे वेळेस लालसर नारिंगी रंगांचे कपडे उदाहरणार्थ पंजाबी, टॉप, साडी, नाईटी, गाऊन इत्यादी हे महिलांसाठी तर पुरुषांनी टी-शर्ट, शर्ट, जब्बा, नेहरू शर्ट, इत्यादी वापरात आणावे. ब्राउन किंवा तपकिरी हा रंग ही यांच्यासाठी लॉटरी सारखे फळे देणारा ठरतो.
भाताच्या ढिगाप्रमाणे या नक्षत्राचा अवकाशात दिसणारा आकार आहे. चार तारे या नक्षत्रात दिसतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा नक्षत्र अनुराधा असते. अशा व्यक्तींनी डाळिंब हे फळ खाण्यामध्ये नियमित ठेवावे. म्हणजे वृश्चिकेचा एक गुण जो इतरांना न परवडण्यासारखा असतो तो जरा कमी कमी होईल. या व्यक्ती शक्यतोवर कठीण शब्द बोलताना वापरत नाहीत. मात्र समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतील कुठल्याही कारणासाठीची सहनशक्ती संपुष्टात आल्यावर या व्यक्ती एखादे वाक्य अगदी शब्द देखील,वृश्चिकेच्या डंख मारण्याप्रमाणे वापरतील की, समोरची व्यक्ती बेजार वा घायाळ होऊन जाते. या नक्षत्रासाठी अग्नेय दिशा भारत चांगली. ज्या वास्तूत या व्यक्ती वास करतात, त्या वास्तू बरोबर या व्यक्तींची घट्ट मैत्री जमते. कारण वास्तुपुरुष देखील अग्नेय दिशेला असतो.
या नक्षत्राची देवता मित्र असून नागकेशर हा आराध्यवृक्ष आहे. ओम मित्राय नमः हा जप कुलस्वामी कुलस्वामिनी जपानंतर १०८ वेळा म्हणाल्यास अशा व्यक्तींना परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग (सोल्युशन/सोलूशन)आपोआप मिळते. नागचाफा या आराध्यवृक्षाशिवाय बकुळ/केवडा हेही आराध्याचे उपवृक्ष म्हणून योजलेले आहेत.
आपण आपल्या देवतांचे वा प्रियजनांची छायाचित्रे वा फोटो जवळ ठेवतो त्याप्रमाणे आपल्या आराध्य वृक्षाचा फोटो देखील या व्यक्तीने जवळ ठेवल्यास यांना आणखी जादुई परिणामांचा अनुभूती येतील. ऑगस्ट ते ऑक्टोबर हा इंग्रजी महिन्यांचा काळ या नक्षत्र धारकांसाठी सुगीचा काळ असतो. म्हणजे बारा महिन्यांपैकी या महिन्यांच्या काळात या व्यक्तींनी कुठलाही निर्णय घेतला तर त्याचे फळ हे मिळतेच. नागकेशराला वर्षातून जशी दोन वेळा फुले येतात त्याच प्रमाणे या व्यक्तीही वर्षातून किमान दोन वेळा आनंदी जीवनाचा अनुभव घेतात.
मित्र पद्मासनारुढं अनुराधेश्र्वरं भजे ।
शूलां कुशल सद्षांहूं युग्यंशोणित वर्णकम् । हा मंत्र जप या व्यक्तींनी म्हटल्यास अधिक उत्तम. शिवाय
अनुराधाधियोमित्रः आयुष्योवर्धकस्तथा ।
सर्वारिष्ट विनाशाय मित्रायच नमो नमः ।। हा जप देखील या व्यक्तींनी केला तर पीडा हरण होतील म्हणजे नष्ट होतील. या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती दयाशील, बुद्धिवान, प्रवासी, अल्प पुत्रवान, शांत आणि स्त्रियांसाठीहे नक्षत्र अधिक चांगले गुण देते जसे उत्तम मैत्री, मैत्रिणी देते, अभिमान नसणारी प्रसन्नता देऊनसर्वांना मान्य असणारे व्यक्तिमत्त्व देते. गुरुभक्ती सह या नक्षत्रावरील स्त्रिया या अखंड सौभाग्य प्राप्त करणाऱ्या असतात.
सर्वांची काळजी घेणाऱ्या या नक्षत्रावरील स्त्रियांची काळजी मात्र स्वतःलाच घ्यावी लागते. वरील रंगांबरोबरच यांनी सोनेरी आणि पांढरा तसेच चंदेरी रंग ही उपयोगात आणण्यास हरकत नाही.
शुभम भवतु
- गजानन सिताराम शेपाळ.
शाळा गावचं वैभव असते.शिक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती असते. गावचा सुशिक्षीतपणा घेतलेल्या ज्ञानावर अवलंबून असतो. त्या गावात माध्यमिक शाळा आहे. दहावी आणि बारावीतील मुलांना निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले होते. मुलामुलींची भाषणं झाली. कार्यक्रम जोरात होता.गावातील प्रतिष्ठित मंडळी भाषण करत होती. अध्यक्षीय भाषण, बक्षीसवितरण कार्यक्रमही उरकला.बराच वेळ झाल्याने मुलं चुळबुळ करत होती. सुत्रसंचलकाने शब्द उच्चारले ' आता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होते ते साहित्यिक आपल्या समोर ... सादर करतील. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या !' मी दचकलो.एकतर सूर्य आग ओकतोय! मुलांची मानसिकता नसेल. आपण कशाला विनाकारण त्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळायचे! भीतभीतच उभा राहीलो.
मित्रांनो , याच गावात मी आठ वर्ष सेवा केली. तुमचा काहींचा जन्मही नसेल. हंगे अण्णाच्या इथे खोली करून राहिलो. कथा, कविता लिहील्या. भिंतीवर संत ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधीजींच्या प्रतिमा ऑईलपेंटमध्ये पसायदान अन् सुविचार आम्हीच लिहीले. ते साकारत असताना माझा मुलगा पळत आला. आपटला फरशीवर.त्याचा हात मोडला.पण फोटो पूर्ण होईपर्यंत दवाखान्यात नेला नाही छोकरा.
शिकवली ती आता मोठी उच्चपदस्थ झाली. भरपूर नोकरीत गेली. काही व्यवसायात गेले. मेहनतीनं मोठी झाली. गावाने अडचणींच्या काळात मदत केली. किराणा,दुधवाले, घरभाडे उधार. ते फक्त दिडशे रूपये महिन्याला. परिसरात झेडपीच्या शाळेचा दबदबा होता.चौथीपर्यंत साडेचारशे मुलं होती. शाळेला स्वतःच रंग देत होतो. बदली झाली तो दिवस अजुनही आठवतो मित्रांनो. टेंम्पोत पसारा भरणे सुरू होते. लेक वाट लावावी तसे गावकरी, घरमालक तसे लेकरं रडत होते. गावचा लळा आणि जिव्हाळा तोडणं अवघड होतं पण नाईलाज होता.
मुलं ऐकत होती. माझीच कथा.तिचे कथाकथन केव्हा झाले. मलाच कळले नाही. लेकरं भाऊक झाली होती. दोन कविता घेतल्या. मने जिंकल्याचा आनंद लपून राहिला नाही. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार तालुक्यातील पाडळी हे गाव. गावात अनेक जातीधर्माचे लोक . गुण्यागोविंदाने नांदणारी. अनेक विद्यार्थी आजही भेटतात. ' ओळखला का सर ?' असं म्हणतात.आता पोरांचे चेहरे मिसरूड फुटलेले. ओळखता येत नाहीत . विचार करून ' नाही ' असेच उच्चारण करावे लागते. बाहुलीनाट्याचे प्रयोग,गॅदरींग यांचा झकास मोसम असायचा ते दिवस आठवले की मन हरवून जाते. बदली रद्द होण्यासाठी ग्रामस्थ टेंम्पो भरून पंचायत समितीला आले होते. हे कोणत्या प्रेमाचे द्योतक म्हणायचे?
विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
मो.9421442995
जकार्ता सोडल्यावर बोट निघाल्यापासून तासाभरात निळ्याशार समुद्रात गेल्यावर वारा आणि लाटांमुळे बोट रोलिंग करायला म्हणजेच घड्याळाच्या दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागली होती. सकाळचे सव्वा आठ की साडेआठ वाजता बोटीत येऊन सीटवर बसल्या बसल्या थंडगार एसी मुळे जी झोप लागली ती दोन तासांनी अनाउन्समेंट झाली नसती तर कदाचित उडाली नसती.
स्पर्श तुझा
चुंबीलाय प्रत्येक शब्द तुमचा
ऒठ प्रियेचे चुंबणे होत नाही.
ताई हे नाव इंदूबाई गणपती तोडकर या नावाने अख्या तोडकर भावकीत तीनशे साडेतीनशे लोकातच नव्हे तर अखंड गावात ओळखलं जात होतं. लहानापासुन थोरांपर्यंत तिला प्रत्येक माणूस ताई म्हणुनच हाक मारत असे.
..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
Copyright © 2025 | Marathisrushti